त्या वासंतिक श्वासांची वर्दळ अजून आहे!

Submitted by सतीश देवपूरकर on 10 May, 2012 - 02:53

गझल
त्या वासंतिक श्वासांची वर्दळ अजून आहे!
गंधोत्सव कधीच सरला; दरवळ अजून आहे!!

आटल्या मोठमोठाल्या सा-या नद्या परंतू......
द्यायला दिलासा मजला, मृगजळ अजून आहे!

कण रणरणते वाळूचे, की, म्हणू माणसे ही?
त्यांच्यातच मानवतेची हिरवळ अजून आहे!

आई, वडील दोघांची तसबीर फक्त आहे;
इतकीच बंगल्यामध्ये अडगळ अजून आहे!

काळजात माझ्या होते पडझड घडीघडीला;
हृदयाची धडधड म्हणते: वादळ अजून आहे!

मंदीर यशाचे माझ्या गेले कुठे कळेना;
त्याच्या पायाभरणीचा कातळ अजून आहे!

बघताना वाट सख्याची गतप्राण जाहली ती;
गालावर ओघळलेले काजळ अजून आहे!

मी पुढे, माझिया मागे माझे नशीब येते;
पण, त्याच्या चालीमध्ये मरगळ अजून आहे!

पारवा तिच्या मौनाचा घुमतो मनात माझ्या;
ती झुळूक कधीच गेली.....सळसळ अजून आहे!

>>-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

तुम्ही बरे आहात ना बेफि?>> नाही, डॉक्टर बोलावलाय हाफिसात गोळ्या घेऊन Rofl , बेफि, दिवा घ्या.

इथे मौनातील बोलणे वारंवार मनात रेंगाळत राहते, म्हणून त्याला पारव्याच्या घुमण्याची उपमा दिली आहे>>>

हे विधान नीटसे लक्षात आले नाही माझ्या

या गझलेचे विडंबन करू काय? >>> वेळ का घालवताय... नवीन लिहा त्या पेक्षा आणि लिखान का एडीटलंत...
मी रोज एक तरी गझल वाचत होतो.

काहि शेर फार आवडले.. आणि त्या खालील चर्चा जास्त आवडली Proud

या गझलेचे विडंबन करू काय? >>> बेफिजी.. आमच्या साठी कहितरी तरी ठेवा ना राव! Uhoh

कणखरजी, भूषणजी, वैभवजी व इतर तमाम सहृदयी रसिकांनो! प्रथम आपणा सर्वांचे प्रतिसादाबद्दल व आपण करत असलेल्या निर्मळ, रसाळ व पारदर्शक चर्चेबद्दल आभार मानतो. असेच निर्भय व सशक्त वातावरण राहिले तर मराठी गझलेला निश्चीतच चांगले दिवस येतील! गंभीर समीक्षकही कनवाळू होतील व गझलेचे निर्भेळ रसग्रहण करू लागतील. गझल न लिहिणारेही गझलेच्या प्रेमात पडतील. गझलेची तथाकथित उपेक्षा संपेल! असो.

कणखरजींनी जी comment केली आहे, “वृत्तांतकथन”, आता तिकडे वळतो.......
या बाबतीत माझ्या पामराचे काही विचार व्यक्त करू इच्छितो.......
कामयाब शेर हे एक अत्यंत दर्जेदार, सर्वांगसुंदर व सरळ हृदयाला भिडणारे काव्य असते! त्यात एक अंतीम सत्य असते जे वाचकांच्या काळजाला भिडते.
कुठलाही शेर हा जीवनात घेतलेला एक प्रांजळ व प्रखर प्रत्यय असतो. त्याची एक स्वत:ची चव असते. असो.

शेरातील दोन ओळी या एकजीव असायलाच पाहिजेत, मग दोन ओळी स्वतंत्र अर्थांच्या असतीलही वा नसतीलही!

