जिंदगी.. शायद ना मिले दोबारा!

Submitted by साजिरा on 19 July, 2011 - 07:04

कबीर. एका संपन्न घरातला, बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा. थोडा मनस्वी. अजून सडाफटिंग. पण नुकताच एका इंटेरियर डिझायनरला प्रपोज 'करून बसलाय'. आपली दोघांची कामे एकमेकांना पुरक आहेत- त्यामुळे आपले जमेल असे तो तिला सांगतोय. तीही खुश. एवढे तिला सांगितले हेच नशीब. कारण हा थोडा अबोल, इंट्रोव्हर्ट. मनातलं सहज दुसर्‍याला न सांगणारा.

अर्जून. हा वर्कोहोलिक. म्हणजे कॉलेजात असताना प्रेमबिम कधीकाळी केलेलं. पण पैशाच्या मागे धावणं, कामाला वाहून घेणं आड आलं. मग प्रेमभंग. त्यानंतर ते विसरण्यासाठी कदाचित, कामाला आणखीच वाहून घेतलं. पैसा है तो जहान है. लंडनमध्ये एका कंपनीत अत्यंत बिझी फायनान्शियल ब्रोकर म्हणून काम करतोय. बर्‍यापैकी पैसेही कमवतो.

इम्रान. हाही हळवा. कवीमनाचा, मनस्वी. पण उपजतच उत्तम विनोदबुद्धी लाभलेला. आणखी एक म्हणजे, याच्या बापाबद्दल याला बराच तरूण झाल्यावर कळते- ही एक सतत दुखरी नस घेऊन वावरणारा. ते विसरण्यासाठीच की काय, पण सतत गलछबूपणा करण्याची सवय, हौस. पण कवीमनाच्या सार्‍यांसारखीच याचीही गोची. जगण्यासाठी काम कसलं करतोस?- या प्रश्नाचं नीट उत्तर याला देता येत नाही.

zindagi-na-milegi-dobara-wallpapers-08.jpg

या तीन मित्रांची कहाणी- म्हणजे झोया अख्तरचा 'जिंदगी मिले ना दोबारा'. स्वीट अँड क्युट अभय देओल, बिगेस्ट हंक ऋतिक रोशन आणि सो-कॉल्ड-गाय-नेक्स्ट-डोअर फरहान अख्तर- असली तगडी रिफ्रेशमेंट. सोबत सुप्रसिद्ध कतरिनाबाई, देव-डी फेम काल्की. जावेद अख्तरचे संवाद आणि कविता. शंकर-एहसान-लॉयचं संगीत. झोया अख्तरचं तरूणाईला भावणारं अत्यंत फ्रेश टेकिंग. काय बिशाद आहे पिक्चर आपटण्याची?

***

कबीरचं लग्न ठरतं, तसा तो अस्वस्थ होतो. आपले सडाफटिंग दिवस आता संपतील, याची हळहळ. सांगणार कुणाला? तर कॉलेजातल्या एकेकाळच्या त्या दोन जीवलग मित्रांना. पण तेही असं अ‍ॅक्रॉस टेबल बसून भडाभडा पाच मिनिटात बोलून टाकणं त्याच्यासारख्याला कसं शक्य आहे? तर नीट वातावरण निर्मिती होऊ देत. जरा आठ दिवस कॉलेजचे दिवस आठवत गुजगोष्टी होऊ देत. मग सख्खे मित्र असतील, तर ओळखतीलच मनीचा सल.

कॉलेज संपून दहा वर्षे झाली, पण त्याने मनात प्लॅन करून ठेवलेली 'बॅचलर्स ट्रिप' अजून होऊ शकलेली नाही. आता थोडेच दिवस राहिलेत, तर ही ट्रिप होणं त्याला फार फार आवश्यक वाटू लागलंय.

मग स्वतःच कार्याध्यक्ष बनून दोघांना फोन करून सांगतो. इम्रान बापडा तयारच असतो, पण बिझी अर्जूनभाऊंना इमोशनल ब्लॅकमेल करून रडातराऊतच घोड्यावर बसवावं लागतं. काम आहे, पैसे कमवायचेत- हे कारण तर आहेच, पण इम्रानसोबत असलेला जुना हिशेब हेही.

