भयानक : भाग २

Submitted by यःकश्चित on 14 September, 2011 - 14:01

मागील भाग वाचा

मागील भागात.....
------------------------------------------------------------------------

विश्वास जेऊरकर हा एक लेखक होता. त्याने लिहिलेल्या 'भयानक' या रहस्यकथेतील घटना मोहनरावांच्या चुलत आजोबांच्या आयुष्याशी साधर्म्य दाखवत होता. मोहनराव विश्वासकडे येण्याच्या आदल्या संध्याकाळी घडलेली घटना आणि कथा आणि वास्तवांतील हे साधर्म्य विश्वासला पुनःपुन्हा गोंधळात टाकत होते. त्याच विचारात विश्वास भरकटला होता....

------------------------------------------------------------------------

मागील भागावरून.....

त्याने परत तयारी सुरु केली होती. मागल्या वेळी काही कारणांमुळे यज्ञात व्यत्यय आल्याने यज्ञ पूर्ण होऊ शकला नव्हता. पण यावेळी त्याला कुठलीही रिस्क घ्यायची नव्हती. यावेळी यज्ञात कसलाही व्यत्यय येणार नाही यासाठी त्याने पूर्ण खबरदारी घ्यायची असं ठरवलं होतं. यज्ञाच्या यशस्वीतेकडे तो पूर्ण लक्ष देत होता.

"बुवा, यावेळी आपल्याला कोणताही धोका पत्करायचा नाहीये. कुठलीही किरकोळ चूकसुद्धा आपल्या हातून झाली नाही पाहिजे. मागच्या वेळी पावसाच्या व्यत्ययाने आपला यज्ञ पूर्ण झाला नाही. मला असं वाटतं की तो पाऊस नक्कीच नैसर्गिक नव्हता. आपला यज्ञ असफल करण्यासाठी त्याने हा खेळ खेळला आणि त्यात तो यशस्वी झाला. आपल्याला यावेळी त्याला यशस्वी होऊ द्यायचे नाहीये."

"तू म्हणतोस त्यात काडीमात्रही शंका नाही. कारण यज्ञ शेवटच्या टप्प्यात आला असताना त्याने चाल चालली. यावेळी जर त्याला हे करण्यापासून रोखायचे असेल तर सर्वप्रथम आपल्याला तो कोण आहे हे शोधावे लागेल आणि मग - "

"...त्याची काळजी तुम्ही करू नका. ते काम मी आधीच केलंय. ", बुवाजींचे वाक्य तोडत तो म्हणाला, "दोन महिन्यांपूर्वीच मी माझ्या एका शक्तीमार्फत त्याला अर्धा कमजोर बनवलाय. आता फक्त आपल्याला यज्ञाच्या सुरक्षेसाठी काही विधी करावे लागतील. "

"वा..!! तू फारच छान केलंस. पण तू त्याला एवढा कमी लेखू नकोस. तू जसा यज्ञाच्या पूर्तीसाठी एवढे कष्ट व खबरदारी घेतोयेस मग त्याने तुझा यज्ञ तोडण्यासाठी काही उपाययोजना कशावरून केली नसेल !!! "

"बुवा, तुम्ही म्हणता यात मला तथ्य वाटतंय. आपल्याला खूप सावध राहायला हवं. मग आता यापुढे आपल्याला काय करावे लागेल ? "

"सर्वात आधी आपल्याला यज्ञासाठी योग्य आणि अनुकूल जागा शोधावी लागेल आणि ती जागा अश्या ठिकाणी हवी की तिथे तो सहजासहजी पोहचू शकणार नाही. "

"अशी एक जागा माझ्या बघण्यात आहे. गावाबाहेरच्या जंगलात एक योग्य जागा आहे. त्या जंगलात खूप आत एक गुहा आहे. याच गुहेत आपण आपला यज्ञ करूयात. ते जंगल खूप घनदाट आहेच आणि तिथे हिंस्र श्वापदांचा वावरदेखील आहे, त्यामुळे तिकडे कुणी गावकरी फिरकतसुद्धा नाही. "

"उत्तम...!!!!"

"आपण पुढच्या महिन्यात तिकडे निघुयात."

"नाही नाही !! आपल्याला अजून बरीच महत्वाची कामे करायची आहेत. त्यासाठी खूप वेळ आपल्याला हवाय. त्यामुळे आपल्याला याच आठवड्यात तिकडे निघावे लागेल. मग बाकीची कामे आणि यज्ञ तिकडे करता येईल. "

"पण आपल्याकडे अजून चार महिने असताना तुम्ही एवढी घाई का करत आहात ?"

