जप, ध्यान आणि प्रवास.....

Submitted by योग on 11 April, 2012 - 09:30

जप, जाप्य.. तप, तपश्चर्या वगैरे शब्द नविन नाहीतच.

तप आणि तपश्चर्या कदाचित आता तितक्याश्या अपिलींग राहिल्या नसल्या तरी अगदी पुराण कालापासून आजही जपाचे महत्व टीकून आहे. जपालाच बिलगून असते ते ध्यान. "सुंदर ते ध्यान ऊभे विटेवरी" मधले ध्यान नव्हे- त्या ओळीत, दगडात कोरलेल्या एखाद्या मूर्त रूपातही नाथांना सौख्य, शांती, लोभस असा जिवंत अनुभव मिळाला त्याचे ते वर्णन आहे. ईथे रूढ अर्थाने "ध्यान" करणे, मेडीटेशन या अर्थी म्हणतोय.
तर जप आणि ध्यान याचे आजच्याही युगात महत्व/अपिल कमी झालेले नाही.

नेहेमीप्रमाणेच धार्मिक, श्रध्दा, अंधश्रध्दा, ई. च्या मार्गाने हा लेख जावू नये म्हणून आधीच नमूद करतो की आजच्या युगातही टिकून असलेल्या व वेगवेगळ्या रूपाने/तर्‍हेने प्रकट होणार्‍या या जप, ध्यान बद्दल असलेले कायमचे कुतूहल व्यक्त करणे आणि जमलेच तर काही ठोकताळे बांधणे एव्हडाच या लेखाचा ऊद्देश.

तर लहानपणापासूनच घरचे वातावरण धार्मिक असल्याने, बाय डिफॉल्ट (म्हणजे माझ्या संमतीशिवाय) म्हणून अशा अनेक जप, ध्यान ई. चे अनुभव जवळून पहायला मिळाले. काळाच्या ओघात त्याच जुन्या अनुभवांचे नविन प्रकटीकरणही पाहिले. एक जाणवले की तेव्हाही आणि आताही "गूढ" कायम आहे. तेव्हाही आणि आताही अजूनही कसल्यातरी शोधात आपण सर्वच फिरतो आहोत..

जितके पंथ, कल्ट, समूह तितके वेगळे प्रकार. ध्यानाचेच पहा:
१. काहींच्या मते निव्वळ शून्यात ध्यान लावून भागत नाही.. समोर काहितरी वस्तू (ऑब्जेक्ट) हवे. असे ऑब्जेक्ट एखादी समई, ज्योत, एखाद्या बाबा/गुरू/माई ई. चा फोटो, किंवा एखादी देवाची मूर्ती/रूप, काहीच नाही तर ओंकार.. पण कशावर तरी लक्ष केंद्रीत करून ध्यान करायचे.
२. काहींच्या मते निव्वळ श्वासावर लक्ष केंद्रीत करून (प्राणायाम क्रीया) डोळे मिटून आपल्याच आतील चैतन्य/जीवन तत्वाशी अनुसंधान साधणे म्हणजे देखिल ध्यान होय.
३. काहींच्या मते एक "स्वयंकेंद्रीत" ध्यान असते. म्हणजे असे की स्वतःला एखादा बिंदू समजून आपल्याच भोवती घडत असलेल्या घटना, व्यक्ती, सभोवालचा परिसर वगैरे वगैरे कल्पून त्या ईतर सर्वांचा त्या बिंदूभोवती होत असलेला प्रवास पहाणे.
४. हिमालयात, वा ईतर पर्वतांवर, दुर्गम डोंगर दर्‍या, गुहा ईत्यादि ठिकाणी अनेक वर्षे ध्यान लावून बसलेल्या साधू, सन्यासी ई. च्या कहाण्याही आपण ऐकतच असतो.
५. तर काहींच्या मते एखादा ठराविक मंत्र (जो त्या समूहाखेरीज ईतरांना सांगितला जात नाही!) ऊच्चारून ध्यान करायचे असते. शिवाय तो मंत्र कसा ऊच्चारावा ई. चे अगदी व्यवस्थित नियमही असतात.

