'' जगन्नाथाचा रथोत्सव''-- स्वा. सावरकर- एक अर्थान्वयन-रसग्रहण

Submitted by भारती.. on 30 October, 2012 - 01:51

जगन्नाथाचा रथोत्सव-- एक अर्थान्वयन-रसग्रहण
(स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानात जन्मठेप भोगत असतांना केलेले हे काव्य)

ऐश्वर्ये भारी |या अशा ऐश्वर्ये भारी |
महाराज आपुली कथा ना कुठे निघे स्वारी |धृ||
दिक क्षितिजांचा दैदिप्य रथ तुझा सुटता
ह्या कालपथाच्या अतुट उतरणीवरता
नक्षत्रकणांचा उठे धुराळा वरता
युगक्रोश दूरी| मागुती युगक्रोश दूरी |
महाराज आपुली कथा ना कुठे निघे स्वारी?||

(२)
पुसूं नयेचि परी| पुसतसे पुसूं नयेचि परी|
मिरवणूक ही किमर्थ अथवा कुठे निघे सारी
दुज्या कुण्या द्वारी| जावया दुजा कुण्या द्वारी
किंवा केवळ मिरवत येई परत निजागारी
ह्या सूर्यशतांच्या किती दुज्या मशाली जळती
मधुनीच शतावधि चंद्रज्योति ह्या अडती
सरसरत बाण हे धूमकेतूचे सुटती
कितिदा आणि तरी | हीहि तैं |कितिदा आणि तरी
उठे। चमकुनि रात्रि पुरातन तिच्या अंधकारी |
महाराज आपुली कथा ना कुठे निघे स्वारी?||
(३)
जीवाचीच किती | कथा या| जीवाचीच किती ||
रथासी जगन्नाथ तुझ्या या ओढू जे झटती
ज्वालामुखि पंक्ती|पासुनी | ज्वालामुखी पंक्ती|
मज्जापिंडापर्यंत प्रस्फुटिता जी जगती
उंचनिंच पाठी | पुढती वा |उंचनिंच पाठी |
गती तितुकी तव रथ झटतसे ओढायासाठी
इच्छांत आणि या भूतमात्र वेगांच्या
ओवून लगामा तुझ्या परम इच्छेच्या
त्या अतूट उतरणीवरती हो काळाच्या
खेळत हा अतलीं | रथोत्सव | खेळत हा अतलीं
महाराज आपुली कथा ना कुठे निघे स्वारी?||
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

''नासदासींनॊसदासीत्तदानीं नासीद्रजॊ नॊ व्यॊमापरॊ यत् ।
किमावरीव: कुहकस्यशर्मन्नभ: किमासीद्गहनं गभीरम् ॥१॥

न मृत्युरासीदमृतं न तर्हि न रात्र्या।आन्ह।आसीत् प्रकॆत: ।
आनीदवातं स्वधया तदॆकं तस्माद्धान्यन्नपर: किंचनास ॥२॥''
ऋग्वेद 10.130

तेव्हा सत नव्हतं आणि असतही नव्हतं .आकाश नव्हतं आणि त्यापलिकडचे विस्तारही. काय होतं जे सर्वत्रावर झाकोळलं होतं ? कुठे? कुणाच्या आश्रयाने ?
गूढ गंभीर पाणी सर्वत्र हेलकावत होतं काय?
मृत्यू नव्हता म्हणून अमृतत्वही नव्हतं. न रात्र होती ना दिवस स्वतःला जाणणारं एक वायुरहित तत्त्व प्रस्फुरत होतं.त्याशिवाय अन्य काही नव्हतं.

ऋग्वेदकाळापासून प्रतिभाशाली मनांना आकर्षित करणारं विश्वरहस्य . अंदमानात जन्मठेप भोगत असलेल्या सावरकरांना अस्तित्वाच्या त्या केंद्राकडून किती शांत प्रेरणा मिळत असल्या पाहिजेत की त्यांनी 'जगन्नाथाचा रथोत्सव' सारखं एक रूपक आपल्या प्रज्ञेने त्या निष्ठूर बंदिवासातही अंतःचक्षूंनी पाहिलं,शब्दांत साकारलं.विश्वनियंत्याला त्याच्या अगम्य अफाट रचनेबद्दल प्रश्न केले.

