महिकावतीची बखर - भाग ३ : प्रताप बिंबाची कोकणावर स्वारी ...

Submitted by सेनापती... on 15 May, 2011 - 09:38

मागील भाग -
महिकावतीची बखर - भाग १ : प्रस्तावना ...
महिकावतीची बखर - भाग २ : बखरीतील जुनी नावे ...

शके १०६० (इ.स. ११३८)ची गोष्ट. सरस्वती नदीच्या काठी असलेल्या पालणपुर देशात अणहिलवाडपाटणवर चौलुक्य उर्फ सोळंकी नावाचे राजे राज्य करीत होते. त्यांच्या चंपानी उर्फ चांपानेर नावाच्या संस्थानावर बिंब ह्या आडनावाचे एक सूर्यवंशी क्षत्रिय कुल त्यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. ह्या बिंबांचा पैठण येथे राज्य करणाऱ्या भौम या क्षत्रिय राजघराण्याबरोबर घनिष्ट संबंध होता. भौम राजघराणे जसे महाराष्ट्रिक होते तसे चौलुक्य आणि बिंब देखील महाराष्ट्रिकच होते. शके १०६० साली गोवर्धन बिंब हा बिंब घराण्याचा राजा होता. त्याचा लहान भाऊ प्रताप बिंब याने उत्तर कोकणावर स्वारी करण्याची योजना शके १०६० मध्ये आखली. त्यावेळी उत्तर कोकणावर शिलाहारांचे राज्य होते. दक्षिण कोकणातील शिलाहारांचे राज्य कदंबांनी हिसकावून घेतलेले होते. गेली ५० वर्षे शिलाहार आणि कदंब यांच्या लढायांमध्ये कोकणात गोंधळ माजलेला होता आणि शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली होती. अशातच उत्तरेकडून चढाई करण्याचा मनोदय प्रताप बिंब याने नक्की केला. सोबत ८ प्रमुख अधिकारी आणि १० हजार फौज घेऊन तो मोहिमेस निघाला.

प्रताप बिंब चांपानेरवरून निघाला तो थेट नर्मदा उतरून, पैठण येथे भौम राजाकडे गेला. तिथे तो संपूर्ण फौजेसह तब्बल २ वर्ष राहिला. प्रताप बिंबला मोहिमेवर निघताना बहुदा पैशाची बरीच अडचण होती असे दिसते नाहीतर तो २ वर्षे काहीही न करता पैठण येथे बसून राहिला नसता. भौम राजाने सुद्धा त्याला जवळ ठेवून घेतले आणि त्याच्या १० हजार फौजेचा खर्च पाहिला याचा अर्थ त्यांच्याच निश्चित जवळचे संबंध होते. अखेर २ वर्षांनी त्याने पैशाची व्यवस्था लावली आणि तो मुंबई-ठाणे भागावर चाल करून आला. यायचा मार्ग मात्र त्याने थोडा उत्तरेवरून घेतला होता. पैठणवरून जुन्नरकडे आल्यावर तो घाट उतरून खाली यायच्या ऐवजी वर गेला आणि दमण म्हणजे सध्याच्या महाराष्ट्र-गुजरात उत्तर सीमाभागाकडून खाली चाल करून आला. कदाचित थेट हल्ला करण्याऐवजी उत्तरेकडून भगदाड पाडत खाली येणे त्याला जास्त सोपे वाटले असावे. ह्या वाटचालीत त्याला हरबाजी देशमुख हा शूर लढवय्या सामील झाला. भौमराजाने सुद्धा निघताना प्रतापबिंबला स्वतःकडची २ हजाराची फौज दिली. त्या फौजेचे नेतृत्व करायला त्याने सोबत दिला होता बाळाजी शिंदे. हा बाळाजी युद्धात प्रखर म्हणून प्रचंड नावाजलेला होता.

प्रताप बिंबाच्या फौजेने सर्वप्रथम दमण प्रांतावर हल्ला चढवला. तिथे राज्य करीत असलेला काळोजी सिरण्या नामक राजा प्रताप बिंबास लगेचच शरण आला. कालोजीच्या हाताखाली असलेला दमण ते चिखली हा भाग बिंबाने ताब्यात घेतला. प्रताप बिंबाने तेथील व्यवस्था पाहण्यासाठी हरबाजी कुळकरणी (कुलकर्णी) नावाचा अधिकारी नेमला आणि तो पुढे निघाला. उंबरगाव - डहाणू - तारापूर करत तो महिकावतीस उर्फ माहीम येथे येऊन पोचला. तेथे विनाजी घोडेल म्हणून कोणी राजा राज्य करीत होता. त्यास बिंबाने दूर सारले आणि देशाची स्थिती अवलोकन केली. त्यास असे आढळले की, शिलाहारांसारख्या सुसंस्कृत मराठ्यांच्या हातून अश्या शुल्लक लोकांच्या हाती इथली सत्ता गेल्यामुळे सुपीकता ओसरून, प्रदेश देशोधडीला लागला होता. नयनरम्य असे समुद्रतीर वैराण आणि उद्वस्त झालेले होते. हे सर्व पाहून प्रतापबिंब खूप दु:ख्खी झाला. त्याने पैठण आणि चांपानेरवरून ब्राह्मण आणि मराठे लोक आणून इथली वसाहत पुन्हा स्थिरस्थावर करावयाचा निर्णय घेतला. तसे पत्र त्याने आपला मोठा भाऊ गोवर्धन बिंब आणि पैठणला भौमाकडे रवाना केले. आपला पुत्र मही बिंब यास देखील इथे धाडून द्यावे असे त्याने आपल्या मोठ्या भावाला कळविले.

