रसग्रहण स्पर्धा - अकथीत सावरकर - लेखक मदन पाटील

Submitted by केदार on 2 August, 2011 - 23:57

अकथीत सावरकर
लेखक मदन पाटील
प्रकाशक - जिजाऊ प्रकाशन
मुल्य - ३०० रू
प्रथमावृत्ती - २३ मार्च २०११

खरेतर लेखक आणि प्रकाशनाचे नाव पाहून मी पुस्तक विकत घेणार नव्हतो कारण दोहोंवरून त्याची दिशा नक्की झाली होती, केवळ ब्राह्मणांचा तिरस्कार करणारे लेखन. तरी धीर धरून हे पुस्तक घेतले, म्हणलं सावरकरांबद्दल जे आधी कळाले नाही ते वाचायला मिळेल.
प्रस्तावना वाचली आणि हतबुद्ध झालो, सावरकरांवर बोलायच्या ऐवजी संघ, ब्राह्मण, टिळक, आर्य, वैदिक ब्राह्मण, जिनोम प्रोजेक्ट व त्याची भलतीच माहिती आणि मुस्लीम आज देशात का जास्त झाले ह्याचे श्रेय (अर्थातच ब्राह्मणांना) आणि गांधी हत्या व त्यातून होणार्‍या ब्राह्मण समाजाच्या सामूहिक हत्यांबद्दल चे जोरदार समर्थन (उदा " वाघाप्रमाणे खवळलेल्या जनतेंन जी कृत्यं केली, ती इतकी नैसर्गिक व शंभरातील नव्याण्णव बाबतीत अचूक होती की, देशातील बहूजन समाजाचं डोक व हिम्मत अजून शाबूत आहे हेच सिद्ध झाले" हे वाचून मला लेखकाची किव करावीशी वाटली. हे वाक्य ज्या गोर्‍यांनी लिहिले त्यांनी कदाचित आज मी चुकीचे बोललो असे विधान केले असते, पण ही व अशा कोट करून हे पुस्तक चालू होते. पेशन्स ठेवून पुढे वाचायचे ठरविले.

एक भन्नाट उदाहरण, ते (पाटील) म्हणतात की "सावरकरांना अभिप्रेत असलेला हिंदू धर्म म्हणजे वैदिक धर्म होय" आता ज्या माणसाने थोडेफार सावरकर वाचले आहे त्याला कळेल की सावरकर म्हणाले, "श्रृती-स्मृती इ ग्रंथानां आज अवास्तव महत्त्व द्यायचे कारण नाही" ," गाय हा पशू आहे, पशू सारखे वाटले तर मारावे व खावे", "पंचंगव्याला जे महत्त्व देतात ते माणसाला पशू हून हिण वागवतात व पशूला देवस्थानी माणतात", " गायीच्या शरीरात जर ३३ कोटी देव असले तर, एखाद्याने जर सहज तिला काठी मारली तर पाच पन्नास देव धारातिर्थी पडायचे, हे कसे परवडेल? आणि तो देवच काय जो स्वतःचे रक्षण करू शकणार नाही?" "गायीच्या पोटात हा देव, पाठीत हा देव इतकेच काय पायात हा देव असे माणने म्हणजे देवालाही पशूपेक्षा हिण समजणे हे होय", ही सर्व वाक्य सावरकरांचे आहेत, माझे नाहीत. जो माणूस असे लिहू शकतो त्याच्या हिंदूत्वाचा कल्पनेला वैदिक म्हणता येईल का? केवळ ब्राह्मण आहे म्हणून उचलली जीभ असे कसे करता येईल?