तर असं एकदाचं एकत्र गाठोडं बांधल्यावर टीम लीडर कबीर तिघांना घेऊन सहलीला निघतो. जुनी भांडणे, रुसवेफुगवे, रागवारागवी, गुजगोष्टी, पार्ट्या, डान्स आणि कतरिना- हे सारे होत असतानाच काही प्रसंग असे घडतात, की तिघांनाही जगण्याकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याचे आपापल्या परीने साक्षात्कार होतात. वेगळे पर्स्पेक्टिव्ह मिळतात. एकमेकांसोबत घालवलेल्या क्षणांना नुसत्याच 'मित्रांचे हितगुज' यापलीकडे आणखीही वेगळा अर्थ मिळतो. आता जगलेले हे अफाट क्षण, जगणं श्रीमंत करून टाकण्याची ताकद असलेली, नव्याने मिळालेली वेगळी दृष्टी घेऊन तिघे निरोप घेतात.

Zindagi-Na-Milegi-Dobara-030610_55_1.jpg

***

अगदी साधीसोपी सरळ कथा. अत्यंत प्रेडिक्टेबल. मुळात 'कथा' म्हणावं की नाही, असाच प्रश्न पडेल. पण हेच या सिनेम्याचे बलस्थान ठरते. त्या मित्रांच्या जगण्याला, त्यांच्या जाणीवांच्या अख्ख्या संचाला नवे आयाम देणारे निरनिराळे प्रसंग आपल्याला स्पर्शून जातात. झोया अख्तर रियली हॅज डन अ फँटॅस्टिक जॉब. स्पेनमधल्या निसर्गाचे चित्रपटात केलेले चित्रण अत्यंत मोहक, हिप्नॉटायझिंग. सर्वांच्या चांगल्या अभिनयाने सजलेली एकूण एक फ्रेम जिवंत वाटेल, याची पूर्ण काळजी घेतली आहे.

ऑफ बीट सिनेम्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या अभयदेओलने या कमर्शियल सिनेम्यातही मस्त कमाल केली आहे. मी गेलो होतो फक्त त्याच्यासाठी (आणि सिनेमा संपल्यावर सर्वात जास्त लक्षात राहिलाही तोच), पण कंप्लीट पॅकेज वॉज अ स्वीट रिफ्रेशमेंट. ऋतिकच्या चाहत्यांनाही मेजवानी. मस्त दिसतो आणि वावरतो. कतरिनाचे दिसणे-वावरणे तिच्या आजवरच्या सार्‍या सिनेम्यांपेक्षा जास्त आवडले. फरहान अख्तरच्या आजवर इरिटेटिंग वाटण्यार्‍या आवाजातल्या कवितांमुळे कथानकाला एक वेगळेच सखोल परिमाण मिळते. 'वक्त के गहरे सन्नाटे, वक्त ने सभी को है बांटे..' सारख्या जावेदअख्तरसिग्नेचरस्टाईलमुळे ते सारे प्रसंग कमालीचे परिणामकारक वाटतात. अभिनय, ते सारे कथानकातल्या प्रसंगांचे तुकडे, संवाद, गाणी कुठेही उथळ होत नाहीत. दोन प्रसंगांत कुठेही सिनेमा रेंगाळल्याचे जाणवत नाही. अत्यंत ओघवत्या शैलीत चित्रित झालेले छोटेछोटे सस्पेन्सेसही रंगत आणतात. उगाच आपल्याला 'थ्रिल्ड' करून सोडण्यासाठी त्याचा वापर केला नाही, हे जाणवतं आणि आवडतंही. शंकरएहसानलॉयचं संगीत आधीच फेमस झालं आहे. 'सेनोरिटा..' गाणं आपल्याला ताल धरायला, रक्त सळसळायला लावणारं.
या सार्‍यापुढे क्वचित कुठेतरी वाटलेल्या अतर्क्य गोष्टींकडे आणि इतर तांत्रिक गोष्टींकडे फारसं लक्ष गेलं नाही.

पोहायला येत नसलेला, स्कुबा डायविंग मधल्या एन्लायटनिंग शांततेनंतरचा ऋतिक. आकाशात उडण्याचा, उंचीचा फोबिया असलेला, पण ते करून करून झाल्यानंतर जग जिंकल्याच्या आवेशातला फरहान. 'बुल-रन'साठी आयुष्य पणाला लावायला तयार झालेला, हेही करून बघायचेय- म्हणणारा अभय. नासिरुद्दीनला भेटल्यानंतर 'प्रश्न हा मुळी प्रश्न नव्हताच!' हा साक्षात्कार झालेला फरहान. टोमाटिना फेस्टिव्हल मध्ये 'आता ही शेवटचीच मस्ती, पुन्हा होणे नाही!' अशा थाटात सामील झालेले सारे.. किती साधे प्रसंग. पण पुन्हा पुन्हा आठवणारे. अस्वस्थ करणारे. आश्वस्तही करणारे.

