|| रेशीमगाठी ||

Submitted by शांतीसुधा on 28 June, 2011 - 14:44

रेशीमगाठी, म्हंटलं तरी करकचून आवळता येत नाहीत आणि जर खरंच मनाचे बंध जुळलेले असतील तर गाठ सैल असली तरी सुटत नाहीत. मग त्या रेशीमगाठी लग्नाआधीच्या परिचयातून, प्रेमातून निर्माण झाल्या असोत किंवा अगदी व्यवस्थित कांदेपोहे खाऊन बांधलेल्या असोत.... आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या रेशीमगाठी बर्‍याचवेळा इतक्या करकचून आवळलेल्या असतात की त्यात दोघांपैकी एकाचा किंवा काहीवेळा दोघांचाही आणि पर्यायाने त्या पूर्ण कुटुंबाचा बळी दिला-घेतला जातो.

लग्नबंधनात अडकलेली अनेक जोडपी असंही म्हणताना आढळतात की लग्नाआधीच बरं होतं, लग्नं करून पस्तावलोय/पस्तावलेय इ.इ. जेव्हा एकत्र रहाणं अशक्यच होतं तेव्हा काहीजण कायद्याचा आधार घेवून वेगळे होतातही.....पण असं करून (खरं पाह्यला गेलं तर) त्यांचे प्रश्न कितपत सुटलेले असतात किंवा वाढलेले असतात हे त्यांच त्यांनाच ठावुक.

लग्न न केलेले किंवा चहा-पोह्यांच्या कार्यक्रमातून फारसं यश न लाभलेले, स्वत:चं स्वत:च न जमवता आलेले अनेक जण आजूबाजूला दिसतात. काही जणांची गाडी ही नको-ती/ हा नको तो असं करत करत लग्न करण्याच्या/जमवण्याच्या वयाच्या स्टेशन वरून कधीच सुटलेली असते. कारणं काहीही असोत हे सगळं आपल्याला आपल्या समाजात पहावयास मिळतं.

वधुवर-सूचक मंडळांच्या नोंदवह्या आणि मॅटर्निटी नर्सिंग होम्स मधील नोंदी (खर्‍या दाखवल्या तर) ह्या तर समाजाच्या खर्‍या प्रगतीचा आरसाच असतो. कारण संपूर्ण समाज जीवन वैयक्तिक जीवनाशी सांगड घालत तिथेच गुरफटलेलं असतं. वधू-वर सूचक मंडळांमधील नोंदवल्या गेलेल्या उपवर वधु-वरांसाठीच्या (अवाजवी) अपेक्षा असोत किंवा गर्भलिंग निदान करून स्त्रीभ्रूण हत्या असोत हे सगळंच एकमेकांत बांधलं गेलं आहे. कितीही वैयक्तिक असा म्हटला तरी अतिशय सामाजिक आणि तितकाच ज्वलंत विषय.

आपल्या सगळ्यांनाच उपवर अशा वधू आणि वर या दोघांच्या आणि त्यांच्या आई-वडीलांच्या वाजवी-अवाजवी अपेक्षा माहिती आहेत त्यामुळे त्या इथे लिहीणे हा या लेखाचा हेतू अजिबात नाही. खरंतर अशा पद्धतीच्या अपेक्षा, त्यानंतर येणारा फोलपणा, लग्न करायच्या आधी त्या उपवर मुला-मुलींची लग्न म्हणजे काय आणि ते कशासाठी करतात किंबहुना ते का करायचं? किंवा करायचंच की नाही? ह्या सगळ्या बाबतीत पुरेसा विचार झालेला असतो का? हा एक मोठा प्रश्न आहे.

काही जणांना लग्न म्हणजे उत्तमोत्तम दाग-दागिने, कपडे घालून विविध प्रकारच्या केशरचना करून स्टेजवर मिरवणे असंच वाटत असतं. उपवर मुला-मुलींच्या पालकांना त्यांच्या स्वत:च्या वैवाहिक आयुष्यातून मिळालेला बहुमूल्य शहाणपणा (??) आपल्या मुला-मुलींबरोबर वाटून घ्यावा, त्यांच्याशी याबाबतीत अतिशय मोकळेपणाने बोलावं असंच वाटत नाही. त्यामुळेच तर खरं ९९% प्रश्न निर्माण होतात/झालेले असतात.

