ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग १८

Submitted by बेफ़िकीर on 15 October, 2010 - 04:48

"ते काय असं सांगण्यासारखं आहे होय???"

अशोकचे हे वाक्य ऐकून दिल्याने भडकून शिव्या घातल्या आणि म्हणाला...

"मी काय केलं होतं गगनबावड्याला त्याचं अगदी डिटेल वर्णन पाहिजे! आं?? आणि तुम्ही दोघं राजमाचीला त्या झुडुपात गेलात ते मात्र सांगण्यासारखं नाही... "

अशोक - अरे दिल्या... आईशप्पथ आम्ही हातात हात घेण्याशिवाय काहीही केलं नाही रे...

दिल्याचे आणि सुरेखाचे लग्न ठरलेले असल्यामुळे त्याने गगनबावड्याला सुरेखाचे चुंबन घेणे हा प्रकार समाजमान्य होता. पण वन्या आणि अश्क्याचे राजमाची अजिबात तसले धाडस झालेले नव्हते. काय सांगा? भडकली दीपा किंवा रशिदा तर? समजायच्या मवाली! अन जायच्या निघून! त्यापेक्षा आपले गप्पा मारत बसावे आणि हातात हात घेण्यापर्यंतच साहस करावे अस दोघांनी विचार केले होते.

आणि आज श्रमपरिहाराची जी पार्टी रूम नंबर २१४ मध्ये चाललेली होती त्यात दिल्याने असा वाद काढला होता की त्याचा आणि सुरेखाचा गगनबावड्याचा प्रसंग मात्र हे सगळे चवीन ऐकत होते आणि आज स्वतःचे मात्र काहीच सांगत नव्हते.

यावर अशोक कळकळीने खरे सांगत होता की असे काहीही झाले नाही. दिल्या भडकलेला होता. आत्मानंद उत्सुकतेने 'काही ऐकायला मिळते का' याकडे डोळे अधिकच बटबटीत करून लक्ष देत होता.

.... आणि... वनदास लामखेडे अत्यंत गंभीर झालेला होता... का ते माहीत नाही...

दिल्या - तू का बे असा?? ... धुसफुस झाली काय दोघांच्यात... त्या झाडीमध्ये??

यावर अशोक फस्सकन हासला. आत्मानंदही फिदीफिदी हासला. तो हल्ली हसू लागला होता. मात्र हा प्रश्न ऐकूनही वन्या गंभीरच!

अशोक - दीपाने झिडकारला असेल हात! दुसरं काय??
दिल्या - नायतर काय! अजून लहान आहेस म्हणाली असेल....

अशोक अजूनच हसू लागला तसा वनदास आपला नवीन पेग भरू लागला. तो एक शब्द बोलत नव्हता.

आता दिल्या आणि अश्क्यालाही गांभीर्य जाणवले.

दिल्या - काय रे वन्या?? काय झालं??
वन्या - .... अं??
अशोक - ... काय झालं काय??
वन्या - अंहं... काय नाय...

अशोकने आणि दिल्याने एकमेकांकडे पाहिले. 'असेल काहीतरी' अशी समजूत करून ते आता आत्मानंदकडे वळले.

अशोक - आपण काय केलंत??
आत्मा - मी?? यांना?? मी काहीच नाही केलं यांना..
अशोक - वनदासांना काय केलंत नाही विचारत मी... तिथे काय केलंत??
दिल्या - हा काय करणार??
अशोक - दिलीप.. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला?? हे काही करूच शकत नाहीत असं तर..???
दिल्या - मी तरी असं काय म्हणालेलो नाही... तुला हवा तो अर्थ काढतोस...
अशोक - काय हो??
आत्मा - काय??
अशोक - आम्ही तिघेही आपापल्या मैत्रिणींबरोबर असताना आपण कुठे होतात...
आत्मा - मी कुठे असणार?? तिथेच बसलो होतो...
अशोक - मग दिसला कसे नाहीत??
आत्मा - तुमचं लक्षं कुठे होतं??
अशोक - खोटं! निखालस खोटं बोलताय... आम्ही अर्ध्याच तासात परत आलो तेव्हा आपण नव्हतातच..
आत्मा - मी खाली गेलो होतो...
अशोक - ..का??
आत्मा - मग एकट्याने मन कसे रमवायचे??
अशोक - .. खाली जाऊन तुमचे मन कसे रमले??
दिल्या - त्या खंडुजीकडे बघत बसला असेल..
अशोक - त्याच्यात काय बघण्यासारखे आहे..
दिल्या - ते यालाच माहीत...
अशोक - बोला की?? केलंत काय खाली जाऊन?
आत्मा - पाय दुखत होते.. पडून राहिलो.. चहा वगैरे घेतला...
अशोक - अरे अरे! एक स्त्रीची अनुपस्थिती किती केविलवाणा करते पुरुषाला...
आत्मा - म्हणजे??
अशोक - तुमच्याही बरोबर कुणी असतं तर तुमचेही मन रमले असते...
आत्मा - खरं आहे....
अशोक - मला आपल्याला पाहून अपराधी वाटत आहे... की आपण एकटे राहिलात...

निवांत दारू पीत असताना फुटकळ चर्चा चाललेल्या होत्या. मात्र वनदास अजूनही बोलत नव्हता.

आता मात्र अशोकला ते सहन होईना! तब्बल दहा मिनिटांच्या शांततेनंतर अशोकने विचारले.

अशोक - वन्या... आता जर तू बोलला नाहीस तर फटकेच खाशील.. ल्येका झालं काय तुला??

वनदासने खाडकन मान वर करून अशोककडे रोखून पाहिले.

वनदास - तू याला विचारतोयस ना?? याने खाली जाऊन काय केलं?? हे बघ... हे केलं याने..

जेन्ट्स होस्टेलच्या रूम नंबर २१४ च्या भिंतीसुद्धा हादरून वन्याच्या हातातल्या वस्तूकडे पाहात होत्या.

तो प्रकारच झेपला नाही कुणाला! म्हणजे, समजलंच नाही की वन्याला काय म्हणायचंय!

वन्याच्या हातात रशिदाचे इनर्स होते.

आणि आत्मानंदचा जीव अक्षरशः जायची वेळ आली होती. डोळे फाडून तो वन्याकडे पाहात होता. वन्या आत्मानंदकडे! अशोक आणि दिल्या एकदा रशिदाच्या कपड्यांकडे आणि एकदा आत्म्याकडे!

कितीतरी सेकंदांनंतर दिल्या सावरला.

