वाघाची डरकाळी, ५० डेसिबेल आणि घराणेशाही ……….

Submitted by विशाल कुलकर्णी on 18 October, 2010 - 02:48

“माझी स्टाइल चोराल, पण विचारांचं काय. माझे विचार त्या स्टाइल चोरात येणार नाही. मराठीचा मुद्दा घेऊन जनतेत जाताहेत. तुमचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून मी मराठीचा मुद्दा हाती घेतला होता. हा जमलेला जनसागर याची साक्ष देतो!”

शिवतिर्थावर शिवसेनेचा वाघ पुन्हा एकदा गरजला. काल विजयादशमीच्या निमित्ताने नेहमीप्रमाणे होणार किं नाही होणार, सायलेंट झोन, ५० डेसिबेल अशा अनेक समस्यांमध्ये गुरफटलेला शिवसेनेचा दसरा मेळावा वाजत गाजत पार पडला. शिवसेनेच्या वाघाने पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत डरकाळी फोडली. आपल्या खुमासदार भाषणात साहेबांनी अनेक मुद्दे मांडले, अनेकांवर शरसंधान केले. त्यांची माहिती जवळजवळ सर्व मुख्य वर्तमानपत्रांतून आलीच आहे. या सभेत ५० डेसिबेलची मर्यादा ओलांडुन ९०-९५ डेसिबेलपर्यंत आवाज वाढला. खरेतर वाघाच्या डरकाळीला आवाजाची मर्यादा घालायची हाच मुर्खपणा वाटतो मला. वर्षातून एकदा येणार्‍या दसरा मेळाव्याला तरी हा नियम अपवाद ठरावा असे माझे प्रामाणिक मत आहे. कदाचित ते चुकही असेल पण एक सच्चा शिवसैनिक या नात्याने मलातरी असे वाटते. असो, आता किमान आठवडाभर हा मुद्दा मिडीयावाले चघळत राहतील. निखील वागळेंच्या आवाजाला अजुन धार चढेल. सामान्यजनातही हा मुद्दा वारंवार उगळला जाईलच. त्यामुळे त्यावर मला काहीही भाष्य करायचे नाही. तो माझा प्रांतही नाही.

मला माझ्या ब्लॉगवर त्याची दखल घ्यावीशी वाटली त्याचे कारण म्हणजे साहेब म्हणाले की…..

“शिवसेनेत घराणेशाही अजिबात नाही!”

यावेळी साहेबांनी केलेले विधान सॉलीडच आहे…

“शिवसेनेत घराणेशाही बिल्कुल नाही, असे सांगत बाळासाहेब म्हणाले, उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष त्या कृष्णकुंजवाल्यांनी केलं. मला समजल्यावर मी भडकलो. मी म्हटलं शिवसैनिकांना विश्वासात घेतल्याशिवाय आणि मी ठरविल्याशिवाय हे होता कामा नये. त्यानंतर शिवसैनिकांनी स्वतः उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदावर नियुक्ती केली, असेही आवर्जुन सांगितले. आमच्याकडे घऱाणेशाही नाही.”

गंमत अशी की साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे कृष्णकुंजवाल्यांनी म्हणजे राजनीच उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष केलं आणि वर हे आपल्याला आवडलं नाही म्हणून शिवसेनेचा त्याग केला. खरं खोटं राजना आणि साहेबांनाच माहीत, वाईट या गोष्टीचं वाटतय की हे सगळं बोलताना साहेब एका गोष्टीकडे सरसकट दुर्लक्ष करताहेत की शिवसेनेपासून तूटून राजने स्थापन केलेली मनसेना फार थोड्या काळात शिवसेनेला आव्हान देण्याइतकी सक्षम झालीये. शिवसेनेच्या जागा घेणे जरी फार प्रमाणावर मनसेला शक्य झालेले नसले तरी मनसे फॅक्टरमुळे शिवसेनेचा फार मोठा मतदार शिवसेनेपासून दुरावत चाललाय. इतकी वर्षे शिवसेनेसी एकनिष्ठ असलेले, कधीही कुठल्याही पदाची अपेक्षा न केलेले बाळा नांदगावकर, शिरीष पारकर यांच्यासारखे कित्येक कट्टर शिवसैनिक शिवसेनेची इतक्या वर्षाची साथ सोडून राजबरोबर जातात. छगन भुजबळांसारखा ज्याने शिवसेना महाराष्ट्राच्या काना-कोपर्‍यात पोचवली असा खंदा कार्यकर्ता शिवसेना सोडताना घराणेशाहीचाच आरोप करतो. आणि शिवसेनेत घराणेशाहीला तिळमात्रही जागा नाही म्हणताना दसर्‍याच्या शुभमुहुर्तावर आदित्य ठाकरेंचे जोरदार लाँचींग केले जाते. किती कोलांट्याउड्या मारल्या जाणार आहेत अजुन?

