काही जालीय मित्रांसमवेत मुकेशने गायलेल्या कित्येक सुमधुर गाण्यांच्या संदर्भात चर्चा चालू असताना राजकपूरशिवाय अन्य कोणकोणत्या अभिनेत्यासाठी मुकेशने पार्श्वगायन केले आहे याची यादी आठवत असतानाच त्यातील एका मित्राने त्याला मुकेशचे "रजनीगंधा" चित्रपटातील 'कई बार यूं भी देखा है...' हे गाणे खूप आवडीचे वाटत असल्याचे म्हटले. जे कोणत्याच अभिनेत्याच्या तोंडी नसून नायिकेच्या सैरभैर मनस्थितीच्या वर्णनासाठी पार्श्वसंगीत म्हणून चित्रपटात या गाण्याचा मार्मिकपणे वापर केला गेला आहे. हे गाणे माझ्याही अत्यंत आवडीचे आहे. त्या अनुषंगाने सलिल चौधरी यांच्या त्या गाण्याविषयी काही लिहावे...विशेषतः गीतकार 'योगेश' यांच्या एरव्ही गद्य वाटू शकणार्या गीतांविषयी....असे मनात आले.
तोच हा प्रयत्न !
हृषिकेश मुखर्जी यानी १९५९ मध्ये राज कपूरला घेऊन तयार केलेला 'अनाडी' आणि त्यातील गाणी खूप गाजल्याचे इथल्या सर्वच चित्रपटप्रेमी सदस्यांना माहीत आहेच. अनाडीच्या यशाने प्रेरित होऊन हृषिदांनी राज कपूर यालाच केन्द्रस्थानी ठेवून 'आनंद' ची जुळवाजुळव सुरू केली होती. इतकेच नव्हे तर अनाडीच्या वेळेसच आनंदसमवेत गाजलेले 'बाबू मोशाय' हे सहाय्यक पात्राचे नावही नक्की झाले होते...त्याला कारण म्हणजे राजकपूर हृषिकेश मुखर्जी याना सेटवर नेहमी 'बाबू मोशाय' याच नावाने हाक मारीत असे. गीतकार म्हणून अर्थातच शैलेन्द्र, ज्यानी 'अनाडी' साठी लिहिलेली गाणी संगीतप्रेमींच्या तोंडात बसली होती. पण त्याच वेळी स्वत:च्या 'आर.के.प्रॉड्क्शन'च्या 'जिस देश मे गंगा बहती है' मध्ये राजकपूर इतका व्यस्त झाला की त्याला 'आनंद' साठी तारखा देणे शक्य झाले नाही. पुढे त्या पाठोपाठ 'संगम' आला...त्यात तब्बल ५ वर्षे गेली...संगम गाजत असतानाच राजकपूरने त्याच्या महत्वाकांक्षी 'मेरा नाम जोकर'मागे लागल्यावर मग तर 'आनंद' साठी तो मिळणार नाही हे पक्केच झाले आणि निराश झालेल्या हृषिदांनी 'आनंद' ची कथा आणि निर्मिती विचार आपल्या फडताळात ठेवून दिला...कारण त्याना त्या भूमिकेसाठी राजकपूरशिवाय अन्य अभिनेता सुचत नव्हता. [विशेष म्हणजे ज्यावेळी 'आनंद' तयार झाला त्यावेळी हृषिकेश मुखर्जी यानी तो चित्रपट 'राजकपूर आणि मुंबई शहर' याना अर्पण केला].
