ओव्या

Submitted by समीर चव्हाण on 21 February, 2013 - 06:39

हसतोस केव्हा नसे नित्यनेम
लगटून प्रेम अंगांगाला

अद्दल घडावी असे झाली काही
पोर उभे राही दारातच

फिरून तुझ्याशी येत राहीन बा
चटावलो मी वा म्हण काही

दिसमास केला सुखाचा सोहळा
लावलास लळा नकळता

............................................

तुझ्यापाठी गेलो फरफट झाली
किमंत कळाली आपसूक

फिटून विटली हौस बोलण्याची
तुला ऐकण्याची जाइचना

फरक पडावा कुणाला कशाचा
आपला उसासा आपल्याशी

लावून घेशील एवढे-तेवढे
मलाही हळवे करशील

......................................

खदखदतोय काळ माझ्यावर
कर्तव्याचा भार थर कापे

घटका विसावा घेतलास निघ
कर लगबग वेळ कोठे

थकून-भागून आसुसला जीव
आपलीच कीव अपणाठायी

फार फार तर उशीर होइल
कर्तव्य निभेल नंतरही

काम नाही काही वेळ काढू कसा
रिकामटेकडा म्हणवेना

कधी प्रश्न पडे काय करायचे
होणार व्हायचे केव्हातरी

लिहीले बरेच बरे बरळले
कुणाला कळले सांग माझे

समीर चव्हाण

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फरक पडावा कुणाला कशाचा
आपला उसासा आपल्याशी

हा अभंग खूप आवडला .

(अवांतर : मराठी गझलेची पाळेमुळे संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम यांच्या अभंगांपर्यंत शोधली जावी असं मला बऱ्‍याचदा वाटतं. पंत साहित्याच्याही आधी या अभंगांतील सहजोद्गार गझलगुणांनी युक्तच होते. अर्थात अभंग ते अभंगच ! वादच नाही .
सहज वाटलं ते लिहिलं . वादासाठी नव्हे.)

सर्व अभंग अतीशय सुवंदर आहेत कोणता एखादा जास्त आवडलाय हे ठरवू शकत नाहीये

अभंगांतील सहजोद्गार गझलगुणांनी युक्तच होते>>>> सहमत ..ह्या रचना वाचल्यावर तरी अजूनच

धन्यवाद.
ओव्यांतील तिन्ही भाग वेगवेगळ्या भूमिकेतून आले आहेत.
पहिला एक बाप म्हणून, दुसरा एक प्रेमी, तर शेवटचा एक स्ट्रगलर-लूझर.