साक्षात्कार

Submitted by आनंदयात्री on 8 February, 2012 - 06:25

ऐकली माझी व्यथा, वरवर दिला आधार त्यांनी
आणि नंतर त्या व्यथेचा मांडला बाजार त्यांनी

सोबतीला मी स्वतःची सावली नेईन म्हणतो
छाटले आहेत सारे वृक्ष डेरेदार त्यांनी

राहत्या वस्तीत माझा छान पाहुणचार झाला
धाडली आमंत्रणे अन् बंद केले दार त्यांनी

आज माझे गीत इतके भावले नसते तुम्हाला
छेडली नसती कधी जर वेदनेची तार त्यांनी

आतमध्ये साचलेले कागदावर मांडले मी
ते कुठे कळले? जरी केली समीक्षा फार त्यांनी

साठले होते तरीही नितळ आणि निखळ होते
डोह करुनी टाकला माझ्या मनाचा पार त्यांनी

शब्द माझ्याशीच माझे वागले परक्याप्रमाणे
बोललो आभार, माझे मानले आभार त्यांनी!

तो म्हणाल्यावर निघाले पालखी घेऊन सारे
तो म्हणाला आणि केला सामुहिक धिक्कार त्यांनी

'मी खरा त्यांच्या कृपेने येथवर सुखरूप आलो'
घडवला सरणावरीही हाच साक्षात्कार त्यांनी

- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/02/blog-post_08.html)

गुलमोहर: 

ही गझल पाहून आम्हास हर्ष झाला. बरेच दशकांनी एक अशी गझल मिळाली जिच्यावर पोटभरून लिहिता येईल.

कवी आमचे जुने स्नेही आहेत त्यामुळे अधिक हर्ष होत आहे हे सांगणे न लगे

-----------------------------------------------------------------------------------------

ऐकली माझी व्यथा, वरवर दिला आधार त्यांनी
आणि नंतर त्या व्यथेचा मांडला बाजार त्यांनी

ऐकली या शब्दातून कवीला ती व्यथा त्याने इतरांना बोलून दाखवल्याचे नोंदवायचे आहे. जाणली माझी व्यथा यामध्ये कवीने न बोलून दाखवताही लोकांनी व्यथा जाणली असा अर्थ निघतो तर ऐकली मध्ये ऐकून घेतली, बोलत होता म्हणून ऐकली असे दोन अर्थ निघतात. यातील 'ऐकून घेण्याइतका खोटा पेशन्स दाखवला' असा अर्थ आम्हास अधिक आवडला. यात एक गंमत अशी की स्वल्पविरामाची जागा एक शब्द पुढे नेली तरी आणखीन मजा येत आहे असा अनुभव वाचकांस यावा. ऐकली माझी व्यथा वरवर, दिला आधार त्यांनी! मात्र असे केल्यास पुढील ओळ सक्षमपणे बसणार नाही म्हणून कवीने खुबीने तो स्वल्पविराम योग्य जागी पेरलेला आढळेल. पुढील ओळीतील 'आणि' आणि 'नंतर' या दोन शब्दांच्या सलग योजनेमुळे आमच्या मनात अनेक वर्षांपासून कवीबदल जो आदर होता त्याला किंचित छेद जातो की काय असे क्षणभर वाटले. म्हणजे आणि ऐवजी 'मात्र' का नाही,'फक्त' का नाही असे प्रश्न आमच्या मनःपटलावर अलगद उमटले. 'फक्त'या शब्दातून उपरोधही साधता आला असता. 'आणि' या शब्दामुळे कथानकाचे स्वरूप मतल्याला आले आहे असा अस्पष्ट संशय आम्ही या ठिकाणी व्यक्त करून पुढील शेराकडे वळतो. मात्र हेही नमुद करायला हवे की 'आणि' या शब्दामुळे प्रवाहीपणा वाढला आहे. गझल सहज उच्चारता येईल अशी शब्दयोजना करण्यात कवी पटाईत आहे.

