पत्रकार, संपादक, आणि ताळतंत्र

Submitted by मंदार-जोशी on 12 April, 2012 - 04:35

गेले काही दिवस वर्तमानपत्रात एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटनेसंबंधी बातमी गाजत आहे. मुलगाच हवा या हव्यासापोटी बंगळूरूमधे एका बापाने मुलगी झाली म्हणून नाराज होऊन त्या मुलीला सतत शारिरीक क्लेश दिल्याने तिचा मृत्यू झाला. तपशीलात फार अधिक लिहीणे मला अशक्य आहे. तसेच बातमी जगजाहीर असल्याने उगाच पाल्हाळही नको.

मला सगळ्यात चीड आली ती पुढील बातमीत त्या पत्रकाराने किंवा संपादकाने जे प्रकाशचित्र छापायचा निर्णय घेतला ते बघून. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात तारतम्य म्हणजे काय ते शिकवत नसतील असे नव्हे, पण मग ते काय परीक्षा दिली की तिथेच ठेऊन बाहेर पडायचं का? अभ्यासक्रमात शिकवो न शिकवो, काही गोष्टी यांना समजत नाहीत का? की सवंग लोकप्रियता आणि जास्तीतजास्त खपाच्या हव्यासापोटी वर्तमानपत्रांनी अक्कल गहाण टाकली आहे? कुठले फोटो फोटो छापायचे याची अक्कल कधी येणार या लोकांना?

या ठिकाणी फोटोत फक्त रडणारी आई दाखवून भागलं नसतं का? हा असा छापला असता तर?
Afreen.JPG

त्या बातमीचा दुवा - पूर्ण फोटो तिथेच बघायला मिळेल:
http://punemirror.in/article/4/20120412201204120315256874dc42755/Baby-Af...

ते प्रकाशचित्र पाहिल्यावर मी इतका हादरलो की संपादकांना पुढील प्रतिसाद लिहीला आहे:

Story is really hard rending, but I sincerely wish Pune Mirror stop carrying photographs of dead babies. It is not appropriate, in addition to being extremely disturbing. I hope the editor understands what I am trying to say here.

तुमच्यापैकी कुणी याच्याशी सहमत असल्यास कृपया अशा अर्थाचा प्रतिसाद तिथे लिहावा.

बातमीच्या खालीच प्रतिसादाचा फॉर्म आहे. तिथे आपण आपला प्रतिसाद लिहू शकता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी, मिरर ने तो फोटो देऊन कोणत्या तरी नियमाचा किंवा संकेताचा भंग केलेला असावा असे वाटते. तुला कदाचित माहीत असेल. सहसा वर्तमानपत्रे असे फोटो देत नाहीत यावरून सुद्धा तेच वाटते.

कोणत्याही व्यक्तीला स्वतःचा फोटो ज्या पद्धतीने वर्तमानपत्रात छापला जाऊ नये असे वाटेल (किंवा १८ वर्षांखालील मुलांच्या बाबतीत त्यांच्या पालकांना तसे वाटेल) तसा तो छापला जाऊ नये. अपवाद पोलिसांनी पकडलेले गुन्हेगार - त्यातही बर्‍याच वेळा तोंडे झाकूनच येतात फोटो. यापेक्षा अत्यंत क्षुल्लक बाबतीत एका महिलेचा फोटो आला होता - ती रस्त्यावरील खड्ड्यामुळे गाडीवरून पडली म्हणून कोणीतरी काढला होता - तो नक्कीच छापण्यासारखा नव्हता.

फारेन्डा, पुणे मिरर- बेनेट कोलमन ग्रूप- टॅब्लॉईड- आणि नियम संकेत यांची अपेक्षा?

विषयांतर होइल म्हणून ते लिहिले नाही. Happy

नंदिनी..कबूल आहे तुझा पॉईंट.. पण काही फोटो, इस्पेशली हा/असा फोटो न छापणे हे तर त्यांच्या हातात होतं ना??
बातम्या 'मनोहर कहानियाँ' टाईप च्या छापून आल्या किंवा टीवी वर दाखवल्या तर नाहीच आवडत पाहायला..मला..

