माझा पहिला परदेश प्रवास : १० (तिसऱ्या रानडुकराची आरोळी.)

Submitted by ललिता-प्रीति on 15 October, 2008 - 00:12

तिसऱ्या रानडुकराची आरोळी.

रोज सकाळी नाश्त्याच्या हॉलमध्ये शिरताना दारात आपला 'रूम नं.' सांगावा लागायचा. कोलंबो, पट्टाया आणि बॅंकॉक नंतरचं हे चौथं हॉटेल होतं. दर दोन दिवसांनी त्या-त्या ठिकाणचे नवीन क्रमांक लक्षात ठेवायचे म्हणजे भलतंच कठीण काम होतं. त्यादिवशी पण मी नाश्त्याला एकटीच खाली आले आणि नंबर विचारला गेल्यावर एकदम गडबडले. तिथला रूम नंबर सोडून आधीचे सगळे आठवले पण जो हवा होता तो आठवेचना !! बरं, 'कार्ड की' असल्यामुळे त्याच्यावरही लिहिलेला नव्हता ... पण अनपेक्षितपणे आदित्य माझ्या मदतीला आला. तो माझ्याआधीच आवरून खाली आला होता आणि त्या हॉलमधे दारासमोरच्याच टेबलवर बसला होता. नेमकं त्याचवेळी त्याचं माझ्याकडे लक्षं गेलं, काय गोंधळ झालाय ते तिथूनच त्याच्या लक्षात आलं आणि बसल्या जागेवरूनच तो ओरडला - 'आईऽऽऽ, ९७८' .... मी एकदम चमकून आत पाहिलं. तोपर्यंत मला पत्ताच नव्हता की तो तिथे आहे आणि आपल्याकडेच पाहतोय. '९७८' हे शब्द मेंदूपर्यंत पोचायला जरा वेळ लागला आणि मग माझी ट्यूब पेटली. हे सगळं अक्षरशः काही सेकंदांतच घडलं पण नंतर आम्हाला दोघांनाही आठवून हसू येत होतं.

नाश्ता उरकून खाली लॉबीत आलो. लिफ़्ट्सच्या समोरच एक अतिशय सुंदर लँडस्केप बनवलेलं होतं. आपले नर्मदेतले गोटे असतात तसे लहानमोठ्या आकाराचे गुळगुळीत दगड आणि त्यातून झुळझूळ वाहणारं कारंजं .... नेहेमीच्या लँडस्केप्सपेक्षा उंची एकदम कमी - जेमतेम ७-८ इंच. पण त्यामुळेच आल्यापासून ते लक्ष वेधून घेत होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यादिवशी तिथल्या त्या पाण्याचं परिक्षण चालू होतं!!! 'कारंज्यातलं पाणी दूषित तर नाही ना' याची तिथल्या लोकांना चिंता पडली होती!! तसंही ते योग्यच होतं म्हणा. कारण तिथे प्रत्येक नळांतून प्यायचं पाणीच वाहत असतं. त्यामुळे तिथे फिरताना जवळ पाण्याच्या बाटल्या बाळगण्याची कटकट नव्हती. तहान लागली की बागेतला एखादा नळ सोडा आणि पाणी प्या इतकं सोपं होतं. म्हणजेच त्या तिथल्या कारंज्यातही प्यायचं पाणीच वाहत असणार ... मला वाटतं ते लोक आपल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये नुसते डोकावले ना, तरी बेशुध्द पडतील बहुतेक!!!