सोबतीला मी स्वतःची सावली नेईन म्हणतो
छाटले आहेत सारे वृक्ष डेरेदार त्यांनी

पहिल्या ओळीत सत्तर ते ऐंशी टक्के शेर संपल्याची भावना निर्माण होत असली तरीही पहिली ओळ अत्युत्तम आहे. ती सहजही आहे व आशयाच्या सरीत मनमुराद भिजलेलीही आहे आणि मुख्य म्हणजे किती टक्के शेर संपला हे दुसरी ओळ वाचल्याशिवाय जाणवत नाही आहे. दुसरी ओळही अतिशय प्रवाही असून देखणीही आहे. कापले, तोडले यापेक्षा छाटलेमधून अधिक सशक्त व प्रभावी भावना निर्माण होताना दिसते. या शेरात 'नेणार आहे' ऐवजी 'नेईन म्हणतो' ही शब्दरचना आल्यामुळे शेर अधिक बोलका झालेला दिसतो. संवादात्मक वाटतो. येथे अस्पष्टपणे कवी स्वतःची तुलना काही प्रमाणात डेरेदार वृक्षांशीही करताना दिसतो. 'सारे' या शब्दाऐवजी 'बाकी' हा शब्द आला असता तर शेर अधिक अचूक झाला असता मात्र ते कवीला अभिप्रेत आहे किंवा नाही हे कवीच सांगू शकेल. जुन्या क्लासिक गझलांमध्ये शोभावा असा हा शेर आहे व सहज आहे.

राहत्या वस्तीत माझा छान पाहुणचार झाला
धाडली आमंत्रणे अन् बंद केले दार त्यांनी

राहत्या वस्तीत यातील राहत्या या शब्दाचा सिग्निफिकन्स नीटसा जाणवला नाही. मात्र या शेरातील खयाल जुना आहे. वस्ती, आमंत्रणे आणि दार बंद करणे एकाच शेरात आल्यामुळे भटांच्या गझलेची आठवण येणे अपरिहार्य आहे. ही तक्रार अर्थातच नाही, मात्र नमूद करण्याजोगी बाब निश्चीतच वाटली. हा शेरही उच्चारायला अतिशय सहज व देखणाही आहेच. याच कवीच्या चार गझला काल रात्री कुसुमाकर या मासिकात पुन्हा वाचल्या तेव्हा त्यातील एक गझल व दुसर्‍या गझलेतील दोन शेरांनी अतिशय भरून आले. मराठी गझलचा काफिला अशा हातांमध्ये राहिला तर ध्येयाकडे नक्कीच जाणार. त्यातील काही शेर येथे खासकरून नमूद करावेसे वाटले.
------------------------------------------------
दिशा दिशा जरी तमास शरण जाउ लागल्या
लपून राहिलेत आत कवडसे अजूनही

दिशा ढगाळताच मी तुझीच वाट पाहतो
नभात दाटतात रोज भरवसे अजूनही

कसली किंमत करता तुम्ही माझ्या या नात्याची
ऐपत नाही घेण्याची, देण्याची दानत नाही

रोज विचारू नका तुम्ही मज तिच्या उत्तराबद्दल
इच्छा मजला उरली नाही, तुमची संपत नाही

जे सुचते ते लिहून जातो, उलटत जातो पाने
जगल्याचे कुठलेच पुरावे मनात ठेवत नाही
----------------------------------------------

तर असे शेर रचणार्‍या कवीची ही गझल.

आज माझे गीत इतके भावले नसते तुम्हाला
छेडली नसती कधी जर वेदनेची तार त्यांनी

वेदनेची तार छेडणे ही नावीन्यपूर्ण कल्पना या शेराचे वैशिष्ट्य आहे. याही शेरातील खयाल जुना आहे की माझे वाईट झाले नसते तर तुमचे चांगले झाले नसते किंवा तुम्हाला चांगले वाटले नसते अशा स्वरुपाच्या विचारांची व्हर्जन्स.

