
मी जर सोनमासळीचे शरीर घेवून या तलावाच्या तळाशी लपून राहीले असते
तेव्हा तू चंद्रबिंबासारखा या पाण्यावर तरंगत आला असतास
आणि माझ्या काळोख्या घरात चांदणे पसरवले असतेस
तरंगत म्हणालाही असतास या एकाकी तळ्यात , 'तुझ्यावरही कुणी प्रेम केले असते'. मग मी किनाऱ्यावर येऊन तुझ्याशी मैत्री केली असती, तुझ्या सोनमासळीने तुझा एकाकीपणा दूर केला असता. या कल्पनेने तुला 'सुकून' मिळाला असता, जर खरेच अशी सोनमासळी या तलावात राहत असती, जर खरेच अशी सोनमासळी या तलावात राहत असती
'एट एम मेट्रो' सिनेमातली ही गुलजार यांची कविता. "एक लडका और लडकी कभी दोस्त नहीं बन सकते" या हिंदी चित्रपटातील सर्व व्याख्यांना छेद देत कुठेतरी दूर नेऊन ठेवणारी थोडी परकी पण बरीचशी आपली वाटणारी दोन माणसांची कथा. ती कधीही स्त्रीपुरुषांची होत नाही, ना कधी 'जेन्डरलेस' स्नेहाचा बटबटीत दिखावा करते. ती शेवटपर्यंत दोन माणसांचीच राहते. तुम्हाला जे हवे ते तुम्ही घ्या, नको असेल तर नका घेऊ. इतकी कंफर्टेबल अभिव्यक्ती..!
साधीसरळ आत्मविश्वास कमी असणारी संवेदनशील गृहिणी इरा व टागोर, चेकॉव्ह, हरिवंशराय बच्चन अशा लेखकांच्या पुस्तकांत रमणारा इंट्रोव्हर्ट वाटावा असा प्रीतम अनपेक्षितपणे सकाळी आठ आणि संध्याकाळी सहा वाजताच्या हैदराबाद शहरातील मेट्रोत भेटतात, बोलतात, खुलतात, एकमेकांना शोधत- प्रेरित करत आपापला मार्ग शोधत 'यथा काष्ठं च काष्ठं च' म्हणत परतही जातात. आपण एकमेकांच्या रितेपणाला भरत आहोत ही जाणीव नेणीवेत जाते आणि दोन आठवड्यांचे निर्व्याज नाते खूप काही देऊन जाते.
इराला लहानपणी ट्रेनमधे काही काळ चुकामूक झाल्याने एकटे रहावे लागते व त्याचा तिला प्रचंड धक्का बसलेला असतो. त्यात तिला बहिणीच्या गुंतागुंतीच्या प्रेग्नंसीसाठी नांदेडहून हैद्राबादला मदतीसाठी यावे लागते. रोज बहिणीच्या घरून हॉस्पिटलमध्ये डबा घेऊन येण्यासाठी ट्रेन घेताना पॅनिक अटॅक्स यायला लागतात. तेव्हा प्रीतम तेथेच असतो व गप्पा मारत तिचे लक्ष विचलीत करतो. सहज सुरू झालेल्या गप्पा तिच्या कविता व त्याच्या वाङमयीन रुची वर व्हायला लागतात. या गप्पा प्रोफाऊंड असूनही सहजपणे होतात, कधीकधी अगदी साध्याही असतात. त्यामुळे त्या मोजूनमापून केलेल्या न वाटतात आपोआपच झालेल्या वाटतात. इरा तिचे भय शब्दातही मांडते. हजारो गोष्टी सांगायच्या असतात पण भोवतालची ही पराकोटीची अनास्था बघून व्यक्त व्हावेसे वाटत नाही. तेव्हा संवेदनशील मनांनी काय करावे ते इरा मांडायचा प्रयत्न करते. फक्त स्वान्तःसुखाय. प्रथमच तिला तिची अभिव्यक्ती समजून घेणारे असे कोणी भेटते, तोवर तिला ही जाणीवही नसते की ती खरोखरच उत्तम काव्य करते. पण या स्वतःच्या चाचपडीत ती त्या सोनमासळी सारखी प्रीतमलाही 'सुकून' देत असते.
