मुलीचा बाप - भाग १

Submitted by आशयगुणे on 30 May, 2012 - 13:37

आमच्या छोट्या शहरी एक बऱ्यापैकी मोठा तलाव आहे. शहराच्या मध्यभागी असल्यामुळे सर्वांना तसा तो जवळ देखील आहे. तलावावर कमळांची सुंदर गादी तयार झालेली आहे आणि म्युन्सिपालटी ने थोडीशी दया दाखवून ती अनुभवायला तिकडे बसायची सोय देखील केली आहे. काठावरच छोटं देऊळ असल्यामुळे अनेक आजी-आजोबांची सकाळची फेरी आणि नंतर चर्चासत्र इकडेच रंगतात. आत अनेक देव असल्यामुळे 'वारांची वारी' अगदी ठरलेली! संध्याकाळी देखील कसली तरी व्याखानं, मध्येच एखादा गाण्यांचा कार्यक्रम, कुणाचा तरी कौतुक सोहळा, पत्त्यांचे सामने, कॅरम खेळणे हे इथल्या छोट्याशा व्यासपीठावर नित्याने होते असते. काही पोरांनी इथे क्रिकेट खेळणे देखील सुरु केले होते. पण सारखा बॉल, आणि त्यामुळे तो विकत घेताना खर्च होणारे पैसे, पाण्यात जाऊ लागल्यामुळे ते बंद झाले. पण ह्या तलावाची खरी सुंदरता रात्री अनुभवायची! थंड हवेची मजा घेत, रात्रीची ती शांतता अनुभवता समोर कमळांनी पांघरलेली ती चांदण्यांची चादर न्याहाळण्यात एक वेगळाच आनंद असतो! ह्याच वातावरणाची मजा घेण्यासाठी आम्ही वेळात वेळ काढून इथे येत असतो. आम्ही म्हणजे 'आम्ही दोघे' ह्या अर्थी नाही तर आम्ही लहानपणीपासूनचे मित्र! अर्थात 'आम्ही दोघे' देखील येऊ शकलो असतो. पण तसं आता तरी होऊ शकणार नाही.

ह्याच संदर्भात आमचा विषय सुरु होता. "काय झाले रे?" एका मित्राने शेवटी विचारलेच. काही सेकंदांच्या शांतते नंतर मी म्हणालो.
"काय होणार? नाही झालं....", मी म्हणालो.
"अरे पण का? तुमचं तर... आणि ती काय म्हणाली? ती तर तयार होती ना?"
"नाही रे... ती काहीही म्हणाली तरी शेवटी बाप म्हणेल तेच मुली करतात. दादांनी तिच्यसाठी कुणीतरी शोधून ठेवलेला आहे रे. आणि मी विचारल्यामुळे आता लग्नाची घाई करणार आहेत ते ", मी वस्तुस्थिती सांगितली.
" कोण आहे बे तो ...त्याला इथे यायच्या आधीच त्याची तंगडी तोडू आपण. मी माझ्या मित्रांना बोलावू का?" आमच्यातला एक टग्या नेहमी मारामारीला तयार! पण त्याबद्दल सांगायचा अजून थोडा आग्रह झाल्यानंतर मी एकदाचे सांगितले.
" अरे कुणीतरी सोफ्टवेअर कंपनीत आहे रे. तिच्या मावशीची ओळख निघाली. तिनेच सुचवलं स्थळ. च्यायला ह्या मावश्या, आत्या उगीच मध्ये-मध्ये करत असतात बे. ह्यांना काय कळतंय...दिसला कुणीतरी लठ्ठ पगाराचा पोरगा...द्या त्याचा reference ...त्यांचा बहुतेक ह्याच्यासाठीच जन्म असतो ", माझं बोलणं आता चढत्या आवाजाचं होत होतं.
" तुमचं बरं आहे रे...च्यायला कामं दुसऱ्याची करता...आणि मिळालेल्या पगारावर उडत असता...", हे वाक्य आमच्या 'Infosys ' मध्ये काम करणाऱ्या मित्राला उद्देशून होतं. " दादांनी घोळ केला म्हणायचं..."

