मायबोली वर्षाविहार २०१० - वृत्तांत

Submitted by आशूडी on 19 July, 2010 - 02:18

१८ जुलै २०१०. मायबोलीकर ज्याची गेला एक दीड महिना आतुरतेने वाट पाहत होते तो वर्षाविहाराचा दिवस. दिवसाची सुरुवातच पहाटे पाच वाजता संयोजकांच्या 'गुड मॉर्निंग मायबोलीकर्स' अशा प्रसन्न एसेमेसने झाली. भाषा नाही भावनाओं को समझो! पुन्हा थोड्या वेळाने 'Bus is on the way as per given schedule... Please reach your given bus stop on time' असाही एसेमेस आला. ज्यांचे अलार्म वाजले नसतील त्यांना उठवण्याची ही नामी युक्ती पाहून मला भरुन आलं. पटापट आवरुन मी अगदी वेळेवर पोहोचणार इतक्यात मला वविला येऊ न शकणार्‍या माबोकरांची तीव्र आठवण झाली. ते आपल्यासोबत आहेत असं वाटावं म्हणून काय बरं घ्यावं असा विचार करत असतानाच सर्व देशा शहरात मिळणारं, सर्वांचं लाडकं लालबुंद सफरचंद दृष्टीस पडलं. ते घेऊन निघायला जितका वेळ लागला असेल फक्त तितक्याच उशीरा आम्ही दोघे स्टॉपवर पोचलो. एवढ्या तमाम माबोकरांना खिशात टाकून नेणे म्हणजे काय (सफरचंद) खायचं काम नव्हे. पण हे कुणाला पटेल तर ना! सफरचंदाचं कारण कळताच लोकांना त्या जागी काही विशिष्ट आयडीच दिसू लागले. त्यामुळे ते त्याकडे 'खाऊ की गिळू' अशा नजरेने पाहू लागले. हे (व भूक )सहन न होऊन मी च शेवटी ते खायला घेतले. तोवर बस 'किमया' ला पोहोचली. खोपोली ला जायचा रस्ता नक्की चांदणी चौकाच्या दिशेला आहे की एसएनडीटीच्या यात एकमत न झाल्याने ते लोक बरोब्बर 'किमया' च्या बाहेर पण बसच्या विरुध्द दिशेला रस्ता क्रॉस करुन थांबले होते. त्या सार्यां ना रस्ताक्रॉस करताना पहायला आम्हाला खूप मजा आली. बस हळूहळू जड होत होती. आणि बसमध्ये एक भूकबळी चढला! बसायाला जागा पहायच्या आधी तिचे 'मया, काही खायला आहे का?' अशी कार्याध्यक्षांना विचारणा झाली. तिला थोडे समजावून बस 'गणपती बाप्पा मोरया' च्या गजरात निघाली. तरीही भुकेने कासावीस मीन्वाज्जींची तब्येत तोळामासाच होत होती. त्यामुळे आमचा जीव वर खाली. त्यात माझ्या हातात ते सफरचंद. वाटेत निस्सान, शेव्हर्ले चे शोरुम आल्यावर 'इथे विचारुया का काही खायला आहे का?' असे आज्जी कोमात बरळत होत्या. आम्ही त्यांना धीर देत होतो. शेवटच्या स्टॉपवर चढल्याने आम्ही सारे बसच्या शेवटच्या काही सीटांवर बसलो होतो. पूनमही आज आपण मूक पाठिंबा द्यायचा असे ठरवून बॅकसीट घेतली होती. तिच्या या निर्णयाचा आम्ही मनापासून आदर केला. परंतू मुळात मीन्वाच भूकबळी ठरत असल्याने बस इंजिनला मागून हवा तेवढा 'पुशिंग फोर्स' मिळत नव्हता. त्याअभावी अखेरीस वाकड फाट्यापुढे बसने गुडघे टेकले. विजेच्या वेगाने मीन्वाज्जी थोडी बिस्कीटे, इडल्या घेऊन आल्या. राज्याने सर्वांना गोळ्या घातल्या. खाऊ. मँगो बाईटच्या. मीन्वाज्जींची तब्येत थोडी स्टेबल झाल्यावर मात्र (त्यांची) गाडी जी काही सुसाट निघाली ती विचारु नका.