ते रोज गप्पा मारायला लागतात. फिल्टर कॉफी वरून जोरात प्रेस केली की डिकॉक्शन पातळ पडते आणि नाही जोर दिला तर ती कडवट होते. पण ती व्यवस्थित करणे ही प्रक्रिया मेडिटेशन सारखी असते. अशा शिळोप्याच्या ते-
आफ्रिकेतील आदिवासी लोक तिथले स्त्री-पुरूष एकमेकांशी कसे निर्विष, नॉन -जजमेंटल बोलतात व इतरांचा कानही होतात. ते आपल्या सोसायटीत या फेक संस्कारांच्या नियमांमुळे शक्य होत नाही म्हणजे एकप्रकारे मानवी नीतिमूल्ये आपण गमावून बसलो आहोत. सगळीकडे माणसांचा महापूर आलेला असूनही ऐकणारा समजू शकणारा कान सापडत नाही- अशा सखोल. चर्चा नव्हे गप्पा.
एकेदिवशी ते हैद्राबाद शहराची सहलही करतात. अतिशय साधी असलेली इरा खुलायला लागते व वडिलांनी अखेरच्या दिवसातल्या त्यांनी व स्वतः केलेल्या कविता म्हणून दाखवते. त्यांच्या शुश्रुषेतले एकाकी दिवस व आयुष्याचा व समाधानाचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा कसा असू असतो असेही सांगते. तिची ट्रेनबद्दलची भीती कमी व्हायला लागते. मोकळा श्वास घ्यायला लागते. बहिणीचे आलेले प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करते.
प्रीतमही खुलून घरच्या -कुटुंबाची हसरी चित्रं रंगवतो. मृदुला व मुलांबद्दल गोड हितगूज करत असतो. मृदुलाही बंगाली कविता करत असते, ते कसे प्रेमात पडले, मुलांसोबत ते प्रत्येक क्षण कसा एन्जॉय करतात. तो कसा गोड बाबा व प्रेमळ नवरा आहे हे इरासोबत आपल्यालाही जाणवते. त्यांचे "खौफ" - भय कमी व्हायला लागतात.
वो कोई खौफ़ था या नाग था काला
मुझे टखनोंसे आ पकडा था जिसने
मै जब पहिली दफा तुमसे मिली थी
कदम घडने लगे थे मेरे जमींनमें
तुम्हीने हात पकडा और मुझे बाहर निकाला
मुझे कंधा दिया सर टेकनेको
दिलासा पाके तुमसे सांस मेरी लौट आयी
वो मेरे खौफ सारे जिनके लंबे नाखून गलेंमें चुभने लगे थे
तुमहीनें कांट फेके सारे फन उनके
मै खुलके सांस लेने लग गयीथी
ना माझी देखा, ना मुस्तक्बिलकी सोची
वो दो हफ्ते तुम्हारे साथ जीकर अलग एक जिंदगी जी ली
फकत मैं थी, फकत तुम थे
कुछ ऐसे रिश्तेभी होते है जिनकी उम्र होती है, ना कोई नाम होता है
वो जिने के लिये कुछ लम्हें होते है.
