शाळा कशी निवडावी ???

Submitted by अमोल कुलकर्णी on 21 June, 2010 - 13:52

सियोना आता दिड वर्षाची झाली. आता ती पुढच्या वर्षी शाळेत जायला लागणार. कसे पटापट दिवस जातात कळतच नाही. असे विचार चालू असतानाच, एकदम क्विक फ्लॅशबॅक मध्ये गेलं मनं ..... डॉ. दाबकेंनी पहिल्यांदा हातात दिलेलं एवढसं पिल्लू, पाळण्यातलं पिल्लू, कुस बदलायला लागलेलं, पालथं पडायला लागलेलं, रांगायला लागलेलं, बेबी स्टेपस् टाकत हळूहळू चालायला लागलेलं पिल्लू, एक एक शब्द ऐकून किंवा स्व्तःच कुठलातरी शब्द तयार करून बोलायला लागलेलं पिल्लू ........ असं सगळं डोळ्यासमोरून जातं होतं आणि एकदम मूळ विचारात परत आलो ...... हेच ते माझं छोटसं पिल्लू आता शाळेत जाणार ...... Happy
हा विचार करुन खुपच वेगळ वाटत होतं, पण एकदम मस्त वाटत होतं. आता काही जणं म्हणतील ह्यात काय ते वेगळं, मस्त वाटायचंय, सगळीचं मुलं शाळेत जातात, आमची मुलं नाही गेली शाळेत .... पण माझ्याकरता हे प्रथमच होतं ना ..... आलं मला एकदम वेगळं फिलींग .....

तर आता माझी सिनू शाळेत जाणारं ..... मग ठिक आहे ना ..... एखादी चांगली शाळा बघू आणि अ‍ॅडमिशन घेऊ. त्यात काय एवढं ....... हे बोलताना सोपं वाटलं पण नंतर मित्र मैत्रिण, नातेवाईक, शेजारी पाजारी ह्यांचे ह्या बाबतीतले अनुभव ऐकले तर जाणवलं ...... खरचं जरा विचारपूर्वकच निर्णय घ्यावा लागणार शाळेचा.
आणि मग माझी विचारचक्र सुरु झाली, शाळा कशी निवडावी ..... सियोनाला कुठल्या शाळेत घालावं .....
विचार करता करता ह्यावर अजुन काही लोकांचे अनुभव जाणून घ्यावे असं वाटलं, तेंव्हा मायबोली वर मंजीचा (मंजिरी सोमणचा) लेख वाचत होतो, 'परिक्षा असाव्यात की नसाव्यात' आणि तेंव्हा सुचलं, अरे यार ..... इथे मायबोलीवर रोज इतक्या लोकांशी बोललं जातं, अनेकांचे लेख, विचार वाचले जातात ..... आपल्या मनातले विचार इथे मांडून बघू. मायबोलीकरांचे अनुभव ऐकून नक्कीच आपल्याला योग्य तो निर्णय घ्यायला मदत होईल. Happy

तर, शाळा कशी निवडावी .....
पहिला विचार आला तो, सियोना आत्ता तर दिड वर्षाची आहे, अजुन एक ते सव्वा वर्ष आहे तिला शाळेत जायला. पन त्याआधी तिला शाळेची ओळख करुन द्यायला, प्री स्कूल मध्ये तर घालावं लागेलच ना. तर पहिला प्रश्न .....

(१) प्री स्कूल साठी कुठे ? .....
ह्या बाबतीत मला वाटतं, आपल्या घराजवळची एखादी घरगुती स्वरुपात असलेली शाळा असावी. जिथे मुलांना शाळेबद्दल आवड निर्माण होईल, शाळेतल्या वातावरणाची ओळख होईल.
आजकाल अशी प्री स्कूल्स् सुध्दा खुप निघाल्या आहेत. त्यातल्या एका प्री स्कूल मध्ये चौकशी ला गेलो होतो, जे की भारतातील सगळ्यात मोठी प्री स्कूल चेन आहे, असा त्यांचा दावा आहे. शाळेबाबत असे शब्द ऐकताना जरा विचीत्रच वाटलं. तर त्या प्री स्कूल मधल्या बाई म्हणाल्या ...... नाही मिस म्हणायला हवं, मिस म्हणाल्या आमच्या प्री स्कूल मध्ये लहान मुलांची मानसिकता लक्षात घेऊन शिकवलं जात. का माहीत नाही, पण मला ते वातावरण, ते बोलणं एवढं काही रुचलं नाही.
मला वाटलं शाळेची ओळख करुन देणारी ही प्री स्कूल्स् कशी, आपल्या घरात कसं वातावरणं असतं
तशी हवी, तीथे मिस .... मिस .... करण्यापेक्षा आजी किंवा मावशी अशी हाक मारली जावी, तरचं ह्या लहान मुलांमध्ये शाळेबद्दल पहिल्यापासून एक आपुलकीचं नातं निर्माण होईल.

(२) शिक्षणाचे माध्यम .....
हा पण खुप विचार करण्यासारखा प्रश्न वाटतो. खरं तर, कुठल्याही माध्यमातून शिक्षण घेतलं तरी प्रगतीपासून कोणीच रोखु शकत नाही. पण आजकाल, मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याच प्रमाण मध्यम आणि उच्च मध्यम वर्गात खुपचं कमी झालयं. आणि त्याला कारणं आहे, मराठी शाळांचा खालावलेला दर्जा आणि तिथलं वातावरणं. खुपच कमी मराठी माध्यमांच्या शाळा त्यांचा पूर्वीचा दर्जा टिकवून आहेत. दुसरं माध्यम, कॉन्व्हेंट .... तिथला प्रॉब्लेम वेगळाच वाटतो. तिथली संस्कृती आणि संस्कार आपल्या मध्यमवर्गातल्या लोकांपेक्षा खुपच भिन्न वाटते. म्हणजे, घरी एक वातावरण असतं, मराठमोळं ही म्हणू शकता आणि शाळेत एकदम त्याच्या विरुध्द. मला असं वाटतं अश्या परस्परविरोधी वातावरणाचा मुलांच्या विचारसरणीवर खुप फरक पडतो. ह्या सगळ्याचा विचार करता, इंग्लिश माध्यमाच्या शाळांचा पर्याय योग्य वाटतो.