त्यातही पुन्हा, गेली कित्येक वर्षे विद्यार्थीसेनेसाठी आपले सर्वस्व पणाला लावणारे अनेक युवा नेते जे विद्यार्थीसेनेतच म्हातारे झाले, त्यांना डावलून शिवसैनिकांनी (?) पुन्हा एकदा आपल्या सुज्ञपणाचा (?) दाखला देत युवासेनेच्या नेतृत्वासाठी काल आलेल्या, इथल्या संघर्षाचा, महाराष्ट्रातील परिस्थितीचा फारसा अनुभव, अभ्यास नसलेल्या आदित्य ठाकरेंची निवड केली. गेल्या दोन वर्षात आदित्य तसे स्थानिक राजकारणात बर्‍यापैकी सक्रीय आहे, म्हणजे चांगल्या दर्जाच्या कॉलेजकँटीन्ससाठी उठवलेला आवाज सद्ध्याचे "सच अ लाँग जर्नी" च्या संदर्भात गाजत असलेले वादग्रस्त आंदोलन. पण तेवढे पुरेसे नाहीये.

हे म्हणजे काँग्रेसजन जे वर्षानुवर्षे करत आलेले आहेत… म्हणजे इंदिराजीं, संजय, नंतर राजीवजी नंतर सोनीया आणि मग आता राहूल………..! तरीही ते म्हणतात आमच्याकडे घराणेशाही नाही हा जनमताचा कौल आहे. काँग्रेसला विरोध करत मोठ्या झालेल्या शिवसेनेतही आता तेच होतय…. साहेब शिवसेना सांभाळत होते तोपर्यंत माझ्यासारखा सर्वसामान्य शिवसैनिक सर्वस्वाने शिवसेनेला बांधलेला होता. पण साहेबांच्या नंतर आता उद्धव आणि त्यानंतर आदित्य….! शिवसेनाही त्याच मार्गाने चाललीये आणि साहेब म्हणताहेत शिवसेनेत घराणेशाही अजिबात नाही हा शिवसैनिकांचा कल आहे. मला वाटतं शिवसेनेचं भलं कशात आहे हे साहेबांना माझ्यापेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने कळतं, मग उद्धवजींच्या वेळचा ताजा अनुभव पाठिशी असताना पुन्हा युवासेनेची कमान आदित्यच्या हाती सोपवून एकप्रकारे घराणेशाहीलाच प्रोत्साहन देणं योग्य आहे का? आदित्यकडे तेवढा अनुभव, तेवढी ताकद आहे का? किंवा जर आदित्य हे उद्धवजींचे सुपूत्र नसते तर हे युवराजपद, युवासेनेचे नेतृत्व त्यांना मिळाले असते का?

कधी कधी शंका येते की जे उद्धवजींच्या बाबतीत झाले, म्हणजे त्यांचा राजकारणात उशीरा झालेला प्रवेश, त्यामुळे उठलेले वादळ या सर्व गोष्टी आदित्यच्या बाबतीत पुन्हा फेस कराव्या लागू नयेत म्हणून तर अवघ्या २० व्या वर्षी आदित्यचा युवराज म्हणून राज्याभिषेक करण्यात आला नसावा? म्हणजे अजुन ५-१० वर्षात आदित्य राजकारणात मुरतील आणि तथाकथीत निष्ठावंत शिवसैनिक (?) उद्धवजींच्या नंतर कार्याध्यक्ष म्हणून आदित्यची निवड करायला सिद्ध होतील. कुणालाही बोलायला जागाच उरणार नाही. आता इतके वर्षे शिवसेनेसाठी खस्ता खाल्लेले निष्ठावंत, ज्येष्ठ शिवसैनिक तोंड दाबून बुक्क्यांचा मार असे म्हणत मनोमन बोटे मोडत वरवर नव्या युवराजांचा जयजयकार करतील म्हणा, पण त्यांना कोण विचारतो? मग त्यांच्यापैकी काहीजण आतल्या आत दुखावल्या जावूनही येणार्‍या संधीची वाट बघतीलही कदाचित, पण ज्यांच्याकडे वाट बघण्याइतकी सहनशीलता नाही त्यांनी संधी निर्माण करण्याचा जर प्रयत्न केला तर त्याचा दोष शिवसेनेच्या नेतृत्वालाच जाणार आहे हे निश्चित ! सुरूवात तर झालीय कडोंमपा निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच डोंबीवलीतील १०० च्यावर शिवसेना पदाधिकार्‍यांनी राजीनामे सादर केले आहेत आणि ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. निष्ठावंतांना डावलून नेतृत्वाच्या पुढे-पुढे करणार्‍यांनाच तिकीटे देण्यात आल्याची जुनीच तक्रार पुन्हा डोके वर काढतेय. ज्यांना साहेब कडवट शिवसैनिक म्हणून अभिमानाने संबोधायचे तोच कडवा शिवसैनिक आता निराश होवू लागलाय, आपल्या निष्ठेची इथे कुणाला कदर राहीलेली नाही ही भावना जोराने वर येतेय. आता या समस्येवर साहेब काय उपाय करणार आहेत?

