कसलीच तयारी न करता पहिल्यांदाच गिर्यारोहणाला जाणारे किती लोक पाहिले आहेत तुम्ही ??
ज्या जागी जायचं आहे तिथला नकाशा, तिथे आधी कुणी गेलंय का, त्यांचे अनुभव काय होते, तिथलं वातावरण कसं असेल, सोबत काय न्यावं लागेल, तिथे त्रास होऊ नये म्हणून खाण्या-पिण्यात काय बदल करावे लागतील, आणि सगळी काळजी घेऊनही काही त्रास झालाच तर काय उपाययोजना करायची.....
......बहुतांशी लोक अशी शक्य तितकी माहिती गोळा करूनच गिर्यारोहणाला निघतात.
आणि असं केल्यामुळे " आपल्याला नक्की जमेल हे ! " हा आत्मविश्वास कितीतरी पटीने वाढतो, प्रवास तुलनेने सुखकर होतो.
४-८ दिवसांच्या गिर्यारोहणासाठी एवढी तयारी करायची गरज असेल तर मग .......आयुष्याचा एक तृतीयांश काळ ज्या अवस्थेत घालवायचा त्या " रजोनिवृत्ती " म्हणजेच मेनोपॉजबद्दल माहिती करून घेण्याची आवश्यकता किती तरी पटीने जास्त आहे !
पण ह्या विषयावर खुलेपणाने चर्चा होताना अजूनही दिसत नाही. गर्भावस्थेबद्दल बर्याच प्रमाणात जागृती होत आहे, त्यामानाने मेनोपॉज हा विषय बर्याचदा दुर्लक्षित राहतो.
मेनोपॉज म्हणजे बर्याच स्त्रियांना बागुलबुवासारखा वाटतो...खरं स्वरुप माहीत नसल्याने आणखीनच घाबरवणारा. ह्या विषयाबद्दल बोलायला वाटणारा संकोच सोडून देऊन चर्चा झाल्या तर स्त्रियांना आणि पर्यायाने संपूर्ण कुटुंबाला नक्कीच खूप फायदा होईल.
ह्या लेखमालिकेतून मेनोपॉजविषयी शास्त्रीय माहिती देण्याचा मानस आहे.
विषय तसा मोठा आणि गुंतागुंतीचा वाटू शकेल असा आहे. त्यामुळे शक्य तितक्या हलक्या-फुलक्या भाषेत
लिहायचा प्रयत्न करत आहे. तरीसुद्धा काही गोष्टी बोजड वाटल्या तर नक्की सांगा. उलगडून सांगायचा प्रयत्न करीन.
लेखमालिकेतील विषय असे आहेत :
मेनोपॉज-१ : नेमकं काय घडतं ?
मेनोपॉज-२ : शरीरात होणारे बदल / लक्षणे
मेनोपॉज-३ : शरीराला होणारे धोके - हाडांची झीज आणि हृदयविकार
मेनोपॉज-४ : शरीराला होणारे धोके - युरिनरी इनकॉन्टिनन्स
मेनोपॉज-५ : योग्य वेळेआधी येणारा म्हणजेच प्रिमॅच्युअर मेनोपॉज
मेनोपॉज-६ : हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी
मेनोपॉज-७ : अल्टरनेटिव्ह थेरपी
मेनोपॉज-८ : जीवनशैलीतील बदल
*******************************************************************************************************************
मेनोपॉज म्हणजे काय ?
मेनोपॉजचा शब्दशः अर्थ आहे - स्त्रियांची शेवटची मासिक पाळी.
हा ग्रीक शब्द आहे. मेन म्हणजे मन्थ आणि पॉसिस म्हणजे सिझेशन
जागतिक आरोग्य संस्थेने केलेली व्याख्या : Menopause is permanent cessation of menstruation due to loss of ovarian follicular activity.
कुठली मासिक पाळी शेवटची असणार आहे, हे आधी सांगता येत नाही. त्यामुळे शेवटच्या मासिक पाळीनंतर एक वर्ष उलटून गेल्यावर 'मेनोपॉज आला' असं निदान केलं जातं.