(३) SSC / CBSE / ICSE Board .....
कुठल्या बोर्डात मुलं शिकणारं .... खरचं फरक पडतो का ह्यानी .... असं म्हणतात, SSC पेक्षा इतर बोर्डातली मुलं दोन वर्ष अ‍ॅडव्हान्स शिकतात, ज्याचा की त्यांना नंतर खुप फायदा होतो. पण फायदा, in terms of what, परीक्षेत मिळणारे मार्कसच ना .... म्हणजे परत आपण मुलांना त्याच rat race मध्ये धावायला भागं पाडतोय, परीक्षार्थी बनवतोय, विद्यार्थी नव्हे. मला असं वाटतं की कुठल्याही बोर्डाच्या शाळेत मुलं गेली तरी त्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये काही फरक पडत नाही.

(४) वर्गातल्या मुलांची संख्या .....
काही शाळांमध्ये एका वर्गात ६० मुलं असतात तर काही शाळांमध्ये २० च मुलं असतात. कमी मुलं असतील तर खरचं काही फरक पडतो का?

(५) शाळेत फक्त अभ्यास .... का .... अभ्यासाबरोबर सर्वांगीण विकास करणारी शाळा .....
आजकाल सगळ्याच शाळांमध्ये अभ्यासाबरोबर इतर काही उपक्रम (activities) राबवल्या जातात. पण काही शाळांमध्ये ते नुसतेच राबवायचे म्हणून राबवले जातात .... फोकस वाटत नाहीत किंवा प्रत्येक मुलाची आवड बघून त्यांचे समान आवडीच्या मुलांबरोबर ग्रुप करुन त्यांना ती अ‍ॅक्टीव्हीटी दिली पाहीजे. ह्यात शाळांची आणि शिक्षांची काही प्रॅक्टीकल डिफीकल्टी पण असू शकते. मुलांचा सर्वांगीण विकास करणारी, फक्त अभ्यासाचा बाऊ न करणारी, ढेर सारा घ. अ.; होम वर्क न देणारी, फक्त अभ्यासात बांधून न ठेवता अभ्यासाबरोबर मुलांच्या कला, क्रीडा अशा गुणांना वाव देणारी शाळा पाहीजे.

(६) शाळा घराजवळ असावी का? .....
मला हा खुप महत्वाचा विषय वाटतो. मी आणि माझी बायको दोघही दिवसभर ऑफिसमध्ये असतो. माझा बिझनेस आहे आणि ऑफिस पण घराजवळ आहे, त्यामुळे सियोनाला शाळेत सोडणं, घेऊन येणं सहज शक्य आहे. माझे आई बाबा माझ्या घराजवळच राहतात. त्यामुळे वाटतं शाळा घराजवळ असेल तर सियोनाला तिचे आजी आजोबा पण कधीतरी आणू शकतात.
आता शाळा घराजवळ नसेल तर मुलांना व्हॅन किंवा स्कूल बस मधून पाठवण्याशिवाय पर्याय नाही.
पण ते थोडफार मला पटत नाही कारण की आजकाल पुण्यात ट्रॅफिक एवढं असतं की जाऊन, येऊन जर दोन तास मुलं प्रवास करणार तर दमून जाणार. दुसरं, व्हॅनमध्ये मुलं शांत काही बसत नाहीत, दंगा करत राहतात आणि व्हॅनकाका ते प्रत्येक वेळेस गाडी चालवता चालवता कंट्रोल करु शकत नाहीत. परवाच ह्याबद्दल दोन घटना ऐकल्या त्या अश्या.
एका ५- ६ वर्षाच्या मुलीला व्हॅन मधल्या मुलांनी खेळता खेळता इतकं मारलं की तिच रक्त साखाळलं. व्हॅन मधली सगळी मुलं त्याच वयाची, कुठल्यातरी छोट्या कारणावरुन सुरुवात झाली आणि २-३ मुला मुलींनी मिळून त्या मुलीला CID आणि कार्टून नेटवर्क बघून त्या स्टाईलनी मारलं. ( सध्याच्या लहान मुलांचा आवडता कार्यक्रम कुठला तर CID. )
दुसरा किस्सा. माझ्या मैत्रिणीच्या मुलीबाबत घडलेला. तिचा शाळेचा आणि व्हॅन मधून शाळेत जाण्याचा पहिलाच दिवस. ती शाळेत व्यवस्थित गेली पण येताना तिला तीचे व्हॅनकाका शाळेतून घ्यायला विसरुन गेले. किती हा निष्काळजीपणा. नंतर एका तासानी फोनाफोनी झाल्यावर ती मुलगी व्यवस्थित घरी आली पण तो एक तास त्या मुलीला आणि तिच्या पालकांना किती टेंन्शन.
अर्थात प्रत्येक वेळेस असचं काही घडेल असं काही नाही, पण असे काही किस्से ऐकले की घराजवळचं शाळा असेल तर जास्त बरं राहील का असा विचार येतो.

(७) ऑफिस टायमिंगवाली शाळा .....
काही शाळांच्या वेळा ऑफिसच्या वेळांप्रमाणे असतात, सकाळी ९ ते संध्याकाळी ६. खरं तर, ज्यांच्या घरी आई बाबा दोघही नोकरी करतात, त्यांच्या दृष्टीने ही खुपच फायद्याची गोष्ट आहे. आधी शाळा आणि मग पाळणाघर, दोन्ही ठिकाणी त्यांची ने-आण करण्यापेक्षा एकाच ठिकाणी ती मुलं जास्त सुरक्षित राहतात. बरं, इथे ब्रेकफास्ट, लंच, मुलांना दुपारी थोडी रेस्ट अश्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते. त्यामुळे अशी शाळा खरचं विभक्त कुटूंब पध्द्तीत आणि जिथे आई बाबा दोघही नोकरी करत असतील त्यांना फायद्याची.
पण, दुसरा विचार असा येतो की, मुलं सकाळी ९ ला शाळा म्हणजे घरातून ८ ला बाहेर पडणार आणि शाळा सुटल्यावर परत घरी यायला त्यांना ६ - ७ वाजणार. त्यांना शाळा हेच जगं. किती मेकॅनिकल लाईफ होत असेल त्यांच. आणि घरी आल्यावर पण आई बाबा त्यांच्या कामात व्यस्त मग ही मुलं घरात संवाद न साधता टी.व्ही. पाहात बसणारं.
त्यापेक्षा नेहमीप्रमाणे ६ तासांची शाळा असेल तर, मुलं थोडा वेळ पाळणाघरात, किंवा घराच्याइथे खाली इतर मुलांबरोबर खेळू शकतात. त्यांची एखादी आवड, एखादी कला, एखादा छंद जोपासू शकतात. आठवड्यातून २ -३ दिवस संध्याकाळी संगीत, चित्रकला असं काहितरी शिकू शकतात. महत्वाचं म्हणजे, शाळा आणि घराव्यतिरीक्त एक वेगळं जगं निर्माण करु शकतात.
सो, ऑफिस टायमिंगप्रमाणे असलेल्या शाळेत ५ - ६ वर्षाच्या मुलाला पाठवून, लहानपणापासून त्याला मेकॅनिकल लाईफ जगायला लावायचे का?