दादा मिरासदार! गेली अनेक वर्ष आमच्या घरासमोर राहणाऱ्या मिरासदार कुटुंबाचे प्रमुख. पण गेल्या काही आठवड्यात हा माणूस माझ्यासमोर आला तर चेहऱ्यावरची रेष देखील न हलवता निघून जातो. जगातल्या काही मोजक्याच लोकांना देव कपाळावर असंख्य स्पीड ब्रेकर्स चिकटवून जन्माला घालतो. मिरासदार त्यातलेच एक. अर्थात गेले काही आठवडे ते स्पीड ब्रेकर्स जरा जास्तच स्पष्ट दिसत होते. आणि मी समोर आलो तर खूपच! माझ्याकडून पापच तसं घडलं होतं. आणि त्याची शिक्षा अर्थात हा असा चेहरा बघून मी भोगत होतो! त्या रात्री मी तळ्यावरून जरा लवकरच घरी आलो. एक तर हा विषय मला पुढे ढकलायचा नव्हता आणि दुसरं म्हणजे चार दिवसात आसामला जायचं होतं. त्याची तयारी करायची होती. हो, तुम्ही हे मराठीत वाचत असलात आणि मी देखील मराठीत लिहिलं असलं तरीही, मी एक व्यवसायी आहे. सध्या छोटाच आहे पण चालू गतीने ३-४ वर्षात माझं स्वतःच ऑफिस उभं राहणार आहे. आणि नंतर देशाच्या काना-कोपऱ्यात मी माझ्या tours नेणार आहे. मला भटकंतीची प्रचंड हौस. आणि त्याच आवडीमुळे मी ह्या धंद्यात पडलो. तसं माझं शिक्षण सुद्धा झालं आहे. मी science graduate आहे. पण नंतर ठरवलं आवडीच्या मार्गाने जाऊया. उगीच 'मास्टर' हे फक्त नावाआधी जोडण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा आवडीच्या क्षेत्रात मास्टर झालेलं बरं. माझी पहिली टूर मी श्रीवर्धनला नेली होती तेव्हा सहभागी होणाऱ्या पहिल्या काही लोकांमध्ये मिरासदार काका देखील होते. मला आशीर्वाद दिले होते त्यांनी. तसा मी १० वी झालो तेव्हा आमच्या समोर नवीन झालेल्या बिल्डींग मध्ये हे कुटुंब राहायला आलं. त्या दिवसात आम्हा मित्रांचा एक उद्योग असे. कुठेही नवीन इमारत उभी राहताना दिसली की त्यात कुणी मुलगी असलेली फेमिली राहायला येईल अशी आस लावून बसायचं! ती बिल्डींग झाली तेव्हा मी नशीबवान असलो पाहिजे कारण हे कुटुंब आले! १० वी ह्या 'राहू' नंतर १२ वी चा 'केतू' नशीबात आलाच! मात्र ते झाल्यावर मी मैक्रोबायोला प्रवेश घेतला आणि अनुष्का मिरासदार माझ्या आयुष्यात आली! आता समोरच्याच बिल्डींगमध्ये राहणं असल्यामुळे बरोबर कॉलेजला जाणं आलंच! आणि कॉलेज पर्यंतची वाट तुडवीत आम्ही पुढची वाट एकत्र चालायची स्वप्न रचू लागलो....