दुसरीकडे प्रताप बिंबाने आपला मुख्य प्रधान बाळकृष्णराव सोमवंशी याला ठाणे - साष्टी आणि मुंबईचा मुलुख काबीज करण्यासाठी पाठविले. त्याच्यासोबत किती फौज दिली हे मात्र बखर स्पष्ट करीत नाही. बाळकृष्णराव सोमवंशी याने पहिल्याच फटक्यात ठाण्यावर हल्ला चढवत यशवंतराव शिलाहार (शेलार) याला ठार केले आणि शिलाहारांची उरली सुरली सत्ता ठाण्यातून उपटून टाकली. बाळकृष्णराव सोमवंशी पुढे खाडी ओलांडून कळवा येथे पोचला. तेथे कोकाट्या नावाच्या कोण्या मराठ्याचा अंमल होता. तो बाळकृष्णरावास शरण आला. बाळकृष्णराव तिथून मुंबईच्या दिशेने निघाला आणि मढ येथे पोचला. तिथून तो जुहू मार्गे वाळूकेश्वरी पोचला. तिथे असलेले बाणगंगा तीर्थ आणि हनुमानाच्या प्रतिमा पाहून तो निश्चित आनंदाला असेल. त्याने फौजेसकट तिथे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आणि 'येथील सर्व देश रान होऊन गेला आहे. आपण स्वतः: एकदा येऊन पहावा' अश्या आशयाचे पात्र प्रताप बिंबास पाठविले. प्रताप बिंबाने माहीम प्रांताप्रमाणे वाळूकेश्वरी देखील वसाहत बसविण्याचा निर्णय केला.

प्रताप बिंबास दमण ते महिकावती आणि बाळकृष्णराव यास महिकावती ते वाळुकेश्वर हे अंतर पार करायला फार तर २ महिने लागले असावेत. गेल्या ५० वर्षातील लढाया - जाळपोळ यांनी प्रदेश इतका वैरण होऊन गेला होता की हा संपूर्ण प्रदेश हातात घ्यायला बिंबास फार प्रयास पडले नाहीत. पण खरे प्रयास पुढे होते. बाहेरून लोक आणून देश पुन्हा बसविणे हे काम नक्कीच सोपे नव्हते. १६४२-४४ मध्ये दादोजी कोंडदेव आणि मासाहेब जिजामाता यांना पुणे वसवताना जे कष्ट करावे लागले तेवढेच किंवा त्यापेखा जास्त कष्ट प्रताप बिंबास पडले असावेत. शेती, ग्रामसंस्था, व्यापार-उदीम हे पुन्हा सुरू व्हावे यासाठी त्याने काही निश्चित धोरणे आखली असतील. इ.स. ११४० मध्ये स्वतःच्या राजधानीचे गाव म्हणून त्याने केळवे-माहीम निश्चित केले. त्याचे कारण बखरकार असे सांगतो की, दमण ते वाळुकेश्वर हे अंतर २८ कोस असून (आजच्या भाषेत ८४ मैल किंवा १३४ किमी.) केळवे-माहीम हा त्याचा मध्य बिंदू आहे. राजधानीचे ठिकाण बनवूनही त्याने तिथे काही विशेष बांधकाम केले असावे असे वाटत नाही. कारण आज कुठल्याच प्रकारचे अवशेष संपूर्ण केळवे-माहीम प्रांतात आढळत नाहीत. पैशाची टंचाई आणि देश वसाहत बसवायच्या जबाबदारीमुळे त्याने बहुदा ते टाळले असावे.