(८) फी, डोनेशन आणि त्याव्यतीरिक्त पण अजून काही पैसे काढू शाळा .....
सध्या शाळांच्या फीज् ऐकल्या की असं वाटतं, अरे पहिलीतल्या मुलाची एका वर्षाची फी ३० ते ३५ हजार रुपये. बरं बाकीचा खर्च वेगळाचं. मी माझा १ ली ते १२ वी पर्यंतचा शाळेचा सगळा खर्च, फी, युनिफॉर्म, पुस्तकं, वह्या काढला तरी तो एवढा येणार नाही. Happy
बरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे, पहिल्या वेळेस अ‍ॅडमिशन घेताना डोनेशन नावचं एक गोंडस शब्द सांगून पालकांना लुबाडणे. मग न राहावून वाटतं, आता शाळा हा सुध्दा एक धंदा झाला आहे का ???

(९) पालकांचा इंटरव्ह्यू .... पालक पास तर मुलं पास .....
हे एक नविनच आहे ना .... म्हणजे तसं आता हे जुनं झालं, पण माझ्याकरता पहिल्यांदाच ना, मग नविनच.
हे परीक्षा, इंटरव्ह्यू ह्या सगळ्याचा जाम कंटाळा येतो मला तर. जाम वैताग. अरे इतकी वर्षा ते झालं ना, आता दोन वर्षाच्या मुलीच्या अ‍ॅड्मिशनला कसला इंटरव्ह्यू घेता. आधी आई बाबांचा इंटरव्ह्यू घेणार, मग त्या दोन वर्षाच्या मुलीचा, मग लिस्ट लावणार आणि त्यात नावं आलं तर अ‍ॅडमिशन.

असे अनेक प्रश्न डोक्यात चालू आहेत. ह्या सगळ्याचा विचार करून मी अती विचार करतोय का ?? ..... इथे माबो वर खुप अनुभवी पालक आहेत, तसेच काही शिक्षक देखील असतील त्यांची ह्या बाबतीतली मतं आणि प्रतिसाद जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. Happy

ह्या माझ्या विचारांमध्ये नक्कीच काही गोष्टींचा विचार झाला नसेल, काही बाजू माझ्याकडून चुकीच्या पध्द्तीने पण मांडल्या गेल्या असतील, तरी ते माझ्या जरूर लक्षात आणून द्यावे.

कुठलीही शाळा, शिक्षणपध्द्ती किंवा शिक्षक कधीच वाईट नसतात आणि ते ठरवण्याचा आधिकार माझा नव्हे. तरी ह्या लिखाणामध्ये कुठल्याही शाळेबद्दल, शिक्षणपध्दतीबद्दल किंवा शिक्षकवर्गाबद्द्ल जर काही चुकीचे लिहीले गेले असेल तर त्या सर्वांची विनम्र माफी.

माबोकरांचे अनुभव, सल्ले आणि अजुन काही गोष्टी असतील ज्यांचा माझ्याकडून विचार झाला नसेल, तर हे सगळं ऐकण्यास मी उत्सुक आहे. Happy

गुलमोहर: 

(१) प्री स्कूल साठी कुठे ? ..... मला वाटत प्री स्कूल घराच्या अगदी जवळ, आपल्या घरातील वातावरणाशी मिळते जुळते असे निवडावे. या स्टेपमध्ये मुलांना घराशिवाय रहायची, इतर मुलांशी संवाद साधण्याची सवय होणं इतकच महत्व आपण द्यावं. ( अर्थातच हे माझं मत Happy )

(२) शिक्षणाचे माध्यम .....घरात प्रामुख्याने मराठी बोलल जात असेल तर कॉन्हेंट हा पर्याय अजिबात ठेवू नये, कारण मग आपण आणि मुलं यांच्यात एक गॅप तयार होत जाते. मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये आता शिक्षकांचा दर्जा घसरत चाललाय. अशा परिस्थितीत इंग्रजी माध्यमाची बरी शाळा हा पर्याय मला बरा वाटतो.

(३) SSC / CBSE / ICSE Board .....
याचा काहीही विचार करायची गरज मला वाटत नाही. आजकाल आपण पुस्तके, टि व्ही, संगणक अशा अनेक मार्गांनी जास्तीची माहिती मुलांना देतच असतो. अन तशात या सर्व बोर्डांच्या अभ्यासक्रमांमध्ये अगदी नोंदवावा असा मोठा फरक नाही, असलाच तर पुस्तकांची मांडणी अन परीक्षापद्धती यात आहे ( अन आता तर परीक्षापद्धती हे एक प्रश्नचिन्हच आहे तेव्हा हाही प्रश्न निकालात )

(४) वर्गातल्या मुलांची संख्या ..... ही मात्र कमी असली तर प्रत्येक मुलाकडे शिक्षक लक्ष देऊ शकतात हे खरे. त्यामुळे शक्य कमी संख्या असलेल्या शाळेचा विचार व्हावा.

(५) शाळेत फक्त अभ्यास .... का .... अभ्यासाबरोबर सर्वांगीण विकास करणारी शाळा .....
मला तरी वाटतं हल्ली सगळ्याच शाळांमध्ये अभ्यासासह काही ना काही उपक्रम चालू असतात. काही ठिकाणी जास्त, काही ठिकाणी कमी. पण काही शाळांमध्ये त्याचा फारच उदो उदो केला जातो, ते मला आवडत नाही. तशात हल्ली आपण मुलांना काही ना काही छंद-क्लास लावतोच, किमान सुट्टीतरी. मग याचा फार विचार शाळा निवडताना नको , असे माझे मत .

