हा चित्रपट अमिताबच्चन आणि शशीकपूर यांच्या बालपणापासून सुरू होत नाही. पहिल्याच सीनमध्ये ते थेट मोठेच्यामोठे आणि कामाला लागलेले दिसतात. खरंतर चित्रपटातली सगळी परिस्थिती 'निरुपा इन व्हाईट सारी'ला इतकी अनुकूल आहे की, तिची उणीव फार जाणवली. तर ते असो.
तर पहिलंच दृश्य कोर्टाच्या आवारातलं. मुस्लिम अमिताभ आणि हिंदू शशी हे दोघं तिथे खोट्या साक्षी देण्याचा उद्योग चालवत असतात. उद्योगातले एम्प्लॉयी हे दोघंच. दोघंही खाऊनपिऊन सुखी दिसतात तेव्हा उत्पन्न चांगलं असावं पण एवढ्या खटल्यांमध्ये हेच दोघं वारंवार साक्ष देताना दिसतायत, हे जज्ज वा विरुद्ध पार्टीचा वकील वा इतर कुणालाच खटकत नाही. तसंच, नमुना म्हणून दोघांची एक-एक साक्ष दाखवली गेली आहे, त्यात शशी साक्षीसाठी जाताना उगीचच एका माणसाच्या कुबड्या घेऊन जातो. त्या कुबड्यांमुळे बहुधा आपण ओळखू येणार नाही, अशी त्याची समजूत असावी. (बेमालूम वेषांतर..!) मग तो गीतेवर हात ठेवून खोटी शपथ घेऊन खोटी साक्ष देतो. तिकडे अमिताभपण कुराणावर हात ठेवून खोटी शपथ घेऊन खोटी साक्ष देतो. यांच्या खोट्या साक्षींमध्ये इतकी ताकद असते की, खटल्याचं पारडं तात्काळ यांच्या बाजूने फिरतं.
संध्याकाळी मग ते कामं आटपली की सहसा वस्तीत राहणार्या हंगलमास्तरांकडे वाईच टेकायला म्हणून येत असतात. हंगलमास्तरांना पुस्तक वाचायची आणि वाचनात मध्ये व्यत्यय आला की, हाताला लागेल ती चपटी वस्तू पुस्तकात खूण म्हणून घालायची सवय असते. मास्तरांची मुलगी श्यामली ही आंधळी असते. तिच्यासाठी ते दोघं साक्षीच्या खोट्या कमाईतून टेपरेकॉर्डर घेऊन येतात. आता आणलाच आहे तर वापरला जावा, ह्या हेतूपायी तिचं गाण्याच्या कार्यक्रमात सिलेक्शन होत नाही आणि हे दोघं तिला वस्तुस्थिती न सांगता, रिकाम्या ऑडिटोरियमात तिच्या गाण्यांचा कार्यक्रम करतात. तिथे टाळ्यांचा कडकडाट ऐकवायला तो टेप वापरतात. एवढ्या हौसेने आणलेल्या टेपचा सकृत्याला वापर झाला म्हणून आपल्यालाही बरं वाटतं.
श्यामलीला एक बॉयफ्रेंड असतो. संजीवकुमार. त्याचे वडील मोठे उद्योगपती+धनाढ्य+तस्कर+पैशाला चटावलेला माणूस+मुलाची काळजी वाटणारा बाप असतात. त्यांच्या गटात रणजीत असे नाव असलेला प्रेम चोप्रा(निरुपाबाईंप्रमाणेच रणजीतचीही उणीव भासू शकली असती, ती प्रेम चोप्राचे नाव रणजीत ठेवून अंशतः दूर केली आहे), म्हातार्या माणसाचा विग लावलेला पण चेहर्याने तरुण दिसणारा अमरीश पुरी, इत्यादी मंडळी असतात. वडील असे असल्याने मुलगा एकदम निरिच्छ आणि दुसरं टोक असतो. हंगलमास्तरांच्या मुलीशीच तो सूत जुळवतो यावरून त्याच्या सच्छीलतेची खात्री पटते. तसंच, त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो सगळे धर्म पाळत असतो. त्याच्या खोलीत एका ओळीत सगळे धर्मग्रंथ आणि क्रॉस वगैरे पवित्र गोष्टी ठेवलेल्या असतात.
इकडे बांधकामावर काम करणार्या तामीळ रेखाबाई मराठी श्रीराम लागूंना भाऊ आणि उत्तरभारतीय शशीकपूरला बॉयफ्रेंड मानतात. तिकडे ख्रिश्चन हेलन आपण खरा काय उद्योगधंदा करतो हे आपल्या निरागस मुलीला कळू नये आणि तिची वडिलांना भेटायची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मुस्लिम अमिताभला तिचा औटघटकेचा, खोटा खोटा नवरा होण्याची गळ घालते मग शिखांचा रिप्रेझेंटेटिव्ह असावा म्हणून संजीव कपूरचा माजी सैनिक असणारा दोस्त म्हणून उत्पल दत्त येतो.