मागे काही वर्षांपूर्वी मला एका नेट-मित्राची इ-मेल आली होती. मला म्हणजे ती त्याने सगळ्यांनाच ग्रुपवर पाठवली होती. इ-मेलचं शीर्षक होतं अ‍ॅलीस इन वंडरलॅन्ड आणि तशीच काही अंशी कथाही जुळवली होती. पण मला यातली अ‍ॅलीस कोण आणि वंडरलॅन्ड काय हे लक्षात आल्याने त्याला प्रतिसादाची मेल लिहिली......"आखूड शिंगी बहुदुधी अशी गाय मिळणं अवघडच. आपल्या प्राथमिकता आपणच ठरवायच्या (अगदी आई-वडीलांना थोडं बाजूला ठेवावं लागलं तरी) त्या प्राथमिकतां प्रमाणे निर्णय आपला आपणच घ्यायचा. जेव्हा एखादा निर्णय आपणच घेतलेला असतो तेव्हा आपसूकच त्याची जबाबदारी आपणच उचलतो आणि जर आपण तेवढे समजुतदार असू तर घेतलेल्या निर्णयाशी प्रामाणिक राहून तो टिकवण्याच्या दृष्टीने स्वत:हून अधिक प्रयत्न करतो. यातच आपण मोठं (ग्रो) होत असतो." मला ताबडतोब त्याचं उत्तर आलं, "माझ्या इतक्या सगळ्या संपर्कां मधुन, मित्र-मैत्रिणीं मधुन फक्त तूच माझी इ-मेल खर्‍याअर्थाने वाचलीस आणि समजून घेतलीस. मला उत्तर आवडलं". व्यक्ती विचारी असेल तर बर्‍याचवेळी हा सगळा विचार चालू असतो फक्त निर्णय घेण्यासाठी दोन शब्दांचं पाठबळ कुठलाही निर्णय न-सुचवता दिलेलं (हे महत्त्वाचं) लागतं. पण बहुतांशी उपवर मुलं-मुली या सगळ्याचा विचार करताना दिसत नाहीत. साहजिकच लग्न होवून आणि न होवून सुद्धा प्रश्न सुटत नाहीतच.

पुण्यात साथ-साथ म्हणून परिचयोत्तर विवाह जुळवणारी एक संस्था आहे. वर संशोधनाची अपेक्षा कमी पण संस्थेविषयी कुतुहल अधिक म्हणून मी सुद्धा कधीतरी त्या संस्थेची पायरी चढले होते. मला तिथे दिला जाणारा एक फॉर्म बर्‍यापैकी भावला. म्हणजे त्याने वधु-वर शोधायला प्रत्यक्षपणे कितपत मदत होते ते माहीत नाही (कारण यात कितीही गणित आणण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा उपयोग नसतो., आवडी-निवडी जुळणे, विचार जुळणे याची मोजदाद करून हिशेब करून लग्न जुळवता येत असतं तर चहापोहे काय वाईट?) पण स्वत:चे विचार स्वत:लाच समजायला, ते पक्के व्ह्यायला मदत होते हे नक्की. मला तर वाटतं सगळ्या उपवर मुला-मुलींनी अगदी पूर्णपणे साथ-साथ स्टाईल मध्ये फॉर्म भरण्यापेक्षा एकदा स्वत:चा खुंटा बळकट करण्यासाठी स्वत:च एक स्वाध्याय करावा. त्यात पहिल्या टप्प्यात स्वत:च्या, इतरांच्या, आई-वडीलांच्या अपेक्षा लिहून काढाव्यात. (हा प्रयोग प्रामाणिकपणाने आणि स्वत:च एकट्याने करावा). मग त्यातील महत्त्वाच्या अशा दहा अपेक्षा शॉर्टलिस्ट कराव्यात. त्यांची पुन्हा एकमेकांशी तुलना करून पहावी म्हणजे एक असेल आणि एक नसेल तर काय वाटेल? इ. अशाप्रकारे तुलना केल्यावर त्या दहा अपेक्षा उतरत्या क्रमाने मांडाव्यात. त्यातील पहिल्या पाच अपेक्षा (म्हणजे याशिवाय चालूच शकणार नाही) पहाव्यात. त्यावर पुन्हा विचार करावा आणि मगच पुढे काय ते ठरवावं. मग अपेक्षां मध्ये अगदी काळ्या-गोर्‍या रंगा पासून ते घरची आर्थिक परिस्थिती, करीअर नोकरी ते बौद्धिक पातळी, सवयी, आवडी-निवडी (या सगळ्यां मध्ये केवळ नुसत्या अपेक्षाच ठेवून उपयोग नसतो तर स्वत: कडे सुद्धा तेवढ्याच चिकित्सेने आणि तटस्थपणे पहायला जमलं पाहीजे.......नाहीतर बर्‍याचवेळा अनेकजण नुसत्याच अपेक्षा करतात)याचा समावेश असावा.