(६) शाळा घराजवळ असावी का? .....हो नक्कीच. मलातर याला प्रथम महत्व द्यावे असे वाटते. जाण्या येण्यातच मुलांची उर्जा संपून जाते. तास तास मुलं रिक्षातून, बसमधून झोपत झोपत शाळेत पोचतात. शिवाय त्यांच्या झोपेच्या वेळाही फार बदलाव्या लागतात. या सर्वांपेक्षा जवळची शाळा उत्तम !

(७) ऑफिस टायमिंगवाली शाळा .....
जर पाळणाघराची (किंवा तत्सम ) चांगली सोय असेल तर वेगळे टायमिंग चालू शकेल पण जरी ही सोय होत नसेल, तर मात्र आपल्या ऑफिस टायमिंगची शाळा पर्यायी म्हणून स्वीकारावी.

(८) फी, डोनेशन आणि त्याव्यतीरिक्त पण अजून काही पैसे काढू शाळा ..... मला वाटतं याबाबत आपल्या हातात किती गोष्टी आहेत ? तर काहीही नाही मग यावर विचार न केलेलाच बरा. ( म्हणजे माझं असं म्हणणं नाही की यावर विचारच करू नये. पण त्याची वेळ अन ठिकाण हे नाही. त्या साठी एक जन आंदोलन, एक जाणीव निर्माण झाली पाहिजे, एकटा दुकटा पालक काहीच करू शकत नाही. )

(९) पालकांचा इंटरव्ह्यू .... याबाबतही वरच्या सारखेच मत Sad

माझ्या लेकाच्या अ‍ॅडमिशनच्या वेळेस यातल्या बहूतेक गोष्टींचा विचार मी केला होता तो इथे मांडला. माझा लेक गेल्याच वर्षी दहावी झाला. अन लेकाचा अभ्यास, कला, खेळ, त्याचे वाचन, मित्रपरिवार, समाजाप्रति त्याचे विचार अन त्याचे एकूण व्यक्तिमत्व या सर्वांबाबत मी आज समाधानी आहे . अन यात त्याचा शाळांचाही वाटा आहेच Happy

अमोल, चांगले मुद्दे मांडले आहेत.

घरापासून जवळ, सोयीस्कर वेळेची, घरच्यांना ज्या माध्यमातून पाल्याला मार्गदर्शन करणे सोपे जाईल अशी, सरकारी मान्यताप्राप्त (हेही महत्त्वाचे), आपल्या खिशाला ज्या शाळेची फी परवडेल अशी व शिक्षण सुविधा - वातावरण - मुलांचा समग्र विकास यावर भर देणारी शाळा योग्य वाटते.

सीबीएसई / आयसीएसई शाळांना केंद्रसरकार निर्देशित नियम व निकष पाळायला लागतात.

सीबीएसई बोर्डाची वेबसाईट : http://www.cbse.nic.in/

आयसीएसई ची वेबसाईट : http://www.cisce.org/

येथे दोन्हीच्या अभ्यासक्रमाविषयी, सोयीसुविधा इत्यादींविषयी माहिती मिळेल.

माझी लेक अतिशय अफाट आहे. तिची अ‍ॅडमिशन म्हणजे एक मोठा प्रोजेक्ट होता माझ्यासाठी.

मी विचारात घेतलेले काही मुद्दे:
१. वर्गातल्या मुलांची संख्या कमी हवी
२. घर -शाळा अंतर कमी हवे
३. वर्गात मुले-मुली एकत्र हवीत
४. संस्कॄती भारतिय हवी
५. घरचा अभ्यास थोडा असावा. कारण माझी लेक एका जागी बसूच शकत नाही
६. अभ्यासाव्यतिरीक्त इतर अ‍ॅक्टिव्हिटीज असाव्यात
७. शाळेला मैदान हवे
आणि सगळ्यात महत्वाचे:
मी शाळेबाहेर जावून उभी रहायचे आणि पहायचे की बाहेर येणारी आणि आत जाणारी मुले खुश दिसताहेत ना. शेवटी आपली मुले ७-८ तास तिथेच राहाणार असतात ना.

पोट्टी आता तिसरित आहे. मस्त अभ्यास, खेळ, गायन चालु आहे. मी शाळेबद्दल पूर्ण समाधानी आहे.

http://vidyanchal.com/

तुम्ही येवढ छान विचारपूर्वक व जवळपास सर्व मुद्यान्ना स्पर्ष करणारे लिहीले आहे की तुम्हाला सल्ला देण्याचे ऐवजी, माबोकर पालकान्नाच या लिखाणाचा जास्त उपयोग होईल Happy
मान्डलेले मुद्दे योग्य आहेत, मात्र त्याची उत्तरे, व्यक्तिसापेक्ष (पालकसापेक्ष म्हणा हव तर) परिस्थितीनुरुप व पाल्याकडूनच्या अपेक्षानुसार बदलती असतील, उदा. प्राथमिक शिक्षणाबाबत मी कट्टर मराठी माध्यमाचा पुरस्कर्ता आहे, तर बाहेरील "स्पर्धात्मक" जगाकडे पाहून इन्ग्रजीची सूप्त भिती वाटत असल्याने कुणास बालवर्गापासूनच इन्ग्रजी माध्यमाचा मोह होईल, वेळेस कॉन्व्हेण्टच बरे असे वाटेल! हे ज्याच्या त्याच्या विचार पद्धतीवर अवलम्बुन असेल.
तसेच, शाळा जवळ की लाम्ब, तिच्या वेळा, अर्धनिवासी/कायमनिवासी, याबाबतही, गरजेनुसार पराकोटीची मतभिन्नता आढळून येईल. कुणी पाल्यास पाचगणीला निवासी शाळेत घालतील, तर कुणी ज्ञानप्रबोधिनीसारख्या शाळेत गुरुकुल्/क्रिडाकुल मधे पाल्यास पाठवतील.
व्यक्तिसापेक्ष बाबीन्चा परिणाम जास्त असल्याने यावर ठाम असेच करा वा असे करु नका असे भाष्य करता येत नाही.
मात्र, वरील लेखात बहुतान्श सर्व मुद्यान्ना स्पर्ष केला आहे.
व्यावहारिक दृष्ट्या, कोणती शाळा/सन्स्था आर्थिक दृष्या परवडणार आहे याचाहि विचार करुन ठेवावा लागतो कारण वाढत्या चन्द्रकलेप्रमाणे पहिली ते दहावी, हे खर्च वाढतच असतात.
असो.
चान्गला विषय, छान लिहीलय Happy