पुढे 'आराधना' नंतर राजेश खन्ना युग आल्यावर आणि त्याच्या अभिनयाची धाटणी त्यावेळी सर्वानाच 'आल्वेज हॅपी काईंड फेलो' अशी वाटू लागल्यावर हृषिदांनी त्याला घेऊन 'आनंद' सुरू केला. 'अनाडी' ची संगीतकार जोडी शंकर-जयकिशन संपले होतेच...पण कथानकातील गाण्यांसाठी हृषिदां ज्या नावावर ठाम होते, ते नाव...शैलेन्द्र...हे देखील परलोकवासी झाले होते. संगीतासाठी सलील चौधरी ठरले आणि मग त्यानाच 'शुद्ध हिंदी लिहिणारा', साहित्याची जाण असणारा, कवी-गीतकार शोधण्यास सांगण्यात आले...[कारण शैलेन्द्रनंतर त्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत जे काही गीतकार होते...उदा. मजरूह सुलतानपुरी, हसरत जयपुरी, नक्श लायलपुरी, शकील बदायुनी, अंजान, आनंद बक्षी, एच.एस.बिहारी आदी...यांच्यावर उर्दू भाषेचा फार प्रभाव होता, नेमका तोच हृषिदांना नकोसा झाला होता....]आणि इथे प्रवेश झाला तो त्या गरजेला पुरेपूर उतरणारा एक युवा कवी 'योगेश गौड'.
दुर्दैव म्हणा वा दुर्लक्ष म्हणा हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकारांना त्यांच्या चालीसाठी 'कवी' नको 'गीतकार' हवा असतो, शिवाय तो 'साहित्या'च्या प्रांतातील तर बिलकुल नको असतो...कारण बैठकीच्यावेळी तो शिरजोर होईल अशी भीती या संगीतकारांच्या मनात असते. त्यामुळेच की काय योगेश या साहित्यिक कवीला चित्रपटसृष्टीने जसे 'समीर' ला भरभरून स्वीकारले तसे कधीच आपलेसे केले नाही. असे असले तरी योगेश यानी जी काही मोजकी कामे केली त्यात एरव्ही गद्य वाटू शकणार्या त्यांच्या गीतांनी जी काही लोकप्रियता मिळविली ती हजारभर चित्रपट करणार्या समीरला मिळू शकत नाही.
लखनौच्या एक सुसंस्कृत कुटुंबात जन्म झालेल्या योगेशचे शिक्षणही तिथेच झाले आणि पदवीपूर्वीच वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबासाठी नोकरीचाकरी करण्याची वेळ आली...साल होते १९६०. काही मित्रांच्या सल्ल्यावरून योगेशने मग मुंबई महानगरीत आपले नशीब आणि प्रतिभा अजमावण्याचा निर्णय घेतला. उत्तर भारतातून या मोहनगरीत येणार्या प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते ते चित्रपटसृष्टीत आपल्या साहित्यिक कलागुणांना वाव मिळतो का ते पाहाण्याचे. त्यावेळी लखनौमधील त्याचे एक मित्र सत्यप्रकाश मुंबईतच चोप्रा फिल्म्सच्या पटकथा विभागात उमेदवारी करीत होते. साठच्या दशकात मुंबईतील ओशिवारा इथे टिपिकल अशा एका चाळीतील सिंगल रूममध्ये अशी ही तीनचार धडपडे युवक पाठ टेकण्यासाठी जमत आणि दिवसभर केलेल्या पायपिटीची उजळणी रात्री तिथेच स्टोव्हवर केलेल्या जेवणासोबत एकमेकाला सांगत. योगेश त्यातीलच एक. सत्यप्रकाशने योगेशला दोनचार सहाय्यक संगीत दिग्दर्शकाकडे 'चित्रपट गाणी लिहिण्याच्या शिकवणी'साठी नेले. त्यावेळी ह्या युवकाला समजले की संगीत दिग्दर्शकाकडे गाण्याची 'चाल' अगोदर तयारच असते आणि ती हार्मोनियमवर गीतकाराला ऐकविल्यावर त्याच्या आधारे कथानकातील त्या जागेला पूरक अशी शब्दरचना लिहायची....[किंवा तयार करायची...]