तर जपाचेही अनेक प्रकार आढळतातः
१. काहींच्या मते जप म्हणजे माळ ओढणे- थोडक्यात एखाद्या देव, दैवता, गुरू, साधू, ई. च्या नावाचा ऊच्चार, एक एक मणी सरकवत करणे. मुळात असे वाटते की निव्वळ जप असावा, कालानुसार त्यात मोजणीसाठी "माळ" घातली गेली असावी.. (आपण गमतीत म्हणतो ना "काय नुसता जप लावलाय..")
यात किती वेळा जप झाला याला महत्व असते, जितके जास्ती तितके चांगले असे काहीसे.
२. काहींच्या मते जप म्हणजे एखादा मंत्र सतत म्हणणे, माळ असायलाच हवी असे नाही- ऊ.दा: "श्री राम जय राम जयजय राम", किंवा "श्री स्वामी समर्थ जय जय..." ईत्यादी...
३. काहींच्या मते जप म्हणजे ईश्वराचा धावा करणे- आता प्रत्येकाला वेगळा ईश्वर पूजण्याची मुभा असल्याने
यात जितके देव/ईश्वर तितके जप.

जपाच्या जवळ जाणारे पण व्यावहारीक अर्थाने मात्र एखादे अनुष्ठान, संकल्प असले रूप घेणार्‍या गोष्टि म्हणजे- गायत्री मंत्राचे सामूहीक वा वैयक्तीक ऊच्चारण, श्री गणपती अथर्वशीर्ष याचे सहस्त्रावर्तन (१००० वेळा म्हणणे), किंवा एखाद्या संत महात्म्याची पोथी वाचणे, ईत्यादी सर्व.

यातलाच अजून एक वेगळा प्रकार आहे तो म्हणजे एखादे मंत्र, स्तोत्र, याचे श्रवण. डॉ. बालाजी तांबे यांचे "गर्भसंस्कार" हे पुस्तक व ध्वनिफीत तर अगदी अलिकडेही प्रसिध्द आहेच. अनेक लोकांनी अनेक प्रकारे प्रयोग करून अशा विशीष्ट मंत्र ऊच्चार वा श्रवणाचे मनुष्यावरील परिणाम अनेक पुस्तकांतून कधी अनुभवासकट तर कधी त्याशी निगडीत वैज्ञानिक प्रयोग यासह प्रकाशीत केले आहेत. (जपान मध्ये एक प्रयोग केला गेला होता असे वाचल्याचे आठवते. त्यात दोन छोट्या रोपट्यांची वाढ तपासली गेली. एका रोपट्याला कायम रॉक म्युझिक च्या जवळ तर दुसर्‍याला कायम मेलडी/जाझ म्युझिक च्या जवळ वाढवले गेले. पहिले रोपटे रॉक म्युझिक च्या स्त्रोत/ध्वनिलहरींपासून दूर अशा विरुध्द दिशेने वाढून शेवटी मलूल होत गेले.. तर दुसरे रोपटे मेलडी म्युझिक च्या दिशेने व्यवस्थित वाढत गेले.)