<<सध्या होमलर्निंग प्रकाराचा मोठा प्रसार सुरू आहे. त्याचा फायदा सगळेजण सांगत आहेत. त्याचे तोटे कोणाला माहिती आहेत का. >>
ओह्ह असे काही खरच आहे का? याबद्दल कोणी माहिती देउ शकेल का? घरात बसुन शिकायचे तर मग परीक्षा कशा देतात

मृदुला, परीक्षा, externally फॉर्म भरुन द्यायची सोय कायमच असते फक्त त्याला वेटेज किती असतं ते पहायला हवं Happy

लहान मुलांसाठी 'घराजवळ शाळा' हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा.
मुलांचं अचानक उद्भवणारं आजारपण हे मंजिरीनं सांगितलेलं कारण आहेच. शिवाय, घरापासून लांबवरच्या शाळेत जाऊन यायचं म्हणजे ३-४ वर्षांची मुलं दमतात, थकतात. आपण कितीही त्यांच्यासाठी वाहनांची सोय केली किंवा स्वतःच त्यांची ने आण केली तरीही! त्या रोजच्या प्रवासाची दगदग त्यांना सहन होत नाही. म्हणजे लौकिकार्थानं मुलं लगेच आजारी वगैरे पडतात अशातला भाग नाही. पण त्यांचा चेहरा बरंच काही सांगून जातो.

एकदा पाल्याला शाळेत घातले की आपली चिंता मिटली असे म्हणायचे दिवस कधीच गेले. त्यामुळे अब्राहम लिंकन (तेच ना नक्की) यांचे विचार उसने घेऊन सांगायचे तर मुलाच्या प्रगतीत अडथळा नसलेली शाळा पुरेशी.
१)माध्यम : यावर कोणताही निर्णय मिळणे अशक्य. मातृभाषेतून शिकल्याने पायाभूत संकल्पना स्पष्ट होतात, मुलांना 'आपल्या' संस्कृतीबद्दल ज्ञान मिळते, मुख्य म्हणजे मराठी भाषेतील साहित्य वाचले जाण्याची शक्यता वाढते. भाषा शिकण्याचे कौशल्य आपल्याला असले तर महाविद्यालयीन शिक्षणात किंवा व्यावसायिक जीवनात काही अडचण येत नाही हा स्वानुभव.
२)इंग्रजी माध्यम म्हणजे फक्त कॉन्वेंट का? मला वाटते मिशनर्‍यांनी चालवलेल्या शाळा म्हणजे कॉन्व्हेंट. जुन्या मराठी शाळांची व्यवस्थापनेही आजकाल इंग्रजी शाळा चालवतात. मराठी शाळेत शिकलेल्यांचे इंग्रजीचे व्याकरण जास्त घोटलेले असते, तर इंग्रजी माध्यमात चलता है...असे दिसते हे निरीक्षण.
३) शाळेतले शिक्षक कसे आहेत हा मुद्दा पण खूप महत्त्वाचा आहे. या एकाच करणासाठी पिढ्यान्पिढ्या एका शाळेत जायच्या. विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांकडे शिकवण्याच्या पात्रतेचे अर्थात बी एड चे प्रमाणपत्र असते का?की बी कॉम शिक्षक विज्ञान आणि इंग्रजी शिकवतोय ते पहा.(बरीच उदाहरणे आहेत, गरजूंना चटकन नोकर्‍याही मिळतील, पगार फक्त सही केल्यापेक्षा कमी मिळेल. उरलेले पैसे मुलांकडून वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या नावाने कॅश अथवा काइंड मधून घ्यायचे. एका शाळेत महिन्याला एकेक भेल डे, मँगो डे, दिवाली स्वीट्स डे साजरा होतो, आणि डबे शिक्षकांचे भरतात. साध्या होड्या शिकवायच्या प्रोजेक्टचा खर्च तीन आकडी असतो. पण शिक्षकांना (इंग्रजी माध्यमातल्या) पालकांशी इंग्रजी बोलता येत नाही.
तेव्हा तुम्ही स्वतः अर्थात पालक, शिक्षक आणि शिकवणी या ३ ठिकाणी मुलाला ३ वेगवेगळी उत्तरे मिळाली तर त्याचे काय होईल.

आरती २१ तुमच्या प्रतिसादात, माझ्या प्रत्येक मुद्याला तुम्ही दिलेली तुमची मत वाचून नक्कीच सगळ्यांना शाळेचा निर्णय घेण्यास मदत हूईल.

लहान मुलांसाठी 'घराजवळ शाळा' हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा. ....... पण त्यांचा चेहरा बरंच काही सांगून जातो. >>>>> प्रिती ताई तुझा मुद्दा पटला.

लिंबूटिंबू धन्यवाद !
व्यावहारिक दृष्ट्या, कोणती शाळा/सन्स्था आर्थिक दृष्या परवडणार आहे याचाहि विचार करुन ठेवावा लागतो >>>>> हा मुद्दा पण महत्वाचा आहे. कधी कधी मुलांमध्ये शाळेतल्या इतर मुलांच्या आर्थिक परिस्थितीवरून पण तुलना करणे वाढत जाते आणि ही गोष्ट मुलं अर्धवट वयात असताना वेगळं स्वरुप घेऊ शकते.

चित्रा घ. अ. कमी हवा आणि संस्कृती भारतीयच हवी, अनुमोदन आणि मैदान तर हवेच शाळेला.
मी शाळेबाहेर जावून उभी रहायचे आणि पहायचे की बाहेर येणारी आणि आत जाणारी मुले खुश दिसताहेत ना. >>>> Happy

भरत तुमच्या मताशी सहमत.

कालच ऑफिससाठे बस ची वाट बघत विक्रोळी स्टेशनला उभी होते तर शाळेत जायला निघालेली इटुकली पिटुकली मुलं पाहिली. बिचारी भर पावसात दप्तराचं ओझं सांभाळत एकीकडे छत्री सावरण्याची शिकस्त करत चाललेली होती. आणि त्यांना शाळेत सोडायला आलेले पालक त्यांना ओढून ओढून नेत होते. नोकरदार पालकांना मुलांना शाळेत सोडून नोकरीवर जायचे असेल किंवा ग्रुहिणींना घरी परतून स्ययंपाक करण्याची घाई असेल.