तर असं सगळं सुरळीत चालू असताना, कुरळ्या केसांचा भयंकर विग लावून चमत्कारिक दिसणारा शेट्टी श्यामलीला पळवून नेऊन अतिप्रसंग करू पाहतो. तेव्हा इतर लोकांमुळे ती वाचते आणि झटापटीत त्याच्या पांढर्या कोटाचा खिसा ओरबाडून फाडून काढते. तो खिशाचा तुकडा कुणीतरी तिच्याच बॅगेत टाकतं आणि हंगलमास्तर तो तुकडा नेहमीप्रमाणे खूण म्हणून गीतेत घालून टाकतात.
इकडे कुठल्याकी कारणामुळे संजीवकुमारचे वडील बाकी ग्यांगला नकोसे होतात आणि त्यांना मारण्यासाठी ते शेट्टीलाच सुपारी देतात. शेट्टी त्यांना मारायला येताना तोच कोट घालून येतो (गरिबी फार वाईट! एवढ्या सुपार्या घेऊनही त्याच्याकडे एका नव्या कोटापुरतेही पैसे उरत नसतात. किंवा तो लकी कोट असेल..) पण त्याला त्याने लाल खिसा शिवून घेतलेला असतो. (त्याचा विग पाहून त्याला सौंदर्यदृष्टी नाही, हे आपल्याला आधीच कळलेलं असतं. त्यामुळे पांढर्या कोटाला लाल खिसा पाहून आपण चकित वा खिन्न होत नाही.) वडिलांना मरत असलेले पाहून संजीवकुमार धावत त्यांच्यापाशी येतो तेव्हा त्या लाल खिशाची प्रतिमा त्याच्या मनात पक्की बसते. ('जानी दुश्मन' इफेक्ट!) मग पोलिस येतात आणि जो कुणी प्रेतापाशी असेल आणि रक्तरंजित कपड्यांत असेल तोच खुनी, या तत्त्वानुसार संजीवकुमारला अटक करतात. बाकीची ग्यांग संजीवकुमारचा काटा निघावा आणि खटला आपल्या मनासारखा व्हावा म्हणून, अमिताभशशी याच शुभंकरांना (मॅस्कॉट!) खोटी साक्ष द्यायला बोलावते आणि हेही दोघे मस्तपैकी खोटी साक्ष देऊन येतात आणि घरी आल्यावर त्यांना हाच तो श्यामलीचा होणारा पती, हे शुभवर्तमान कळते. आता केलेल्या सगळ्या गोष्टी उलट करण्याची व खोटेपणाची वाट सोडून चांगली कामे करण्याची मोठीच जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडते.
शशीकपूरला लहानपणापासून एका मुस्लिम चाचांनी मुलासारखं सांभाळलेलं असतं. ते डबेवाले असतात. अतिआजारपण, अतिश्रम आणि भूक अशा तीन गोष्टींमुळे त्यांचं पोचवायचा डबा हातात असतानाच प्राणोत्क्रमण होतं. ते जाताजाता त्यांचं एक कुराण शशीला सांभाळून ठेवायला सांगून जातात. शशी त्यांच्या घरून ते कुराण लाल कापडात लपेटून नेत असताना पाऊस सुरू होतो आणि शशीच्या खिशाच्या तिथे कापडाचा लाल डाग पडतो. तोही तोच शर्ट घालून संजीवकुमारला भेटायला जातो. लगेच ट्यूब पेटून तो त्या माणसाबद्दल या दोघांना सांगतो आणि शेट्टी पकडला जातो.
दरम्यानच्या काळात ग्यांग गप्प बसलेली नसते. ती या तिघांच्या सुपार्या देते. पण इकडे या दोघांकडे आता कुराण व गीतेच्या प्रती असतात. रात्री गुंड या दोघांना मारायला येतात. गुंडाने हळूच दरवाजा उघडल्यावर मोठा टेबलफ्यान लावला असावा, तशी अमिताभने झोपताना समोर ठेवलेल्या कुराणाची पाने फडफडू लागतात. गुंड दार बंद करतो पण बहुधा फॅन चालूच ठेवतो कारण पाने उडतच राहतात. साहजिकच अमिताभला जाग येते आणि तो फाईट देऊन वाचतो. तिकडे शशी गीता(पुस्तक!) छातीवर घेऊन झोपलेला असतो, त्यामुळे गुंडाने चाकू मारल्यावर तो गीतेच्या पार जात नाही (चाकू 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि'ला अडला असेल काय?) आणि शशीही वाचतो. संजीवकुमारला मारायला आलेल्या माणसाला तो येशूचे वचन सांगून त्याचे मन पालटवतो.