. हा प्रकार 'कवी' म्हणून वयाच्या नवव्या वर्षापासून लिखाण केलेल्या योगेशच्या पचनी पडणे कठीण होते...कारण हा तर मुक्त छंदाचा प्रेमी...शिवाय 'ट' ला 'ट' जुळवून 'एबीसीडी छोडो..प्रेम का साथ जोडो...' अशी शुष्क गाणी लिहिणेही याला नामंजूरच होते. तरीही सत्यप्रकाशने त्याला 'जीना यहाँ मरना यहाँ..' हे मंजूर असेल तर चालीवरच गाणी लिहिली पाहिजेसच तू...अशी धमकीवजा सूचना दिल्यावर तो तयार तर झाला, पण त्याने 'तशा पद्धतीची गाणी लिहिताना मी माझ्या कवितेवरील भक्तीला दूर करणार नाही..' असा मनोमनी निश्चयही केला. सत्यप्रकाशने मग 'सी' दर्जाच्या चित्रपटांना संगीत देणार्या रॉबिन बॅनर्जीकडे योगेशला नेले. त्या काळात दारासिंगला आलेला भाव पाहता सी ग्रेड निर्मातेही धडाधड तसलेच चित्रपट बाजारात आणत होते...'सखी रॉबिन, मार्व्हल मॅन, फ्लाईंग सर्कस, रॉबिनहूड..." अशी चित्रपटांची नावे जरी वाचली तर ते काय दर्जाचे होते याची कल्पना होती. या सार्या चित्रपटांचे संगीतकार होते रॉबिन बॅनर्जी. अशा चित्रपटांतील गाणी गाजली काय किंवा न गाजली काय...निर्मात्याला कसलाही फरक पडत नसायचा. कारण त्यांच्या दृष्टीने हाणामारी, कोलांट्याउड्या, राजकन्येचे अपहरण, खलनायक सेनापती, एखादा जादूगार, मग एक तगडा नायक, त्याची तलवारबाजी...बस्स..झाले काम. अधुनमधून तोंडी लावण्यापुरती हेलेन-लक्ष्मीछाया-मधुमती-राणी यांचे एखाददुसरे नृत्य...मग त्यावर कसलेही शब्द गाण्यासाठी असले तरी काही फरक पडत नव्हता. योगेशने अशातर्हेच्या चित्रपटासाठी गाणी लिहून दिली एका गाण्याला २० रुपये अशा दराने.. निदान महिन्याभराचे रेशन तरी खोलीवर आपल्या पैशातून आले याचाच योगेशला जास्त आनंद.
रॉबिन बॅनर्जीच्या रूमवर संगीत बैठकीसाठी येणार्यामध्ये गीतकार 'अंजान' [लखनौचेच लालजी पांडे...प्रसिद्ध गीतकार समीरचे वडील] यांच्याशी त्याची मैत्री जुळली. कारण एकच.. दोघेही धडपडे आणि तितकेच उपाशीही. योगेशला मिळालेला पहिला चित्रपट जसा आपटला, तितकाच अंजान याना मिळालेला 'गोदान'ही...ज्याला पं.रविशंकर यांचे संगीत लाभले होते. मात्र त्या अपयशाने दोघांची मैत्री जुळली आणि कामे शोधताना एकमेकाची साथ 'बेस्ट' द्वारा सुरू राहिली.
'अंजान' आणि सलील चौधरी यांची दाट मैत्री होती पण सलीलदा यांच्या संगीतप्रकृतीला मानवेल अशी गाणी अंजान लिहू शकत नव्हते. तथापि त्यांच्या मैत्रीत काही फरक आला नव्हता...त्याला कारण म्हणजे सलीलदा यांची पत्नी सविता ह्या साहित्यप्रेमी होत्या. अंजानसमवेत घरी येणार्या योगेशसमवेत सविता चौधरींची चांगलीच मैत्री जुळली. सविताने त्याची कविताची वही पाहिली....[योगेश यांच्या याच कवितेच्या वहीचा उपयोग हृषिकेश मुखर्जी यानी 'आनंद' च्या त्या एका प्रसंगात केला आहे...ज्यात एक मोरपीस ठेवलेले असते.. जे पाहून राजेश खन्ना हळुवारपणे 'कही दूर जब दिन...' गाणे म्हणतो] आणि योगेशच्या सहजसुंदर गद्य कवितांनी त्या भारावून गेल्या...त्या रात्री त्यानी सलील चौधरींना योगेशची ती वही दाखविली आणि मग तिथेच सलील, हृषिकेश मुखर्जी याना अभिप्रेत असलेला 'शैलेन्द्र' सापडला.