अर्थातच ९९% वरीलपैकी कुठल्याच गोष्टीला "बाप दाखव नाहीतर श्राध्द कर" अशा वस्तूनिष्ट कसोटीवर तपासून बघणे आणि दर वेळी खरे खोटे सिध्द करणे शक्य नसते. एखादी गोष्ट (वैज्ञानिक अर्थाने "प्रयोग") करून पाहिल्याशिवाय त्यातून अनुभव, निरीक्षणे आणि पर्यायाने काही अनुमान वा सिध्दांत मांडणे अवघड आहे हे मान्य केले तर वरील सर्व गोष्टी करून पाहिल्याशिवाय त्यातून नेमके काय मिळते हे सांगणे अवघड. गोंधळ व वाद तेव्हा निर्माण होतो जेव्हा या वरील सर्वाचे स्तोम माजवून वर त्याला पाप-पुण्य ईत्यादीच्या तराजूत तोलून, मग विश्वास-अविश्वास, श्रध्दा-अंधश्रध्दा अशा भावनिक भेदातून एकतर तुम्ही यातले आहात वा नाहीत अशी एकच टोकाची भूमिका घ्यायला भाग पाडले जाते. आणि यातून गंभीर समस्या तेव्हा ऊद्भवतात जेव्हा या वरील सर्वाचा वापर लोकांची फसवणूक, लुबाडणूक ई. साठी केला जातो. अर्थात तो वेगळा विषय.

पण एव्हडे असूनही काही वैयक्तीक बाबी मात्र नोंदवाव्याश्या वाटतातः
१. कधी कधी असे प्रसंग घडतात, अनुभव येतात (बरे वाईट सर्वच) की ज्याचे व्यावहारीक, वैज्ञानिक, वा तर्कबुध्दीच्या आधारे स्पष्टीकरण देता येत नाही.
२. आता अमुक एक संताची पोथी वाच असे मला कुणी निव्वळ सांगितले म्हणून वाचणार्‍यातला मी नाही. पण वाचून पाहुया काय वाटते असे म्हणून वाचली- बरे वाटले, थोडी मनःशांती मिळाल्यासारखे झाले असे मात्र होते. मग यातून ऊलट काही अपाय तर होतच नाहीये तर नावे कशाला ठेवा? तेव्हा वाचतो मी.
३. कधी कधी या वरील ध्यान धारणा प्रकरणापैकी एखादी करून पाहिली तर काही काही गमतीशीर अनुभव देखिल येतात. ऊ.दा. एखादी भविष्यात घडणारी गोष्ट दिसणे (जी नंतर घडून गेली की आपल्याला आठवते अरे हे तर आपण आधी पाहिलेले...), एखाद्या व्यक्तीबद्दल एखादी बातमी आधीच कळणे, किंवा काही काही आधी न पाहिलेल्या व्यक्ती, शब्द, देखावे ई. दिसणे.. याला बरेच लोक सिक्स्थ सेंस (अतींद्रीय ज्ञान) म्हणतात, तर वैज्ञानिक, वा मानसशास्त्र तज्ञ याला प्रकाश-ध्वनी-लहरींचे चित्रखेळ वगैरे असेही म्हणतात.. "मनी वसे ते स्वप्नी दिसे" असेही म्हणतात... तर "माझ्या ध्यानी मनी नव्हते आणि अचानक घडले" असेही आपण ऐकतो.
४. कधी कधी अशा जप जाप्य, ध्यान ई. चे अनेक वर्ष अनुभव असणार्‍या लोकांच्या कडून अनेक गोष्टी ऐकतो- हा त्या व्यक्तीचा अनुभव असल्याने आपल्या पुरता "कही सुनी" असली तरी त्या व्यक्तीपुरता तो अनुभव "सत्य" असतो असे म्हणावे लागते. गंमत म्हणजे कधी काळाने "अरे मलाही अगदी असाच अनुभव जवळपास आला" असे म्हणणारा कुणी भेटला की त्याच अनुभवाची सत्यता अधिक भासू लागते. थोडक्यात जे मी अनुभवले तेच दुसर्‍याने देखिल अनुभवले असेल तर नक्कीच या मागे काहीतरी दडलेले आहे एव्हडा एक निश्कर्ष काढायला वाव असतो.
५. गर्भसंस्कार हा खरे तर हिंदू धर्मातील एक महत्वाचा संस्कार मानला जातो. आम्ही देखिल गंमत म्हणून बायको गर्भवती होती तेव्हा डॉ. बालाजी तांबे यांची "गर्भसंस्कार" ध्वनिफीत ऐकणे, किंव्वा मुद्दामून काही मंत्र, स्तोत्रे, ई. रोज म्हणणे ईत्यादी (मुख्यत्वे बायकोने) नेमाने करून बघितले होते. सर्वच तपशील ईथे बारकाव्यांसकट देता येणार नाहीत पण काही काही अनुभव अक्षरश: गर्भसंस्काराचे पुरावे म्हणून ठरतील ईतके स्पष्ट आले तर काही संबंध लावायचा ठरवला तर लागेलही असेही आले..