सगळे निघायच्या तयारीत होतो पण आमची गाईड आलेली नव्हती अजून. मग हॉटेलच्या आवारात जरा इकडे-तिकडे करायला सुरूवात केली. प्रवासी येत होते, जात होते, बॅगांचे ढीग चढत होते, उतरत होते; कर्मचाऱ्यांची लगबग चालू होती. कोण सिंगापूरला प्रथमच आलंय, कोण अनेकदा येऊन गेलंय याच्याशी त्यांना काहीही देणं-घेणं नव्हतं. मी पायऱ्या उतरून खाली आले. आवारात रस्त्याच्या कडेला झाडं लावलेली होती आणि त्यांच्या कडेने ३-४ फ़ूट उंचीचे संरक्षक कठडे लावलेले होते. खरं म्हणजे, थोडा वेळ 'टेकायला' ती जागा एकदम मस्त होती - आसपास इतकी छान झाडंबिडं ... मला मोह आवरला नाही. जरा तिथे बसतीये न बसतीये तोच कुठूनतरी हॉटेलचा एक माणूस आला आणि मला त्याने तिथून उठायला लावलं. कारण काय - तर तसं तिथे बसल्याने झाडांची नासधूस होते. ऐकताक्षणी मला थोडा रागच आला, कारण आपल्यामुळे झाडांना काही त्रास होत नाहीये याची खात्री करूनच मी बसले होते. त्यात पुन्हा सार्वजनिक ठिकाणी असं हटकलं जाण्याची आपल्या देशात आपल्यावर क्वचितच वेळ येते. उठले मग तिथून - करणार काय? पण माझ्यासारखेच इतर काहीजण जे बसले होते त्यांना मात्र खरंच त्या झाडांची पर्वा नव्हती असं लक्षात आलं. तसं होतं तर मग त्या माणसाने सगळ्यांनाच तिथून उठवलं त्यात त्याची काहीच चूक नव्हती!!! अजयच्या मते ते पाण्याचं परिक्षण काय, हे असं लोकांना बसल्या जागचं उठवणं काय, हे सगळे तारांकित हॉटेलचे नखरे होते. पण मला नाही तसं वाटलं कारण शिस्त, स्वच्छता आणि नियमांचं पालन या गोष्टी तिथल्या लोकांच्या दैनंदिन आयुष्याचाच भाग होत्या. आपल्या देशात जर असं प्रत्येक ठिकाणी नियमावर बोट ठेवायचं म्हटलं तर रोजची कामं सोडून दिवसभर तेच करत बसावं लागेल आणि तरीही शेवटी 'जनजागृती' वगैरे साध्य होणार नाही ती नाहीच!!! पण परदेश प्रवास हा अश्या विरोधाभासांमुळेच तर लक्षात राहतो ...

१० वाजत आले होते. धावत-पळत आमची गाईड आली. आमची रोजची बस बिघडली होती. दुसऱ्या बसची व्यवस्था करण्याच्या नादात तिला उशीर झाला होता. सिंगापूरमध्ये वेळेचं बंधन पाळणं किती महत्वाचं आहे, तसं केलं नाही तर कसा भरमसाठ दंड भरावा लागतो इ. गोष्टींची तिनं आम्हाला आल्या-आल्या, पहिल्या दिवशीच भीती घातली होती. आता तिलाच उशीर झाला म्हटल्यावर मंडळींची तिला दंड ठोठावण्याची फार इच्छा होती. नुसत्या कल्पनेनंच सगळे खूष झाले. ५-१० मिनिटांत सगळे निघालो. बसमध्ये ड्रायव्हरच्या सीटसमोर आपल्याकडे असतो त्याच्या चौपट मोठा आरसा लावलेला होता. त्यातून त्याला संपूर्ण बस व्यवस्थित दिसत असणार. आमचा मलेशियन ड्रायव्हर - मि. मलिक - बस चालवता-चालवता सुध्दा सगळ्यांवर बारीक लक्ष ठेवून असायचा. बस निघाल्यावर वर ठेवलेल्या बॅगमधून काहीतरी काढण्यासाठी मी उभी राहिले तर त्याने माझ्याकडे त्या आरश्यातून असलं रोखून पाहिलं ना की मी बॅग उघडून त्यात हात घालून हवी ती वस्तू काढण्या‍ऐवजी पटकन ती बॅगच खाली घेऊन बसले. चालत्या गाडीत उभं राहणं हा पण तिथे गुन्हा मानला जातो ... म्हटलं उगीच झंझट नको कसलं!! कारण आमची गाईड सुध्दा बहुतेक वेळा बसूनच आमच्याशी बोलायची.