शेरात सपाट, गद्य विधाने नसावीत. अशा सपाट विधानांना मी “वृत्तांतकथन” असे म्हणेन!
शेरात एखादा विचार मांडलेला असतो, ज्याची प्रस्तावना पहिल्या ओळीत असते व कलाटणीपूर्वक पूर्तता दुस-या ओळीत असते. विचार विधानात्मकही मांडता येतो. पण शेरात विधानही काव्यात्मकरित्या केलेले असावे. आता येथे काव्यात्मक कशाला म्हणायचे ही चर्चा करायला वेळ वा जागा अपूरी आहे. प्रत्यक्ष भेट झालीच तर समक्ष बोलायला आवडेल! असो.

शेरात विरोधाभास असायलाच हवा अशी अजिबात सक्ती नाही. विरोधाभास नसतानाही शेर कामयाब होवू शकतो. शेर हा आशयघन, बहुअर्थी, प्रासादीक व गोटीबंद असावा, म्हणजे तो हटकून कामयाब बनतो! अनावश्यक शब्द वा शब्दबंबाळपणा वा चमत्कृतीचा वा अलंकारांचा सोस हा कामयाब शेरास मारक ठरतो.
कामयाब शेरात अचूक, अर्थपूर्ण शब्द हे उचंबळून व धावून आल्यासारखे जाणवतात. कामयाब शेर लिहिण्यासाठी काफियांचा पाठलाग करावा लागत नाही. काफियाच आपल्या मागे मागे येतात!

कणखरजींनी अजून एक केलेली comment म्हणजे “शेर predictable” वाटतात. मला याचा अर्थ काही कळला नाही बुवा! मी लावतो तो अर्थ असा की, दुसरी ओळ किंवा तिच्यातील काफिया वाचक अचूकपणे हेरतात असा असावा. पण हा काही त्या शेराचा दोष ठरू शकत नाही. असो. आता थंबतो, कारण मंडळी(आमच्या) फारच अस्वस्थ झाल्या आहेत बाहेरजाण्यासाठी! तेव्हा आज इतकेच पुरे!
सर्व रसिकांचा असाच लोभ असावा! “वर लिहिलेला गद्य वृत्तांत” ही माझी वैयक्तीक मते आहेत. पटली तर घ्यावीत, नाही तर सोडून द्यावीत.
>.....................प्रा. सतीश देवपूरकर

बेफिकीर, 'अखाती' आणि 'हिरव्या' हे दोन शब्द एकेरी अवतरणात आहेत. याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा संदर्भ असावा.

<मी लावतो तो अर्थ असा की, दुसरी ओळ किंवा तिच्यातील काफिया वाचक अचूकपणे हेरतात असा असावा. पण हा काही त्या शेराचा दोष ठरू शकत नाही>

हो. पण "अरे वा! आपल्याला नसतं बुवा सुचलं हे!!" अशी प्रतिक्रिया वाचकाच्या मनात उमटवता आली तर त्यातली मजा खचितच और असते.

हो. पण "अरे वा! आपल्याला नसतं बुवा सुचलं हे!!" अशी प्रतिक्रिया वाचकाच्या मनात उमटवता आली तर त्यातली मजा खचितच और असते.>>

सहमत आहे

चर्चा 'निळीकाळी' पडू नये म्हणून त्या विधानावर काही म्हणालो नाही

पण दुसरी ओळ (तिच्यातील काफियाचे राहूचदेत ) जर अख्खी हेरता आली तर डायरेक्ट दुसरी ओळच ऐकवायला काय हरकत असे एक मनात आले

पूर्वी गझलचर्चा म्हटल्यावर काळजात धस्स व्हायचं .. सगळेजण आपापले वेगवेगळे विचार प्रगट करीत.... ते वाचता वाचता कंटाळा येई.....पण प्रा. साहेबांनी गझला पोस्टायला चालू केल्यानंतर ही सगळी सोंगं एका छताखाली आली आणि मजा येउ लागली
(multiplex मध्ये नाहीका अनेक ओपशन्स असतात .हवा तो पिच्चर पहा तसा इथे हवा तो प्रतिसाद गळाला लावून ..... मासेमारी करता येते !!)