दुसरे एक महान वाक्य म्हणजे "सावरकरांच्या लिखाणातून बहुजन दु:स्वास स्पष्ट दिसून येतो आणि स्वजातीयांची वारेमाप भलावण व कौतूक द्सितं." काय म्हणावे ह्याला हे काही कळत नाही. अहो ज्या माणसाला खुद्द गांधी पण म्हणाले की तुम्ही जे काम रत्नागिरी, नाशकात केलं त्याला तोड नाही, कित्येक देवळ, पानवटे हे अस्पृश्यांना खुले केले ते पाटीलांना दिसत नाही वा केवळ जातीमुळे मान्य नाही. अहो खुद्दा सावरकर सत्यनारायण घालायला नको कारण त्याची गरज नाही असे म्हणत होते हे पाटील विसरले! पुढे ते म्हणतात की "काही नाटकांचे प्रयोग लोकांनी बंद पाडले ह्यावरूनच त्यांचं सामाजिक लेखन बहुजन संमत नव्हत हे दिसत", अरे बा पाटला, जो माणूस सर्वणांविरुद्ध खुद्द ब्राह्मण असून आवाज उठवत होता, त्याला सर्वण विरोध करणारच. की ते सत्यनारायणविरोधी नाटक पाहायला ज्यांना दोन वेळचे जेवन मिळत नव्हते ते अस्पृश्य येणार? उलट बा पाटला तू दोन्ही वाक्ये सलग मांडून ती दोन्ही परस्परविरोधी आहेत हे तुज कळले नाही असे खेदाने म्हणावे वाटते.

पुढे पहिल्या प्रकरणात पाटील गाजलेल्या उडीचा आढावा घेतात. ह्या उडी बद्दल अनेक प्रवाद आहेत. धनजंय कीर (चरित्रकार) जरी ही उडी महान होती असे मांडत असले तरी खुद्द उडी तितकी महान नव्हती हे य दि फडके म्हणतात, ज्यावर सावरकरांनी मौन बाळगले व आम्हास य दिं फडक्यांचे म्हणणे पटते. पण ही उडी लाक्षणिक दृष्ट्या महान होती असे आमचेही मानणे आहे कारण ह्यात खुद्द क्रिया (म्हणजे उडी) जरी महान नसली तरी ज्या रितीने तिचा प्रसार व प्रचार झाला. ब्रिटीशांना कोणी असेही टक्कर देऊ शकते हेच त्यातून साध्य झाले त्यातून अनेक क्रांतीकारक जन्माला आले हे सत्य कसे नाकारता येईल? पाटलांनी नेमके हेच नाकारले आहे. ब्राह्मण लेखकाबद्दल ते पुढे म्हणतात की " एका सामान्य दर्जाच्या कृतीला आंतरराष्ट्रीयख्यातीची कृती ठरवणे आणि तिचे बेसुमार उदात्तिकरण करणं, ह्यामागे "जातीनिष्टा" ही एकच बाब असल्याचे दिसून येते" अहो पाटील, अहो जरा य दि फडके वाचा हो, आणि ते ही ब्राह्मणच आहेत तरी त्यांनी ही उडी सामान्य होती पण तिच्यामुळे जे बुडबुडे निर्माण झाले ते असामान्य होते असे मांडले आहे.

पुढे ते म्हणतात की १९०७ साली जो माणूस मुस्लीम हिंदू भाई भाई म्हणतो, तो पुढे अचानक हिंदूत्वाकडे का वळतो? त्यांनी वैचारिक कोलांटउडी मारली असे लेखक म्हणतो. जे त्याचा दूरदृष्टीला कळाले नाही ते आम्ही इथे सांगू इच्छितो. सावरकरांनी १८५७ चे बंड पुनः जागृत केले व त्याला स्वातंत्र्य समर हे नाव दिले. त्याची प्रसिद्धी केली, इतकी की हे पुस्तक ज्या कडे मिळेल त्याला तुरूंगात जावे लागत होते. ह्या बंडाला त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक आयुध म्हणून वापरले. बहादुरशहा जफरचा एक शेराचा त्यांनी फारच प्रचार केला तो म्हणजे
"गाझियोमें बू रहेगी जबतलक इमान की,
तब तो लंडनतक चलेगी तेग हिंदूस्थान की "
तेंव्हा सावरकरास उर्दू माहिती नव्हते. गाझी म्हणजे मुस्लीम योद्धा, जो धर्मासाठी व मुस्लीम राष्ट्रासाठी आपले प्राण अर्पण करतो, अल्लाचेच राज्य स्थापण्यात झगडतो. होमवर्क म्हणून आमची पाटलांना विनंती आहे की बहुजन समाजातीलच एका लेखकाने, श्री शेषराव मोर्‍यांनी लिहिलेले, "१८५७ चा जिहाद" हे पुस्तक वाचावे. लेखक ब्राह्मण नाही, त्यामुळे कृपया वाचाच असा आग्रह. मग आपल्याला कळेल की ही कोलांटौडी का? उर्दूत एक शब्द आहे दार-उल-इस्लाम व दार-उल-हरब . दार-उल-हरब म्हणजे हे इस्लामचे राज्य नाही असे येथील मुस्लीमांचे म्हणने आहे व होते. त्यामुळे १८५७ च्या पत्रांमध्ये तसे उल्लेख आहेत जे शेषराव मोर्‍यांनी व्यवस्थित मांडले आहेत.