आपल्याकडे पावसाळा ऐन तोंडावर असताना शाळा/कॉलेजेस् का सुरु होतात बरं Uhoh
मुलांना शाळा हे प्रकरण अगदी नकोसं होत असेल travelling मुळेच Sad

मलाहि या चर्चेत सहभागी व्हायला आवडेल.
वरती सांगितलेल्या मुद्द्यांपैकी बर्‍याच गोष्टिंवर घरि चर्चा होते पण निष्पन्न काहि नाहि.
पुढ्च्या वर्षी भारतात यायच आहे. मुलीसाठि १ली मधे अ‍ॅडमिशन घ्यायची आहे.
मला तिला मराठि शाळेत घालावे असे वाटते पण नवरा अमराठी असल्याने घालाव की नाहि असा प्रश्न आहे ! तुमच्या पैकी कोणाला असा प्रोब्लेम आहे का? काय करणे योग्य होईल?
आणि ठाण्यात कुठ्ल्या शाळा चांगल्या आहेत. मला ३ हात नाक्यावरुन जवळची शाळा शोधायचि आहे.

मुलांना शाळा हे प्रकरण अगदी नकोसं होत असेल travelling मुळेच >>>>> निंबुडा खरचं आहे, जाम वैतागुन जात असतीलं पोरं. Sad

खरं आहे निंबुडा पावसाळ्यात तर मुलांचे हाल होतात.

मी परवा असाच सकाळी माझ्या बाल्कनीत उभा होतो. शाळेच्या व्हॅन येत होत्या आणि त्यात मुलं भरुन जात होत्या.
तेंव्हा समोरच्या बिल्डिंगमधल्या ओकांचा ३री का ४थी तला मुलगा खाली उतरला. आधिच तो तब्येतीने तसा अशक्तच वाटतो आणि त्यात त्याच्या पाठीवर हे भलं मोठं दप्तर, हातात डब्याची दुसरी बॅग आणि दुसर्या हातात छत्री. कुठेतरी लढाईला चाललेल्या सैनिकासारखी अवस्था होती त्याची.
हळूहळू पावलं टाकतं चालतं होता. तेवढ्यात त्याला आईला टाटा करण्याची हुक्कि आली. आता तो राहतो ५व्या मजल्यावर, हा खालून वर बघत, ते ओझं सांभाळत, निरागसपणे आईला टाटा-टाटा करत चालला होता, त्यात त्याला काही पुढचा फुटपाथ दिसला नाही आणि पडला जोरात. Sad

खरचं हे एवढं मोठं दप्तर आवश्यक आहे का??? आधिच मुलांवर लहानपणापासून आपण अभ्यास, परिक्षा ही ओझी लादतच असतो.

मला वाटतं, खरचं शाळांनी दप्तराचं ओझं कमी करण्याचा विचार केला पाहीजे.

पालकांचा इंटरव्ह्यू .... पालक पास तर मुलं पास >>>...
पालकांचा source of income कळणे महत्वाचे असते ना... पुढची १२ वर्षे मुलं त्या शाळेचा हिस्सा असणारेय... १२ वर्षांचा खर्च पालकांना परवडेल का नाही ते पडताळायचे असते... कारण स्कुल फिज व्यतिरीक्त बरेच खर्च असतात शाळेत... ते भागवता आले पाहीजेत ना... Happy

मी पालक आणि शिक्षक या दोन्ही नात्याने प्रतिक्रिया देत आहे.
१] प्री स्कूलची गरज आहे यात शंका नाही, त्याची निवड करताना जास्तीत जास्त अ‍ॅक्टीव्हिटी बेस्ड शाळा निवडावी.

२] आपल्या पाल्याला मराठी वा इंग्रजी साहित्य-संस्कृती याची जाणिव ही घरातल्या वातावरणावरच अवलंबून आहे, त्यात शाळेचा फारसा प्रभाव नसतो.माध्यम कोणतेही असले तरी फरक पडत नाही, शाळा आणि शिक्षकांचा दर्जा याने सर्व फरक पडतो.

३] SSC / CBSE / ICSE Board - कृपया या पलिकडे जाउन विचार करा. भारतात सध्या दोन आंतरराष्ट्रिय अभ्यासक्रम आहेत ते म्हणजे IGCSE (केंब्रिज) आणि IB (इंटरनॅशनल बॅक्युलॉरिएट). ज्ञान, कौशल्य आणि व्यक्तिमत्व ह्या तिन्ही पातळ्यांवर मुलांचा विकास करण्यात हे सिलॅबस कुठल्याही भारतीय सिलॅबसपेक्षा कितीतरी पुढे आहेत. यांच्या शाळा महाग आहेत पण त्याचबरोबर त्यांचा टीचर-स्टुडंट रेशो आयडीअल आहे.
http://www.cie.org.uk/
http://www.ibo.org/

मला वाटतं, खरचं शाळांनी दप्तराचं ओझं कमी करण्याचा विचार केला पाहीजे. >>>>>>>
माझ्या लेकीच्या शाळेत वह्या नाहिएत. सुट्टे फुलस्केप घेउन जायचे. त्यावर लिहायचे आणि घरी आले की त्या त्या विषयाच्या फाईल केलेल्या असतात त्यात लावायचे. आणि शाळेत जेव्हा चेकिंगला मागतील तेव्हा ती फाईल न्यायची. ह्यामुळे दप्तर खुपच हलके झाले आहे पण पालकांना मात्र त्या पत्रावळ्या सांभाळाव्या लागतात. Happy पण ते ठिक आहे, मुलांचा त्रासतर कमी झाला ना.

ह्म्म.. उत्तम चर्चा.

माझे मत एका शिकवणी मास्तरीणीचे!!

शाळा निवडताना जितका विचार कराल त्याच्या दुप्पट विचार, शाळा निवडल्यावर करा. बर्‍याचदा पालक शाळेत येऊन बोलत नाहीत म्हणून शिक्षकाचे (यामधे शाळा मॅनेजमेंटचा संबंध असेलच असे नाही!!)काहीपण फावते.

पहिलीतल्या मुलीला दोनचा पाढा दोन दिवसात पाठ करायचा आहे, तिच्याच्याने तो झाला नाही. टू वन्झा टू, टू टूझा फोर नंतर टू फाईवझा सिक्स वर गाडी जाते! का? तिच्या डोक्यात आकड्याचा गोंधळ होतोय म्हणून! आणी आपण काय बोलतोय हेच तिला समजत नाहिये. यावर टीचरने काय करावे? तिला तो पाढा १०० वेळा लिहाय्ला लावला. शाळेतून आल्यावर इतर होमवर्क संभाळून हेत्या मुलीने कधी लिहावे? आणि इतक्या वेळा लिहूनदेखील तिच्या डोक्यातला गोंधळ कमी होणार आहे का? याचा विचार शिक्षक करत नाहीत, पालकाना टीचरला भेटून विचारायला वेळ नाही, आणि वेळ असलाच तर "आपणच का बोलावे?" ही भीड मनात. तुमच्यासाठी शाळा आहे, शाळेसाठी तुम्ही नाही हे कायम लक्षात ठेवा.