माझ्या एका मित्राला छान सवय आहे - तो असे अनुभव लिहून काढतो- जसे स्वप्नात, किंवा ध्यान करताना काय दिसले, अनुभवले.. काळाच्या ओघात कधितरी काही प्रसंग असे घडतात की आधी जे दिसले असते, अनुभवले असते त्याच्याशी एक "लिंक" जोडता येते. जसे आपण रोज डायरी लिहीतो तसे गंमत म्हणून असे अनुभवही लिहून पहायला हरकत नाही. कारण जोपर्यंत एखादी गोष्ट घडत नाही तोपर्यंत तो अनुभव निव्वळ कागदावरच असतो पण आधीच लिहून ठेवलेल्या अनुभवानुसार भविष्यत गोष्ट घडली तर मात्र दोन्ही तपासूण पहाणे रोमांचकारी असेल.

असो. तर एकंदरीत जप जाप्य, ध्यान धारणा ई. ने तुमची शरीर ईंद्रीये अधिक सूक्ष्म होतात असे वैज्ञानिक प्रयोग वा निश्कर्षही काढलेले वाचलेले आहेत. अशा जप जाप्य, ध्यान धारणेतून मन प्रसन्न रहाणे, शांतचित्त, एकाग्रता वाढणे, वगैरे अनुभवास येते असेही आपण ऐकतो. एव्हडेच काय आजकालचे आधुनिक योगा गुरू, मॅनेजेमेंट गुरू, हे देखिल अनेक पुस्तकातून तुम्हाला ध्यानधारणा वगैरेचे महत्व आजच्या टेक्निकल वा मॅनेजेमेंट भाषेतून सांगताना अगदी ढीगाने मिळतील. बहुतांशी लोक त्यातून छान व्यावसायिक धंदा करून घेतात तर काही जणांना खरेच स्वताच्या अनुभवातून दुसर्‍यालाही काहितरी फायद्याचे द्यायचे असते (ही जमात आता नामशेष होत आहे!).

शेवटी "असुरक्षितता" हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि त्या अनुशंगाने "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" असे म्हणणारा एखादा आपल्याला देवासमान भासतो हेही खरेच. किंवा काहीच ऊपाय चालेनासे झाले की आपसूक देवाचा धावा करणारे अगदी निष्णात डॉक्टरही पाहिले आहेत. जन्मलेल्या जीवाला "मृत्त्यू" हेच अंतीम सत्त्य आहे हे अगदी सर्व धर्मग्रंथ, संत वांगमय ई. मध्ये ठासून सांगितलेले असले तरीही ऊभा जन्म बहुतांशी सर्वांची धडपड ही तो मृत्त्यू टाळणे यासाठी असते हीच खरी गंमत आहे आणि मग त्या प्रवासात असे जप जाप्य, ध्यान धारणा ई. चे वाटाडे भेटतात. काही तुम्हाला मार्ग दाखवतात तर काही तुम्हाला लुबाडतात- शेवटी जसा ज्याचा अनुभव तशी त्याची धारणा/विचार प्रक्रीया घडत जाते आणि मग पुढील धोरणे देखिल त्यानुसारच बनतात.
"हर फिक्रको धुवे मे ऊडाता चला गया" हे रंगीत पडद्यावरच बघायला छान वाटते.. Happy