आतमध्ये साचलेले कागदावर मांडले मी
ते कुठे कळले? जरी केली समीक्षा फार त्यांनी

येथे आम्हाला शालजोडीतला दिला आहे याची मनातच नोंद घेऊन आम्ही विवेचन करतो. हा शेर काहीसा सपाट आहे. यातील पहिली ओळ अतिशय सुंदर आहे. शेराची प्रकृती टीकात्मक आहे. टीकात्मक शेरांनी अनेक कवींच्या अनेक गझला सजलेल्या असतात. आम्हाला तरी त्यात काही गैर वाटत नाही. मधेच आलेल्या प्रश्नचिन्हामुळे पुण्यातील स्पीडब्रेकर्सची आठवण झाली. या शेरातील काफियाही जुना आहे. 'मी जे म्हणतो ते मनात साचलेले आहे हे त्यांना समजले नाही जरी त्यांनी समीक्षा खूप केली' अशा अर्थाचा हा शेर या गझलेच्या स्वभावप्रकृतीशी काहीसा अलाईन्ड असला तरी एकंदरीत फिका वाटत आहे.

साठले होते तरीही नितळ आणि निखळ होते
डोह करुनी टाकला माझ्या मनाचा पार त्यांनी

आम्हाला दुसर्‍या ओळीत मजा जाणवली. 'पार डोह करून टाकला' यातील पार या शब्दाचा अर्थ 'पूर्णपणे' असा होतो तर 'माझ्या मनाचा पार त्यांनी' यानुसार वाचल्यावर 'पार' या शब्दाचा दुसराही अर्थ जाणवतो तो म्हणजे झाडाचा जसा पार असतो तसा मनाचा पार! कवीने खुबीने केलेली ही शब्दरचना कोणालाही भावावी. डोह होणे व आधी मी नितळ व निरागस होतो हे म्हणणे हे जगात निष्पापतेची व निरागसतेची कशी हत्या केली जाते यावरचे भाष्य असून ते अजिबातच सपाट नाही. एखाद्याने असेही म्हंटले असते की मी आधी निरागस होतो पण आता तसा राहिलेलो नाही. मात्र कवी येथे उच्च रुपके वापरून हा संदेश देतानाच ती अनुभुती कवीची स्वतःची असूनही सार्वजनिक व व्यापक करताना दिसतो. पहिल्या ओळीतील गंमत वेगळीच आहे. मन साठले होते असे कवी म्हणत आहे. मनात काही साठले होते असे नव्हे तर मन साठले होते. ही वेगळीच कल्पना आहे. त्यापुढे हे साट्।अलेले मन निखळ आणि नितळ होते. निखळ या शब्दात प्रांजळता व सत्यता जाणवते तर नितळ या शब्दात पारदर्शकता व निरागसता. शब्दांच्या छटांची व अचूक अर्थाची योजना इतकी सुंदर करणे हे कवीला सहज जमलेले दिसते.

शब्द माझ्याशीच माझे वागले परक्याप्रमाणे
बोललो आभार, माझे मानले आभार त्यांनी!

उत्तम शेर. हा शेर वरवर वाचण्यासारखा नव्हे तर तीन चार वेळा स्वतःशीच गुणगुणायला हवा असा शेर. मी शब्दांचे आभार मानले कारण ते मला ऐनवेळी, अचूकपणे व योग्य जागी बसतील अशा शैलीने सुचले. तर शब्दही वेडे माझे आभारच मानत आहेत की त्यांची मला गरज भासली. गझल रचताना किंवा एकूणच आयुष्यात संवाद साधताना माझी आणि शब्दांची अशी घट्ट स्वरुपाची मैत्री झालीच नाही ज्यात मी हक्काने त्यांना सुचायला सांगावे आणि त्यांनी हक्काने माझ्याकडून खयाल मागवावेत. या शेरासाठी आम्ही उभे राहून वाहवा करत आहोत.

तो म्हणाल्यावर निघाले पालखी घेऊन सारे
तो म्हणाला आणि केला सामुहिक धिक्कार त्यांनी

प्रातिनिधिक व भटांसारखा शेर म्हणता येईल. हा सपाट शेर म्हणता यावा कारण यात अर्थ सरळ आहे व जो अर्थ कवीला अभिप्रेत आहे तोच व त्याच शब्दात त्याने नोंदवलेला आहे.