श्यामलीही आता बसमध्ये आल्याने अंताक्षरीला सुरुवात झाली. तर तिने नमनालाच स्वतःचे मायबोली गणेशोत्सव मधली गणेशवंदना गायली. यावर मिल्याने तिला 'बसमध्ये रिक्षा आणता येणार नाही' अशी प्रेमळ सूचना केली. अआंची आठवण काढून आम्ही तिला तिची ८० पानी वही उघडायला सांगितली तर तिने '८० पाने पुरत नाहीत. आता १६ जीबी, ८० जीबी, २५० जीबी असे बोला' म्हटल्यावर आम्ही घाबरुन चूप बसलो, आणि अंताक्षरीच सुरु ठेवली. वाटेत ते घाट, गाड्या, कार्स, हिरवे डोंगर, धबधबे, सुंदर वळणदार रस्ते वगैरे नेहमीचं होतंच. परंतु बोगदे आल्यावर अंधारातले फोटो काढून काही लोक कसले पुरावे गोळा करत आहेत ही माझी आणि मीन्वाची गहन चर्चा इथे सांगणं इष्ट नाही. त्यासाठी भेटा अथवा लिहा : मी किंवा मीन्वा. (ही अशी यमकं मिल्या, देवा दिवसभर जुळवून उच्छाद आणत होते.)अशा गाणीगप्पांमध्ये आम्ही यू के'ज रिसॉर्टला कधी पोहोचलो ते समजलंच नाही. मुंबईकर आधीच येऊन आमची वाट पाहत होते. मी आल्या आल्या त्यांची बस पाहिली. खरंच त्यात वर्णन करण्यासारखं काहीच नव्हतं. कबके बिछडे हुए हम आज कहां आके मिले स्टाईलमध्ये भेटाभेटी झाल्यावर बॅगा रुममध्ये टाकल्या आणि आम्ही नाष्त्याला एकत्र जमलो. पोहे, उडिदवडा सांबार, ऑम्लेट पाव ('यांपैकी कोणतेही एक खाऊन दाखवा' अशी पाटी तिथे नसल्याने) सगळंच थोडं थोडं असा भरपेट नाष्ता करुन गरम गरम \चहा प्यायलो. चहासोबत आम्हाला विशिष्ट स्फूर्ती आली असावी असे वाटून हॉटेलवाल्यांनी लगेच 'कोंबडी पळाली' गाणे लावले. संयोजकांनी दिलेल्या फोटोनुसार तिथे स्वीमिंगपूल होता. त्यातल्या त्या मशरुमच्या छत्र्या, घसरगुंड्यांसकट. उत्साही माबोकरांनी, त्यांच्या बछड्यांनी रेन्डान्स, स्वीमींग पूल येथे चिंब भिजून, नाचून मस्त मजा केली. एका बाजूला लॉन होते तिथे मी, मिल्या, देवा, किरण, साजिरा, मयुरेश, हर्षद, आणि बेस्ट फिल्डर निहिरा (वय वर्ष ३) घाम फुटेस्तोवर क्रिकेट खेळलो. पार लांबून उंचावरुन हाताशी कॅच आला की बोटाला लागेल म्हणून मी चाणाक्षपणे तो सोडायची काळजी घेत होते. असे खेळून, भिजून , नाचून थकलेले माबोकर जरा विसावताच त्यांना संयोजकांनी रिमझिम, झिम्माड, धोधो, मुसळधार अशा टीममध्ये विभागून टाकलं. ही कंपूबाजी नव्हे काय? असा खडा सवाल तिथे कुणीतरी केला त्याला अर्थातच उत्तर आले नाही. त्यानंतर स्वादिष्ट असा पंजाबी मेन्यू जेवणात होता. जेवण झाल्यावर मी ,अतुल कॅरम रूममध्ये गेलो आणि नवा कोरा गुळगुळीत बोर्ड, सर्व सोंगट्या, स्ट्रायकर, पावडर या वस्तू सापडल्यावर ट्रेझर हंट जिंकल्यावर जितका आनंद होतो तितकाच होऊन सदगदित झालो. नंतर आम्हाला आनंदमैत्री व राज्या डबल्स मध्ये जॉईन झाले. तोवर तिकडे सांस चे कार्यक्रम सुरु होत होते. व 'आपण यांना पाहिलंत का?' मध्ये आमची नावं घोषित केली जात होती. दोनोळी उखाण्यांना एक मार्क आणि माझ्या २४ ओळींच्या उखाण्यालाही एकच मार्क अशा बहुत नाइन्साफीमुळे आमची टीम मागे पडली. त्या कटु आठवणी नको म्हणून गेम्स बद्दल लिहायची मी दुसर्‍या कुणाला तरी विनंती करते. गेम्स खेळायला पाऊसही आला, आणि ववि कारणी लागला. लगेच मीन्वाज्जींनी उखाण्यात भज्यांची फर्माईश केली. आज्जीचा दरारा सर्वदूर आहे याची प्रचिती म्हणूनच की काय आम्हाला लगेच भजी आणि चहा मिळाला!