बाळासाहेब ठाकरे या नावापेक्षाही बाळासाहेब ठाकरे या विचाराकडे आकर्षित झालेला माझ्यासारखा सामान्य शिवसैनिक आता काळजीत पडलाय. कारण विचाराची जागा आता व्यक्तीने घेतलीय की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. मराठी, मराठी माणुस, हिंदुत्व असे कळीचे मुद्दे फक्त राजकीय हेतुने बरबटल्यासाराखे वाटताहेत. मला वाटतं आता खरोखर शिवसेनेवर आत्मपरीक्षणाची वेळ आलेली आहे. जे काही होतय, चाललेय ती घराणेशाही नाही असे खरोखर साहेबांना वाटत असेल तर माझ्यासारख्या प्रामाणिक शिवसैनिकाची शिवसेनेला रामराम करायची वेळ झालेली आहे असे वाटतेय.

असं जर झालं तर हे खरंच खुप चिंताजनक आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील एका तेजस्वी पर्वाचा अंत जवळ आला आहे काय?

एक अस्वस्थ आणि व्यथित शिवसैनिक !

गुलमोहर: 

Proud

खरेतर या अशा विनोदांवर हसतानादेखील खुप वाईट वाटतेय, पण तीच पाळी आलीय सद्ध्या Sad

शेवटी सगळ्यांचेच पाय मातीचे निघाले! Sad

'घराणे'शाही च्या मुद्द्यावर कोलांट्याउड्या मारल्या अन 'मराठी' माणुस चा गजर करीत असताना सुद्धा बामण अन मराठा असा भेद मात्र मनात पक्का ठेवलाच! ......... काल दोन्ही गोष्टी कळत-नकळत बाहेर आल्या!

शिवसेनेला हे 'बामण मुख्यमंत्री' अन 'गॅन्गस्टर मराठा मुख्यमंत्री' हे वाक्य २०१४ ला जाम महागात पडणार हे नक्की... कारण शिवसेनेत सगळे 'नेते' ब्राम्हण असले, तरी सगळे शिवसैनिक ब्राम्हण नाहीत. अन मनसे ने अजुन बामण-मराठा, हिंदु-मुस्लीम असा भेद सुरु केलेला नाही. मनसे ने हीच निती कायम ठेवली तर असंतुष्ठ मराठा तरुण शिवसेने ऐवजी मनसेला पाठींबा देणार....

नाना पाटेकर बोलले ते काल पुन्हा एकदा खरे ठरले! 'बाळासाहेब, आमच्या मनातील तुमच्या प्रतिमेला तडा जाईल असे वागण्याचा तुम्हाला देखील हक्क नाही! पण....... शेवटी सगळ्यांचेच पाय मातीचे निघाले! Sad

चंपक, लिन्क मिळेल का हे कोण कोणास म्हणाले त्याची? शिवसेने च्या बाबतीत हे कधी ऐकले नव्हते म्हणून आश्चर्य वाटले (हिंदू-मुस्लिम वगैरे कायम असते, पण जातीभेद फारसा दिसला नव्हता)

<<बाळासाहेब ठाकरे या नावापेक्षाही बाळासाहेब ठाकरे या विचाराकडे आकर्षित झालेला माझ्यासारखा सामान्य शिवसैनिक आता काळजीत पडलाय. कारण विचाराची जागा आता व्यक्तीने घेतलीय की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय.>> मी बाळासाहेबांचा भक्त नसलो तरीही त्यांचं मुंबईतील मराठी माणसावरचं ऋण मनापासून मानणार्‍यांपैकी एक निश्चितच आहे. मी म्हणेन तोच शिवसेनेचा विचार व मी सांगेन तोच शिवसेनेचा कृति आराखडा, हा त्यांच्या वक्तव्याचा अगदी सुरवातीपासून ते आजतागायतचा स्थायीभाव आहे. त्यानी याबाबत कधीही संदिग्धता ठेवली नव्हती. जर बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती व हा विचार या वेगवेगळ्या गोष्टी आहेत असा कुणीही समज करून घेतला असेल तर त्याचा दोष बाळासाहेबांचा निश्चितच नाही; याबाबतीत ते आता बदलले आहेत, असं म्हणणं त्यांच्यावर अन्याय केल्यासारखंच होईल. इतर बाबतीत प्रत्येकाची मतं वेगवेगळीं असूं शकतात .