दुसर्या दिवशी तात्काळ मुखर्जी यांच्याकडून अंजानला निरोप गेला की त्या युवकाला घेऊन सलील चौधरीच्या घरी येणे. हृषिकेश मुखर्जी हे नाव किती दबदब्याचे आहे हे अंजान, सत्यप्रकाश याना अर्थातच माहीत होती. ती संधी अजिबात घालवू नकोस असे योगेशला वारंवार सांगून त्याला सलीलदांच्या घरी आणले. तिथे प्रमुख कलाकार वगळता चित्रपटाशी संबंधित सर्वच घटक होते...अगदी कॅमेरामन जयवंत पाठारेसुद्धा....कथानक वाचन सुरू झाले...आणि सायंकाळच्या सुमारास योगेश यानी त्या वातावरणालाच जणूकाही अनुसरून ऐकविलेल्या चालीवर गीत रचले :
"कहीं दूर जब दिन ढल जाये
सांझ की दुल्हन बदन चुराये, चुपकेसे आये..."
गायिले मुकेशने आपल्या तरल आवाजात...सोनेच केले या रचनेचे.
चित्रपट पूर्ण झाल्यावर त्या एका गाण्याने तसेच दुसरे..."जिंदगी कैसी है पहेली हाये, कभी तो हसांए...कभी ये रुलाये !" [जे मन्ना डे यानी गायले होते]...यानी अतोनात प्रसिद्धी मिळविली...'आनंद'शी निगडित सारेच घटक एका रात्रीत देशात लोकप्रिय झाले. योगेश आणि सलील चौधरी असे समीकरण छान जुळले. पुढे 'अन्नदाता...आनंदमहल...अनोखा दान' असे काही चित्रपट या जोडीने दिले...पण या सर्वात आगळावेगळा होता तो म्हणजे 'रजनीगंधा'.
चित्रपट 'आर्ट फिल्म' म्हणून समीक्षक आणि रसिकांना उचलून धरला. अमोल पालेकर आणि विद्या सिन्हा ही दोन नावे हिंदी चित्रपटसृष्टीत चांगलीच रुजली. यातील संगीत तर सर्वतोमुखी झाले. योगेश यानी ह्यासाठी दोन गाणी लिहिली...तितकीच होती 'रजनीगंधा' मध्ये :
१. "रजनीगंधा फूल तुम्हारे..." लता
२. "कई बार यूं भी देखा है...ये जो मन की सीमा रेखा है".. मुकेश.
[मुकेश याना त्यांच्या दीर्घ अशा पार्श्वगायन प्रवासात फक्त एकदाच 'राष्ट्रीय पुरस्कार' मिळाला....तोही शंकर-जयकिशन तसेच राजकपूरसमवेत केलेल्या चित्रपट गायनासाठी नव्हे तर...योगेशच्या याच गीतासाठी, हे एक विशेषच म्हणावे लागेल.]