"हे पहा. अजून बराच वेळ आहे म्हणून तू गाफील राहू नकोस. त्याला माहित असणारच की आपण यावेळी परत यज्ञ करणार आणि जर माहित असेल तर तो यावेळी आपल्याला अयशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त बाधा आणायचा प्रयत्न करेल. आपली किंचितशी चूकसुद्धा त्याच्या भरपूर फायद्याची आहे. म्हणून आपण आत्तापासूनच तयारी करायला हवी. "

"ठीक आहे. जसं तुम्ही म्हणाल तसं. मी निघायच्या तयारीला लागतो. "

**********************************************************************************************************

"बुवा ती पहा गुहा.", समोर असलेल्या गुहेच्या तोंडाकडे बोट दाखवून तो सांगत होता, " बाहेरून ही फार छोटी वाटते पण आतून एकदम मोठी आणि सुंदर आहे. सुमारे ७५० वर्षांपूर्वी एका ऋषींनी इथे तपश्चर्या केली होती. त्यांच्या तपश्चर्येमुळे ही जागा शक्तिशाली झाली आहे. तिला आपण अजून शक्तिशाली बनवूया म्हणजे आपला यज्ञ कोणत्याही विघ्नाशिवाय पूर्ण होईल. "
असे म्हणून सर्वजण त्या गुहेकडे निघाले. गुहेजवळ आल्यावर बुवांनी सगळ्यांना बाहेरच थांबायला सांगितले आणि स्वतः गुहेत गेले. थोड्या वेळाने ते परत आले.

"काय झाल बुवाजी ? असे आत जाऊन का आलात ?"
"कधी कधी एखाद्या जागी जर दीर्घ काल मनुष्याचे वास्तव्य नसेल तर तिथे भुते, पिशाच किंवा अतृप्त आत्मा वास करतात. ही गुहासुद्धा फार जुनी असल्याने मी आत जाऊन भूत-पिशाचाचा वास आहे का ते तपासलं. इथे तसे काही नाहीये. आता आपण आत जाऊ शकतो."

मग बुवा गुहेत गेले. त्यांच्या पाठोपाठ तो आणि सगळे शिष्यगण त्यांच्या मागून जाऊ लागले. गुहा फार जुनी असल्याने आतून ती खूप अस्वच्छ होती. कोळीष्टके नसलेली एकही भिंत नव्हती. कपारीत वटवाघळे राहत होती. आत एक प्रकारची गुढ शांतता पसरली होती. बुवा नि तो दोघेजण निर्भिडपणे पुढे जात होते. बाकीचे मात्र आत जाताना जरा बिचकत परिस्थितीचा अंदाज घेत येत होते. मधूनच कुठूनशी ५-६ वाघळे फडफड आवाज करीत बाहेर जात होती. त्यांचा आवाज आणि पंखांची फडफड मनात भीती उत्पन्न करत होता. बुवा आणि तो मात्र एखादे प्रदर्शन पाहत निघावे तसे पुढे पुढे जात होते.

ते जसे जसे आत जात होते अंधार आणि भयाणता वाढतच चालली होती. ते तसेच चालत राहिले. अचानक एकदम लख्ख प्रकाश पडला. ती जागा एकदम मोठी होती. गुहेच्या मध्यभागी ते पोहोचले होते. शे-दोनशे लोक आरामात मावतील एवढी प्रशस्त जागा होती ती. मध्यभागी एक वर्तुळाकार चबुतरा होता. त्यावर अष्टकोनी यज्ञकुंड होतं. त्या कुंडाच्या बरोबर वरच्या वाजूस छताला एक छिद्र होते. यज्ञाचा धूर जाण्यासाठी बहुधा तशी सोय असावी. त्याचा छिद्रातून प्रकाश येत होता. बुवांनी सभोवार नजर टाकली आणि त्याच्याकडे वळून म्हणाले,
"आपल्याला ही जागा स्वच्छ करून घ्यावी लागेल. फारच सुरेख जागा निवडलीस तू. इथे नक्कीच आपला यज्ञ यशस्वी होणार आणि एकदाचा हा यज्ञ यशस्वी झाला की मग -"
बुवांच्या चेहऱ्यावरच्या छटा बदलल्या,

"हा हा हा हा हा "

