ओळखा पाहू : हे वाक्य / उतारा कुठल्या पुस्तकातला आहे ?

Submitted by विस्मया on 18 March, 2012 - 03:33

एक खेळ खेळूयात का ?
खेळाचा उद्देश हसत खेळत मराठी पुस्तकांची माहिती शेअर करणे हा आहे. इथं गाजलेल्या मराठी पुस्तकातील एखादं वाक्य / उतारा द्यायचा आणि तो इतरांनी ओळखून दाखवायचा. उत्तर देतानाच त्या पुस्तकाची थोडक्यात माहिती, त्या पुस्तकासंबंधी असलेली एखादी आठवण द्यायची.

लक्षात असू द्या.

१. आपण देणार असलेलं वाक्य / उतारा शक्यतो अगदीच अडगळीत गेलेल्या अपरिचित पुस्तकातून देऊ नये.
२. कुणालाच उत्तर न आल्यास प्रश्नकर्त्याने खूप ताणून न धरता उत्तर द्यावे.
३. इथं मराठी भाषेतल्याच पुस्तकांतील उतारे अपेक्षित आहेत.
४. पुस्तकरूपाने प्रकाशित झालेल्या सिनेमा / नाटकातील उतारेही चालतील.
५. आपण जर एक दोन ओळी देणार असू तर त्या ओळखता येतील याची खात्री हवी. थोडक्यात त्या गाजलेल्या हव्यात, त्यातून लेखकाची शैली दिसून यायला हवी. अशी खात्री वाटत नसेल तर एक गंमतीदार क्ल्यु द्यावा. या क्ल्यु मुळे खेळाची रंगत वाढायला मदत होईल. थोडक्यात काय, वाक्य ओळखलं गेलं नाही तरी हा क्ल्यु लक्षात रहावा.
६. उतारे दिले तर ओळखायला सोपं जातं. याचाही विचार व्हावा.

उदा : आठवणी हत्तीच्या पायांनी येतात. खूप खोलवर आपला ठसा उमटवून जातात.

उत्तर - श्री शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय या गाजलेल्या पुस्तकातील हे वाक्य. त्या वेळी घराघरातून हे पुस्तक रामायण-महाभारतच्या जोडीने असायचं. भारतातल्या अनेक भाषांमधे ही कादंबरी अनुवादित झाली. लहानपणी भाषा समृद्ध करणारी एक संस्कारक्षम कादंबरी म्हणून तिचं मराठी भाषिकांमधलं स्थान अबाधित राहणार असं वाटतं.

उत्तर आलंच पाहिजे हा खेळाचा हेतू नाही. खूप दिवसांपूर्वी वाचनात आलेल्या चांगल्या साहीत्यकॄती या निमित्ताने एकमेकांत शेअर केल्या जातील, कुणासाठी ती वाचायची राहून गेली असल्यास एक रिमांईडर म्हणूनही उपयोग होईल.. आणि खेळ तर आहेच !!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे जरा कठीण आहे, पण बघा कोणी वाचलंय का ते ...
"
आम्ही आमची गाडी गल्लीत घातली, तशी चालीको झ्याला म्हणाला, "झ्या ! तुम्ही म्हणाला तसं झालं. ती तुमची चटणी तमाम रोगांवर इलाज आहे."
"तमाम रोगांवर !", झ्या डोळे मिचकावीत बोलला, "तमाम रोगांवर ! ... फक्त इष्काचा रोग सोडून !"
"त्याच्यावर काय इलाज, झ्या ?" मी विचारलं.
झ्या नं आपल्या पांढर्‍या मिशांचे आकडे वळविले आणि तो उद्गारला, "त्या रोगावर इलाज? एक म्हणजे मरण, नाहीतर दुसरा इलाज म्हणजे दुसरा अधिक सुंदर मुखडा !"

"
टीपः पु.लं. नी अनुवाद केलेल्या एका पुस्तकामधून. [अनुवादीत पुस्तके इथे चालावीत, अशी भा.अ.]