पण प्रीतममधले वैफल्य सुरवातीपासून जाणवत असते. बऱ्याचदा भरपूर वाचन असणारे, वरवर वाक्चतुर वाटणारे लोक खऱ्याखुऱ्या भावना शिताफीने लपवू शकतात, अजिबात खोटे न बोलताही. अशा लोकांचे नैराश्य/एकटेपणा कधीही कळत नाही. तेवढा पेशन्स असणारेही कोणी भेटत नाही. कुणाच्या कलाकलाने घ्यायला आपल्याला वेळ कुठे आहे एकमेकांसाठी. त्यांना समजून घ्यायला तितकेच 'रूतलेले' कोणीतरी लागते. इराही त्याच तलावात दडी मारून बसलेली, प्रीतमसारख्या चंद्रबिंबाप्रमाणे वरवर तरंगत राहणाऱ्या इंट्रोव्हर्ट आणि वैफल्यग्रस्त व्यक्तीची दोन आठवड्यांपुरती 'सोनमासळी' होते. त्या चंद्रबिंबामुळे तिलाही तिच्या अभिव्यक्तीने- तिच्या कवितांनी कुणा एका जीवाला 'सुकून' मिळतोय ही जाणीव होते. अजून लिहायला हवे, हे छापून यायला हवे अशी इच्छा प्रथमच वाटते. "तू जसा कुठेतरी एकटा नसूनही एकाकी आहेस तशी मीही भरलेल्या संसारात महत्त्वाकांक्षी नसलेली तरीही संसारापेक्षा जास्त काही तरी शोधणारी वरवर सुखी वाटणारी साधीसरळ गृहिणी आहे. या भयांच्या गर्तेतून मी कधीही बाहेर निघणार नाही असे वाटताना अनाहूतपणे तू भेटलास. आणि निनावी नाते खूप काही देऊन गेले."
अशाच गप्पांमधे इरा प्रीतमच्या कुटुंबाला भेटण्याची इच्छा व्यक्त करते. प्रीतमही सरळपणे तयार होतो. ती भेट अर्थात होतच नाही व धक्कादायक प्रकारे तिला त्याच्या एकाकीपणाचे कारण कळते. तिच्या बहिणीला बाळ होते व तिच्या परत जाण्याची वेळ होते. ते वेगळे होतात, पुन्हा कधीही न भेटण्यासाठी. एकमेकांना चांदणे दाखवून, आपापल्या मार्गाने जातात. उरलेला प्रवास एकाकी असला तरी तो 'सुकून' घेऊन पुढे जाण्याने कमी बोचरा होतो. या सिनेमात फक्त इरा आणि प्रीतमचा संवाद आहे, बाकी काहीही महत्त्वाचे नाही. जे आहे ते संवादांची शृंखला एकमेकांना जोडणारे आहे, तेवढ्याचसाठी आहे. इराच्या सगळ्या कविता गुलजार यांच्या आहेत. त्या काव्याशिवाय ही कथा नाही, कथेला अधिक आर्तपणे त्या प्रेक्षकांपर्यंत पोचवतात. कथेशिवाय काव्यालाही अर्थ व सखोलता प्राप्त होत नाही. त्यामुळे ते दोन्ही इरा आणि प्रीतमप्रमाणे एकमेकांना परिपूर्ण करतात, नव्या उंचीवर नेतात. सुरवातीपासूनच हा बंध 'प्लेटॉनिक व तात्कालिक' आहे असे स्पष्ट दिसत असूनही हा संवाद ती उंची निश्चितच गाठतो. नात्यांमधली आणि अभिव्यक्तीमधलीही. हे पंधरा दिवस व ट्रेनमधल्या गप्पा दोघांचेही आंतरिक आयुष्य बदलवून टाकतात. पुढचा प्रवास कमी एकाकी करतात. प्रीतमही थेरपीच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकतो. आत्महत्येचा विचार रद्द करतो. त्याच ट्रेन ट्रॅकवर तो जीव द्यायला निघालेला असतो, जिथे इराला पॅनिक अटॅक्स आलेला बघताना पहिल्यांदा तिला सावरायला जातो.
इराच्या गप्पांनी/ तिच्या कवितांनी एका जीवाला शांतता मिळते. "अशांसाठी तू लिहायला हवेस इरा, सभोवताली असलेल्या अनास्थेची - 'बेरूखी'ची पर्वा न करता तू लिहायला हवेस इरा. एखाद्या जीवापर्यंत त्या पोचतील आणि त्याला कुठेतरी तृप्त करतील. तुझ्या रक्तात वाहणारी ती वेदना बोटांतून बाहेर पडू दे. चांदणे पसरू दे, खोल तलावातून बाहेर पड. चंद्रबिंबाप्रमाणे कुणीतरी तरंगत येईल".