दिल्या - हे.. हे काय??? कुणाचे कपडे आहेत हे?
वनदास - काय माहीत???
दिल्या - काय माहीत म्हणजे?? मग तुझ्याकडे कसे आले??
वनदास - साहेब आज सकाळी बाहेर गेले होते ना?? जरा आलोच जाऊन म्हणत..
दिल्या - कोण आत्म्या??
वनदास - हं!
दिल्या - ... मग??
वनदास - तेव्हा मी मुद्दाम मागून जाऊन पाहिले... याने हे कपडे कचर्‍यात फेकले होते..
दिल्या - आत्म्या ***** .. काय आहे हे???
आत्मा - म... मी....
दिल्या - मी मी काय?? कुठनं आले हे कपडे???
आत्मा - चु... कुन.. आले होते....
दिल्या - चुकून म्हणजे???
आत्मा - जालन्याहून येताना...
वनदास - आत्मानंद ठोंबरे.. जालन्याहून येऊन तुम्हाला महिने लोटलेत... आजच कसे फेकायला गेलात?
आत्मा - सांगीतलं ना?? ....राहिले होते पिशवीत तेव्हापासून...
वनदास - आत्म्या... तुला एकच सांगतो.. मैत्रीत जेव्हा खोटे बोलतात ना... तेव्हा ...
आत्मा - ......
वनदास - तेव्हा माणसाची जगायची लायकी संपते... नंतर फक्त जनावरासारखे जगतो माणूस....
आत्मा - तुम्ही कृपया विश्वास ठेवा... मी असा आहे तरी का??? मी कशाला कुणाचे कपडे घेऊ??
दिल्या - आत्म्या... मला एका मिनिटात उत्तर हवं आहे... हे कुठून आले कपडे....
आत्मा - ... अहो... माझ्याकडे.. म्हणजे... मी कसे असे कपडे घेईन कुणाचे??
दिल्या - आत्म्या... ***** .. रस्टिकेट होशील रूममध्ये असले प्रकार ठेवलेस तर.. खरे बोल..
आत्मा - मी... तुमच्या तिघांची शप्पथ घेतो... हे कपडे चुकून होते माझ्या बॅगेत....
वनदास - आत्मा... ही तुझी पहिली चूक असती तर मी काहीच म्हणालो नसतो....
अशोक - ... म्हणजे काय रे वन्या??
वनदास - अश्क्या... हा .. लेडिज होस्टेलला... मुलींनाच पाहायला जायचा..

सगळे उडलेच!

अशोक - ... क... कशावरून??
वनदास - सांग ना तूच.. एकदा तरी विडीचा वास आला का याच्या तोंडाला.. एकदा तरी ओढली का??
अशोक - आत्म्या... तू आता मार खाणारेस.. सांग मला... हा घाणेरडेपणा कसा केलास??

काही झाले तरी तो होता फक्त एकोणीस, वीस वर्षांचा! याच रूममध्ये आपल्याला याच तिघांबरोबर राहायचे आहे हे माहीत असल्यामुळे त्याच्या मनावर प्रचंड ताण आला.

आत्मा अक्षरशः रडायला लागला...

कुणीही त्याला धीर दिला नाही. दोन ,तीन मिनिटे ओक्साबोक्शी रडल्यानंतर डोळे पुसून म्हणाला...

आत्मा - चुकलं माझं! ... त्या.... त्या बाई... खूप आवडल्या होत्या मला... म्हणून.. मी .. हे कपडेच घेतले... पण.. नंतर ..आज सकाळी उठल्यावर खूप भीती वाटली मला हे कपडे आपल्याकडे आहेत याची.. म्हणून घाईघाईत फेकायला गेलो.....

खरे तर हा एक विनोदच होता. उगाचच त्या बाईचे कपडे आणले आणि रूमवर आल्यावर 'हे प्रकरण आपल्याला झेपणार नाही' असा रास्त अंदाज आल्यानंतर ते फेकायची घाई सुरू झाली. पण... या विनोदावर कुणीच हसू शकत नव्हते. उलट.. मगाचपेक्षा कित्येक पटींनी गंभीर झाले सगळे!

आणि तसे गंभीर होण्याचे कारणच होते!

कारण आत्मानंदने 'हे कपडे मी राजमाचीहूनच आणले आहेत' हे कबूल केलेले होते. आता नजरा अधिकच तीक्ष्ण झाल्या.

दिल्या - कुठली बाई बे??

आता आला का प्रश्न?? कुठली बाई सांगायची??

आत्मा - त्या... चुलीपाशी... बसायच्या त्या....

तिघांनीही एकमेकांकडे आणि आत्म्याने आळीपाळीने तिघांकडे पाहिले.

वनदास - आत्म्या... तुला एकच सांगतो... आपण जेवढे बुद्धीमान स्वतःला समजतो ना?? तेवढे नसतो..

आत्मा - ... क... का?? ... काय झाले??

काय झाले होते ते चौघांनाही समजण्यासारखे होते. खंडुजी उमरेच्या घरातील कोणतीच स्त्री असे कपडे वापरत असणे अशक्य होते. त्यांच्या सतरा ठिकाणी फाटलेल्या पोलक्यांनाच आधी ठिगळे होती. कपडे हा त्या ठिकाणी मुळी महत्वाचा प्रकारच नव्हता. आणि आत्म्यालाही समजले होते की या तिघांच्या ते लक्षात आले आहे. निश्चीतच हे कपडे सुरेखा, रशिदा किंवा दीपा यांच्यापैकी एकीचे असणार होते.

दिल्या - आत्म्या... ..

दिल्याची ती हिंस्त्र नजर पाहून मात्र आत्म्याची बोबडीच वळली.

अशोक - आत्म्या... तुझे बाबा.. तुझे बाबा कसे आहेत ते आठवून... आज मी तुला ... काहीच म्हणत नाही....

आत्मा पुन्हा रडायला लागला. पण प्रकरण तेवढ्यावर थांबणार नव्हते.

वनदास - त्या बाईंचे कपडे... तू कुठून घेतलेस रे???

आत्मा - दोरीवर होते...

वनदास - असं?? .. मग एक काम करतोस???

आत्मा - काय???

वनदास - मी आणि तू पुन्हा दोघे तिथे जाऊ.. चुकून आमच्याबरोबर हे कपडे आले असं सांगू... आणि त्या खंडुजीला परत देऊन येऊ... जाऊयात??

आत्मा - .. तेवढ्यासाठी... कशाला जायला हवंय...

वनदास - कारण मग कळेल ना?? तो जेव्हा म्हणेल की हे आमचे कपडेच नाहीयेत....

दिल्या आणि अश्क्याच्या अगदी मनातलंच वाक्य वनदास बोललेला असल्यामुळे आता कसलीच फिकीर करण्याची आवश्यकता नव्हती. भयानक चिडलेल्या दिल्याने आत्म्याची धुलाई सुरू केली. त्यापासून अशोक आणि वन्याने आत्म्याला वाचवले. आत्मा अजूनही रडत होता. प्रकरण रूमबाहेर जाणे योग्य नव्हते. त्यामुळे सगळेच घुसमटून ओरडत होते.

आत्म्याचे रडणे थांबले तसा वनदास म्हणाला...

वनदास - खरे तर... तू सांगूच नकोस... कुणाचे कपडे आहेत ते...पण एक लक्षात ठेव... यानंतर प्रत्येक क्षणी माझी तुझ्यावर नजर आहे... आणि... आजपासून माझी आणि तुझी... मैत्री मात्र संपली आत्म्या.... मला तुझ्याबद्दल, तुझ्या शुद्ध संस्कारांबद्दल, तुझ्या घरातल्या सोवळ्यात राहणार्‍या लोकांबद्दल जो आदर होता तो तुझ्या या वागण्यामुळे... पूर्णपणे संपला.... मात्र एक लक्षात ठेव... जुन्या मैत्रीला न जागणारा माणूस मी नाही.. तसाच काही प्रसंग आला तर... मी तुझ्यासाठी नक्की धावून येईन... पण.... तो प्रसंग ... या कपड्यांच्या प्रसंगासारखा असला तर मात्र... ती अपेक्षाच ठेवू नकोस...

