अनुदिनी परिचय-५: सेव्ह अँटिबायोटिक्स

Submitted by नरेंद्र गोळे on 12 April, 2011 - 20:40

७ एप्रिल २००११ रोजी जागतिक आरोग्यदिन साजरा करण्यात आला. यावर्षी, ‘प्रतिजैविक अवरोध’ हा विषय यासाठी निवडण्यात आलेला होता. याच कारणाने, भारतात हे काम हाती घेतलेल्या एका संघटनेच्या अनुदिनीची आज ओळख करून देत आहे.

अनुदिनीः सेव्ह अँटिबायोटिक्स http://save-antibiotics.blogspot.com/
(ह्या अनुदिनीशी संलग्न आणखीही दोन आनुदिन्या आहेत http://antibio-resistance.blogspot.com आणि http://wewantantibiotics.blogspot.com/. ह्या तीन्ही अनुदिन्या मिळून संस्थेच्या उद्दिष्टाच्या प्रचाराचे काम करतात.)

अनुदिनी लेखकः डॉक्टर अशोक ताम्हनकर antibio.resistance@gmail.com. राष्ट्रीय समन्वयक, प्रतिजैविक अवरोधाच्या व्यवस्थापनाकरताचा भारतीय पुढाकार. अनुदिनीवरही त्यांचा तपशीलवार परिचय उपलब्ध आहेच.

अनुदिनीचे घोषवाक्यः “Let us all JOIN together and spread a word for prudent use of antibiotics.”

"आपण सर्व एकत्र येऊन प्रतिजैविकांच्या सुयोग्य वापरासंबंधीची जागरूकता निर्माण करू या."

अनुदिनीची सुरूवातः मे २००८

अनुदिनीतील नोंदीः

http://save-antibiotics.blogspot.com/ -२००८ मध्ये एक, २००९ मध्ये नऊ, २०१० मध्ये आठ आणि २०११ मध्ये दोन अशा एकूण वीस नोंदी आहेत.

http://antibio-resistance.blogspot.com - २००८ मध्ये अकरा, २००९ मध्ये चौपन्न, २०१० मध्ये पस्तीस आणि २०११ मध्ये तेरा अशा एकूण ११३ नोंदी. तसेच,

http://wewantantibiotics.blogspot.com/ -२००८ मध्ये २६, २००९ मध्ये ६०, २०१० मध्ये ४२ आणि २०११ मध्ये १४ अशा एकूण १४२ नोंदी या अनुदिनी समुहात आढळून येतात.

अनुदिनीस मिळालेले पारितोषिकः अनुदिनीस “टॉप अँटिबायोटिक्स ब्लॉग-२०१०” हे पारितोषिक मिळालेले आहे.

अनुदिनीचे वाचकः क्लस्टर मॅपनुसार १७ एप्रिल २०१० ते ६ एप्रिल २०११ दरम्यान, या अनुदिनी समुहास जगभरातील एकूण ९० देशांतील, २,१४४ वाचकांनी भेटी दिल्या आहेत.

अनुदिनी कशासाठी वाचनीय आहे?

अनुदिनी पूर्णतः इंग्रजीत आहे. मुख्यतः वैद्यकीय व्यावसायिकांकरता आणि सुबुद्ध व जागरूक वाचकांकरता उपयुक्त अशी आहे. मात्र, यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचा संदेश घेऊनच ती उभी आहे. लोकांपर्यंत तो संदेश पोहोचवण्याकरताच हा सर्व खटाटोप आहे. म्हणूनच तिची दखल इथे घेत आहे. काय आहे बर तो संदेश? तो आहे खालीलप्रमाणे.

खालील पुस्तिका डॉ.अ.ज.ताम्हनकर यांनी तयार केलेली आहे. अनुदिनीवर तिचा थेट दुवा नाही. मात्र लेखकाशी झालेल्या प्रत्यक्ष संपर्कातून, लोकप्रबोधनार्थ तयार केलेल्या जागरण पुस्तिकेचा हा तर्जुमा, हाती आलेला आहे.