'मी खरा त्यांच्या कृपेने येथवर सुखरूप आलो'
घडवला सरणावरीही हाच साक्षात्कार त्यांनी

गझलेत अनेकदा कवीला शेवटचा शेर मरणावर घ्यावासा वाटतो यामागे एक मोठी कथा आहे. तूर्त हा शेर या गझलेत दुसरा शेर म्हणून आला असता तर कसा वाटला असता हे कल्पून पाहावेत. मुरब्बी रसिकाला काहीच वाटले नसते कारण सर्व शेर या स्वतंत्र कविता असतात. मात्र कवी स्वतःहून मरणाचा शेर शेवटी घेतो यामागे एक मानसशास्त्रीय कारणमीमांसा आहे. गझल रचताना अपार कष्ट पडतात. खयालांशी प्रामाणिक राहणे, खयाल उत्तमोत्तम रुपके व प्रतिमांमधून समोर आणणे, ते सुंदर व चित्ताकर्षक शब्दांनी नटवणे व एवढे सगळे करून ते गझलतंत्रात बसवणे यासाठी कवीला साधना करावी लागते. एखादी गझल समारोपाच्या वेळी कवीला त्या निर्मीतीबाबतचा तात्पुरता आनंद व समारोपाचे तापुरते दु:ख देऊन जाते. अशा वेळी कवी अनेकदा मुत्यूबाबत एखादा खयाल आपसूक मांडतो. याचा अर्थ असा नव्हे की तो खयाल अथवा तो शेर प्रामाणिक नसतो, पण तो कवीच्या गझलप्रेमामुळे आपोआप उतरतो. त्या गझलेच्या निर्मीतीपुरता झालेला विचार मंथनाचा मृत्यू अशा शेरांना कारणीभूत ठरवतो. नकळत कवी गझलेला एक कहाणी बनवून टाकतो, जिचा अंतही माणसाप्रमाणेच मृत्यूनेच होतो. अशी अनंत उदाहरणे मराठी गझलेत आहेत. आता या शेराबद्दलः या शेरातील खयालही जुना आहे. हा शेर भटांचा किंवा त्यांच्या शिष्योत्तमांचा आहे असेही वाटू शकेल. कवीचा हा शेर आम्हास रुचला नाही.

असो:

समीक्षा:

१. गझलनुसारे: ही गझल एक नॉस्टॅल्जिक अथवा क्लासिक प्रकारची गझल आहे. एका तरुण कवीने हे मुरलेले व अनेकांनी अनेकवेळा वाचलेले खयाल आपल्या शब्दात आपल्या चॉईसने गुंफलेले आहेत व सौंदर्यवान पद्धतीने सादर केलेले आहेत. या गझलेमुळे मराठी गझल एक पाऊल पुढे न जाता आहे तिथेच रेंगाळलेली दिसते व आपल्याच पाऊलखुणांवर भाळल्याप्रमाणे वागताना दिसते. एका गुरू ऐवजी दोन लघु ही सूट काही आता सूट म्हणता येत नाही. तो जमाना बाराव्या शतकातच गेला. पण पर्यायी शब्दांबाबत किती विचार झाला असावा ही शंका मात्र मनात येते. कोणत्याही युगात एका समाजाभिमुख कवीला येणार्‍या अनुभुतींचे स्वरुप मूलतः बरेचसे समान असू शकते हे दर्शवणारी गझल. ही गझल रुपाने टाळीची गझल आहे तर स्वभावाने टीकेची. तिच्यात प्रेमभावनेवर शेर नाही याचा अर्थ ती सामाजिक आहे असे मुळीच नाही. तिच्यातील विचार हे एकट्या कवीलाच नव्हे तर कोणालाही लागू होणारे असू शकतात. मात्र ही गझल या कवीची सिग्नेचर गझल ठरू शकत नाही हे तितकेच खरे. ही गझल सेकंड जनरेशनच्या गझलकारांची गझल वाटत राहते.