मला अशा बातम्या ऐकताना, बघताना खूप खूप त्रास होतो, अगदी अंगावर येतात या बातम्या... मग पुढचे २-३ दिवस काहीच सुचत नाही फक्त आणि फक्त याच बातम्यांचा विचार...! इतक्या निरागस, गोड बाळाला मारणारा नराधमच! जन्मदाता तरी कसं म्हणणार त्याला!!! Sad

बातमीचं काय घेऊन बसलात बातम्या तयार करून देणारेही कमी नाहीयेत खप वाढावा म्हणून!

पण खरंच मिडीयाने कुठेतरी ताळतंत्र ठेवावं. कारण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचताना या माध्यमाचा सर्वसामान्यांवर विपरीत परीणाम होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते!

किती दिवस सर्व सामान्य माणुस सत्य घटनेपासुन दुर राहणार, त्यालाही कळु द्या लोक कसे आहेत, ज्यांनी हे केले ते सर्व सामान्यच, ज्यांना याची झळ पोहचली ते सर्व सामान्यच मग विपरीत परीणाम कसा होईल,

>>> पुणे मिरर- बेनेट कोलमन ग्रूप- टॅब्लॉईड- आणि नियम संकेत यांची अपेक्षा? <<< अगदी अगदी! फक्त या धाग्याचा विषय ना।ई तो

लिंबूने शरिया कायद्याचा उल्लेख केलाय, पण इतके नीच कृत्य त्यांनीदेखील कल्पिले
नसेल.
साधारणपणे त्या कायद्यानुसार ज्याचे नुकसान झालेय किंवा ज्याच्यावर अन्याय झालाय, त्यालाच शिक्षा करायचा अधिकार असतो. इतकेच नव्हे तर माफ करायचा
अधिकार पण त्यालाच असतो.

नंदिनी

९९ % सहमत

गुन्हेगाराला जरब बसण्याची गरज वैगेरे भारतात सध्या तरी शक्य नाही !!

कारण ज्या देशात कसाब सारख्या गुन्हेगारावर २५ -२६ कोटी खर्च केले जातात व

त्याला ६ आचारी त्याच्या साठी तैनात असतात, त्या देशात हे शक्य वाटत नाही !

मंदार, हे उद्वेगजनक आहेच. कुठल्याही जखमींची, मृतदेहांची चित्रे दाखवताना, किमान काहि भाग धूसर केले जावेत, एवढी तरी अपेक्षा ठेवू शकतो का आपण.>> +१

काळजात चर्र करणारा फोटो आहे तो...............

नंदिनीशी सहमत.

त्यांनी बातमी / फोटो केवळ फायदा नजरेसमोर ठेऊनच दिली आहे हे मान्य. ती खूप अंगावर येतेय हे पण मान्य. तरी काही मुद्दे :

१. आज आपण आपल्याच रामरगाड्यात एवढे अडकलोय की भोवती काय चाललय याचे आपल्याला काहीच सोयर -सुतक नसते. आज जर तो फोटो नसता तर ही बातमी मायबोलीवर चर्चेला आली असती का?

२. कधी कधी समाजाला जाग यायला परीसिमा गाठावीच लागते. या बातमीमुळे समाज जागा होईल असे नाही पण त्यामुळे स्त्री-भ्रूणहत्या चुकीची आहे याची जाणीव काही लोकांना नक्की झाली असेल. नवजात बालिकांना किंवा एकंदरीतच मुलींना केवळ त्या मुली आहेत म्हणून मारले जाते ते किती भयंकर हे काही लोकांना समजले असेल.

३. एका लहान जीवाला - जो अजून पूर्णपणे परावलंबी आहे - हालहाल करून मारणे हे जनावरे पण करत नाहीत. असे कृत्य जेंव्हा बातमी होऊन समोर येते तेंव्हा त्रास हा होणारच. व्हायलाच हवा.