(ही माहिती निरनिराळ्या स्त्रोतांतून आणि प्रतिजैविक अवरोध विकसन थांबवण्याच्या/कमी करण्याच्या/मंदावण्याच्या उदात्त हेतूने गोळा केलेली आहे. कुणाही व्यक्ती/अधिकारी/कुठल्याही समाजाचा घटक यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा किंवा त्यांचा अनादर करण्याचा आमचा हेतू नाही. वैद्यकीय डॉक्टर्स आणि सरकारचे आरोग्य खाते, याबाबतीत कुठलेही निर्णय घेण्यास आणि कृती करण्याचा अंतिम अधिकार बाळगतात, ह्याची आम्हाला जाणीव आहे. जर कुणा वाचकास यात काही चूक आढळली तर त्यांनी ती आमच्या निदर्शनास आणावी. आम्ही ती दुरुस्त करू. जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याकरता आम्ही क्षमा प्रार्थितो. -डॉ.अ.ज.ताम्हनकर)

प्रतिजैविके म्हणजे काय? प्रतिजैविक-अवरोध म्हणजे काय?

प्रतिजैविके (antibiotics) म्हणजे, जिवाणूंमुळे होणार्‍या न्युमोनिया, कॉलरा, टायफॉईड इत्यादी रोगांवर, उपचार करण्याकरता वापरली जाणारी (अमोक्सिलिन, एरिथ्रोमायसिन, डॉक्सिसायक्लिन, सिप्रोफ्लोक्सासिन इत्यादींसारखी), महत्त्वाची औषधे असतात. जेव्हा आपण सतत प्रतिजैविके घेत राहतो, तेव्हा जिवाणू, प्रतिजैविकांच्या प्रभावापासून वाचण्याचे मार्ग शोधून काढू शकतात आणि “प्रतिजैविक-अवरोधक” बनतात. मग प्रतिजैविके काम करत नाहीत. जेवढी जास्त वेळा आपण प्रतिजैविके वापरू तेवढीच, जिवाणू प्रतिजैविक-अवरोधक बनण्याची शक्यता बळावते. म्हणून आपण गरज नसतांना प्रतिजैविके वापरू नयेत. महागडी आणि नवी प्रतिजैविके प्रभावी असू शकतात, मात्र त्यांचे उप-प्रभावही अनेक असू शकतात आणि अखेरीस जिवाणू त्यांनाही अवरोधक बनू लागतील. अलीकडील काही वर्षांत फारच थोडी, नवी प्रतिजैविके शोधली गेलेली आहेत. म्हणून जर आपण आजची प्रतिजैविके योग्य प्रकारे वापरली नाहीत आणि संसर्गकारक जिवाणू जर त्यांकरता अवरोधक झाले, तर आपल्याला आपल्या रोगांचे निवारण करतांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल.

प्रतिजैविकांबाबतचा अवरोध ही विश्वव्यापी समस्या होऊ पाहत आहे. भारताच्या प्रचंड लोकसंख्येमुळे, भारतात ही समस्याही जास्त तीव्र असेल. प्रतिजैविक-अवरोधक जैवसृजन व त्यांचा आढळ आपल्या सभोवताल जिकडे तिकडे –चिकित्सालये, आरोग्यकेंद्रे, मनुष्यमात्र, शेती, प्राणी, खते, अन्नपदार्थ, दूध, गटारे, पाणवठे, सांडपाणी, ज्याचा ज्याचा आपण विचार करू तिथे तिथे- होऊ लागलेला आहे. हे प्रतिजैविकांच्या बेदरकार/ अति-/ गैर- वापरामुळे घडून येत आहे. म्हणून आपण अवरोध विकसनाच्या संभाव्यतेस कमी करणारी उपाययोजना सुरू करायलाच हवी आहे. आपण सगळ्यांनी, योग्य उपाययोजना सुरू करण्यासाठी आणि या समस्येबाबतची जागरूकता वाढवण्यासाठी एक झाले पाहिजे.

जर आपण प्रतिजैविके गरज नसतांना वापरली, तर त्यांची गरज असेल तेव्हा ती काम करणार नाहीत. प्रतिजैविकांचा सर्वात अनावश्यक वापर सर्दीकरता होत असतो.