रूम नंबर २१४! स्मशानासारखी शांतता पसरली होती आज तिच्यात! जो तो आपापल्या पलंगावर आडवा झाला होता. एकमेकांकडे ढुंकूनही पाहात नव्हता. आणि चौघेही पीत होते. दिल्याने आज कित्येक महिन्यांनी भिंतीवर अनेक बुक्या मारल्या होत्या.

आणि आत्मानंद ठोंबरे नावाचा एक जिताजागता पश्चात्तप जेव्हा घोरायला लागला.. तेव्हा उरलेल्या तिघांच्याही मनात तोच विचार येत होता...

'आपल्या मैत्रिणीच्या बाबतीत असं झालं असलं तर??? पण विचारायचं कसं?? आणि... यापुढे... आत्म्याला आपल्या मैत्रिणींच्या संपर्कातही येऊ द्यायचे नाही... '

मात्र झोपायच्या आधी सर्वांनी उद्याच एकमेकांना स्वतंत्रपणे भेटायचे ठरवले आणि... त्यात त्या तिघींनाही बोलवायचे ठरवले... कारण... आत्मानंदसारखा पर्व्हर्टेड माणूस रूममध्ये असताना नेमके काय करायला पाहिजे हे मुलांपेक्षा मुली जास्त नीट सांगू शकल्या असत्या.... तसेच, त्यांना दक्ष राहायलाही सांगायला हवेच होते....

==============================================

आत्मा जेव्हा कॉलेजमधील दुपारच्या सलग चार पिरियड्सना बसून कालचा प्रसंग मनातून घालवून टाकायचा विचार करत होता तेव्हा दिल्या, अशोक, वनदास, सुरेखा, रशिदा आणि दीपा सारसबागेत अत्यंत गंभीर चेहरा करून एका झाडाच्या सावलीत बसले होते.

झालेला प्रसंग कुणीच सांगीतला नव्हता. मात्र, आत्मा लेडिज होस्टेलमधल्या मुलींना निरखायचा आणि त्याला आमच्यापेक्षा दारूचे व्यसन जास्त लागले आहे एवढे मात्र सांगीतले होते.

सुरेखा - पहिलं म्हणजे हे पिणं आधी बंद करा... बास झालं आता...
दीपा - खरंच आहे... ट्रीपलाही प्यायले... यापुढे पिणं बंद!
वनदास - दीपा.. ते ठीक आहे.. पण.. प्रश्न आत्मानंदचा आहे..
दीपा - त्याचा एकट्याचा नाही आहे तो प्रश्न....तुमच्यामुळेच त्याला व्यसन लागलं...

तिघांनीही मान खाली घातली. आपला भावी नवरा दिलीप आणि आपला भावी नवरा अशोक यांनाही दीपाने दोष दिला याचे सुरेखा आणि रशिदाला अजिबात वाईट वाटले नाही. उलट ती त्यांच्या मनातीलच विचार बोलत होती....

दीपा - मला सांग वनदास... तो एकतर लहान आहे.. इथे यायच्या आधी तो घेत होता का ड्रिन्क्स?? नाही... तुमचे पिणे पाहून तोही प्यायला लागला.. हा दोष कुणाचा आहे?? तो जेव्हा पहिल्यांदा प्यायला तेव्हा तुमच्यातील एकाने तरी त्याला पिऊ नकोस असे सांगीतले का?? मग आज त्याची एवढी काळजी वाटत आहे तर.. निदान स्वतःचे पिणे बंद करण्याची तरी इच्छा आहे का तुम्हाला??

वनदास - हे बघ दीपा... तू आधी मुद्दा ऐकून घे...

दीपा एकदम कडाडलीच! दिल्यासुद्धा दचकला तर इतरांचे काय??

दीपा - एक शब्द बोलू नकोस... आजपासून तुझे पिणे बंद! मला असला मित्रच नको आहे जो दारू पितो.. वा रे वा! तुम्हाला काळजी त्या आत्मानंदच्या पिण्याची... आणि तुझ्या पिण्याचं काय?? तू काय कमी पितोस?? कित्येकवेळा आंगनला बसलेला असतोस... वनदास.. काहीही झालं तरी मला असाच मित्र हवा आहे... जो फक्त माझ्यावर प्रेमच करतो असं नाही ... तर.. जो दोघांच्या विचारांनी चालतो... जो व्यसनाधीन नाही... आत्ता तू फक्त वीस, एकवीस वर्षांचा आहेस... मी पण तेवढीच आहे... आपल्याला एकमेकांशी लग्न करायची इच्छा आहे हे आपण केव्हाच एकमेकांशी बोललो आहोत.. पण अजून आपल्या दोघांच्याही घरी काहीही माहीत नाही.. तुला जॉब लागेपर्यंत तर मला बोलताही येणार नाही.. आणि मुलींचे लग्न लवकर करतात.. तोपर्यंत मला स्थळं आली तर मला हेही सांगता येणार नाही की जो मुलगा अजून शिकतोच आहे त्याच्याशी मला लग्न करायचं आहे... अशा परिस्थितीत जर त्यांना हे समजले की तू इतकी दारू पितोस..तर कोण तयार होईल घरचं... लग्नाला???? बास झालं... आजपासून दारू बंद! शपथ घे माझी..... घे शपथ...

दीपा किंवा दारू! काय पर्याय उपलब्ध होते! आजवर ज्या मदिरेने प्रत्येक छोट्यामोठ्या प्रसंगात, सुख-दु:खात साथ दिली, प्रत्येक प्रसंग अविस्मरणीय केला, आजवर ज्या मदिरेच्या लोभाने आणि प्रतीक्षेतच दुपारची संध्याकाळ व्हायची... ती मदिरा आज प्रेमाचा पर्याय ठरत होती... एक तर प्रेम... किवा मग दारू!

आणि तो ग्रूप असा होता.. ते वातावरण असे होते... की आता शपथ घेतल्याशिवाय चालणारच नव्हते...

वनदास - दीपा... म... मी... मला ... फक्त तू हवी आहेस.... दारू सोडली मी.. या क्षणापासून....

दीपाच्या चेहर्‍यावरचे स्त्रीसुलभ प्रेमळ विजयाचे हास्य रशिदा आणि सुरेखाला अस्वस्थ करून गेले..

किती हे प्रेम!

हे प्रेम पाहून सुरेखा तीव्रपणे म्हणाली...

सुरेखा - दिलीप... मला....मलाही... तुझ्याकडून शपथ हवीय....

दिलीप उर्फ धनंजय राऊत! श्रीमती कौशल्या राऊत यांचा एकुलता एक मुलगा! राजघराण्याचा वारसदार! घरातील दौलत वाहून जावी इतकी अफाट! देखणा, रुबाबदार, पुरुषी सौंदर्याचे जितेजागते उदाहरण! अत्यंत आक्रमक, तितकाच सहृदय, मिश्कील आणि शौकीन! सिगारेटशिवाय तास गेला नाही आणि दारूशिवाय रात्र, असा मुलगा!

काय म्हणाला?? सारसबागेतील गणपतीही अवाक झाला असेल....