आता चष्मा नको ही एक महत्त्वाची (?) अट असते. मग एखाद्याला/एखादीला लग्नानंतर चष्मा लागला तर काय घटस्फोट घेणार? गंमतच आहे. चोखोबांच्या "ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलीया रंगा" ह्या शिकवणुकीचा पार बोर्‍या वाजवत लोकांना कायम बाह्य रंगाने काळी मुलगी नको असते.......मग एखाद्या गोर्‍या मुलीचं अंतरंग कितीही काळं असलं तरी......पत्रिका बघणे आणि त्यातून मंगळ आहे म्हणून नकार तर कांदेपोह्यांपर्यंतचा प्रवासच दुर्धर करून टाकतो तर काही जण मुलगी पाहिल्यानंतर मंगळ आहे असे कारण पुढे करतात. अगदी दोन एकाच जाती मधल्या कुटुंबांत सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असू शकतात म्हणून मुलगा/मुलगी विशिष्ट जातीतीलच पाहीजे यासाठी हट्ट धरण्यात मतलब आहे की नाही हे आपणच ठरवावे. आहार हा काही जणांना कळीचा मुद्दा वाटू शकतो कारण शाकाहारी व्यक्तींना मांसाहार अजिबात चालतच नसेल (म्हणजे समोर सुद्धा पहावत नसेल) तर अवघड होवून बसतं. खरंतर पत्रिका पहाणे, विशिष्ट पोटजात, विशिष्ट शहरं [पुण्यासारख्या शहरात (अमुकच पेठेत किंवा भागात), मुंबईत अमुक एकाच लाईनवर (वेस्टर्न दादर वगैरे उत्तमच पण बोरीवली, अंधेरी वेस्ट, चांगलं, मालाड ठाणा डोंबिवली चालेल शिवडी, सायन, चुनाभट्टी नकोच. पनवेल खूपच लांब आहे], परदेशातील स्थळे यांसारख्या इतर अनेक उपविषयांची अपेक्षा या अंतर्गत चर्चा करायची असल्यास प्रत्येकी एक एक प्रकरण सहज लिहीता येईल.

१) कांदेपोहे पद्धतीत काहीच मुद्दे एखाद्या व्यक्तीचे दिसू शकतात. उदा. बाह्यगोष्टी, शिक्षण, नोकरी (खरी माहिती दिल्यास), घरची पार्श्वभूमी (जुजबी........प्रत्यक्ष लग्न करून घरात गेल्याशिवाय कोणाचेच खरे स्वभाव कळत नाहीत)
२) प्रेमविवाहात सुद्धा प्रेमाने आंधळे झाल्यामुळे काही गोष्टी दिसत असून न-दिसल्या सारख्या होतात आणि मग लग्नानंतर डोळे उघडू शकतात.
३) परिचयोत्तर विवाहात यातील काही धोके कमी असतात. आपल्याला व्यक्तीशी बोलता येतं (व्यक्ती प्रामाणिक असेल तर अनेक गोष्टी बोलून ताडता येऊ शकतात), व्यक्तीच्या देहबोलीवरून डोळ्यांच्या हालचालीवरून व्यक्ती प्रामाणिक आहे की नाही हे समजू शकते.
४) रंग, रूप, नोकरी, पैसा, स्टेट्स, पत्रिका, राहण्याचे विशिष्ट ठिकाण, विशिष्ट पोटजात, विशिष्ट शिक्षण, सिनेमातील विशिष्ट अभिनेता किंवा अभिनेत्री सारखेच दिसणे, एखादा खेळ येणे, एखादी कला येणे, स्वयंपाक करता येणे, पैसे भरपूर कमवून आणावेत, अती शिकलेली आणि करिअरिस्टिक मुलगी नको, श्रीमंत आई-बापांची एकुलती एक असली तर चांगलं आहे, एकच भाऊ असेल तर आदर्श स्थळ, एक बहीण चालेल पण जास्त बहिणीच आणि भाऊ नाही म्हणजे त्या मुलीची घोड चूक आहे (हे मुलींच्या बाबतीतले) तर मुलावर कोणाची जबाबदारी नको, स्वतंत्र फ्लॅट असल्यास प्राधान्य, स्वत:ची गाडी हवी, एकुलता एक मुलगा सोन्याहून पिवळं, एक बहीण उत्तम, एक भाऊ चालेल, जास्त भाऊ नकोतच (हे मुलांच्या बाबतीतले) यासगळ्या भाऊगर्दीत आरोग्य, स्वभाव, चारित्र्य ह्या गोष्टी हरवलेल्या असतात. आपण वरील गोष्टींचा विचार नक्की का करतो? लग्न हे कशासाठी करतात? म्हणजे आपल्याला सर्वार्थाने जोडीदार हवा असतो, त्याच्याबरोबर आपल्याला पूर्ण आयुष्य काढायचं असतं. वरील मुद्दे हे विचार करण्यासारखे नक्कीच आहेत पण प्राधान्य क्रम नक्की कोणता असावा हे आपलं आपणच ठरवा. जो काही निर्णय घ्याल तो कुठल्याही फॅन्टसीमधे घेऊ नका. आयुष्याची सत्य खूप वेगळी असतात.