जगन्नाथाचा रथ ही आपण सामान्य व्यवहारात स्वीकारलेली एक प्रतिमा, पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील एक कर्मकांड, ज्यात देवाचे विराट मंदिरसदृश तीन रथ सगळे भाविक, यात सर्व पंथमतांचे एरवी निषिद्ध मानलेले लोकही येतात, मिळून आषाढ शुद्ध द्वितियेला ओढत नेतात.कृष्ण, बलराम व सुभद्रा ही तीन भावंडे आपल्या मावशीला भेटायला दरवर्षी निघतात.. हा रथ आणि त्याचा सारथी याबद्दल देह व बुद्धी असेही एक रूपक आधीच प्रचलित आहे. ही रथयात्रा म्हणजे रथ , त्याची चाके व तो जनसमुदायासहित भारलेला परिसर याचे एकत्व असेही मानले जाते.

मुळात ऐश्वर्य म्हणजे ईश्वराचे,ईश्वरतेने परिपूर्ण. ऐहिक अर्थाने वापरला जाणारा हा संपूर्णपणे अनीह शब्द सावरकरांनी त्याच्या उगमस्थानी नेऊन ठेवलाय. हा विश्वविस्तार, या कवितेतला 'जगन्नाथाचा रथ' कुठेतरी कुठूनतरी निघालाय. तो ऐश्वर्याने सहजपणे संपृक्त आहे.त्याच्या स्वामीला ,जगन्नाथाला कवी विचारतोय,हे ऐश्वर्य घेऊन ,या रथाचे लीलया सारथ्य करत आपण कुठे निघाला आहात?
हे प्रस्थान ठेवणं अर्थातच एका अशा प्रवासाचं आहे जिथले रस्ते दगडमातीचे नसून काळरूप आहेत. विश्व-रथाच्या मिती अर्थातच दिक्-क्षितिजांच्या आहेत.रथ पुढे जातो तेव्हा मागे चाकांखाली उडणारा धुरळा नक्षत्रकणांचा आहे- विघटन पावणार्‍या आकाशस्थ गोलांचा आहे.युगांचा आक्रोश, महाध्वनी मागे पडतोय.रथ पुढेच जातोय अलिप्तपणे.

दुसर्‍या कडव्यात कवी न राहवून विचारतोय- प्रवासाला निघाले असताना 'कुठे' म्हणून विचारू नये असा एक संकेत आहे . इथे तर ज्याला छेडायचे तो विश्वनियंता आही,तरीही ही ब्रह्मजिज्ञासा स्वस्थ बसू देत नाही. 'कोठे जाण्यासाठी हा खटाटोप? दुसर्‍या कुण्या दारात (जसे की मूळ रथयात्रा कृष्णांच्या मावशीकडे जाऊन परत येते ), की केवळ हे 'ऐश्वर्य विस्तारवून मिरवून परतच यायचेय मूळ केंद्रबिंदूपाशी ?'

एका जुन्या राजस्थानी स्त्रीगीताची अभावित आठवण झाली.. 'बाजारात जायचंय ते खरेदी-सौद्यासाठी नाहीच ,थोडी माझ्या काजळाची चमक अन कंकणांची लखलख सगळ्यांना दाखवून परत यायचेय ग सखे !' असं म्हणणार्‍या त्या स्त्रीसारखं देवाला नुसतं फिरून यायचंय बस्स.ऐश्वर्य मिरवीत !
हे मिरवणं कसं? तर -
रथयात्रेत 'शतसूर्यांच्या ' - सावरकरांचा आवडता शब्द- मशाली जळताहेत, चंद्रांसारख्या छोट्या उपग्रहांच्या नयनमनोहर 'चंद्रज्योती ' जळताहेत. धूमकेतूंचे बाण सरसरत आहेत. अशी भव्य रोषणाई आकाशमंडळात रथाच्या पथावर चाललीय.त्यामुळे तेथील पुरातन रात्रीचा अंधकार उजळून निघतोय.. हा 'पुरातन रात्र' शब्द्प्रयोग पुनः पुरातन सूक्तांची आठवण करून देणारा..अनादि अनंतात चाललेल्या महानाट्याची जाणीव करून देणारा.
'मूलरात्रिर्महारात्रि' असाही एक संदर्भ आहे,जो नीटसा मिळाला नाही,ज्यात वस्तुसंघातामध्ये चेतन होणारी जाणीव व तो वस्तुसंघात विघटन होताना ती जाणीव मालवून जडद्रव्य मागे उरणे असा तम-प्रकाशाचा विरोधविकास वर्णिला आहे .इथे तोही संदर्भ असू शकतो..