दोन्ही गाण्यांतील हळवेपणा विलक्षणच...शिवाय अतिशय शुद्ध हिंदीचा वापर...मुक्त छंदाचा उपयोग...आणि लता मुकेश यांच्या आवाजाची दैवी करामत. इथल्या सर्व सदस्यांनी ही दोन्ही गाणी जरूर माहीत असतील...ऐकलीही असणार, पण दोन्हीचे एक वैशिष्ट्य म्हणजे दिग्दर्शक बासू चटर्जी यानी कलात्मकतेने ही गाणी नायिका नायकाच्या तोंडी न देता त्यांचा 'पार्श्वसंगीत' म्हणून उपयोग केला आणि नायिकेच्या मनी असलेल्या भावनांना त्याद्वारे 'चित्रित' केले. हा एक अनोखाच प्रयोग होता...जो बासू चटर्जीसारखाच दिग्दर्शक करू जाणे. बासूदा यानीच मग पुढे 'छोटी सी बात', 'प्रियतमा', 'दिल्लगी', 'बातो-बातो मे' आणि "मंझिल" या चित्रपटासाठी योगेश यानाच गीतकार म्हणून करारबद्ध केले. या सार्या चित्रपटातील गाणी तितक्याच सघन अर्थाने आणि मधुरतेने चिरपरिचित झाली आहेत. 'मंझिल' मधील अमिताभ बच्चन आणि मौशुमी चटर्जी यांचे गेटवे ऑफ इंडिया समोरील भर पावसातील 'रिमझिम घिरे सावन...' हे गाणे तर उत्कृष्ट छायाचित्रणाचा एक सुंदर नमुना ठरला आहे. 'छोटीसी बात' मधील लताचे 'न जाने क्यों होता है, ये जिन्दगी के साथ अचानक ये मन किसी के जाने के बाद....' हे गाणे तर पत्रलेखन केल्यासारखेच गद्यमय आहे...लताने म्हटलेही आहे अत्यंत नाजुकपणे.
...पण काळाच्या ओघात ह्या मोहमयी मायावी चित्रदुनियेतून जिथे हृषिकेश मुखर्जी, बासू चटर्जी, सलील चौधरी आदी मागे पडले, बर्मन पितापुत्रही कैलासवासी झाले...मारधाड आणि गाण्यातील शब्दांना कसलाही आगापिछा नसला तरी चालते असे दिवस आल्यावर 'योगेश' यांच्यासारख्या 'कवी-गीतकारा'ने या प्रेमाला रामराम करणे हे क्रमप्राप्तच होते....झालेही तसेच.
१९४३ साली जन्मलेले योगेश गौड आज बरोबर ७० वर्षाचे झाले असून त्यानी चित्रपटलेखन संन्यास घेतला आहे.
हा लेख वर काढण्याऱ्या/रीचे
हा लेख वर काढण्याऱ्या/रीचे मनस्वी आभार !
शांकलीशी सहमत, वर्षानुवर्षे मनात झालेलं माहितीचं संकलन जिव्हाळ्यात मुरवून तुमचं अशा प्रकारचं लेखन होतं अशोक.
म्हणून ते वाचताना आपल्याकडून या अशा महान विस्मृत प्रतिभांकडे किती दुर्लक्ष झालं आहे ते जाणवतं.
म्हणजे त्या खोल भावविश्वात बुडालेल्या गाण्यांचा आनंद घ्यायचा , आणि तो आनंद ज्यांनी निर्मिला त्यांचा अनुल्लेख चालवून घ्यायचा आणि स्वत:ही करायचा.अक्षम्य.
''दिग्दर्शक बासू चटर्जी यानी कलात्मकतेने ही गाणी नायिका नायकाच्या तोंडी न देता त्यांचा 'पार्श्वसंगीत' म्हणून उपयोग केला आणि नायिकेच्या मनी असलेल्या भावनांना त्याद्वारे 'चित्रित' केले.'' यातूनही योगेश यांच्या गीतांची तरलता,त्यातले कवितापण सिनेमातील संदर्भापलीकडे जाणारे आहे हेच अधोरेखित होते..
कृपया अशा अन्यही गीतकारांवर लिहा..