बाळासाहेबांनी सांगीतले की काँग्रेस जे करु शकत नाही ते त्यांनी केले .. महाराष्ट्राला एक ब्राम्हण मुख्यमंत्री देण्याचे धाडस दाखवीले. त्याच प्रमाणे एका गँगस्टरला देखिल त्यांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची दिली. त्यांनी मराठा गँगस्टर असा शब्द वापरला नाही.

<<<जर बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती व हा विचार या वेगवेगळ्या गोष्टी आहेत असा कुणीही समज करून घेतला असेल तर त्याचा दोष बाळासाहेबांचा निश्चितच नाही; याबाबतीत ते आता बदलले आहेत, असं म्हणणं त्यांच्यावर अन्याय केल्यासारखंच होईल. इतर बाबतीत प्रत्येकाची मतं वेगवेगळीं असूं शकतात .>>>>

भाऊ, तुमच्याइतकाच माझाही बाळासाहेबांवर विश्वास आहे. पण म्हणुनच आजकाल त्यांनी मारलेल्या कोलांट्या उड्या दु:ख देतायत. उदा. उद्धवच्या निवडीबद्दल राजवर केलेले विधान , सगळा महाराष्ट्र जाणतो की शिवसेनेत शेवटचा शब्द साहेबांचा असतो. तरीही आणि राजच्या निर्णयाला त्या वेळी कुठलेले महत्व उरलेले नसताना साहेब जेव्हा हे विधान करतात तेव्हा शंका घ्यायला जागा असते. व्यक्ती आणि विचार याबद्दल बोलायचे झाल्यास तो खुप विस्तृत मुद्दा आहे आणि इथे मांडायची माझी इच्छा नाहीये. Happy

"'बामण मुख्यमंत्री' अन 'गॅन्गस्टर मराठा मुख्यमंत्री'""काँग्रेस जे करु शकत नाही ते त्यांनी केले .. महाराष्ट्राला एक ब्राम्हण मुख्यमंत्री देण्याचे धाडस दाखवीले. त्याच प्रमाणे एका गँगस्टरला देखिल त्यांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची दिली." या दोन वाक्यात प्रचंड अंतर आहे. बाळासाहेब ठाकरे पहिले वाक्य म्हणल्याचे मी कुठेही ऐकले, वाचले किंवा पाहिले नाही. ते जर खरेच असे म्हणाले असते तर एव्हाना प्रचंड गदारोळ झाला असता.

>>>> "आपलेच दात अन आपलेच ओठ"
ते खर हो, पण वळवळणार्‍या जीभा मात्र लोकान्च्याच अस्तात ना! Proud

शिवसेनेत घराणेशाहीला तिळमात्रही जागा नाही म्हणताना दसर्‍याच्या शुभमुहुर्तावर आदित्य ठाकरेंचे जोरदार लाँचींग केले जाते. किती कोलांट्याउड्या मारल्या जाणार आहेत अजुन?

अश्याच उड्या मनसे सुद्धा मारते आहेच... मराठी हितासाठी सर्व मराठी पक्क्शांनी एकत्र यावे असे सांगणारे स्वतः वेगळा पक्ष काढून बसतात... कमालच आहे....

उद्धवच्या निवडीबद्दल राजवर केलेले विधान >>>> आणि हे बघा राजचे विधान http://72.78.249.107/Sakal/26Oct2010/Enlarge/Solapur/page3.htm , राजने पहिल्यांदाच बाळासाहेबांवर टिका केलीय. त्याच तरी काय चुकतयं म्हणा , तो बिचारा किती दिवस ह्यांच्या कोलांटउड्या आणि जहरी टिका सहन करणार, ह्यांना फक्त आपली घराणेशाही दामटण्याची घाई झालीय.

बाळासाहेबांच्या नावे आज जे पत्रक आलेय, त्याचा अर्थच लागत नाहीये? फुल्ल चक्कर बसलाय सेना ...टॅन्क ला! चित्रफिती चे पुरावे... किती 'प्लान' होते ते सगळे!

उद्धव ठाकरेंचा कारभार सर्वांना कळला आहे आणी स्मिता राज ठाकरे हे सर्व मुर्ख नाहीत त्यामुळे हा पक्ष बंद पडणार आहे

Pages