येथे एडी मर्फीच्या 'Holy man' चित्रपटातला संवाद आठवला. समुद्रकिनारी चालत असताना लाटेसोबत वाहत येत वाळूत अडकून पडलेल्या हजारो स्टारफिशचा खच पडलेला असतो. शक्य तितके स्टारफिश परत प्रवाहात नेऊन सोडण्याची एका छोट्या मुलीची तडफड...! असे किती स्टारफिश आपण वाचवू शकणार आहोत, येथे तर खच पडलाय. आपल्या या तडफडीने असा कितीसा फरक पडणार. त्या छोट्यामुलीला जे समुद्रात जाऊन पुनर्जीवीत होतील, त्यांना तर खूप मोठा फरक पडेल असेच वाटलेले असते.
तसेच इराचे काव्य प्रीतमसाठी फरक पाडते, गारवा देते. तिलाही निश्चित दिशा मिळते. तिलाही ते सगळे मिळते, जे एका सोनमासळीला हवे असते. बरीच भयं दूर होतात, दिलासा मिळतो. मोकळा श्वास घ्यायला लागते. सुखी संसारात 'स्वत्व' सापडते. काही क्षणांमधे घडणारे आयुष्य अनोळखी व्यक्तीमुळे जगता येते.
इरा तिच्या कवितांचे पुस्तक छापते. त्याच हैदराबाद मधल्या पुस्तकांच्या नॉस्टॅल्जिक वाटणाऱ्या दुकानात तिथे ते त्याला मिळते. निरोप म्हणून 'काफ्का आणि बाहुलीची गोष्ट' तिने त्यात लिहिलेली त्याला सापडते. बर्लिनच्या एका पार्कमधे फिरताना काफ्काला एक छोटीशी मुलगी रडताना दिसते. बाहुली हरवल्याने ती रडत असते. दोघे मिळून बाहुली शोधतात पण ती काही सापडत नाही. दुसऱ्या दिवशी काफ्का त्या चिमुकलीसाठी बाहुलीकडून आलेले पत्र वाचून दाखवतो. बाहुली जगप्रवासाला निघालेली असते, त्यात तिने ह्या प्रवासातील साहसांबद्दल पत्रांत लिहिण्याचे वचन दिलेले असते. मुलीला गंमत वाटते. अशी बाहुलीची पत्रे वर्षभर येतात, काफ्का ते वाचून दाखवतो. एका वर्षांनी पूर्णपणे वेगळी वाटणारी बाहुली आणि शेवटचे पत्र येते. चिमुकली म्हणते, ही तर माझ्या भावली सारखी दिसत नाही, वेगळीच दिसतेय. भावली म्हणते, "मी जग बघितलेय आता आणि बदलून गेले आहे. पण मी तुझीच आहे." गोष्टीचे आणि सिनेमाचे तात्पर्य, प्रीतमसाठी इरा व इरासाठी प्रीतम त्या काफ्काच्या बाहुलीसारखे ठरतात.
Everything you love will probably be lost, but in the end, love will return in another way.
मला खटकलेली एकच गोष्ट म्हणजे सैयामीने वाचलेल्या कवितांमधे अजून एक्सप्रेशन हवे होते. चित्रपट समांतर सिनेमा वाटावा इतका संथ आहे. ज्यांना कविता व साहित्यात रूची नाही, त्यांच्यासाठी नक्कीच नाही. अभिनय उत्तम आहे. छोटेसेच पण ताकदीचे कथाबीज आहे. गुंतवून ठेवतो , काही ठिकाणी डोळ्यांत पाणीही येते. तुम्ही प्रेक्षक म्हणून त्या भावना जगलेल्याच नसतील तर यात काय अर्थ आहे असेही वाटू शकते. शेवटी पात्रांमधे कुठेतरी आपण स्वतःलाच शोधत असतो. कधीकधी आपलेच हरवलेले तुकडे शोधण्यासाठीच आपण चित्रपट बघतो, पुस्तक वाचतो, येथे येतो- चर्चा करतो. तुकडा गवसलाय वाटेपर्यंत आतले ब्रह्मांड अजून बदलून गेलेले असते. कुणाला गवसेलही काही कदाचित... यातून..!