त्या दिवशी आमचा दौरा होता 'ज्युरॉंग बर्ड पार्क' ला ... 'बर्ड पार्क' हे नावच मुळात मला फार आवडलं ... 'पक्षी अभयारण्य' पेक्षा 'पक्ष्यांची बाग' हे ऐकायलाही छान वाटतं. जगभरातले जवळजवळ ३००० प्रकारचे पक्षी तिथे पहायला मिळतात. सुरुवातीला निशाचर पक्ष्यांचं एक वेगळं दालन होतं. त्या दालनात जोरजोरात बोलायला किंवा कॅमेऱ्याचे फ़्लॅश मारायला मनाई होती. बहिरी ससाणे, अनेक प्रकारची घुबडं तिथे पाहिली.
बाहेर मात्र काही अपवाद सोडले तर सगळे पक्षी मुक्तपणे विहरत होते. पण त्यांची वावरण्याची ठिकाणं आणि माणसांना हिंडायला दिलेली पायवाट यांच्यात बऱ्यापैकी अंतर होतं. आपण केवळ निरिक्षणाशिवाय अन्य कुठल्याही प्रकारे त्या पक्षांच्या संपर्कात येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना हात लावायचा प्रयत्न करणं, त्यांना काहीतरी खायला घालणं असल्या प्रकारांना आपोआपच आळा बसतो. अश्या ठिकाणी ते प्राणी किंवा पक्षी हेच सर्वात महत्वाचे घटक असतात याचं तिथे सतत भान ठेवलेलं दिसलं. सकाळी फिरायला बाहेर पडलो आणि रस्त्यात किंवा झाडावर अचानक एखादा सुंदर पक्षी दिसला तर आपली कशी प्रतिक्रिया असेल तसंच होत होतं तिथे. मुळात त्या बागेचा आराखडाच असा होता की 'सहज दिसावा' असेच सगळे पक्षी समोर यायचे. 'पक्षी बघायला आलो आहोत' हे माहिती असूनही दर वेळेला तोंडातून आश्चर्योद्गारच बाहेर पडायचे.
छोटे चिमण्यांसारखे पक्षी, जे जमिनीवर कमी चालतात, असे मात्र काहीसे बंदिस्त होते. पण ते ही कसे ... तर मोठ्ठंच्यामोठ्ठं आवार आणि त्याला १५-२० फ़ूट उंचीवरून बारीक मच्छरदाणीसारखी जाळी लावलेली. म्हणजे ऊन, पाऊस, वारा याला कुठलाही अडसर नाही, पण ते पक्षीही इतरत्र कुठे उडून जाऊ शकणार नाहीत. कळस म्हणजे अश्या ह्या पक्ष्यांचं निरिक्षण करण्यासाठी त्या मच्छरदाणीच्या वरून फिरवून आणणारी एक छोटीशी लहान मुलांच्या बागेत असते तसली रेल्वेगाडी होती. त्या रेल्वेगाडीतून एक फेरी मारून आलो.

बॅंकॉकप्रमाणेच इथेही दोन 'शो' पाहिले - 'Birds for Pray Show' आणि 'Birds-N-Buddies Show'.

4051-06.jpg

पहिल्या शो मध्ये सगळे शिकारी पक्षी अगदी जवळून पहायला मिळाले. लांब अंतरावरून सावज टिपण्यासाठी त्यांनी घेतलेली झेप, त्यांची तीक्ष्ण नजर इ. ची प्रात्यक्षिकं फारच छान होती. दुसरा शो लहान मुलांना आवडेल असा होता. तिथेही अनेक नवखे पक्षी पहायला मजा आली.
नेहेमीप्रमाणेच, त्या बागेत घालवलेला तास-दीड तास आम्हाला कमी वाटला....