बरं हे अजून एक बघा, " प्रामुख्याने उत्तर भारतात झालेल्या उठावात किती हिंदू सहभागी होते, ते पाहिलं तर मोजकी नावे समोर येतात, नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे आणि मंगल पांडे. सावरकरांनी ह्या सर्वांना रणदेवता, संग्रामदेवता असे गौरविले आहे आणि ते सगळे ब्राह्मण आहेत" असे मांडून पुढे लगेच आम्ही वरच्या प्यारात जे म्हणत आहोत तेच ते मांडतात, " दार-उल-इस्लाम" चा विचार स्वत्;च्या ताकदीवर अंमलात आणंण मुस्लीमांना शक्य नव्हतं, त्यासाठी त्यांना हिंदूंची मदत लागणार होती, परंतू हिंदू माणसिकता तेवढी कडवी नव्हती हे उठाव कर्त्यांना ठावूक होते" आता घ्या. दोन्ही कडून आपलीच टिमकी अन वर परत ब्राह्मणांना मोठे केले म्हणून ओरडा.

एके ठिकाणी अजून एक गमतीदार वाक्य बघा, " प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ आणि 'रामदास हे शिवरायांचे गुरू नसून अदिलशहाचे हेर होते' असे पुराव्यानिशी हायकोर्टात सिद्ध करणारे प्रा मा म देशमुख ह्यांच्या मते, सावरकरांना अवघे दोन आठवडे कोलू ओढण्याचं काम दिलं गेलं. आणि काथा कुटण्याचे काम अवघं महिना भर दिलं गेलं." अशी कष्टाची काम बहुजनसमाजातील महिला देखील शेतात नांगरणी करताना विना थकवा करतात.

आता ह्या वाक्यातून महाशय दोन उद्दिष्ट साध्य करतात ब्राह्मण रामदास अदिलशहाचा हेर होता, हे त्यांना इथे सांगायचेच आहे, अन्यथा ह्या वाक्याची गरजच नव्हती पण ते सावरकरांवर वरील आरोपही करतात की त्यांना तेवढी सजा नव्हतीच म्हणे कारण मा म देशमुख तसे म्हणतात म्हणे! शिवाय हे काम महिला देखील करते ते सावरकरांनी कधी कधी केले व त्याचा प्रचार केला!! अहो पाटील किती तो द्वेष! अन लगेच पुढे सावरण्यासाठी ते लिहितात, "दिल्ली दरबार महोत्सवाची तयारी चालू होती तेंव्हा कैद्यांना वर्षाला १ महिन्याची सवलत (म्हणजे सावरकरांना ५० महिने) मिळणार होती, पण सावरकरांकडे एक आक्षेपार्ह पत्र सापडल्यामुळे तीन महिने एकातंवासाची शिक्षा दिली व सात दिवस हातकडीत राहण्याची शिक्षा दिली." म्हणजे वरच्या प्यार्‍यात शिव्या द्यायच्या व लगेच खाली असे लिहायचे. पण पाटील तुम्हाला एक कळतं का? की ही अशी शिक्षा कधी होते? तर इंग्रजांविरुद्ध कोठडीतून काही तरी केले म्हणून. उलट तुम्ही वर तर इंग्रजांनी त्यांना सवलतीत राहायला दिले असे म्हणता अन हे ही लिहिता? अहो काही तरी एकावर राहा. म्हणजे एकीकडे सावरकरांच्या शिक्षा कश्या साध्या असताना ब्राह्मणी प्रचारकांनी गवगवा केला हे म्हणायचे व पुढे लगेच नाही हो, त्यांना एकांतवासाशी शिक्षा केवळ पत्र सापडल्यामुळे झाली हे ही म्हणून मी तसा द्वेष करत नाही बरं हे ही साध्य करायचे.