ज्या समर्थांनी निर्मनुष्य जंगलातून कठोर तप केले त्याच समर्थांनी एक सोप्पा ऊपायही सांगून ठेवलायः

"मन करा रे प्रसन्न, सर्व सिध्दींचे कारण"

पण अगदी हे देखिल आपल्याला जमत नाही हे सत्य आहे. मी कशाने प्रसन्न असतो याचा शोध संपत नाही. मुन्नी बदनाम हुवी किंवा शीला की जवानी बघून मिळणारी क्षणिक प्रसन्नता समर्थांना अपेक्षीत नाहीच. आणि चिरकाल टिकणारी प्रसन्नता कशात आहे याचे ऊत्तर माहित असले तरी ती मिळवेपर्यंत वा त्या मार्गाने चालेपर्यंत सर्व क्षणिक सुखे ऊपभोगण्याच्या शर्यतीत आयुष्य संपते. तुमच्याजवळ जितके कमी, थोडक्यात जितका कमी पसारा तितके तुम्ही सुखी अशीही एक धारणा आहे.
ईथे आमच्या आजीची फार आठवण येते. १० मुले, आजोबांचा थोडा पगार, त्यांची फिरतीची नोकरी, खडतर आयुष्य... पण वयाच्या ८५ व्या वर्षी ती स्वताच्या हाताने शेवया करून विकत असे, पैसे हवे म्हणून नव्हे तर काहितरी ऊद्योग हवा आणि विकतच्या शेवयांची खीर खावत नाही म्हणून ईतरांनाही स्वता: घरी बनवलेल्या शेवया करून देणे. अक्षरश: दिवसभर तो सर्व राम रगाडा आटोपून जेमेतेम ४-५ किलो शेवया बनवल्यावर निव्वळ २० रू किलो ने विकल्यावर आलेल्या रकमेतून नांतवंडांना गोळ्या, बिस्कीटे देणे, मंदीरातून दानपेटीत पैसे टाकणे, हे सर्व करताना चेहेर्‍यावर कायम हसू आणि आनंद. शेवयावाल्या आजी "गेल्या" म्हणून बायका हळहळल्या. पण मनाने कायम प्रसन्न असलेली आजी अगदी बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्याच्या निमीत्ताने गेली. बाकी कुठलाच रोग तिला कधीच शिवला नाही.. समर्थांचे वाक्य ती असे सिध्द करून गेली.

एरवी मुंबईच्या कोलाहलात स्वता:चाही आवाज न ऐकू येणारा मनुष्य जेव्हा कधी बाहेरच्या प्रदेशात जातो- जिथे एक छोटासाच पण टुमदार निसर्ग एव्हडेच त्याच्या सोबतीला असतो तिथे मग अगदी सूर्योदय वा सूर्यास्ताच्या वेळी पाखरांची, पक्षांची किलबील, एखाद्या मंद वाहणार्‍या झर्‍याचे पाणी, सागराची गाज, ऊंच डोंगरावरील एखाद्या टेकडीवरून अनुभवलेला वारा, एखाद्या दरीतून ऐकू येणारा नाद, किंवा निव्वळ निरभ्र आणि टीपूर चांदण्याने भरलेल्या आकाशाखाली निवांत पहुडताना झालेला संवाद... अशा ठिकाणी अशा वेळी देखिल रूढ अर्थाने कुठलाही जप, ध्यान न करता कुठल्यातरी सुकून, आत्मशांती देणार्‍या शक्तिशी तादात्म्य झाल्याचा अनुभव आपण घेत असतो. काहींसाठी ती एक प्रेरणा ठरते- कविता, कथा, चित्र या रूपातून ती प्रकट होते, काहींना त्यातूनही सगुण निर्गुण भक्तीची गोम ऊकलते- "रुणुझुणु रुणुझुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा..."
सर्वव्यापी असे ते जे काही आहे (काही म्हणा न्युटन बाबा ची ऊर्जा, किंवा अणू रेणू परमाणू, प्रकाश वा ध्वनी लहरी, ऊर्जा, वा अज्ञात शक्ती, ई. ) त्याचा आपण किती सूक्ष अंश आहोत याचा स्पष्ट पुरावा व अनुभव दोन्ही एकाच वेळी या अशा ठिकाणांतून मिळत असतो.