वरकरणी जरी भावनेच्या भरात हे असे फोटो नकोसे वाटले..... तरी "नंदिनी"ने मांडलेले मुद्दे विचार करायला लावण्यासारखे आहेतच....... तिचे मुद्दे बरोबर आहेत.

पुणे मिरर- बेनेट कोलमन ग्रूप- टॅब्लॉईड- आणि नियम संकेत यांची अपेक्षा?
>>>>

अगदी Happy

मंदार,

कोणत्याही सुजाण नागरीकाने आपण केले तेच विचार व्यक्त केले असते, प्रश्न नाहीच.

मूळ लेखातील मुद्दा पटला, मात्र हा विषय संतापजनक असल्याने अधिक लिहीत नाही

मंदार
खूप वाईट घटना आहे रे. त्या सई साठेची कविता तर पूर्ण वाचताही नाही आली. भयानक आहे. अर्थात इथं विषय परकारितेचा आहे. स़काळच्या पुरवणी मधे मध्यंतरी समीरण वाळवेकरांचे लेख येत असत ते वाचनीय होते. किमान मला तरी ते पटत होते. कुमार केतकरांचाही एक लेख कधीतरी वाचनात आलेला होता. राजदीप सरदेसाईंनी देखील एकदा टीव्हीवर याबद्दल छान सांगितलं होतं. पत्रकारितेतल्या सूज्ञ माणसांनी वेळोवेळी चिंता व्यक्त केलीच आहे... आपण आणखी काय बोलणार ?

वरची पोस्ट लिहील्यानंतर नंदिनी यांची प्रतिक्रिया वाचली. त्या स्वतः पत्रकार असल्याने त्यांनी जी बाजू मांडली आहे ती विचारात घ्यायला हवीच. त्यामागे असलेला त्यांचा अनुभव, अभ्यास पाहता इतरांनी मत खोडून काढताना ते जबाबदारीने करायला हवं. पण काही शंका आहेत..

पूर्वी रूपेरी पडद्यावर लहान मुलांची हत्या न दाखवायचा अलिखित संकेत पाळला जाई. लहान मुलांवर त्याचा वाईट परिणाम होतोच , मोठ्यांमधेही हळव्या लोकांना ते झेपत नाही. शोले मधे गब्बरसिंग छोट्या मुलाच्या दिशेने बंदूक रोखतो मात्र प्रत्यक्ष हत्या करताना दाखवलेले नाही तर इंजिनचा आवाज घेतला आहे. या सूचकतेने क्रौर्य दाखवण्याचा उद्देश प्रत्यक्षपेक्षा जास्त प्रभावी रित्या साध्य झाला. बातमी पोहोचवताना देखील असा विचार करता येऊ शकेल का ?

पत्रकार आणि डॉक्टर या व्यवसायांना समाजात वेगळं स्थान असल्याने अपेक्षा वाढलेल्या असतात हे लक्षात घ्यायला हवं

बातमी पोहोचवताना देखील असा विचार करता येऊ शकेल का ?>> का नाही? तो केलेलाच असतो. फक्त तो कशापद्धतीने केलाय हे वाचकाना समजू शकत नाही. आणि माझा अभ्यास आणि अनुभव दोन्ही अगदीच तोकडे आहेत हे पण लक्षात घ्या. (उगा नम्रता म्हणून लिहत नाही पण माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणारी लोकं मायबोलीवर आहेत)

आणि उदाहरण देताना सिनेमामधले देऊ नका. सिनेमा आणि वृत्तपत्रे ही दोन भिन्न माध्यमं आहेत.

