आधीच्या भागांची लिंक
भाग १ - http://www.maayboli.com/node/40847
भाग २ - http://www.maayboli.com/node/42011
भाग ३ - http://www.maayboli.com/node/42077
भाग ४ - http://www.maayboli.com/node/42134
भाग ५ - http://www.maayboli.com/node/42252
भाग ६ - http://www.maayboli.com/node/42292
भाग ७ - http://www.maayboli.com/node/42397
पुढे..
"आता लगेच एका दिवसात आत्याशी गाठ घेऊन बोलायला वेळ नव्हता. पण आम्ही आमचं ठरवून टाकलं की लग्न पक्कं आहे. ती रात्र मी टक्क डोळे उघडे ठेवून छताकडं बघत काढली.
आपल्या भेटीगाठी आठवत राहिले. आपली जवळीक, तुझा आधार, त्या धुंद वेळा सगळं मनात फिरत राहीलं. वेड लागेल असं वाटायला लागलं. बघ ना, आपल्याला आवडत असलेल्या माणसाला आपण आवडत नसू तर आपल्याला दु:ख होतं पण त्याला आपण आवडत असून मिळवता येत नसेल तर किती घुसमट होती काय सांगू? ती भयानक रात्र मी अजून विसरू शकत नाही सम्राट. "
सम्राटनं तिचा हात पुन्हा हातात घेतला. " मला माहितीय गं. ती घुसमट तुम्ही वाड्यावर आलात तेंव्हा माझी पण झाली ना . आणि त्यानंतरच्या किती रात्रि मी अशा काढल्या असतील. "
" मी दुसर्या दिवशी जवजवळ शुद्धीत नव्हतेच. कसंबसं आईबाबांनी मला आधार देत वाड्यावर आणलं. कोण काय बोलतंय ते पण धड कळत नव्हतं. फक्त तुझा आवाज ऐकला तेंव्हा कसं कोण जाणे ऐकू आलं. 'लग्न मोडा' आणि 'सगुणा तुला काय वाटतं?' ही वाक्यं मला कळली. मनानी पुन्हा उचल खाल्ली. वाटलं ओरडावं जोरात की 'मला तुझ्या मिठीत यावंसं वाटतं आत्ता. बस जगातलं दुसरं काही नको या वेळी.' पण राधाईंचं बोलणं आठवलं. माझ्या ओढीपायी तुझ्या जिवाशी खेळ करायचा नव्हता मला. आणि आईनं पण समजाऊन सांगितलं होतं, "श्रीमंताचा शिकल्याला पोरगा बाई त्यो . चार दिवसात इसरंल तुला. उगा त्याच्या आईनी संगितल्याबर केलं तर तू इधवा हुशील. अन मग काय त्या आपल्याला सोडतात होय. घरदार उजाड हुईल पोरी. असं ना तसं तुला सुक लागू देनार न्हाईत त्या. पोराचा जीव जाया पायजी का तुला? " मी थरथरले. मला तुझ्याबरोबरचं चार दिसांचं जमीन्दारीण होऊन राहणं आणि मग तुला गमावणं पटणारं नव्हतं. तू किती म्हणालास ’मी बघतो’ तरी तुझ्या आईबाबांपुढं तुझा पाड लागला नसता."
सम्राट हताश होऊन ऐकत होता. त्याला तिची मन:स्थिती समजत होती. माझी सगुणा. माझ्याशिवाय आयुष्य काढलं. माझ्यासाठी. आणि वर मी तिलाच दोषी समजत राहीलो. किती नावं ठेवली असतील मनातल्या मनात.