त्यामुळे एकदा पोराला अमुक एका शाळेत घातलं म्हणजे निश्चिंती असे होत नाही. प्रत्येक पालकाने शाळेच्या प्रत्येक दिवशी जागरूक राहून मुलाशी संवाद साधलाच पाहिजे. जिथे गरज असेल तिथे शाळेत जाऊन बोलायलाच हवे. कारण प्रश्न आपल्या मुलाच्या शिक्षणाचा असतो. मुलाकडून होमवर्क करून घेताना त्याच्याकडून इतरपण अभ्यास करून घ्या. होमवर्क करून घेण्याइतका वेळ नसेल तर किमान त्यानी काय काय केलय याकडे लक्ष द्या. आठवड्यातून किमान चार ते पाच तास फक्त आणि फक्त मुलाच्या अभ्यासासाठी लक्ष द्या. त्याना काय समजतय. कशामधे ते कमी पडतायत ते विचारा. एखादी गोष्ट समजत नसेल तर ती का समजत नाही याचा तुम्ही विचार करा. "एवढं सोपं कसं कळत नाही" असा त्रागा न करता त्याच्या बालमनाच्या दृष्टीने विचार करा. अणि त्याला समजेल अशा पद्धतीने त्याला शिकवा. एकदा संकल्पना स्पष्ट झाली की मग दुसर्‍या पद्धतीने (शाळेत शिकवल्याप्रमाणे) पण समजणे खूप सोपे होते.

शाळेमधे अगदीच चुकीचे वातावरण असल्यास, मुलाला त्याचा त्रास होत असल्यास, शाळा बदलायचा विचार देखील जरूर करा. भरपूर पैसे दिले तर उत्तम शिक्षण मिळते, ही समजूत मनात अजिब्बात नको. आणि भरपूर मार्केटिंग केलेल्या शाळा उत्तमच असतील याची खात्री नाही. (किंबहुना, इतके मार्केटिंग करण्यासाठी हे लोक पैसे कसे जमा करत असतील याचा विचार करा!!) शाळेच्या इतर अ‍ॅक्टिव्हिटिजचा आताच जास्त विचार करू नका, कारण आपल्या मुलाला त्यात इंटरेस्ट आहे की नाही हेच अजून कित्येक पालकाना माहित नसत. त्यामुळे आधी मुलाचा कल बघा, वाढत्या वयाबरोबर त्याचे इंटरेस्ट बदलतील,(आज तासभर बसून चित्र काढेल, पण चौथीत गेल्यावर कराटेच्करत बसेल) त्यामुळे शाळेचा शिकवण्याची पद्धत, अभ्यास, सिलॅबस या गोष्टीचा जास्त विचार करा.

माझ्या मते तरी. ज्या शाळेतील कमीतकमी मुलं बाहेर ट्युशनला जात असतील ती शाळा चांगली म्हणायला हरकत नाही.

नंदिनी | 28 June, 2010 - 07:17 नवीन >>> एक नंबर पोष्ट.... मस्त लिहलय्....

माझ्या मते जिथे " हि शाळा विद्यार्थ्यांसाठीच आहे, विद्यार्थी आहेत म्हणुन शाळा आहे, संस्था आहे, शिक्षक आहेत" असे समजले जाते तिच शाळा योग्य.... (आज काल सगळीकडे "आम्ही आहोत म्हणुन मुले शाळा शिकतात" असे वातावरण तयार झाले आहे. कारण पालकच पहाटे ४ वाजता जाउन लाइन लावतात प्रवेशासाठी..)

ज्या शाळेतील कमीतकमी मुलं बाहेर ट्युशनला जात असतील ती शाळा चांगली म्हणायला हरकत नाही.>>> सगळ्यात महत्वाचा मुद्दा.

नंदिनी छान लिहीलं आहेस. Happy

शाळा निवडताना जितका विचार कराल त्याच्या दुप्पट विचार, शाळा निवडल्यावर करा. >>>>>
आणि
ज्या शाळेतील कमीतकमी मुलं बाहेर ट्युशनला जात असतील ती शाळा चांगली म्हणायला हरकत नाही.>>>>>>

अगदी बरोबर आहे. पटलं. Happy

आपल्या पाल्याला मराठी वा इंग्रजी साहित्य-संस्कृती याची जाणिव ही घरातल्या वातावरणावरच अवलंबून आहे, त्यात शाळेचा फारसा प्रभाव नसतो.माध्यम कोणतेही असले तरी फरक पडत नाही, शाळा आणि शिक्षकांचा दर्जा याने सर्व फरक पडतो.>>>>>
आगाऊचे हे मत अगदी पटले. माझा स्वतःचा आणि भावंडांचाही हाच अनुभव आहे.
आणि अगदी २-३ वर्षाची मुलं सुद्धा आपल्यापेक्षा लवकर नवीन भाषा शिकतात. त्यामुळे माध्यमाने फरक पडत नाही. त्या भाषेचा सराव घरात कसा होतो, हे महत्वाचे.

अजून पुढे जाऊन असेही म्हणेन की शाळेतल्या शिक्षकांच्या दर्जापेक्षाही घरी तुम्ही मुलांना काय आणि कसे शिकवता याला जास्त महत्व आहे.
उदा. मराठी अक्षर्-अंक, वार- महिने- नक्षत्र, कविता, श्लोक, स्तोत्र्/प्रार्थना, सण हे सगळं घरात न शिकवता यायला काय झालं? त्यासाठी फार वेगळा वेळ काढून शिकवायची गरज पडत नाही (फक्त अक्षर्-अंक शिकवायला लागेल पण ते इं. माध्यमाच्या शाळेतही शिकवतात). रोजचा पेपर(मराठी-इं) वाचायची सवय लहानपणापासून नक्कीच लावू शकतो, ज्यामुळे वाचनाची सवय लागेल. आणि एकदा वाचायची गोडी लागली की मुले आपणहूनच कितीतरी शिकतात.