एके ठिकाणी पाटील म्हणतात की "सावरकरांनी ने मजसी ने" हे गीत कोठडीत लिहिले कारण आपल्या जीवनाकडे (भविष्याकडे) पाहून ते उदास झाले, त्यांनी मृत्यूपत्र तयार केले त्या उदासीतच हे गीत लिहिले. आम्ही पाटलांस मराठी काव्याचे धडे गिरवायला पाठवावे असे इच्छितो. कारण ते काव्य ब्रायटन इथे लिहिले आहे, तेंव्हा मदनलाल धिंग्रा एपीसोड चालू होता, अशातच त्यांना त्यांचा मुलगा वारल्याचे पत्राने कळले म्हणून त्यांनी " तो बाल गुलाबहि आता रे फुलबाग मला हाय पारखा झाला ॥ सागरा प्राण तळमळला" अशी रचना केली. ज्यांना साधे हे गीत कधी व कुठल्या परिस्थितीत लिहिले गेले हे माहिती नसते त्यांनी पुस्तक लिहिण्याच्या अट्टहास का करावा? हे कळले नाही.

आणखी एके ठिकाणी ते म्हणतात, " सावरकरांनी आपली लेखणी राबविली ती खुज्यांचं कौतूक करण्यासाठीच. चंद्रगुप्ताला दासीपुत्र, धनानंदाला भेकड, जुलमी रंगवून आणि पळपुट्या चाणाक्याला मात्र राष्ट्र निर्माता ठरवून सत्य इतिहासाचा मुडदा पाडला" ह्यावर मी टिपण्णी करणार नाही कारण ह्या विषयावर भरपुर साहित्य उपलब्ध आहे. खोट कोण लिहितं ते वाचल्यावर कळेल. आणि शिवाजीची आठवण त्या काळच्या मृतप्राय जनतेत सतत तेवती ठेवली ती सावरकरांनी हे मात्र पाटील विसरतात.

इतर अनेक शुल्लक घटनांना देखील त्यांनी बाऊ करून मांडले आहे. गांधी हत्या, संघ इत्यादी मध्ये ते कुठेही ब्राह्मणाला शिव्या देण्याचे कमी करत नाहीत. इतकेच नव्हे तर सावरकर क्रांती कारक की इंग्रज मित्र? असा प्रश्न ते विचारतात. आम्ही त्याचे उत्तर देत नाही, गरज वाटत नाही पण पूर्ण पुस्तकच असे विरोधाभासाने व केवळ बाम्हणद्वेषाने भरले आहे. इतकेच काय त्या कुठल्याश्या जिनोम प्रोजेक्टने म्हणे ब्राह्मण हे आर्य असल्याचे सिद्ध झाले आणि ते युरोशियनच आहेत असे मत टिळकांपासून अनेक ब्राह्मणाचे होते असे लेखक म्हणतो. टिळकांच्या काळी मॅक्समुलर मुळे आर्य बाहेरून आले हे सर्वमान्य होते, तो इंग्रजी प्रचाराचा एक भाग होता, पण पुढे जाऊन हडप्पा-मोहंजदाडोचा शोध लागल्यावर (१९२१) ते आजपर्यंत अनेक नवीन संशोधन होऊन ही थेअरी बाद असल्याचे निष्पन्न होत आहे, तरी लेखकू जुन्याच थेअरीस कवटाळून बसले आहेत व ब्राह्मण हे बाहेरचे आहेत असे प्रतिपादत आहेत.

