पैजेखातर आचरट खाणं

Submitted by धनश्री on 18 January, 2013 - 14:36

इब्लिस यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे हा गप्पांचा धागा काढत आहे. पहिला किस्सा माझ्या मावसभावाचा. त्याने ५ मित्रांबरोबर पैजलावून ४८ पाणीपुर्‍या खाल्ल्या होत्या. जिंकला नाही आणि पोटाला पण काही झालं नाही त्याला. त्या भैय्याकडच्या पुर्‍याच संपल्या नाहीतर नक्की जिंकला असता.

अजून किस्सा एका मैत्रिणीच्या लग्नातला. जिलब्या खाण्याची पैज आणि खरंच तिच्या एका भावाने अशा काहीतरी ३० एक जिलब्या हाणल्या होत्या. जिलबी एका घासात आणि मग अर्धी वाटी मठ्ठा Happy जेवणानंतर गुपचूपपणे जाऊन ब्यॉक पण करून आला होता Wink पण खाल्ल्या होत्या हे खरं.

तुमचे पण असे किस्से येऊ द्यात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे प्रत्येकाच्या लग्नात जिलेबीची पैज ठरलेली असते. पूर्ण जेवण झाल्यावर जिलेब्या खायच्या. त्यासाठी पहिल्या २५ जिलेब्यासाठी ठरावीक पैसे आणि त्यानन्तर प्रत्येक १० जिलेब्यासठी पैसे असतात. नातेवाईकापैकी कोणीतरी हे sponser करते. आणि खुपजण हे enjoy करतात.

माझ्या लग्नात एका काकानी (वय वर्शे ६५ ) ८० जिलेब्या खाल्ल्या होत्या.
विशेश म्हणजे या जिलेब्या छोट्या नसतात तर मोठ्या बनवून घेतल्या जातात.

एक परात जिलबी, पातेलंभर मसालेभात, डबाभर आमरस वगैरे खाणारी माणसं मी प्रत्यक्ष बघितली आहेत. मिरजेत तालमीत नेहेमी जाणार्‍या टोळ्या लग्नात वगैरे असल्यास इतपत खाणे अगदी सामान्य होते. इब्लिसने लिहिलेले मुळीच अशक्य नाही. बरेचदा श्रीखंड/गुलाबजाम/जिलबी वगैरे गोड गोष्टींबरोबर चाखायला लोणचे/लिंबू वगैरे घेतात.>>
छोले भटूरे आणि पुलाव असं जेवण जेवून नवरा आणि त्याचे २ मित्र मिळून कण्केचा डबा भरून बासुंदी प्यायलेले. भारतातला कणकेचा (पीठाचा) डबा किती मोठा असतो, ते सांगायला नकोच.

वाईमधे लोकांचे आचरट पणाचे किस्से बघितले आहेत. त्यात अतिश योक्ती वाटू शकते लोकांना,पण इलाज नाही. लोक आचरट असतातच. Happy

ह्ही ह्ही ह्हा ह्हा...........! आम्ही आजपण २ किलो बासुंदी ,टचिंगला कांदाभजी घेऊन हाण सकते है॥ http://www.freesmileys.org/smileys/smiley-stargate009.gif

चँपा.. Biggrin

मस्तच किस्से..
माझी चुलत बहिण पक्कि मासेखाऊ. तिने एकदा पैज लावून जेवताना सुरमई च्या तळलेल्या २२ तुकड्या खाल्या होत्या. याची देही याची डोळा बघितले आहे Happy

सातार्‍याजवळ एक धावडशी नावाचे खेडे आहे. तिथली माणसं अचाट खाण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
बाहेरचे साठ आणि धावडशीचे आठ! हे वाक्यही धावडशीबद्दल खूप प्रसिद्ध आहे.

एक किस्सा-
धावडशीच्या दोघांना एकाने बुंदीचे लाडू खायला बोलावले. ४ पिंप भरून लाडू केले होते पण दुष्टपणा करून त्यावर रॉकेल फवारून ठेवलं होतं.
ह्या दोघा पठ्ठ्यांनी ते तसले लाडू फस्त केले आणि वर पुन्हा अजून लाडू आहेत का असे विचारत होते.
हा किस्सा ऐकीव आहे, खखोदेजा.