तो आणि बुवा दोघेही जोरजोरात हसू लागले.ते इतक्या जोरजोरात हसू लागले की त्यांच्या हसण्याचा प्रतिध्वनी गुहेत ऐकू येऊ लागला. तो आवाज ऐकून शिष्यगण भीतीने इकडेतिकडे पाहू लागले. थोड्यावेळाने त्या दोघांनी हसणे थांबवले. पण ते प्रतिध्वनीचे हसणे मात्र वाढतच गेले...वाढतच गेले...वाढतच गेले. तो हसण्याचा आवाज इतका वाढला की तो कानांना असह्य होऊ लागला. सर्व शिष्यांनी कानावर हात ठेवले तरी त्यांना तो आवाज सहन होईना. त्याने आणि बुवांनी कान गच्च दाबले. तो आवाज येतच राहिला.

तो आवाज सहन न होऊन सारे शिष्यगण बेशुद्ध झाले. पाठोपाठ त्याच्या डोक्यातही कळा येऊ लागल्या, चक्कर येऊ लागली. परिणामी तोसुद्धा बेहोश झाला. बुवांनी तोंडाने मंत्र पुटपुटत आपल्या कमंडलूतील पाणी सर्वत्र शिंपडायला सुरु केले. पण तो आवाज काही केल्या आवाज कमी होईना. बुवा त्या आवाजाला कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते पण त्या आवाजावर काडीचाही परिणाम होत नव्हता. शेवटी बुवासुद्धा त्या आवाजापुढे हतबल ठरले. त्यांना चक्कर येऊ लागली, डोळे जड झाले , पापण्या मिटू लागल्या आणि बुवाजींचा अचेतन देह जमिनीवर कोसळला.

**********************************************************************************************************
**********************************************************************************************************

ट्रिंग..ट्रिंग..

"हॅलो"

"मोहन दामले आहेत का..?"

"हो..मीच बोलतोय. बोला "

"मी विश्वास जेऊरकर बोलतोय. तुम्ही ताबडतोप माझ्याकडे या ?"

"का ? काय झालं ?"

"आपल्याला खूप मोठा आणि महत्वाचा दुवा सापडलाय जो आपल्याला तुमच्या आजोबांच्या आयुष्याचा उलगडा करेल आणि माझ्याही मनातील काही प्रश्नांना वाट फुटेल."

"अच्छा ठीक आहे. मी १५-२० मिनिटात पोहोचेन तुमच्याकडे."

"ठीक आहे. " असे म्हणून विश्वासने फोन ठेवला आणि सोफ्यावर मोहनरावांची वाट पहात बसला. टेबलावरच्या रोजनिशीवर त्याने नजर टाकली. हीच ती रोजनिशी जी विश्वास आणि मोहनराव, दोघांचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार होती. त्यांच्या भेटीनंतरच्या दुसऱ्याच दिवशी मोहनरावांनी रोजनिशी विश्वासला आणून दिली होती. विश्वासने ती रोजनिशी एका दमात वाचून काढली. त्यामुळे बरीच माहिती विश्वासला आता कळली होती. त्याच्या काही प्रश्नाची उत्तरे मिळाली होती. पण काही कोडी अजून गुलदस्त्यातच होती त्यासाठी विश्वासला मदत लागणार होती म्हणून त्याने मोहनरावांना बोलावले होते. त्यांचीच वाट पाहत तो बसला होता.

मोहनराव येईपर्यंत परत एकदा ती रोजनिशी पहावी म्हणून त्याने ती हातात घेतली. खरंतर त्या वहीला रोजनिशी म्हणता येणार नाही. कारण त्या वहीत रोजची नोंद नव्हती पण नानाभटांच्या आयुष्यातील महत्वाच्या नोंदी होत्या. त्याच नोंदींमधून विश्वासला त्यांच्याबद्दल बरीच उपयोगाची माहिती मिळाली होती. तो पुनःपुन्हा त्या वहीची पाने चाळत होता. तेवढ्यात मोहनराव आले. त्यांना बसायला सांगून विश्वास आत गेला. थोड्या वेळाने तो कसलासा कागद घेऊन आला.

"हे पहा हाच तो दुवा..", अतिशय आनंदाने त्याने मोहनरावांना सांगितले आणि तो कागद त्यांच्या हातात दिला.

मोहनरावांनी ती कागदाची घडी उलगडली आणि ते वाचू लागले.