दिल्या - सुरेखा... तुला माहीत नाही?? वन्याने सोडली त्याच क्षणी मीही सोडली दारू...

मनातून लाखो उमाळे वर आले आणि आवंढे बनून पुन्हा आत गेले सगळ्यांचे....

दिल्या - आजपासून.. धनंजय राऊत दारू पिणार नाही...

सुरेखाच्या चेहर्‍यावरचे ते समाधानाचे, सुखाचे आणि स्त्रीत्वाचा विजय झाल्याचे हास्य.....

...... ब्ल्यू लेबल किंवा ग्लेनफिडीशसारख्या अतीउच्च स्कॉचच्या लाखो खंब्यांपेक्षा ... नशीले होते....

पण रशिदा?? तिचा काय हक्क होता अशोकवर?? काहीच नाही... त्यांचे लग्न होईल तेव्ह खरे म्हणायचे!

तोपर्यंत ती फक्त एक परित्यक्ता! जिचा नवरा चोवीस तास दारूच्याच नशेत असायचा...

अचानक सर्वांना जाणवले... रशिदाच्या टपोर्‍या डोळ्यांमधून एक एक अश्रूंची सर ओघळून तिच्या गालांवर येऊन दुपारचे ऊन परावर्तीत करू लागली...

दीपाने पटकन रशिदाला जवळ घेतले... पाच वर्षांनी मोठी होती रशिदा.... त्या ग्रूपमध्ये सर्वात मोठी तीच होती... पण... सर्वात निराधार आणि अजूनही कायद्याने उपरी अशीही तीच होती.... तिला आत्ता गरज होती प्रेमाची..... आधाराची...

दीपाच्या स्पर्शात तो आधार मिळताच ती एकदम रडत दीपाला बिलगली... मग सुरेखालाही राहवले नाही... तिनेही रशिदाला जवळ घेतले...

तिघेही मुले अपराधी चेहर्‍याने खाली मान घालून बसलेली होती....

आणि... सगळ्यांनाच ते व्हावे ... उत्स्फुर्तपणे व्हावे असेच वाटत होते... रशिदाने न सांगताच व्हावे असेच वाटत होते.... आणि.... अगदी तस्सेच झाले....

अशोक - ... रशिदा... शराब... मैने भी छोडदी... आजसे.. सिर्फ... तुम्हारे लिये.... जिऊंगा...

सारसबागेत प्रेमी युगुलांनी चाळे करू नयेत म्हणून खूप प्रयत्न चालायचे.... पण आज.... तीन युगुले एकत्र बसलेली असतानाही... खर्‍याखुर्‍या शुद्ध प्रेमाच्या उमाळ्याने... रशिदा बेगमने कोणतीही लाजलज्जा न बाळगता... अशोकच्या खांद्यावर... बसल्या बसल्याच आपली मान टेकवली आणि आत्तापर्यंतच्या दु:खाचा रंग असलेल्या आसवांचा रंग एकदम पालटला... त्यांना आता सुखाचा... आनंदाचा रंग मिळाला....

सारसबागेतील गणपतीने त्या दिवशी... तीन शपथा ऐकल्या.... दारू सोडायच्या...

मात्र... 'आत्मानंदलाही पिऊ देणार नाही' ही शपथ घ्यायलाच नेमके तिघेही विसरले.... कारण... चमचमीत भेळेचा वास आणि प्रेमाचे झालेले विजय... यात आत्म्याला सगळेच विसरून गेले होते....

मात्र.... भेळ खाताना... सुरेखा आणि दीपाशी रशिदाने कुजबुजत बोललेले वाक्य नेमके काय असेल... हे या तिघांनाही समजले होते.... आणि अशोकच्या भडकलेल्या चेहर्‍याला... दिल्या आणि वन्या नजरेनेच शांत करायचा प्रयत्न करत होते.....

"वहांसे आकर देखा... तो.. बॅगमे मेरे कपडेही नही थे...."
================================================

संध्याकाळी सहा वाजता आत्मा परत रूमवर आला तेव्हाही त्याचा चेहरा लज्जीतच होता. पण... रूमवर तर कुणीच नव्हते.

बरे वाटले त्याला! नाहीतर आल्याआल्या वन्याच्या नजरेतील भाव पाहून आणखीनच शरमला असता तो! कसेबस त्याने ते कपडे आज पुन्हा नेऊन कचर्‍यात फेकले होते. तेथून सरळ कॉलेजलाच आला होता.

गेले कुठे सगळे?? आपल्या गावाला बिवाला गेले की काय? बाबांना हे प्रकार सांगायला?

खरे तर ही भीती अगदीच निराधार होती! पण चोराच्या मनात चांदणे! आत्म्याच्या पायाखालची वाळुच सरकली.

साडे सात वाजले तरी कुणीच रूमवर आले नाही म्हंटल्यावर मात्र त्याला खरच भीती वाटली.

त्याने पटकन स्वतःच्या घरी फोन लावला ऑफीसमधून! घरी तर सगळे ठीकठाक होते. अर्थात, हे तिघे गेले असले तरी इतक्यात पोचणार नाहीत हे त्यालाही माहीत होते.

पण फोनसाठीचा रुपया देताना मात्र आत्म्याला जाणवले...

खरंच की! सदतीस रुपये उरले आता आपल्याकडे फक्त! मनी ऑर्डर आली दोन चार दिवसात तर बरंय! आपल्याला पैसे पाठवायला विसरणार नाहीतच बाबा म्हणा! पण.. एखाद दोन दिवस उशीर झाला तर... करायचे काय आपण??

या तिघांकडे तर आता पैसे मागायचेच नाहीत... हे तिघे आपापल्या प्रेमिकेला घेऊन मस्त मजा करणार... मी मात्र एकटाच...

आत्मा पुन्हा रूमवर आला.... काय वाटले कुणास ठाऊक त्याला...

आपलं आजवरचं होस्टेलवरचं लाईफ रिकन्साईल करावंसं वाटलं त्याला अचानक...

उठला.... आणि.. खिशातले सदतीस रुपये घेऊन... आत्मानंद ठोंबरे.... आज एकटेच आंगनला गेले....

ओल्ड मंकचा पहिला पेग रक्तात भिनत असतानाच त्याचे विचारचक्र सुरू झाले....

कुठे सुरुवात झाली या सगळ्याला?? काय झाले नेमके?? आपण वाईट झालो आहोत की आपण स्वतंत्र आहोत इतकेच??

आपण जे केले, जे करतो आहोत... आपण स्वतःच त्याचा विचार केला तर आपल्याला कायम त्या सर्व गोष्टींचे समर्थन कसे करता येईल याचेच पर्याय सुचत राहणार... पण.. आज आपण जरा त्रयस्थपणे स्वतःकडे पाहिले पहिजे...

सदतिस रुपये... का काळजी वाटली आज आपल्याकडे असलेल्या या पैशांची आपल्याला?? का वाटले की हे संपले तर आपण काय करणार???

