विषय क्र. १- 'रामसे बंधूंचा सिनेमा'

Submitted by लसावि on 13 August, 2012 - 06:26

रामसे बंधूंच्या सिनेमाकडे बहुतेकवेळा हेटाळणीच्या नजरेने पाहिले जाते. त्यांची अत्यंत कृत्रिम वाटणारी भुते, पठडीबाज वातावरण, एकंदरीत सामान्य दर्जा हे सगळे चेष्टेचेच विषय झाले आहेत. पण माझ्या चित्रपट अनुभवात रामसेंचे स्थान खास आहे कारण मी धडधडत्या हृदयाने पाहिलेला पहिला 'फक्त प्रौढांसाठी'चा सिनेमा होता रामसेंचा 'वीराना'!
रामसेंचा सिनेमा आला हे कळायचे ते त्याच्या भडक, उत्तान पोस्टर्समुळे. चोरट्या नजरेने ती पोस्टर्स डोळे भरुन पाहिली जायची. सिनेमात नक्की काय काय बघायला मिळणार आहे हे आपल्या निष्ठावान प्रेक्षकांना बरोबर कळावे हा उद्देश या पोस्टर्सने लगेच सफल व्हायचा. गावातल्या सगळ्यात गचाळ थिएटरमधे; घाम, पानमसाले, हातभट्टी आणि मुतारी अशा संयुक्त दरवळात पाहिलेले हे सिनेमे माझ्या वयात येण्याचा अविभाज्य भाग आहेत.

एक निर्मितीसंस्था म्हणून रामसे बंधू एकमेवाद्वितीय आहेत. सतत एकाच शैलीचे चित्रपट तयार करणारी ही अजब मंडळी आहेत. इतके की हिचकॉक आणि रहस्यपट यासारखेच रामसे म्हणजे भयपट हे समीकरण पक्के झाले आहे. रामसेंचा सिनेमा अजून एका अर्थानेही वेगळा आहे. प्रस्थापित हिंदी चित्रसृष्टीच्या मुख्य प्रवाहात त्यांना स्थान मिळाले नाही. पण त्याच प्रवाहातील सर्व घटक घेउन त्यांना रामसे स्टाईल फोडणी देउन हे सिनेमे बनले. नातेसंबंधांची, प्रेमाची, सुष्ट-दुष्ट संघर्षाची बॉलीवूडी चौकट, त्याचे मूलभूत गृहीतक याला धक्का न लावता ते सर्व त्यांच्या पद्धतीच्या भयपटांच्या शैलीत रामसेंनी मांडले.

त्यांच्या चित्रपटाच्या या रचनेमुळे मला ते प्रचंड मनोरंजक वाटतात. 'एक्स्पेक्ट द एक्स्पेक्टेड' असा काहीसा प्रकार त्यात असतो. उदाहरणार्थ, रामसेंच्या चित्रपटात सैतान-भूत जे काय असेल ते लोकांच्या मागे लागत नाही, लोकच स्वतःच्या पायाने त्याच्याकडे जातात. आणि हे होताना थिएटरमधे आमच्या गँगचा निव्वळ दंगा चाललेला- ए तो आला बग, आला बग; धरतेय बे तेनी, पळ्,पळ... इ.इ. पुन्हा तिथल्या किंकाळ्यावर आवाज काढून आमचा आरडाओरडा! गरम प्रसंग चालू असताना दुसर्‍याचे डोळे बंद करणे हे ही आलेच! थोडक्यात काय तर पडद्यावर काहीही होउदे, त्याचा वापर करुन आम्ही आमचे मनोरंजन करुन घ्यायचो. रामसेंच्या चित्रपटात कसलाही कलात्मकतेचा आव नाही, उगाच काहीतरी प्रतिकात्मक वगैरे नाही, आणि मला त्यांचा हा प्रामाणिकपणा प्रचंड भावतो.

रामसेंच्या प्रदिर्घ कारकिर्दीतील दोन सिनेमे मला फार आवडतात. त्यांच्या अगदी पहिल्या सिनेमांपैकी, 'दो गज जमीन के नीचे' एक मोठे धाडसच म्हणावे लागेल. १९७२ साली, राजेश खन्नाप्रणीत भावव्याकुळ सिनेमांच्या लाटेत, स्टार सिस्टीम पूर्ण भरात असताना हा चित्रपट आला आणि बर्‍यापैकी व्यावसायिक यशही मिळवून गेला. या चित्रपटात 'झाँबी' ही संकल्पना भारतीय सिनेमात पहिल्यांदा वापरण्यात आली. उत्तम वातावरणनिर्मीती, बर्‍यापैकी खिळवून ठेवणारी कथा आणि रामसे स्पेशल मसाला यामुळे मनोरंजनाची हमखास गॅरंटी म्हणून हा चित्रपट मी तुम्हाला नक्कीच सुचवेन!