ही सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रा. साहेबांचे आभार..........

असो मी बेफिंचे विडंबन पाहिले ......ती हळहळ सळसळ वाली त्यांची गझल आठवली.

मी पोस्टलेल्या शेरवजा ओळी माझ्या नोंस्त्रादमस.... या कवितेतल्या होत्या ...मयेकरांनी गर्भितार्थ बरोबर ओळखलाय....

नुकताच वर प्रा. साहेबांनी दिलेला प्रतिसाद ओरीजनल वाटला ..नेहमी साराखां पर्यायी नाही वाटला त्यामुळे मूड बदलू देवू नये ही माबोकराना विनंती .
चालूद्या चाललंय ते मजा येतेय .......

या प्रतिसादातून मी प्रा. साहेबाना प्रतिसादान्ची फिफ्टी करून दिलीय ......आता इतरान्नीही शतकासाठी मदत करावी ही विनन्ती..............

फक्त बघताना सख्याशी वाट शी रिलेट करता आले नाही. मंजे वाट फार पाहावी लागत असे पण अजून गतप्राण नै ना. आणि काजळ पण कधी घातले नै. त्याहून बाकी सर्व कडवी मध्यमवयात आपलीशी होतातच हो. त्यात गंधोत्सव आणि दरवळ मंजे आमचेच कार्यक्षेत्र.

भूशास्त्र व खनिज तेल तंत्रज्ञानवाले साहेब पण मन किती संवेदन शील आहे. शिवाय कातळ वगैरे अगदी सहज चपखल वापरले आहे. थकून घरी यावं अन असे काही वाचले कि वाट्ते अरे हे तर आपल्याही मनात आहेच कि.

ज्ञानेशजी! धन्यवाद आपल्या काटेकोर प्रतिसादाबद्दल! आपण निर्देश केलेली चूक त्रिवार कबूल! गुणगुणण्यात चूक झाली. चुकीची दुरुस्ती केली आहे. कृपया पहाल का? दुरुस्त केलेला शेर असा आहे.............
“कण रणरणते वाळूचे, की, म्हणू माणसे ही?
त्यांच्यातच मानवतेची हिरवळ अजून आहे!”
मी वापरलेले वृत्त मात्रावृत्त आहे. प्रत्येक ओळीत १४+१२=२६ मात्रा आहेत.
मला आता वाटत नाही, की कुठे लयक्षय होत आहे. पहा पटते का ते!
माझी गझल आपणास बरी वाटली वाचून बरे वाटले!
पुनश्च प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
यतीभंग कुठे होत असल्यास(भूषणजींच्या म्हणण्यानुसार) कृपया कळवावे!
>....................प्रा.सतीश देवपूरकर

अश्विनी मामी! धन्यवाद आपण केलेल्या कौतुकाबद्दल! मी दगडगोट्यांचा व खनिजतेलाचा प्राध्यापक असलो तरी मुळात गझलवेडा आहे हो! गझल हाच माझा श्वास आहे, ध्यास आहे! आवडलेल्या कुणाच्याही मिस-याने माझे दिवस अन् रात्री उजळून व बहरून निघतात. त्याच मिस-यांच्या धुंदीत दिवसेंदिवस असतो. नव्या गझला लिहायला एक वेगळाच जोम येतो. आपल्यासारखे सहृदयी रसिक भेटत जातात व माझी लेखणी परमेश्वरकृपेने पाझरत जाते!
पुनश्च प्रतिसादाबद्दल धन्यवाद! असाच लोभ असू द्या!
...............प्रा.सतीश देवपूरकर

भूषणजी! आपण उपस्थित केलेल्या मुद्याचा खुलासा करतो......
“चर्चा 'निळीकाळी' पडू नये म्हणून त्या विधानावर काही म्हणालो नाही<<<<
पण दुसरी ओळ (तिच्यातील काफियाचे राहूच देत ) जर अख्खी हेरता आली तर डायरेक्ट दुसरी ओळच ऐकवायला काय हरकत असे एक मनात आले”<<<<<
अनेक मोठमोठ्या उर्दू शयरांच्या गझलेत मला दिसले की, पहिलीच एक ओळ दाद द्यावी अशी स्वयंपूर्ण कविता असते! कधी कधी अर्धी ओळ सुद्धा! हे अत्यंत उच्च दर्जाच्या काव्याचे लक्षण मानले जाते! इथे दुस-या ओळीचे प्रयोजनच काय, असे म्हणत नाहीत. असो.