ग्यांगचा बदला घेण्याचे अमिताभ आणि रेखाकडे काहीतरी तगडे कारण हवे म्हणून ग्यांगने बनवलेल्या नकली औषधाच्या इंजेक्शनामुळे हेलन मरते आणि ग्यांग बिल्डिंग बांधताना कमी दर्जाची सामग्री वापरायला भाग पाडते तेव्हा बिल्डिंग कोसळून रेखाचा मुकादम असलेला भाऊ मरतो.
शेवटच्या मारामारीला सगळ्या धर्मांचे, प्रांतांचे लोक एकत्र जमतात आणि नेहमीप्रमाणे जबर हाणाहाणी होते. फायनली, प्रेम चोप्राच्या हातात बंदूक आणि पर्यायाने सगळी परिस्थिती आलेली असतानाही हेलनच्या मुलीने आई गेल्यावर श्यामलीच्या गळ्यात घातलेला क्रॉस उन्हात लखलखतो आणि त्याने प्रेम चोप्रा विचलित झाल्याने अमिताभशशी चपळाई करून त्याच्यावर मात करतात.
अशाप्रकारे, अमिताभशशीला धर्मग्रंथांचे खरे महत्त्व कळाल्याने शेवटी सिनेमा संपतो.
भन्नाट आहे. गीता(पुस्तक!)
भन्नाट आहे.
गीता(पुस्तक!) छातीवर >>> यातील कंसातील कोटी निसटलेली नाही याची नोंद घ्यावी >>>
आधी एका चित्रपटात तसे झाले तर
आधी एका चित्रपटात तसे झाले तर त्याचे नाव नमक हराम ठेवावे लागले होते<<<<
फारेंडा, अमिताभसाठी हेलन आहे. ती मेल्यावर हाही शोलेप्रमाणे शेवटी मरतो का काय, अशी भीती वाटली कारण त्याने हेलनच्या मुलीची जबाबदारीही आधीच श्यामलीच्या गळ्यात (अक्षरशः! क्रॉसच्या रुपाने) घातली होती. पण तोही वाचला.
आधी एका चित्रपटात तसे झाले तर
आधी एका चित्रपटात तसे झाले तर त्याचे नाव नमक हराम ठेवावे लागले होते<<<<
फारएन्ड स्पेशल वाक्य आणि पूर्ण पोस्टही खासच.
म हा न! शशी-गीताचा भाग तर
म हा न! शशी-गीताचा भाग तर फारच वरचा झाला आहे. तुझ्या परीक्षणांमध्ये हे पहिल्या तीनांत असेल. (माझ्या दृष्टीने सर्वच परीक्षणांमध्ये हे पहिल्या तीनात असेल!)
फारेंडा, >>>>नमकहराम!
आधी एका चित्रपटात तसे झाले तर
आधी एका चित्रपटात तसे झाले तर त्याचे नाव नमक हराम ठेवावे लागले होते>>
त्याचा विग पाहून त्याला
त्याचा विग पाहून त्याला सौंदर्यदृष्टी नाही, हे आपल्याला आधीच कळलेलं असतं. त्यामुळे पांढर्या कोटाला लाल खिसा पाहून आपण चकित वा खिन्न होत नाही.) >>>>>जबरॅक्स! आत्ताच वाचलं!
तू असले चित्रपट निदान आठावड्यातून एकदा तरी बघचचच्च! रच्याक, तुझ्याकडे झी सिनेमा आहे का?
फारएन्डा
फारएन्डा
श्र, फारेण्डा ... केवळ
श्र, फारेण्डा ... केवळ अशक्य!!!
जहबहर्ही .............
जहबहर्ही .............
चाकू 'नैनं छिन्दन्ति
चाकू 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि'ला अडला असेल काय? >> :p
गीता(पुस्तक!) छातीवर >>> यातील कंसातील कोटी निसटलेली नाही याची नोंद घ्यावी >>
आधी एका चित्रपटात तसे झाले तर त्याचे नाव नमक हराम ठेवावे लागले होते >>
हे पोस्टर पहा संजीवकुमारला
हे पोस्टर पहा संजीवकुमारला ख्रिस्ताचा रिप्रेझेन्टेटीव्ह केले आहे.
<<चाकू 'नैनं छिन्दन्ति
<<चाकू 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि'ला अडला असेल का<<>>
हा सगळ्यात जबरा पंच बसला आहे........
जबरा लिहिले आहे......:P
जबरदस्त लिखाण. अतिशय आवडले.
जबरदस्त लिखाण. अतिशय आवडले.
किती घाण पोस्टर फारएण्ड भारी
किती घाण पोस्टर
फारएण्ड भारी
दुनियेचं भारी..
दुनियेचं भारी..
मस्त परीक्षण , एक नंबर
मस्त परीक्षण , एक नंबर
Pages