तिसरं कडवं.
या रथयात्रेत सामील झालेल्या जीवसृष्टीच्या कौतुकाकडे आता सावरकर अवधान देत आहेत. त्या जीवांच्याच किती कथा, किती परि सांगाव्यात ! या जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी प्रत्यक्ष गतीच घोडा झाली आहे. ''गती तितुकी तव रथ झटतसे ओढायासाठी.. ''
ही गती कोणती ? तर ही गती एकीकडे ज्वालामुखीमध्ये लाव्ह्याच्या अमानवीय ऊर्जेने धगधगणारी ,जडातील ऊर्जा दर्शवणारी तर दुसरीकडे सचेतनांच्या मज्जापिंडांमध्ये संचरणारी दैवी प्राणशक्ती कुंडलिनी अशी चोहीकडून उंचसखोल व्याप्तीची चेतना, विश्वाची गती..हीच जणू अश्वरूप घेऊन तुझा रथ ओढत आहे.
या गतीच्या भूतमात्रांच्या प्रच्छन्न इच्छांच्या अनावर वाटणार्‍या आवेगांमध्ये एका लगामाची वेसण आहेच. तुझ्या परम इच्छेची गच्च वेसण. त्याने तू हा प्रचंड शक्तीशाली अश्व नियंत्रणात ठेवला आहेस.

ही गती अशी सजीव भूतमात्रांच्या मनःपूत स्वैर इच्छांमधून प्रकट होते तेव्हा त्या गतीरूप अश्वांना जुंपलेला रथ उधळून कसा जात नाही ? या जीवमात्रांच्या इच्छा तर स्वतंत्र, परस्परविरोधी दिशांना वार्‍यासारख्या धावणार्‍या आहेत. पण सावरकर सांगताहेत की तसे होत नाही, कारण, या इच्छारूप अश्वांच्या नाकात परमेश्वराच्या परम-इच्छेची वेसण - लगाम आहे. हा अस्ताव्यस्त अनियंत्रित वाटणारा खेळ कुणाच्या तरी नियंत्रणाखाली आहे. म्हणून तर आपण 'ईश्वरेच्छा बलियसि ' असे म्हणतो!

पुनः एकदा सावरकर म्हणताहेत, काळाच्या न संपणार्‍या उतरणीवर ( 'अ-तली' म्हणजे कोणत्याही तळावर-भूमीतळावर नाही अशा अर्थाने ) हा तुझा रथ यात्रेचा खेळ चालला आहे. ही तुझी हेतूरहित लीला विलसतेय. ''रथोत्सव | खेळत हा अतलीं''- स्वतःच्या प्रश्नाला असं स्वतःच स्वातंत्र्यवीरांनी उत्तर दिलेय.. कसा नी कुठे निघालाय हा रथ अन नियंत्याची अद्भुत स्वारी ? तर कुठेही नाही.. हा तर खेळ आहे . आनंद आहे.

अशा तर्‍हेने ग्रहगोल,शतसूर्यमालिकांच्या दीपावली सामावून घेणारे हे विश्व, यातील गतीमानतेचे स्त्रोत,त्यांचं अनाकलनीय प्रयोजन ..सावरकरांच्या निरंतर जिव्हाळ्याच्या विषयावरील ही कविता. स्वातंत्र्यसंग्रामात आपल्या जीवनाचा होम करणारी ही माणसे किती पांडित्य-प्रतिभा पूर्ण होती हे नव्याने काय सांगायचे ! पण आपण विसरतोही खूपच लवकर हल्ली म्हणून आठवण द्यायची तर हिंदुधर्माच्या सनातनत्वाचा बोजा करून न घेता त्यातील फोल निर्ममतेने काढून सत्त्वाचा अभ्यास व आग्रह धरणार्‍या सावरकरांमध्ये टिळक व आगरकर दोघेही एकवटलेले मला भासतात.

शेवटी , या सुंदर रूपकाचं हे यथाशक्ति-मती अर्थान्वयन-रसग्रहण संपवताना, का कोण जाणे मला नासदीय सूक्तच पुनः आठवतेय..
''सुरुवातीला एका परम इच्छेचे बीज अवतरले, ते आदिबीज. नियंत्याचा मूळ आसक्ती-संकल्प. कवी ज्याचा शोध हृदयातून घेतात.(कवीला जे भावते त्याचा शोध शास्त्रज्ञ कमी आकर्षक पद्धतीने लावतात असं बंगालचे परमहंस योगानंद गमतीने म्हणालेत ते स्मरलं, अर्थात इथे हे कवी म्हणजे सत मध्ये ज्यांची प्रज्ञा तपश्चर्येने स्थिरावली आहे असे द्रष्टे..सावरकरांसारखे. )
काय सांगावे हे सारे कुठून आले.. देवही जन्मले नव्हते त्याआधीचे हे प्रस्फुरण.. जेथून हे स्फुरले त्या व्योमांपलिकडच्या परम 'अध्यक्षाला'च माहीत की त्यालाही नसेल माहीत ??!! ''