द्वैत, अद्वैत, कोहं वगैरे असल्या अध्यात्मिक, आदीभौतीक वगैरे वादात न शिरता एक नमूद करावेसे वाटते की स्व. किशोरदांची गाणी ऐकताना ध्यान लागते, एक स्वता:शीच संवाद झाल्याचा अनुभव येतो, त्यातही संगीत पंचम चे असेल, तर ते वर ऊल्लेखलेले ज्योत, बिंदू, शून्य, ई. सर्व सर्व आपसूक सर्वच कसे मस्त एकाच जागी गवसते- मग मी त्या सर्वाच्या मधला एक सूक्ष्म बिंदू होवून त्या ध्वनिलहरींचा अनाहत नाद ऐकत पुढील प्रवास करत रहातो-
"खुश रहो एहेले वतन हम तो सफर करते है".........

ता.क.:
प्रजापिता ब्रह्मकुमारी, आर्ट ऑफ लिव्हींग, ऑरोबिंदो (योगी ऑरोबिंदो), हरे कृष्ण हरे राम, मनःशक्ती, विपश्यना, अशा अनेक समूह, पंथांचे जवळून अनुभव आहेत. त्यांच्या जप, ध्यान, योगा ईं. चे आधुनिक युगातील प्रकटीकरण, क्वचित "मार्केटींग" हेही जवळून पाहिले आहे. याखेरीज महाराष्ट्राच्या मातीतील सर्व संत समूदाय परिवारांचा अनुभव घेतला आहे. त्यामूळे एकंदरीत अनेक गोष्टी अनेक प्रकारातून अनेक कोनातून व विविध चष्म्यातून पाहिल्या आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नयेत. "गूढ, कुतूहल" कायम आहेच.. आणि वरील सर्व लिहीताना कुठलीच लाज वा तमा वाटत नाही कारण ते सर्व माझ्यापुरते आपापल्या परीने माझ्या आयुष्यात काही ना काही उपयुक्त भर घालणारे घटक/अनुभव आहेत हे निश्चीत. त्यातल्या "वाईट" गोष्टीच घेवून चर्चा करण्यात मला रस नाही- तरिही एकंदरीत अश्या गूढ व रोमांचक अनुभवांबद्दल कुतुहल असणार्‍यांनी खालील पुस्तके जरूर वाचावीतः

१. The monk who sold his ferrari.. या रॉबीन महाशयांच्या अलिकडील दुबई मधील "सेशन" ऐकायचा योग आला होता. गंमत वाटली. एरवी ज्या गोष्टी आपले आई वडील, वा साधू सज्जन आपल्या भल्या साठी सांगतात त्याच गोष्टि मात्र रॉबीन साहेबांच्या "मिठ्ठास" बिझिनेस भाषेतून ऐकायला अक्षरशः हजारोने पैसे देवून लोक आले होते Happy पुस्तक छान आहे. बरेच लोकं या पुस्तकाला so the monk who had first bought the ferrari? असेही म्हणतात Happy
http://www.amazon.com/The-Monk-Who-Sold-Ferrari/dp/0062515675
२. The messages from the Masters- अनेक ऊपखंड आहेत. पूर्वजन्म, आठवणी, कर्म-क्रीयमाण, पुनर्जन्म, याबद्दल फ्लोरीडामधिल प्रख्ख्यात डॉ. ब्रायन वेस यांचे एकंदर अनुभव, प्रयोग, विचारसरणी, सर्वच "भन्नाट" आहे. ब्रायन वेस हे नाव माहित नसेल तर गुगलून पहा. http://www.amazon.com/Messages-Masters-Tapping-into-Power/dp/0446676926
३. Silvercrest of Himalayas (मला वाटते याचे मराठी भाषांतर देखिल आहे: साद देती हिमशिखरे). एक प्रशासकीय सेवेतील अधिकारी प्रधान यांना हिमालयात भेटलेल्या गुरूंचे व त्या अनुशंगाने लिहीलेले काही रोमांचक अनुभव व विश्लेषण यात आहे.
http://books.sulekha.com/book/towards-the-silver-crests-of-the-himalayas...