या पत्राच्या वाचका,
मी भगवान गंगाधरपंत दामले उर्फ देवाजी. मला माहित नाही की हे पत्र कोण वाचतंय पण जो कोणी हे वाचत आहे त्याला मला काही सांगायचं आहे. हे पत्र वाचलं जाईल तेंव्हा कदाचित मी ह्या जगात नसेन. त्यामुळे माझ्यानंतर आपल्या दामले घराण्याशी संबंधित काही रहस्ये काळाच्या ओघात नष्ट होऊ नयेत म्हणून मी हे पत्र लिहितोय. कारण ही रहस्ये फक्त मलाच माहित आहेत. आपल्या दामले घराण्याला फार मोठा इतिहास आहे, तो असा -
फार फार वर्षांपूर्वी इंद्रशील नगरीत शूरसेन नावाचा राजाचं राज्य होतं. त्यावेळेस आपले पूर्वज शूरसेन राजाच्या दरबारात पुरोहित होते, चंद्रराव भट. ते राजाच्या दरबारातील सर्व पूजाअर्चा आणि अन्य विधी करायचे. त्यासाठी त्यांना राजाकडून पुरेशी बिदागीही मिळायची. तसेच घरातील वर्षाचे धान्यसुद्धा राजाकडूनच मिळायचं शिवाय कधी कधी राजाची मर्जी असेल तर मोत्याचा कंठाही भेट मिळायचा. त्यांना कधीही काहीही कमी पडायचं नाही. सारं काही व्यवस्थित चालू होतं. पण अचानक कुणाची नजर लागली देव जाणे..! त्यादिवशी राजाकडून अचानक चंद्ररावांना बोलावणे आले.

पत्र वाचता वाचता विश्वास आणि मोहनराव त्या काळात शिरले.

एक सेवक सकाळी सकाळी चंद्ररावांच्या घरी राजाचे बोलावणे घेऊन आला. त्यावेळी चंद्रराव देवपूजा करीत होते. देवपूजा आटोपून त्यांनी धोतरावर सदरा चढवला. खुंटीवरचे उपरणे काढत शांताक्कांना सांगितले, "अहो, जरा जाऊन येतो." शांताक्का म्हणजे चंद्ररावांच्या पत्नी. त्या घाईघाईने बाहेर येत म्हणाल्या,
"अहो धनी, एवढ्या सकाळ सकाळी कुठे निघालात ?"

"कितीवेळा सांगितलं, जाताना कुठे जाताय असं विचारू नका. विघ्न येतं हो. राजाकडून बोलावणं आलंय.", असं म्हणत त्यांनी वहाणा घातल्या.

"अहो दोन घास खाऊन जा म्हणलं"

"परत तेच ....... आणि आपण राजाचे सेवक आहोत. आधी राजाची आज्ञा मग बाकीचं "

"अहो पण - "
हे ऐकायला चंद्रराव तिथे होतेच कुठे ! त्यांनी अर्धा रस्ता पार केला होता. ते राजाच्या दरबारात पोहोचले. दरबार भरला होता. पण राजा दरबारात नव्हता. चंद्ररावांनी विचारणा केली असता एक मंत्री उठला आणि तो चंद्ररावांचा हात धरून कुठेतरी नेऊ लागला. ते राजवाड्याच्या आतल्या दिशेने जात होते.
"आपण कुठे जात आहोत ?"

"देवा, काही विचारू नका. आपण राणीसाहेबांच्या खोलीत जात आहोत. मोठा अनर्थ घडलाय. राणीसाहेबांवर कुणीतरी करणी केलीय बघा. सकाळपासून त्या काहीच खात नाहीयेत, कुणाशी बोलत नाहीयेत, वैद्यबुवापण सकाळीपासून प्रयत्न करत आहेत पण प्रकृतीमध्ये काहीच फरक पडत नाहीये. "

"पण मला कशासाठी बोलावलंय ?"

"राणीसाहेबांच्या खोलीत कसले तरी काळे दोरे सापडलेत आणि एक धागातरी चक्क त्यांच्या हातात बांधलेला होता. म्हणून - "

"हम्म.. मग हा नक्कीच काळ्या जादूचा प्रकार आहे. राजवाड्यात कुणाला काळी विद्या अवगत आहे ? "

"कुणालाच नाही."

"मग हे कोणी केलं ?"

"तेच समजत नाहीये.", समोरच्या दिशेने हात करत मंत्री म्हणाला, "ती पहा ती राणीसाहेबांची खोली. तुम्ही आत जा , मी इथेच थांबतो."