भारती बिर्जे डिग्गीकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आभार वैभव, दिनेशदा.मलाही खूप छान वाटलं या विस्मृत व अप्रचलित कवितेवर लिहिताना . .
मला संगीत देता आलं असतं तर तो जास्त प्रभावी ट्रिब्युट झाला असता.. :))

स्वातंत्र्यसंग्रामात आपल्या जीवनाचा होम करणारी ही माणसे किती पांडित्य-प्रतिभा पूर्ण होती हे नव्याने काय सांगायचे ! पण आपण विसरतोही खूपच लवकर हल्ली म्हणून आठवण द्यायची तर हिंदुधर्माच्या सनातनत्वाचा बोजा करून न घेता त्यातील फोल निर्ममतेने काढून सत्त्वाचा अभ्यास व आग्रह धरणार्‍या सावरकरांमध्ये टिळक व आगरकर दोघेही एकवटलेले मला भासतात.
अप्रतिम निरीक्षण!!!

बाई माझे! या कवितेचे शिवधनुष्य पेललेस! _/\_
मला अजून १-२दा वाचावं लागेल निवांतपणे Happy

आभार सर्किट, आंबा१, अश्विनी, सुसुकू ! खूपच हायसे वाटले. शिवधनुष्य खरेच ते.आपण इंद्रधनुष्याच्या स्वप्नाळू जगात राहणारी माणसे :)) पण आपलेपणापोटी साहस केले.

@भारती बिर्जे डि... | 30 October, 2012 - 10:01 नवीन
मी भास्कर, हे माझं रसग्रहण, धन्यवाद ते लिहिण्यास प्रवृत्त केल्याबद्दल. <<

सावरकरांच्या काव्याबाबतची तुमची आस्था प्रतिसादातून जाणवली आणि रसग्रहण करणार का हे विचारताच आलेले होकारार्थि उत्तर फार फार आश्वासक वाटले. स्वा. सावरकरांच्या प्रतिभेनेच हे रसग्रहण करण्यास तुम्हाला प्रवृत्त केले हेच खरे!

हे रसग्रहण वाचले नि २४ तासांपूर्वी येथे हे महान काव्य टंकण्याचे सार्थक झाले असे वाटले.
हे शिवधनुष्य पेलण्याचे साहस करणेच मुळात अभिनंदनीय! आमच्या आवाक्याबाहेरचे हे काव्य समजून घेता येईल अशा स्तरावर आणून दिल्याबद्दल धन्यवाद! आता या काव्यातील भावलेली इतर सौंदर्यस्थळे रसिक आपल्या सर्वांच्या नजरेला आणुन देतीलच!
तोवर काव्य आणि रसग्रहण पुन्हा पुन्हा वाचून समजावून घेतो.

अगदी बरोबर ,मी भास्कर, शब्द न शब्द यथायोग्य.त्या महान प्रतिभेनेच मला प्रवृत्त केले, तुमच्यामार्फत.
ही सुरुवात.

>> आता या काव्यातील भावलेली इतर सौंदर्यस्थळे रसिक आपल्या सर्वांच्या नजरेला आणुन देतीलच! >>

माझीही हीच अपेक्षा.

सावरकरकाव्याचे भाष्य
गांगरती भलेभले मनुष्य
प्रचंडसे ते शिवधनुष्य
पेले भारती लीलया

भारतीताई, आपल्या चरणी साष्टांग प्रणाम!!

आ.न.,
-गा.पै.

सुरेख. विस्मृतीत गेली होती कविता माझ्या.
भारतीताई. दर दोन-तिन आठवड्यांनी एक असे रसग्रहण लिहावे अशी विनंती.
सहज आठवले की इरावतीबाईंच्या परिपूर्ती मध्ये बहुतेक रथोत्सवावर एक ललित आहे ना?

चैतन्य, तुम्ही सुंदर लिहिले होते,त्याचीही प्रेरणा होती.
गामा पैलवान, खूप आभार, कधीकधी दु:साहस करणेही चांगले असते. :))
रैना, मी नाही वाचलेय तुम्ही सांगितलेत ते. मिळवून वाचेन्.रसग्रहण लिहायला नेहमीच आवडेल. आभार या छानशा सूचनेबद्दल.