कामयाब शेराचा अर्थ, काफिया/रदीफ उच्चारेपर्यंत suspense मधे असतो. काफिया व रदीफ उच्चारल्यावर समग्र शेराचा अर्थ क्षणार्धात लकाकतो! कुठल्याही समर्थनाची त्यास अवश्यकता नसते! दोन्ही ओळींची मिळून एक (वा दोन) स्वयंपूर्ण कविता झालेल्या असतात! पहिली ओळ कवितेची प्रसतावना असते, जिच्यात एक भावनांचा, अर्थाचा पीळ असावा लागतो, अधीरता निर्माण करणारी ताकद असावी लागते! आता प्रस्तावना नकोच, थेट मुद्याचेच बोला म्हटले तर संपलेच की हो सारे!
धनुष्यावर बाण चढवलेला आहे, प्रत्यंचा सुद्धा खेचली आहे, नेम धरलेला आहे, पण अजून बाण सुटलेला नाही. अशा वेळी वाटणारी अधिरता पहिली ओळ किंवा पहिली दीड ओळ म्हटल्यावर शेरात निर्माण व्हायला हवी! काफिया व रदीफ उच्चारताच तो शेर बाणासारखा रसिकांच्या काळजात आरपार जातो व मग उद्गार निघतात “क्या बात है!”
उदाहरणार्थ माझे एका गझलेतील दोन शेर देतो. मी वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टींचा पडताळा आपणास यावा! असे अनेक शेर आपल्या गझलेतही मी पाहिले आहेत. प्रत्येक शेर इतक्या ताकदीचाच असेल हे सांगता येणार नाही, पण प्रयत्न मात्र त्या दिशेनेच असायला हवेत! शेवटी आपण जे लिहितो ते अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जसे आपली मानसिकता, प्रसन्नता, स्थैर्य, आपल्या चिंतनाची खोली, स्वत:ला परमेश्वराकडे सोपवण्यातली निष्ठा, आपली सबूरी वगैरे........
माझे २ शेर असे आहेत........

बोल तू सारे उद्या, पण आज नाही! (इथे एक वैचारीक पीळ आहे, एक प्रश्न आहे, की, का बुवा नको आज बोलायला?)
आज माझाही मला (इथपर्यंत अर्थ उमगत नाही) अंदाज नाही!!

ऎकण्यासाठी जिवाचे कान केले; (इथे देखिल एक उत्सुकता आहे, की काय बुवा ऎकायला जिवाचे एवढे कान केले?)
पाहिजे तो नेमका (इथपर्यंत अर्थ उमगत नाही) आवाज नाही!

भूषणजी, काय पटते का? कृपया आपली प्रांजळ व परखड प्रतिक्रिया कळवावी!
मी माझ्या काळजाचे दार सताड उघडे ठेवले आहे!
..............प्रा.सतीश देवपूरकर

प्रोफेसर,

आपल्या सर्वसमावेशक प्रतिसादावरची प्रतिक्रिया लिहिण्याच्या मनस्थितीत मी बहुतेक उद्या असेन (म्हणजे भारतातल्या १२ मे ची सकाळ किंवा दुपार)

सध्या मी याच प्रतिसादावर हबकलेलो आहे:

<<अश्विनीमामी | 10 May, 2012 - 20:01 नवीन
मला गजल वगैरे कळत नाही पण खूप छान लिहीले आहे. पुलेशु.>>

Pages