या चित्रपटानंतर पुढची अनेक वर्षे रामसेंनी कमी-अधिक व्यावसायिक यशासकट 'होटल', 'दहशत', 'घुंगरु की आवाज' इत्यादी चित्रपट काढले. यातला 'घुंगरु की आवाज' तर चक्क नवकेतनचा होता! या सर्व काळात ते त्यांचा असा सिनेमा शोधत होते आणि तो त्यांना मिळाला १९८४ साली, 'पुराना मंदिर'च्या रुपाने. दुय्यम दर्जाचे कलाकार, अतिस्वस्त निर्मितीमूल्ये, अंगप्रदर्शनाचा सढळ वापर आणि भय-सूड कथा हा रामसे पॅटर्न या सिनेमाने कायमचा पक्का करुन टाकला. हॉलीवूडमध्ये गाजलेल्या अनेक भयपटातील वेगवेगळे प्रकार त्यांनी इथे वापरले.

हिंदी सिनेमाच्या इतिहासातला एक भयाण कालखंड म्हणून ८०च्या दशकाकडे पाहिले जाते. व्हिडीओ पायरसी आणि नव्यानेच आलेल्या इडीअट बॉक्सचा हल्ला, नव्या कल्पनांचा दुष्काळ, थिल्लर संगीत आणि एकंदरीतच सिनेमाच्या सर्व क्षेत्रात कमअस्सल लोकांचा धुमाकूळ अशी परिस्थिती होती. अशा या दशकाच्या मध्यावरचे १९८४ हे वर्ष स्वतंत्र भारताच्या इतिहासातले अत्यंत अवघड काळ; खलिस्तान चळवळ, ऑपरेशन ब्लूस्टार, पंतप्रधानांची हत्या, भोपाळ वायूकांड अशा अनेक घटनांनी संपूर्ण देश कडेलोटाच्या उंबरठ्यावर पोचला होता. लोक घाबरले होते, सैरभैर झाले होते. अशा काळोख्या परिस्थितीत 'पुराना मंदिर'सारख्या सिनेमाची निर्मिती होणे आणि तो तुफान चालणे हे दोन्ही सयुक्तिक वाटते.

रामसेंचा एक प्रातिनिधिक चित्रपट म्हणून 'पुराना मंदिर' वैशिष्ठ्यपूर्ण आहे. जनावरांची डोकी टांगलेल्या जुनाट अंधार्‍या हवेल्या, भुयारं, सैतानाचा अड्डा, जंगल, धुकं, पाउस, चित्रविचित्र प्रकाशयोजना, अत्यंत सरधोपट पार्श्वसंगीत याच्या मदतीने निर्माण केलेले भयाचे वातावरण. सैतानी कारवाया, शाप आणि त्यापासून मुक्ती या भोवती फिरणारी कथा. त्यात शहरातून येणारे नायक-नायिका, अजून एखादी उपजोडी, जंगलातले आदिवासी, ठाकूर ही मुख्य पात्रे. नायक-नायिका आणि त्यांचे मित्र शहरातून येत असल्याने त्यांच्या लैंगिक मोकळेपणाचे आपसूकच समर्थन होत असे आणि आदिवासी तर कमीच कपड्यात असणार नाही का! कथानकाशी पूर्ण फटकून असणारा द्वयर्थी विनोदाचा एक धागाही असे.

पुराना मंदिरचे यश रामसेंच्या खास निर्मितीप्रक्रियेचेही यश आहे. कमीत कमी बजेट, कमी पैशात मिळणारे नवे किंवा दुय्यम कलाकार (या चित्रपटात मोहनीश बहल, आरती गुप्ता, पुनित इस्सार आहेत), दिग्दर्शनापासून ते कॅमेरामन, ध्वनीसंयोजन, कथा-पटकथालेखकापर्यंत सगळी कामे पाच रामसे बंधूंनी एकमेकात वाटून घेतलेली. संगीताकडे दुर्लक्ष हे ही रामसेंचे विशेषच. बप्पी लाहिरी आणि सोनिक-ओमी हे त्यांचे मुख्य संगीतकार, पण त्यांच्या इतक्या सिनेमातील एकही गाणे विशेष गाजले नाही. त्याच त्या कलाकारांबरोबर, त्याच त्या लोकेशनवर चित्रित केलेले हे चित्रपट असल्याने एकापासून दुसरा वेगळा करणे मला अजूनही अवघड वाटते. त्यामुळे बरेच चित्रपट तर तो बघताना झालेल्या इतर गमतीजमतीमुळेच लक्षात आहेत.

चित्रपटाचे वितरण करताना ते तो फार थोड्या प्रिंट्सच्या मदतीने सुरवातीला फक्त मुंबई-दिल्लीसारख्या मोठ्या शहरात प्रदर्शित करीत. हळूहळू त्याच प्रिंट्स छोट्या शहरात नेल्या जात. शहर छोटे असो वा मोठे, रामसेंचा खरा प्रेक्षकवर्ग ज्या दुय्यम-तिय्यम दर्जाच्या चित्रपटगृहात येत असे तिथेच कमी तिकीट दरात हे सिनेमे दाखवले जात. सोलापूरात मी रामसेंचे जे काही चित्रपट थिएटरमधे पाहिले ती सगळीच बकाल आणि कळकट होती याचे कारण हेच!