" आई असं करेल असं वाटलं नव्हतं गं सगुणा. स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. उलट तिनीच माझी काळजी घेतली. तोपर्यंतच्या त्यांच्या वागण्यावरून आणि तिनं जितक्या सहजपणानी ऐकून घेतलं त्यावरून मला वाटलं की हे दोघं पसंत नसलं तरी लग्नाला अडथळा आणणार नाहीत. अगदी नाराजी दाखवली तरी मी लाडीगोडी लाऊन हट्ट करून मिळवीन पाहिजे ते. आता मात्र विचार केला की वाटतं, त्यावेळी सुद्धा इतक्या सहजपणानी तिनी ऐकून घेतलं त्यावरून मला जरा काळंबेरं दिसायला पाहिजे होतं. पण मीच आधी कमीपणा घेत होतो. त्यांना साजेशी सून आणत नाही म्हणून. आणी तुम्ही आल्यावर जे घडलं त्यानी मी तुलाच नावं ठेवत राहीलो गं. वळणावर गेली. करंटी, नतद्रष्ट बाई. हातातलं प्रेम, वैभव घालवून गेली शेतात राबायला. असा राग राग आला तुझा. आणि माझा स्वत:चा पण. इतकं सगळं समोर असताना नको तिच्या प्रेमात पडलो. आणि तिथंही हरलो असलं काय काय रोज बोलायचो गं. चुकलं गं माझं. "
सगुणाच्या डोळ्यातून पाणि वाहायला लागलं. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत ती म्हणाली,
"खरंच होतं ते सम्राट. कुठल्या दृष्टीनी तुझ्या लायकीची होते मी. एकदा पहिला दु:खाचा भर ओसरल्यावर वाटलं जे झालं ते बरंच झालं. मी मैत्रीण म्हणून तुला माझ्यासारख्या मुलीशी लग्न करण्याचा सल्ला दिला असता का? नाहीच का नाही? मग उगच भावनेच्या भरात काहीतरी करून बसल्यासारखं झालं असतं ते. मी लग्न टाळलं. बाबा आत्याला सांगायला जाणार असं ठरलं. पण मला काय जमेना ते सगळं. सहनच होईना. आता आईबाबाला बोलण्याचा पण उपयोग नव्हता. मी सरळ घर सोडलं. शहरात आले. मैत्रिणीचा पत्ता शोधला. आमच्या जातीची मदत घिऊन एका NGO मध्ये कामाला लागले. फ़िरायचं, अंगणवाड्यांमधे जायचं, पोरांना शिकवायचं आणी खरं म्हणजे स्वच्छता शिकवायची असलं काम होतं. ते आवडायला लागलं. डोकं चालत होतं आणी एकटी असल्यामुळं थोडा वेळ पण होता. आम्ही काही बायका संस्थेतच झोपायचो. मग रात्रीचं कॉलेज सुरू केलं. बी. कॉम. केलं. मॅडमनी मदत केली. म्हणाल्या, शिक्षण संपलं की इथंच अकाऊण्टस बघ. टायपिंग कर. मग तसंच ठरवलं. पण कॉलेजातली जवळची मैत्रीण स्वत:चा बिझनेस करायची. हॉटेल होतं तिचं. ती पण दिवसाचा हॉटेलचा बिझनेस करून रात्री शिकायला यायची. तिला पैसा मिळत होता पण शिक्षण अर्धवट राहिलं होतं. ती म्हणाली माझ्या हॉटेलचं अकाऊंट्स आणि इतर काम बघशील का?मला बाईच हवी आहे कामाला. मग मॅडमना विचारून दोन्ही करायला लागले. हळूहळू हॉटेलच्या धंद्यातलं कळायला लागलं. मैत्रीणीनी नवीन होटेल काढलं तेंव्हा पार्टनरशिप दिली. "
सम्राट आश्चर्यचकित होत होता. त्यानी सगुणाच्या ज्या आयुष्याची कल्पना केली होती त्यापेक्षा ती काहीतरी वेगळंच करत होती. अगदी ती इथं आल्यावर पण, तिला बघितल्यावर पण त्याला माहीत नव्हतं ती असं काहीतरी करत असेल. मग पुढं झालं काय? माझी गरज कशी पडली? इथं का आली? पण हे लगेच विचारायचं त्याला धाडस झालं नाही.
"सगुणा, अगं हे काय तरी वेगळंच केलंस तू. मला वाटत होतं तू आपली आत्याच्या पोराशी लग्न करून राबत असशील. चार पोरं झाली असतील तुला. तुला बघितल्यावर पण विचार करत होतो कि हिला सासुरवास झाला असेल. नवर्यानी, सासुनी घराबाहेर काढलं असेल. पण पोरांचं काय केलं असशील? कशी आली असशील सोडून? "
सगुणा गप्प झाली.