वरील अधिकाधिक मुद्द्यांमध्ये फारसा दम नसला तरी याच गोष्टीं मध्ये रेशीमगाठी अडकलेल्या असतात. एक मात्रं खरं की जो निर्णय घेतला तो व्यवस्थित (दोघांनीही) निभावून नेण्यात आणि एकत्र ग्रो होण्यात यशस्वी सहजीवनाचं यश दडलेलं आहे. त्यात एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम (केवळ शारीरिक आकर्षण नाही) हे सुद्धा तितकच महत्त्वाचं आहे. त्यात दोघांनी मिळून सर्व जबाबदार्‍या पार पाडणे, घरातील कामं वाटून घेणे या गोष्टी ओघाने आल्याच. त्यात सुद्धा एक वेगळीच मजा असते. ताणण्याने काहीच साध्य होत नसतं पण जोडून सामोपचाराने राहण्यातच खरी कसोटी आणि यश दडलेलं असतं हे महत्त्वाचं. दोघांनीही आपापल्या आणि एकमेकांच्या घरच्यांना समजून घेऊन (घरच्यांनी सुद्धा त्यांना समजून घेणं महत्त्वाचं) दोन घरं खर्‍या अर्थाने जोडावीत. या सगळ्याचा अधिक विचार व्हावा असं मला वाटतं. उपवर मुला-मुलींनी अतिशय वस्तुनिष्ठपणे या सगळ्याचा विचार केला पाहीजे आणि आपल्या रेशीमगाठी करकचून न-बांधल्या जाता घट्ट आपोआप कशा होतील यावर भर दिला पाहीजे. स्वत:च्या प्राथमिकता स्वत:च ठरवून जबाबदारी घेण्यास शिकलं पाहीजे येवढंच मनापासून सुचवावंसं वाटतं.

गुलमोहर: 

शांतीसुधा, खरच चांगले विचार मांडलेत. त्यातला अतिशय सुंदर अन समर्पक मांडलेला विचार म्हणजे - स्वतःच्या अपेक्षांचं मूल्यमापन.
<<एकदा स्वत:चा खुंटा बळकट करण्यासाठी स्वत:च एक स्वाध्याय करावा>>
किती आवश्यक आहे हे? असं एकाजागी स्वस्थं बसून, कागद पेन ह्यासहं केलेला, लिहून काढलेला विचार म्हणजे स्वत:शी संवाद.
माझ्यावेळी हा लेख नव्हता... Happy
पण माझ्या लेकाच्यावेळी त्याला हे करायला लावेनच. आणि जी मुलं आता लग्नाच्या वयाची आहेत, त्यांना आवर्जून हे सांगेन.

शांतीसुधा, खुप छान विचार आणि त्यातुन आलेला सहजसुंदर लेख....
खुप पटले आपले विचार......
<आखूड शिंगी बहुदुधी अशी गाय मिळणं अवघडच. आपल्या प्राथमिकता आपणच ठरवायच्या (अगदी आई-वडीलांना थोडं बाजूला ठेवावं लागलं तरी) त्या प्राथमिकतां प्रमाणे निर्णय आपला आपणच घ्यायचा. जेव्हा एखादा निर्णय आपणच घेतलेला असतो तेव्हा आपसूकच त्याची जबाबदारी आपणच उचलतो आणि जर आपण तेवढे समजुतदार असू तर घेतलेल्या निर्णयाशी प्रामाणिक राहून तो टिकवण्याच्या दृष्टीने स्वत:हून अधिक प्रयत्न करतो. यातच आपण मोठं (ग्रो) होत असतो."<> खुप खुप अनुमोदन....
हेच एका मित्राला पटविण्याच्या प्रयत्नात आपला लेख इमेल केला तर (तुम्च्या नावासकट) तर चालेल का?

जाई-जुई आणि मुग्धानंद प्रतिक्रीये बद्धल धन्यवाद. लेखातील विचार हे अधिकाधीक लोकांपर्यंत पोहोचणे हाच हेतू आहे त्यामुळे नावासहित लेख शेअर करायला काहीच हरकत नाही.

शांतीसुधा,

आपण म्हणता ते खरे आहे.

<<<@बेफिकीर, माझा रेशीमगाठी हा लेख फार लांबलचक नव्हता. अर्थात तसाही फारसा उपयोग झालाच नसता.....तुम्ही ज्या पद्धतीने लेख वाचता त्यावरून म्हणते आहे.>>>

मला खरच नाही वाचता येत तुमचं लेखन! क्षमस्व!

या लेखात तुम्हाला जे काही म्हणायचे असेल तिथपर्यंत मी पोचलोच नाही आहे. अगदी येथपर्यंत वाचलं मी:

या सगळ्याचा अधिक विचार व्हावा असं मला वाटतं. उपवर मुला-मुलींनी अतिशय वस्तुनिष्ठपणे या सगळ्याचा विचार केला पाहीजे आणि आपल्या रेशीमगाठी करकचून न-बांधल्या जाता घट्ट आपोआप कशा होतील यावर भर दिला पाहीजे.

असे व्हायला पाहिजे आणि तसे व्हायला पाहिजे असेच आहे ना? की आणखीन काही नावीन्यपूर्ण विचारही आहे यात?

आपल्यावर टीका करण्यात कुणालाही आनंद मिळणार नाही शांतीसुधा! लेखन मुद्देसूदच आहे की आपलं! पण मुद्यावर यायला वेळ लागत आहे हे तरी मान्य कराल? की निगेटिव्ह प्रतिक्रिया सहनच होत नाही अशी ज्याती उगाचच ख्याती आहे त्या बेफिकीरप्रमाणे आहात आपण ?