कॉलेजची वर्ष सहसा बिघडवणारी. शाळेपर्यंत किंवा बारावी पर्यंत मुलीकडे ढुंकून न पाहणारी मुलं ही 'निळ्या' रंगाच्या प्रेमात पडतात ती कॉलेज मध्येच! Wink बारावी पर्यंत वर्गात प्रथम क्रमांक काढणारी पोरं वास्तवातले विश्व पाहून खाली आपटतात ती कॉलेज मध्येच! लायब्ररीला घर मानणारी मुलं मैदानाच्या प्रेमात पडतात ती कॉलेज मध्येच. भारतीय पेहराव ( कपाळावरच्या टिकली सकट!) पसंत करणाऱ्या मुली जीन्स, टी-शर्टला कुरवाळू लागतात ते देखील कॉलेज मध्येच! थोडक्यात काय, प्रगती काय किंवा अधोगती काय....कॉलेज मध्येच होते. माझीही झाली. मला अभ्यासात कधीही रस नव्हता. पण इतर गोष्टींची आवड लागली कॉलेजमध्ये. संगीत हा माझा सर्वात आवडता विषय! अगदी शाळेपासून मी त्यात बुडालेलो आहे. सुरुवात शास्त्रीय संगीताने झाली. पण नंतर एकंदर चांगलं संगीत मी ऐकू लागलो. त्यात लोकसंगीत प्रथम क्रमांकाने. लोकसंगीतात ऐकायला मिळणारे एकाच भाषेचे त्या भागानुसार झालेले वेगवेगळे उच्चार, त्या भाषेतील गोडवा, त्या परंपरागत चालत आलेल्या चाली ह्यामुळे मराठी बोली भाषा माझ्या आयुष्यात आली! आणि महाराष्ट्रातील अनेक भाग आम्ही ती ऐकायला मिळावी म्हणून अक्षरशः पिंजून काढू लागलो. माझ्या बरोबर एक-दोन उत्साही मित्र होतेच. शिवाय महाराष्ट्राबाहेरचे संगीत देखील मी कान देऊन ऐकू लागलो. उत्तर भारतातील पहाडी, मध्य-प्रदेशातील लोकसंगीत, उर्दू कव्वाली, राजस्थानी मांड, बंगाली राविन्द्र्संगीत आणि भटियाली इत्यादी माझ्या कानी पडू लागले. त्यामुळे ह्या प्रांतातील भाषा आणि पर्यायाने ह्या सर्व भागातील लोकसंस्कृती मला आकर्षित करू लागली. आणि मग त्या प्रांतात जाऊन तिथले संगीत ऐकणे हा माझा छंद झाला. भीमसेन जोशींचे 'तुंगा तीरदी' हे भजन तुंगभद्रा नदीच्या काठी ऐकताना आपण ह्या उत्तर कर्नाटक संस्कृतीचा एक भाग आहोत असेच वाटायचे. हेच बाकी बऱ्याच ठिकाणचे. आणि तेव्हा मला जाणवलं की पर्यटन आणि भटकंती ह्यातच काहीतरी केलं पाहिजे. कॉलेजची वर्ष आटोपली आणि मी माझी स्वतःची travel company काढायच्या मागे लागलो. आणि जंतूंचा विषय शिकायला आलेला मी पार बिघडलो!