भारतीजी
अप्रतीम, मी हे काव्य बरेचदा वाचले आणि अर्थ लावायचा निष्फळ यत्न केला होता. पण मनास पटेलसे जमेना.
हे रसग्रहण उत्तमच. धंन्यवाद.
सुधीर

आभार मानणेही औपचारिकतेचे म्हणून मानत नाही तुम्हा सर्वांचे. सावरकर हे माझे आवडते कवी.. त्यांना हृदयनाथांनी खरा न्याय दिला नाही तर ते विस्मृतीच्या काळोखात गेले असते. खर्‍याला मरण नसते हेच खरे.
आपल्या महापुरुषांना आपण जातीयतेच्या तुरुंगवासातून कधी सोडवणार ? मी स्वतः बहुजनसमाजाची आहे..म्हणून सवर्ण संत,देशभक्त,कवी यांचं योगदान कमी लेखणं म्हणजे स्वतःची वंचना करणं.राग सकारण सप्रमाण असावा व तो त्या त्या ठिकाणीच स्पष्टपणे व्यक्त करावा..

भारती ताई: अप्रतिम लिहिले आहेत. अनेकदा वाचून ही समाधान होत नाहीये. सावरकरांनी मांडलेला हा दीव्य प्रतिभा उत्सव आणि त्या उत्सवाची कवाडे
आमच्या सारख्या सामान्यांना खुले करणारे तुम्ही प्रज्ञावंत. सावरकरांच्या प्रतिभेला शब्दांचं इतकं सुरेख कोंदण तुम्ही दिलंत.. तुमच्या प्रज्ञेला अभिवादन !!

इच्छांत आणि या भूतमात्र वेगांच्या
ओवून लगामा तुझ्या परम इच्छेच्या
त्या अतूट उतरणीवरती हो काळाच्या
खेळत हा अतलीं | रथोत्सव | खेळत हा अतलीं

या ओळींवर आणखीन विवेचन करावे ही विनंती !!

अवांतर:
@ मी भास्कर: शत जन्म शोधिताना हा धागा आणि सावरकरांच्या इतर कवितांचं रसग्रहण करणारे धागे हे माबो वर group करता येतील का?

@श्रीयू | 31 October, 2012 - 20:27 नवीन
अवांतर:
@ मी भास्कर: शत जन्म शोधिताना हा धागा आणि सावरकरांच्या इतर कवितांचं रसग्रहण करणारे धागे हे माबो वर group करता येतील का?<<

चांगली कल्पना आहे. पण त्यासाठी प्रशासकांचे सहाय्य लागेल असे वाटते.

@भारती बिर्जे डि... | 30 October, 2012 - 23:36
....... त्या महान प्रतिभेनेच मला प्रवृत्त केले, तुमच्यामार्फत.
ही सुरुवात.<<

सुरुवातच मोठी दमदार झालेली आहे. रसग्रहणासाठी केवढा तरी मोठा खजिना भरुन ठेवला आहे सावरकरांनी ! उणीव आहे ती त्या शिवधनुष्याला हात घालणार्‍यांची! तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

अप्रतिम आहे हे! सूर्यकिरणांतून तेज वेचण्याएवढे कठीण काम होते ते.

मी स्वतः बहुजनसमाजाची आहे..म्हणून सवर्ण संत,देशभक्त,कवी यांचं योगदान कमी लेखणं म्हणजे स्वतःची वंचना करणं. >> हे खूप आशादायी आहे. यावरून दुर्गाबाईंचे विचार आठवले. त्या साहित्यात दलीत-साहित्य, स्त्री-साहित्य इ. भेद मानत नसत. लेखकाची अनुभव घेण्याची क्षमता, त्यातली कोवळीक, रसरशीतपणा वेचण्याची ताकद यावर त्याच्या साहित्याचा दर्जा ठरतो. त्याच्या जात, धर्म, लिंग यावर नाही.

जाताजाता, दोन शब्द नविनच वाचले तुमच्या लेखात. तसे त्यांचे अंदाजे अर्थ लागताहेत वाक्याच्या संदर्भावरून! पण नक्की अर्थ जाणून घ्यायला आवडेलः

१. अनीह
२. वस्तुसंघात

अनीह = अन् + इह = इह (लोकांत) नसलेले...? पण मग ते अनिह झाले असते...! का ते अन् + ईह आहे?

-गा.पै.

Pages