"त्या सुभान्याच्या दुकानातून आणलेलं आत्तर घे जरा"
कडक इस्त्री मारलेली कापडं अंगावर चढवत आपल्या भारदस्त आवाजात संग्राम पाटलानं आवाज टाकल्यावर बोटाएवढी पांढरी फटक नक्षीदार काचेची नाजूक बाटली उजव्या हातात अलगद पकडून बिगीबिगी चालत गोदावरी पाटलीणबाई दोन पावलं मागं उभं राहून अदबीनं थांबली.
"झ्याक" संग्राम पाटलानं उजव्या हातानं सोन्याचं कडं त्याच्या डाव्या मनगटावर चढवलं. अत्तराची कुपी उघडून त्याच्या टोकाशी असणारा मऊशार कापूस दोन्ही तळहाताच्या मागील बाजूवर अलगद फिरवला. मदनबाणाची नाजूक फुले उमलताना सुगंध अचानक घरभर दरवळावा तसा त्या कुपीतील गंध कौलारू खोलीच्या कोपरा कोपरात पसरला.
" राहू दे माझ्याकडेच ही कुपी" संग्रामने कुपी अंगरख्याच्या डाव्या खिशात रुमालासह कोंबली.
" गावातली कामं उरकून तालुक्याला जाणार हाय कचेरीत, सगुनीला पण सोडणार हाये तिकडं, रातच्याला येळ हुईल, भाकरीला वाट बघू नका, खाऊनश्यान पडा गुमान.म्हातारीला पण सांग, नाहीतं उगाच डोळं लावून बसल वाटंवर." संग्रामने जणू फर्मान सोडलं होतं.
"ती जाईल की दुपारच्या एशटीनी, तुम्ही काह्याला तकलीफ करता" गोदावरी थोड्या इर्षेच्या स्वरात बोलली.
"हात्तीच्या, झालं का सुरू परत, आता कचेरीला चाललोच हाये म्हणून सोडतोय तिला, तिच्यासाठी नाय चाललो तालुक्याला" संग्रामने पुन्हा आवाज चढवला. च्यायला तुम्ही बायका जन्मभर नवऱ्यावर शंका कसली घेता, नाय आणणार तुला सवत मी, नको काळजी करु"
सगुना आणि संग्राम एकाच शाळेत लहानाचे मोठे झाले होते. नाय म्हणलं तरी बारा वर्षाची त्यांची मैत्री होती त्यांची. संग्राम आणि सगुनाची घट्ट मैत्री बघून पुढं जाऊन ते दोघे लग्न करतील अशीच गावात चर्चा व्हायची. गावही तसे पुरोगामी विचाराचे होते. प्रेम वगैरे या गोष्टी गावात वर्ज्य नव्हत्या. त्यांच्यात प्रेम होते का फक्त मैत्री ही बाब मात्र कोणालाच कळाली नव्हती. संग्रामचे मन बारावीनंतर अभ्यासात रमले नाही.जेमतेम गुण मिळवत काठावर बी. ए. पास करून तो गावच्या राजकारणात रमला होता. सगुना मात्र अभ्यासात चांगली होती दहावीनंतर तालुक्याला विज्ञान शाखेत बारावी आणि पुढे पुण्याच्या अष्टांग आयुर्वेदिक महाविद्यालयातून ती डॉक्टर झाली होती.शिक्षण संपवून तालुक्याच्या सरकारी दवाखान्यात तिने नोकरी स्वीकारली होती. या सगळ्यात गोदवरीला खटकणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे सगुनाने अजून लग्न केले नव्हते.घरातल्या लँडलाइन फोनवर संग्राम आणि सगुनाच्या गप्पा तासनतास चालायच्या.वरचेवर तालुक्याच्या कामाला गेल्यावर संग्राम आणि सगुनाची भेटही व्हायची. एक दोन वेळा सगुनाच्या सरकारी निवासी वसाहतीत संग्रामने मुक्काम केल्याचे खुद्द संग्रामने सांगितल्यापासून गोदावरीची चलबिचल अजून वाढली होती. काल यात्रेनिमित्त सगुना गावात आल्यापासून संग्रामबरोबर तिने केलेली लगट तर गोदावरीच्या डोक्यात गेली होती.गावातही भलत्या चर्चेलाही उधाण आले होते.