पेरिमेनोपॉज : शेवटची मासिक पाळी येण्याच्या काही वर्षे आधीपासूनच स्त्रियांच्या शरीरात तसे बदल घडून यायला सुरूवात झालेली असते. बर्याच स्त्रियांमध्ये हा काळ साधारणपणे ३ ते ४ वर्षे इतका असतो.
ह्या काळाला पेरिमेनोपॉज असे म्हणतात.
पोस्टमेनोपॉज : स्त्रीच्या आयुष्यातील, शेवटच्या मासिक पाळीनंतरच्या उर्वरित काळाला पोस्टमेनोपॉज असे म्हणतात.
जगभरातील स्त्रियांमध्ये मेनोपॉजचं सरासरी वय ५१ वर्षे इतकं आहे.
भारतातील स्त्रियांमध्ये हे थोडं अलीकडे म्हणजे ४८ वर्षे इतकं आहे.
अर्ली मेनोपॉज : ४५ वर्षे वयाच्या आधी आलेला.
प्रिमॅच्युअर मेनोपॉज : ४० वर्षे वयाच्या आधी आलेला.
लेट मेनोपॉज : ५५ वर्षे वयाच्या नंतर आलेला.
वयाच्या फरकामुळे तयार झालेल्या ह्या व्याख्यांचा संबंध काही आजारांशी आहे. म्हणून त्यांचा उल्लेख इथे केला आहे.
हे सगळं आहे नैसर्गिकपणे घडून येणार्या मेनोपॉजबद्दल.
पण काहीवेळा इतर काही गोष्टींमुळे बीजांडांचं (ओव्हरीज) कार्य अवेळी थांबतं.
उदा. - सर्जिकल मेनोपॉज : शस्त्रक्रिया करून दोन्ही ओव्हरीज काढून टाकल्यामुळे आलेला मेनोपॉज.
तसेच कर्करोगासाठी घेतल्या गेलेल्या रेडिओथेरपी आणि/किंवा किमोथेरपीमुळे ओव्हरीजवर दुष्परिणाम झाल्याने आलेला मेनोपॉज.
मेनोपॉज का येतो ? म्हणजेच मासिक पाळी का थांबते ?
जी.सी. विल्यम्स ह्या शास्त्रज्ञाने असं मांडलं की, उत्क्रांतीदरम्यान अपत्यांमध्ये असलेल्या आपल्या जेनेटीक पूलचं रक्षण करण्याच्या हेतूने स्त्रियांच्या शरीरात काही बदल घडत गेले. मेनोपॉज हासुद्धा स्त्रीशरीराने आपल्यात घडवून आणलेला एक बदल आहे.
आयुष्याच्या शेवटापर्यंत स्त्रियांची गर्भधारणेची क्षमता शिल्लक राहिली तर काही गंभीर प्रश्न उभे राहतात. जसे की, साठाव्या वर्षांपर्यंत एखाद्या स्त्रीला मुले होत राहिली आणि शेवटच्या मुलाला जन्म दिल्यानंतर काही काळातच त्या स्त्रीचा वृद्धावस्थेमुळे मृत्यू झाला, तर तिच्या अपत्यांच्या जिवंत राहण्याला धोका येणार.
माणसाच्या अपत्याला स्वयंपूर्ण व्हायला इतर प्राण्यांच्या तुलनेत बराच जास्त काळ लागतो.
बहुतांश प्राण्यांची पिल्ले जशी जन्मानंतर थोड्या अवधीतच उभी राहतात, स्वतःचं अन्न मिळवायला चालू करतात....तसं माणसाच्या अपत्याबाबत होत नाही.
त्यामुळे त्या स्त्रीच्या मृत्यूनंतर मागे राहिलेल्या अपत्यांचा उपासमारीमुळे मृत्यू ओढवू शकतो. आणि परिणामतः सगळाच जेनेटिक पूल धोक्यात येऊ शकतो.
