जिंदगी.. शायद ना मिले दोबारा!

Submitted by साजिरा on 19 July, 2011 - 07:04

कबीर. एका संपन्न घरातला, बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा. थोडा मनस्वी. अजून सडाफटिंग. पण नुकताच एका इंटेरियर डिझायनरला प्रपोज 'करून बसलाय'. आपली दोघांची कामे एकमेकांना पुरक आहेत- त्यामुळे आपले जमेल असे तो तिला सांगतोय. तीही खुश. एवढे तिला सांगितले हेच नशीब. कारण हा थोडा अबोल, इंट्रोव्हर्ट. मनातलं सहज दुसर्‍याला न सांगणारा.

अर्जून. हा वर्कोहोलिक. म्हणजे कॉलेजात असताना प्रेमबिम कधीकाळी केलेलं. पण पैशाच्या मागे धावणं, कामाला वाहून घेणं आड आलं. मग प्रेमभंग. त्यानंतर ते विसरण्यासाठी कदाचित, कामाला आणखीच वाहून घेतलं. पैसा है तो जहान है. लंडनमध्ये एका कंपनीत अत्यंत बिझी फायनान्शियल ब्रोकर म्हणून काम करतोय. बर्‍यापैकी पैसेही कमवतो.

इम्रान. हाही हळवा. कवीमनाचा, मनस्वी. पण उपजतच उत्तम विनोदबुद्धी लाभलेला. आणखी एक म्हणजे, याच्या बापाबद्दल याला बराच तरूण झाल्यावर कळते- ही एक सतत दुखरी नस घेऊन वावरणारा. ते विसरण्यासाठीच की काय, पण सतत गलछबूपणा करण्याची सवय, हौस. पण कवीमनाच्या सार्‍यांसारखीच याचीही गोची. जगण्यासाठी काम कसलं करतोस?- या प्रश्नाचं नीट उत्तर याला देता येत नाही.

zindagi-na-milegi-dobara-wallpapers-08.jpg

या तीन मित्रांची कहाणी- म्हणजे झोया अख्तरचा 'जिंदगी मिले ना दोबारा'. स्वीट अँड क्युट अभय देओल, बिगेस्ट हंक ऋतिक रोशन आणि सो-कॉल्ड-गाय-नेक्स्ट-डोअर फरहान अख्तर- असली तगडी रिफ्रेशमेंट. सोबत सुप्रसिद्ध कतरिनाबाई, देव-डी फेम काल्की. जावेद अख्तरचे संवाद आणि कविता. शंकर-एहसान-लॉयचं संगीत. झोया अख्तरचं तरूणाईला भावणारं अत्यंत फ्रेश टेकिंग. काय बिशाद आहे पिक्चर आपटण्याची?

***

कबीरचं लग्न ठरतं, तसा तो अस्वस्थ होतो. आपले सडाफटिंग दिवस आता संपतील, याची हळहळ. सांगणार कुणाला? तर कॉलेजातल्या एकेकाळच्या त्या दोन जीवलग मित्रांना. पण तेही असं अ‍ॅक्रॉस टेबल बसून भडाभडा पाच मिनिटात बोलून टाकणं त्याच्यासारख्याला कसं शक्य आहे? तर नीट वातावरण निर्मिती होऊ देत. जरा आठ दिवस कॉलेजचे दिवस आठवत गुजगोष्टी होऊ देत. मग सख्खे मित्र असतील, तर ओळखतीलच मनीचा सल.

कॉलेज संपून दहा वर्षे झाली, पण त्याने मनात प्लॅन करून ठेवलेली 'बॅचलर्स ट्रिप' अजून होऊ शकलेली नाही. आता थोडेच दिवस राहिलेत, तर ही ट्रिप होणं त्याला फार फार आवश्यक वाटू लागलंय.

मग स्वतःच कार्याध्यक्ष बनून दोघांना फोन करून सांगतो. इम्रान बापडा तयारच असतो, पण बिझी अर्जूनभाऊंना इमोशनल ब्लॅकमेल करून रडातराऊतच घोड्यावर बसवावं लागतं. काम आहे, पैसे कमवायचेत- हे कारण तर आहेच, पण इम्रानसोबत असलेला जुना हिशेब हेही.