चंद्रराव राणीसाहेबांच्या खोलीत शिरले. त्यांना पाहताच राजा धावत धावत त्यांच्याकडे आला आणि भीती कम काळजीच्या स्वरात म्हणाला ,
"देवा, बघ ना काय झालं हे ? मी कधी कुणाचं वाईट केलं म्हणून आज माझ्यावर अशी वेळ यावी ."

"महाराज तुम्ही काळजी करू नका मी बघतो , काय करायचं ते . तुमच्या मंत्र्याने मला सगळं सांगितलंय. मला ते काळे धागे द्या, मी राणीसाहेबांवरची करणी काढून टाकतो."

ते धागे घेऊन चंद्रराव दरबारात आले. अचानक त्यांना काही आठवलं म्हणून ते वळले आणि परत राजाकडे गेले.

"महाराज, तुमचा कोणी शत्रू आहे का ? म्हणजे असा कोणी जो तुमच्या वाईटावर टपला आहे ?"

"अं.....", बराच विचार करून राजा म्हणाला , "नाही. मला असा कोणीही आठवत नाहीये."

"अच्छा. ठीक आहे.", राजाला जवळ ओढत चंद्रराव म्हणाले , " आपल्याला एका पूजेची तयारी करावी लागेल. राणीसाहेबांवरची करणी घालवण्यासाठी आपल्याला ही पूजा करावी लागेल. "
"तुम्ही काय म्हणाले ते करायला मी तयार आहे पण हिला काही झालं नाही पाहिजे. तुम्हाला काय हवंय ते अमात्यांना मागा. ते देतील. "

'ठीक आहे', असे म्हणून चंद्रराव तेथून निघून गेले. राजा परत राणीजवळ जाऊन बसला. चंद्रराव घरी आले. त्यांनी शांताक्कांना काय झालं ते सांगितलं आणि आता एक पूजा करावी लागेल हेही सांगितलं. त्यांनी जेवण केलं आणि आणखी दोन जणांना घेऊन ते राजवाड्यात गेले. राणीच्या महालाबाहेर असलेल्या सज्जा मध्ये ती पूजा करावयाचे ठरले.

चंद्ररावांनी त्या दोघांना आसन मांडले आणि त्यावर बसायला सांगितले. ते दोघे तिथे बसले आणि रामरक्षापठण करू लागले. चंद्ररावांनी पूजेसाठी लागणारी सारी साधने मागून घेतली आणि पुजेला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी शुभ्र दोऱ्याच रीळ अभिमंत्रून, त्या दोऱ्याने वडाच्या झाडाला बांधतात तसे राणीच्या पलंगाला बांधले. तसेच दोरा बांधता बांधता ते कुठलासा मंत्रोच्चार करत होते. त्याचं दोरा बांधून झालं आणि त्याचक्षणी राणीने विजेचा झटका लागल्यासारखे अंग जोरात हलवले. सर्वांच्या नजरा राणीकडे वळल्या. राजाचे डोळे आशेने चमकले. चंद्ररावांनी राणीकडे पाहिले. आता ती निपचित पडून होती. ते परत पुजेकडे वळाले.

ते पाटावर येऊन बसले. त्यांनी कसलासा भूत-पिशाच निवारक मंत्र पुटपुटत विधी करू लागले. ते काळे धागे त्यांनी समोर ठेवले. त्याभोवती खडूने चौकोन काढला आणि कुंकवाचा फवारा मारला. त्या धाग्यांतून धूर निघू लागला. हळूहळू धुराचे प्रमाण वाढू लागले त्याचबरोबर राणी जराशी चुळबुळ करू लागली. काही वेळ हे असं चालू होतं पण राणी परत निपचित झाली. चंद्ररावांनी त्या धाग्यांवर पाणी शिंपडले आणि त्यावर काळे तीळ पसरले. तोंडाने मंत्र चालू होताच. अचानक ते धागे हालू लागले. मासा पाण्याबाहेर काढल्यावर जसा तडफड करतो तसे धागे हलू लागले. ते धागे चौकोनाच्या बाहेर जायचा प्रयत्न करू लागले पण धागा चौकोनाच्या रेषेला स्पर्श करताच त्या रेषेवरून ज्वाला निघाली त्यामुळे ते त्या चौकोनाच्या बाहेर जाऊ शकत नव्हते. इकडे राणी परत चुळबुळ करू लागली. ती उठून बसली. राजाने चंद्ररावांकडे एक आभारपूर्ण नजर टाकली आणि राणीच्या जवळ जाऊ लागला. चंद्ररावांनी डोळे मोठे करून राजाला तिकडे न जाण्याचा इशारा केला. राजा तसाच थांबला.