हा जेनेटिक पूल टिकवण्यासाठी स्त्रियांच्या शरीराने ठराविक वयाच्या सुमारास आपल्यातील गर्भधारणेच्या क्षमतेचा त्याग केला.
ह्याचा परिणाम म्हणून तिला होणार्या अपत्यांच्या एकूण संख्येत घट झाली. पण तिच्या मृत्यूपर्यंत तिची अपत्ये साधारण १५-१६ वर्षांची होऊ शकल्याने स्वतःचं अन्न मिळवण्याइतपत आणि जेनेटिक पूल पुढे चालू ठेवण्याइतपत स्वयंपूर्ण झाली.
शिवाय तरूण मुले-मुली अन्नाच्या शोधात गेल्यानंतर ही वृद्ध स्त्री नातवंडांसोबत थांबून त्यांचं ...आणि पर्यायाने त्यांच्यामध्ये गुंतवणूक केलेल्या जेनेटिक पूलचं रक्षण करू शकली.
थोडक्यात सांगायचं तर, क्वालिटीसाठी क्वान्टिटी कमी होण्याची झळ सोसूनही माणसासाठी हा सौदा फायद्याचा ठरला.
ह्यालाच "ग्रँडमदर थेअरी" असे म्हणतात.
ह्या थेअरीबद्दल अनेक वाद-प्रतिवाद आहेत. इतर काही थेअरीजही मांडल्या गेल्या. पण आपण इथेच थांबून आपल्या मूळ विषयाकडे वळू या.
मासिक पाळी का थांबते ?
प्रजननक्षम काळात स्त्रीशरीरात काही ठराविक हॉर्मोन्सचा सुसंबद्ध ऑर्केस्ट्रा सतत चालू असतो.
ह्या कलाकारांनी (हॉर्मोन्सनी) काही चुका केल्या तर ऑर्केस्ट्राची सुसूत्रता बिघडते, आणि काही समस्या उद्भवू शकतात.
GnRH (जी एन आर एच), FSH ( फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन), LH (ल्युटिनाइजिंग हॉर्मोन), Prolactin (प्रोलॅक्टिन), Thyroid hormones (थायरॉइड हॉर्मोन्स), Estrogen (इस्ट्रोजेन), Progesterone (प्रोजेस्टेरॉन)
हे ऑर्केस्ट्रातील काही ठळक कलाकार.
हायपोथॅलॅमस मधून निघालेलं GnRH (जी एन आर एच) हे हॉर्मोन पिट्युटरी ग्रंथीला संदेश देतं. पिट्युटरीने पाठवलेली FSH ( फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन) आणि LH (ल्युटिनाइजिंग हॉर्मोन) ही दोन हॉर्मोन्स ओव्हरीजना संदेश देतात.
ओव्हरीजमध्ये दर महिन्याला काही ठराविक बीजांच्या आकारमान आणि कार्यामध्ये बदल घडत असतात.
FSH आणि LH च्या प्रभावाखाली ह्या बीजांमधून Estrogen (इस्ट्रोजेन) आणि Progesterone (प्रोजेस्टेरॉन) ही हॉर्मोन्स तयार होतात.
ह्या सगळ्या हॉर्मोन्सच्या प्रमाणांमध्ये योग्य वेळी योग्य ते बदल घडत असल्यामुळे प्रत्येक महिन्याला पाळी येते. ( किंवा स्त्रीबीजांचा शुक्राणूंशी संयोग झाल्यास गर्भधारणा होते.)
ओव्हरीतील एकूण बीजांची संख्या ठरलेली असते. म्हणजे पुरूषांच्या शरीरात जसे नवीन शुक्राणू पुन्हा-पुन्हा तयार होत राहतात, तसं स्त्रियांमध्ये होत नाही.
आईच्या पोटात असताना १२ ते २० आठवड्याच्या स्त्रीगर्भाच्या ओव्हरीमध्ये स्त्रीबीजांची संख्या ही सर्वात जास्त असते....म्हणजे साधारण ७० लाख इतकी.
ह्यातील बरीचशी बीजे गर्भावस्थेतच नष्ट होतात. मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या ओव्हरीजमध्ये साधारण २० लाख बीजे शिल्लक असतात.