तर असं एकदाचं एकत्र गाठोडं बांधल्यावर टीम लीडर कबीर तिघांना घेऊन सहलीला निघतो. जुनी भांडणे, रुसवेफुगवे, रागवारागवी, गुजगोष्टी, पार्ट्या, डान्स आणि कतरिना- हे सारे होत असतानाच काही प्रसंग असे घडतात, की तिघांनाही जगण्याकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याचे आपापल्या परीने साक्षात्कार होतात. वेगळे पर्स्पेक्टिव्ह मिळतात. एकमेकांसोबत घालवलेल्या क्षणांना नुसत्याच 'मित्रांचे हितगुज' यापलीकडे आणखीही वेगळा अर्थ मिळतो. आता जगलेले हे अफाट क्षण, जगणं श्रीमंत करून टाकण्याची ताकद असलेली, नव्याने मिळालेली वेगळी दृष्टी घेऊन तिघे निरोप घेतात.

Zindagi-Na-Milegi-Dobara-030610_55_1.jpg

***

अगदी साधीसोपी सरळ कथा. अत्यंत प्रेडिक्टेबल. मुळात 'कथा' म्हणावं की नाही, असाच प्रश्न पडेल. पण हेच या सिनेम्याचे बलस्थान ठरते. त्या मित्रांच्या जगण्याला, त्यांच्या जाणीवांच्या अख्ख्या संचाला नवे आयाम देणारे निरनिराळे प्रसंग आपल्याला स्पर्शून जातात. झोया अख्तर रियली हॅज डन अ फँटॅस्टिक जॉब. स्पेनमधल्या निसर्गाचे चित्रपटात केलेले चित्रण अत्यंत मोहक, हिप्नॉटायझिंग. सर्वांच्या चांगल्या अभिनयाने सजलेली एकूण एक फ्रेम जिवंत वाटेल, याची पूर्ण काळजी घेतली आहे.

ऑफ बीट सिनेम्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या अभयदेओलने या कमर्शियल सिनेम्यातही मस्त कमाल केली आहे. मी गेलो होतो फक्त त्याच्यासाठी (आणि सिनेमा संपल्यावर सर्वात जास्त लक्षात राहिलाही तोच), पण कंप्लीट पॅकेज वॉज अ स्वीट रिफ्रेशमेंट. ऋतिकच्या चाहत्यांनाही मेजवानी. मस्त दिसतो आणि वावरतो. कतरिनाचे दिसणे-वावरणे तिच्या आजवरच्या सार्‍या सिनेम्यांपेक्षा जास्त आवडले. फरहान अख्तरच्या आजवर इरिटेटिंग वाटण्यार्‍या आवाजातल्या कवितांमुळे कथानकाला एक वेगळेच सखोल परिमाण मिळते. 'वक्त के गहरे सन्नाटे, वक्त ने सभी को है बांटे..' सारख्या जावेदअख्तरसिग्नेचरस्टाईलमुळे ते सारे प्रसंग कमालीचे परिणामकारक वाटतात. अभिनय, ते सारे कथानकातल्या प्रसंगांचे तुकडे, संवाद, गाणी कुठेही उथळ होत नाहीत. दोन प्रसंगांत कुठेही सिनेमा रेंगाळल्याचे जाणवत नाही. अत्यंत ओघवत्या शैलीत चित्रित झालेले छोटेछोटे सस्पेन्सेसही रंगत आणतात. उगाच आपल्याला 'थ्रिल्ड' करून सोडण्यासाठी त्याचा वापर केला नाही, हे जाणवतं आणि आवडतंही. शंकरएहसानलॉयचं संगीत आधीच फेमस झालं आहे. 'सेनोरिटा..' गाणं आपल्याला ताल धरायला, रक्त सळसळायला लावणारं.
या सार्‍यापुढे क्वचित कुठेतरी वाटलेल्या अतर्क्य गोष्टींकडे आणि इतर तांत्रिक गोष्टींकडे फारसं लक्ष गेलं नाही.