'चहा कुणी सांडला?' हा 'कोंबडीने रस्ता का पार केला?' या प्रश्नाइतकाच ऐरणीवरचा प्रश्न आता झाला आहे याची सर्व माबोकरांनी नोंद घ्यावी. 'धडपड्या वृत्तीचे उद्योजक' साजिरा यांचे हे महान कार्य असल्याचे येथे नमूद करावे लागेल. चहा तर सकाळी मी ही सांडला होता पण तो माझ्याच अंगावर. त्यामुळे निदान तो अंगी लागला असे म्हणता येईल. परंतू साजिर्‍याने गंधासारखा घट्ट चहा फरशीवर सांडून चहाबाजांचे जे भावनिक नुकसान केले त्याची भरपाई त्यात त्याने स्वत:ने रिकामे कप ठेवून, वरुन खुर्ची ठेवून होणार नाही. शिवाय वैनीने एक कागदाचा चिटोरा टाकून तो कपभर चहा शोषला जाईल अशी शक्कल लढवली. मी आणि मीन्वा तिच्याकडे संशयाने पाहत असतानाच तिला त्यात होडी करुन सोडायची असेल अशी मी आमच्या दोघींच्या मनाची समजूत करुन घेतली. यावर नंतर देवा, मिल्या, मीन्वाने 'कप मांडला, चहा सांडला' (खेळ मांडला - नटरंग), 'चहा सांडून भांडून सोडू नको', 'साजिरा रे, चहा सांडला रे' (नाविका रे) अशा विडंबनांचा बसमध्ये खच पाडला. ते आपल्याला लवकरच गुलमोहरात दिसेल अशी आशा करुया.