कुणाला खालची पोस्ट फारच असंवेदनशील वाटेल. तसे असेल तर वाचू नका/

इथे आई बाळाचे प्रेत घेऊन रडते आहे असा तर फोटो आहे. बाळाच्या आईचा चेहरा त्या चेहर्‍यावरचा आक्रोश पूर्ण दिसतोय. बाळाचा क्लोजप नाही. बाळाचा चेहरा अथवा अंगावरच्या जखमा दिसत नाहीत. या बाळाच्या हाताला फ्रॅक्चर होते. या बाळाची मान मोडली होती. (Dislocated Neck) तसेच बाळाच्या अंगावर सिगरेटने भाजल्याच्या खुणा होत्या. पण फोटोत ते दिसत नाही. अर्थात, बाळाचा चेहरा झाकलेला नाही, यामधे धार्मिक कारण आहे. फोटोग्राफरने काढलेल्या शंभरेक फोटोमधले हाच फोटो सिलेक्ट करण्यामागे कारण असणारच.

हा फोटो टॅब्लोईडमधे आलाय. पण जरा ब्रॉडशीटमधे कसे फोटो आलेत ते तपासाल का? (सकाळ्/लोकमत/टाईम्स ऑफ इंडिया इत्यादि)

आणि उदाहरण देताना सिनेमामधले देऊ नका. सिनेमा आणि वृत्तपत्रे ही दोन भिन्न माध्यमं आहेत.

हे उदाहरण दिलं तेव्हा हा सीनच आठवला. अर्थात हे उदाहरण दिलं नसतं तरी चाललं असतं. काय म्हणायचंय हे समजल्याशी कारण..

मलाही असे फोटो पहाताना फार त्रास होतो.
नुकताचे पेपर मधे आलेला तिबेटियन तरुणाचा जळतानाचा फोटो बघुन दोन दिवस कसे तरी वाटत होते. तो तिबेटीयन मुलाचा फोटो तरी का दिला असावा? फोटो अगदी समोरुन होता आणि फार त्रासदायक वाटतं बघायला. त्याशिवाय पेपर लहान मुलेही उघडुन पहातात. ( हा फोटो पहिल्याच पानावर होता) मुलांनी त्याबद्दल विचारल्यास काय सांगायचे? त्या दिवशीचा पेपर मी लपवुन ठेवला.

@माधव
>>आज जर तो फोटो नसता तर ही बातमी मायबोलीवर चर्चेला आली असती का?
समजा मी फक्त संपादकांना ईमेल करुन सोडून दिलं असतं तर आला असता का हा फोटो मायबोलीवर? अशा चार-पाच बातम्यांच्या बाबतीत मी हेच केलं आहे. पण हा फोटो फारच अंगावर येणारा वाटला म्हणून अधिकाधिक लोकांनी निषेध नोंदवावा म्हणून ह्या बातमीचा उल्लेख इथे केला इतकंच.

>>या बातमीमुळे समाज जागा होईल असे नाही पण त्यामुळे स्त्री-भ्रूणहत्या चुकीची आहे याची जाणीव काही लोकांना नक्की झाली असेल. नवजात बालिकांना किंवा एकंदरीतच मुलींना केवळ त्या मुली आहेत म्हणून मारले जाते ते किती भयंकर हे काही लोकांना समजले असेल.

मला ह्यावर विश्वास ठेवायला आवडेल, पण दुर्दैवाने हा अत्यंत भाबडा समज आहे. बातमीला आक्षेप नाहीच आहे. आक्षेप आहे तो त्या बाळाच्या मृतदेहासहित काढलेल्या फोटोला. आणि स्त्री-भ्रूणहत्या चुकीची आहे याची जाणीव ज्यांना आहे त्यांना आहेच, त्यांना ह्या फोटोचा त्रासच होणार - तो का व्हावा, त्यांची मते आणि आचार चांगला असताना???!!