Happy प्लीज डोन्ट मिसअंडरस्टॅन्ड !

-'बेफिकीर'!

@ बेफिकीर, निगेटीव्ह प्रतिक्रीया देण्यास काहीही हरकत नाही. फक्त प्रतिक्रीया देणार्‍यांनी लेख पूर्ण वाचावा आणि लेखाला धरून प्रतिक्रीया लिहाव्यात येवढईच माफक अपेक्षा आहे.

मी काही तुमच्यासारखी एक्सपर्ट लेखक नाही. त्यामुळे "तुमच्या म्हणण्याप्रमाणे" मुद्यावर यायला वेळ लागतही असेल. हळूहळू तयार होईन की तुमच्या प्रतिक्रीयांमुळे. Happy

आपल्याला लेखात फक्त शेवटची काही वाक्यं वाचून काहीच नविन नाही असं वाटत असेल. शक्य आहे कारण तुम्हाला त्या विषयातील सर्व विचार माहिती असतील. लेख फक्त तुमच्यासाठी किंवा तुमच्यासारख्या सर्वज्ञानींसाठी लिहीत नाही ना. याआधीही (माबो व्यतिरीक्त) अनेकांनी आम्हाला यातून बरंच काही नविन मिळाले अशी प्रतिक्रेया दिली आहे. ते आणि मी पामर, तुमच्या कडे सर्वज्ञानीपणाची शिकवणी लावली नाही म्हणून हो. Happy

तुम्ही मिसअंडरस्टॅन्ड करणार नाही याची खात्री आहे......कारण आपण सर्व जाणताच !!

अरे वा... छान आहे हाही लेख.

दाद म्हणते तसे आमच्याही वेळी असले लेख नव्हते Happy पुढच्याला ठेच मागचा शहाणा आणि एकंदर मध्यमवर्गीय वातावरणातून येणारे गुण दोष याच वळणाने आमची नैय्या पार लागली- नैय्या शोधायचे स्वातंत्र्य आम्हाला होते एव्हडेच Happy

एकंदरीत हा विषय मात्र ईतर अनेक विषयांसारखाच गूढ आहे. जितके शोधाल तितके दर वेळी काहितरी नविन सापडेल.

@ योग आणि दाद, "तुमच्यावेळी हा लेख नव्हता......माझ्यावेळीही नव्हता Happy मी अगदी कागद पेन घेऊन यादी केली नसली तरी थोडा-विचार जरूर केला. हा लेख लग्नानंतर (अनुभवांअंती) लिहीलेला आहे. म्हंटलं आपल्याला नाही निदान इतरांना तरी उपयोग व्हावा.

@ योग, >>> एकंदरीत हा विषय मात्र ईतर अनेक विषयांसारखाच गूढ आहे. जितके शोधाल तितके दर वेळी काहितरी नविन सापडेल.>>> पण बेफिकीर सारख्या मोजक्यांना सर्व माहीती आहे. म्हणून काहीच नविन नाही असं वाटतं. म्हणजे त्यांच्यावेळी कोणीतरी असे विचार त्यांना आधी सांगीतले असणार किंवा त्यांनी स्वतः विचार केला असणार. किती भाग्यवान! Happy

छान माहीती...हा लेख पोहचला हो...सुधा मॅडम Happy

अंदाज आहे, कालांतराने आपले लेखन 'प्रभावि' होईल....आणि थोडक्यात स्पष्ट करुन आवरते घेउन आपण आपले सर्व मुद्दे लोकांसमोर प्रभाविपणे मांडु शकाल.

शुभेच्छा!

छान आहे. माझ्या ओळखीतल्या काही confused souls साठी थोडंसं मार्गदर्शन म्हणुन मी त्यांना forward करेन. अर्थात तुमच्या नावासकट.

पण खरंच जरा paragraphs करायला हवे होते. लांबच लांब लिखाण वाचायला बोअर होतं. आता कालच हा विषय जोरदार चावला होता, म्हणुन आज पुर्ण वाचला, नाहीतर जरा कंटाळवाणा वाटला असता. म्हणजे लिखाण नाही म्हणत आहे, तर त्याचा लांबलचक एकच para.

वा वा!
पॅरा पाडलेत. आता कसा लेख बघणीय आणि वाचनीय झालाय.
माझ्यामते लग्न ही एक प्रकारचीझाकली मूठ आहे. लग्नानंतर अनुभवांतीच उघडणार हळूहळू.
मग तुम्ही ठरवून लग्न करा,प्रेमात पडून करा किंवा कसेही.
वही पेन घेऊन आपल्या अपेक्षा मांडून घेतल्यातरी त्या पूर्ण होतीलच असे नाही.
(यावर माझाच एक जुना प्रहसनात्मक लेख यादी आठवला इथे पहा.) Happy

कागदावरच्या अपेक्षांत परफेक्ट ठरणारा,लग्नानंतर एक वेगळाच माणूस म्हणून समोर येऊ शकतो तर लग्नानंतरच्या पहिल्या पहिल्या दिवसांत आखडू,आगाऊ किंवा इतर दुर्गूण युक्त वाटणारा माणूस काही वर्षांनी समंजस बनू शकतो.