होस्टेलच्या मेसचा पैसा अन पैसा भरलेला आहे... अगदी सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत प्रत्येक पैसा... सगळी पुस्तके, सगळ्या वह्या, सगळी गाईड्स, सर्व साहित्य... सगळं आधीच घेतलेलं आहे... एक्झॅम फी सुद्धा भरलेली आहे... कपडे आहेत... हव्या त्या वस्तू आहेत... मग... आपल्याला काळजी का वाटत आहे?? कारण... या नवीन वर्षात आपल्याला इतर मुलांच्या सबमिशनची कंत्राटेच मिळाली नाहीत... कारण... आता प्रत्येक शाखेचे विषय वेगळे आहेत... आपण आता फक्त उत्पादन अभियांत्रिकीचेच कंत्राट मिळवू शकतो... आणि ... तेही कुणी देत नाही.... अक्षर कळले तर?? असे वाटते सगळ्यांना...

आपल्याला गुण मिळत नाहीत का?? मिळतात... आपण तर मागच्या वर्षी आठवे आलो... मग?? मग काय चालले आहे काय आपले??

दारू! मद्य पितो आपण मद्य! का? का पितो म्हणे?? कारण... असे वाटते की ... मद्य प्यायल्यानंतर मिळणारी मानसिक व शारिरीक अवस्था आपल्याला शूर बनवते... बेदरकार बनवते.... मग आपणच आपल्याला मोठे वाटू लागतो... महान वाटू लागतो... स्वतंत्र वाटू लागतो....

खरंच की... या स्वतंत्रमुळे लक्षात आलं! आपल्याला... आपल्याला कधी स्वतंत्र केलंच नाही आई बाबांनी!

अशोक यांनी घेतलेल्या बौद्धिकाचाच फक्त परिणाम नाही आहे हा... हा परिणाम आहे कडक सोवळ्याचा... कडक संस्कारांचा... का? मी एक मुलगा नाही?? मी फुटबॉल खेळू नये?? का?? कारण इतर मुले शिव्या देतात आणि मलाही तीच सवय लागेल म्हणून?? मग असे का होणार नाही म्हणे?? की माझी सवय त्यांना लागेल?? असा विचार का करत नाही तुम्ही???

आत्मानंद ठोंबरे हा मुलगा जेव्हा पंधरा वर्षांचा होतो, आपल्या त्या अवयवाचा लघ्वी करण्याव्यतिरिक्तही असलेला अत्यंत महत्वाचा उपयोग जेव्हा या मुलाला समजतो... तेव्हा तुम्हाला समजत नाही का??? की मुलगा वयात आला असेल??? त्याच्या डोक्यात काय काय विचार येत असतील??

का?? दिलीप यांना सुरेखा भेटू शकतात, वनदास ग्रामीण विभागातले.. त्यांना मैत्रिण मिळू शकते... अशोक तर नुसते भोपळ्यासारखे आहेत... एक परित्यक्ता का होईना... पण त्यांना मिळू शकते... बरं... हा माझ्या नशिबाचा भाग... की मला कुणीच भेटत नाही... मी कुणालाच आवडत नाही.... पण....मला कुणीच आवडणार नाही का??

हे पिवळे दात... हे खुंटासारखे केस... हा जाड चष्मा... ही कुणालाच मान्य नसलेली भाषा... जी केवळ एक थट्टेचा विषयच फक्त होऊ शकते... ही कृश अंगकाठी... हा बावळट पेहराव.... मान्य आहे ना... माझ्यात काहीच नाही... पण... मला भावना नाहीत???

अलका देव... स्वतः काही सुंदर नाही आहेत त्या... सामान्य.. सर्वसाधारण आहेत... काय केले नाही मी त्या दिवसांमध्ये त्यांच्या वडिलांसाठी... रात्र रात्र जागायचो.. अशोक आणि देवकाकांसाठी... तेव्हा मी... तेव्हा मी इतका चांगला होतो... मग?? आज त्या माझ्याशी एक शब्द बोलत नाहीत.... लांबूनच जातात निघून...

कुणालाच कसे कळत नाही?? मी माझ्या कक्षात झोपायला गेलो तेव्हा नाटेकर काकू अशा अवस्थेत दिसतील हे काय मला स्वप्न पडले होते?? की मी त्यांना आग्रह केला होता की मी झोपायला माझ्या कक्षात आलो की तुम्ही तुमच्या खिडकीत येऊन वस्त्रे बदला... आणि मग... नंतर त्यांना पाहण्याची ओढ निर्माण होणे... त्यासाठी ताटकळत बसावेसे वाटणे... त्याच स्वप्नात येणे... हा निसर्ग नाही??

नाटेकर काकू या व्यक्तीबाबत मला माझ्या आईइतकाच आदर होता आधी... या भावनेला धक्का पोचवायला मी कारणीभूत आहे की त्या?? त्याच स्वतः!

दिलीप यांचे वडील सगळ्या गावादेखत त्या सुंद्रा नावाच्या स्त्रीला आपल्या बायकोसमोर आणून 'हिला घरात ठेवणार' म्हणायचे... त्यांची नाही तक्रार करत कुणी सापत्नीकर सरांकडे... आपल्याला सहा महिन्यात होस्टेलवरची एकही मुलगी कपडे बदलताना दिसली नाही.. पण... नुसते आपण तिथे बसायचो म्हणून केवढे प्रकरण..... त्यतही त्या सुरेखांचाच वरचष्मा... म्हणे मी मध्ये पडले म्हणून तुम्ही सगळे वाचलात... का?? मी एकटाच दारू पितो?? हे तिघे नाही पीत??

अरे?? आपण हे काय विचार करतोय?? त्रयस्थपणे पाहायचंय नाही का आपल्याला आपल्याकडे?? हां! त्रयस्थपणे!...

तर आत्मानंद ठोंबरे... आम्हाला असे वाटते की तुम्ही एक मुरलेले पियक्कड आहात... कारण तुम्हाला रोज संध्याकाळी प्यायची आठवण येते... प्यायल्यावर तुम्हाला जो आनंद मिळतो तो मिळवण्यासाठी सूर्य क्षितीजावरून पलीकडे गेला की आपोआप तुमची पावले आंगनकडे वळतात.... परिस्थिती काहीही असो, तुमच्याबरोबर कुणी असो वा नसो, तुम्ही प्यायला जाताच... यावर तुम्हाला काही म्हणायचे आहे???

नाही... काहीही नाही.....

मग आत्मानंद ठोंबरे... आता पुढचा प्रश्न विचारतो.... केवळ एका मुलीला तिच्या वडिलांच्या आजारपणात मनापासून भरपूर मदत केलीत या एकाच भांडवलावर तुम्हाला असे वाटते की तिने तुमच्यावर भाळावे.. जीव ओवाळून टाकावा...तुम्हाला आलिंगन द्यावे... लग्नाची किंवा कसलीही अपेक्षा न ठेवताही तिच्या मोहक शरीरावर तुटून पडण्याचा अधिकार तिने तुम्हाला द्यावा... का?? तुमच्या वडिलांसाठी की तुमच्या आईसाठी तिने असे काही केलेच तर फिटणार नाहीत का ते उपकार?? तुम्ही काही विशेष केलेत असे वाटते तुम्हाला?? तुम्ही केलेत ती केवळ एक माणुसकी होती आणि त्या बदल्यात तुम्हाला तिचे सर्वस्व हवे आहे... याचा अर्थच ती माणुसकी करण्यामागचा तुमचा हेतुच मुळात भ्रष्ट आहे.... यावर तुम्हाला काही म्हणायचे आहे???

नाही... काहीही नाही...