वैनिल

आता पाहिली ही पोस्ट...

एका कोळियाने मधून दिलाय का उतारा ?
माझ्या लक्षात नाही..

नाही, यु.गा. 'काय वाट्टेल ते होईल' ह्या पुस्तकामधला हा उतारा आहे.
'Anything can happen' by George Papashvily and Helen Papashvily चा अनुवाद आहे. जॉर्जियामधून अमेरीकेत नशीब काढायला आलेल्या एका अवलियाची गोष्ट आहे ही, त्यानेच सांगितलेली.
[http://www.goodreads.com/book/show/1716402.Anything_Can_Happen]

अगदी सोपं वाक्य आहे, बहुतेकांना आठवायलाच हवं...

पंचापांडू – सह्यादांडू – सप्तपोपडे – अष्ट जिंकिले – नऊनऊ किल्ले – दश्शा पेडा – अकलकराठा बाळू मराठा – तिरंगी सोटा – चौदा लंगोटा – पंधराशी परिवळ – सोळी घरिवल – सतरम सीते – अठरम गरुडे – एकोणीस च्यकच्यक – वीसा पकपक – एकवीस कात्री – बावीस रात्री – तेवीस त्रिकाम फुल – चोवीस चोर – पंचवीस मोर

शारदा संगीत. 'परचक्र' का काहीतरी नावाची कथा आहे ना ती? तो बंक्या हा मंत्र शिकवतो लंपनला.

Happy

शुद्ध प्रेम फलस्वरूप आहे --जशी चंदनाची झाडे .त्यांना फळे न येताही त्यांचे जीवन कृतार्थ झाले.प्रेमाचे तसे आहे.त्याला काहीही मिळवायचे नाही; काही लब्धव्य,प्राप्तव्य नाही.नारदांनी प्रेमाचे वर्णन 'फलरुपत्वात' असे केले आहे.ही प्रेमभावना मानवी मनास षोडशकलांनी उदय पावली, की ते अमृतस्वरूप, तृप्त अणि मत्त होते.द्वेष मागे थांबतो, असुयेचा संबंध संपतो.

दोस्तांनो

खेळाची रंगत वाढावी म्हणून मुख्य पोस्ट संपादीत केली आहे. खेळाच्या मार्गदर्शक तत्वांमधे काही वाढीव मुद्दे टाकले आहेत. अनु. क्र. ५ आणि ६ मुळे खेळ रंजक होईल अशी आशा आहे....

गहीनीनाथांच्या गुहेत दृष्टी अंर्तमुख करुन निवृत्ती योग समाधी लावून बसला होता. त्याच्या मिटल्या डोळ्यासमोर अवघ्या विश्वाचा पट उलघडत होता, एकाद्या दुरवरच्या ग्रहावरचे व्यापार पहावेत तसे अंर्तचक्षुने सगळ्या विश्वाची उलथापालथ तो बसल्या जागी पहात होता. पहाता पहाता त्याला डोळ्यासमोर प्रयागतिर्थ दिसू लागले.
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।।
हा श्लोक त्याच्या कानी पडला, सखोल पहाता एका उंच दरडीवर एक स्त्री आणि पुरुष हात जोडून उभे होते. त्यानी आपले नेत्र मिटले आणि आपले देह त्रिवेणी संगमात फेकून दिले...................

ओळखा? फार कठीण नाही.

शंकराच्या पिंडीवर खेळायची उंदीर-जमातीला हौसच असावी. आम्ही पुजारीमहाराजांना विचारल्यावर त्यांनी प्रसन्न मुद्रेने आम्हाला सांगितले, " जिथं मंदीर तिथं उंदीर आहेतच !" आणि आपल्या विनोदावर ते ज्या कोडगेपणाने हसले त्याला तोड नव्हती. आम्ही काही ठेवावे अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली. मी देखील , " शंकरापुढे आम्ही काय ठेवणार ? नर्मदेतले कंकर ? " असे म्हणून त्याला यमकात मारले होते. तरीही आम्ही त्याला एखादी दूध लोटी पिलवून द्यावीच अशी मांग त्याने केलीच. हे सारे किती किळसवाणे असते. पण ते तसे नसावे. मंदीरातले उंदीर आम्हालाच कुरतडून जातात.

