* औंदाचा पाऊस *

Submitted by अभय आर्वीकर on 25 November, 2009 - 10:58

औंदाचा पाऊस

सायबीन झालं पोटलोड, पराटी केविलवाणी,
कोमात गेलं शिवार सारं, व्वारे पाऊसपाणी ......!!

उन्हाळवाही-जांभूळवाही, शेती केली सुधारीत,
बी-बेनं खत-दवाई, बिटी आणली उधारीत,
नवं ज्ञान, नवं तंत्र, उदिम केला पुरा,
पावसाच्या उघाडीनं, स्वप्न झालं चुरा,
खंगून गेली कपाशी, बोंड बोरावाणी ......!!

बेनारचा बाबू म्हणे कापूस नाही बरा,
औंदा पेर सायबीन, बरकत येईन घरा,
नाही उतारा तिलेबी, खासर उलार होते,
रोग झाला गेरवा,एकरी दीड पोते,
बिनपाणी हजामत, चीत चारखानी ......!!

सायबाचं दप्तर म्हणते, पीक सोळा आणे,
अक्कल नाही तूले म्हून, भरले नाही दाणे,
विहिरित नाही पाझार, नयनी मात्र झरे,
किसाना परिस कईपट, चिमण्या-पाखरं बरे,
भकास झालं गावकूस, दिशा वंगळवाणी .....!!

, गंगाधर मुटे

..........**..............**............. **.............

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अक्कल नाही तूले म्हणून, भरले नाही दाणे>> सगळे शेतकर्‍यालेच अक्काल शिकाया जातेत! अन बी स्सी अ‍ॅग्री होउन बी शेतकरी नाई पण सरकारी हाफिसर होतेत! Sad

परवाचं वाचल. अवकाळी पावसाआधी शेत कापणी करून घरी का भरून ठेवलं नाही असा सवाल सरकारी अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना केला.
गंगाधरराव, काव्य आवडलं. शहरी आणि गावरान फुजन जमलय. काही शब्द कळले नाहीत. माझ्या माहीतीसाठी अर्थ विचारतोय.
पोटलोड, पराटी, बेनारचा बाबू, खासर उलार
गेरवा - रोगाच नाव कदाचित.

शब्दार्थ
पोटलोड = जमिनीतील अपुऱ्या ओलाव्यामुळे दाण्याची पूर्ण वाढ होण्यापूर्वीच शेंग पक्व होणे.
पराटी = पऱ्हांटी,कपाशीचे झाड.
बेनार = कृषी विषयक सल्ला देणारा शासकीय विभाग
खासर = बंडी, शेतीमाल वाहतुकीसाठी बैल जुंपून वापरावयाचे साधन.
गेरवा = तांबेरा नावाचा रोग, झाडाची पूर्ण वाढ न होता पिक कापणीला येते.
खासर उलार होणे = लाक्षणिक अर्थाने व्यवस्था कोलमडणे. घडी विस्कटणे.

गंगाधरजी ,
अशा कवितांच्या खाली अवघड शब्दांचा अर्थपण दिलात तर वाचकांना सोप जाईल .
बालभारती मध्ये जसे अवघड शब्दाचे अर्थ दिलेले असतात तसे .
पु.ले.शु. Happy

अभिप्रायाबद्दल सर्वांचे आभार.
<< व्वा एकदम वर्‍हाडी थाट आहे कवितेचा! कुठले आपण? >> बी
मी विदर्भातला.
अल्याड झाडी, पल्याड वर्‍हाड,दोन्हीच्या मधामधी माझं बिर्‍हाड.

" खुप दिवसांनी या बाजाची कविता बघायला मिळाली. धन्यवाद.
छानच लिहिलीय.. पुलेशु !! "
गिरीषजी,
अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

मुटे जी,
पुर्वी पाउस तरी वेळेवर यायचा आता तोही चुकवु लागलाय !
किसाना परिस कईपट,चिमण्या-पाखरं बरे,
भकास झालं गावकूस,दिशा वंगळवाणी ... 4 ...

.....कारण त्यांनाही मागे सगळं वारयावर सोडुन आत्महत्या करायची वेळ खुप कमी येत असेल !

गंगाधरजी,
मन भरुन आले. आम्हीही कागदावरचे शेतकरी.
दुष्काळी भागातले. नशिब डोंबिवलीला घेऊन आले.
ही अफाट रचना वाचताना एक विचार नेहमी मनात येतो, प्रश्नांपासुन लांब जाण्यापेक्षा त्यात घुसून ऊत्तरे, मार्ग शोधणे महत्वाचे. आत्महत्त्या हे ऊत्तर असूच शकत नाही.
असो, मनात आलेले लिहील्याबद्द्ल राग नसावा.
आपला,
मनापासुन परत शेतात राबायची ईच्छा असलेला.

अभिप्रायाबद्दल सर्वांचे आभार.

<< ही अफाट रचना वाचताना एक विचार नेहमी मनात येतो, प्रश्नांपासुन लांब जाण्यापेक्षा त्यात घुसून ऊत्तरे, मार्ग शोधणे महत्वाचे. आत्महत्त्या हे ऊत्तर असूच शकत नाही.>>

जिथे प्रश्नांची उत्तरे सोडवणे सर्वस्वी दुसर्‍याचे अधिन असते, तिथे आपण प्रश्नांपासुन लांब जाणे काय किंवा त्यात घुसून ऊत्तरे, मार्ग शोधणे काय, सारेच अनाठायी...!

मग कोणी रडत बसतो, कोणी फुकाचा आव आणुन आपलीच पाठ थोपटत बसतो आणि कोणी आत्महत्तेत ऊत्तर शोधत बसतो.

तीन्ही पर्याय वाईटच. आणि चवथा पर्याय आवाक्यात नाही.

Pages