किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना?

Submitted by भानस on 31 August, 2010 - 10:56

' अ वेनस्डे ',' अब तक छप्पन ' हे दोन्ही सिनेमे मी कमीतकमी २५-३० वेळा पाहिले असतील. शिवाय कधीकधी तर कुठूनही सुरवात करून कुठेही बंद केले... असेही पाहिलेत. हे दोन्ही सिनेमे पाहताना वारंवार वाटते, असे खरेही कधी घडावे. हा ' स्टुपिड कॉमन मॅन ' मला हवाय. आतुरतेने मी त्याची वाट पाहतेय. ते आमचे शेकड्याने मारत आहेत तर किमान त्यांचे दोन तरी मारले गेलेले मला पाहायचेत.

कुठलाही अतिरेकी हमला झाला की जीव मुंडके अर्धवट चिरलेल्या कोंबडीसारखा तडफडू लागतो. खरे तर मुंडके कधीचेच चिरलेय, त्यावर पुन्हा पुन्हा नव्याने सुरी फिरवली जाते. कधी छातीवर तर कधी पाठीवर.... वारच वार. अव्याहत व पद्धतशीर. चार टाळकी एकत्र येऊन इतक्या मोठ्या माझ्या भारतमातेला जेरीस आणत आहेत आणि तिची लेकरे - आम्ही, किडामुंगीसारखे मरण्यापलीकडे काहीच करत नाही.

ज्या दिवशी हल्ला होतो तो सारा दिवस व नंतरचे मोजून चार-सहा दिवस मिडियावाले, घटनेचा चोथा चोथा करून चघळत राहतात. मेलेल्या माणसांच्या नातेवाईकांना, आईला, मुलाला, " कसे वाटतेय तुला? आत्ता तुझ्या मनात नेमके काय चालले आहे? " सारखे भावना-सहानुभूती तर दूरच पण साधे प्रसंगाचे तारतम्यही न ठेवणारे प्रश्न विचारून झालेल्या जखमा आणिकच ओरबाडतात. मरणारे असहायपणे मरून जातात. उरणारे, आज वाचलो रे असे म्हणत चर्चा-आकांत करतात. ( यात मी ही आलेच ) ती चार टाळकी, " कैसे हिंदुस्तानमे घुसके हिंदुस्तानके सिनेमेही खंजीर भोका " चा जल्लोष करतात, अन दुसऱ्या हल्ल्याच्या तयारीला लागतात.

पण, यावर वर्षोनवर्षे मी काय करतेय? हे भ्याड वार थांबवण्यासाठी मी काहीच करू शकत नाही म्हणून, तडफडाट. हल्ले झाल्यावर सरकार ज्या पद्धतीने स्वत:चे समर्थन करते त्याचा, संताप संताप. एखादा-दुसरा अतिरेकी चुकून पकडला गेलाच तर, " आम्ही बाबा सहिष्णू....... शत्रू असला तरीही न्यायदेवता सगळ्यांना सारखीच असते ना? त्यांनी बेमुर्वतपणे - क्रूरपणे, आमच्या लहान लहान मुलांनाही मारले असेल हो पण आपण त्याला संधी नको का द्यायला? जे काय व्हायचं ते न्यायाने झालं पाहिजे...... " म्हणून त्याला अगदी फुलासारखे जपून कोर्टात महिनोंन महिने केस चालवून, जनतेचाच पैसा वापरून तिच्याच सहनशक्तीचा पुरा अंत पाहून झाला की एकदाची शिक्षा सुनावली जाते........ की, तिची अंमलबजावणी होण्याआधीच कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीला किंवा त्याच्या घरच्यांना पळवून न्यायचे आणि बदल्यात याला सोडा म्हणायचे. हिंदुस्तानामध्ये प्रत्येक जीवाची वेगवेगळी असलेली किंमत त्यांनी बरोबर हेरली आहे. गरीब हजारोंनी मेले तरी कोणाला काही फरक पडत नाही पण या गरीबांनीच अतिशय मूर्खपणे महान बनवलेला एखादा नेता किंवा त्याचा जावई / साला.... यांचा जीव फार मोलाचा असतो. हे पाहून आलेली, उद्विग्नता.