वालचंदला असतानाची गोष्ट.

कसलेसे सेमीनार होते, विषय आठवत नाही याचा अर्थ नक्कीच बोरींग असणार. मात्र संपल्यावर चहापानाचा कार्यक्रम असल्याने आम्ही सारे होस्टेलाईट्सनी फुकट तिथे प्रकट या तत्वाला अनुसरून हजेरी लावली होती. चहापानाबरोबर नाश्ता म्हणून पोहे किंवा समोसे असणार अशी आवई उठली असल्याने जरा जास्तच गर्दी होती. मात्र प्रत्यक्षात ग्लुकोजची बिस्किटे निघाली आणि सार्‍यांचाच हिरमोड झाला. तरीही मी जिद्द न हारता या झालेल्या पोपटाचा बदला घेण्यास म्हणून एकापाठोपाठ एक असे पाच सहा चहाचे प्याले, खरे तर थर्माकोलचे ग्लास होते, ते रिचवले अन माझ्या मित्राने माझा हा पराक्रम जगजाहीर करताच तिथून एक आवाज आला की कोण्या विकासने सात ग्लास मारले होते....

बस्स.. माझ्यापेक्षा जास्त चहा कोण पिऊच कसा शकतो या अहंकाराने चूर चूर मी त्या विकासला चहा पिण्याच्या स्पर्धेचे अघोषित आव्हान दिले ते स्वता अजून दोन-तीन ग्लास चहा मारूनच.. त्यानेही अजून एक दोन ग्लास रिचवून ते आव्हान स्विकारले न स्पर्धेचे रुपांतर बघता बघता युद्धात झाले.. बारा-तेरा वर पोहोचल्यावर तो तेवढा थकला आणि मला पंधरा ग्लास संपवून तिथेच युद्धविराम देणे सहज शक्य होते. मात्र कोणालातरी चावला आणि त्याने २५ चा आवाज दिला.....

एव्हाना चहा माझ्या अंगात अन डोक्यात भिनली होती. जीभेला चटक लागली होती वा त्या चवीची सवय झाली होती म्हणा पण पाण्यासारखी आत जात होती. मी कधी १५ वरून २५ पर्यत गेलो ते माझे मलाही समजले नाही मात्र तेवढ्यावर थांबेल तो नाईक कसला असा आवाज पुन्हा कोणीतरी दिला आणि मी देखील असा दिवस रोज रोज येत नाही असे म्हणत २६ वा ग्लास उचलला....

आता मैदानात कोणीही नव्हते.. स्पर्धा स्वताशीच होती.. २६, २७, २८, २९.. मी व्यसन करावे तसे चहा घटाघटा पित होतो... ३०, ३१, .. अन ३२ व्या ग्लासाला माझ्या सुदैवाने चहाची टाकी रिकामी झाली... आणि इथे माझे पोट किटली सारखे टम्म फुगले होते.. टाळ्यांचा कडकडात कोणी ही केला नाही मात्र ३२ चहा आणि सोबतीला १६-१८ ग्लुकोजची बिस्किटे या रेकॉर्डची वालचंद कॉलेजच्या इतिहासात नोंद मात्र झाली...!!!
.
.
.
(दुसर्‍या दिवशी मी किती वेळा डब्बा धरून पळालो या विक्रमाचे आकडे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहेत.)

ग्रॅज्युएट स्कुलमधे फुकट तिथे मित्रपरिवारासकट ही म्हण देशी विद्यार्थी सार्थ करून दाखवायचे. Wink