" बरं मग सांग की पुढं काय झालं?"
" तुला आवडलं नाही का रे हे सगळं? म्हणजे तुला असं वाटत होतं कि मी आपला चुपचाप संसार केला असता तर बरं झालं असतं? "
सम्राट दचकला, "अगं मला कशाला असं वाटेल? आणि माझा काय संबंध होता तुझ्या आयुष्याशी तेंव्हा?"
" तसं नाही रे. तू माझ्याबद्दल काय विचार करतोयस याची मला आता का कुणास काळजी वाटायला लागलीय. म्हणजे मी अशी एकटी बिना लग्नाची शहरात राहिले. फिरले. तुला असं नाही ना वाटत का काय करून आली असेल ही बाई?"
" काय बोलतेस सगुणा? मला फक्त तुझी काळजी वाटतीय. मला आधी थोडं तुझं सुधारलेलं बोलणं चालणं बघून आश्चर्य वाटलं होतं. पण मग म्हटलं हल्ली गावात पण सुधारलेले लोक राहतात. नवरा शिकलेला असेल. बरं ते काही असेना तू पुढं सांग ना काय झालं ते "
" मग काय बर्यापैकी पैसा मिळाय लागला. मैत्रिणीच्या घराजवळच घर घेऊन राहिले.
शहर आवडलं. तिथं मुली शिकतात हे आवडाय लागलं. संस्थेमुळं आयुष्य सुधारता येतं, त्यात शहाणे लोक मदत करतात हे कळाय लागलं. वाईट अनुभव आले नाहीत असं नाही. खूप आले. एकटी बाई म्हणून. पण माझ्या मनात एक दिवा सतत जळत होता. तुझ्या नावाचा. मोहाला बळी पडावं असं वाटायचं कधी कधी पण जमायचंच नाही. "
सम्राटनी तिला जवळ घेतलं. "म्हणजे तुला कुणी भेटलंच नाही? लग्न जाऊ देत पण निदान साथ म्हणून तरी? जवळचं कुणी? कधीच नाही? "
"नाही रे. ते र्हाऊनच गेलं. जरा कुठं जुळतंय असं वाटल्यावर आपोआप लोकांचे खरे चेहरे दिसाय लागायचे. मग वाटायचं बरंच झालं. तुझ्यासारखा सच्चा एक पण माणूस भेटला नाही या माझ्या जगात सम्राट.
मग हॉटेल आणी संस्थेची कामं यातच सगळं. मी संस्थेत मुलींना शिकवणं, त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणं आणि चांगल्या जगण्याची ओळख करून देणं हे सगळं करते. जवळपासच्या वाड्यावस्त्यांवर, आश्रमशाळांमधे जाते. "
सम्राटला राहवेना. "मग इथं? "
"हो. अरे आईबाबाला भेटावं असं फ़ार वाटायचं पण भिती वाटायची की ते हाकलून देतील, नावं ठेवतील किंवा मग अजून लग्न कर म्हणत बसतील. पण त्यांना बघावं, पैसा पाठवावा असं फ़ार मनात यायचं. पण ते धोक्याचं होतं. असं पोरगी न दिसता पैसा येतोय म्हणल्यावर अजूनच कसले संशय आले असते त्यांना. मग एक दिवस आमच्या शेजारची मंगी भेटली शहरात. भेटली म्हणजे हॉटेलातच आली नवर्याबरोबर. मी तिथंच होते. तिला मग सगळं सांगितलं. आईबाबाला घेऊन येती का म्हणलं. माझ्याबद्दल सांगू नको असं पण सांगितलं मग ती एक दिवस त्यांना घेऊन आली. मग बसून आम्ही खूप रडलो. म्हणलं रडणंच नशिबात आहे आपल्या. त्यांना म्हणलं आता लय झालं इकडं या. माझ्याबरोबर रहा. ते पण आले. नाहीतरी आता आमचं कोण तिथं नव्हतंच. सगळ्यांनी शहराचा रस्ता धरला होता. मग त्यांच्याकडून गावचं कळलं. रावसाहेब आणी राधाईंबद्दल कळलं. तुझ्या लग्नाचं समजलं. मग त्यांना सांगितलं का थोडे