खान त्रयीच्या उदयाबरोबरच हिंदी चित्रपटांनी वेगळे वळण घेतले आणि या नव्या हवेत रामसेंचा सिनेमा मात्र स्वतःला बदलू शकला नाही. पुढे केशू रामसेंनी स्वतंत्रपणे निर्मीती सुरु केली आणि सबसे बडा खिलाडी, खाकी अशा मुख्य प्रवाहातील चित्रपट बनवले. मात्र रामसे या नावाशी जुळलेला भयपटांचा अतूट संबंध आपल्या सिनेमाची इमेजच बदलून टाकेल हे त्यांना पक्के माहिती होते. त्यामुळे त्यांनी श्रेयनामावलीत आपले नाव केवळ 'केशू' इतकेच येईल ही काळजी घेतली.

माझ्या दृष्टीने हे रामसेंचे, त्यांच्या शैलीच्या चित्रपटांचे यशच आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेख... एकदम हटके Happy

अजूनही आपण "रामसे स्टाईल" असे विशेषण वापरतो यातच काय ते आलं<<< ++१

स्पर्धेसाठी शुभेच्छा!!!

रामसे चे एक दोन सिनेमे बघितले आहेत...

रामसे बंधुं बद्दल हा लेख पाहुन खुप आश्चर्य वाटलं. लेख खुपच मस्त जमला आहे.

मी रामसेंचे दरवाजा, गेस्ट हाउस, हॉटेल, वीराना, दो गज जमीन के नीचे हे सिनेमा पाहिलेत.

तद्दन बी ग्रेड चे असुनही ते सीनेमे पाहिले जायचे. भुतपटांचा कारखानाच होता. अनेक फालतु नट ( दिपक पराशर, प्रेम धवन, मोहनीश बहल, हेमंत बिर्जे) आणि फालतु नट्या ( कोमिला विर्क, पद्मिनी कपिला, सारीका सुध्धा) फालतु गाणी ( अपवाद लता ने गायलेलं "तुफान रातो मे जब तु नही आता, तेरे बीना अब लगता है , सुना ये सन्नाटा" हे गाणं. माला वाटतं हे गाणं सारीका वर चित्रित झालं आहे). बहुतेक शुटींग महाबळेश्वर मधे केलेलं असायचं. महाबळेस्वर मधलं "अनारकली" नावाच्या हॉटेलात खुपसे शुटींग व्हायच. हे हॉटेल "गेस्ट हाउस", "हॉटेल" ह्या दोनही सिनेमात आहे. ( आम्ही एकदा त्या हॉटेल मधे राहिलो होतो)

तुम्ही एक चांगली आठवण करुन दिलीत. वेगळा विषय. तुमचं अभिनंदन!!!!!

आगाऊ,

रामसे नामक विषयाला हात घालायचा आगाऊपणा आवडला. मला व्यक्तिश: चित्रपटातलं काही (म्हणजे काहीही) कळंत नाही. तरीपण उत्सुकतेपायी प्रतिसाद लिहितोय.

हा लेख वाचून मला पडलेले भो.भा.प्र. :

१. केशु रामशांचं निधन झाल्यावर ते नव्या सृष्टीत जाऊन माणूसपट बनवत असतील काय?

२. रामसे लोकांच्या नावात राम आणि भुताचे चित्रपट कसे काय काढतात बरे?

३. की नावात राम असल्याने भुते त्यांन घाबरायची? आणि ते सांगतील त्याप्रमाणे प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेऊन त्यांना परतपरत चित्रपटाच्या खेळाकडे खेचून न्यायची?

४. वरील प्रश्नात वर्णिलेल्या पद्धतीने केशुभाई भूतसृष्टीतील प्रेक्षकभुते खेचून घेत असतील काय? तसं असल्यास अघोरी मांत्रिकाची मदत घेत असतील काय?

कृपया Light 1 च्या प्रकाशात प्रश्न वाचणे!

आ.न.,
-गा.पै.

रामसे बंधूं चित्रपटावरील लेख बघून मज्जा वाटली.

पण यात 'खोज' या केशू रामसे दिग्दर्शीत चित्रपटाचा उल्लेख हवा होता. रामसेंच्या बाकी चित्रपटांपेक्षा वेगळा नी मस्त रहस्यपट!

सुंदर आणि अनपेक्शीत विषयावरचा लेख. खुपच आवडला. खरच एक वेगळा द्रुष्टिकोन दिलात.
'खोज' चा उल्लेख मस्टच. हा सिनेमा रामसे बंधूंचा आहे हे कळल्यावर कोण आश्चर्य वाटलॅ होतं.

वो बीते दिन याद है मलाही आवडतं. मस्तच लेख. त्या पिक्चरातून भुताचं काम करणारा माणूस एकच होता का, कोण होता वगैरे मला बरीच उत्सुकता आहे. Happy

Pages