नटरंग

Submitted by आशूडी on 6 January, 2010 - 23:17

काल नटरंग पाहिला. प्रचंड ताकदीचा अप्रतिम, देखणा चित्रपट. शीर्षक जेव्हा पडद्यावर दिसते तेव्हापासून जी मनाची पकड घेतो ती शेवटच्या श्रेयनामावलीतले शेवटचे नाव पडद्यावरुन नाहीसे होईपर्यंत!
तमाशाच्या कलेसाठी स्वतःचं जीवन वाहून घेतलेल्या तमाम कलाकारांना हा मानाचा मुजरा, या निर्मितीबाबत आपल्यालाही मुजरा करायला लावतो यात शंका नाही.
डोळ्यांच्या कडा ओलावण्याचे अनेक प्रसंग.. पण अत्यंत संयतपणे हाताळल्याने "पुढे काय?" ते पाहायला प्रेक्षक तयार असतो. एक कलंदर, जिगरबाज व्यक्तिमत्व.. कलेचा ध्यास घेतलेलं.. परिस्थितीपुढे झुकायची वेळ येताच स्वतःच्या हिमतीनं उभं राहणारं.. स्वतःच्या कलेचा उपयोग फक्त स्वतःसाठी न करता लोकांचं भलं व्हावं असा निरागस उद्देश असणारं.. वेळच तशी आली म्हणून कलेच्या या होमात स्वतःची आहुती द्यायला मागेपुढे पाहत नाही.. पण या भावनेच्या भरात, वेडात घेतलेल्या उडीची जबर किंमत त्याला द्यावी लागते.. आयुष्यभर्..एकट्याला.

अतुल कुलकर्णीच्या कामाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. पैलवान गुण्या ते 'मावशी' हा दोन टोकांचा प्रवास त्यानं इतक्या जबरदस्त ताकदीनं पेललाय की तो बदल पाहता पाहता भान हरपतं. एका वाघाची शेळी झालेली पाहवत नाही , मन हेलावतं. सहानुभूती , कणव वाटतेच पण त्यापेक्षाही त्याचं कौतुक, त्याच्या जिगरला द्यावीशी वाटणारी दाद जिंकून जाते. आणि हेच दिग्दर्शकाला अभिप्रेत असावं. अतुलने त्याच्या भूमिकेचं अक्षरशः सोनं केलं आहे. कल्पनेपलीकडचा अभिनेता डोळ्यांसमोर साक्षात उभा केला आहे. या ग्लॅमरस जगात येण्यासाठी, प्रसिध्दीसाठी हपापलेल्या, स्वतःला 'अभिनय' येतो असं समजणार्‍या हौशी कलाकारांनी आवर्जून पाहावा असा चित्रपट यातल्या दोन कलाकारांसाठी - गुणा आणि स्वतः अतुल!

अजय अतुलच्या संगीताची तर आधीच इतकी प्रसिध्दी झालेली आहे त्यामुळे त्याविषयी वेगळे सांगणे न लगे! सोनाली कुलकर्णी सारखी देखणी , लावण्यमयी अभिनेत्री मराठीला लाभली हे आपले भाग्यच! अमृता खानविलकर पाहुणी कलाकार म्हणून 'आता वाजले की बारा' गाण्यात आहे. ही गाणी ऐकायला जबरदस्त आहेत. पण शीर्षकगीत 'नटरंग' सिनेमात जितकं 'जाणवत' नाही तितकं ऑडिओ सीडी ऐकताना वेड लावतं. यातला ढोलकीचा ठेका इतका दिलखेचक आहे की त्याच्या 'तटकारा' बरोबर अंगावर काटा फुलतो. हे गाणं एकदा तरी ऐकाच. गुरु ठाकूरची गाणी नेहमीप्रमाणेच अचूक शब्दांची उधळण करणारी. गुरु ठाकूर सिनेमातही आहे. गुणा ज्याच्या मळ्यात काम करत असतो तो पाटील म्हणजे गुरु. इतर कलाकारांनीही उत्कृष्ट साथ दिल्याने चित्रपट कुठेच 'कमी पडलाय' असं वाटत नाही. तरीही तमाशावर चित्रपट आणि त्यात 'गुणा' हा शाहीर ..तर एक "सवाल जवाबाची बारी" असती तर अजूनच चार चांद लागले असते असं वाटलं. शेवटचं पण अत्यंत महत्त्वाचं, जो चित्रपट इतका जबरदस्त आहे त्याची मूळ कथा डॉ. आनंद यादवांची 'नटरंग' ही कादंबरी काय चीज असेल हे पाहण्यासाठी तरी मी ती वाचायला उद्युक्त झाले आहे!
झी टॉकीजने असेच एकाहून एक दर्जेदार चित्रपट काढावेत, त्यांची याहून जास्त जाहिरात करुन प्रेक्षक वर्ग चित्रपटगृहात खेचून घ्यावा अशा शुभेच्छा! असे जर 'अतुल गुणवंत नटरंग' मराठीमध्ये असतील तर मराठी चित्रपटाला, नाट्यभूमी, लोककलेचा सुवर्णकाळ येतोय असं म्हणायला हरकत नाही!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यात गोष्टीच्या ज्या काही तृटी सांगितल्या जातात त्याला दिग्दर्शक कसा जबाबदार? कारण चित्रपट कादम्बरीवर आधारित आहे.
अतुल पेक्षा किशोर कदमचा अभिनय उजवा आहे. सोनाली कुलकर्णी तमासगिरीण म्हणून कोणत्याच बाबतीत पटत नाही. खरे तर या चित्रपटात ओरिजिनल कलावती जसे सुरेखा पुणेकर, छाया माया खुटेगावकर गेणे आवश्यक आणि शक्य होते. सो. कु . फारच युसलेस.