ह्याच संगीत ऐकण्याच्या निमित्ताने मिरासदार काकांशी प्रथम ओळख झाली. ११ वी सुरु असताना कुमार गंधर्वांची एक दुर्मिळ रेकॉर्ड मी शोधत होतो. 'तारी दे गारी' हे मध्य भारतातल्या माळवा प्रांतातील एक सुंदर लोकगीत आहे. कुमारांच्या आवाजात ते प्रथम मी रेडिओवर ऐकलं आणि त्याच्या प्रेमात पडलो. आणि आपल्या 'collection ' मध्ये ह्या आणि त्यांनी गायलेल्या इतर लोकगीतांचा समावेश करायचा हे मी ठरवून टाकलं! आणि एके दिवशी घरी येताना समोरच्या बिल्डींगमधून हेच गाणं ऐकू येऊ लागलं! तळ मजल्यावर असल्यामुळे तिथल्या gallery च्या बाहेर मी उभा होतो. तेवढ्यात आतून " काय पाहिजे " असा आवाज आला. ह्या मिरासदार काकू. गाणं ऐकतोय असं सांगताच आतल्या काकांनी 'वा वा' ओरडत मला दाद दिली आणि मला आत बोलावलं. माझं आता काही खरं नाही ह्या विचारात मी आत गेलो आणि काकांनी चक्क समोर बसवून ते गाणं मला परत ऐकायला दिलं. मी त्यांचे आभार मानले आणि एकमेकांकडे असलेल्या गाण्यांची देवाणघेवाण करूया असा प्रस्ताव समोर ठेवला.
"आजच्या पिढीतल्या लोकांना भारतीय संगीतात आवड आहे हे ऐकून बरं वाटलं....तू शास्त्रीय संगीत पण ऐकतोस का?"
"हो...कानाला चांगलं वाटेल ते सारं काही मी ऐकतो", मी म्हणालो.
" आमच्या घरी कुठले ते पाश्चात्य सूर ऐकायला येतात. जरा समजावा त्यांना...", असं काका म्हणाले इतक्यात आतून आवाज आला, " बाबा प्लीजच!" इंग्रजीतल्या प्लीजला 'उगीचच' च्या ऐटीत 'प्लीजच' कोण म्हणतोय हे बघायला मी त्या दिशेने मान वळवली. आणि अनुष्का मला त्या दिवशी प्रथम दिसली. अख्खं कपाळ दिसेल असे सगळे केस मागे खेचून त्याची वेणी बांधलेली आणि चष्मा घातलेली ही मुलगी रात्रीचे ८ वाजल्यापासूनच night dress घालून होती. रात्रीच्या ड्रेस मध्ये मुली अधिक सुंदर दिसतात हे चेतन भगत म्हणतो ते काही खोटं नाही! प्रथम दर्शनास प्रेम होतं वगेरे वर माझं विश्वास नाही. पण एकमेकांबद्दल कुतूहल नक्कीच वाढतं. तिने माझ्याकडे बघून गंभीर असलेला चेहऱ्यावर किंचित हास्य आणलं. आणि त्यादिवशी आमची ओळख झाली. पण माझ्यासाठी सर्वात मोठा फायदा म्हणजे मुलीच्या बापाच्या नजरेत चांगली 'image ' ठेवणे! आणि नंतर माझे त्यांच्याकडे जाणे वाढले. त्याला थोडेफार कारण अनुष्काचे होतेच! परंतु ही व्यक्ती किती हरहुन्नरी आहे हे मला नंतर समजू लागले. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारणे हा उद्देश सुद्धा असायचा. नंतर मी आणि अनुष्काने एकाच कॉलेजमध्ये मैक्रोबायोसाठी प्रवेश मिळवला आणि माझे मिरासदार कुटुंबाशी संबंध दृढ होत गेले. सुरुवातीला संगीत हा विषय असायचा. त्यानंतर लोककला, राजकारण, समाज, अंधश्रद्धा...कुठलाही विषय घ्या ...आम्ही चर्चेस नेहमी तयार! साधारण एफ. वाय संपेपर्यंत माझी आणि दादांची चांगलीच जोडी जमली होती. अधून-मधून काकू देखील चर्चेत सामील होत असत.

एकदा असाच गोव्याला जायचा प्लान झाला होता. जायच्या दोन दिवस आधी मी दादांना भेटायला गेलो होतो. त्यावेळेस गोव्याचा लोकजीवनावर आमची दोन तास चर्चा रंगली होती. शेवटी मी त्यांना पटवून दिलं कि गोव्याच्या संगीतात पोर्तुगीज सुरांचा तितकाच समावेश आहे जितका भारतीय सुरांचा! माझ्याकडे गाणीच तशी होती. पण खिलाडूवृत्तीने दादांनी आपली हार मान्य केली होती आणि तुझ्या 'ज्ञानाला माझा सलाम' अशी दाद देखील दिली होती. आणि नंतर एका टिपीकल पालकाप्रमाणे अनुष्काला 'ह्याच्याकडून काहीतरी शिका' असा उपदेश देखील दिला होता. अनुष्का मी सांगतो ते सारे ऐकू लागली होती हे दादांना कुठे माहिती होतं! ते एस.वाय चे दिवस होते.