संदर्भ-
Holy man- https://www.imdb.com/title/tt0120701/characters/nm0000552
Kafka and the lost doll- https://epicureanglobalexchange.com/kafka-lost-doll-little-girl/
Wikipedia
https://en.m.wikipedia.org/wiki/8_A.M._Metro
चित्र साभार विकी
इरा- सैयामी खेर
प्रीतम- गुलशन देवैय्या
इराचा नवरा- उमेश कामत
सगळ्या कविता गुलजार यांच्या आहेत.
©अस्मिता.
Update - फिल्म कंपॅनियनची लिंक ज्यात या परीक्षणापेक्षा वेगळा दृष्टिकोन ठेवून वेगळी बाजू मांडली आहे.
https://www.filmcompanion.in/reviews/bollywood-review/8-am-metro-movie-r...
अस्मिताचा लेख आणि इथली
अस्मिताचा लेख आणि इथली त्यानिमित्ताने सुरु असलेले चर्चा दोन्ही आवडले. मी अजून सिनेमा बघितला नाहीये.
अस्मिता, मी लेख वाचून सिनेमा
अस्मिता, मी लेख वाचून सिनेमा पाहिला. गुलजारच्या कविता ऐकून मन काठोकाठ भरून आले. पण तरीही सिनेमा पेक्षा तुमचे लिखाण जास्त आवडले!
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
लेख तर छान आहेच, बरेच प्रतिसाद देखील चांगले आहेत.
फारएण्ड आणि संप्रतीचे प्रतिसाद विशेष आवडले.
चित्रपट बघेन. युट्युबर दिसतोय.
किती तरल परीक्षण अगदी
किती तरल परीक्षण अगदी गुलजारच्या कवितेसारखं. जियो अस्मिता. मला हा पिक्चर माहीती नव्हता, बघेन की नाही माहीती नाही पण बघितलाच तर तू नक्की आठवशील.
प्रतिसाद वाचले नाहीत, वाचते सवडीने.
धन्यवाद स्वातीताई, शर्वरी,
धन्यवाद स्वातीताई, शर्वरी, झकासराव, अन्जुताई


पण तरीही सिनेमा पेक्षा तुमचे लिखाण जास्त आवडले! >>> /\
किती तरल परीक्षण अगदी गुलजारच्या कवितेसारखं. जियो अस्मिता. >>> /\
व्वा मस्त परीक्षण. चित्रपट
व्वा मस्त परीक्षण. चित्रपट बघून लिहीन इथे नक्की.
मी पाहिला चित्रपट... परीक्षण
मी पाहिला चित्रपट... परीक्षण जास्त आवडले.
गुलशन देवैय्याच काम मस्तच झालाय, सैयामीने पण बरं काम केलं आहे
अरे व्वा, आबा. धन्यवाद.
अरे व्वा, आबा.
धन्यवाद.
लंपन, धन्यवाद.
हा सिनेमा पाहिला आहे. आवडला
हा सिनेमा पाहिला आहे. आवडला होता.
पण तुमचा लेख जास्त आवडला. खूप छान लिहिलं आहे.
प्रतिसाद सुद्धा छान.
धन्यवाद ऋतुराज.
धन्यवाद ऋतुराज.
तू लिहिलेला लेख आणि गुलज़ार
तू लिहिलेला लेख आणि गुलज़ार म्हणून सवडीने वाचायला बाजूला ठेवला तर राहूनच गेला होता. छान लिहिलं आहेस त्यामुळे आता चित्रपट तेवढा भिडेल का असा प्रश्न पडलाय.
पण गुलजारच्या कविता आहेत ना मग बघेन वीकएंडला.
आता व्हाईट नाईट्स पण वाचणे आले.
तूर्तास एवढंच.
माझेमन
माझेमन
अपेक्षा भंग होईल बर.
https://www.filmcompanion.in/reviews/bollywood-review/8-am-metro-movie-r...
तू लिहिलेला लेख आणि गुलज़ार
तू लिहिलेला लेख आणि गुलज़ार म्हणून सवडीने वाचायला बाजूला ठेवला तर राहूनच गेला होता. छान लिहिलं आहेस त्यामुळे आता चित्रपट तेवढा भिडेल का असा प्रश्न पडलाय.