तिथून निघायची वेळ झाली होती. आदित्यला तेवढ्यात एक आईसक्रीमचं दुकान दिसलंच. पण सकाळपासूनच ढगाळ हवेमुळे इतकं उकडत होतं की त्यानं आईसक्रीमची मागणी करण्याची मी वाटच पाहत होते. आम्ही तिघांनी मारे अगदी 'डबल लार्ज स्कूप' वगैरे खाल्ले पण नंतर बिलाचा आकडा पाहून माझ्या आणि अजयच्या पोटात त्या 'डबल लार्ज स्कूप' पेक्षा मोठा गोळा आला!!! तेवढ्या किंमतीत इथे महिनाभर आम्हाला तिघांना भरपूर आईसक्रीम खाता आलं असतं!!! पण आता त्याचा विचार करून काय फायदा होता? गुपचूप पैसे दिले आणि आदित्यनं अजून कशाची मागणी करण्याच्या आत तिथून काढता पाय घेतला.

आता बसनं न जाता आम्ही मेट्रो ट्रेनने हॉटेलवर परतणार होतो. सिंगापूरची MRT Train ही लंडनच्या मेट्रो ट्रेनच्या तोडीस तोड समजली जाते. MRT म्हणजे Mass Rapid Transit. नावाप्रमाणेच ती माणसांची वेगानं वाहतूक करणारी व्यवस्था होती. साहजिकच काही विशिष्ट नियम पाळणं गरजेचं होतं. चुंबकीय तिकिटांनी उघडणारे स्वयंचलित दरवाजे, गाडीची आपोआप उघड-बंद होणारी दारं, त्यांचा कालावधी - या सगळ्यांबद्दल सौ. शिंदेनी खबरदारीचे उपाय सांगायला सुरूवात केल्यावर समस्त आजी-आजोबा मंडळी जरा चपापलीच होती. चुंबकीय तिकिटानं ओळख पटवून दार उघडल्यावर पट्कन त्या दारातून पुढे जावं लागतं नाहीतर मग एकदा दार बंद झालं की पुन्हा दुसरं तिकिट घ्यावं लागतं हे कळल्यावर तर बहुतेकांचं अवसानच गळालं. 'आम्ही आपले बसनं जातो ... आम्हाला नको ती ट्रेन राईड' असाही प्रस्ताव आला. मग आम्ही तरण्याताठ्यांनी त्यांना जरा धीर दिला आणि एकदा अनुभव घेतला पाहिजे असं म्हणून येण्याचा आग्रह केला.