पहिली मासिक पाळी ते शेवटची मासिक पाळी ह्या ३०-३५ वर्षांच्या काळात साधारणपणे ४०० बीजे परिपक्व होऊन बाहेर पडतात.
मेनोपॉजच्या वयापर्यंत ओव्हरीजमधील स्त्रीबीजांचा साठा जवळजवळ संपत आलेला असतो.
त्यामुळे पिट्युटरी ग्रंथीकडून आलेल्या FSH आणि LH चे आदेश पाळायला आणि त्यानुसार इस्ट्रोजेन तयार करायला पुरेशी स्त्रीबीजे शिल्लक नसतात. परिणामी रक्तातील इस्ट्रोजेनचे प्रमाण कमी कमी होत जातं.
आणखी जास्त प्रमाणात FSH पाठवून उपयोग होईल ह्या आशेने पिट्युटरी ग्रंथी FSH पाठवतच राहते. परिणामी रक्तातील FSH चं प्रमाण वाढत राहतं. (म्हणूनच काहीवेळा मेनोपॉजचं निदान करण्यासाठी FSH ची पातळी मोजली जाते.)
मासिक पाळीचं चक्र चालू राहण्यासाठी आवश्यक असणारी सुसूत्रता बिघडल्याने ते चक्र बंद पडतं....आणि असं एक वर्षापर्यंत चालू राहिलं तर मेनोपॉज आला असं मानलं जातं !
ह्या सगळ्यावरून एक गोष्ट लक्षात येईल की मेनोपॉज हा आजार नसून स्त्रीशरीराची अटळ आणि पूर्णतः नैसर्गिक अशी अवस्था आहे.
असं असूनही बहुतांश स्त्रिया मेनोपॉजला का घाबरतात ? त्यावेळी इतका शारीरिक आणि मानसिक त्रास का होतो ??
ह्याचं उत्तर आहे - इस्ट्रोजेनची कमतरता आणि त्यामुळे दिसू लागलेली लक्षणे !
आधी सांगितल्याप्रमाणे स्त्रियांच्या शरीरातील हॉर्मोनल ऑर्केस्ट्रामधील इस्ट्रोजेन हा एक अतिशय महत्वाचा कलाकार आहे. स्त्रीशरीरातील अनेक अवयव आणि त्यांची कार्ये ह्याच्यावर इस्ट्रोजेनचा प्रभाव आणि नियंत्रण असते.
खाली दिलेल्या चित्रावरून ह्याची कल्पना येईल.
मेनोपॉजच्या वेळी रक्तातील इस्ट्रोजेनची पातळी अगदी कमी झाल्याने त्याच्या प्रभावाखाली असलेल्या अवयवांवर विपरीत परिणाम होतो.
.........घरातील स्त्री चार दिवस बाहेर गेली की -
" तू गेल्यावर फिके चांदणे
घर परसूही सुने सुके,
मुले मांजरापरी मुकी अन्
दर दोघांच्या मधे धुके "
..........अशी अवस्था होऊन सगळे भांबावतात ना अगदी तसंच इस्ट्रोजेन नाहीसं झाल्यावर शरीरातील अवयवांचं होतं.
त्यातही जर हे सगळं अनपेक्षितपणे, मनाची कसलीच पूर्वतयारी नसताना घडलं तर त्या स्त्रीला ह्या बदलांसोबत जुळवून घेणं खूप कठीण जातं.
संशोधनात असं आढळून आलं आहे की, ज्या स्त्रियांना ह्या बदलांची आधीपासून माहिती असते, त्यांना मेनोपॉजमुळे होणारी त्रासदायक लक्षणे कमी तीव्रतेने जाणवतात.
हे बदल आणि त्यामुळे जाणवणारी लक्षणे ह्याबद्दल पुढच्या लेखात.
- रुणुझुणू (स्त्रीरोगतज्ञ)
*******************************************************************************************************************
- सर्व चित्रे जालावरून साभार.