त्यानंतर बक्षीसवाटपाचा, आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला. मगाशी टीम करताना नवरा बायकोंना मुददाम वेगवेगळ्या टीममध्ये का ठेवले असावे या प्रश्नाचे उत्तर मला आता मिळाले. ४ पैकी २ टीमला (विजेते आणि उपविजेते)बक्षीस देऊन जास्तीत जास्त घरात ट्रे पोहोचावेत अशी दूरदृष्टी पाहून मला त्यांचे अपार कौतुक वाटले. यू. के. चे सर्वेसर्वा श्री. पाटील यांनी या प्रसंगी सर्व माबोकरांना १०% डिस्काऊंट देण्याची घोषणा जाहीर केली. तिथे बोर्डवर 'Maayboli vavi 2010'चे कुणीतरी खट्याळपणे 'Maayboli vavi 2001' केले होते. पण फुटलेले काचेचे ग्लास, सांडलेला चहा, सतत रुमच्या किल्ल्या हरवल्याच्या घोषणा यावरुन मलाच ते 'Maayboli vavi (इसपू) 1002' करावेसे वाटले. श्यामलीची मोठी हँडबॅग पाहून ती तेथे रहायला आली आहे का असा प्रश्न मी तिला सकाळीच विचारला होता. आता तिच्या सांत्वनपर सुरावटींची खरंच यू के वाल्यांना गरज आहे असे वाटत होते. खरोखर उत्तम व्यवस्था, उत्कृष्ट आयोजन यासाठी यू के'ज रिसॉर्ट ची टीम, ववि समिती, टी शर्ट समिती, सांस यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर ग्रुप फोटो, जय भवानी जय शिवाजी वगैरे घोषणा देऊन, एकमेकांचे निरोप घेऊन सगळे आपापल्या बसमध्ये जाऊन जागेवर बसले. बस निघाल्या. पाऊस होताच. तेव्हा शाळेच्या अ‍ॅडमिशन्स असा एकदम गंभीर गिअर कसा पडला कोण जाणे. आणि 'तुम्ही आताच अ‍ॅडमिशन घेऊन ठेवा' असा अनुभवी, मौलिक सल्ला मला मिल्याने दिला. यावर मी त्याला 'त्यासाठी मला आधी अ‍ॅडमिट व्हावे लागेल त्याचे काय?' असे विचारताच त्याने ' ते सोप्पं असतं' असं टिपिकल पुवडुवृत्तीचे उत्तर दिले. तितक्यात देवा, हिम्या आणि साजिर्‍याने 'चुपके चुपके रातदिन आँसू बहाना याद है' सुरु केल्याने मिल्या वाचला. आणि मग अशा एकेक सुरेख गाण्यांची मैफिलच जमली. गणेश कुलकर्णी, नितिनचिंचवड, सुधीर, रुमा, मीन्वा, मी, मिल्या, श्यामली, देवा, साजिरा , निळूभाऊ सगळेच एका भावविश्वात गुंग होऊन गेलो. फर्माईशी येत होत्या, दाद मिळत होती. हुजूर इस कदर भी ना, तुमको देखा तो ये खयाल आया, नीला आसमां, सांज ढले गगनतले हम कितने, दयाघना, मन क्यूं बहका रे बहका अशी एकेक रत्नंच बाहेर पडत होती. श्यामलीचा स्टॉप यायच्या आत तिच्याकडून किती गाणी ऐकून घेऊ असं प्रत्येकाला झालं होतं. सांज ये गोकुळी, फुलले रे, भय इथले संपत नाही, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या.. अशी अजरामर गाणी तिने गायली. पुढे ती उतरल्यावर मग आम्ही मूड हळूहळू बदलत रिम्झिम गिरे सावन, तू ही रे वगैरे सुरु केले.मध्ये सलामे इष्क वर सगळ्यांचे गळे साफ करुन झाले होतेच. वैनीला उठवण्यासाठी मीन्वाची चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही ची मात्रा मात्र करेक्ट लागू पडली. निरोपाची वेळ येतीये हे कळूनच आपोआप 'अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही' ओठावर आलंच. चांदणी चौक आल्यावर 'लागा चुनरी में दाग' च्या भैरवीने मैफिलीची सांगता केली. मग मीन्वाज्जी 'काय शब्द, काय संगीत, काय आवाज रे त्या काळचे! काय कामं करुन ठेवली आहेत या लोकांनी! ' असं म्हणत भावविवश झाल्या. आम्ही त्यांना अनुमोदन दिले. पण आज अजय देवगण, अक्षयकुमार, सुनील शेट्टी यांनाही रात्री शांत झोप लागावी म्हणून for the sake of old college-days म्हणून गोरे गोरे मुखडे पे, मैने प्यार तुम ही से, आँखो मे बसे हो तुम ही गाणीही वाचून टाकली. आणि सुनील शेट्टी अ‍ॅट द टॉप ऑफ हिज इमोशन्स(सौजन्य : साजिरा) वाले 'ना कजरे की धार' ही मोहरा मधले गाणे मनापासून म्हणून मिल्या ने पूर्णविराम दिला. जरा शांतता प्रस्थापित झाल्यावर निळूभाऊने साजिर्‍याचे एकूण चार लोकात असूनही एकटं राहणं पसंत करणे, ती मगाचची भावविवश गाणी (वो शाम कुछ अजीब थी) मनापासून आर्त स्वरात गाणे यावरुन अंदाज बांधून 'तुम्ही एकटेच असता का?' असा प्रश्न करताच हसून हसून मी आणि रुमा सीटवरुन पडायच्या बाकी होतो. तरी रुमाने लग्गेच सांगितले 'त्याच्या बरोबर एक छोटी मुलगी असते अधूनमधून. त्याचीच.' इतक्यात आमचा स्टॉप आला आणि मी भरगच्च आनंदाने भरुन पावून बसमधून उतरले. असा हा २०१० चा ववि माझ्या नजरेतून संपन्न झाला.