मग आता आत्मानंद ठोंबरे... हा पुढचा प्रश्न ऐका... तुम्ही स्वतःच्या कक्षात झोपायला गेलात तेव्हा केवळ अनवधानाने शेजारची ती महिला तशा अवस्थेत तुम्हाला दिसली... जगातील कोणत्याही महिलेला स्वेच्छेने तसे दिसावे असे वाटणार नाही हे माहीत असूनही तुम्हाला आजवर तुअम्च्यावर झालेल्या कोणत्याही संस्कारांची वा तिच्या वयाची जाणीव झाली नाही व रोज तुम्ही आसूसून तुमच्या कक्षात तिच्या त्याच अवस्थेचे दर्शन होण्याच्या प्रतीक्षेत तासन तास बसून राहायचात... ही एक विकृती आहे... यावर तुम्हाला काही म्हणायचे आहे????

नाही.... काहीही नाही....

अभिनंदन आत्मानंद ठोंबरे, अजून तुमच्यातला आत्मानंद ठोंबरे जिवंत आहे हेच दिसत आहे या कबुलीतून... आता पुढचा प्रश्न ऐका... शकिला व रेश्मासारख्या मनोवृत्ती बिघडवणार्‍या स्त्रियांची भडक व उत्तान छायाचित्रे पाहताना लाजून मान खाली घालणारे तुम्ही... होस्टेलवरच्या विद्यार्थिनींपैकी कुणी अशाच एखाद्या अवस्थेत दिसते का हे हपापल्यासारखे पाहण्यासाठी टेकडीवर जाऊन तासनतास बसायचात... यात केवळ एक हीन मनोवृत्ती आहे व त्यामुळे तुम्ही पुरुष असण्याचा आदर स्वीकारण्यास नालायक ठरत आहात यावर तुम्हाला काही म्हणायचे आहे???

नाही.... काहीही नाही...

तर मग आत्मानंद ठोंबरे... याही प्रश्नाचे उत्तर द्याच... की ज्या तिघांनी गेले दिड वर्ष तुमच्यावर अतोनात प्रेम केले... ज्यांच्या सहवासात असल्यामुळे तुम्ही एक प्रकारे सुरक्षित होतात कारण मित्र किंवा मैत्री ही चीजच तुम्हाला या तिघांमुळे समजलेली होती.... त्या तिघांपैकी एकाच्या प्रेयसीचे कपडे चोरून स्वतःच्या पिशवीत घालणे... ही एक मानसिक विकृती असून .... तो एक विश्वासघात असून... त्यात माणूसपण नसून... तुम्ही चारचौघात एक माणूस म्हणून जगायला किंवा राहायला नालायक आहात यावर तुम्हाला काही म्हणायचे आहे????

होय... म्हणायचे आहे....

... म्हणायचे आहे????? .... काय म्हणायचे आहे??? ..... ऐकूदेत....

ऐका.....

शकिला या स्त्रीचे टॉवेल गुंडाळलेले छायाचित्र पाहून मला आठवण आली होती माझ्या आईची.... ऐकताय ना?? माझ्या आईची आठवण आली मला... त्रिवेणीचीही आठवण आली.... तो पहिला दिवस, ती पहिली रात्र होती या वसतीगृहातली माझी... माझे सगळे संस्कार, माझी ही भाषा जिची पावलोपावली मस्करी केली जाते... हे सगळे भांडवल घेऊन मी येथे प्रवेशलो तेव्हा... आज सुरेखावहिनींमुळे सुधारलेले दिलीप राऊत... त्यांच्या आतल्या कपड्यांवर उघडेनागडे रूममध्ये बसलेले होते... भिंतीवर बुक्या मारत होते.... सिगारेटींवर सिगारेटी फुंकत होते... वनदास लामखेडे पहिल्याच दिवशी 'मी कधीतरीच घेतो' असे म्हणून तब्बल अडीच पेग प्यायले होते... आणि हे अशोक... ज्यांचा विश्वासघात मी केला असे तुम्ही म्हणता... त्यांनी स्त्रीचे मला ते रूप दाखवले होते... जे पाहून मला माझ्या आईची आणि तरुण बहिणीची आठवण आली होती.... का येऊ नये??? मला वाईट वाटले होते... की आपण स्त्रीला कोणत्या रुपात आजवर पाहिले... आणि आज हे कोणते रूप पाहात आहोत... मी काही चित्रपटांची चित्रे पाहिलीच नव्हती असे नाही.. मी दूरदर्शनवर काही गाणी पाहिलीच नव्हती असेही नाही... पण.. रोजच्या.. अगदी आपल्या जीवनात अशीऑ माणसे असतील आणि ती इतकी बिनधास्त असतील याची मला पहिल्यांदाच कल्पना आली... ज्या संस्थेमध्ये केवळ शिक्षणासाठी येण्याचा माझा पवित्र हेतू होता त्या संस्थेच्या वसतीगृहात शकिलाच्या अनावृत्त छातीकडे पाहात मिटक्या मारत मद्य प्राशन केले जाईल हे मला माहीतही नव्हते... अशा वेळेस.. ज्या माझ्यावर झालेल्या संस्कारांचा हवाला आज देऊन वनदास लामखेडे माझ्याशी मैत्री तोडत आहेत... ते वनदास लामखेडे त्यादिवशी खदाखदा हसत होते... शकिलाचे छायाचित्र येथे लावू नयेत अशी विनंती मी केल्यानंतर.... त्या दिवशी... मला सुधारण्यासाठी... किंवा मी त्यांचे विचार सुधारत आहे याची नोंद घेण्यासाठी.... यच्चयावत वसतीगृहातील कुणीही... अगदी सापत्नीकर सरही.. ज्यांनी माझ्याकडून त्या दिवशी जाब मागीतला... तेही धावले नव्हते... ही चूक माझी होती???? काय म्हणायचे आहे तुम्हाला याच्यावर??? ... काहीच नाही??? मग आता पुढचा प्रश्न ऐका...

या कक्षात मद्यपान करताच कसे हा प्रश्न मी अत्यंत नम्रपणे व माझ्या याच बाळबोध भाषेत विचारला तेव्हा त्या प्रश्नाची व माझ्या शैलीची मनसोक्त थट्टा करून मला जबरदस्तीने पकडून माझ्या घशात मदिरेचे थेंब बळजबरीने ओतणे... ही विकृती नाही?? मी कोणत्या पार्श्वभूमीत वाढलेलो आहे याचा काहीही विचार न करता मला निदान समजावून तरी सांगावे याची जाणीवही न झालेल्या लामखडेंना त्या दिवशी माझी अवस्था पाहून खदखदून हसू येत होते.... हे कोणते संस्कार?? हा कोणता चांगुलपणा?? हे कसले माणूसपण?? यावर तुमच्याकडे काही उत्तर आहे???? नाही???? नसणारच.... मग ऐका...