<यात गोष्टीच्या ज्या काही तृटी सांगितल्या जातात त्याला दिग्दर्शक कसा जबाबदार? कारण चित्रपट कादम्बरीवर आधारित आहे.>

मी कादंबरी वाचलेली नाही, पण कथानकात लेखकाच्या परवानगीने फेरफार केले आहे, हे चित्रपटाच्या सुरुवातीलाच सांगितले आहे.

बाकी, मला तरी सोनाली कुलकर्णी चित्रपटात विजोड वाटली. आणि गुणाला तमाशाबद्दल एवढी ओढ का वाटते हेही कळले नाही. किशोर कदम आणि विभावरी देशपांडे मात्र मस्त.. एवढ्यातच परत 'वास्तुपुरुष', 'समांतर', 'बाधा' परत बघितल्यामुळे असेल, पण चित्रपटाची हाताळणीही भडक वाटली.

कालच्या चतुरंग पुरवणीत या चित्रपटातील लावण्यांवर व नृत्यावर टीक करणारे दोन लेख प्रसिद्ध झाले आहेत.

>>चित्रपटातील लावण्यांवर व नृत्यावर टीका
?? आय्ला. त्या तर दोन्ही लय भारी गोष्टी आहेत. कि क, वि. दे. आणि गुणा(फर्स्ट पार्ट) च्या सारख्याच!
गाणी + नृत्य आवडली बाबा आपल्याला. उगाच काय??

पन त्यावर टी़का का म्हनुन बाबा? जाउदे... चालायचच....

आज एका स्नेह्याने ईमेलीतून हे पत्र पाठवले -

नमस्कार,
'दै. लोकसत्ता'च्या रविवार पुरवणीत 'वाजले की बारा' या "नटरंग" मधील लावणीवर आधारित लेखावर अनेक प्रतिक्रिया फेसबुक वर उमटल्या.. अर्थात रवि जाधव यानीच या लेखाबद्दल "कोणाला काय वाटते ?" असे विचारून कळ लावून दिली आणि बिनडोकपणे सिनेमा पाहणा-या कितीतरी जणानी रवि जाधव यांच्या अपेक्षेप्रमाणेच मते दिली. ही "दड़पशाहीची सांस्कृतिक 'पळ'वाट" आहे असे मला वाटते......