उठून बसलेली राणी जोरजोरात ओरडू लागली. धाग्यांची तडफड सुद्धा वाढली. राणीच्या तोंडून पुरुषासारखा घोगरा आवाज येऊ लागला. तश्याच आवाजात ती ओरडत होती. चंद्रराव आणि ते दोघे भटजी सोडून सारेजण घाबरून राणीकडे पाहू लागले. इतके सारे घडत होते पण त्या दोघा भटजींचे रामरक्षापठण चालूच होते. बराच वेळ असंच चालू होतं. चंद्ररावांनी हातात कुंकू, तीळ व बुक्का घेतले, मुठ बंद केली, काही मंत्र म्हणले आणि जोरात त्या धाग्यावर फेकले. त्या धाग्यांनी उसळी घेतली आणि त्यातून ज्वाळा बाहेर पडल्या. ते धाग्यातून बाईच्या ओरडण्याचा आवाज आला आणि ते धागे स्तब्ध झाले. राणीपण स्तब्ध झाली. तिचे ओरडणं एकदम बंद झालं. ती इकडे तिकडे बघू लागली. राजाराणी एकमेकांकडे बघून हसले. राणी आता पूर्ण बरी झाली होती.

चंद्रराव त्या धाग्याकडे पाहत होते. त्या धाग्यातून ज्वाळा बाहेर पडत होत्या. थोड्यावेळाने त्या ज्वाळा कमी झाल्या. परत एकदा त्या धाग्याने उसळी घेतली, तो उंच हवेत गेला आणि रॉकेट फुटते तसा जोरात फुटला.

"फटाsssssssssssssssssssक"

त्यासरशी विश्वास आणि मोहनराव परत वर्तमानकाळात आले.

त्यादिवशी राणी बरी झाली होती आणि तिच्यावर करणी करणारा तो, त्याचा खात्मा झाला होता. त्या दिवसापासून तो जो कोणी आहे तो दामले घराण्याचा शत्रू झाला होता. दर ५० वर्षांनी त्याचे वारसदार दामले घराण्यातील एका व्यक्तीचा जीव घ्यायचा प्रयत्न करतात. दोनच महिन्यांपूर्वी त्याच्या एका वारसदाराने भानूला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्याने एका जंगलात यज्ञ केला होता. पण मी आणि भानुने मिळून कृत्रिम पाऊस तयार केला आणि त्याच्या यज्ञात बाधा आणली. त्यावेळी त्याचा यज्ञ असफल झाला. पुढच्या वेळी त्याचा वारसदार नक्कीच जास्त खबरदारी घेईल यात शंका नाही पण माझी अशी इच्छा आहे की तू त्या वारसदाराला यावेळी ठार मारावे. कारण त्या वारसदारानंतर 'त्या'चं घराणं निर्वंश होईल आणि दामले घराण्याचा कायमचा धोका टळेल. ज्याने हे पत्र शोधून काढले तोच फक्त हे काम करू शकतो कारण
भानुदासनंतर तोच दामले घराण्याचा नवा वारसदार आहे.

तुमचा,
भगवान गंगाधरपंत दामले

विश्वास आणि मोहनराव एकमेकांकडे पाहतच राहिले.

...........क्रमशः

गुलमोहर: 

मस्त्त मस्त्त चांगलीच उत्सुकता ताणली जात आहे. कहानी मै कहानी
पुलेशु पण कवकर प्लीज........................

छान आहे दुसरा भाग पण 'त्याने चाल चालली', 'भीती कम काळजी' असे शब्दप्रयोग खटकले. ते तेव्हढे दुरुस्त करा प्लीज. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत Happy

वाव, कहानी मै कहानी, पहिला आणि दुसरा भाग दोन्हीही छान झाले आहेत, पुलेशु ...... १००% अनुमोदन.

खुप छान वाटली, पण पुढचा भाग लवकर पोस्टा... ऊत्सुकता संपायच्या आत....

वाव, कहानी मै कहानी, पहिला आणि दुसरा भाग दोन्हीही छान झाले आहेत, पुलेशु ...... १००% अनुमोदन.

खुप छान वाटली, पण पुढचा भाग लवकर पोस्टा... ऊत्सुकता संपायच्या आत....

भाग लवकर टाका...............अन्यथा वाट बघणे सोडुन देतील लोक............ Happy

Pages