आम्ही ब्राह्मण आहोत म्हणून आम्हास ते खपले नाही असा कीव करण्याजोगा विचार कृपया करू नये तर आम्ही केवळ पुस्तक परिचय घडवून देत आहोत. पुस्तक परिचय का? तर पुस्तक कसे लिहू नये? ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पुस्तक होय. सावरकरांचे विचार खोडायला काहीच हरकत नाही पण ते जातीय चष्मा लावून पाहू नये. सावरकर व्यक्ती म्हणून पाहावे व सारासार विचार करून त्यांचे विचार खोडावेत असे आम्हाला वाटते. पुढे असे पुस्तक पाटलांनी लिहिले तर आम्ही त्याचे स्वागतच करू. तूर्तास पाटील जातीय द्वेष वाढीस लावत आहेत असे मात्र आम्ही म्हणू इच्छितो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सावरकरांनी १८५७ चे बंड पुनः जागृत केले व त्याला स्वातंत्र्य समर हे नाव दिले.>> यावर नवीन संशोधन झाले आहे. १८५७चा उठाव हा हिंदूनी वा तात्यासाहेबानी केला नव्हता. तो मुस्लिमनी केलेला जिहाद होता.

पुस्तक:- १८५७ चा जिहाद.
लेखकः शेषराव मोरे.
प्रकाशकः- राजहंस प्रकाशन पुणे. हे पुस्तक नक्की वाचा.

वरिल पुस्तक वाचा.
---------------

सावरकर देशभक्त म्हणून रेखाटताना ब-याच अडचणी येतात. जन्मठेपे पुर्वीचे सावरकर हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे समर्थक होते. पण जन्मठेपेत सावरकरांवर नजर ठेवण्यासाठी पठाणांची तुकडी नेमण्यात आली होती. त्या पठाणानी पराकोटीचा त्रास दिला. या दरम्याना सावरकर कट्टर हिंदू बनत गेले. त्यांचा माफिनामा स्ट्रेटेजीचा भाग होता असे गृहीत धरल्यास सुटके नंतर स्ट्रॅटेजीच्या पाऊलखूणा दिसत नाहीत. त्यामूळे माफिनामा नितीचा भाग नव्हता हे सिद्ध होते. स्थानबद्देते पासून तर हिंदू महासभेतील सर्व वर्तन इंग्रजांच्या बाजूने मान तुकविणारा होता. याला कारणीभूत आहे काळ्या पाण्यातील शिक्षेच्या दरम्याना झालेलेल मनाचे खच्चिकरण. पराकोटीच्या वेदना गाठीशी असल्यावर स्वभावात मूलभूत बदल होणे नैसर्गिक होते. जन्मठेपे पुर्वीचे सावकर क्रांतीकारक व देशभक्त दोन्ही होते. याच्या उलट जन्मठेपे नंतरचे सावरकर देशभक्त होते पण क्रांतीकारक नव्हते. जन्मठेपेच्या दरम्यान सावरकराच्या आतील क्रांतिकारक पार नेस्तानाबुत झाला. सावरकर वादयानी मात्र जन्मठेपे नंतरच्या सावरकरातही क्रांतीकारक सावरकर रंगविणे सुरु ठेवले त्यामूळे सावरकरांचा हसा झाला. त्यांच्या ईतर कार्याला तितका फोकस केला जात नाही. अन्यथा मराठी भाषा समृद्द करण्याच्या कार्यातील एक मैलाचा दगड म्हणून सावकर एक निर्विवाद व्यक्तीमत्व आहे. वार्तहार, महापौर हे शब्द सावकरांची देण आहे.

काळ्या पाण्यातील शिक्षेच्या दरम्याना झालेलेल मनाचे खच्चिकरण
---- कुणाच्या मनाचे खच्ची करण करावे आणि कुणाला अ दर्जाची वागणुक द्यावी हे ब्रिटिशर्स जाणुन होते. हे त्यांच्या दुरगामी विचार सरणीचेच लक्षण आहे.

सावरकर हे चळवळीचे मेंदू होते आणि ब्रिटीश सत्तेस जास्तच धोकादायक होते हे तुम्ही मान्य करत आहात. अभिनंदन.

Pages