अलका देव यांचे तीर्थरूप रुग्णालयात नसते तरीही अशोक यांची मी रात्र रात्र तितकीच सेवा मन लावून केली असती हे ठाऊक असतानाही... माझ्या लहानपणापासून मला कसे स्वातंत्र्य मिळालेले नाही व मीम्हणजे कसा फक्त आपल्या मातापित्यांच्या अपेक्षांना मूर्त स्वरूप देणारा एक सजीव आहे हे इतक्या ठासून ठासून मला सांगणे व स्वतंत्र विचार करायला प्रवृत्त करणे व तेही कशासाठी???? तर मदिरा प्राशन करण्यासाठी.... यात तुम्हाला काही माणूसपण जाणवते का हो??? काही जाणीव दिसते?? की आपण एका आपल्याच वयाच्या परंतु शुद्ध आचरण करणार्‍या मुलाला काय सांगत आहोत??? हे वागणे योग्य नाही असे माझे म्हणणे आहे... यावर काही म्हणायचे आहे???? छे.. काय म्हणायचे असणार???

म्हणजे.. मी माझी संस्कृती, माझे संस्कार आणि माझे आचरण अबाधित ठेवायचे... ठेवायचा प्रयत्न करायचा सतत... आणि त्यावर घाला घालायला आज तुमच्यादृष्टीने माणुसकीने वागणारे हे तिघेही सतत तयार असणार..... आणि आता मी त्यांच्या पावलांवर पाऊल टाकले की लगेच मी मोठा अपराधी.. वावा... ऐका ऐका.. पुढे ऐका...

सुवर्णा मॅडम या आपल्या शिक्षिका आहेत.. त्यांच्याबद्द्ल असलं काहीतरी बोलणं योग्य नाही... कक्ष क्रमांक २१४ मध्ये सर्वात पहिल्यांदा हे विधान कुणी केलं होतं??? आज ज्याला तुम्ही विकृत समजता त्या आत्मानंद ठोंबरेने.... तेव्हा हेच तिघे गप्प बसले होते??? माझे वय काय ऐंशी आहे की माझ्या नजरेत सुवर्णा मॅडम वाकून सही करताना त्यांच्या सरकलेल्या पदरातून दिसणार्‍या त्यांच्या यौवनाने मी विचलीत होऊ नये??? खास करून तेव्हा... जेव्हा चोवीस तास कक्षात फक्त त्यांचीच चर्चा चालते??? त्याचप्रकारे वर्धिनी... वर्धिनी मॅडमबाबत तसा दृष्टीकोन येण्यामागे काय आहे??? माझे अस्थिर मन?? मला मिलालेले व अचानकपणे मिळालेले स्वातंत्र्य?? की या तिघांचा प्रभाव??? काही म्हणायचे आहे??? हं! काय म्हणता येणार तुम्हाला यावर???

रशिदा! कितीतरी मोठ्या बाई! पंचवीस वर्षांच्या! लग्न झालेले आहे... हजारो अनुभव घेतले आहेत माणसांचे... मग मला सांगा... एखादा मुलगा वागायला बावळट वाटला... तुपट भाषेत बोलणारा वाटला... तर... एकदा हसाल... दोनदा हसाल.. राजमाचीच्या संपूर्ण सहलीत तुम्हाला मी म्हणजे एखादे मन रमवणारे खेळणे वाटलो??? तरी त्याचेही काही नाही... मला काय त्याचे??? मला काहीच नाही वाटत... माझ्या तीर्थरुपांमुळे ही भाषा माझ्या तोंडात आली... मी काय करू?? बदलायची म्हंटली तर मिनिट लागणार नाही... पण आजवर मी शिवी दिलेली नाही.... एकही... कुणालाही... पण.. रशिदा...संपूर्ण सहलीत त्यांचे लक्ष फक्त मी आता काय आणि कसे बोलतो याकडे.. सुरुवातीला मलाही वाटले... की यांचे मन आपल्यामुळे रमतेय... हरकत नाही... आपल्याच मित्रपरिवारातील आहेत... मोठ्या आहेत... मनाने चांगल्या आहेत... पण मग... आम्ही सगळे त्या खंडुजी उमरेंच्या बाहेरच्या खोलीत चहा पीत असताना... दिलीप यांनी मला माझ्या पिशवीतील बिस्कीटे आणायला सांगीतली म्हणून मी आत गेलो तेव्हा... त्या अंधार्‍या खोलीत जेव्हा रशिदा आपला ड्रेस बदलत होत्या... मी धक्का बसून बावचळलो होतो... तेव्हाही त्या... खुदकन हासल्याच... मी कसाबसा परत आलो.... पण... मी एखादा निरुपद्रवी माणूस असल्याप्रमाणे हासल्या... का?? मी ... मी ... माझ्या मनात तश्या भावना नसतील??? त्यांना का नाही वाटले पटकन स्वतःचे अंग झाकून यावे... मी म्हणजे एक लहान मुलगा आहे?? ... एक.... एक हास्यास्पद जीव आहे??? .... लाज वाटली नाही त्या क्षणी??? .... मग.... त्यांच्या माझ्याबाबतीतील सर्व समजुतींना जोरदार तडा द्यावासा मला वाटला... तर... लगेच मी विकृत??? असो.. चूक ती चूकच... माझ्याकडून चूकच झाली..... पण मग.. फक्त.... फक्त मी जे केले तीच विकृती??? .... सलग छत्तीस तास मला विनोदाचा विषय समजून त्या हासत होत्या... माझे महत्व नगण्य समजत होत्या... याला तुम्ही.. मानसिक पातळीवरची विकृती नाही समजणार??? .... माझ्यामते तुम्ही समजणार नसाल तर तुम्हीच ..... तुम्हीच विचित्र आहात.... यावर... यावर काही म्हणायचे आहे?? तुमचे स्त्रीत्व तुम्हाला इतके सुरक्षित वाटत आहे... की अर्धवट कपड्यांमध्ये तुम्ही असताना, मनात तुम्हाला तसे पाहायचा अजिबात हेतू नसलेला आत्मानंद ठोंबरे जेव्हा अचानक तिथे येतो... तेव्हाही तुम्ही त्याला हासता... काय हा गर्व... यावर... आहे काही म्हणायचे??? .... असेलही... पण... मला ऐकायचेच नाहीये ते.....

रात्रीचे साडे दहा वाजले होते. रूम नंबर २१४ मध्ये परत आलेल्या तिघांनाही कल्पना होती. आत्म्या बहुधा आंगनला गेला असेल! पण आज त्याला परत आणायची, बोलवायची इच्छाच होत नव्हती कुणाला! सगळ्यांच्या मनात आत्मानंद ठोंबरेबद्दल तिरस्कार भरलेला होता.

इकडे हायवेवरील ट्रक्स घोंघावत जात होते. क्वार्टर संपली होती आज पहिल्यांदाच आत्म्याची! अर्थात, ती त्यने पेग सिस्टीमवर घेतली असली तरी आंगनवाल्याने क्वार्टरप्रमाणे रेट लावला असताच! पण... महत्वाचा प्रश्न हा होता की खिशातल्या सदतीस रुपयांच्या पुढे बिल गेले होते.

पण आत्मा? त्याला ते माहीतच नव्हते. डोळे अंधारात कुठेतरी लागलेले होते. दु:खाने ओतप्रोत भरलेले डोळे! एकाच शरीरात जणू दोन मने असावीत व त्यांच्यातील युद्धात तडफडावे लागावे तसा तडफडत होता तो! काय बरोबर काय चूक समजत नव्हते. आत्ता खरच बुवा ठोंबरेंसारख्या कुणा मार्गदर्शकाची आवश्यकता वाटत होती त्याला.. आईजवळ बसावेसे वाटत होते...