४. ईतर पुस्तकेही आहेत... जमलेच तर नंतर यादी देईन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थेट मांडलय जे काही वाटतं ते, म्हणून लेख आवडला..
मला वाटतं तुम्ही कुठलंही पुस्तक वाचता तेव्हा तुम्ही स्वतः कसे आहात, त्यावरुन तुम्ही त्यातल्या गोष्टीशी समरस होता (अथवा होत नाही). ह्यालाच आपण आवड किंवा निवड म्हणतो. व्यक्तिपरत्त्वे आणि एकच व्यक्तिअसेल तर स्थिती/कालापरत्वे ही आवड बदलते. धार्मिक पुस्तकांबद्दल हे विशेष जाणवतं. पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला 'साद देती हिमशिखरे' भावलं नव्हतं पण मग काही काळाने ते पुस्तक परत हातात आलं आणि प्र चं ड भिनलं/ भिडलं.
दिव्यस्पर्श हे अजून एक चांगलं पुस्तक. नर्मदा परिक्रमेवर कुंटेव्यतिरीक्त अजून एक-दोन चांगली पुस्तके आहेत. कुंटेचं लिखाण पण जबरदस्त आहे असं ऐकतो (मी वाचलेलं नाही अजून).
शब्द, त्यांचे उचार ह्यात सामर्थ्य आहे ह्यावर ज्याचा विश्व्वस असेल त्यालाच जप, मंत्र, स्तोत्र ह्यांचे महत्त्व कळू शकेल.

>>मी रेकीच्या धाग्यावर त्याबद्दल लिहल आहे.
ओह... वाचल्याचे आठवत नाहीये... पहातो.

>>कर्मयोगी साधक्! प्रकाशभाउ- आणि मंदाताई आमटे आमच्या घरी दोन्-तीन दिवस रहायला होत्या. त्या दोघांचा परंपारिक देव या संकल्पनेवर विश्वास आहे के नाही ठाउक नाही (नसावा असा माझा अंदाज आहे) पण त्यांच्या कार्याचा अवाका, त्यांची कामावरची अढळ निष्ठा, आणि कसलाही आव नसलेली कामातली सहजता बघून divinity divinity म्हणतात ती हीच याची जबरदस्त अनुभुती मला आणि नवर्‍याला आली.

निश्चीतच! अशा लोकांचा अगदी थोडासा सहवास देखिल आपल्याला एक वेगळी दिशा व स्पष्ट दृष्टी अन व्यापक दृष्टिकोन देतो.

>>
मूळ लेख (इंग्रजी दुवा) लांबलचक आहे, तरीपण वाचून पहावा असं सुचवेन. Western Classics आणि Indian Clssics यांचं तौलनिक स्थान नेमक्या शब्दांत मांडलं आहे.

बापरे... फराच मोठं पुराण आहे वेळ काढूनच वाचावे लागेल.. लिंक दिल्याबद्दल आभारी!

तरिही इथवर आलो आणि मुद्दे बरेचसे पटण्यासारखे आहेत हे जाणवले.. :
>>Furthermore, Greek thought is referenced as being of Greek origin, whereas, when Indian ideas are appropriated, their Indian origin is erased over time: real knowledge is implied to come only from Western sources; all others must wait till they get legitimized by being claimed as Western. This is because the knowledge representation system is under Western control, and hence they are the final arbiters of “what” belongs “where.” Only when something falls under Western control does it become legitimate.

Pages