आपण सारे अर्जुन..

Submitted by बागेश्री on 12 June, 2012 - 01:47

एक खळाळती नदी
तिचे रम्य दोन्ही काठ,
दोन तिरी दोन मन
माना दोघांच्याही ताठ!

समांतर ते जगती
मत एक ना चुकून,
एक होकार भरितो
दुजा नकार घोकून...

वाटे निर्मळ वहावे
अडता, मना पुसावे
त्याने संभ्रम सारावे
आपणास सुखवावे!

प्रत्यक्षात असे नाही
मने धरी भिन्न तान
एक नित्य मी, मी करे
दुजा म्हणे मी महान..!!

मग सहजच वाटे
सारे आपण अर्जुन,
त्याचे प्रश्न मोठे होते
आणि संभ्रम कठिण..!!
इथे प्रश्न इवलाले
करी आपणा अर्जुन,
संभ्रमात जग म्हणे
नाही सुटका ह्यातून!

त्यास कृष्ण तरी होता
योग्य अयोग्य सांगाया,
इथे आपणच खरे
नसे कुणाचीच माया!

मग आपलीच तीर
दोन आपलीच मने,
नवे संभ्रम सोबती
सारी पाळाया वचने!!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सारे आपण अर्जुन,
त्यास कृष्ण तरी होता
योग्य अयोग्य सांगाया,
मस्त बागु..
कलीयुगात आपलं अंतर्मन ,कृष्णाचं काम बजावतं ना!!!

त्यास कृष्ण तरी होता
योग्य अयोग्य सांगाया,
इथे आपणच खरे
नसे कुणाचीच माया!

मग आपलीच तीरं
दोन आपलीच मने,
नवे संभ्रम सोबती
सारी पाळाया वचने!!>>>

सुंदर संदेश आणि निखळ आशय

काही किरकोळ बाबी खटकल्या:

<<<एक मी, मी, मी म्हणे>>>

येथे सात अक्षरे आली आहेत, त्या ऐवजी 'एक सदा मी मी म्हणे' असे सुलभ व्हावे. कृगैन

<<<अडता, मना पुसावे>>> अशा ओळी वाचताना किंचित लय हारवते

ऐवजी:

वाटे निर्मळ वहावे
कुठे अडता पुसावे
त्याने संभ्रम सारावे
आपणास सुखवावे!

<<<मग आपलीच तीरं>>> याऐवजी 'फक्त आपलेच तीर' असे एक सुचले. (तीर वरील र वर अनुस्वार नाही दिला तरी अष्टाक्षरीत तो तसा वाचला जातो असे वाटते) कृ गै न

-'बेफिकीर'!

<<<मग आपलीच तीरं>>> याऐवजी 'फक्त आपलेच तीर' असे एक सुचले. (तीर वरील र वर अनुस्वार नाही दिला तरी अष्टाक्षरीत तो तसा वाचला जातो असे वाटते) >>>
अनुमोदन. एक तीर अनेक तीर (तीरं नव्हे!)

कवितेचा आशय आवडला. पण "कलीयुगात आपलं अंतर्मन ,कृष्णाचं काम बजावतं" हा आशय पोचवणारे कडवं शेवटी असावं असं माझं मत! इथे शेवटच्या कडव्यात संभ्रमाचा उल्लेख आहे. त्याने कवितेचा शेवट अर्धवट सोडल्यासारखा वाटला मला तरी!

बेफिकीर,
सुचनांसाठी आभारी आहे, योग्य ते बदल केले आहेत.

फक्त, "अडता, मना पुसावे" ह्यावर सुचवलेला पर्याय आमलात आणला नाही, त्याचे कारण असे-
तुही सुचवलेला बदल निर्विवाद चांगला आहे पण मला त्या वाक्यात आपण अडले की "मनाला" विचारावे असे हवे आहे,

वाटे निर्मळ वहावे
कुठे अडता पुसावे
त्याने संभ्रम सारावे
आपणास सुखवावे!>> इथे 'त्याने' म्हणजे मन 'च' असे स्पष्ट नाही वाटले.. इतर काही सुचल्यास आवर्जुन कळवा.. माझी गाडी 'अडता, मना पुसावे'' वरच अडकली आहे (हाही संभ्रम का? :फिदी:)

निंबे,
आपण आपले सारथी, आपणच आपले कृष्ण हे मला अजिबात सुचवायचे नाही आहे, आपण सारे संभ्रमित अर्जुनच, कृष्ण पदाला जाऊन (ही शक्यताच अशक्य म्हणा!) आहे त्या परिस्थितीचं उंचावरून परि़क्षण करून त्यातून निर्विकारपणे मार्ग काढण्याचं देवपण आपल्याला लाभणं मला तरी शक्यतेच्या बाहेरचंच वाटतं!

सस्मित, वर्षूतै धन्स! Happy

बागे, मला तुझ्या बद्दल संशय यायला लागला आहे.
वय काय ग तुझं? लै मोठ्या मोठ्या गोष्टी (?) लिवाया लागलिस ते Wink
बाकी मला कवितेतलं काही कळत नाही पण आशय पोहोचला. Happy

आशय छान
कविताही मस्त आहे
पण छन्दबद्ध करताना अडचणी आल्या आहेत हे स्पष्ट जाणवले
हाच प्रयत्न तुमच्या नेहमीच्या शैलीत मुक्ताछांदात करून पहा अजून अप्रतीमपणे , नेमकेपणे अभिव्यक्त होता येईल असे वाटते

असो
कविता छान आहेच ......धन्यवाद

बागु, मस्त ! सुरेख आशय. छान जमली आहे.

त्यास कृष्ण तरी होता
योग्य अयोग्य सांगाया,
इथे आपणच खरे
नसे कुणाचीच माया! >>> वर्षुला अनुमोदन. कलीयुगात आपलं अंतर्मन ,कृष्णाचं काम बजावतं ना!!! Happy

प्रतिसाद देणार्‍या सार्‍यांचे आभार Happy
वैभव, याउलट शब्द पटापट सुचत गेलेत, त्रास नाही पडला, तुझ्या प्रांजळ मतासाठी आभार!

बागेश्री, कविता आवडली. Happy

कलीयुगात आपलं अंतर्मन ,कृष्णाचं काम बजावतं ना!!! >>> अनुमोदन.

मग आपलीच तीर
दोन आपलीच मने,
नवे संभ्रम सोबती
सारी पाळाया वचने!! >>> अगदी अगदी

कवितेत विषय चांगला उलगडत जातो.

कवितेत विषय चांगला उलगडत जातो.>> काका, थँक्स! Happy
गिरी, शिल्पा कवितेची दखल घेऊन प्रतिसाद दिल्याबद्दल खूप आभारी आहे ..
लोभ असावा Happy

कवितेत विषय चांगला उलगडत जातो.>>

खरय काका
काका, थँक्स!

हल्ली गझला जास्त करत असल्याने मला कविता करायला जरा त्रास पडतो . ( एकच विषय घेवून तो अख्खी कविताभर उलगडताना )
मी इतरांच्या कविता वाचून मोठ्या जोशात प्रतिसाद देतो की हे असे हवे ते तसे हवे वगैरे पण मला "तू कविता करून दाखव"...... म्हणाल्यास जरा अवघड जाते ..हे खरे !!
Happy