पण.... ते अजिबातच शक्य नव्हते...

इतकी पहिल्यांदाच चढली होती... एक क्वार्टर म्हणजे काय झाले??? सगळे आवाज लांबून ऐकू येत होते... डोक्यापर्यंत पोचायलाच वेळ लागत होता घटनांचे अर्थ... तेवढ्यात खांद्यावर कुणाचा तरी मैत्रीपूर्ण हात पडला... आत्म्याला त्याही परिस्थितीत बरे वाटले... बहुधा... राग विसरून वनदास आला असावा...

तेवढ्यात आजूबाजूच्या खुर्च्यांवर दोघे तिघे येऊनही बसले... कळत काहीच नव्हते दारूमुळे...

खांद्यावर हात ठेवणारा मागेच उभा होता... तो अगदीच आपुलकीच्या स्वरात म्हणाला.....

"आज... अकेले अकेले शौक फर्मारहे हो मियाँ..... हम भी शरीक होजाये तो.... इजाजत है????"

आत्मा एकटाच आंगनला बसल्याचे माहीत झाल्यामुळे धनराज गुणेची गॅन्ग आंगनला आली होती....

गुलमोहर: 

नंबर १

मी पण

सानी,डॉ,परेश.......
आपण सारे पहीले.......
तुम्हा सगल्यान्च्या वतीने मी नम्बर लावला होता.......अभिनन्दन सगळ्यान्च.......
चला वाचुयात.............

सावरी

सावरी अभिनंदन!!!!! आम्ही सर्वांनी तुला आज आनंदाची गोड संधी दिली, हो की नाही डॉ़क, नितीन परेश?????
Rofl
Rofl
Rofl
Rofl
Rofl

Happy

सावरी अभिनंदन!!!!! आम्ही सर्वांनी तुला आज आनंदाची गोड संधी दिली, हो की नाही डॉ़क, नितीन परेश?????......

धन्यवाद्..नी तुम्हा सगळ्यान्चही अभिनंदन..........

सावरी

धन्यवाद बेफिकीर साहेब. कधी एवढी वाट पहायची सवय नवती. पण तुमच्या कामाच्या घाईतून वेळ काढून भाग टाकल्याबद्दल आभारी आहे.

अरे अरे अरे असे हपापल्यागत काय करता? Uhoh तो नवटाकचा खंबा सांडेल ना अशाने. मला त्याची काळजी. Sad दमाने घ्या. सार्‍यांना मिळेल.

Thnxxxxxxxxxxx..

सानी......
सावरी तुझे मन किती किती मोठे!!! तुम्ही सगळे जसे तशीच मीही......

सावरी

डॉक, तुमचे आमीन फळाला आले Happy
कधी एवढी वाट पहायची सवय नवती. >>> मला पण....
पहिल्या नंबरसाठी आहे, कोणी चुकीचा अर्थ घेऊ नये>>> नाही नितीन, आम्ही चांगलेच अर्थ काढू... Happy
चला आता वाचूयात Happy

ह्या कथानकातील सर्वात दमदार असा हा भाग झाला आहे. बेफिकीर साहेब तीन दिवसाची वाट बघणे खरोखरच सत्कार्यी लागले आहे. विशेष करून गरज नसताना नाक खुपसून टीका करणारांना हे सर्वात चांगले उत्तर आहे. अभिनंदन पुन्हा एकदा..

फार मनापासून लिहिलात का हा भाग बेफिकीरजी???? अप्रतिम, याशिवाय माझ्याजवळ दुसरा शब्द नाहीये... आत्मानंदचे स्वगत अंतर्मुख करणारे होते... आत्मानंदच्या वागण्याचे अतिशय बॅलेंस्ड विश्लेषण केलेय तुम्ही... आवडले...
रशिदाला 'तशा' अवस्थेत आत्म्याने पाहिले आणि तेंव्हाही ती हसत होती हे वाचून तिच्याविषयीच्या माझ्या मनातल्या प्रतिमेला तडा गेला...

नितीन बोरगेंशी सहमत... जे अनाठायी टिका करतात, त्यांनी हा भाग नक्की वाचावा... थोडेतरी शहाणपण येईल त्यांना, असे वाटते...

पंचलाईनने खरेच ठोका चुकवलाय आज... आत्मानंदला मानसिक मार भरपूर बसलाय, आता जबरी शारिरीक वारही होणार का त्यावर... अरेरे Sad

बेफिकीरजी.... खुप खुप धन्यवाद ह्या मौल्यवान लिखाणाबद्दल... जियो आप.... Happy

नितिन बोरगे, संदिप आहेर, मंदार व सनि १९८२,

आपले सर्वांचे मनःपुर्वक आभार!

तसेच, सर्व प्रतिसादकांनी उत्स्फुर्तपणे नोंदवलेल्या प्रतिक्रियांसाठी त्यांचेही मनापासून आभार! एक प्रयत्नपुर्वक लेखन करणारा माणूस म्हणून मला व्यक्तीशः लेखनावर आलेल्या प्रतिसादांची अधिक उत्सुकता होती. आपल्या प्रेमाचा आदर असतानाच त्या प्रतिसादांमधून मला काहीच शिकायला किंवा दुरुस्त करायला मिळाले नाही याचा किंचित खेद आहे. असो, लोभ असाच ठेवावात अशी विनंती!

चिंतातूर,

आपणही आवर्जुन दखल घेतल्याबद्दल आभारी आहे.

-'बेफिकीर'!

सानी,

आपणही लेखनाची दखल घेतलीत व मनमोकळा प्रतिसाद दिलात यासाठी आपले आभार!

कृपया लोभ असावा!

-'बेफिकीर'!

क्षमस्व आणि धन्यवाद बेफिकीरजी... यापुढे तुमच्या सुचनेचा विचार करेन ही हमी देते...

दोस्तलोग, आता नंबरचे गेम बंद करु या का? आणि कथाभाग शांतपणे वाचून त्यावर व्यवस्थित प्रतिक्रिया देऊ या का?

मला वाटतं, इथे होणार्‍या कलुषित वातावरणावर हा एकच पर्याय/ उपाय आहे....

बेफिकिर जी, आज जे काहि लिहिलत ना तुम्हि हे सगळ्यात चांगल लिहिलत अस मला वाटल. मिना-मिना चि आई, चाचा-अबु, श्रि-महेश ह्याच्या मध्ये जे संवाद तुम्हि लिहिलेत ना त्या सर्वा पेक्षा आत्मानंद चा त्याच्या मनाशिच केलेला संवाद, रादर, एक मन विरुद्ध दुसरे मन, हा संवाद किति तरि पटिंमध्ये ग्रेट होता.
खरच अजुन खुप खुप लिहावस वाटतय, पण शब्दांमध्ये ते मांडता येत नाहिय.

आणि दिल्या आंगण ला येणारचचचच.. मला खात्रि आहे.

छानच.... अप्रतिम हा ही भाग.....
सानी ला १००% अनुमोदन...

धन्यवाद बेफिकिर जी.....

बेफिकिर राव, आजचा हा भाग दमदार आहे. आत्मानंद्चा स्वतःशीच साधलेला संवाद जबरदस्त.
पु.ले.शु.

Pages