@चेतन प्रदिप, भरत व्यास,
@चेतन
प्रदिप, भरत व्यास, इंदिवर यांना इतर कवि किंवा गीतकारांच्या यादीत गणण्याचे औद्धत्य करणे अंमळ धार्ष्ट्याचे ठरेल.
मस्त झालाय लेख! खुप
मस्त झालाय लेख! खुप अभ्यासपुर्ण!
योगेश गौड हे नाव कधी ऐकलं नव्हतं.
मामा,तुमची ओघवती भाषा, लिहायची धाटणी सुंदर आहे.
महेश, माझं नाव टंकल्यावर एक
महेश,
माझं नाव टंकल्यावर एक Enter ची कळ दाबायला हवी होती. तसे न केल्याने त्या मान्यवरांच्या यादीतच माझे नाव पहिले दिसत आहे.
भरत व्यास बाबत सहमत.
इंदिवर यांनी बर्याच व्यावसायिक गीतरचना केल्या आहेत. प्रदीप यांचा किस्सा तर अजूनच वेगळा आहे. त्यांच्याविषयी कधी सवडीने वेगळा धागा काढेन.
अशोकमामा, अगदी समयोचित लेख!
अशोकमामा,
अगदी समयोचित लेख! माझ्यासारख्या अज्ञ लोकांना तुमचे लेख मार्गदर्शक आहेत. अपरिचित प्रांतात ओळखीचं दालन उघडल्यासारखं वाटतं.
थोडी दुरुस्ती सुचवतो.
>> 'न जाने क्यूं होता है ये बारबार...अचानक ये मन...'
याऐवजी
'न जाने क्यूं होता है ये जिंदगीके साथ...अचानक ये मन...'
असं हवं होतं ना? त्रुटीनिर्देशाबद्दल क्षमा असावी.
आ.न.,
-गा.पै.
चेतन योग्य तो बदल केला आहे.
चेतन
योग्य तो बदल केला आहे.
@गापै, तुम्ही म्हणता ते गीत
@गापै,
तुम्ही म्हणता ते गीत वेगळे आहे.
https://www.youtube.com/watch?v=NC1yM-9Jwrk
आणि अशोकजी ज्या गीताबद्दल म्हणत आहेत ते वेगळे आहे.
https://www.youtube.com/watch?v=UVeDXzv7AQU
गा पै म्हणतात ते बरोबर वाटते
गा पै म्हणतात ते बरोबर वाटते आहे.
श्री.गामा पैलवान.....आणि
श्री.गामा पैलवान.....आणि महेश....
चर्चेबद्दल आभार....महेश वरील एका गाण्यामधील टंकलेखनाची माझ्याकडून नकळत झालेली चूक श्री.गामा पैलवान यानी दाखविली आहे....ती मी मूळ गीतावरून तपासली. गापै यानी उल्लेख केलेले गाणे "छोटीसी बात" चित्रपटातील आहे...लताचे.... तर तुम्ही दर्शवीत असलेले गाणे "रजनीगंधा' तील मुकेश यांचे आहे. श्री.गापै यांच्या सूचनेनुसार मी मूळ लेखात योग्य तो बदल केला आहे.
लेखा जशाच्या तसा वाचला जात नाही, ही बाब अतिशय समाधानाची असते आणि अशा रितीने होणार्या चुका दाखविणार्याचे लेखकाने आभार मानलेच पाहिजे.
मागे सशल यानीही ऊर्दू भाषेतील गाण्याच्या वहीचा उल्लेख केला आहे....त्याबद्दल माझ्याकडील माहिती ही सविता चौधरी यांच्या मुलाखतीवर आधारित असल्याने तसा उल्लेख लेखात आला होता.
असो....एका चांगल्या दर्जाच्या कवीवर इतक्या सविस्तररित्या प्रतिसाद लिहिणार्यांना मनःपूर्वक धन्यवाद. या प्रतिसादांमुळेच अशा विषयांवर इथे लेखन करीत राहावे यासाठी पाठबळ मिळते.
Pages