"गाडी काढ" शिंदे चालकाला संग्रामचा आदेश मिळाला तसा तो गाडीकडे निघाला. वाड्याबाहेर संग्रामच्या बरोबर नेहमी फिरतीवर असणारे त्याचे पंटर कम हेल्पर दिनेश आणि राहूल गाडीजवळ उभे होते. निघायची वेळ कालच ठरली असल्याने सगुनाही गाडीजवळ येतच होती. सोडायला आलेली तिची आई तिला गाडीत बसवून माघारी फिरली. शिंदेने स्टार्टर मारला आणि गाडी तालुक्याच्या दिशेने धावली.
इनमिन हजार बाराशे लोकवस्तीच्या अवसरी गावात संग्राम पाटलाचा चांगला दबदबा होता. गावात दोन कुटुंबात झालेल्या जमिनीच्या वादामुळे एक प्रकरण कचेरीत निकालासाठी पडून होतं. गावचा पोलीस पाटील म्हणून संग्रामची साक्ष तेवढीच महत्वाची असल्याने तालुक्याहून वर्दी घेऊन एक गडीमाणूस दोन दिवसापूर्वी वाड्यावर येऊन गेला होता. तालुक्याला कचेरीचे काम आहे हे गोदावरीला पक्के माहीत असले तरी सगुना आणि संग्रामने एकत्र जाणे तिच्या जीवाला घोर लावत होते. त्यात कधीही अत्तर न लावणाऱ्या संग्रामला आज अचानक अत्तराची कुपी आठवली होती. नेहमीपेक्षा त्याचा चेहरा जास्तच उजळ दिसत होता. गावाकडं नेहमी पंजाबी ड्रेसमध्ये वावरणारी सगुणा आज फॅशनेबल स्कर्ट आणि टॉप अंगावर चढवून बाहेर पडली होती. पुण्यात चार वर्षे शिक्षण झाल्यामुळे तिला तसे कपडे वापरायची सवय असली तरी गावाकडे आल्यावर तिने ते वापरु नये असे गोदावरीला वाटायचे.गोदावरीच्या डोक्यातला विचारांचा कल्लोळ काही थांबायचे नाव घेत नव्हता. वाड्यात संग्रामची आई सोडली तर इतर बायकांपैकी कोणालाही उलटे प्रश्न विचारायचे धाडस आणि मुभाही नव्हती. घरात नोकर चाकर होते, बायकांना स्वयंपाक सोडला तर फारसे काम नसायचे त्यामुळे रिकाम्या वेळेत टिव्ही समोर बसून गप्पागोष्टी,कधी बाजारात चक्कर टाकून किरकोळ खरेदी, झालंच तर घरातली आणि फॉर्म हाऊसचे बागकाम वगैरे ही कामे त्यांच्यासाठी नेहमीची झाली होती.
धाकटी जाऊबाई चंदा सकाळपासून गोदावरीला पाहत होती.एव्हाना तिची चलबिचल तिच्याही लक्षात आली होती.
"एवढी ढील देणं बरं न्हाही भावजींना, गावातपण चर्चा वाढली आहे त्या दोघांची, आता एकत्रच गेल्यात तर तालुक्यालाच गेलं म्हणजी झालं" चंदाची जीभ सैल होत गेली.
" नाय म्हंजी तालुक्याच्याच वाटंवर आपलं फार्म हाऊस बी हाये म्हटलं" चंदाने आगीत तेल ओतलं तसं गोदावरी अजून कासाविस झाली.
"नाय गं, जातील ते सरळ तालुक्याला" चंदाला उत्तर देताना गोदावरी खरे तर स्वतःलाच धीर देत होती.
गोदावरीचे स्वयंपाक करण्यात लक्ष नव्हते. चंदाचे बोलणे राहून राहून पुन्हा कानावर आदळत होते. तसेही सहा सात लोकांचा स्वयंपाक करायला तासभर पुरे होता नंतर दिवसभर काही काम नव्हते. 'आता नुसते बसून चालणार नाही, काहीतरी केले पाहिजे' गोदावरीने मनातच निर्धार केला.