काही महिन्यात प्रताप बिंबाचा मुलगा मही बिंब चांपानेर वरून महिकावतीस पोचला. त्याने देश वसाहत वसवण्यासाठी सोबत अनेक लोक आणले होते. त्यात ६६ मुख्य कुळे होती. बखरकार लिहितो की त्यात २७ सोमवंशी, १२ सूर्यवंशी आणि ९ शेषवंशी कुळे होती. या शिवाय वाणी, उदमी, गुजर, वैश्य, लाड, दैवज्ञ अशी काही कुळे होती. भौमाने जी कुळे पैठणवरून पाठवली त्यात मुख्य ब्राह्मण कुळे होती. शास्त्री, वैदक, पंडित, आचार्य, उपाध्ये, ज्योतिषी, पुरोहित ही यादी बखरकार देतो. ह्यातील प्रमुख कुळे घेऊन प्रताप बिंब वाळुकेश्वर येथे गेला. बाळकृष्णराव फौजेसकट जिथे मुक्काम करून होता तिथे त्याने स्वतःचा राज्यारोहणसमारंभ करून घेतला. ह्या समारंभानिमित्ताने त्याने शेषवंशीयांचे कुलगुरु असणाऱ्या गंगाधर नाईक सावखेडकर यांस पसपवली गाव तर राजपुरोहित असणाऱ्या विश्वनाथपंत कांबळे यांस पाहाड गाव इनाम दिला. प्रताप बिंब स्वतः काही काल वाहिनळे - राजणफर येथे राहिला आणि मग कान्हेरी येथील गुहेमध्ये देखील त्याने काही काळ मुक्काम ठोकला. मरोळ येथील महाळजापूर (एकूण २२ गावे), मालाड येथील नरसापूर (एकूण २२ गावे), उत्तन (२२ गावे) आणि घोडबंदर (एकूण ३३ गावे) अश्या विविध ठिकाणी त्याने नवीन वसाहत बसविली. ३ वर्षाकरिता व्यापारी जकात नाही असा बंदोबस्त देखील केला.

आज मुंबईमध्ये पसपवली, पाहाड, वाहिनळे - राजणफर ही गावे कोठे आहेत? ह्याबद्दल कोणी अधिक माहिती देऊ शकेल का?

क्रमश: ... महिकावतीची बखर - भाग ४ : बिंब घराण्याची ठाणे - कोकणची राजवट ...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पसपवली हे पोवाईच्या आसपासचे गाव होते. मला वाटते पोवाई तलाव बांधला तेव्हा या गावची बरीचशी जमीन पाण्याखाली गेली. असे वाचल्याचे अंधुकसे आठवते की या भागात कोणी पारसी उसाची शेती करीत असे. विकीवर सुद्धा ही माहिती होती असे वाटते. बहुधा भांडुप,पांजरापोळ या शीर्षकाखाली होती का? आता शोधावे लागेल.
पाहाड म्हणजे गोरेगावचा पूर्वेकडचा डोंगराळ भाग. खरे तर गोरेगाव पश्चिम हे बहुतेक सर्व दलदलीतून भराव घालून सन १९४८ च्या आसपास बनवलेले आहे. त्या वर्षी पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांसाठी गवर्न्मेंट कॉलनी (सध्याचे सिद्धार्थ नगर) ही वसाहत अक्षरशः दलदलीत पत्रे ठोकून लष्कराच्या बराकींसारखी बांधली गेली. त्यानंतर संपूर्ण ओशिवडें खाडी बुजवून मोतिलाल नगर,बांगुर नगर वगैरे वसाहती झाल्या. जुन्या काळी पाहाड किंवा पाहाडी हाच मुख्य इलाका होता आणि गोरेगाव हा त्याचा एक छोटासा भाग होता. रेल्वे आणि स्वामी विवेकानंद रस्ता(पूर्वीचा घोडबंदर रोड) झाल्यावर गेल्या दीडशे वर्षांत या सर्व भागाचा भूगोल बदलला. रेल्वे आणि रस्त्याच्या कडेने वस्ती वाढली आणि पाहाडी भाग दुर्लक्षित राहिला तो थेट अहमदाबाद रस्ता(पश्चिम द्रुतगती मार्ग) तयार होईपर्यंत. त्यानंतर मात्र पूर्व भागाची देखील लोकसंख्या भराभर वाढली. या विषयी असे सांगितले जाते की तत्कालीन ठाणे जिल्हा आणि मुंबई येथे १९४८ साली अलीकडच्या २००५ सालासारखी अतिवृष्टी झाली तेव्हा या नवीन बांधकामामुळे खाडीचा प्रवाह अडून संपूर्ण पश्चिम गोरेगाव जलमय झाले होते. दहीसर गावातही दहिसर नदीच्या पात्रात (पुलाखाली)मोठमोठे ओंडके अडकून पाणी गावात शिरले होते.
राजणफर विषयी नक्की माहिती नाही पण वान्दरें येथे राजण नावाचे गावठाण आहे.
वाहिनळे विषयी सुद्धा माहिती नाही पण विल्ले-पारले या जोडगावातले एक गाव (सध्याचे इर्ला) पूर्वी विहिळ्ळे होते असे जुने लोक सांगत. हे शक्य वाटते कारण आगरी क्रिस्टिअन भाषेत 'ळ','ड' चा 'र' आणि 'व' चा 'अ' होतो. आणि दुसरे म्हणजे ब्रिटिशांनी विशेषनावातल्या ळ साठी 'डबल एल' ही अक्षरे वापरलेली दिसतात (उदा.नाळा-सोपारा) जी विल्ले च्या स्पेलिंग मध्ये आत्ता-आत्तापर्यंत होती. अर्थात हा अंदाज आहे.

कांजुरचा ऐतिहासिक संदर्भ असल्यास कृपया द्यावा. कांजूरचा कानझुरे असा उल्लेख या बखरीत आहे. पण पुर्वी कांजुरला महसूल जमा करण्यासाठी यावे लागत असे, अशी माहिती ऐकिवात आहे. कृपया माहित असेल तर, संदर्भ द्यावा.