दिवस जाऊन येते. कर्ज आहे ते उतरवलं पायजे. ते आधी समजवायला लागले पण आता तुझे आईबाबा नाहित म्हणल्यावर भिती कमी झाली होती. म्हणले जा पोरी तुला ना पायजे होता तो नवरा मिळाला ना तू संसार केलास. मैत्रिणीशी बोलले. तिला माहित होतंच तुझ्याबद्दल. आधी तिनी पण जरा समजावलं. अगं असं सगळं पिक्चरमधे होत असतं. तो आता कसा असेल? काय म्हणेल? कसा वागेल? त्यानी तुझा फ़ायदा घेतला तर? "
ह्या शेवटच्या प्रश्नावर मी खूप हसले. ' अगं ज्याच्या नावानीच माझं बाईपण राखून ठेवलं कायम, त्यानी फ़ायदा घ्यावा यापेक्षा जास्त बरं काय घडणार? पण तेवढं कुठलं माझं नशीब बाई? '
परत कधी येणार या प्रश्नाला माझ्याकडं उत्तर नव्हतं. म्हणलं नुस्तं बोलायचं आहे. तेवढं झालं की येते. तरी पण काय गडबड झाली तर थोडे दिवस संभाळ नाहीतर विकून टाक माझा शेर. आईबाबाला लागतील एवढे पैशे बँकेत आहेत. बर्यापैकी घर पण आहेच. मग तिनी सांगितलं की 'तू जा. मी बघते. अगदी गायब झालीस तरी दोन म्हातारी माणसं काय जड नाहीत मला. तुझी ती संस्था पण आहे. त्यांची पण मदत घीन लागली तर. '
मग मी बिनघोर झाले. "
सम्राटनी तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं. " मी तुझा आधीच फ़ायदा घेतला ना? खेचून आणायला पाहिजे होतं तुला. रागाच्या भरात कधी चौकशी पण नाही केली. आणि स्वत:हून तुझी माहिती मला कोण कशाला द्यायला बसलं होतं? "
" तुझं नाही रे चुकलं. मला समजतंय रे. "
" पण मग तू इथं आल्यावर लगेच मला सांगितलं का नाहीस? " सम्राटला एकदम आठवलं की गोष्ट अजून संपली नाही.
" हं. अरे इथं आले पण नेमका तू नाहीस असं कळलं. तू असतास तर तुला भेटून, समोर बोलून निघून गेले असते. पण मी तयारीनी आलेच होते. मी तू येईपर्यंत इथंच रहायचं ठरवलं. थोडं नाटक करायचं ठरवलं. आक्कात्या भेटल्या. त्यांची सहानुभूती मिळवली. हे असं खोटं कधीच वागले नव्हते. कुठून बळ आलं काय माहित? पण मग म्हणलं कि सगळं झाल्यावर त्यांची माफी मागून खरं सांगून टाकता येईल. मग इथं राहायला लागल्यावर शर्वरीचा लळा लागला, आक्कात्यांची सोबत आवडली. तुझ्या घरावरून माझा हात फिरतोय हा विचार पण मला सुखवाय लागला.
मग तेवढ्यात तू आलास. पण बोललाच नाहीस. मग मला काय करावं कळेना. ओळख दाखवली असतीस तर तेंव्हाच बोलून निघून गेले असते. मग वाट बघत बसले कधी योग येतो त्याची. "
" झालं?" तिचा चेहरा हातात घेऊन तिच्या डोळ्यात पहात सम्राट म्हणाला.
" हो. " सगुणाची नजर खाली गेली. अंगावर शहारा आला.
" पण सम्राट मी.. मी.. " त्याच्या स्पर्शानी तिचं वाक्य अर्धवट राहिलं.
" बोल ना " तिला अजून जवळ घेत सम्राट म्हणाला. आता त्याच्या लक्शात आलं की तिनी त्याला तिच्या अंगावर बघायला आवडायचा त्या फिकट निळ्या रंगाची साडी नेसली होती. चंदनाचा मंद सुगंध जाणवत होता. केसात हलकी शिकेकाई. धुंद होत त्यानं तिच्या मानेजवळ आपले ओठ नेले.