स्वतःची पाठ थोपटून घेण्यातच जर आपण धन्यता मानत असू, तर काही खरे नाही. लोकप्रियता आणि दर्जा या सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत. लोकप्रिय झालेले सर्वच सिनेमा दर्जेदार असतात, असे सर्वाना वाटते का ? गेल्या काही वर्षात सिनेमाचे केवळ तंत्र बदलले.. आशय आणि खोली यामध्ये फार कमी सिनेमानी विचार केला.. आतापर्यंत बोललो नाही. पण लोकसत्तातील लेखाच्या निमित्ताने उधळली गेलेली मुक्ताफळे हीच जर "जाणकार" रसिकांची मते असतील, तर खरेच काही खरे नाही, गड्या..! सिनेमा "पाहणे" आपल्याला अजूनही कळलेले नाही, हे खरेच दुर्दैव आहे. तसे असते तर नो एंट्री, मस्तीसारखे टुक्कार सिनेमा हिट झाले नसते आणि मेट्रोसारखा सिनेमा फ्लॉप नसता गेला.. चांगल्या-वाईटाच्या संकल्पना व्यक्तिसापेक्ष असल्या, तरी त्यामध्ये किमान दर्जा असावा अशी अपेक्षा ठेवली तर बिघडले कुठे ? लोकसत्तात ज्यानी लेख लिहिला आहे, त्यांच्यावर टीका करताना ते लोककलेचे अभ्यासक आहेत, याची तरी जाणीव ठेवावी. एका बाजूने, आम्ही खूप अमाच्युएर आहोत, असाही स्टांस घ्यायचा आणि दुसरया बाजूने, जे कानाला गोड वाटते, ते चांगले संगीत, असा सर्व सामान्य निकष काढत अभ्यासकांवर टीका करायची, हे कसे ? "नटरंग" च्या कथा आणि कथेचा प्रवाह (चित्रपटीय भाषेत ज्याला आपण 'पटकथा' म्हणतो) हां वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे.. हा सिनेमा गाजला म्हणून तो चांगला आहे, असे सर्वांचे मत आहे का ? मनमोहन देसाईंचा 'अमर अकबर अन्थोनी' आणि 'मर्द' सुद्धा गाजलेच की ! म्हणून ते दर्जेदार सिनेमा का ? ते निव्वळ गल्लाभरू सिनेमा होते. Three Idiots हे अश्या गल्लाभरू सिनेमांचे सर्वात ताजे उदाहरण आहे. तो दर्जेदार सिनेमा आहे का ? "नटरंग" त्यातला नाही ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. पण तेवढाच तो प्रेक्षकशरण सिनेमा आहे, हेही तेवढेच खरे आहे. लोकांची नेमकी नाडी ओळखून केलेला हा चित्रपट आहे. त्यातल्या संगीताने देखिल लोकांची नेमकी नाडी ओळखली आहे. लोकसत्ताच्या लेखात मंजिरी देव यानी म्हटल्याप्रमाणे अजय-अतुल यांनी जुन्याच चाली नव्याने स्वतःच्या orchestration च्या कौशल्याच्या जोरावर बांधल्या आणि हा लग्गा लागलादेखिल.. orchestration नसलेले आणि त्यामुळे फसलेले एक गाणे "नटरंग" मध्ये आहे, कुणाला विचारले तर झटकन सांगता येईल का ? सगळ्यात महत्वाची बाब, प्रेक्षकशरणता ज्या ठिकाणी येते, त्या ठिकाणी मूळ उद्देशच फसतो... "नटरंग" कर्त्यांचे प्रयत्न फार प्रामाणिक आहेत, पण आपण imposed असलो की, दुसरे काही विचार करण्याच्या मनस्थितीत नसतो आणि नेमके हेच "नटरंग" च्या बाबतीत झाले आहे. "नटरंग" आणि "थ्री इडियट्स" हे ओव्हरहाईप सिनेमे आहेत. गुणा कागलकराच्या आधीच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आणि नाच्याची भूमिका नाईलाजाने करावी लागल्यानंतरची त्याची तगमग यथार्थपणे आली आहे, असे या सर्वाना वाटत असेल, तर मग सगळेच संपले.. आपली सांस्कृतिक जाणीव विकसित व्हायची असेल तर, अश्या कलाकृतींबाबत स्वतंत्रपणे विचार करणे गरजेचे असते. कारण "नटरंग" म्हणजे "मर्द" किंवा "नो एंट्री" किंवा "मस्ती" किंवा "वेलकम" नव्हे.. मला नेमके काय म्हणायचे आहे, हे सुद्न्यांच्या नक्कीच लक्षात आले असेल. फुटकळ मनोरंजन हाच जर बौद्धिक जाणीवेचा निकष असेल, तर मग बोलणेच खुंटले.... आता मनोरंजनाच्या संकल्पनादेखील सापेक्ष आहेत, म्हणा ! केवळ विनोद म्हणजेच मनोरंजन असे समजणा-यांची संख्या आजकाल फार वेगाने वाढते आहे, ही चिंतेची बाब आहे. आपण किती वरवर सिनेमा पाहतो, हे स्वतःशीच ताडून पाह्यचे असेल, तर इच्छुकानी पुढील लिंकवर माझे दोन लेख पाहण्यास हरकत नाही.
१) "तंत्राधिष्ठित चित्रपट : दृश्य प्रभाव आणि वैचारीक गोंधळ" http://www.scribd.com/doc/24257146 (हा लेख आनंद अंतरकर यांच्या "मोहिनी" दीपावली २००८ अंकामध्ये प्रकाशित झाला आहे.)
२) "तारे जमीं पर आणि टिंग्या : ऑस्करवारीच्या निमित्ताने..." http://www.scribd.com/doc/24296135 (हा लेख जानेवारी २००९ मध्ये दै. लोकसत्ता मध्ये प्रकाशित झाला होता.)

धन्यवाद !

स्नेहांकित,
श्रीनिवास नार्वेकर.........................