पैजेखातर आचरट खाण्याचा अजून एक किस्सा. दुर्दैवाने या किश्श्याची पार्श्वभूमी थोडी दु:खी आहे पण अगदी समोर घडलेला प्रसंग.
माझे आजोबा (आईचे वडील) वारल्यानंतर दिवसपाणी झाल्यावर बहुतेक १४ व्या दिवशी गोडजेवण असते आणि मृतात्म्यास आवडणार्‍या पदार्थाचा बेत असतो. माझ्या आजोबांना रवा-नारळाचे लाडू खूप आवडत. तेव्हा जेवणासाठी आलेल्या ब्राह्मणांमधे लाडूंची पैज लागली. अगदी किरकोळ वाटणार्‍या ४-५ जणांनी प्रत्येकी २०-२५ लाडू हा हा म्हणता उडवले. एकदम ५-७ लाडू पानात घेऊन ते फोडून त्यावर भरपूर तूप, दूध, साखर घालून कालवून खात होते. अगदी किळसवाणा प्रकार होता हा. आणि तो ही एक दु:खद प्रसंग घडलेल्या घरात.
शेवटी आतल्या खोलीत माझ्या मावशा, आई यांच्यात जेवण पुरेल ना अशी एक काळजीवजा चर्चा सुरु झाली. अगदी संपलेच तर बाहेरून लाडू विकत आणावे असा निर्णय वगैरेही झाला. माझी एक मावशी बरीच धीट, डॅशिंग टाईपची होती. तिने सरळ भरपंक्तीत त्या भटजींचा समाचार घेते अशी सुरुवात केली. प्रसंग पाहून बाकीच्यांनी तिला अडवले. शेवटी जेवणे झाली. नंतरच्या लोकांना लाडू पुरले नाहीतच. पण मावशी जेवल्यानंतर त्यांना म्हणाली की आमचे वडील असते तर हा अघोचरपणा पाहून तुम्हाला हाकलून दिले असते. Sad पण वाईट वाटते अशा गोष्टीचे.

पाणी पिण्याचा किस्सा कुणी लिहीला नाही का?

मी १९९२ साली, तेव्हा देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्ग नुकताच नव्याने आकाराला येत असताना त्या रस्त्यावर पिंपरी-चिंचवड नवनगरातून, रावेत-पुनावळे-ताथवडे मार्गे जाऊन पुन्हा देहूरोडहून जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने परत येत सलग चाळीस किमी सायकल दामटली होती. आल्यावर एकामागोमाग एक करीत १७ ग्लास पाणी (अंदाजे साडेतीन लिटर) प्यालो. अर्थात मला काहीच त्रास झाला नाही.

एकदा कसल्या तरी उद्यापनाचं पोट्भर जेवण झाल्यावर आई म्हणाली की खूप जेवले..
बाबा लगेच म्हणाले, हा १२ केळांचा घड खाउन दाखवते का? १००० रु देईन..

तेव्हा १००० रु खूप होते.. आईने खाल्ले ११ केळ.. शेवटचं केळ फारच पिकलेलं होतं, उलटुन पडेल अशी भीती वाटली.. मग सुट मिळाली! Happy
१०००रु ही..

मला जमलं नसतं!

मी आणी माझी मैत्रीण पुर्विच्या बाल गन्धर्वच्या मागच्या कॅफेटेरिआत गेलो होतो... ब वडे हाणण्या साठी ....१ -१ प्लेट वडे मागवले आणी खाताना त्या बरोबरच्या मिरचीच्या प्लेट कडे लक्श गेले .. आणी मि सहज म्ह्टले "विजया ..चल ह्या सगळ्या मिरच्या खाउन दाखव तुला अजुन एक ब वडा माझ्या कडुन" ...(मी एक मिरची नुसती जिभेवर ठेवली आणी मला ब्रम्हाड आठवले ).... पेटलिच विजया आणी भराभर सगळ्या मिरच्या खाल्या .......
मी १ ब वडा अगदी प्रेमाने दिला पण त्यानन्तर काय झाले तिचे हे न विचारलेलेच बरे ....

बाप रे!

