मैत्रीचं रुपांतरण

Submitted by आकाशस्थ on 29 January, 2013 - 23:39

मैत्री म्हणजे अधिकाराशिवाय केलेलं प्रेम. प्रेम म्हटलं की हक्काची भावना जागृत होवू लागते. ह्याच मालकी हक्काची परमावधी म्हणजे लग्न. समजून घेणे क्रमाक्रमाने लुप्त होत जाते. उलटपक्षी असमंजसपणा हाच नातेसंबंधांचा पाया होतो. त्यावर उभारलेले संसाराचे इमले हलक्याश्या झुळुकीने डळमळू लागते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्रीने पुरुषाविषयी जोपासलेला "पुरुष स्त्रीला देहभोगासाठीच जवळ करतो" हा परंपरागत दृष्टीकोन. ब-याच अंशी तो खरा असला तरी नेहमीच तो खरा असतो असं नाही. स्त्रीला पुरुषाचं रूप व पुरुषाला स्त्रीचा देह हे प्रथमदर्शनी आकर्षणीय वाटत असले तरीही कालांतराने किंवा पर्याय उपलब्ध झाला की बदलतात. देह टाळता येत नाही. त्यापलिकडे व्यक्तिदर्शन झालं की मग आकर्षणास अर्थ उरत नाही. व्यक्तिमत्वाच्याही पलिकडे जाता आलं की कुठलाच पर्याय विचलीत करत नाही. ह्याच अवस्थेला समर्पण समजावं. इथे मित्र प्रियकर किंवा नवरा झाला तरीही मित्रच असतो. नाते बदलले तरीही मैत्री बदलत नाही.

सहज जाता जाता ओळख होते. नेहमी भेटणं होतं, तर कधी क्वचित प्रासंगिक भेटणं होतं. पाहता पाहता आपण मित्र होवून जातो. आवड निवड जुळते म्हणून तर कधी अगदी विपरीत असते म्हणून. आपण एकमेकांना उलगडत जातो.

तारा जुळत जातात, आयुष्य छेडलं जातं.

ह्याच मैत्रीचं रुपांतरण आपण स्विकारतोच असं नाही. त्यापलिकडचं नातं नकोसं असत. वाद होतच नाही, संवादही संपतो. आधाराची जागा अधिकार घेतो. समर्पणाची जागा संशय घेतो.

तारा तुटत जातात. आयुष्य छेदलं जातं.

आयुष्याच्या घटनाक्रमाकडे मागे वळून पाहिलं की सुख, दु:ख, जखमा, वेदना, मैत्री, शत्रुत्व सगळं सारखच वाटू लागतं. पुलाखालून बरच पाणी निघून गेलेलं असतं. आपल्याच व्रणांच्याकडे तटस्थतेनं पाहणं जमतं. एखाद्या क्षणी खूपच महत्वाची किंवा आत्यंतिक वाटणारी गोष्ट आज खूपच क्षुल्लक वाटू लागते. अरे, आपण त्यावेळी का इतका अट्टाहास केला असं वाटू लागतं. तो क्षण जगत असताना मात्र तसं नसतं वाटत. आयुष्यातले सुखद प्रसंग निसटले म्हणून छळतात आणि वर वर दिसत असलेल्या एखाद्या खपळीखाली निरंतर वाहणारं दु:ख त्याच्या असण्यानं छळतं.

आयुष्य हा एक छळवादच आहे,

तोही हवहवासा वाटणारा, मैत्रीसारखा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Nobody understand the reason why we met in this journey of life. We are not related by blood. We don't know each other from the start, but God put us together to be wonderful friends by heart...
आवडेश!!!