- वैद्यकीय बाबींशी संबंधित काही इंग्रजी शब्द तसेच ठेवले आहेत. पण कुणाला त्यांच्यासाठी बोलीभाषेतील मराठी प्रतिशब्द माहीत असल्यास सांगा. मी योग्य ते बदल करीन.
डिस्क्लेमर :
सदरहू लेखाचा उद्देश मेनोपॉज ह्या विषयावरील माहिती देणे हा असून त्या संदर्भातील काही सल्ला-उपचार इत्यादी असतील ते डॉक्टरी सल्ल्यानुसारच करावेत.
मेनोपॉझला. अॅण्ड्रोपॉझच्या
मेनोपॉझला. अॅण्ड्रोपॉझच्या वेळेस बायकोनं नवर्याला समजून घेतलं, तर तो ही तिच्या मेनोपॉझच्या वेळी तिला नीट समजून घेईल. त्यासाठी अॅण्ड्रोपॉझचीही सविस्तर माहिती मिळायला हवी.>>>> +१०००० लले
मधे तनिष्काचा एक पूर्ण अंक ह्यावर होता.त्यातही अगदी उपयुक्त माहिती होती.
सगळ्यांना धन्यवाद. << पोस्ट
सगळ्यांना धन्यवाद.
<< पोस्ट मेनोपॉज काळात स्त्रीबीजांचा सर्व साठा संपलेला असतो का ?>> हो अवनी.
लेखातील सगळ्यात खालचं प्रचि पहा. त्यातल्या पहिल्या चित्रात मेनोपॉजच्या आधीची ओव्हरी दाखवली आहे. तेव्हा स्त्रीबीजे मोठ्या प्रमाणात असतात. दुसर्या चित्रात मेनोपॉजनंतरची ओव्हरी दाखवली आहे -तिच्यामधील स्त्रीबीजांचा साठा संपला आह. आणि शेवटच्या चित्रात - सर्जिकल मेनोपॉज - म्हणजेच शस्त्रक्रिया करून काढून टाकल्यामुळे ओव्हरीजच शिल्ल्क नाहीत.
साती, धन्यवाद. ही लेखमालिका संपली की पुन्हा हायबरनेशनमध्ये जावं लागणार आहे.
अमा,
<< जगण्यासाठीचे काही त्रास सहन करायचे व बाकी
आनंदी आत्म विश्वास पूर्ण अंतरंग हे डिव्हाइड नक्की झाले आहे.>> सौ टके की बात ! लगे रहो. तुम्ही तर आमच्यासाठी आयडॉल आहात.
ललिता-प्रीति,
<<असंच, पुरूषांच्या अॅण्ड्रोपॉझबद्दलही लिहिणार का?>>
रुणुझुणू | 31 May, 2012 - 10:32 - ह्या प्रतिक्रियेत थोडक्यात लिहिलं आहे ते वाचाल का ?
जरा सवडीने सविस्तर लिहीन.
रुणुझुणु, खुप छान. अतिशय
रुणुझुणु, खुप छान. अतिशय उपयुक्त.
व्वा! उत्तम माहितीपूर्ण लेख!
व्वा! उत्तम माहितीपूर्ण लेख!
खुप छान आणि उपयुक्त माहिती !
खुप छान आणि उपयुक्त माहिती !
उत्तम माहिती सोप्या शब्दांत
उत्तम माहिती सोप्या शब्दांत सांगितल्याबद्दल आभार. ललित लेखनाचा बाज थोडासा घेतल्यामुळे लेख माहितीपूर्ण असूनही रंजकता अजिबात कमी झालेली नाही.
सुरूवातीला उल्लेख केलेल्या उत्क्रांती आणि सिद्धांतांसंदर्भात काही प्रश्न आहेतः
एकेकाळी स्त्रियांची आयुर्मर्यादा (life expectancy) काय होती? अगदी १९६० च्या दशकातही भारतात ४०+ वर्ष इतपतच आयुर्मर्यादा होती. पाश्चात्य देशांचाही विचार केल्यास १८-१९ व्या शतकात आयुर्मर्यादा फार फार अधिक नव्हतीच. उत्क्रांतीचा विचार करता गेली १००-२०० वर्ष म्हणजे फारच कमी काळ झाला.