पण गुलजारच्या कविता आहेत ना मग बघेन वीकएंडला. >>>> + १००
धन्यवाद माझेमन आणि जाई
धन्यवाद माझेमन आणि जाई

पण गुलजारच्या कविता आहेत ना मग बघेन वीकएंडला.>>>
हे फिल्म कम्पॅनियनचं काय
हे फिल्म कम्पॅनियनचं काय तुणतुणं लावलंय प्रत्येक पानावर?
अस्मिता, लेखाच्या शेवटी लिंका दिल्यात त्यात हीसुद्धा अॅड करून टाक - यांचा त्रास वाचेल.
(No subject)
माफ करा. मी इथल्या कुणाही आयडी वर कॉमेंट करत नाहीये. गैरसमज नसावा. माझेमन ह्याना मला एव्हढेच सांगायचे होते कि अपेक्षा भंग होईल. बाकी काही नाही. नाण्याला दोन बाजू असतात आणि क्यूबला तर सहा. दुसर्यांचा व्ह्यू पॉईंट पण समजून घेणे हे प्रगल्भतेचे लक्षण.
त्या लेखाचे शीर्षकच मुळी आहे who knew a film could make Gulzar's poetry feel grating.
दुसर्यांचा व्ह्यू पॉईंट पण
दुसर्यांचा व्ह्यू पॉईंट पण समजून घेणे हे प्रगल्भतेचे लक्षण.

>>> माझाही घ्या नं मग
But feel free हं केकू.
स्वाती -
दिली लिंक लेखाखाली, मला ही गंमत आवडली. 
सुंदर लिहिले आहे अस्मिता.. हा
सुंदर लिहिले आहे अस्मिता.. हा लेख कसा मिसला होता.
ते गुलजार वगैरे मला कळत नाही. पण मलाही लंचबॉक्स आठवला.. आणि तो फार आवडला होता. याचे मात्र नाव सुद्धा ऐकले नव्हते. शोधायला हवे आवरजून आता.
दुसर्यांचा व्ह्यू पॉईंट पण
दुसर्यांचा व्ह्यू पॉईंट पण समजून घेणे हे प्रगल्भतेचे लक्षण.
>>> माझाही घ्या नं मग Lol
हे काय इथे आहे.
"लेख चांगला आहे.
पण पिक्चर माझ्या टाईपचा नाही म्हणून आपला पास.
Submitted by केशवकूल on 20 November, 2024 - 09:20 "
ओके धन्यवाद ऋ
ओके

धन्यवाद ऋ
एक नितांतसुंदर चित्रपट. खूप
एक नितांतसुंदर चित्रपट. खूप खूप सुंदर
अनेक वर्षांनी असा समांतर चित्रपटांची आठवण करून देणारा चित्रपट आला असावा. आणि अस्मिता तू खूप सखोल लिहिले आहेस. खूप खूप तपशीलवार आणि सखोल परीक्षण. लेख वाचून कैक दिवस झाले. पण हा चित्रपट पाहिल्याशिवाय प्रतिसाद लिहायचा नाही असे ठरवले होते. अखेर काल तो योग आला.
'इरा' ला पाहून दीप्ती नवल आठवत होती. प्रतिसादांतून या दोघांच्या अभिनयाविषयी विविध मते व्यक्त झाली आहेत. पण मला दोघांच्याही भूमिका प्रचंड आवडल्या. रोजची कामं करताना अनेकदा जगणं कुठतरी हरवल्यासारखं वाटत राहतं. विचारांत यांत्रिकपणा येतो. सूर हरवतात आणि रोजच्या जगण्याचे रहाटगाडगे नुसतेच वाजत राहते. या चित्रपटाने जिवंतपणाचा उमाळा जागृत केला जणू. आणि अधूनमधून पखरण केलेल्या गुलज़ारी काव्याने अजूनच बहार आणली.