आणि ज्यांना नाही ही जाणीव, त्यांना या बातमीमुळे तर सोडूनच द्या, पण फोटोमुळेही काहीही फरक पडणार नाही. नराधम ते नराधमच राहणार. यासाठी लहानपणापासून होणारे संस्कार आणि पुढे झालेलं प्रबोधन या गोष्टींना अनन्यसाधारण महत्व आहे. "मुलगा झाला तरी आनंद, मुलगी झाली तरी आनंद" अशी मानसिकता संपूर्ण समाजात जो पर्यंत तयार होत नाही, तो पर्यंत असले हजार फोटो छापले तरी समाजात काडीमात्र फरक पडण्याची शक्यता नाही.

ही बातमी दाखवूनही "मुलगाच हवा, मुलगी असेल तर पाडून टाकू" अशी प्रतिक्रिया देणारे महाभाग मी शोधून दाखवतो. आत्ता बोला

>> असे कृत्य जेंव्हा बातमी होऊन समोर येते तेंव्हा त्रास हा होणारच. व्हायलाच हवा.
नाही. हा त्रास मला आणि माझ्यासारख्या (म्हणजे समानता प्रत्यक्ष जगणार्‍या आणि मुलगा-मुलगी हा जन्मभेद न करणार्‍या) असंख्य लोकांना व्हायला नको आहे.

नंदिनीने म्हटल्याप्रमाणे जर का पत्रकार हे समाजाचे शॉक अ‍ॅब्सॉर्बर असतात आणि कुठल्याही घटनेचा पहिला धक्का ते पचवतात आणी मग ती घटना इतर जनतेपर्यंत सौम्यरीत्या पोचते - ते काम इथे झालेलं दिसत नाही.
बातमीचा आधार घेऊन समाजप्रबोधन करण्याचा कुठलाही प्रयत्न दिसत नाही.

@ नंदिनी
>>बाळाचा क्लोजप नाही. बाळाचा चेहरा अथवा अंगावरच्या जखमा दिसत नाहीत. या बाळाच्या हाताला फ्रॅक्चर होते. या बाळाची मान मोडली होती. (Dislocated Neck) तसेच बाळाच्या अंगावर सिगरेटने भाजल्याच्या खुणा होत्या. पण फोटोत ते दिसत नाही. अर्थात, बाळाचा चेहरा झाकलेला नाही, यामधे धार्मिक कारण आहे. फोटोग्राफरने काढलेल्या शंभरेक फोटोमधले हाच फोटो सिलेक्ट करण्यामागे कारण असणारच.

फोटोग्राफरने काढलेल्या शंभरेक फोटोमधले हाच फोटो निवडला हे आमच्यावरचे उपकारच म्हणायचे. त्या फोटोत बाळाच्या अंगावर असलेल्या भाजल्याच्या खुणा आणि मोडलेली मान दिसत नाही म्हणून तो फोटो सौम्य ठरत नाही. बातमीत त्या बाळाला काय त्रास झाला त्याचं साद्यंत वर्णन आहे, शिवाय फोटोत "एका बाळाचा मृतदेह" आहे एवढी गोष्ट समोरच्याला हलवायला पुरेशी ठरते. त्यासाठी जखमा दाखवायलाच हव्यात असे काही नाही.

ही बातमी मी चक्क सर्वेक्षण केल्याप्रमाणे दहा लोकांना दाखवली किंवा बघायला सांगितली. त्यात पाच स्त्रीया आणि पाच पुरुष होते. गंमत म्हणजे त्यातल्या एकानेही या फोटोचं समर्थन केलं नाही. त्या पाच पुरुषात एक पत्रकारही होता. तो दोन्ही प्रकारच्या वर्तमानपत्रात काम करतो - टॅब्लॉइड आणि ब्रॉडशीट. त्याला मी विचारलं की एक पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला पर्याय दिला की आहे तोच फोटो छापाल की फक्त आईचा चेहरा असलेला फोटो छापाल, तर तो म्हणाला की "मी फक्त आईचा रडणारा चेहरा असलेला फोटो छापायला प्राधान्य देईन".

अर्थात तू म्हणतेस त्याप्रमाणे जाहीरातदारांच्या प्रभावाखाली येऊन असले फोटो छापले जात असतील तर बोलणंच खुंटलं.