** 'माझ्या नजरेतून' असे लिहील्याने कुणाला काही दिवे बिवे मिळणार नाहीत. शिवाय स्मायली ज्याच्या त्याने हव्या तिथे चवीनुसार टाकून घ्या. सगळं आयतं मिळणार नाही. Proud मुख्य गोष्ट, यात बर्यााच गोष्टींचा, व्यक्तींचा उल्लेख राहिला आहे, (असेल म्हणत नाही) त्यांनी राग मानून न घेता लेखकाच्या एकूणच मर्यादेचा आदर करावा ही विनंती. Happy शिवाय, अजून वृत्तांत येऊ द्या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धमाल वृ अन प्रतिसाद पण.. Happy
या सुखद विचाराने लगेच साडे तिसाव्या मिनिटाला परत झोपी गेली.... >>>
लाडके.. आता सर्व धमाल वाचुन झोप उडेल बघ.. तु का नाही आलिस??

आशुडी काय भन्नाट लिहीतेस. काल सकाळपासुन जोक वर जोक होत होते.

मी सकाळी साधारण ७ वाजता वाकड फाट्यावर हजर झालो. काही प्रायव्हेट बस चे एजंट मला पहात होते. मी बर्मुडा घातलेला, गोरा अश्या एका माणसाकडे पहात होतो. तो महाराष्ट्र टाईम्स वाचत होता. वाचता वाचता मला म्हणाला हवा का मटा वाचायला ? मी म्हणालो चाळिशी नाही आणलेली. वाचणार कसा ? तुम्ही कशाची वाट पहाताय ? येव्हडी मोठी सॅक घेऊन कुठे निघाला आहात ? वाटल हाही बहुदा ववीला येणार. त्याच्या पाठिवरची सॅक व त्याचा आकार पाहुन त्यात ववीला जायला इतक सामान का लागत असाव याचा मी विचार करत होतो. काही कारणाने कशालाही उशीर झाला की नसत्या शंका मनात यायला लागतात त्यातला हा प्रकार.

माझ्या दुसर्‍या प्रश्नाच उत्तर त्या अनोळखी माणसान दिल. दोन वेळेचा डबा आहे, पाणी आहे जंगलात आपल आपल्याच न्याव लागत ट्रेक करताना.

माझी विकेट गेली. ववीच घोषणापत्र मी वाचल नव्हत. ववीत ट्रेक करावा लागतो की काय ? मेलो ठार मला काय जमणार ? पाठीच दुखण लागल्यापासुन सरळ चालता येत नाही. ट्रेक कसा करणार.

पुढे तो म्हणाला. मी यु. एस मधे असतो. सुट्टीला आलोय. पुण्यात एक हौशी ट्रेक क्लब आहे त्यांच्याबरोबर चाललोय. जंगलातुन भिमाशंकर पर्यत.

काय जाम सुखावलो मी. त्याने जर मायबोलीच्या ट्रेकचा हा कंपल्सरी भाग आहे असे म्हणले असते तर मी मायबोलीचा व माझा काही संबंध नाही असे सांगुन तिथुन सटकलो असतो.

मग मी छाती ताणुन मायबोली आणि ववी बद्दल सांगीतले. तेव्हडयात त्याची बस आली आणि मला दिवसभराच्यासाठी शुभेच्छा देउन तो गेला.