"वर्षानुवर्षे जोडलेली नाती, झालेले संवाद, जगलेले अविस्मरणीय क्षण.... हे सारे एका क्षणात नजरेआड होऊन फक्त शेवटी काय संवाद झाला तोच का लक्षात राहतो? केवळ तोच नाते तुटायला का कारणीभूत ठरतो?" ... हे ऐकताक्षणी आपणही स्तंभित होतो. क्षणभर चित्रपट पॉज करून "अरे खरेच की!" म्हणत विचारात पडतो. चित्रपट हा असा जागोजागी भिनत जातो
संपूर्ण सिनेमा ज्या एका वैचरिक दर्जाच्या पातळीवर सकारात प्रेक्षकांच्या अपेक्षा निर्माण करतो, शेवट सुद्धा त्याला साजेसाच आहे. दोघे एकमेकांत काही काळ मनाने गुंतून शेवटी आपापल्या वाटेने निघून जातात तरीही प्रेक्षकांना ते अर्ध्यातच संपलेले न वाटत परिपूर्ण वाटणे हे या सिनेमाचे यश आहे. ते साधण्यासाठी कथानक, पात्रनिर्मीती, संवाद या साऱ्याच पातळ्यांवर दिग्दर्शकाने किती कमालीची मेहनत घेतली असेल हे दिसून येते. मध्ये एका नाजूक क्षणी 'इरा' अत्यंत ऑकवर्ड होते, लगोलग 'प्रितम' सुद्धा ऑकवर्ड होतो आणि पाठोपाठ प्रेक्षकांची सुद्धा तीच अवस्था होते! आजवर कोणत्या सिनेमात नायिका आकस्मिकपणे काही घडून नायकाच्या मिठीत येते आणि प्रेक्षकांना ते दृश्य गोड न वाटता अवघडल्यासारखे होते असे झालेले आहे? मला वाटते इथेच हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला आहे.
मला सर्वात आवडली ती इराच्या बहिणीची भूमिका. वाह!
निमिषा नायरने किती नैसर्गिक सहजसुंदर भूमिका केली आहे. पात्रनिर्मिती, कास्टिंग, अभिनय, संवाद, देहबोली सारे काही जुळून आले कि ती भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करते. हि सारी भट्टी या चित्रपटात तशी सर्वच भूमिकांबाबत जमून आली आहे. पण "रिया"ची बातच न्यारी! टिप्पीकल मेहुणी, नवऱ्याकडून प्रतारणा झालेली पत्नी, आईच्या साडीला मिठी मारून रडणारी लेक आणि लाडकी धाकटी बहिण या सर्व छटा असलेले हे पात्र तिने फार फार गोड साकारले आहे. प्रचंड भावली हि भूमिका मला. चित्रपटाच्या नामावलीत अनेक ठिकाणी "मृदुला"ला अग्रस्थान दिले गेले आहे. पण मला वाटतंय ती जागा "रिया" ची आहे.
समांतर सिनेमात असते तसे इथेही एखादे गाणे हवे होते असे उगीचच वाटून गेले एकदोनदा. पण तशी उणीव मात्र भासली नाही.
एक खूप खूप अप्रतिम व मनात घर करून राहणारा चित्रपट सुचवलास अस्मिता
सिनेमा पाहिला. आवडला.
सिनेमा पाहिला. आवडला.
परीक्षण खूप सुंदर केलंय.
आजवर कोणत्या सिनेमात नायिका
आजवर कोणत्या सिनेमात नायिका आकस्मिकपणे काही घडून नायकाच्या मिठीत येते आणि प्रेक्षकांना ते दृश्य गोड न वाटता अवघडल्यासारखे होते असे झालेले आहे? मला वाटते इथेच हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाला आहे.>>>>>
आणि
हे ऐकताक्षणी आपणही स्तंभित होतो. >>> हा परिच्छेद-
>>>> चपखल निरीक्षण. सगळी पोस्टच आवडली. गाणी होती ना, (कविता सोडूनही) ते जेव्हा हैद्राबाद भटकतात तेव्हा एक गाणं आहे.
धन्यवाद अतुल आणि शर्मिला.
Pages