पोहायला येत नसलेला, स्कुबा डायविंग मधल्या एन्लायटनिंग शांततेनंतरचा ऋतिक. आकाशात उडण्याचा, उंचीचा फोबिया असलेला, पण ते करून करून झाल्यानंतर जग जिंकल्याच्या आवेशातला फरहान. 'बुल-रन'साठी आयुष्य पणाला लावायला तयार झालेला, हेही करून बघायचेय- म्हणणारा अभय. नासिरुद्दीनला भेटल्यानंतर 'प्रश्न हा मुळी प्रश्न नव्हताच!' हा साक्षात्कार झालेला फरहान. टोमाटिना फेस्टिव्हल मध्ये 'आता ही शेवटचीच मस्ती, पुन्हा होणे नाही!' अशा थाटात सामील झालेले सारे.. किती साधे प्रसंग. पण पुन्हा पुन्हा आठवणारे. अस्वस्थ करणारे. आश्वस्तही करणारे.

***

आपल्याला आयुष्यात शेवटी हवं असतं तरी काय? तर याचं उत्तर नीट स्वतःलाच पटेल असं कुणी देऊ शकेल असं वाटत नाही. भुतकाळाची भुतं मानगुटीवर वागवत आणि भविष्याची चिंता करत आपला अख्खा जन्म जातो. जगणं हातातून कधी निसटून गेलं तेच शेवटपर्यंत कळत नसावं.
'शेवटी एकदा वाटून गेलं, जगणं हे जगणं नव्हतंच..
निकराने जगण्याच्या लायकीचं, हे आयुष्य नव्हतंच!'
असं सार्‍यांचं होत असेल का? आला क्षण साजरा करणं आयुष्यभर सार्‍यांचंच राहून जात असेल का?

आत्ता, आत्ताचा हाच एक क्षण आपला आहे. नंतरचं काही खरं नाही. गो फ्रेंड्स. इट्स अ बिग ट्रीट.

***

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परिक्षण मस्त लिहिलंय. मुव्ही पण एक्क्दम झक्कास आहे. एकदा बघायला छान आहे.
द फेमस 'सिनोरिटा' तीनही हिरोजनी आपल्या स्वतःच्या आवाजात गायलं आहे.

'शेवटी एकदा वाटून गेलं, जगणं हे जगणं नव्हतंच..
निकराने जगण्याच्या लायकीचं, हे आयुष्य नव्हतंच!'
>>> क्या बात हें, मान गये.... मुव्ही एकदम मस्त आहे, बर्‍याच दिवसांनी चांगला मुव्ही पाहायला मिळाला...

*

मस्त सिनेमा. बर्‍यापैकी प्रेडिक्टेबल वळणं घेत जातो, पण तरीही मजा येते. किंबहुना तोच 'मेसेज' आहे. तुमच्या आमच्या आयुष्यात निराळं निराळं असं काय घडणार असतं नाहीतरी? पण जे घडतंय त्यातच एक 'गंमत' कुठेतरी लपून बसली आहे, तिचा शोध हीच या प्रवासाची मजा.
'मी कोण आहे' आणि 'मला नेमकं काय हवं आहे' हे सनातन प्रश्न - या तिघांच्या आयुष्याच्या एका टप्प्यावर त्यांना त्यांची काय उत्तरं सापडली त्याची ही मस्त रंगलेली कथा.

छोटीशी सुधारणा :
>> जगण्यासाठी काम कसलं करतोस?- या प्रश्नाचं नीट उत्तर याला देता येत नाही.
तो कॉपीरायटर असतो ना? आणि गाड्या उडवत नसला तरी बर्‍या स्थितीत दिसतो.

मस्त मुव्ही. छान लिहीलेय परिक्षण. पण थोडा ओवरहाईप्ड. आणि अभय देओलची डायलॉग डिलिवरी आणि बॉडी लॅन्गवेज मला ऑड वाटली.. तुम्हाला नाही का? . रितिक आणि फरहान कूल. कतरिना कसली फ्रेश आहे..

आज पाहिला.. स्वातीताईशी सहमत...
पण चित्रपटात बर्‍याच ठिकाणी आयुष्य एकदाच मिळतं, आजमध्ये जगून घ्या हा थॉट वरवर भिडला.. i mean तेच आणि तेच वाटलं... त्याच्या तुलनेत "रॉक ऑन" किंवा ३ इडिअट्स मधे तो कमालीच्या तीव्रतेने पोचला होता.. अर्थात हे माझं वैयक्तिक मत...
Direction of photography ला पैकीच्या पैकी मार्क्स!! इट्स ब्युटिफुल!! Happy

मस्त लिहिलय.