शांतीसुधा.... बहुतेकांच्या बाबतीत "त्या"वेळी मार्गदर्शन मिळाले नाही, अशीच परिस्थिती आहे. आता पुढच्यास ठेच मागचा शहाणा, या न्यायाने फरक पडला तर चांगले.

कागदावरच्या अपेक्षांत परफेक्ट ठरणारा,लग्नानंतर एक वेगळाच माणूस म्हणून समोर येऊ शकतो तर लग्नानंतरच्या पहिल्या पहिल्या दिवसांत आखडू,आगाऊ किंवा इतर दुर्गूण युक्त वाटणारा माणूस काही वर्षांनी समंजस बनू शकतो.>>> अगदी अगदी!!!! एकमेकांशी ओळख झाल्यापासून ते लग्नानंतर एकमेकांच्या सहवासात राहण्यापर्यंतच्या ह्या कुणाच्या बाबतीत लहान तर कुणाच्या बाबतीत मोठ्या कालावधीत आयुष्यात बरीच स्थित्यंतरं येत असतात. त्यामुळे माणूस बदलत जातो. आधीचाच माणूस नंतर राहिलंच असं नाही... त्यामुळे फार अपेक्षा ठेवण्यात अर्थ नसतोच...

लेख कालच वाचला होता, पण प्रतिक्रिया आज देते आहे. मला तुमची शैली आवडली. छान लिहिता तुम्ही. पु.ले.शु. Happy

@ saati, परिच्छेद पाडणं म्हणजे इथे विरळ लिहीणं असं अपेक्षित आहे. हे लक्षात आल्यावर ताबडतोब परिच्छेद पाडले. आम्ही वेगळा मुद्दा चालू झाला की परिच्छेद पाडतो. ऐनीवेज, कन्स्ट्रक्टीव्ह फिडबॅक (निगेटीव्ह असला तरीही) दिला तर कोणीही स्विकारेल. थॅंक्स टू मनीमाऊ!! तुम्हाला देखिल धन्यवाद.

सानी आणि चातक, शुभेच्छांबद्धल धन्यवाद!

परिच्छेद पाडणे हा कन्स्ट्रक्टीव्ह फीडबॅक कसा काय? मजबूत लिहिलेलं विरळ विरळ करणं म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह झालं ना?

हा लेख आवडला Happy (पण फारसा पटला नाही.)

लग्न करायच्या आधी त्या उपवर मुला-मुलींची लग्न म्हणजे काय आणि ते कशासाठी करतात किंबहुना ते का करायचं? किंवा करायचंच की नाही? ह्या सगळ्या बाबतीत पुरेसा विचार झालेला असतो का? हा एक मोठा प्रश्न आहे.>>> हे अगदी खरंच असावं. असा विचार व्हायला हवा Happy

जो निर्णय घेतला तो व्यवस्थित (दोघांनीही) निभावून नेण्यात आणि एकत्र ग्रो होण्यात यशस्वी सहजीवनाचं यश दडलेलं आहे.>> नक्कीच !

मात्र एकत्र ग्रो होता येतं ह्यावर जरा डाऊट आहे...

जो निर्णय घेतला तो व्यवस्थित (दोघांनीही) निभावून नेण्यात आणि एकत्र ग्रो होण्यात यशस्वी सहजीवनाचं यश दडलेलं आहे.>> बरोबर. त्यासाठी दोघंही समजुतदार आणि त्या नात्याला "सर्वात महत्वाचे" मानणारे हवेत.

डुआय, तुला कसला डाउट आणि का वाटतोय? Happy

लेख चांगला आहे पण सर्व समावेशक वाटला नाही... आज ही कनिष्ठ मध्यम वर्गीय आणी गरीब कुटुंबातील मेजॉरिटी मुलींची लग्ने ही तिच्या आईवडीलांच्या इच्छेनुसार होतात.. मेजॉरीटी आईवडीलाना आपल्या मुलीचे लग्न ही एक चिंता वाटते.. याचा अर्थ त्या आई वडीलांचे मुलीवर प्रेम नसते किंवा त्याना तीची काळजी नसते असा नाही पण केवळ आपल्या बरोबरीचे घराणे किंवा बर्‍या परिस्थीतीत असलेला मुलगा एवढे बघुनच बहुसंख्य लग्ने होतात.. यात मुलीच्या इच्छा आकांक्षा किंवा तिच्या वैचारीक पातळीचा विचार करण्याची कुणाला गरजच भासत नाही.. बाकी सगळे ठीक आहे ना मग घे जुळवुन हाच सल्ला अश्या प्रत्येक मुलीला तिच्या जन्मदात्याकडुन मिळत असतो.. लग्नानंतर तेच तुझे घर, बाईनेच समजुतीने घेतले पाहीजे , कसाही असला तरी तुझ्या कुंकवाचा धनी आहे, तुझ्या मुलांचा बाप आहे तेंव्हा समजुतीने तुलाच वागले पाहीजे असे उपदेशामृत तिला रोज पाजण्यात येते.. आणी दुर्दैवाने त्या मुली सुद्धा त्याच गोष्टी आपल्या नशीबाचे भोग म्हणुन मान्य करत असतात... या मुलीना कुठे असतो अश्या तर्‍हेने विचार करण्याचा चॉईस?? कोण विचारते तिला अपेक्षा?? प्राथमीकता?? तिची प्राथमीक अपेक्षा फक्त आपले लग्न व्हावे आणी आपल्या आईवडीलाना जबाबदारीतुन मुक्त करावे एवढीच असु शकते.. Sad