दादांचं वाचन अवांतर होतं. ते स्वतः एका बऱ्यापैकी मोठ्या कंपनीत काम करत होते पण त्या कंपनीचे विदेशी व्यवहार काही फार नव्हते. तरीही एकंदर जगाच्या घडामोडींवर त्यांचे बारीक लक्ष असायचे. टाईम्स ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक टाईम्स हे दोन्ही पेपर ते रोज वाचायचे. त्यामुळे आता शिक्षण झाले की पुढे काय करायचे ह्या विषयावर त्यांच्याशी बोलताना फार माहिती मिळायची. एकंदर मायक्रोबायोला भारतात फार कमी पगाराच्या नोकऱ्या आणि कॉलेज मध्ये काही विशेष न शिकवलं गेल्यामुळे आम्ही सारे सदैव संभ्रमात! एकतर नोकरी करताना नक्की काय करायचं, आयुष्यभर प्रयोगच करत राहायचं का? कुणीतरी आम्हाला सांगितले की परदेशात जा....उत्तम संधी आहेत. पण ते तरी खरं आहे का? आश्चर्य म्हणजे ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला दादांकडून मिळाली.

" आपल्याकडे मध्यमवर्गातल्या लोकांना त्यांच्या मुलांना परदेशी पाठवायचे आहे. त्यातच त्यांना धन्यता वाटते. पण तिकडे परिस्थिती काय आहे ह्याचा आपण आधी अभ्यास करतो का? तुला माहिती आहे त्या देशातली मुलं महागाईमुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना आपण लागतो....कमी पैशात काम करणारे. आणि आपण त्यांच्या त्या थोडक्या डॉलर पगाराच्या मोहात पडतो कारण आपल्या मनात गुणिले ५० हे गणित असतं. पण मिळणारे डॉलर तिथल्या हिशोबाने अगदी तुटपुंज! हां, जर तुम्हाला तुमच्या क्षेत्रात झोकून द्यायचे आहे...नवीन शोध लावायचे आहेत तर मात्र तुम्ही परदेशातच गेलं पाहिजे. कारण अशा झपाटलेल्या माणसांचे आपल्या देशात कौतुक होत नाही....त्यांना थोडा कमी पैसा चालतो....कारण त्यांचे काम हेच त्यांचे आयुष्य असते. तुमची मैक्रोबायो ही संशोधनावर जोर देणारी 'field ' आहे. त्यामुळे तुला जर झोकून द्यायचे
असेल तरच परदेशी जायचा विचार कर. मी अनुला पण हेच सांगतो आहे. नीट विचार करून निर्णय घ्या. तू graduate झालास की तेच पुढे केलं पाहिजेस असं नाही. तुला हे सारे छंद आहेत....ते जोपास ना...तुला भटकंतीची आवड आहे...त्याच्यात काहीतरी कर....तुझ्याकडे असलेलं हे ज्ञान तुला खूप पुढे घेऊन जाऊ शकेल. 'वल्ली अमेरिकेतल्या' हे पुस्तक वाचतोय सध्या. त्यात हेच सगळं दिलंय", दादा मला सल्ला देत होते.
" आणि आज-काल तुम्हा मुलांना ना झटपट पैसा पाहिजे रे. सगळं काही लगेच! आमच्याकडे बघ....मी ह्यांच्याशी लग्न केलं तेव्हा काहीही नव्हत. पै- पै साठवून आम्ही हा संसार उभा केला", काकूंनी मध्येच आपलं एक मत व्यक्त केलं. " हो ना. वास्तविक आपल्या देशात हा जो पैसा आला आहे तो ह्या बाहेरच्या कंपन्या आल्या आहेत म्हणून. कॉम्पुटर इंजिनिअर परदेशी कंपनीला सर्विस पुरवतात आणि ह्या परदेशी कंपनी आपल्याकडून काम करवून घेतात. त्यांना तिथून कमी डॉलरमध्ये काम करून मिळतं....तुम्हाला २५,००० रुपये मुळात मिळतात कारण तुमच्यामागे त्या कंपनीला त्यांच्या हिशोबाने ५०० डॉलरच खर्चावे लागतात. हेच काम त्यांनी तिथल्या माणसाकडून करवून घेतलं तर तिथली माणसं २००० डॉलर मागतील. जी गोष्ट कॉम्पुटर इंजिनिअरची तीच गोष्ट कॉल-सेंटरची. आणि एवढे पैसे बघून आपली लोक त्या क्षेत्रांकडे वळतात...आवड असो व नसो... आता मला सांग....त्यामुळे इतर क्षेत्र मागे पडली आहेत. सगळ्यांना कॉम्पुटर मध्ये जायचे आहे. आणि ह्या कंपन्या कुठलेही इंजिनिअर असो...त्यांना शेवटी कॉम्पुटर मध्ये खेचतात! पैशासाठी आपण असं करायला तयार देखील होतो. त्यामुळे काय झालंय...आपल्याकडे नवीन काहीतरी करायची...झपाटून जायची प्रवृत्ती नाही राहिली. भारतात कुठलाही शोध लागला नाही.....तुमच्या क्षेत्रातच बघ ना....एकही मुख्य शोध नाही....ह्याची कारणं ही इथे आहेत. पैसा कमवायचा नाही असं मी म्हणत नाही. पण आपल्यातल्या माणसाला हरवू नका....जर आवडीच्या क्षेत्रात काम केलं तर पैसे नक्कीच मिळतील."

