पंचम - माझा एक जिव्हाळ्याचा विषय ....

Submitted by prashant_the_one on 24 May, 2010 - 13:19

पंचम उर्फ राहुल देव बर्मन हा अनेक लोकांच्या जिव्हाळ्याचा, लिखाणाचा, ऐकण्याचा विषय आहे - खास करून त्याच्या निधनानंतर. मात्र सगळीकडचे लेख वाचताना जाणवलं की फार थोड्या लोकांनी भरपूर पंचम ऐकला आहे आणि नुसताच ऐकलं नाहीये तर तो पचवला, जिरवला आहे डोक्यात ! आणि अभिमानाने सांगू शकतो की त्या काही लोकात (स्वयंघोषित) मी आहे !

लहानपणापासूनच आम्ही मुलं मुली मिळून कॉलनी मधल्या गणेश उत्सवात कार्यक्रम करत असताना नकळत पंचम कडे ओढले गेलो. तेव्हा तो आरडी या नावाने जास्त लोकप्रिय होता. त्याचा लोकांमध्ये "पंचमदा" नव्हता झाला. (आजकाल कोणत्याही वय वाढलेल्या बंगाल्याला "दा" म्हणतात. उदा. सानू-दा, अभिजित-दा असो) साधारण ८ वी ते १० वी च्या सुमारास - म्हणजे १९७७-१९७९ सुमारास - त्याचे संगीत आमच्या डोक्यात घुमायला लागले आणि प्रत्येक कार्यक्रम बसवताना लक्षात यायला लागलं की सगळ्यात जास्त वेळ लागतो ती "आरड्याची " गाणी बसवताना. प्रेमानी त्याला शिव्या पण बसायच्या - काय साल्यानी बनवून ठेवला आहे. डोक्याला खुराक आहे साला.... कल्पना करा की १३-१५ वर्षाची मुलं, चांद मेरा दिल, जीवन के हर मोड पे, लेकर हम दिवाना दिल, दम मारो दम अशी दमछाक करणारी गाणी बसवण्याची जिद्द बाळगत होते आणि सामग्री काय तर एक स्वस्तातला गिटार, हार्मोनियम, बोंगो आणि तबला !!! कसं जमावं ते? पण एकदा डोक्यात ते संगीत घुसलं होते तेव्हा परिस्थिती "कळतंय पण वळत नाहीये" अशीच होती. तसल्या परिस्थितीत सुद्धा आम्ही जमेल तशी ती गाणी केलीच !! मजा होती ती गाणी बसवणे, त्यासाठी १०० वेळा ऐकून पीसेस काढणे, त्यावर वादविवाद, कॉर्डस वरून हमरी-तुमरी यात. कारण या धडपडीत शिकायला एवढे मिळत होते की आयुष्याची पुंजी जमा होत होती. संस्कार होत होते...

ही गाणी ऐकतानाच आम्ही इंग्रजी गाणी पण ऐकू लागलो आणि मग पंचमनी उचललेली इंग्रजी गाणी पण ऐकली, त्याला मनसोक्त शिव्या घातल्या त्याबद्दल - एवढे गुण असताना जरुरी काय वगैरे वगैरे... पण नंतर त्याबद्दल त्याला माफ पण करून टाकला ... २५०० गाण्यांमध्ये २५ एक उचललेली गाणी असावीत पण बाकी जे करून ठेवले आहे ते इतके भारी आहे की म्हटलं जाऊदेत असेल बिचा-याची काही मजबुरी ... पुढे जशी हळू हळू घरामध्ये हाय फाय सिस्टम येऊ लागल्या तशी पंचम ऐकण्याची चैन भलतीच वाढली... त्याची गाणी स्टेरिओ वरती मोठ्यांदा ऐकणे हा एक छंद झाला. कधी प्रयत्न करून बघा अजूनही. १९७०-१९८५ मधली पंचम आणि इतर कोणत्याही संगीतकाराची गाणी एकत्र करून एका सीडी वर टाका आणि एका ठरावीक आवाजावर सिस्टीम लावा. इतर संगीतकरांचे गाणे झाल्यावर पंचमचे गाणे लागले की सिस्टम एकदम ड्रग्स वर असल्यासारखी वाजू लागते !!! मला दरवेळी एक प्रश्न पडायचा (अजूनही पडतो) की त्याच्या वेळच्या इतर कोणत्याही संगीतकाराला असं कसं सुचले नाही की याची गाणी एवढी भन्नाट कशी वाजतात आणि माझी का नाही? फक्त चांगले संगीत देऊन उपयोगी नाही तर ते चांगले रेकॉर्ड पण करावे लागते आणि पुढे चांगले मिक्स पण करावे लागते आणि त्यावर संगीतकाराची चांगली पकड असावीच लागते तेव्हा कुठे ते गाणे "चांगले" वाटते. आजच्या डिजिटल काळात सुद्धा रेहमानची गाणी वेगळी का वाटतात याचे उत्तर हेच आहे !!

पुढे मल्टी ट्रेक रेकॉर्ड करतांना एका ड्रम सेट साठी सहा सहा मायक्रोफोन्स लावून त्याचे मिक्सिंग पंचम करीत असे. फक्त संगीतच नाही तर त्यावेळची अत्याधुनिक तंत्रे वापरून आणि त्याच्या पुढे जाऊन त्याचा उपयोग तो करून घेत असे. एकावर एक आवाज रेकॉर्ड करता येत नव्हता ६० च्या दशकात तेव्हा लता आणि उषा यांच्या आवाजातला एका पट्टीतला सारखेपणा लक्षात घेऊन एकावेळीस दोघींच्या आवाजात "क्या जानू साजन " गाणे असे रेकॉर्ड केले की कित्येक वर्षे लोकांना लताने एकावर एका दोन आवाजात कसे गायले असेल आणि पंचम नी त्यात काय केला हे कोडे होते !! त्याचा "हटके" स्वभाव आणि काहीतरी वेगळेच करण्याचा स्वभाव अगदी सुरुवातीच्या संगीतातून पण जाणवतो. पाश्चिमात्य संगीतात चालू असेलेले स्केल बदलणे यात वावगे काहीच नसते. पण पडोसन च्या वेळेस "मै चली मै चली" मध्ये त्यानी पहिल्यांदा एका गाण्यात एकदा नाही तर २ वेळा स्केल बदलून तेव्हा धमाल उडवून दिली होती !! हा मुलगा पुढे काय करू शकतो याची परीक्षा घेणारे वडील पण थोरच.... सदेनी, पंचमनी लहानपणी बनवलेल्या १-२ धून घेऊन तेव्हा त्याची गाणी बनवली होती - ए मेरी टोपी पलट के आ - फंटुश , सर जो तेरा टकाराये - प्यासा. त्यांनी विचारल्यावर सदेनी उत्तर दिले होते की तुझ्या पुढील गाण्याचे सिनेमात कसे स्वागत होईल ते मी आत्ता पासून बघून ठेवतोय !! पण जेव्हा पंचमनी स्वतंत्रपणे संगीत देण्याचा निर्णय घेतला होता असं म्हणतात की तेव्हा काही लोकांनी त्याला विचारले की तू तुझ्या वडिलांसारखेच संगीत आमच्या चित्रपटाला दे तेव्हा त्यांनी नम्रपणे सांगितले की माझे वडील हे जरी माझा आदर्श असले तरी माझे संगीत हे माझेच संगीत असेल !! जरी दंतकथा असली तरी त्याच्या संगीतावरून ते खरं पण असेल असे वाटते....

जसे जसे मी एक एक वाद्य जाणून घ्यायला लागलो त्या प्रत्येक वेळा असा विचार करायचो की हे वाद्य पंचमनी कुठे कुठे कसे कसे वापरले आहे? आणि ते त्या वाद्यामधून काढताना जो अनुभव मिळायचा (अजूनही मिळतो) तो कशातही मोजता येत नाही. पंचमची गाणी बसवताना सगळ्यात धमाल येते ती म्हणजे त्याचे "ऑफ बीट" रचना करणे. "ऑफ बीट" म्हणजे जर आपण १-२-३-४ असा ताल धरला तर गाण्याचे बोल किंवा मुझिक पीस हा दुसऱ्या बीट वर चालू होतो किंवा अख्खा तुकडा एक एक बीट सोडून तयार केलेला असतो! अशी किती गाणी सांगू? - ओ मेरे दिलके चैन मधला पहिले किशोर चे हमिंग, चुरा लिया मध्ये पहिला गिटारपीस संपतो तो भाग, रातकली एक ख्वाब मे आई , गुम है किसीके प्यार मे ... एक ना अनेक ! कधी हे गाणे गाण्याचा प्रयत्न करून बघा - सातो बार बोले बन्सी - दिल एक पडोसी है मधले. सुरुवातीस ठीक वाटते पण "तन की लागे मन की बोली" ओळ आली की ऑफ बीट धमाल सुरु होते. तशी या अख्या गाण्यात त्यांनी धमाल केली आहे. त्याचे ऑफ बीट वाजवताना अनेकांची भंबेरी उडताना बघितली आहे मी ...ऐकताना एकदम सोपे वाटते ...वाजवताना मात्र चेहरा पडतो ... त्यावरून आठवले - एका माणसांनी मला काही वर्षांपूर्वी बोलावले की मे एक प्रोग्राम करत आहे ...त्यात वाजवायला येतोस का? तर म्हटला काय करतोयस काय? तर म्हणाला की आर डी बर्मन वर प्रोग्राम करायचा आहे. माझ्या हातातली प्लेट पडायला आली !! याला स्वत:ला धड हार्मोनियम सुद्धा वाजवता येत नाही ...गाण्यातला ओ की ठो कळत नाही आणि निघाला होता आर डी करायला ..काय वाट्टेल ते... असो. थोडे विषयांतर झाले पण एक एक किस्से असतात. तेव्हा मला शिवधनुष्य उचलणाऱ्या माणसांची गत काय झाली असेल याचे थोडे चित्र डोळ्यासमोर आले.... मनात म्हटल आम्ही लहान असताना करायचो तेव्हा अक्कल नव्हती.. आता आली आहे तेव्हा धीर होत नाही करायचा .. प्रचंड मेहनत केल्यानंतर सुद्धा पंचमची गाणी वाजवताना एक प्रकारचा ताण असतो, भीती असते ... आपल्या हातून या गाण्याचा राडा होऊ नये याची !

पंचमचे मला आवडणारे अजून एक वैशिट्य म्हणजे गायक आधी सुरु करतो आणि मग ताल सुरु होतो - उदा. चुरा लिया है तुमने जो दिल को, तुम आगये हो नूर आ गया है, दम मारो दम, दुक्की पे दुक्की हो... आणि परत एकदा - गुम है किसी के प्यार मे... यातल्या ठळक केलेल्या शब्दांवर किंवा आसपास ताल सुरु होतो...मध्यंतरी मला कुणी विचारले की तुला पंचमच्या संगीतातली किंवा त्याच्या वाद्यावृन्दातील ठळक वैशिट्य कोणती वाटतात? तेव्हा खरं तर मोठा प्रश्नच पडला होता. काय काय आणि कसे सांगायचे? तरी पण त्यातल्या त्यात विचार करताना लक्षात आलेल्या गोष्टी अश्या की सर्वप्रथम जर काही असेल तर त्यांनी चित्रपट संगीताची पद्धतच बदलून टाकली. अनेकविध प्रयोग करून संगीत सतत जिवंत ठेवले. त्यावेळच्या आणि नंतरच्या येणाऱ्या श्रोत्यांच्या आणि संगीतकारांच्या पुढे एक मोठा आदर्श निर्माण केला. चित्रपट संगीताला अनेक नवी वाद्ये आणि ती कशी वापरता येऊ शकतात याची उदाहरणे घालून दिली. कशातूनही संगीत करता येते हे सिद्ध केले (पाठीवर दिलेली थाप, गुळण्या करता करता गुणगुणणे (सत्ते पे सत्ता मधल्या दुसऱ्या अमिताभ चा वेळी दिलेले पार्श्वसंगीत), चमचे, ग्लास, वल्हे, भोंगा ...काय वाट्टेल ते). नवीन बीट्स दिले, इलेक्ट्रिक बास रूळवले (आज त्याशिवाय कोणतेही गाणे पूर्ण होत नाही). गिटार मधले अनेक इफेक्ट्स सर्व प्रथम वापरले (flanger, delay, distortion), सिंथ तुफानी पद्धतीने वापरले... आता बास कारण यादी थांबत नाहीये...

अश्या संपूर्ण संगीतकारावर बीट मास्टर, वेस्टर्न म्युझिकवाला असली काहीतरी लेबलं लावून त्याला शास्त्रीय संगीतातले फारसे कळत नाही असले समज पण पसरलेले होते अगदी शेवट पर्यंत !! मला एक कधीच कळले नाही की "मीठे बोल बोले" , "मेरे नैना सावन भादो", "भोर भये पंछी" , "आयो कहासे घनश्याम" , "रैना बीती जाये", "बीतीना बितायी रैना", "घर आजा घिर आयी (त्याचे पहिले गाणे)" ही गाणी शास्त्रीय नाहीत तर काय? केवळ त्यांनी पाश्चिमात्य संगीत जास्त वापरले म्हणजे शास्त्रीय कळत नाही हे कसे काय ? मला न उलगडलेला हा एक प्रश्न... कारण याच समजातून त्याला सूरसंगम पण मिळाला नव्हता ! त्यात काय गाणी केली असती या कल्पनेनीच कधी कधी मी हैराण होतो...

आणि तरीसुद्धा अश्या संगीतकाराचा शेवटचा काळ १९८५ नंतर अतिशय वाईट होता - तेही संगीतकार म्हणून ! १९८० च्या दशकात त्याचे लागोपाठ वीस एक चित्रपट कोसळले होते. आणि फक्त चित्रपटच नाही तर गाणी सुद्धा ठीक ठाकच होती. एखादं गाणं मधेच झकास होऊन पण जायचे पण एकूण चित्र मात्र विदारकच होते. तसं बघितलं तर साधारण १९८३ पासून ते २००० पर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीचाच काळ संगीतदृष्ट्या अतिशय वाईट होता. त्यात पंचम सारखा मनुष्य ढासळल्यावर त्यात भर पडल्यासारखेच झाले तेव्हा. त्याच्या हृदयविकारानंतरच्या काळात नवीन संगीतकारांचे नवीन संगीत येऊ घातले होते. असलेले लक्ष्मी-प्यारे, बप्पी "लोहार" इत्यादी मंडळी केवळ धुमाकूळ घालत होती आणि इकडे रफी नंतर भीषण शब्बीर कुमार आणि किशोर नंतर सुमार सानू यांनी रेकायला सुरुवात केली होती... माझे सगळे तरुण वय या लोकांनी संगीत दृष्ट्या नासवले म्हणून त्यावेळची आमची पिढी गजल कडे वळली !! त्यामुळे त्याकाळात जो येईल तो गजल गात असे. पुढे त्याचे पण घाऊक पीक निघाले आणि ते पण खराब झाले (धन्यवाद पंकज). पण चित्रपट संगीतावर पंचमचा जो परिणाम होता तो मात्र राहिला होता. नवीन संगीतकारांच्या गाण्यात तो डोकावत होता. कुठे तरी एखादा तुकडा त्याची याद देऊन जायचा पण ते सुद्धा क्वचितच. नवी लोकं, हत्ती मेल्यावर जसे जंगलात पुढे कित्येक दिवस त्याच्या मढ्यावर इतर प्राणी जगतात, तसे पंचम गेल्यावर त्याच्या संगीतावर जगले ...आणि मग त्यातून स्वत:ची "स्टाइल" म्हणून मिरवत राहिले.. तो नुसताच त्यांना पुरला नाही तर नंतर "रीमिक्स" वाल्याना पण पुरला, आणि पुरत आहे.

पण आजचे संगीतकार बरेच प्रामाणिक आहेत (प्रीतम चा अपवाद वगळता, आणि अन्नू मलिक हा संगीतकारच नाही त्यामुळे प्रामाणिकपणाचा संबंधच येत नाही तिथे) आणि त्याचे ऋण, त्याचा त्यांच्यावरचा परिणाम जाहीर पणे सांगत असतात. मला एक मात्र खूपच वाईट वाटते- पंचम आजच्या डिजिटल युगात पाहिजे होता... सोनू निगम, श्रेया, शंकर महादेवन, सुखविंदर यांच्या बरोबर काय तुफान गाणी केली असती आणि ते पण आजची डिजिटल तंत्र वापरून... आणि त्यात सुद्धा आघाडीवर राहिला असता, बरेच काही नवीन शिकवून गेला असता...

पण या सगळ्या जर-तरच्याच गोष्टी... आयुष्यभर कोण कुणाला पुरलंय? पण पंचम, तुझे संगीत मात्र अनेक आयुष्यांना पुरून उरेल... कधीतरी एखादा तुकडा जुळवायला बसलो आणि अडकलो की तुझी आठवण येते.. मग तुझे एखादे गाणे घेउन त्याचे विश्लेषण करत बसतो आणि अचानक काहीतरी सुंदर शिकायला मिळते....एखादा चांगला तुकडा जमला तरी आठवण येते की पंचम नि हाच तुकडा घेऊन काय वेगळे केले असते? मग मेंदू वेगळ्या दिशेने काम करतो. तुझ्या बरोबरीचे काम कधीच जमणार नाही पण तशी करण्याची झिंग येते त्यातच मी समाधानी आहे !!

पंचम... जसा आकाशातला स्थिर ध्रुव तारा तसा दोन षडजांमधला स्थिर पंचम... कायम दिशा देणारा, स्फूर्ती देणारा...आधार देणारा...माझा आणि माझ्यासारख्या अनेक एकलव्यांचा गुरु पंचम !

गुलमोहर: 

मला एक मात्र खूपच वाईट वाटते- पंचम आजच्या डिजिटल युगात पाहिजे होता... सोनू निगम, श्रेया, शंकर महादेवन, सुखविंदर यांच्या बरोबर काय तुफान गाणी केली असती आणि ते पण आजची डिजिटल तंत्र वापरून... आणि त्यात सुद्धा आघाडीवर राहिला असता, बरेच काही नवीन शिकवून गेला असता...

<<< Well said :), या लिस्ट मधे सुनिधी पण अ‍ॅड करा.
नो डाउट , आजही आरडी नं १ च राहिला असता :).

प्रशांत, मस्त लिहिलाय लेख. तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोचल्या अगदी. Happy
'सूरसंगम'बद्दलचे माहीत नव्हते.

"लिबास " या प्रदर्शित न झालेल्या सिनेमातील "सिली हवा छू गई" ऐकलय नां??? अल्टिमेट गाणं आहे!

मस्तय ते लिबास मधलं गाणं.
आर डी च्या वेगळ्या प्रयोगां मधलं अजुन एक जबरी कल्ब साँग, 'मेरा नाम है शबनम , प्यार से लोग मुझे कहते है शब्बो' , तुम्हारा नाम क्या है, नीना मीना अंजु मंजु, याssss मधु ?.. कसलं सही जमलय Happy !!
आजही आरडीची सगळी क्लब हिट्स सुपर हिट आहेत !
आजच्या अघाडीच्या सगळ्या म्युझिक डायरेक्टर्स च्या सो कॉल्ड आयटेम साँग्स च्या तोंडात मारतील अशी एक से एक कल्ब हिट्स !

आशा भोसले ट्विटरवर : If only Pancham had today's technology.Even I can't even imagine the heights he would have scaled.His genius was beyond normal comprehension

"आर डी च्या वेगळ्या प्रयोगां मधलं अजुन एक जबरी कल्ब साँग, 'मेरा नाम है शबनम , प्यार से लोग मुझे कहते है शब्बो' , तुम्हारा नाम क्या है, नीना मीना अंजु मंजु, याssss मधु ?.. कसलं सही जमलय !!"

दीपांजली या एका गाण्यासाठी मी 'asha sings for RD' हा ४ कॅसेटसचा संच विकत घेतला होता १३-१४ वर्षांपूर्वी, आणि एक वेगळाच खजिना हाती लागला. त्यात अशी अनेक गाणी आहेत, की जी रेडियोओवर पण कधी ऐकली नव्हती...बहुतेक चित्रपट पडल्यामुळे.

Indian Idol planning a special on Pancham for his upcoming birth anniversary. I will appear on this episode.

आशाताई ट्विटरवर.

सही !
श्रीराम-शशी -नौशाद सोडून आयडॉल चे स्पर्धक काही खास नाहीत पण आशा ताईंसाठी मजा येइल हा एपिसोड पहायला :).

लेख अतिशय सुन्दर.

मला एक मात्र खूपच वाईट वाटते- पंचम आजच्या डिजिटल युगात पाहिजे होता... सोनू निगम, श्रेया, शंकर महादेवन, सुखविंदर यांच्या बरोबर काय तुफान गाणी केली असती आणि ते पण आजची डिजिटल तंत्र वापरून... आणि त्यात सुद्धा आघाडीवर राहिला असता, बरेच काही नवीन शिकवून गेला असता...

aaj RD aapalyat nahit hi janiv jivala chatake lavun jate. He would be always number 1.

megh

आर डी स्पेशल पाहिला का इंडियन आयडॉल एपिसोड ?
गायकां पेक्षा ऑर्केस्ट्रॉ आणि आशा ताईंना बोलताना पहून छान वाटलं !

प्रिय प्रशांत,

अतिशय सुंदर लेख आहे. तुझं पंचमविषयी असलेलं पागलपन अनुभवायला मिळतं. पंचम होतेच तसे...पागल करणारे.

पण मित्रा, एक चूक जमल्यास दुरुस्त कर. "क्या जानु सजन" मध्ये खरोखर दोन ट्रॅक्सवर लताच गायली आहे. हे कसं शक्य आहे हे साहजीकच सर्वांना त्याकाळी पडलेला प्रश्न होता! पण पंचमदांच्या बाबतीत सहज शक्य होतं. झालं काय...कि त्या वेळी नागरावर रेकॉर्डिंग व्हायचं. नागरावर दोन हेड्स असतात. एक इरेजर हेड आणि एक रेकॉर्डिंग हेड. टेप आधी इरेजर हेडवरून जाते, जो एक्जिस्टिंग डेटा इरेज करतो. आणि मग रेकॉर्डिंग हेड टेपवर नवीन डेटा रेकॉर्ड करतो. पंचमदांनी ह्यातला इरेजर हेड बाहेर काढला....खेचून...

याने झालं काय, कि टेपवरचं गाणं इरेज न होता तिच्यावर दूसरा ट्रॅक रेकॉर्ड झाला....पुन्हा लताबाईच! ८०च्या दशकात ज्याप्रकारे दोन कॅसेट कॅबिनेटवाले कराओके टेपरेकॉर्डर्स आले होते ना...तसंच...फ़क्त २० वर्ष आधी... हे हे!!

एखाद्या टेक्नॉलोजिकल हॅन्डिकॅपला कश्याप्रकारे ओव्हरकम करू शकतो, म्हणून आजही हे उदाहरण देण्यात येतं.

- लाल्या.

आर. डीं चे हम किसीसे कम नही मधले.....चांद मेरा दिल या गाण्यामध्ये प्रत्येक कड्व्यामाध्ये विविधा आहे..
लेख छान आहे.........:)

हो, ती हम किसिसे कम नही मधली ४ एका पाठोपाठ येणारी गाणी म्हणजे म्युझिकल ट्रीट च !!
चान्द मेरा दिल , आ दिल क्या महफिल है तेरे कदमोमे, तुम क्या जानो मुहब्बत क्या है, मिल गया हमको साथी मिल गया.. !!

लाल्या - क्या जणू साजन हे दोघींनीच म्हटलेले आहे. माझ्याकडे विश्वास नेरूरकरांचे पंचमचे पुस्तक आहे ज्यात सर्व गाणी आणि गायकांच्या नावे आहेत. त्यात सुद्धा हेच म्हटलेले आहे.

इथे पण पहा -

http://www.earthmusic.net/cgi-bin/cgiwrap/nuts/search.cgi?song=kya+jaano...

"दो पल" हे एकच गाणं उषाताईने म्हटलं होतं. विश्वास नेरुरकर हे माझे मित्र आहेत. पण चूक ही त्यांच्याकडूनही होऊ शकते. "क्या जानू सजन" चं उदाहरण आजही "एफ.टी.टी.आय" मध्ये साउंड-इंजिनियरींग च्या स्टुडंट्स ना दिलं जातं....तरी मी पुन्हा एकदा त्या वेळच्या टेक्निशिइयन्सकडे विचारपूस करून बघतो!

<<<<एकावर एक आवाज रेकॉर्ड करता येत नव्हता ६० च्या दशकात तेव्हा लता आणि उषा यांच्या आवाजातला एका पट्टीतला सारखेपणा लक्षात घेऊन एकावेळीस दोघींच्या आवाजात "क्या जानू साजन " गाणे असे रेकॉर्ड केले की कित्येक वर्षे लोकांना लताने एकावर एका दोन आवाजात कसे गायले असेल आणि पंचम नी त्यात काय केला हे कोडे होते >>>>
याबद्दल लता मंगेशकर यांनी ट्विटरवर दिलेले स्पष्टीकरण ...दोन्ही आवाज त्यांचेच्...आधी गाणे रेकॉर्ड केले आणि मग आलाप .
http://www.twitlonger.com/show/30trbg
http://www.twitlonger.com/show/311qdg

On Monday 9th August 2010, @mangeshkarlata said:
(In reply to kcpingle)
@kcpingle namaskar,aap ka sawal bahot accha hai,mai ye kehena chahungi ki wo aalap bhi maine hi gaaye hai,pancham ko naye prayog karna hamesha accha lagta tha,us gaane me pehele maine pura gaana record kiya,phir wo gaana headphone me lekar maine aalap gaye the.....

Pages