@ राम, >>>आज ही कनिष्ठ मध्यम वर्गीय आणी गरीब कुटुंबातील मेजॉरिटी मुलींची लग्ने ही तिच्या आईवडीलांच्या इच्छेनुसार होतात.>>> मी असं म्हणत नाहीये की आई-वडिलांना न विचारता लग्न करा म्हणून. मला नाही वाटत की आता इतकी वाईट परीस्थिती समाजात आहे म्हणून. असेल तर काही अंशी याला मुलींचे पालकच जबाबदार आहेत.

>>>मेजॉरीटी आईवडीलाना आपल्या मुलीचे लग्न ही एक चिंता वाटते..>>> इथेच तर ग्यानबाची मेख आहे. मुलीला जर व्यवस्थित शिकवलं, तिला स्वत:च्या पायावर उभं केलं आणि तिच्यात आत्मविश्वास निर्माण केलात तर तिच्या लग्नाची चिंता कशाला वाटायला हवी?

>>>पण केवळ आपल्या बरोबरीचे घराणे किंवा बर्‍या परिस्थीतीत असलेला मुलगा एवढे बघुनच बहुसंख्य लग्ने होतात.. >>> हे बरोबरीचे घराणे म्हणजे काय? आर्थिक परिस्थीती समान असलेले, घरात समान क्रमांकाचे सदस्य असलेले, घरात समान संस्कार असलेले?? आता मला सांगा अगदी एकच पोटजात असलेल्या दोन घरांमध्ये जेवण बनवण्याच्या पद्धती वेगळ्या असू शकतात. आणि अशा "बरोबरीच्या" घराण्यांमध्ये लग्न करून दिलेल्या घरात सासू सुनेला कायम (सासूच्या मरणापर्यंत) आमच्याकडे असं करत नाहीत. आमच्याकडे असं चालत नाही. तुझ्या आई-वडिलांनी तुला काही शिकवलं नाही इ. इ. बोलते हे ऐकलेली, पाहिलेली अनेक उदाहरणे दिसतील. आणि या बरोबरीच्या घराण्यात जर नवरा मुलगा नपुंसक असेल आणि हे लग्नानंतर मूल का होत नाही हे समजल्यावर सूनच वांझोटी इ.इ. आणि त्यावरून तिचा छळ....किती उदाहरणं आहेत. जरा नविन सुधारित विचार करूया.

>>>. यात मुलीच्या इच्छा आकांक्षा किंवा तिच्या वैचारीक पातळीचा विचार करण्याची कुणाला गरजच भासत नाही.. ................आणी दुर्दैवाने त्या मुली सुद्धा त्याच गोष्टी आपल्या नशीबाचे भोग म्हणुन मान्य करत असतात... >>> आता कसं तुम्ही जरा माणसात असल्यासारखे मुद्दे आणलेत. मुलीच्या इच्छा आकांक्षांचा, तिच्या वैचारिक पातळीचा विचार झालाच पाहिजे. तो फक्त आई-वडिलांनी न-करता तिने स्वत:ने सुद्धा केला पाहिजे, करायला शिकलं पाहिजे....आई-वडिलांनी यात तिला मार्गदर्शन केलं पाहिजे. अगदी ठरवुन लग्न झालं तरी लग्नासाठीचा होकार-किंवा न-कार याचा हक्क त्या मुलीलाच असला पाहिजे. आई-वडिलांनी स्वतः कोणाच्याही दबावाखाली न येता (कारण नातेवाईक सुद्धा आई-वडिलांवर प्रचंड दबाव आणत असतात) तिच्यावर कोणत्याही प्रकाराने दबाव आणता कामा नये. जर मुलीला चांगलं शिकवुन स्वतःच्या पायावर उभं केलं आणि तिच्यात आत्मविश्वास निर्माण केला तर: जुळवुन घे, तुझ्या कुंकवाचा धनी, तुझ्या मुलांचा बाप वगैरे सांगण्याची वेळ येणारच नाही.