आतिरेक्यांना पकडताना मेलेल्या पोलिसांची कोणाला पडलीये इथे. तुम्ही काहीही म्हणाल हो , " ते शहीद झाले. त्यांनी देशासाठी बलिदान दिले. निधड्या छातीने सामना केला. सब झूट. त्यांच्या दुर्दैवाने त्यांची नेमकी नको तिथे ड्युटी लागली. मग निदान स्वतःचा जीव वाचवण्याकरिता तरी दोन हात करणे भागच आहे नं? आता, एके फोर्टी सेव्हन समोर साले कुठलेही तमंचे घेऊन येतात. आमचे बच्चे खेळण्यासाठीसुद्धा हातात धरणार नाहीत ते. त्यात वरती मारे बुलेटप्रूफ जॅकेटं घालतात. ज्यांना आधीच स्वार्थाची मोठाली भगदाड पडलेली..... ना ना.... पाडलेली आहेत. कोणी? काय राव, काहीही विचारता? हेच की तुमचे मायबाप राज्यकर्ते. स्वार्थकारण कशात करावे आणि कशात करू नये याचे नियम कोणी शिकवलेलेच नाहीत नं. स्वत:च्या आईलाही विकायला मागे पुढे न पाहणारे, तुम्हाला सोडतील की काय? तर, ही तुमची नेतेमंडळी खोकेच्याखोके पचवून मस्त एसीत बसून ( इलेक्ट्रिसिटीचे बील.... आता त्याचे काय मध्येच? ते कोण भरणार? पागल झालात की दारू ढोसून आलात? कोणाची टाप लागून गेलीये हे विचारण्याची. ) तमाशा पाहत बसतात. मग एकदा का तमाशा पुरा पेटला की खुर्ची बचावण्यासाठी, " अरेरे! काय हे घडतेय. आमची गरीब बिचारी जनता, आमचे शूर जवान.... मेले, मारले गेले " म्हणून गळे काढतात. नंतर मेणबत्त्या, मूक श्रद्धांजल्या वगैरे वाहून झाल्या की डोळ्यावर कातडे ओढतात. त्यातूनही कोणी अतीच आदळाआपट केलीच तर, " वेगवेगळी चक्रेही प्रदान होतात नं? नुकसान भरपाईही दिली जाते नं? कधी व किती ते मात्र नाही विचारायचे...... मग अजून काय हवेय??? "

कुठलाही आतंकवादी हल्ला होण्याआधी ( म्हणजे आधीचे हल्ले होऊन काही काळ लोटल्यानंतर ) व पुन्हा नवीन हल्ला झाल्यानंतर आपल्या मायबाप सरकारची मुक्ताफळे ऐकून ऐकून तर कान किटलेत. जनतेला किती मूर्ख बनवायचे याला काही लिमिट राहिलेलेच नाही. हल्ला होण्याआधी म्हणायचे, " जनतेने संयमाने व धैर्याने वागावे. आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. पूर्ण बंदोबस्त असून घुसखोर लगेच पकडले जातील. तरीही अतिरेकी कुठल्याही मार्गाने सहजपणे घुसतातच. आम्ही आमच्या भूमीच्या कणाकणाचे रक्षण करू. जमेल तितकी जमीन आम्ही भक्षणच करून टाकू. देशातल्या सगळ्या अतिरेक्यांवर व त्यांच्या हालचालींवर आमची कडक नजर आहे. म्हणजे ते कुठे आहेत हे तुम्हाला माहीत आहे नं... मग पकडा की त्यांना. आमच्या पहाऱ्यामुळे, अतिसावधनतेने अतिरेकी कुठलाही नवीन हल्ला करू शकत नाहीयेत. कसाब आणि साथीदार पार ताजमहालात पोहोचले तरी आम्हाला भनक पण नाय बा पडली. जिथे जिथे हे हल्ले होण्याची शक्यता आहे तिथे तिथे क्लोज सर्किट टीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. हे कंत्राट, अमुक अमुक नेत्याच्या जावयाला दिले गेलेय. राज्य व केंद्र सरकार यांच्यामध्ये सामंजस्य व सूचना यांत उत्तम ताळमेळ आहे. हल्ला झाला की हा उत्तम ताळमेळ परस्पर विरोधी व्यक्तव्यांनी उघडा पडतो. तिथे चालणारी अतिरेकी शिबिरे बंद होत नाहीत तोवर आम्ही पाकिस्तानाशी बोलणी करणार नाही. पाकिस्तानाशी बोलणी होऊ शकतात, शेवटचा निर्णय केंद्राचा. प्रत्यक्षात होत काहीच नाही आणि ही बोलणी होऊन तरी निष्पन्न काय होणार आहे?em>