***

आपल्याला आयुष्यात शेवटी हवं असतं तरी काय? तर याचं उत्तर नीट स्वतःलाच पटेल असं कुणी देऊ शकेल असं वाटत नाही. भुतकाळाची भुतं मानगुटीवर वागवत आणि भविष्याची चिंता करत आपला अख्खा जन्म जातो. जगणं हातातून कधी निसटून गेलं तेच शेवटपर्यंत कळत नसावं.
'शेवटी एकदा वाटून गेलं, जगणं हे जगणं नव्हतंच..
निकराने जगण्याच्या लायकीचं, हे आयुष्य नव्हतंच!'
असं सार्‍यांचं होत असेल का? आला क्षण साजरा करणं आयुष्यभर सार्‍यांचंच राहून जात असेल का?

आत्ता, आत्ताचा हाच एक क्षण आपला आहे. नंतरचं काही खरं नाही. गो फ्रेंड्स. इट्स अ बिग ट्रीट.

***

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्हय व्हय बरोबर झिमर झिमर ग आता फॅन क्लबच काढावा ह्याचा. वय झालं लक्षात राहिना. पण बरोबर लिंक दिली आहे विपूत. Happy

आजच हा चित्रपट पाहिला आणि मुद्दाम मायबोलीवर ह्याविषयी काही लिहिलं गेलं आहे का ते शोधून काढून वाचलं. शिळ्या कढीला ऊत कशाला आणायचा ह्या विचाराने इथे लिहिणार नव्हते पण पहिल्याच पानावर 'पाएया,पाएया' दिसलं आणि म्हटलं, स्पेनच्या व्हेकेशनसारखंच इथे येऊन लिहिणं predestined दिसतं Proud

तर कुठलाही चित्रपट आम्ही हल्ली 'वरातीमागून घोडं' योगावर पाहतो त्याप्रमाणे आज टीव्हीवर लागलेला दिसला म्हणून सहज पाहायला घेतला. अगदी कोरी पाटी घेऊन ! पार्ल्यात 'जिन्दामिन्दो'चा उद्धार झालेला आणि त्यावरुन दात विचकलेले पुसटसे आठवतात पण त्याव्यतिरिक्त चित्रपटाचे प्रोमोज, परीक्षणं, गाणी हे बहुतेक आमच्या आंतर्देशीय स्थलांतराच्या काळात झाल्याने सगळंच मिस केलं होतं.
चित्रपट सुरु झाल्या झाल्या तीन मित्रांची कहाणी, एकंदरीत जोक्स, राहणीमान ह्या सगळ्यांवरुन सारखा 'दिल चाहता है'च आठवायला लागला. एकदा इतका यशस्वी, ट्रेंडसेटर चित्रपट काढल्यावर परत फरहान आणि झोयाला हाच विषय घ्यायचं काय नडलं होतं असं वाटायला लागलं. DCH शी तुलना करता करता समोर जे चाललंय ते एंजॉय करुन निखळपणे बघताच येणार नाही असंही एका टप्प्यावर वाटलं. पण तीन मित्रांनी पाण्यात बुडी मारली आणि हळूहळू चित्रपट आत झिरपायला लागला. पाण्याबाहेर आल्यावर ह्रितिकला साक्षात्कार होण्याच्या क्षणाला चित्रपटाने जी पकड घेतली ती अगदी शेवटापर्यंत. शेवटचा बुलरनचा प्रसंग तर चक्क प्रतिकात्मक वाटला. वरच्या काही जहाल पोस्टस वाचता ते रसग्रहण इथे लिहायचा धीर होत नाही Proud
काही गोष्टी अतर्क्य वाटल्या ... चलता है I तशा त्या कुठल्या चित्रपटात नसतात ? फरहानची शायरी नाही आवडली. सहजता नाही वाटली. पण तिघं आपापल्या जागी एकदम फिट्ट आहेत. कॅटरिना एकदम गोड दिसलीय आणि लैलाच्या भूमिकेत चपखल शोभलीय. नताशा ठीकठाक पण दोष काढण्यासारखंही काही नाही. गाणी स्वतंत्र ऐकायला अविस्मरणीय वगैरे नाहीत पण पडद्यावर ऐकताना छान वातावरणनिर्मिती करतात. चित्रपट अगदी नेत्रसुखद.
परत बघायला आवडेल का आणि बघितला तर तितकीच मजा येईल का ते माहीत नाही पण आजचं पाहणं एकदम वसूल ( आम्ही फुकटातच पाहिला तरीही ...:फिदी: )

रच्याकने, साजिर्‍या, तू लिहिलेलं परीक्षण आधी वाचलं असतं तर बघेस्तोवर इतकं छान काहीतरी बघायला कधी जमणार ह्या विचाराने त्रास झाला असता त्यामुळे आधी हा धागा वाचनात आला नाही हे बरंच झालं Happy

Pages