" आज हे सगळं मला भेटण्यासाठी? " तो म्हणाला.
अस्पष्ट हुंकार देत मन, शरीर, प्राण सगळीकडून प्रतिसाद येत गेला.
" लग्न करशील माझ्याशी सगुणा? " सम्राट म्हणाला. त्याच्या मानेवर, खांद्यावर अश्रुंची धार लागली. " अगं रडू नको ना. मी तुला कैद नाही करणार. तू तुझं हॉटेल चालव. नाहीतर गावात नवीन होटेल काढ. आईबाबांना इथं घेऊन ये. आणि तुला पाहिजे ते कर. पण माझ्याशी लग्न कर. कर ना प्लीज? "
तिचं रडणं थांबत नव्हतं.
"बरं तू विचार कर शांतपणे. तुझ्या आईबाबांशी बोल, त्यांना विचार आणि मग सांग. नको असेल तर नको सांग. मी तेव्हा पण जबरदस्ती केली नव्हती आणि आता पण नाही करू शकत. मी अजून प्रेम करतो गं तुझ्यावर. तुला नको असलेलं काही नको मला. पण माझा जीव अजून तुझ्यात अडकलाय गं." सम्राट प्रामाणिकपणे म्हणाला.
सगुणानी रडता रडता त्याच्या तोंडावर तिचा हात ठेवला.
" हं. " कसंबसं रडू आवरत सगुणा म्हणाली. "कुणाला विचारणार नाही मी आता. खूप वाट बघितली रे. "
" बागेत आत्ता जाऊ या का लग्नानंतर? " तिचे डोळे पुसत सम्राट हसत म्हणाला.
" तुला पाहिजे तसं. " कसेबसे तिच्या तोंडून शब्द बाहेर आले. आणि ते पूर्ण होताच त्याच्या ओठांनी तिचे पुढचे शब्द थांबवले. युगायुगांचा विरह घेऊन फिरत असलेली दोन मनं आता शांत झाली होती.
-समाप्त
ऊत्तम पहीला प्रयत्न अजिबात
ऊत्तम
पहीला प्रयत्न अजिबात वाटत नाही एवढी सुरेख झाली आहे कथा...
आता एखाद्या मोठ्या कथेची अपेक्शा आहे.
पु ले शु
बहार आली. पु.ले.शु.
बहार आली.
पु.ले.शु.
धन्यवाद
धन्यवाद
Very nice.
Very nice.
सुंदर शेवट अगदी
सुंदर शेवट अगदी अपेक्षित.
सगुण आणि सम्राट मिलन होणार हे होतच मनाशी.
पण सगुणाचा पास्ट खुप खुप भावला आणि आवडला सुद्धा.
मस्तच आहे वर काढल्यामुळे
मस्तच आहे
वर काढल्यामुळे वाचता आली
छान...
छान...
छानच. शेवट एकदम हवा तसा.
छानच. शेवट एकदम हवा तसा. आवडली कथा.
Khup sundar katha, samrat
Khup sundar katha, samrat khup avdla...
Junya katha shodhun wachtey... Pan tumchya ya apratim lekhanshaili ne guntavun takle...
छान आहे. आवडली.
छान आहे. आवडली.
1ch number....hats off.
1ch number....hats off.
सगळे भाग एका दमात वाचुन काढले
सगळे भाग एका दमात वाचुन काढले, जणुकाहि डोळ्यासमोर cinema पहातोय असे वाटले.
Khup chhan lihiliye katha.
Khup chhan lihiliye katha.
Apratim
Apratim
२०१३ नंतरचे सगळे प्रतिसाद
२०१३ नंतरचे सगळे प्रतिसाद आत्ता वाचले. खूप धन्यवाद. आवडीने वाचून कळवल्याबद्दल. खूपच दिवस झालेत. पण अगदी १६, १७ आणि १८ अशा वेगवेगळ्या वर्षात लोकांनी ही गोष्ट वाचली हे खूप मस्त आहे.
खुप छान लेखनशैली आहे तुमची.
खुप छान लेखनशैली आहे तुमची. पण एकाच कथेवर का थांबलात? लिहीत रहा कथा! पु.क.प्र!
छान कथा
छान कथा
Pages