जाऊद्याना राव! Sad
आपल्यात एक पद्धत आहे, कुठे प्रेतयात्रा किन्वा नुस्ते जरी प्रेत दिसले, खास करुन मानवाचे, तर नमस्कार करुन(च) पुढे जावे. कदाचित छापणार्‍यान्ची तशीच अपेक्षा असेल. नै का? दरवेळेस त्यान्चा वाईटच हेतू असेल असे तरी का धरावे?

लिंबूकाका. हेतू वाईट नसतोच असं मानलं, तरी समोरच्याच्या मनाचा विचार करावा एवढीच अपेक्षा. पण तुम्ही म्हणता ते सुद्धा खरं आहे. जाऊ दे.

'डिग्निटी ऑफ अ डेड बॉडी' हा विचार करून तसे फोटो छापत नाहीत हा संकेत असल्याचं वाचलं होतं. पण टॅब्लॉइड्स एकूणच ताळतंत्र सोडून बातम्या आणि फोटो छापतात. नंदिनी म्हणते ते कारण आहेच.(आता तर इतर वर्तमानपत्रांचीही स्थिती यापेक्षा वेगळी नाही!) हवा तो इंपॅक्ट साधायला वाट्टेल ती पातळी गाठतात एवढं खरं!

मी मंदारशी सहमत आणि तितकाच नंदिनीही....
पण काही जणांनी पत्रकारीतेवरच हल्लाबोल केलेला दिसला म्हणून थोडे म्हणणे मांडावे वाटले...अर्थात वैयक्तिकरित्या मी देखील असले फोटो छापण्याच्या विरोधात आहे...
पण माझे काही प्रश्न आहेत...कुणाला शक्य असल्यास त्याची उत्तरे द्यावीत..

१. वृत्तपत्रांना शेल्फ लाईफ असते हे सर्वांनाच माहीती आहे. मग मला सांगा किती टक्के वाचक लहान मुलाच्या मृतदेहाचा फोटो बघून तो पेपर वाचण्यासाठी उचलतील. जर असे करण्यार्यांची संख्या नगण्य असेल तर संपादकाचा फोटो छापण्यामागचा हेतू साध्य झाला नाही असे समजायचे का? आणि जर संख्या जास्त असेल तर आपल्या समाजात विकृत लोकांचा जास्त भरणा आहे असे अनुमान काढायचे का?
२. पत्रकारितेत काम करणारे सर्वचजण विकृत आहेत का? हे असे फोटो छापताना त्यांना खरेच समाधान मिळते का?
३. माध्यमांचा सर्वसामन्यांवर विपरित परिणाम होतो असे मत वाचले. या बातम्यांचा किंवा फोटोंचा खरेच परिणाम होतो हे मानण्याइतके आपण अजूनही भाबडे आहोत का..चित्रपटात, मालिकांमध्ये दाखवण्यात येणारा हिंसाचार किंवा अगदी कॉम्प्युटर गेम्समधली हिंसा यापेक्षाही वृत्तपत्रातील फोटो हा कितपत प्रभावी ठरतो?
याच संदर्भात गोविंद निहलानी यांची मुलाखत आठवली. त्यांनी म्हणले होते की मी हिंसेविरोधात चित्रपट बनवतो. ज्यांच्या चित्रपटात हिंसा ठासून भरलीये त्यांनी असे म्हणावे हे सुरुवातीला विनोदी वाटले पण त्यांनी स्पष्टीकरण असे दिले..माझ्या चित्रपटातली हिंसा ही अंगावर येते. ती पाहणार्याला हिंसा हे भयंकर, बिभत्स आणि नकोसे कृत्य वाटावे असा मी प्रयत्न करतो. बाकी हिंदी चित्रपटात एकेक हिरो अगदी आरामात शंभर-सव्वाशे गुंडाचा खातमा करतो. ते पाहून प्रत्येकालाही हिंसा ही अगदी सहज सोपी आणि ग्लोरीफाईड वाटू शकते...
४. लोकांची सत्य माहीती असूनही ते स्वीकारायची मानसिकता नसते. हा फोटो काही संवेदनशील लोकांना त्रासदायक ठरला असेलही पण कित्येकांची मानसिकता अशी आहे की हा फोटो छापला नसता तर काही बिघडले असते का...यामागे नक्की कारण काय आहे...वाचकाभोवतीचे सुरक्षित उबदार वातावरण खसकन ओरबाडून वास्तव जगातील भयाण वास्तव अतिशय बटबटीतरित्या सामोरे आणल्याची नाराजी आहे का?
५. आज मिडीया तर सोडाच सर्वसाधारण समाजच कोडगा झाला आहे असे कुणाला वाटत नाही का..रोज किमान ३-४ खुनाच्या बातम्या असतातच असतात. कितीजण त्या बातम्या नेमाने वाचतात किंवा किमान पाहतात. जर काही वेगळे, विचित्र असले तरच त्याला वाचक भेटतो हे सर्वेक्षण आहे. खून सोडून द्या...काश्मिरमध्ये किंवा इतरत्र झालेल्या जवानांच्या हत्या किती जण वाचतात. याचे कारण ते आता अगदी सर्वसामान्य झाले आहे. कुणाला आता काश्मिरमध्ये जवानाची हत्या असा मथळा वाचून खूप हळहळ, जोरदार धक्का असे काही वाटल्याचे आठवते का?
६. शुभम शिर्केची बातमी वाचून खूपजणांना धक्का बसला. आता त्या गुन्हेगारांच्या खटल्याच्या बातम्या येत राहतील आणि काही वर्षे येतच राहतील. कितीजण त्या बातम्या नियमीतपणे वाचतील. किंवा कितीजणांना शुभम शिर्के लक्षात राहील?