आता तर खरं मुलींचा जन्मदर घटल्यामुले आणि मुलींच्या शिक्षणाला शासनातर्फे भरपूर मदत मिळत आहे त्याचा मुलींच्या पालकांनी जबरदस्त फायदा करून घेतला पाहिजे. आपल्या मुलीला व्यवस्थित शिकवलं पाहिजे. इथुन पुढे सगळ्या मुलींच्या आई-वडिलांनी दबुन रहायचं नाही. मुलांची संख्या वाढल्यामुळे मुलांना लग्नं करण्यासाठी कमी मुली असतील. जिथे पुरवठा कमी तिथे मागणी अधिक यान्यायाने मुलींच्या आई-व्डिलांची बाजू वरचढ होईल. आजीबात हुंडा न देता, लग्नाचा खर्च करायचा असल्यास ५०-५०% करणे याअटींवर मुलींनी लग्नाला तयार व्हावे. आणि वराकडील लोभी लोकांना धडा शिकवावा.
मुलींना विचार करायला चॉईस नसतो म्हणजे आपण (समाज, नातेवाईक, आई-वडिल) तो देत नाही. आपण मुद्दामहून सुरूवातीपासून त्यांना कोणत्याच निर्णयप्रक्रीयेत सहभागी करून घेत नाही. भाऊ असेल तर सगळीकडे भाऊ बरोबर जाईल किंवा भाऊच निर्णय घेईल. भावाला अक्कल नसली तरी तो म्हणेल ते प्रमाण हे असले प्रकार आपणच (स, ना, आ-व) मुलींच्याबाबतीत करत असतो. अनेकवेळा मुलींना शिकवुन काय उपयोग तिच्या शिक्षणाचा उपयोग लग्नानंतर मुलाकडच्यांना होईल आम्हाला होणार नाही म्हणून मुलीला शिक्षण नाकारतात. "केवढा पुढचा विचार? " फक्त उलट्या दिशेने. म्हणजे मुलीचा तिच्या भवितव्याचा विचार नाहीच. आई-वडिलांचं सुद्धा भरपूर चुकतं. सगल्यांनीच आपले विचार बदलायला हवेत. पुढच्यास ठेच लागल्याने त्यांनी शहाणं होऊन मागून येणार्^यांना शहाणं व्हायला संधी आणि मार्गदर्शन दिलं पाहिजे. नुसतेच प्रश्न उपस्थित करून किंवा चर्चा करून होणार नाही. प्रत्यक्ष कृती करायला हवी. ती कशी करावी यासाठी एक उपाय सुचविण्याचा प्रयत्न मी लेखात केला आहे.
आज मितीला कोणतंही लग्नं ठरवताना मुलगा आणि मुलगी दोघांचीही वैद्यकीय चाचणी करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. लग्नाच्या निर्णयाप्रत येण्याआधी त्यांना एकमेकांशी भेटून-बोलू दिलं पाहिजे. काय बोलायचं काय विचार करायचा यासाठी थोडं मार्गदर्शन लेखात मिळेल.
मुलीला चांगलं शिकवलं, तिच्यात स्वत्:च्या पायावर उभं राहण्याचा आत्मविश्वास निर्माण केला की खरंतर आई-वडिलांची ७०% जबाबदारी संपायला हवी. आई-वडिलांनी आपल्या मुला-मुलींशी मोकळेपणाने संवाद साशण्याचं कसब आत्मसात केलं, त्यांच्याशी मैत्री केली की पुढची २०% जबाबदारी संपली. १०% कशीही संपेल. त्यात येवढं टेन्शन घेण्याची गरज नाही. विचार बदला आजूबाजूची परिस्थीती आपोआप बदलेल. (हेच मुलांच्या पालकांसाठीही सांगता येईल. टाळी एका हाताने वाजत नसते.)

आता कसं तुम्ही जरा माणसात असल्यासारखे मुद्दे आणलेत>>

व्वा! राम यांना उद्देशून हे वाक्य??????

तुम्हाला म्हणायचंय काय?

मुलीला व्यवस्थित वगैरे शिकवायला भारतात ८० टक्क्यांना वेळ नाहीये. काय करता बोला????

कै च्या कै आपलं!

-' बे फि की र'

@ सानी आणि satti, परफेक्ट जोडीदार (म्हणजे कागदावरील अपेक्षांप्रमाणे) मिळणं दुरापास्तच आहे. म्हणूनच जोडी आणि सहजीवन परफेक्ट होण्यासाठी दोघांनीही त्यासाठी विचार केला पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे, कधी पडतं घेऊन (कधी पडतं घ्यायला लावून) एकत्र ग्रो व्हायला पाहिजे.

असं परफेक्ट मिळणं मुष्कील आहे म्हणूनच पूर्णपणे अंधारात उडी मारण्यापेक्षा डोळसपणाने प्रवेश केलेला कधीही चांगला. त्याचं थोडंफार मार्गदर्शन (संपूर्ण नाही) म्हणून हा लेख. काही मुद्दे नक्कीच राहीले असतील. शंका नाही. मला जे अधिक महत्त्वाचे वाटले ते मुद्दे थोडक्यात मांडलेत. Happy

Pages