दादांची ही वाक्य ऐकून खूप धीर आला होता. अनुष्का देखील हे सारं ऐकत असायची. तेव्हा आमच्यातल्या प्रकरणाची दाद न लागू देणे ही खबरदारी आम्ही घेत होतो. तरीही दादांचे बोलणे सुरु असताना तिच्याकडे लक्ष जायचं. गंभीर चेहरा करून ती तिच्या बाबांकडे बघत असायची. ते तिचे एकटक बघणे सुद्धा किती सुंदर दिसायचे....असं वाटायचं तिच्याकडे पाहत राहावं. खूप प्रेम होतं तिचं तिच्या बाबांवर! शेवटी दादांचा हा सल्ला उपयोगी पडला. घरून सुद्धा काही दडपण नव्हते. त्यामुळे मी माझ्या आवडीच्या क्षेत्रात पाउल ठेवायचे ठरवले. Graduation झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी आणि योगायोगाने माझ्या वाढदिवसाला श्रीवर्धन आणि इतर परिसर अशी tour काढली. सुट्टीत त्याची जाहिरात देखील केली होती. बसची व्यवस्था झाली आणि नंतर तिकडे राहण्याची सोय पण केली. खूप माहिती जमवली आणि अख्ख्या यात्रेत सर्वांना ती माहिती मिळावी अशी व्यवस्था केली. ह्याच टूरला दादांनी मला आशीर्वाद दिला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील. आणि मग मी झपाटून गेलो. फेसबुकचा वापर केला, सगळीकडे contacts बनवले. 'Deal ' केल्या. आणि बघता बघता मी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी ह्या यात्रा नेऊ लागलो. माझी संगीताची माहिती, लोककलांची माहिती मला नंतर उपयोगी पडू लागली. ज्या भागात जाऊ तिथल्या लोक-कलाकारांना मी पाहुण्यांसमोर त्यांची कला सादर करण्याची संधी देऊ लागलो. लोकं त्यामुळे खुश असायची. मला आता एक चांगला 'customer base ' मिळाला होता. आणि अडीच ते तीन वर्षात मी माझ्या पायावर उभा देखील राहिलो होतो. पुढे ऑफिस बांधायचे होते. महाराष्ट्राबाहेर आता माझी मजल मध्य प्रदेश पर्यंत गेली होती. तिथल्या संस्कृतीची ओळख असल्यामुळे माझे 'contacts ' लगेच जमायचे आणि त्यांच्याशी भागेदारी चांगलीच बहरायची. पुढे देशातच नव्हे पण जगभरात हिंडायची मला आता खात्री झाली होती.