साधारण दोन हजार वर्षांपूर्वीही बहुसंख्य स्त्रिया पन्नाशी गाठत असतील असं नाही. किंवा बर्याच प्रमाणात स्त्रिया मेनोपॉज/ रजोनिवृत्तीच्या वयापर्यंत पोहोचत असतील असं वाटत नाही. त्यामुळे जेनेटीक पूल टिकवण्यासाठी स्त्रियांना या वयात रजोनिवृत्ती येत असेल हे पटत नाही. (ग्रँडमदर्स सिद्धांततर फारच far fetched वाटतो.) किंवा ४५-५५ या वयात रजोनिवृत्ती येणार्या स्त्रियांचेच वंश पुढे टिकले हे पटत नाही.
दुसरा मुद्दा असा की एकेकाळी स्त्रियांना समजा अगदी ७० व्या वर्षी रजोनिवृत्ती येत असेल आणि त्यांची पाळी आत्ताप्रमाणेच १०-१४ या वयात सुरू होत असेल तर त्या २०-४० या वयातही मुलांना जन्म देऊन जेनेटीक पूलमधे योगदान देऊ शकतात. अगदी ४०-६० या वयात झालेली मुलं फारशी जगली नाहीत तरीही. त्यामुळेही उत्क्रांतीचा परिणाम म्हणून सामान्यतः ४५-५५ या वयात आता रजोनिवृत्ती येते हे पटत नाही.
त्याउलट या वयात स्त्री-पुरूष सर्वांनाच तब्येतीचे इतर त्रास सुरू होतात. चयापचयाचा वेग कमी होतो, त्यामुळे एकूणच स्थौल्य येणे, मधुमेह, रक्तदाब या संदर्भातले इतर विकार, चाळीशीचा चष्मा किंवा डोळ्यांचे स्नायू कमजोर होणे, इत्यादींमुळे (एकेकाळच्या गुहेत रहाणार्या मनुष्यांचा विचार करता) ४५-५५ या वयाच्या पुढच्या मनुष्यांना पुनरूत्पादन करणे शक्यच होणार नाही किंवा फारच कठीण होऊन जाईल. फार उशीरा रजोनिवृत्ती येणार्या स्त्रियांचे वंश टिकले नाहीत यापेक्षा मानवी शरीराची जडणघडणच ४५-५५ या वयाच्या पुढे नवीन काही करण्याच्या, विशेषतः ज्यात शारीरिक योगदानाची आवश्यकता आहे, उपयुक्त नाही हे अधिक संयुक्तिक वाटतं.
या उत्क्रांतीच्या दृष्टीने अधिक विचार करण्यासाठी काही संदर्भ चटकन सुचवणं शक्य आहे का?
३_१४ अदिती, उत्क्रांतीबद्दल
३_१४ अदिती,
उत्क्रांतीबद्दल किंवा ग्रँडमदर थेअरीबद्दल मी फार सांगू शकणार नाही. ह्याविषयातील तज्ञच ह्यावर जास्त प्रकाश टाकू शकतील.
मी लेखात उल्लेख केल्याप्रमाणे, ह्या थेअरीबद्दल अनेक वाद-प्रतिवाद आहेत. तुम्ही मांडलेला - आयुर्मर्यादेचा मुद्दा हा ह्या थेअरीवरचा मुख्य आक्षेप आहे.
काही ठिकाणी असा उल्लेख आढळतो की, पूर्वी आयुर्मर्यादा कमी असण्याचे कारण दुष्काळ, उपासमार, साथीचे आजार, टोळ्यांवरील हल्ले हे असायचं. जी माणसं ह्यातून वाचायची ती अगदी म्हातारी होईपर्यंत जगायची.