दादर, ठाणे, बोरिवली सगळ्या शिवनेरी गेल्या. लाल डब्याच्या, निम आराम, जास्त आराम सगळ्या येस्ट्या गेल्या तरी मी तिथेच. मग सगळे एजंट माझ्याभोवती जमा झाले. एकाने निता ट्रॅव्हल्स, दुसर्‍याने आणखी कोणती, सगळ्या गाड्यांचे भाव सांगीतले. एक तवेरावाला मला स्वस्तात न्यायला तयार झाला पण मी वाट अंबीकेची पहात होतो. शेवटी ७.५३ ला एक तासाच्या प्रतिक्षेनंतर आली. त्यांना माझ्याबद्द्ल काय शंका होती कुणास ठाउक ? चांगले कपडे तर घातलेले दिसत आहेत पण बहुदा जायच कुठ हे विसरलेला दिसतोय.

एकाने मी माबोकरच आहे ना ? अशी शंका व्यक्त केल्यावर बहुदा माझी कडक तपासणी होणार असे वाट्ले पण सचीनने मला पैसे देताना पाहिले होते म्हणुन माझी सुटका होऊन माझा खोपोलीच्या दिशेने प्रवास सुरु झाला. हो हे सांगायचच राहिल की " अखेरीस वाकड फाट्यापुढे बसने गुडघे टेकले. विजेच्या वेगाने मीन्वाज्जी थोडी बिस्कीटे, इडल्या घेऊन आल्या. राज्याने सर्वांना गोळ्या घातल्या. खाऊ. मँगो बाईटच्या. मीन्वाज्जींची तब्येत थोडी स्टेबल झाल्यावर मात्र (त्यांची) गाडी जी काही सुसाट निघाली ती विचारु नका." हे झाल्यावरच वाकड फाट्यावरुन बस एकदाची सुटली.

दु:ख बस उशीरा आल्याच नव्हत हो. पु.लं च्या म्हैस कथेप्रमाणे अजुन अर्धातास झोपलो नस्तो ? याचे होते.

दु:ख बस उशीरा आल्याच नव्हत हो. पु.लं च्या म्हैस कथेप्रमाणे अजुन अर्धातास झोपलो नस्तो ? याचे होते...>>>नितीन,हे दु:ख बर्‍याच जणांना झालं रे... Proud

>>>>> 'पपई' असा आयडी घे. ('प' वरुन सुरु होतोय बघ) <<<<< Lol Lol Lol
चान्गला लिहीलाय वृत्तान्त, कित्येक पन्चेस जबरी आहेत
नितिन्चिन्चवड, तुमचाही वृत्तान्त झकास Happy
(एक तास वाट पहात उभे रहाणे म्हणजे भारीच अवघड, - त्यातुन पुन्हा हिन्जवडीच्या वाटेवर)

पपई नॉट बॅड Proud चेहरा गोल असो नसो मी ओळखल ना तिला ते महत्वाच Proud

दु:ख बस उशीरा आल्याच नव्हत हो. पु.लं च्या म्हैस कथेप्रमाणे अजुन अर्धातास झोपलो नस्तो ? याचे होते...>>>नितीन,हे दु:ख बर्‍याच जणांना झालं रे...>>असं दु:ख मुंबईकरांनाही झालं पण बसमुळे नाही लेट लतिफांमुळे Proud

दु:ख बस उशीरा आल्याच नव्हत हो. पु.लं च्या म्हैस कथेप्रमाणे अजुन अर्धातास झोपलो नस्तो ? याचे होते...>>>नितीन,हे दु:ख बर्‍याच जणांना झालं रे.>>>>>>>

अगदी अगदी. पण नंतरच्या बसमधल्या दंग्याने दु:ख निवारण केलं.

आशूडी, खूप मस्त लिहिलाय वृत्तांत, आणि तुझा उखाणा पण एकदमच ब्येष्ट, तो आयत्यावेळी तयार केला होता?