मी माझ्या सर्दीचा इलाज कसा करावा?

बहुधा सर्दी, खोकला किंवा घशाला पडणारी कोरड यांवरचा सर्वात उत्तम उपचार म्हणजे भरपूर पेय पान (पाणी पिणे) आणि विश्रांती घेणे हाच आहे. सर्दी एखादा हप्ता टिकू शकते, तिचे पर्यवसान खोकल्यात होऊ शकते ज्यात कफ पडतो. लक्षणे मोकळी करणारे अनेक सोपे उपाय आहेत, उदाहरणार्थ- पॅरासिटामोल. आरोग्यकेंद्रांतून राबवला जाणारा एक साधा उपक्रम, अनावश्यक प्रतिजैविकांचा वापर लक्षणीयरीत्या घटवतो असे दिसून येते. यात डॉक्टर रुग्णांना, सर्दी-खोकल्याकरता वापरावयाच्या, औषधांचा संचच देतात. त्यात दुःख-निवारक, श्वास-विमोचक, विना-प्रतिजैविक खोकल्याचे औषधी द्रावण, गरम पाणी प्यावे असा सल्ला देणारी पदके असतात. जर सर्दी एका हप्त्याहून जास्त टिकून राहिली किंवा श्वसनास त्रास जाणवू लागला अथवा छातीत दुखू लागले वा आधीचीच काही छातीत दुखण्याची तक्रार असेल तर, तुमच्या डॉक्टरला भेटा. साध्या सर्दीकरता प्रतिजैविके मिळणार्‍या रुग्णास कुठलाही लाभ वा सुधारणा पदरी पडत नाही, मात्र प्रत्यक्षात अनेक उप-प्रभावांस सामोरे जावे लागते.

मुलांना तर सारखाच सर्दी-खोकला होत असतो, त्याचेबाबत काय करावे?

जेव्हा ते शाळेत जातात आणि इतर मुलांसोबत मिसळतात तेव्हा, मुलांना सर्दी व खोकला होणे खूप सामान्यपणे घडणारी घटना आहे. जर लक्षणे टिकून राहिली तर, डॉक्टरांना भेटा मात्र प्रतिजैविके देण्याचा आग्रह धरू नका.

सर्दी-खोकल्याच्या उपचाराकरता प्रतिजैविके का म्हणून वापरू नयेत?

सर्व सर्द्या आणि बहुतेक खोकले व घशाला पडणार्‍या कोरडी ह्या विषाणूंमुळे होत असतात. प्रतिजैविके विषाणूंविरुद्ध काम करत नाहीत.

मग माझ्याकरता प्रतिजैविकांची उपाययोजना केव्हा केली जाईल?

मूत्रपिंड संसर्ग किंवा न्युमोनिया, दंतसंसर्ग, घावसंसर्ग यांसारख्या आजारांवर आणि मेनेंजायटिस सारख्या संसर्गांवर प्राण-रक्षक औषधी म्हणून तुमचे डॉक्टर प्रतिजैविके देतील.

प्रतिजैविक-अवरोध कसा टाळता येईल?

जर आपण प्रतिजैविके क्वचितच वापरत असू, तर आपण अवरोध विकसनाची गती मंद करू शकू. जेव्हा प्रतिजैविके दिलेली असतील तेव्हा त्यांची दिलेली पूर्ण मात्रा जिवाणूंचा संपूर्ण नायनाट करण्याकरता घेणे आवश्यक आहे. जर ती अर्धवट घेऊन सोडून दिली तर, काही जिवाणू अवरोध-विकसन करण्यासाठी मोकळे राहतील.

आम्ही रुग्णास खालील गोष्टी सुचवतो

१. रुग्णांनी प्रतिजैविकांचा अति-/अल्प-/गैर- वापर करू नये.

२. तुम्ही पुन्हा आजारी पडाल त्यावेळी वापरण्याकरता काही प्रतिजैविके शिल्लक ठेवू नका.

३. डॉक्टरने दिलेली सर्व औषधे संपेस्तोवर पूर्णपणे सेवन करा.

४. इतर कुणाकरता दिलेली प्रतिजैविके सेवन करू नका.