नासिरुद्दीनचा एकच प्रसंग तो इतका का ग्रेट आहे याची साक्ष पटवून देणारा. फरहाननेही छान दिलाय तो सीन.

स्कूबा डायव्हिंगनंतर लॉन्चमधे किंवा स्पेनच्या त्या भन्नाट सुंदर रस्त्यांवरुन ड्रायव्हिंग करत असताना या तिघांमधे झिरपत असलेली मानसिक शांतता, अंतर्मुखता आपल्याला चक्क जाणवते सिनेमा बघताना.
फरहानच्या मनात उमटत रहाणार्‍या कविता, सलमान हबिबला एकाच वेळी तीव्रतेनं भेटावसं वाटणं आणि ऐनवेळी कच खाणं, र्‍हितिक रोशनची सुरुवातीची अपटाईट बॉडीलॅन्ग्वेज आणि त्याचं नंतर सैलावत जाणं, फरहान आणि त्याच्यातला सुरुवातीचा तणाव, त्याचं कॅट्रिनाशी डोळ्यांतून बोलणं, अभय देओलच्या मनावरचं आपल्यालाही जाणवणारं पण सगळं तर ठीक आहे तरी कशासाठी असं वाटवणारं दडपण हे सगळं खूप सहज आपल्यापर्यंत पोचतं. हे फार ग्रेट वाटलं मला.
शिवाय सिनेमा संपवलायही परफेक्ट नोटवर.
खूप खूप दिवसांनी असा इतका प्रसन्न अनुभव देणारा सिनेमा बघायला मिळाला. कमालीची सहजता आहे दिग्दर्शनात.

झकास ..
मुव्ही बद्दल काय बोलणार.. लिहिलय सगळ्यांनी ऑलरेडी.. ह्रितिक-फरहान-अभय !!! Blush
शर्मिलानी लिहिलेले प्रसंग पण सुंदर !!
एक बाकी मजाय , हे तिघं ड्राइव्ह करताना कुठल्याही रस्त्यावर यांच्या कार व्यतिरिक्त एकही कार कधीही दिसत नाही :)..

मस्त लिहीलंय! खूप अतिप्रचंड आवडला सिनेमा. परत परत पाहायला आवडेल.
अभय देओल सोल्लिड क्युट आहे, मला तो आयेशा मध्ये पण आवडला होता. ह्रितिक हॉट, फरहान कूल. तिघांचीही व्यक्तिमत्त्व वेगळी आहेत, त्यांना एकत्र आणण्याची कल्पनाच भारी आहे.
ख्वाबोंके परिंदे, सॅनोरिता गाणी तर अगणित वेळा ऐकून झाली Happy

राखी. तू फक्त आयेशा मध्ये अभय देओल ला बघितले असशील तर You have missed a lot. त्याचे सगळे ८-१० सिनेमे बघ.
<<< अनुमोदन रुनी :).
अभय देओल खरच कॅरॅक्टर्स शी फार प्रामाणिक असतो Happy
सोचा न था , हनीमुन ट्रॅव्हल्स , मनोरमा सिक्स फीट अंडर, लक्की ओय, देव डी, आयेशा आणि जिंदगी सगळ्यात आवडला.. हि इज डिफरंट Happy

शर्मिला, अगदी!
मला तो सगळा प्रसंगच भलताच आवडला बापाला भेटण्याचा. मुलगा नुसत्या भेटीच्या कल्पनेने इतका ओव्हरव्हेल्म झालेला, आणि बाप इतका अलिप्त! चांगला, पण अलिप्त! भेटल्या क्षणापासून इमरान (फरहान) सतत त्याच्या डोळ्यांमधे ती 'ओल' शोधत असतो, आणि ती सापडतच नाही! प्रत्यक्ष संवादांतून जे पुढे स्पष्ट होतं, ते आपल्याला आधीच जाणवलेलंच असतं.

Pages