मला बराच वेळ आशूडी म्हणजेच पौर्णिमा वाटत होती, उखाण्यांच्या वेळी उलगडा झाला Happy

मला बराच वेळ आशूडी म्हणजेच पौर्णिमा वाटत होती, उखाण्यांच्या वेळी उलगडा झाला....>>>मंजिरी, मग पौर्णिमा म्हणजे कोण वाटत होती ?:)

ओवली, पपई >> Lol
वेळ मिळेल तसा अजून लिहितो आहे.. >> साजिरा, वृत्तांत लिहीतोयस की ग्रंथ? Proud भारी लिहीलेस रे. अजून लिही.
नितीनचिंचवड, आम्ही तुमच्या दु:खात सहभागी आहोत. पण वाकड पर्यंत येताना मीन्वाने जी वेळ आमच्यावर आणली त्यापेक्षा तुम्ही सुखीच ना? Proud छान लिहीलेत.
आशूडी म्हणजेच पूनम वाटत होती ? माझा चेहरा कोणत्या अँगलने गोल आहे? Uhoh Proud
मंजिरी, तू फारच स्फोटक विधान केलेस. Wink Happy

आणि हो, ते गटबाजी करतानाही सांस ने पौर्णिमेचं नाव 'पुनम' लिहीलं होतं. Proud त्यामुळे तिथे तिला तिचं मौन (?) व्रत सोडावंच लागलं. Lol पूनम, हा दीर्घ उकारच उभट चेहर्‍याला सूट होतो बरं! Wink
ववि चे पैसे भरताना, मागच्या वर्षीच्या पहिल्या पानावर आलेल्या फोटोबद्दल अतुलने हर्षदकडून २०० रु अधिक घ्यायला सांगितले होते. म्हणून यावेळी आम्ही पलीकडच्या बाजूला बसलो होतो. तरीही त्याने घाटात बाहेर बघण्यासाठी खिडकीतून डोकावताच असूयेने मीन्वा विचारत होती, 'फोटो काढतायत का गं?' (दरीतून?? पोटात अन्न गेले तरी मगाचच्या एकूण हैदोसात मीन्वाचे मानसिक संतुलन बिघडले आहे याची खात्री पटली. )शेवटी बोगद्यात तिला त्याच्याशेजारी बसायला जागा देऊन मी तिची फोटोची इच्छा पूर्ण केली. Proud माझ्या पुढे गुब्बी बसली होती. तिला माझी ओळख करुन देताच अचानक 'अगंबाई, हो का?' असे आश्चर्य/भय/खेद/आनंद जन्य भाव (/ = किंवा. आणि नाही. :फिदी:) तिच्या चेहर्‍यावर उमटले. असाच अनुभव आणखी एक दोन आयडींसोबत आल्यावर मी माझी ओळख करुन देणे बंद केले आणि परत आल्यावर माझ्या पाऊलखुणा तपासायचा निश्चय केला. पण दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं हे अजून जगाला समजत नाही त्याला मी तरी काय करु? Proud

मंजे , कविता, अम्या, इंद्रा, किर्‍या, गुब्बे.. तुमचे वृतांत बास झाले बरं का..

आता राधा, सानू, येषा यांच्या बोबड्या शैलीतून मस्तपैकी एखादा वृतांत येवूदेत. Wink

अर्रर्रर्र! पपई काय, श्रद्धा काय!!! Rofl Rofl

मला म्हणजे बोलायची सोय ठेवलेली नाहीये माबोकरांनी.. माझा आणि मीनुचा प्रेमळ संवाद चालू असताना सुमारे बारा फूटांवरून केश्विनी म्हणाली, "मी ओळखलं हिला.. पूनम ना?" कवितापासून दोन फूटावर असताना आणि शेजारी मिल्याशी नाश्त्याबद्दल मौलिक आदानप्रदान करत असताना कविता म्हणाली, ""मी ओळखलं हिला.. पूनम ना?" बसमध्ये गप्प बसले तरी, 'ही गात (ओरडत) का नाहीये? पूनमच आहे ना?" अरे काय हे!!! Sad
Lol

Pages