तात्पर्यः माध्यमाने विशेष फरक पडत नाही Happy

एक फूल , अनुमोदन . मी पहिलीत इंग्रजी माध्यमात होतो, पण घर बदलल्यावर नवीन जागी इंग्रजी माध्यमात प्रवेश नाही मिळाला..पण मराठी माध्यमात दुसरीतच गेलो, कारण घरीच मला मराठी लिहायला वाचायला शिकवले होते, चांदोबा किशोर वाचायचो, मोडीची पण तोंड ओळख झाली होती.
कुणाला हसू येईल भाषेचे संस्कार व्हायला आकाशवाणी किंवा दूरदर्शनवरच्या(खाजगी वाहिन्या नाही...अजिबात नाही, फक्त सरकारी) हिंदी, इंग्रजी बातम्या उपयोगी पडतात. मला शाळेतल्या शिक्षकांबरोबर नीती रवींद्रन, रामु दामोदरन , सलमा, नरोत्तम पुरी इत्यादींनी इंग्रजी, हिंदी शिकवले. मराठीचे उच्चार व भाषा आकाशवाणीवर प्रभु दीक्षित, कमलिनी विजयकर, नीलम प्रभु, बाळ कुडतरकर, ई.नी शिकवले.(कोणतीही फी न घेता)

अमोल धन्यवाद फार उपयुक्त चर्चा सुरु केलित तुम्हि. हे लिखाण चर्चा स्वरुपात म्हणजे योग्य बाफ वर हलवता येइल का गुलमोहर ऐवजि? इथे व्यक्त केलेलि मत खुप उपयोगि वाटलि, पुढेहि कोणाला तरि उपयोगि पडु शकतिल.

माध्यमाने विशेष फरक पडत नाही >>> हे वाचुन बरे वाटले.
पण एक प्रश्न आहे. वरच पाढ्याच उदाहरण घेतल तर, मला स्वतःला पाढे इंग्रजी मधुन म्हणता येणार नाहित. मी मराठि मधुन शिकलेय. अजुनहि आकडेमोड करायची असेल तर मी मराठि आकडेच वापरते मनात्ल्या मनात Happy मग जे मला येत नाहि ते मुलांकडुन कस काय करुन घ्यायच? इथलेहि सगळे जण काहि इंग्रजी माध्यमातुन शिकलेले नाहित. मग मुलांकडुन कसा अभ्यास करुन घेता?

भरत अनुमोदन. मी दहावीपरेन्त पूर्ण मराठी मीडीअम. मग रद्दीच्या दुकानातून खूप सारे रीडर्स डाय्जेस्ट आण्लेले. त्यातून ते वाचायची सवय लागली त्याचा इंग्रजी शिकायला खूप उपयोग झाला. सुधारली भाषा. इतकी की त्यातून कॉपी लिहून पैसे कमविता आले. मराठी तून शास्त्र गणित शिकले त्या कन्सेप्ट्स खूप पक्क्या झाल्या. खरा काँप्लेक्स मुलांना अकरावीत येऊ शकतो. आपण सेंट विमली व मुले सें जोजफ वगैरेतून
येतात, मुली इंग्रजीत बोलून भाव खातात तेव्हा आपली हुशार मुले थोडी बावरू शकतात. मग सहा महिन्यात सावरून कॅट होतात.

वरच पाढ्याच उदाहरण घेतल तर, मला स्वतःला पाढे इंग्रजी मधुन म्हणता येणार नाहित. मी मराठि मधुन शिकलेय. अजुनहि आकडेमोड करायची असेल तर मी मराठि आकडेच वापरते मनात्ल्या मनात.>> अनुमोदन
सावली.

मला स्वतःला पाढे इंग्रजी मधुन म्हणता येणार नाहित. मी मराठि मधुन शिकलेय. अजुनहि आकडेमोड करायची असेल तर मी मराठि आकडेच वापरते मनात्ल्या मनात.>> माझं ही अनुमोदन.

पण अर्थातच जात्याच चौकस बुद्धी आणि नवे शिकून घेण्याचा अट्टाहास आणि जिज्ञासा यामुळे पूर्णपणे मराठी माध्यमात शिकून सुद्धा कॉलेज मध्ये (ते ही बांद्र्यासारख्या ठिकाणी की जिथे इंग्रजी माध्यमातल्या मुले-मुली जास्त असतात) गेल्यावर कधी भाषेची अडचण आली नाही. पण याचे श्रेय शाळेत मन लावून शिकविलेल्या इंग्रजीच्या शिक्षकांचे आणि इंग्रजीची शिकवणी ज्या सरांकडे लावली होती त्या सरांचे आहे. सध्याच्या मराठी शाळांमध्ये आमच्या वेळी होते तसे शिक्षक दिसत नाहीत. त्यांना स्वतःलाच नीट व्याकरणशुद्ध भाषा (मराठी / हिंदी / इंग्रजी) बोलता येते की नाही इतपत शंका आहे ("मी आली/गेली", "चपल्या", "पिन्या", "केसं", "बुटं" वै. मराठीचे धिंडवडे निघतात. Angry त्यामुळे "माध्यमाने विशेष फरक पडत नाही" असे सरसकट म्हणता येणार नाही. जात्याच हुशार मुलासाठी हे विधान सत्य ठरु शकेल कदाचित कारण शाळेत शिकून समाधान होत नसेल / प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील तर बाहेर वाचन करून किंवा घरातील वडीलधार्‍यांच्या सहाय्याने किंवा येन केन प्रकारेण तो विद्यार्थी विद्यार्जन करेल. पण सामान्य मुलांचे काय?

वरील सगळी चर्चा दोन तीन वेळा वाचून झाली , पन माझ्या मनातली द्विधा परिस्थिती काही कमी होत नाही. माझा प्रश्न हा माध्यमाबद्दल आहे.
आम्ही दोघेही मराठी मिडियममधून शिकलोय. आधी आमच्या मनात मुलाला मराठी मिडियमला टाकायचे होते, पण एकंदरीत आजुबाजुअची परिस्थिती बघता आम्ही मुलाला या वर्षीच नर्सरी ईंग्लिश मिडियमध्ये घातल आहे. अजुनही आमच्या दोघांमध्ये वाद होतोच की आपण त्याला मराठी मिडियमला घालूया.
काय करावे सुचत नाही आहे. आताच्या काळात मुलाला मराठी मिडियममध्ये घालावे की ईंग्लिश मिडियममम्ध्ये ?

Pages