आता थोडे वृत्तपत्रांनी पाळावयाचे संकेत...
असा नियम आहे की बलात्कारित स्त्रीची ओळख पटेल असा मजकूर किंवा छायाचित्र येता कामा नये. आणि बहुतांशी वृत्तपत्रे कटाक्षाने तो पाळतातही. याचे कारण त्या दुर्दैवी स्त्रीला समाजात राहणे शक्य व्हावे यासाठी
पण मृत व्यक्तीच्या बाबतीत तसा नियम पाळला जात नाही याचे कारण उघड आहे. ती दुर्दैवी व्यक्ती या सगळ्याच्या पलिकडे गेलेली असते आणि तिचे नातेवाईक सहानभूतीला प्राप्त असतात (अपवाद वगळता). मग इथे फक्त प्रश्न उरतो की मृतदेह दाखवावा किंवा नाही..तर तो पूर्णपणे संपादकाचा निर्णय आहे..तो छापल्याने काही संवेदनशील व्यक्तींना काही काळ त्रास होण्यापलिकडे फार काही परिणाम साधला जाईल असे वाटत नाही.

मी मंदार तुझी तळमळ समजु शकते आणि स्वत: एक आई म्हणूनही या घटनेकडे पाहताना मला प्रचंड चीड येतेय पण कदाचीत पत्रकार म्हणून किंवा समाजाची मानसिकता म्हणून नंदिनींचंही बरोबर असू शकेल...

अवांतर पुन्हा एकदा चित्रपटाचं उदा. द्यायचं तर तू मेट्रो पाहिला असशील तर त्यात ते "रुपाली बनी रुदाली" पाहिलंस न? शेवटी ज्याचं जातं त्याला कळतं बाकी सगळा दोन पैशाचा तमाशा आहे....

फोटो पाहुन बातमी वाचुच शकले नाही. Sad ... नंदिनीची कारणे पटताहेत पण तरी दिनेशदांचे पटले. फोटोतील गंभीर भाग धुसर करुन दाखवले तरीही गांभिर्य तितकेच पोचु शकले असते.

Pages