स्त्रियांच्या शरीरातील रिप्रॉडक्टिव्ह क्लॉक आधी होतं तसंच आहे. ( आणि त्यामुळेच आजकाल जीवनशैली बदलल्याने उशिरा गर्भधारणेचा निर्णय स्त्रिया घेत असल्या तरी त्यांचे शरीर मात्र आधीप्रमाणेच वागते आणि परिणामतः अशा गर्भावस्थांमध्ये काही गुंतागुंती उद्भवतात !)
तुम्ही ह्या क्षेत्रातील जाणकार असाल किंवा तुम्हाला अजून काही माहिती मिळाली तर आणखीन जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
रूणुझुणू, तुमचा प्रतिसाद
रूणुझुणू, तुमचा प्रतिसाद पटतो.
१. इतर काही ठिकाणी ऐकलं-वाचल्याप्रमाणे मासिक पाळीचा चंद्राच्या आवर्तनाशी संबंध लावला जातो. त्याचा विचार करता वीज आणि कृत्रिम, भगभगीत प्रकाश निर्माण केल्यालाही फार काळ लोटलेला नाही. त्याचाही कदाचित मासिक पाळी आणि/किंवा रजोनिवृत्तीवर काहीतरी परिणाम होण्याची शक्यता वाटते. आधुनिक जीवनशैलीचा पहिला प्रभाव, कदाचित. (चंद्र पृथ्वीपासून सध्या लांब जातो आहे, त्यामुळे चांद्रमास सध्यापेक्षा मोठा होतो आहे. एका ठराविक ठिकाणी जाऊन चंद्र पुन्हा उलट पृथ्वीच्या दिशेने येऊ लागेल. त्याचा मानवावर परिणाम होत असेल तरीही चंद्राची ही गती अतिशय सावकाश अशी आहे. त्याचा फार जास्त परिणाम दिसेल असं वाटत नाही, कारण ...)
२. ... या संदर्भात, आधुनिक जीवनपद्धती पूर्णतया औद्योगिक क्रांती+स्त्रीवाद यांच्यातून आलेली आहे. म्हणजे या गोष्टीलाही फारतर १०० वर्ष झालेली आहेत. तेवढीही नाहीत, कारण महायुद्धांनंतर स्त्रियांच्या नोकरी करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं. या गोष्टींचा स्त्रियांच्या आरोग्याशी अतिशय निकटचा संबंध आहे, जो तुम्ही अगदी रोज बघत असणार.
एक प्रकारे उत्क्रांती होण्यासाठी, बदल होण्याची आवश्यकता निर्माण होते आहे. ज्या स्त्रिया यात (निसर्गतः अथवा औषधांच्या जोरावर) टिकून रहातील, तब्येत टिकवू शकतील आणि निरोगी मुलांना जन्म देतील त्यांच्यामधे होणारा बदल किंवा असणारे गुणधर्म, पुढच्या पिढीत जाईल.
(माझा या विषयाचा फार अभ्यास नाही. आपण स्त्री आहोत तर आपल्या शरीराबद्दल थोडीबहुत माहिती असावी, काही दुखलंखुपल्यास ते का होतंय हे डॉक्टरकडून समजून घेता यावं इतपतच. आणि उत्क्रांती सिद्धांतावर प्रेम आहे म्हणून थोडंफार इकडचं तिकडचं उत्क्रांतीसंदर्भात वाचन. म्हणूनच तुम्हाला किंवा इतर कोणालाही या संदर्भातलं एखादं "बायबल", "कुरान" माहित असेल वाचायला आवडेल म्हणून विचारलं.)
रुणुझुणु लेख आवड्ला.लिहित
रुणुझुणु
लेख आवड्ला.लिहित राहा.
मानसी
अगदी सोप्या भाषेत लेख
अगदी सोप्या भाषेत लेख लिहल्याबद्दल धन्यवाद.
शरीरातील हे बदल का होतात हे माहित होते पण त्या मागचे कारण शास्त्रीय धृस्तीकोणाची कल्पना नव्ह्ती.पुढील लेखांची आतुरतेने वाट पाहत आहे.
अतिशय उपयुक्त माहिती. पुढिल
अतिशय उपयुक्त माहिती. पुढिल माहितीची वाट पाहात आहे. धन्यवाद!
Pages