"आत्याबाई,ओ आत्याबाई" गोदावरीने सासूला आवाज दिला.
"काय गं गोदे" सासूने पाट्यावर फिरणारा वरवंटा थांबवला.
" महादू म्हणत होता आपल्या फार्म हाऊसची झाडं पार वाळल्याती, जरा खुरटं गवत काढून,खतपाणी घालून येऊ का आज चंदा आणि म्या" तसबी हे रातीला उशीरा येणार हायेत. मामंजीपण नाहीत घरात, तर मग काय काम पण न्हाई इथं"
सकाळपासून चाललेला गोदावरीचा रुसवा फुगवा तिच्या सासूने केव्हाच हेरला होता, इर्षा काय असते हे एक बाई चागलेच जाणते. तिने हसून पुन्हा वरवंटा चालवला. "हा, जा दोघीबी,पण मावळायाच्या आत घरला या, पाहिजे तर ती बुलेरो घेऊन जा वैरणाची, महादू हाये चालवायला"
गोदावरीने सुटकेचा निश्वास टाकला,चंदालाही घरातून बाहेर पडून शेतावर फिरायला आवडायचे.त्यामुळे ती तर यायला लगेच तयारच झाली. खरे तर तिला तिच्या भावजीला रंगेहाथ पकडण्याची संधी सोडायची नव्हती.एकाच घरात राहत असले तरी पुढे जाऊन होणाऱ्या प्रॉपर्टीच्या वाटणीवरुन त्यांच्यातही अधेमधे खटके उडायचे. संग्रामचा गावातला दबदबा, राजकारणात मिळालेली पदे , थोरला असल्यामुळे जिकडे तिकडे आपल्या नव-यापेक्षा जास्त संग्रामला मिळणारा मान तिला टोचत होता. जवळपास तासाभराने त्या दोघी वाड्याबाहेर पडल्या.महादूने बोलेरो गाडी काढली. मागे वैरणासाठी हौद आणि पुढे चार लोकांना बसायला लावलेली सीट्स अशी ती गाडी संग्रामने बनवून घेतलेली होती.एका स्टार्टरने चालू झाली तर ती बोलेरो कसली, चांगली पंधरा मिनिटे खटपट करुन महादूने गाडी चालू केली, गावची वेस ओलांडून गाडी वा-याशी बोलू लागली.
सकाळची अत्तराची कुपी गोदावरीच्या डोक्यात पुन्हा खाडकन उघडली.निरभ्र आकाश अचानक ढगाळ झाल्यानंतर मनात उगाचच येणारी उदासी तिच्या अवतीभवती पसरली होती.
'किती छान मदनबाणासारखा सुगंध होता त्या अत्तराचा. ह्यांनी तो दोन्ही हातावर लावला म्हणजे एक हात माझा आणि एक सगुनीचा तर नसल. काल किती खिदळत होते ते दोघे गप्पा मारताना. ती सटवी तर बिनधास्त टाळ्या मारुन लगट करत होती ह्यांच्याबरोबर,आम्हीबी दाहावीपोतरं शिकलोच की आमची नव्हती अशी मैत्री कुणाबरोबर,पंचवीशी झाली तरी तिनी लगीन का केलं नसलं अजून, हेन्ला पण गावच्या माणसांची लय काळजी, कोण हाये,कसा हाये , लोकं काय म्हणतील काय बी इचार नाय करायचा, संग्रामदादा म्हणून हाक मारली की निघाले धाऊन मदतीला.तिलाबी ह्यांच्याबरोबरच जायचं असतयं, गावातून काय एकच गाडी जाती का तालुक्याला पण नाय ह्यांचीच गाडी पाहिजे.
नाही,त्यांच्यात फक्त मैत्री असणे शक्य नाही. मला फक्त कळू दे,नाय झिंज्या उपटल्या त्या डाक्टर्णीच्या तर नावाची गोदावरी नाही.'गोदावरीचे मनातले पुटपुटणे बऱ्यापैकी मोठ्या आवाजात असल्याने चंदाला ऐकू जात होते. न ऐकल्याचे सोंग घेऊन चंदा असुरी आनंद घेत गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहत असल्याचा आव आणत होती.गाडी म्हणता म्हणता फार्म हाऊस जवळ पोहचली तशी चंदा पचकली
" आई शप्पथ, भावजींची गाडी....."
गोदावरीच्या तळपायाची आग मस्तकात पोहचली होती.
"गाडी इथ्थच थांबीव रे" ती नेहमीपेक्षा मोठ्या आवाजात बोलत होती.
"चल गं चंदे आज काय तो सोक्षमोक्ष होऊन जाऊ दे, बायकांचा जन्म शंका घेण्यात जातो म्हणत्यात काय....अशा सटव्या आजूबाजूला असल्यावर शंका घेयालाच लागती"
उघडे असलेले लोखंडी गेट हाताने अजून मागे रेटत त्या दोघी कंपाउंडच्या आत शिरल्या.बाहेरच्या बाकड्यावर दिनेश आणि राहुल निवांत तंबाखूचा विडा तोंडात कोंबून गप्पा मारत बसले होते.
"बघ ही दोघं बसल्याती पहाऱ्याला"
चंदा भडका उडवण्याची एकही संधी सोडत नव्हती.
त्यांच्याकडे दुर्लक्ष करून दोघी पुढं निघाल्या मात्र दिनेश आणि राहुलने त्यांना अडविलेही नाही किंवा काही विचारले नाही याचे दोघींनाही आश्चर्य वाटले.
बंगल्याचे मुख्य दारही सताड उघडे असल्याचे पाहून गोदावरीला हायसे वाटले.तरीही त्यांच्या पावलांचा वेग मंदवला नव्हता, तावातावाने त्या दोघी मुख्य दारातून आत शिरल्या तसे कानावर वाक्य आदळले.
"संग्रामं तुम्ही दिसता किओ अगदी तसे ... सुनिल दत्त म्हणतो मी"
आठ दहा लोकांचा मोठ्याने हसण्याचा आवाज कानावर पडला.थोडे पुढे जाऊन पाहिले तर खरेच कोणतीतरी मोठी मिटिंग चालल्याचे गोदावरीच्या लक्षात आले होते. सगळ्यांनीच एकाच वेळी दाराकडे नजर वळविली.
" अहो मंडळी. हिकडं कुठं शेताची वाट धरली आज" संग्रामने मान वरुन विचारले.
" झाडांना खतपाणी घालायचे हाये, गवत पण वाढलय लय बागेत, तेच्यासाठी आलो हिकडं"
"आस्स" संग्रामला गोदावरी तिथे का आली असावी हे न कळायाचा प्रश्नच नव्हता.
" बरं, आलाच हायेत तर या बसा हिथं " संग्रामने पुन्हा आदेश दिला.
तर पाहुण्यांनो या आमच्या मंडळी गोदावरी बरका, या धाकल्या वहिनी चंदाबाई" संग्रामने बोटाने इशारा केला.
संग्रामने लांब श्वास घेतला.
"आणि हे डॉ. व्यंकटेश अय्यंगार " सगुनाचे यजमान म्हणजे आपल्या गावचे जावई बरका.कर्नाटकातले असले तरी मऱ्हाटी झ्याक बोलत्यात बघ" संग्रामने निरागसपणे सगळे काही झटक्यात सांगून टाकले.
मांजा तुटलेला पतंग जमिनीवर पडायच्या आधी उगाचच गिरक्या घेऊन उडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतो तशी गोदावरीच्या मनाची अवस्था झाली होती. नेमके काय बोलावे,काय करावे तिला काहीही समजत नव्हते. डोक्यातला राग गेला असला तरीही उन्माद अवस्थेतून थेट मौनात प्रवेश होणे इतके सहज नव्हते. तरीही पुन्हा प्रश्नार्थक नजरेने त्यांनी व्यंकटेशकडे पाहिले.तिच्या तोंडातून मात्र शब्द बाहेर पडत नव्हते.
"एवढं गप बसायला काय झालं, पुढच्या आठवड्यात आपण गावात रिसेप्शन ठेवणार आहे यांचे , मग सगळ्या गावाला समजेल, तव्हर कुणाला काय बोलू नका." संग्राम बोलायचे थांबत नव्हता.
एवढा वेळ पडद्याच्या बाजूला उभे राहून सगळे काही नजरेने टिपणारी सगुना पुढे आली.
"अरे थांब थांब, बॉम्ब फोडण्याची सगळी मजा तूच घेणार की काय, इट्स माय टर्न नाऊ , आम्ही लेडीज मेंबर जरा बागेत चक्कर टाकून आलो"
चला गोदाताई, चंदाताई" सगुनाने आवाज टाकला तशा तिघीही बंगल्याच्या बाहेर पडल्या.गोदावरीच्या डोक्यात अजूनही बरेच प्रश्न असतील याची सगुणाला कल्पना होती.
बागेत चालता चालता सगुना बोलू लागली.
"तुला तर माहीत आहेच संग्राम आणि मी वर्गमित्र आहोत, त्याला राजकारणात रस होता आणि मला मेडीकल फिल्डमध्ये, माझे वडील मी लहान असतानाच गेले आणि माझी जबाबदारी एकट्या आईवर पडली.तेव्हा संग्राम आणि काकाने मला मोठा आधार दिला बघ. मला डॉक्टर व्हायलाही संग्रामने आणि तुझ्या सासऱ्याने खूप मदत केली. संग्राम अणि माझ्यामध्ये मैत्रीपलिकडे कधीच नाते नव्हते.”
“ व्यंकटेश माझ्याबरोबर कॉलेजला होता. तो मूळचा बंगळूरचा असला तरी त्याचे सगळे शिक्षण पुण्यातच झाले आहे .तसा तो मला सिनिअर होता, पुण्यात आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. शिक्षण संपल्यावर लगेच लग्न करायचा विचार होता पण त्याच्या घरातून प्रचंड विरोध झाल्यामुळे लग्न लांबणीवर पडले त्यात व्यंकटेश मागची तीन वर्षे पोस्ट डीग्री मिळवायला लंडनला होता. मागच्याच महिन्यात आम्ही रजिस्टर लग्न केले आहे. संग्राम तिथे फक्त साक्षीदार म्हणून नव्हता तर व्यंकटेशच्या घरच्यांनाही त्याने लग्नासाठी कन्विन्स केले. लग्न साध्या पध्दतीने झाल्याने दोन्ही घरातील काही मंडळी नाराज आहेत म्हणून गावात मोठा रिसेप्शन कार्यक्रम ठेवायची आयडीया पण संग्रामचीच बरका. तू इथे का आली आहेस हे मला कळते आहे पण तू समजतेस असे काही नाही, मला भाऊ नाही पण तो असता ना तरी त्याने एवढ सगळं केलं नसते माझ्यासाठी. अगं,स्त्री पुरुषामध्ये निखळ मैत्रीचेही सुंदर नाते असू शकते ना , संग्राम फार मोठ्या मनाचा आहे आणि तेवढाच साधाही. गावावर त्याचे प्रेम आहे म्हणून सगळ्यांना मदत करायला तो पुढे असतो. व्यंकटेशच्या सगळ्या नातेवाइकांची सोय त्याने इथेच फार्म हाऊसवर केली आहे आज किंवा उद्यापर्यंत येतील सगळे,हे सर्व आधीच गावात कळू नये म्हणूनच तुम्हालाही काही सांगितले नसेल संग्रामने" सगुणा बोलतच होती आणि या दोघी सख्ख्या जावा कान लावून ऐकत होत्या .
" काय चंदा" शॉक बसला ना ऐकून सगळं "
चंदाने खोटे हासू ओठावर आणले होते. "नाहीतर काय, एवढं सगळ झालं आणि आम्हाला पत्तापण नाय"
" आणि हे बघ " सगुनाचे बोल कानावर पडताच गोदावरी दचकली
"संग्रामने वापरलेली ही अत्तराची अर्धी कुपी मी मुद्दाम ढापली आहे, रिसेप्शन झाल्यावर मी बंगलोरला शिप्ट होणार आहे कायमची, व्यंकटेशने आणि त्याच्या डॉक्टर मित्रांनी मिळून तिथे हॉस्पीटल उघडले आहे,आता आम्ही दोघेपण तिकडेच प्रॅक्टीस करू. ही कुपी मात्र मी संग्रामची आठवण म्हणून कायम जपून ठेवणार आहे.असे मित्र आयुष्यात भेटायला भाग्य लागते. तू तर फार लकी आहेस तुला तर असला भारी रांगडा लाईफ पार्टनर भेटला आहे"
फार्म हाऊसवर पाहुण्यांची वर्दळ वाढू लागली, बागेतली झाडे आता एवढीही सुकल्यासारखी वाटत नव्हती. अजूनही काही रोपावर फूले खिदळत होती. बागेची कामं नंतर करतो असे संग्रामला सांगून गोदावरी आणि चंदा मावळतीच्या आधीच घराकडे परतले.
रात्रीचे दोन वाजले तरी गोदावरीचा डोळा लागत नव्हता, आपण ह्यांच्यावर अशी वंगाळ शंका घ्यायला नको होती, सगुनासारख्या चांगल्या पोरीबद्दल किती वाईट विचार केले आपण अशा एक ना अनेक विचारात तिचा डोळा पहाटे कसाबसा लागला होता.
सकाळी डोळे उघडले तसे समोर एक सुंदर लक्कड पैठणीकडे गोदावरीचे लक्ष गेले. बाजूला संग्राम गाढ झोपला होता.
पैठणीची घडी उघडण्याचा मोह गोदावरीला टाळणे शक्य नव्हते, घडी उघडली तशी त्यात एक नवीन आणि कालच्यापेक्षा आकर्षक अत्तराची कुपी दिसली. कुपीच्या खाली एका कागदावर पुसट झालेल्या अक्षरात लिहिले होते.
"कुपीतून घेतलेला सुगंध विचारात पेरता आला तरच त्या अत्तराचे सार्थक झाले म्हणावे"
पाणावलेल्या डोळ्याने गोदावरीने झोपलेल्या संग्रामच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि चेहऱ्यावर पराकोटीच्या समाधानसह ती स्वयंपाकघराकडे वळाली.
छान कथा..
छान कथा..
खुप छान...
खुप छान...
छान पॉझिटिव्ह कथा.
छान पॉझिटिव्ह कथा.
एकदम सुरेख रंगवलीयत सर्व
एकदम सुरेख रंगवलीयत सर्व पात्रं आणि त्यांचे भाव तरंग.
________________
चार वर्षे शिक्षण झाल्यामुळे तिला तसे कपडे वापरायची सवय असली तरी गावाकडे आल्यावर तिने ते वापरु नये असे
सगुनाला( गोदावरीला असे असले पाहिजे ना इकडे) वाटायचे. गोदावरीच्या डोक्यातला ....मस्तच एकदम….. आवडली.
मस्तच एकदम….. आवडली.
धन्यवाद मित्रांनो..
धन्यवाद मित्रांनो..
@अni, चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आभार . दुरुस्ती केली आहे.
छान कथा..
छान कथा..
मस्त कथा!
मस्त कथा!
शेवटचा पॅरा विशेष आवडला
खूपच मस्त कथा आहे.
खूपच मस्त कथा आहे.
छान लिहिली आहे कथा, आवडली.
छान लिहिली आहे कथा, आवडली.
खूपच छान कथा
खूपच छान कथा
धन्यवाद रसिक मित्रांनो ......
धन्यवाद रसिक मित्रांनो .............../\..............
मस्त कथा. आवडली!
मस्त कथा. आवडली!
मस्त कथा! कालच वाचलेली.
मस्त कथा! कालच वाचलेली. प्रतिसाद द्यायचा बाकी होता. शेवट खूपच छान!
आहा !! गोड कथा
आहा !! गोड कथा
कथा छान आहे, आवडली!
कथा छान आहे, आवडली!