पंचापांडू – सह्यादांडू – सप्तपोपडे

>>> येथे उल्लेख केलेली कथा परचक्र मी वाचलेली नाही पण हा मंत्र नसून विटीदांडूच्या खेळातील काउन्टिंग (गणती ) आहे. लहानपणी विटीदांडू खेळताना आम्ही हे म्हनायचो.
मात्र त्याची सुरुवात पुढीलप्रमाणे आहे.
'एकलम खाजे, दुब्बी राजे , तिरान भोजे,चौथा काजे, पंचा पांडव, सह्यादान्डू, सप्तकटिले, अष्ट जिंकिले, नम नम कुल्ले , दश्शा गुलामा, असं आम्ही म्हणायचो... पुढचे आठवत नव्हते.

मूठभर माती भाजून पृथ्वी पवित्र होत नाही की ओंजळभर पाणी उकळून महासागर शुद्ध होत नाहीत....
(नाटकातला संवाद आहे.)

मूठभर माती भाजून पृथ्वी पवित्र होत नाही की ओंजळभर पाणी उकळून महासागर शुद्ध होत नाहीत....

बाजो, हे वाक्य वसंत कानेटकरांच्या ' अश्रुंची झाली फुले ' या नाटकातील आहे.

हे ओळखण्यासाठी अगदी सोपे आहे, पण त्याच बरोबर अनुभवण्यासाठी सुद्धा आहे -

"दाण्डेकरजी, एक सवाल पूछूं? "
"जी हाँ, विना संकोचके !"
"आप दुर्गभरे देशसे आ रहे है | यह हमारा किला भी आपने देखा | क्या इनकी तुलना कर सकेंगे ?"
"क्यॉं नही ?"
"तब फिर शुरु किजीये |"
"पहले आपके इस किलेके बारेमें बताऊं | जैसे कोई अमीर - हाथों में चमेली की मालाएं पहने, आँखोंमें सुरमा लगाए, तकियेसे सटकर किसी तवायफ का मदभरा गाना सुनने बैठा हो - आपका किला वैसा सुहावना है |"
प्रसन्न होऊन तो म्हणाला, "क्या कही दाण्डेकरजी | वाकई आप उपन्यासकार है | जी, अब इसके साथ आपके किलोंके बारे में ..."
त्याला थांबवत म्हटलं, "अजी जाने दीजिये, मेरे देशके किलोंकी तुलना इस लाल किलेके साथ नही की जा सकती |"
"भई, क्यों?"
"सारे बदन में अरंडीका तेल लगाये कोई दो तगडे मल्ल, हाथमें वज्रमुष्टी लिये, एक-एक के साथ जूंझ रहे हो, सारा बदन लहू-लुहान हो गया हो, मेरे देशके गिरीदुर्ग देखने पर इस दृश्य का ही स्मरण होता है |"

नाही. वैनिल आणि मास्तुरे.
वरील उतारा पद्माकर गोवइकर यांच्या "मुंगी उडाली आकाशी" या कादंबरीतील आहे.एकदा वाचावे असे अप्रतिम पुस्तक आहे हे.
ऑनलाईन वाचण्यासाठी इथे पहा

<<<शुद्ध प्रेम फलस्वरूप आहे --जशी चंदनाची झाडे....>>>>

गोनिदांच्या ’शितू’ या कादंबरीला त्यांनीच लिहीलेल्या प्रस्तावनेतील वाक्य आहे हे Happy

@महेश- 'स्वामी'
हे सांगा- डोक्यावरच्या माश्या वारायचा त्याने खूप प्रयत्न केला पण त्या त्याच्याबरोबर येतच राहील्या, तो जिथे लोक आहेत, घाण आहे तिथे चालला होता हे त्यांना कळले होते.

Pages