बसनं आम्हाला 'ऑर्चर्ड' स्टेशनपाशी सोडलं. रस्त्यावरून स्टेशनमध्ये प्रवेश करायची इमारत अगदी सर्वसाधारण होती. तिच्याखाली इतका मोठा पसारा असेल याची कल्पनाच आली नाही. आत खाली उतरल्यावर सगळीकडे इतकं स्वच्छ आणि चकाचक होतं की त्या ठिकाणाला 'रेल्वे स्टेशन' म्हणणं जिवावर यावं!!! आमच्या गाईडनं सर्वांना तिकिटं दिली. अजूनही काही आजी-आजोबांची 'जावं की नको' अशी द्विधा मनस्थिती होती. तिकिटांची ओळख पटवायच्या ठिकाणी शेवटी एक आजी जरा जास्तच गांगरल्या आणि अडकल्या. पण त्यांना पुढे आणणं फारसं कठिण गेलं नाही.
तिथून खाली प्लॅटफ़ॉर्मवर आलो. एका बाजूला एक गाडी उभी होती. पण ती तिथून हलेपर्यंत कळलंच नाही की ती तिथे उभी होती. मोठमोठ्या फलकांवर गाड्यांचा मार्ग, वाटेतली स्टेशन्स इ. माहिती अतिशय आकर्षक पध्दतीने लिहून ठेवलेली होती. आम्हाला 'मरिना बे' या स्टेशनवर उतरायचं होतं. वाटेत ५-६ स्टेशन्स लागणार होती. त्यात एक 'धोबी घाट' नावाचं स्टेशन होतं. 'धोबी घाट' हा तद्दन भारतीय पण गटात न बसणारा शब्द तिथे वाचून हसू आलं. त्या स्टेशनचं ते तसं नाव का बरं पडलं असेल??
जरा इकडे-तिकडे बघेपर्यंत गाडी आली. सगळ्यांचा 'गृहपाठ' अगदी जय्यत तयार असल्यामुळे गाडीत चढताना मात्र काही गोंधळ झाला नाही. गाडीचा वेग अफाट होता. पुढचं स्टेशन कुठलं ते दाराजवळच्या 'इंडिकेटर'वर दिसत होतं. त्यामुळे 'माटुंगा आ गया?' असल्या प्रश्नांना थारा नव्हता. गाडीची दारं एकाच बाजूला असल्यामुळे 'कळवा कुठल्या बाजूला येणार?' हा ही प्रश्न नव्हता!! नवख्या माणसालाही सहजगत्या प्रवास करता यावा यासाठी असे साधे-सोपे उपाय पुरेसे असतात.
५-६ स्टेशन्स आणि काही कि.मी. अंतर पार करायला जेमतेम १०-१२ मिनिटं लागली. आम्ही 'मरिना बे' स्टेशनवर उतरलो, जमिनीच्या पोटातून वर रस्त्यावर आलो. तिथून अगदी समोरच आमचं हॉटेल दिसत होतं. अचानक लक्षात आलं की दोन दिवस हॉटेलच्या खिडकीतून उजव्या बाजूला एक जुन्या पध्दतीची इमारत मी पाहत होते, ते प्रत्यक्षात एक अत्याधुनिक मेट्रो स्टेशन होतं .... !!

जेवणाची वेळ झाली होती. त्या दिवशी आम्हाला चक्क घरगुती जेवणाचा डबा मिळणार होता. मस्त आमटी-भात, पोळी-भाजी, कोशिंबीर, गोडाचा शिरा .... मजा आली जेवायला. जेवणानंतरचा वेळ जरा निवांत होता. आजी-आजोबांनी विश्रांती घेतली, आम्ही चौघं 'मुस्तफ़ा मॉल' मध्ये फेरफटका मारून आलो. 'सिंगापूरच्या मॉल्समध्ये आम्हाला विसरू नका' असा आमच्या भगिनींचा निरोप होता. त्यामुळे त्यांना लक्षात ठेवण्यासाठी थोडा खिसा हलका केला....