" होईल रे! काळजी करू नकोस. तू ज्या प्रकारे प्रगती करतो आहेस....नक्की होईल!" दादांनी प्रोत्साहन सुरूच ठेवले होते. अधून-मधून काकू पाठीवर थाप मारायच्या. त्यांचं ते आम्ही मिळून संसार केला आणि पैसे जमवले हे कडवं असायचं अधून-मधून. एकूण काय, मी आता मिरासदार कुटुंबात एकदम हिट झालो होतो!

" शेवटी मराठ्यांनी दिल्लीवर चाल केलीच! वा! अभिनंदन! आज मला फार अभिमान वाटतो तुझा. तू त्या थोड्यांपैकी आहेस जे स्वतःची दिशा स्वतः ठरवतात. आणि नंतर ती कायम ठेवून पुढे घोडदौड सुरु ठेवतात! आता पुढे काय काय करायचा विचार आहे?" दादांनी मला विचारलं. मी दिल्लीतल्या महाराष्ट्र मंडळाशी संपर्क साधून तिकडे पाहुण्यांची राहायची सोय केली होती. दिल्ली, आग्रा, मथुरा अशा तीन शहरांची ती यात्रा होती. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यादिवशी यात्रा संपवून घरी आलो आणि अनुष्का MBA झाल्याचा निकाल लागल्याचे कळले. घरी आईस-क्रीम खायला बोलावले असताना दादांनी हा प्रश्न मला विचारला. मी माझे देशाच्या कोपऱ्या-कोपऱ्यात यात्रा घेऊन जाण्याचे मनसुबे सांगितले. आणि ६-७ वर्षात आंतरराष्ट्रीय पातळीवर यात्रा सुरु करायचा विचार बोलून दाखवला. दादांनी प्रसन्न मुद्रेने शुभेच्छा दिल्या होत्या.
आणि मी दादांना बाबा म्हणण्याची स्वप्न आता रंगवू लागलो होतो.

- आशय Happy

भाग २ (अंतिम भाग) : http://www.maayboli.com/node/35355

माझे इतर लेख: http://relatingtheunrelated.blogspot.in/
http://www.innercirclemates.com/

गुलमोहर: 

जर तुम्हाला तुमच्या क्षेत्रात झोकून द्यायचे आहे...नवीन शोध लावायचे आहेत तर मात्र तुम्ही परदेशातच गेलं पाहिजे. कारण अशा झपाटलेल्या माणसांचे आपल्या देशात कौतुक होत नाही....त्यांना थोडा कमी पैसा चालतो....कारण त्यांचे काम हेच त्यांचे आयुष्य असते. तुमची मैक्रोबायो ही संशोधनावर जोर देणारी 'field ' आहे. त्यामुळे तुला जर झोकून द्यायचे नसेल तरच परदेशी जायचा विचार कर>>> ईथे 'असेल' असे हवे ना..

छान! पुढचा भाग लवकर टाका.

आयडू , कौशी : धन्यवाद! पुढचा भाग लिहिला आहे. त्याची लिंक इकडेच दिली आहे.
लोला : तुमचा सल्ला ऐकला. बदल केले आहेत आणि परत 'save ' केले. धन्यवाद! Happy
sonalisl : बदल केलाय! सांगितल्याबद्दल धन्यवाद! Happy