प्रत्यक्ष घटना घडताना/ घडून गेल्यानंतर, घटनेची जबाबदारी अमुकतमुक ने घेतली आहे. कोणाचेही नाव टाका ना, सिद्ध थोडेच करायचे आहे. सगळे देशवासी एकजूटीने सामना करत आहेत. कुठला दुसरा पर्याय आहे का त्यांना? अतिरेक्यांना सोडणार नाही. दयामाया दाखवणार नाही. आधी पकडा तर आणि ज्यांना पकडलेय त्यांना सजाही द्या. केंद्राकडून हल्ला होणार अशी सूचना होती परंतु कधी व कोठे होणार ही नेमकी माहितीच दिली गेली नाही. पुढच्यावेळी क्रमवार पत्रिकाच हातात देऊ तोवर तुम्ही निवांत राहा. ही सगळी चूक राज्याची ( सरकारची) आहे. अतिरेकी खूप काळ हल्ल्याची तयारी करत होते. मग आमचे हेरखाते काय झोपले होते का? सगळीकडे क्लोज सर्किट कॅमेरे नाहीत व जिथे आहेत ते बरोबर काम देत नाहीत. काय सांगता? अजून कॅमेरे तिथे लटकलेले आहेत??? कमालच झाली. आम्ही अतिरेक्यांना लवकरच पकडू. कसे? सिंपल.... कोणीतरी खबर दिली, की ते इथे इथे आहेत की... काही लोकांना संशयावरून पकडलेही आहे. काहीतरीच काय. गरीब बिचारे. ते मुळी गुन्हेगार नाहीतच.पुढच्या निवडणुकीला हवीत ना त्यांची मतं..... सोडवा त्यांना ताबडतोब. यापुढे पुन्हा असा हल्ला झाल्यास भारत गप्प बसणार नाही. ( वल्गना वल्गना.... )

बस इतकेच? मग, त्या अतिरेक्यांनी बळी घेतलेल्या निष्पाप जिवांचे काय? सामना करताना धारातीर्थी पडलेल्या पोलिसांचे काय? त्यांचा बदला कसा पुरा होणार? मी अहिंसावादी आहे, सहिष्णू आहे. तरीही मला हा ' बदला ' पुरा व्हायलाच हवा आहे. पण, तो कधीच होत नाही म्हणून होणारी, तळतळ. आधीच्या घावांवर अतिपातळसा त्वचेचा पापुद्रा ( शेवटी मन तरी कितिकाळ अरण्यरुदन करणार.... त्याचाही नाईलाजच आहे. ते बिचारे मरतमरत जगण्याचा प्रयत्न करते. ) धरायच्या आतच पुन्हा पुन्हा वार होत आहेत. त्यामुळे चिघळलेली जखम उरात घेऊन नाईलाजाने पोटाची खळगी भरण्याकरिता दुसऱ्याच दिवशी मी ट्रेन पकडते खरी पण तिच्यातून जिवंत सहीसलामत उतरेनची शाश्वती नाहीच. या जाणीवेतून आलेली, अगतिकता. या साऱ्यातून पिळवटलेली, खचलेली, क्वचित, षंढ त्वेषाने का होईना दातओठ खाणारी, कसाबला गेटवेसमोर उलटा टांगा अशी मागणी करणारीही मीच. उरात ही आग पेटलेली असली तरीही, प्रत्यक्षात त्याला एक फटकाही माझ्याच्याने मारवला जाणार नाही. पण, इतर मारत असतील ( निदान काहीजण तरी माझ्या इतके दुबळे नसतील ) ते नक्कीच पाहीन. इतके खोलवर घाव झालेत आता की " डोळ्याला डोळा " सारखीच शिक्षा त्यांना झालेली मला हवी आहे आणि माझे डोळे टक्क उघडे ठेवून ते बंद होऊ लागले तर बोटांनी जबरीने त्यांना ताणून, ती प्रत्यक्षात अमलात येताना पाहायचीही आहे. माझ्यासारख्या सामान्य - मध्यमवर्गीय - हतबल माणसाची ही नितांत गरज आहे.

हे दोन्ही सिनेमे, खोटा तर खोटा पण काही काळापुरता तो बदला पुरा करतात. बेंचखालच्या बॉंम्बने त्यांची उडणारी शकले-देहाचे चिथडे मला क्षणभर का होईना, समाधान देतात. हे घडवणाऱ्या त्या ' स्टुपिड कॉमन मॅनमध्ये ' मी स्वत:ला पाहते. वारंवार पाहू इच्छिते. ’ साधू आगाशे ’ खराच आस्तित्वात आहे यावर मला विश्वास ठेवावासा वाटतो. कदाचित काहींना हा दांभिकपणा वाटेलही..... मला नाही वाटत. किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना?

गुलमोहर: 

भाग्यश्री, परत एकदा झक्कास. मेरे मन की बात छिन ली तुमने.

कालच रात्री आपल्या टी.व्ही.चॅनलवर नक्षलवाद्यांची बातमी बघितली. बिहारमध्ये हे नक्षलवादी इतक्या निरपराध लोकांना मारतायत त्यावर सरकारकडे काहीच उपाय नाहीये कां? काल एका पोलिसाला मारलं त्यांनी, त्याच्या घरच्यांचं दाखवत होते. त्या पोलिसाची सगळ्यात मोठी मुलगी १५-२० वयोगटातली असेल फारतर. त्याच्या बायकोकडे, मुलांकडे मला बघवलंच नाही. खूप वाईट वाटलं बघूनसुद्धा. आणि हे मिडियावाले त्यांच्यावर कॅमेरा रोखून. आपको कैसे लग रहा है, विचारत. Angry

jk, शिल्पा, ऑटडोअर्स अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार.

खरेच गं. हे मिडियावाले एका बातमीसाठी कुठल्याही थराला जात आहेत. कुठलाच धरबंद नाही. उलट अहमिकेने एकापेक्षा वरताण करत असतात. Sad

तुझी तगमग, तडफड, आणि फ्रस्ट्रेशन अगदी समजण्यासारखे आहे.. किंबहुना अपल्यापैकी अनेकांना हेच फीलींग होत असेल.
-मानस६

Sad तुझ्या भावना अगदी पोचल्या ग.
काहीतरी करायला हवं हे समजतंय पण काय करायचे हेच नाही माहीत.
"आपको कैसे लग रहा है" Angry
आडो अनुमोदन.
मिडियावाले एका बातमीसाठी कुठल्याही थराला जात आहेत>> खरतर काही थरच राहिलेला नाहीए असल्या बातम्यांना. ताजच्या हल्ल्यात पोलिसांची प्रत्येक (जी काय केली ती) चाल टि.व्ही वर त्या क्षणिच दाखवत होते. त्या दहशतवाद्यांना तयारी करायला चान्स! हे सगळ केवळ आपलं चॅनल कस ब्येस्ट आहे ते दाखवायला. Angry

देश देश म्हणतो आपण ..
आता देश म्हणजे नक्की काय?? याची वाख्या काय आहे??
हे समजुन घेणे गरजेचे आहे...

ह्या देशात राजकारणी लोक त्यांना (काळा) पैसे कमवायला आणी ऐस पैस लाईफ जगायला वाव आहे म्हणुन ते तसे करतात ..

ह्या देशात दहशतवादी लोक त्यांना घुसायला वाव आहे आणी घुसुन लोकांना मारायला पण वाव आहे म्हणुन ते तसे करतात ..

ह्या देशातील ऊद्योगपती ह्यांना पण काळा पैसा कमावायला वाव आहे... आणी टॅक्स चुकवायला पण म्हणुन ते तसे करतात.

ह्या देशामधे हिंदु आणी मुस्लीम भांडण होतात. जातीयवाद पण होतो.. कारण ईथे तो करायला वाव आहे..