५. सर्दी व खोकल्या सारख्या विषाणूंसंसर्गांकरता प्रतिजैविके सेवन करू नका.

६. प्रतिजैविक-अवरोध टाळण्याकरता रुग्णांनी, नमुन्याचे योग्य वैद्यक-निदान केल्याशिवाय प्रतिजैविके स्वीकारू नयेत.

७. प्रतिजैविके डॉक्टरने सांगितली नेमकी तशीच घ्या.

८. सुधारित स्वच्छतासवयींनी संसर्ग टाळल्यास प्रतिजैविकांची गरजच कमी करता येईल. कुठलेही घाणीशी संबंधित काम केल्यावर आणि जेवणापूर्वी नेहमीच हात धुवावेत. परिसर स्वच्छ ठेवावा.

९. संसर्ग-साखळी तोडा. आजारी असाल तेव्हा घरीच राहा.

१०. “संसर्गांचा –विशेषतः अतिसार, उलट्या, सर्दी आणि खोकला यांमुळे होणार्‍या संसर्गांचा- प्रसार नियंत्रणात ठेवण्याचा, हात स्वच्छ धुणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे.”

११. गैरसमजः जर नाकातून वाहणारा स्त्राव पिवळा किंवा हिरवा असेल तर प्रतिजैविके आवश्यक असतात. वस्तुस्थितीः स्त्रावाचा रंग आणि प्रतिजैविकांची गरज यात कुठलाही संबंध असत नाही.

१२. गैरसमजः जर सर्दी तीन दिवसांहून जास्त टिकून राहिली तर प्रतिजैविके आवश्यक असतात. वस्तुस्थितीः सर्दी सर्वसामान्यपणे पाच ते सात दिवस टिकते क्वचित १० दिवस वा अधिकही टिकू शकते.

सर्वसाधारणपणे आपल्या शरीरात जिवाणूंनी, नेहमीच वसाहत केलेली असते. हे जिवाणू आपल्याला कुठलाही रोग न जडवता आपल्या शरीरात व आपल्या शरीरावरही राहतात. एवढेच काय ते आपल्याला उपयुक्तही असतात. उदाहरणार्थ आपल्या आतडीतील काही जिवाणू जीवनसत्त्वे तयार करतात. जेव्हा आपण प्रतिजैविके घेतो तेव्हा, आपण आपले जिवाणूंसोबत असलेले संतुलन विचलित होऊ देण्याचा धोका पत्करत असतो. असे संतुलन ढळल्यामुळे, आपल्या शरीरात असणार्‍या “सामान्य जिवाणूं” पैकी काही जाती प्रतिजैविक अवरोध विकसित करू शकतात आणि मग त्यांचा नायनाट करणे अवघड ठरू शकते. आपले जिवाणूंसोबत असलेले संतुलन बदलल्यास, सामान्यतः निरामय वसाहत करून राहणारे हे जिवाणू आपल्याकरता आजार आणू शकतात. इतकेच नव्हे तर ते नंतर हा अवरोध संसर्गकारक जिवाणूंनाही देऊ शकतात.

लक्षात ठेवाः अवरोधक जिवाणू श्रीमंत आणि गरीब, जाती आणि धर्म यांच्यात भेदभाव करत नाहीत. ते आपणा सगळ्यांनाच संसर्ग पोहोचवतात. जर आजची प्रतिजैविके निरुपयोगी झाली तर, आपल्याला कुणीही वाचवू शकणार नाही. भवितव्य अंधकारमय होईल.
.
http://nvgole.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम लेख.
(अशा विषयावर जुना लेख, त्याकाळी एकाही प्रतिसदाशिवाय याचे आश्चर्य वाटले.)

असे ऐकून, वाचून आहे की पशुधन उद्योगात प्रतिजैविकांचा खूप गैरवापर होतो ज्याचा प्रतिजैविक अवरोधास हातभार लागतो.

हे वाचायचे राहूनच गेले होते. सोप्या भाषेत प्रश्नोत्तरांच्या स्वरुपात दिलेली माहीती सर्वसामान्य व्यक्तीला खूप मार्गदर्शक आहे.
मानव, धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद.