सुमार, टुकार उलाढाल! (Kamaal Dhamaal Malamaal - Movie Review)

Submitted by रसप on 1 October, 2012 - 01:35

विंग्रजीतील एक म्हण म्हणते की, 'घोड्याला पाण्यापर्यंत नेता येऊ शकतं, पण त्याला पाणी पाजता येत नाही.' म्हणजे, त्याला तहान असेल तरच तो पाणी पिणार... कितीही काहीही करा..! पण माणसाचं जरा वेगळं असावं.. म्हणजे, जर एखाद्याने ठरवलं की त्याला शेणच खायचं तर तुम्ही त्याला गोठ्यापासून कितीही दूर न्या.... तो काही ना काही करून शेण खाणारच ! 'कमाल धमाल मालामाल' च्या निमित्ताने एक चांगली कहाणी प्रियदर्शनला मिळाली होती पण... आता शेणच खायचं ठरवलं असेल, तर काय करणार ना ? असो.. उगाच कुणाचं खाणं-पिणं काढू नये म्हणतात. आपण शेणेमाबद्दल बोलू... सॉरी, सिनेमाबद्दल बोलू..

'प्रियन'च्या इतर अनेक सिनेमांप्रमाणे ही कथाही बरेच फाटे असणारी आहे.
उत्तर भारतातील कुठल्याश्या भागातील एक खेडेगांव - 'बिजनोर'. [इथे अजून घराघरात वीजही पोहोचली नाहीये पण गावांतल्या समस्त स्त्रीवर्गाने चिकनं-चुपडं दिसण्यासाठी पावडर, लिपस्टिक, हेअर स्ट्रेटनर, चांगले कपडे, ई. जीवनावश्यक गोष्टी मुबलक उपलब्ध असाव्यात. बिच्चारा पुरुषवर्ग मात्र एकदम 'लायकीत'ले कपडे व एकंदर अवतार करून वावरतो, अपवाद - 'जॉनी बेलिंडा (श्रेयस तळपदे).] कोणे एके काळी इथे दोन जिवलग मित्र असतात.. ओम पुरी आणि परेश रावल. प्रेम सोडून इतर सगळं भागीदारीत करणारे...! अर्धे अर्धे पैसे देऊन लॉटरीचं तिकीट घेतात.. जिंकतात आणि पैश्यांवरून एकमेकांशी भांडतात. परेश रावल सगळे पैसे हडपतो आणि ओम पुरी त्याच्या मित्राची गर्लफ्रेंड पळवतो अन लग्न करतो. जिवलग मित्र जानी दुश्मन बनतात.
पुढे श्रीमंत मा. मित्र धटिंगण बनतो... (मा. = माजी. असंस्कृत लोकांनी विकृत अर्थ काढू नये.) दोन-तीन वळू-टाईप मुलगे आणि गरीब मित्राच्या डरपोक पोराच्या प्रेमात पडण्यासाठी एक टकाटक पोरगी पैदा करतो. बायको गचकली असावी कारण ती दिसत नाही. गरीब मित्र ओम पुरी खड्डे खणून कुटुंबाची गुजराण करत असतो. कसले खड्डे ? का ? असले प्रश्न विचारू नका. ते त्यालाही पडले नव्हते म्हणून मलाही पडले नाहीत. पण सुचेल तेव्हा हातात कुदळ-फावडा घेऊन हा खड्डेच खणत असतो. मुलगा श्रेयस तळपदे गावातल्या शेंबड्या पोरांकडूनही मार खात असतो तर गर्लफ्रेंडच्या सांड भावांकडून का नाही खाणार..? एकदम हक्काने ते त्याला येता-जाता ठोकत असतात. पण आळशी पोराला कशाचं काही नसतं. कुत्र्यासारखा मार खाऊनही त्याला मुका मार, जखमा काही होत नसतात. (तो बहुधा अमिबा आणि टर्मिनेटरचं मिक्स ब्रीड असावा. म्हणून जखमा भरून निघत असाव्यात आणि मुके मार, सूज वगैरे बदलत्या आकारात सपाट होत असाव्या.) तो तिन्ही त्रिकाळ घरात एक तर घरात पडून राहात असतो किंवा गावभर हुंडारत असतो. बाप खड्डे खोदतोय आणि पोरगा फक्त लॉटरीची तिकिटं विकत घेतोय.. !
तर हे असं सगळं चालू असताना एक अनोळखी इसम (नाना पाटेकर) गावात येतो आणि थेट ओम पुरीचं घर गाठतो. तो गावात येतो दुपारच्याला आणि घरी येतो रात्री.. का ? कारण अंधारातून येताना रस्त्यात येणाऱ्या विहिरीत पडणं आवश्यक असतं. हा अनोळखी इसमही एक धटिंगण असतो आणि त्याच्या येण्याने मरतुकड्या जॉनीला 'बॉडीगार्ड' मिळतो आणि तो त्याला स्वत:च्याच घरात 'वाइल्ड कार्ड एन्ट्री' मिळवून देतो.
अनेक भरीचे सीन झाल्यावर, एक दोन चोरलेल्या गाण्यांवर हिरो-हिरोईनची अंगविक्षेप करायची हौस फिटवून झाल्यावर सिनेमा अपेक्षित वळणावर येतो. हिरोईनचा बाप, हिरोसमोर 'टार्गेट' ठेवतो. नाताळच्या सुटीत दिवसभर उलटा लटक किंवा काय हवं ते कर. गावाच्या चर्चला पूर्वी एक सोन्याचा क्रूस होता, जो चोरीला गेला आहे; तसा एक सोन्याचा क्रूस चर्चसाठी आण आणि पोरीला ने ! (च्या मारी ! पोरगी चर्चच्या पायरीवर मिळाली होती की काय ?) आत्तापर्यंत चाणाक्ष प्रेक्षकाला कळलेलं असतं की तो क्रूस कोणे एके काळी कुणी चोरलेला असतो आणि तोच क्रूस मरतुकड्या जॉनीला येनकेन प्रकारेण मिळणार आहे. मिळतो. त्यात अर्थातच धटिंगण नाना मदत करतो. शेवटच्या १५ मिनिटात सर्व पात्रं अचानकच सभ्य, समजूतदार, मोठ्या मनाची वगैरे होतात आणि सिनेमा आपटतो... सॉरी आटोपतो.

Priyadarshans-kamaal-dhamaal-malamaal.jpeg

'नाना नक्की कोण आहे?' ह्या एकाच प्लॉटवर अख्खा सिनेमा लै भारी उत्कंठावर्धक बनवता आला असता. पण आधी म्हटल्याप्रमाणे शेण खायचंच ठरवलं असेल, तर कोण काय करणार ?

श्रेयस तळपदे जीव तोडून जॉनीच्या व्यक्तिरेखेत जीव ओतायचा प्रयत्न करतो, पण पटकथा आणि दिग्दर्शनातील भगदाडं, ओम पुरी व नंतर नानाने खोदलेल्या सर्व खड्ड्यांपेक्षा मोठी आहेत. नाना, परेश रावल आणि ओम पुरी ह्यांनी विडी-काडीचा खर्च भागविण्यासाठी हा सिनेमा केला असावा.

कुठल्याश्या दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक आहे, हे माहित होतं पण माहित नसतं तरी जाणवावं इतका काही ठिकाणी सिनेमा विचित्र उचंबळ दाखवतो.

आताशा मला असं वाटायला लागलं आहे की, प्रियदर्शन आणि शाहीद आफ्रिदी बहुतेक 'एकही चक्की का पिसा आटा' खात असावेत. एक तर ३७ चेंडून १०० किंवा एकदम 'सुमार, टुकार उलाढाल' !

रेटिंग - *

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा मालामाल विकलीचा रिमेक आहे का?
<<
<<

या सिनेमातील स्टारकास्ट व हा सिनेमा, यांची जाहीरात प्रियदर्शनने अशी काही केली होती की, दर्शकांना हा चित्रपट "मालामाल विकली"चा सीक्वलच वाटेल. पण मुळात हा "मलयालम" भाषेत बनलेल्या व सुपरहीट ठरलेल्या 'मारिकून्डोरू कुंजाडु' या सिनेमाचा हींदीत थोडेफार बदल करुन बनविलेला रिमेक आहे.