बेला शेंडेच्या गाण्यात आजिबात ठसका वा जोर नाही. विशेषतः "वाजले की बारा" च्या आधी ढोलकी आणि इतर वाद्यांच्या सुरेख intro piece नंतर तिची सुरुवात एकदमच फुसकी वाटली. उषा मंगेशकरांना का नाही बोलावले? त्यांचा आवाज अजूनही उत्तम आहे. वैशाली सामंतनेही दिला असता न्याय असे वाटते.>>>>>

कोणी दिला असता ते माहिती नाही पण... अगदी अगदी.. सुरुवात फारच सोफ्ट.. शेवट छान आहे पण तो जोराचा ठेका तर नाहीच नाही..

शिवाय गुणाचं तन्द्रिष्ट असणं, वगासाठी वेडं होणं, शेतात कितीही राबलं, तरी चार टिकल्यांसाठी मालकाचे पाय चाटणं, सतत घरातल्यांच्या अपेक्षांवर कमी ठरणं- हे सिनेमात ते खूपच प्रभावीपणे दाखवता आलं असतं. तिथे सिनेमा खचितच कमी पडलाय.>>>

रिकाम्या जागा तुम्ही भरा असा वाटता.. आणि त्या भरल्या किवा सोडून दिल्या .. त्यामुळे आवडला.. पण उत्तम प्रयत्न.. गुरु ठाकूर आणि अजय अतुल ला परत एकदा धन्यवाद लावण्या २-३ वेळा ऐकावाश्या वाटतात तेही २०१० मध्ये त्यात सगळा आलाच.. त्यांचा कांदा पोहे नंतर आवडलेला हे "मराठा मोळ" देणा लई भारी..

अजय-अतुल यांनी जुन्याच चाली नव्याने स्वतःच्या orchestration च्या कौशल्याच्या जोरावर बांधल्या आणि हा लग्गा लागलादेखिल.. >>>>

हा लग्गा लागेलच कारण अजून मराठी सिनेमाचा जम तेवढा हि बसला नाही .. मला सातच्या आत घरात ला
हिल पोरी हिला म्हणूनच आवडलं होता.. आधी मराठी सिनेमा होऊस फुल्ल तर होऊ दे मग बघू या सगळ्याकडे.. हे आपला माझा मत ..

मला पण आवडला नटरंग, करमणूक म्हणून :).
अजय अतुल च्या सांगीता साठी सर्वात आधी मग अतुल कुलकर्णी , गुरु ठाकुर, फुलवा खामकर आणि इतर कलाकारांसाठी.
मला अमृता खानविलकर ची लावणी पण आवडली, अर्थात सोनाली नृत्यात जास्त उजवी आहे .
बेला शेन्डे चा आवाज मला कधीच फार आवडत नाही, जास्त च किनरा/ वरच्या सुरां मधे नेहेमी खूप नेजल टोन वाटतो तिच्या आवाजात.
वैशाली सामन्त्/वैशाली माडे चा आवाज असता तर अजुन मजा आली असती.
अजय नी 'खेळ मांडला' मस्त गायलय.
Btw, या अजय गोगावले चा आवाज सुखविन्दर सारखा आहे ना बर्‍या पैकी ?.. I mean त्याच जातीतला !
अग बाई अरेच्या मधल 'मल्हार वारी' आणि त्याला जोडून आलेलं 'उदे ग आंबे उदे' मला खूप दिवस सुखविन्दरचं च वाटायच :).

चित्रपट ठीक आहे. वाजले की बारा - लाव़णी मला पण आवडली. पण तरीही चित्रपट चटका लाऊन गेला नाही. मागे कुठेतरी पिंजराचा उल्लेख आला आहे. त्यातला मास्तर अजुनही आठवतो. पण गुणा कुठेतरी कमी पडला. मला वाटत नाच्याचा संघर्ष जितका दाखवला आहे तितका शेवटी त्याचा लढा देखिल दाखवला असता तर जास्त आवडला असता चित्रपट.

आशुडी हा तुझा आवडीचा प्रांत आहे आत्ता कळतय. मी जानेवारीत मायबोली मेंबर झालो आणि आत्ता आत्ता कुठे मायबोलीच अंतरंग समजतय. मी पण नटरंग चा फॅन आहे. सिनेमांचा सुध्दा. नटरंग मधे सवाल जबाब असायला पाहिजे होता वादच नाही. जुन्या गाजलेल्या तमाशापटात तो असायचाच. काही ठिकाणी सर्व म्हणातात तस लॉजिक मॅच नाही होत पण हिंदी चित्रपटांपेक्षा बरच आहे.

माझ अतुल कुलकर्णींशी बोलण झाले आहे. ते मायबोली साठी मुलाखत द्यायला तयार आहेत. ववी ला कोणी म्हणाल की ही मुलाखत आधीच झाली आहे. मला तर नाही सापडली.

Pages