दिवस बुडाल्यानंतर आम्हाला जायचं होतं 'नाईट सफ़ारी' पहायला. जगातलं एकमेव असं ठिकाण की जिथे रात्रीच्या वेळचा जंगली श्वापदांचा वावर पाहता येतो. तसं ते एक अभयारण्यच होतं. सगळीकडे मंद प्रकाशाचाच वापर केला गेलेला होता. एक अंधारमय गूढ वातावरण तिथे होतं. प्रथम Birds at Night Show पहायचा होता. तो शो सादर करणाऱ्या मुलीनं 'रात्रीच्या वेळी शिकार करणारे पक्षी' हा मूळ मुद्दा सोडून बाकीचीच इतकी आगाऊ बडबड केली ना की उगीच आलो इथे असं वाटलं.... त्यानंतर त्या जंगलातून एक फेरी मारायला जायचं होतं.
एक 'फुलराणी' सारखी गाडी आपल्याला सगळीकडे फिरवून आणते. चहूबाजूला किर्रर्र अंधार, रात्रीच्या वेळची जंगलातली जीवघेणी शांतता, आवाज हो‍ऊ नये म्हणून गाडीलाही रबराची चाकं लावलेली ... वाटेत अधे-मधे चांदण्याचा प्रकाश वाटावा इतपतच उजेड पाडणारे तुरळक, मंद दिवे ... प्राणी आणि गाडी यांच्यात कुठलाही अडसर नाही ... त्यात त्या गाडीला दारं-बिरं काही नाहीत ... वातावरण निर्मितीच असली झालेली होती ना ... गाडीच्या पुढच्या भागात एक मुलगी अगदी हळू, दबक्या आवाजात सगळी माहिती देत उभी होती. डावी-उजवीकडे जंगली प्राणी मोकळे-ढाकळे फिरत होते. मी गाडीच्या एका कडेला बसले होते. लांबवर एक रानडुकरांची जोडी दिसत होती. गाडीचा वेग अगदी कमी होता. ती मुलगी रानडुकरांची विशिष्ट आरोळी ऐकायला सांगत होती. म्हणून मी अगदी लक्षपूर्वक कानोसा घ्यायचा प्रयत्न करत होते. दरम्यान एक तिसरं रानडुक्कर रस्त्यावर अगदी माझ्या पायाशी येऊन उभं राहिलेलं मला कळलंच नाही. त्या दोन रानडुकरांच्या आरोळीला प्रत्युत्तर म्हणून हे तिसरं पण जोरात चित्कारलं आणि मी नखशिखांत शहारले.....
हत्ती हा प्राणी इतर वेळी अगदी गरीब आणि निरुपद्रवी वाटला तरी रात्रीच्या अंधारात मोठ्या हत्तींचा कळप किती भितीदायक दिसतो हे तिथे त्या दिवशी कळलं. किती प्राण्यांचं आणि काय-काय वर्णन करणार ... !!! गाडीच्या फेरीप्रमाणेच त्या जंगलातून पायी फिरण्याचीही सोय होती. मला त्या पायवाटांवरून फिरायलाही आवडलं असतं. ज्या कुणाच्या डोक्यातून ही कल्पना निघाली होती त्याला आधीच्या त्या शो मधल्या आगाऊ, बडबड्या मुलीला तिथून हाकलून द्यायचं का कधी सुचलं नसेल कोण जाणे!!! तो शो आम्ही आधीच पाहिला ते बरं झालं नाहीतर या रंगाचा अगदी बेरंग झाला असता....

नाईट सफ़ारीतून बाहेर पडायला नऊ वाजले. जेवून हॉटेलवर परतलो. सामान आवरायचं कंटाळवाणं काम पुन्हा एकदा करायचं होतं. आमचं सिंगापूरमधलं वास्तव्य संपलेलं होतं....
केवळ अठ्ठेचाळीस तासांच्या संगतीत या देशानं आम्हाला किती निरनिराळ्या अनुभवांनी समृध्द करून टाकलं होतं. मायदेशातल्या वास्तवाशी नकळत झालेल्या तुलनेने अंतर्मुख बनायला लावलेलं होतं ... या देशाकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे, अनुकरण फक्त युरोप-अमेरिकेचंच करावं असं काही नाही याची सत्यता पटवून दिलेली होती ... त्यांच्या तोडीस तोड एक देश आपल्या आशिया खंडातच आहे याची जाणीव करून दिलेली होती ...

कुठल्याही प्रसंगाचे अथवा गोष्टीचे ढोबळमानाने तीन भाग करता येतात - सुरूवात, मध्य आणि शेवट. सुरूवातीची उत्सुकता आणि शेवटाची हुरहूर सोडली तर मध्य हा त्या प्रसंगाचा गाभा असतो ... सिंगापूर हा माझ्या पहिल्याच अविस्मरणीय परदेश सहलीचा तेवढाच अविस्मरणीय गाभा ठरला होता....

गुलमोहर: