गोष्टीतली गोष्ट

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

विश्वासराव सरपोतदार, एक प्रथीतयश लेखक. विशेषतः 'प्रवास वर्णन' आणि 'व्यक्तीचित्रण' ही त्यांची खासीयत. त्यांच्या लिखाणाची सहज शैली वाचकांना भूल पाडत असे. पण गेले काही महीने, ते अगदी अज्ञातवासात गेलेले. नेहेमीच्या धकाधकी पासून एकदम दूर. अगदी थोड्याच दिवसांची गोष्ट होती. काही दिवसांनी ते आपला नविन संग्रह प्रकाशीत करणार होते- 'भय' कथांचा. भय कथांतले जवळ जवळ सगळेच विषय त्यांनी पिंजून काढलेले. रात्रीचे पडघम, सैतान, काळी मांजर , अघोरी विद्या, तांत्रीक, पछाडलेला वाडा .... सगळे म्हणजे अगदी सगळेच. आता एक 'शेवटची' गोष्ट लीहायची. म्हणजे १० गूढकथा/ भयकथांच्या पूस्तकांचा संचच ते प्रकाशना करीता देणार होते. प्रकाशकांशी तस त्यांच बोलणही झालेल. पण अर्थात ते त्या दोघांना सोडून इतर कोणालाच ते माहीत नव्हत. वाचकांसाठी हा एक सुखद धक्काच असणार होता. आणि विश्वासरावांना त्याचा पूरेपूर मोबदला मिळणार होता. आणि एवढ सगळ करायच तर मनाला शांतता हवी. त्यासाठीच त्यांनी वस्तीपासून दूर अशी जागा निवडलेली.

' चला आता ही एक गोष्ट लीहायची. कदाचित शेवटची. ह्यापूढे आता लेखन सन्यास घ्यायचा' विश्वासराव विचार करत होते. लीखाणासाठी म्हणून विश्वासराव आपल्या नेहेमीच्या खूर्चीवर बसलेले. समोर छानस टेबल आणि त्यावर स्वच्छ सफेद कपडा. टेबला वर बरेचसे कोरे कागद आणि शाईची दौत. अजूनही विश्वासराव शाईच्या पेनाने लिहीत. अगदी लहानपणापासूनची सवय म्हणाना. पण आज काही केल्या विश्वासरावांची 'लेखन प्रतिभा' त्यांची साथ देत नव्हती. खूप विचार करून काही सूचत नव्हत. विचार करता करता कधी डोळा लागला ते त्यांना कळलच नाही. मध्येच कसल्याश्या आवाजाने त्यांना जाग आली. त्यांनी पाहील तर शाईची दौत टेबलावर कलंडली होती आणि थोडीशी शाई टेबलावर सांडलेली. काही वेळान ती सूकूनही जाणार होती. पण तिथे लक्ष द्यायला विश्वासरावांना वेळ नव्हता. त्यांच्या डोक्यात एक कथा आकार घेत होती, ती लवकरात लवकर कागदावर उतरवून काढल्याशिवाय त्यांना चैन पडणार नव्हती. आणि अस काही लीहायच असल की त्यांना जेवण खाण्याचीही शुद्ध रहात नसे. ही शेवटची कथा अगदी खासच. विश्वास रावांनी कथा लीहायला सूरुवात केली........

....... अमरनाथ एक जबरदस्त लेखक होते. रहस्यकथा आणि गूढकथा लीहिण्यात त्यांचा हात कोणी धरत नसे.गेले काही दिवस ते अगदी सगळ्यांपासून दूर अश्या ठीकाणी जाऊन राहीलेले. काही दिवसांनी ते त्यांच्या गूढकथांच एक पूस्तक प्रकाशीत करणार होते आणि एका मागोमाग एक पूस्तक प्रकाशीत करत जाणार होते. तस म्हटल तर वाचकांच पूरेपूर प्रेम त्यांना मिळालेल. पैशाची ददात अशी नव्हती. पण सतत काही तरी नव करण्याची ऊर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. स्वतः बद्दल प्रचंड आत्मविश्वास होता आणि आपल्यापेक्षा कोणीच वरचढ नाही हा तोरा ते नेहेमी मिरवीत असत.

त्यांना जवळच अस कोणी नव्हत. नाही म्हणायला एक लेखक मित्र होता 'निशांत'. 'पण त्याला तर आपण .....' विचारानेच अमरनाथ दचकले. विशेषतः अश्या संध्याकाळच्या वेळी त्यांच मन अधिकच कातर होत असे. 'अगदी अश्याच एका वेळी आपण त्याला सम्पवलेला. अगदी अलगद. कोणाला संशयही येणार नाही असा. '
निशांतला एक 'विचित्र सवय' होती. कथा लीहीताना तो मधे मधे शाईच पेन तोंडात धरत असे. कदाचित काही 'सूचण्यासाठी' म्हणून असेल पण ह्या वयात 'असली सवय' म्हणजे फारच विचित्र. पण अगदी ह्याच 'विचित्र सवयीचा' फायदा उठवून अमरनाथांनी त्याला सम्पवलेला. त्याच्या नेहेमीच्या शाईच्या दौतात त्यांनी 'जहरी विषाचे थेम्ब' सोडलेले. कोणाला संशयही आला नसता. त्याची ती सवय कोणालाच माहीत नव्हती एक अमरनाथ सोडून. त्या रात्री निशांत जो निजला तो सकाळी उठलाच नाही. अमरनाथांनी त्याच्या अप्रकाशीत कथांची बांड लाम्बवली. त्याआधी दौतीतली शाई बदलण्यास ते विसरले नाहीत. त्याच्याच कथा तर अमरनाथ आपल्या म्हणून खपवणार होते. पण 'तस' लगेच करण धोक्याच होत. आधी त्यांनी आपल्या शोकाच पूरेपूर प्रदर्शन केल.

आता ते त्या पूस्तकांची प्रस्तावना लीहीत होते. कथा आपल्या नसल्या तरी प्रस्तावना आपली असावी हा हेतू. मध्येच त्यांना तहान लागली म्हणून ते पाणी प्यायला उठले. त्याधी त्यांनी पेन बंडीच्या खिशाला अडकवल. तितक्यात जोराच्या वार्‍याने समोरचा पडदा हलला. इतका जोरात की बाहेरचा अंधार एकदम नजरेत भरला. तसे रस्त्यावर थोडे दिवे होते त्यामूळे अगदीच अंधार नाही म्हणता यायचा. त्या खिडकीत अचानक त्यांना 'तो' दिसला. हो तोच तो. तोच चेहेरा. अमरनाथ क्षणभर हादरले. ते खिडकी बंद करायला धावले. पण आज काही केल्या खिडकी बंदच होत नव्हती. जणू कोणी मूद्दाम धरून ठेवलेली. अमरनाथांना घाम फूटला. त्यांची जीभ कोरडी पडली. इतक्यात निशांतचा आवाज आला.

' अमर. कसा आहेस मित्रा? माझ्या शिवाय करमत का रे तूला? अरे त्या रात्री इतक शांत आणि सूंदर मरण दिलस मला. आणि घाबरतोस काय असा? मला सम्पवून वर माझ्या कथाही चोरल्यास. एकवेळ माझ्या खूना बद्दल मी तूला क्षमा करेन, पण माझ्या 'कथा चोरल्यास' त्याबद्दल कधीही नाही. ह्यापूढे तूच काय कोणालाच मी 'अश्या कथा' लीहू देणार नाही. आणि ज्या शाईने तू मला मारलस ना, त्याच शाईने मी तूझा जीव घेणारै.जरा बघ तरी'

अमरनाथ चपापले. मगाशी पाणी पिताना त्यांनी पेन बंडीला अडकवलेले. तेंव्हा बंडीवर एक शाईचा ठीपका पडलेला. आता त्यांनी पाहील तर तो ठीपका तेथे नव्हता. तो शाईचा छोटा ठीपका हळू हळू त्यांच्या छातीच्या दिशेने सरकत होता. त्यांच्या कानात निशांतचे शब्द घूमत होते आणि अचानक छातीत एक अगम्य कळ उठली.............

......... विश्वासरावांनी कथा लीहून सम्पवली.त्यांना आता खूप छान वाटत होत. त्यांच्या कथा काही दिवसांनी अगदी धमाल उडवणार होत्या. वाचकांच प्रेम, वाहवा, अमाप कीर्ती सर्व काही त्यांना मिळणार होत. आता त्यांना भूकेची जाणीव झाली. त्याआधी टेबलावरचा पसारा आवरावा. त्यांनी उरलेले कोरे कागद व्यवस्थीत रचून ठेवले. मगाशी पडलेली दौत उचलून ठेवावी म्हणून त्यांनी पाहील. आणि ते पहातच राहीले. मगाशी शाईने भिजलेला टेबलक्लॉथ आता अगदी स्वच्छ होता. जणू काही झालच नाही असा आणि 'तो शाईचा ओहोळ' हळूहळू त्यांच्या दिशेने सरकत होता.

*********************************************************************** समाप्त

विषय: 
प्रकार: 

शेवट जरा लवकर आला.
अजुन रंगवुन मग आला असता तर अजुन छान वाटल असत अस मला वाटत.

केदार
जमलीये. कल्पना बेफाम आहे.... अजून फुलवता आली असती का? गूढकथा, भयकथांमध्ये भय हे त्या त्या भयाकारी, गूढ घटनांच्या, व्यक्तींच्या वर्णनांचं असतं..... मल स्वतःला भयकथा लिहिता येत नाहीत... पण तुमची वाचायला आवडली.

खर तर हा पहीलाच प्रयत्न आहे. भय कथा लीहायचा. त्यामूळे त्रूटी आहेत बर्‍याच. पण पूढच्या वेळेला चांगल लीहायचा प्रयत्न करेन नक्की. तूमच्या मोलाच्या सल्ल्याबद्दल खूप खूप आभार.

झकोबा धन्यवाद रे.

अरेच्चा, वाचलीच नव्हती हि कथा!! कथाबीज छान आहे मुळात... झकास म्हणतो तसं लवकर संपवलीस!! पण छान आहे.. Happy

धन्स ग स्वाती.

WOW!

@ केदार१२३, छान कथा, आवडली. शेवटी अनपेक्षितपणे धक्का बसला. अवाक् झालो. तो शाईचा ओहोळ डोळ्यांपुढे हळूहळू ओघळायला लागला.