२. संवेदनशीलतेनुसारे: स्वतःची सावली, वेदनेची तार हे उल्लेख कवीचे अंतर्मुख होणे दर्शवत राहतात. अनेक कवी 'करायची म्हणून गझल करताना दिसतात' तसे या गझलेचे नाही हे अगदी ठळकपणे दिसत राहते. संवेदनशीलता बरीच असली तरी ही गझल एकांगी वाटते. एकाच व्यक्तीच्या भावना व त्याही साधारणपणे एक प्रकारचे नैराश्य हे वेगवेगळ्या पैलूंद्वारे दाखवले गेल्यासारखे वाटते. काही प्रमाणात गझलेह्या प्रवृत्तीसाठी ते ठीकही आहेच, पण गझलेच्या वैशिष्ट्यासाठी थोडे वेगळे विचार, वेगळ्या भावना आल्या असत्या तर संवेदनशीलतेचे परिमाण नेमके ठरवणे हे आव्हानात्मक व त्यामुळे निखळ वाटू शकले असते.

३. मराठी कविता प्रवाहानुसारे: मुळातच गझलतंत्रात असल्यामुळे आकृतीबंधात ही गझल इतर अनेक कवितांवर वरचष्मा दाखवणार यात वाद नाहीच. पण मराठी कवितेला आज विषयांचे कधी न पाहिलेले मनोरे आणि शिखरे दिसत आहेत. एखादा मुक्तछंदी एखादा नावीन्यपूर्ण विषय घेऊन बाजी मारू शकतो. मराठी कविता हे काही कुरुक्षेत्र नाही हे मान्य आहेच, पण रचना प्रकाशित केल्यानंतर ती तौलनिक विचारात स्थान मिळवणार हे ओघाने आलेच.

४. गायनानुकुलता - ही गझल 'गझल गायनासाठी' अतिशय उचित गझल आहे. एखाद्या प्रतिष्ठित गझल गायकाने ही गझल अवश्य स्वीकारावी असे वाटते.

५. समकालीनता: - या गझलेतील खयाल काही प्रमाणात जुने असले तरीही ते समकालीन नाहीत असे म्हणणे साहसी ठरेल. या भावना सर्वत्रच दिसून येतात. ही गझल आजही तितकीच ओतीव व प्रभावी ठरावी.

६. आशयाचे वैविध्यः आशय प्रत्येक शेरात भिन्न आला तरीही गझलेच्या मुळाशी काहीसे नैराश्य, काहीसा उद्वेग आहे असे जाणवत राहते. एखाद्या शेरात हलकी फुलकी भावना, एखाद्या शेरात उपरोध वा मिश्कीलता असे जाणीवपूर्वक कोणताच कवी कधीच आणत नाही. पण एकाच मनस्थितीत ही गझल पार पडली असावी असे वाटण्याइतपत आशय समांतर जाताना दिसतो.

७. सजावट - गझल उमराव जानसारखी नटलेली आहे. अचूक शब्दयोजना व अचून उपमा ही वैशिष्ट्ये आहेत.

८. टिकाऊपणा - ही गझल खयालांमुळे अधिक टिकणार नाही. आधीच म्हंटल्याप्रमाणे या कवीची ही गझल सिग्नेचर गझल होऊ शकत नाही.

अनेक अंगांनी बोलता येईल पण आम्ही थांबतो.

कळावे

गंभीर समीक्षक

वाहवा !!! गंभीर साहेब, तुमच्या समीक्षेने एका वेगळ्या प्रकारे पुनश्च ही अप्रतिम गजल वाचली.

ही मैफिलींत गजलगायकाला आनंद आणि दाद दोन्ही प्रदान करणारी गजल आहे. नचिकेतच्या अनेक उत्तम गजलांपैकी बरीच उजवी असलेली गजल. Happy

सर्वांचे आभार!
संध्याजी, विशेष धन्यवाद Wink

बेफिकीर उर्फ गंभीर समीक्षकजी, आपल्या जुन्या स्नेहाचा आदर राखून आपला विशेष अनुल्लेख! Wink
:हलके घ्या:

Pages