पैज म्हणून नाही पण लहानपणी मी एकदा असेच इतके पाणी प्यायलो होतो की मला उठायलाच येत नव्हते. Proud दिवसभर शेतातून हिंडून हिंडून आम्हा सगळ्यांना अशी तहान लागलेली की विहिरीवर येताच सगळे पाण्यावर तुटून पडले.विहिरीत उतरून आतल्या काठावर बसकन मारली आणि एका पाठोपाठ एक ओंजळ विहिरीतून भरायची आणि ओठांना लावून तोंडात रिकामी करायची. ओंजळीने पित असल्याने आपण नेमके किती पाणी प्यायलोय याचा अंदाज आला नाही. मग भांवंडांच्या मदतीने कसाबसा विहिरीबाहेर आलो आणि हळूहळू चालायला सुरुवात केली. आता सगळे पाणी उलटून बाहेर येणार असे वाटत होते. पण तसे काही झाले नाही.

सॉरी पण मी एका अशाच एका मराठी संकेतस्थळावर अशीच एक खाण्याच्या स्पर्धेवर लेख वाचला आहे...आता तो सापडतच नाये...काहितरी दोन वेगवेगळ्या गावांमधल्या दोन भट असतात त्यात...

माझ्या भावाने ९-१० वर्षाचा असताना एका संकष्टीला २१ उकडीचे मोदक खाल्लेले. एरवी तो १-२ मोदकच खातो.

हा प्रकार प्रचलित आहे ह्याची कल्पना आहे आणि इथले एकेक किस्सेही अचाट आहेत पण ...

मला पैज लावून ओ येईस्तोवर ( किंवा नंतर ओ करायला लागेस्तोवर ) खाणे ह्या प्रकाराबद्दल जबरदस्त किळस आणि संताप आहे. शरीरावर अत्याचार तर आहेतच ( पण ती खाणार्‍याची मर्जी ), त्याहून जास्त अन्नाची नासाडी, अनादर करणे आहे.
एकतर असे प्रकार करावे तर विकत घेतलेल्या अन्नानेच करावे. म्हणजे करणार्‍याला त्या अन्नाचा मोबदला तरी मिळालेला असतो नंतर ते अन्न खा, फेका किंवा ओका ! पण घरातल्या बायकांनी राब राब राबून निगुतीने पदार्थ रांधायचे आणि मग त्याची अशी नासाडी झालेली बघायची ह्यासारखी वाईट गोष्ट नाही ( मोदकांच्या पैजा तर अगदी कॉमन आहेत ना गणपतीच्या दिवसांत ! ) धनश्रीने लिहिलेला लाडवांचा किस्सा वाचून तर जीव जळला. मी असते तर त्या भटजींना नक्कीच सुनावले असते.

फूड नेटवर्कवरही असाच एक आचरट कार्यक्रम लागायचा. एकदा-दोनदा बघितला कुतुहल म्हणून पण नंतर तो कार्यक्रम दिसला की चॅनल बदलला जायचा.

असो. ह्या सगळ्या पैजबहाद्दरांना शिक्षा म्हणून प्रत्येकी एकहाती दोनशे मोदक, पुरणपोळ्या, गूळपोळ्या, गुलाबजाम,खाजाच्या करंज्या, चिरोटे ह्यातला किमान एक पदार्थ बनवून इतरांना खिलवायची शिक्षा द्यायला हवी म्हणजे बरोबर रग जिरेल Proud

ह्या सगळ्या पैजबहाद्दरांना शिक्षा म्हणून प्रत्येकी एकहाती दोनशे मोदक, पुरणपोळ्या, गूळपोळ्या, गुलाबजाम,खाजाच्या करंज्या, चिरोटे ह्यातला किमान एक पदार्थ बनवून इतरांना खिलवायची शिक्षा द्यायला हवी म्हणजे बरोबर रग जिरेल फिदीफिदी > +१००००

त्याहून जास्त अन्नाची नासाडी, अनादर करणे आहे.
>>>
ईंटरेस्टींग अँगल .. पण पटला, सहमत!

माझे काही मित्र दारू पिण्याची, खास करून बीअर रिचवण्याची पैज लावतात.. तेव्हा खरेच, किव करावी, राग करावा, समजत नाही. निषेध व्यक्त करत तिथून निघून जातो. त्यामुळे प्रत्यक्ष बघण्याचा योग नाही आला. पण मागाहून त्यांचे मोठमोठाले आकडे ऐकून एवढे द्रवपदार्थ शरीरात मावते कसे हा प्रश्न नेहमी पडतो.

Pages