ह्या सगळ्यामागे एकच गोष्ट कॉमन आहे .. ती म्हणजे ह्या वाईट गोष्टी करायला असणारा स्कोप ..
आणी तो जो काही स्कोप किंवा वाव आहे तो मध्यम वर्गीय माणुस कंट्रोल नाही करत..
आणी त्याला जे कंट्रोल करतात ते स्वतःच काळा पैसा आणी भ्रष्टाचार याच्या विळख्यात अडकले आहेत..

तात्पर्य हेच की आजुन पूढील किमान ५० वर्ष तरी ह्या देशाचे काहीही नाही होऊ शकणार
आता जो भ्रष्टाचार आणी दहशतवाद चालु आहे ह्याचे रुप आणखी भयानकच होईल..

कितीही कटु असले तरी हेच सत्य आहे...

मानस६, सावली व किशोर१८६४ अनेक आभार.

किशोर, आपले विश्लेषण पर्फेक्ट आहे. ह्या कटु सत्याचे डोस जाणतेपणी पचवणे फार फार जड जातेय आणि जाणार आहे. केवळ शांतपणे जगण्यालाच वाव नाही, हे कळून चुकल्यावर बथ्थड होणे इतकेच हाती उरलेय.

आपण जर दशवादाबद्दल बोलत असु तर आमच्या पुण्यात एक मॉडेल आहे. नागरिकांच्या स्तरावर त्याचा सामना करण्याच. जर्मन बेकरीचा अपवाद वगळता लोकांनी केलेला अतिरेक्यांचा सामना हा एक इतिहास आहे.

१) पुण्यातला एका बॅंकेत अतिरेकी घुसले. त्यांचा सामना करताना विठ्ठ्ल भरगुडे हा शिपाई शहिद झाला. बँक कर्मचार्यांनी अतिरेक्यांचा पाठलाग केला.

२) जनरल अरुण वैद्य यांचे मारेकरी चिंचवड जवळ नागरिकांनी प़कडुन दिले.

आपण जर सावध असु तर याचा सामना सहज शक्य आहे. मरण तर कोणालाच चुकले नाही. शेळ्या मेंढ्यांसारख अतिरेक्यांच्या गोळ्यांना मरायच का वाघाप्रमाणे चाल करायची आपल्याच हातात आहे.

प्रश्न राहिला पोलिसांनी पकडलेल्या परंतु अद्याप शिक्षा होऊन अंमलबजावणी न झालेल्या गुरु अफजलसारख्या अतिरेक्यांच काय ?

जनमताचा रेटा हे घडवायला पुरेसा आहे. लिहुयात पत्रे राष्ट्रपतींना सर्वांनी. करुयात दाखल जनहितार्थ याचिका, येऊ यात रस्त्यावर मग तर दखल घ्यावीच लागेल ना ?

आपल्याला एवढे सगळे माहित असून आपण काहीच का करत नाही ?
त्याला एक कारण आहे. वपुंच्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास "Because its not hurting bad enough ! "
जसा गाझा स्ट्रीप वर इस्राईली हल्ला चालू आहे तसा होईस्तोवर आपण काही उभे राहणार नाही.
हे वाचताना कटू वाटेलही, पण इतिहास हेच सांगतो.

आपण जेंव्हा अतिरेकी विचारसरणीचा विरोध करायचा म्हणतो, तेंव्हा आपल्याला "अ वेन्सडे" चा सुद्धा विरोधच करावा लागेल.
जेंव्हा कसाब आणि अफजल गुरुचा विरोध करतो तेंव्हा प्रशांत जुवेकारचा सुद्धा करावा लागेल.
अतिरेकाचा सामना करायचा असल्यास अतिरेकी विचारसरणी मोडून काढावी लागेल.

लेख आवडला, लिहिलेली मते प्रामाणिक आहेत व माझ्याही भावना अशाच आहेत. ना दहशतवादी संपणार ना दहशतवाद हा लढा असाच सुरू राहणार. पण दोन्ही बाजूंनी आक्रमण, हल्ले, कृती होत असतील तरच त्याला लढा/युध्द म्हणता येइल. सध्या तरी दहशतवादीच हल्ले करतायत आणि आपण (सरकार, सामान्य जनता) निमूटपणे सहन करतोय, याला युध्द म्हणायचे काय? Sad