'खास' पुस्तकलेखकांचे अंतरंग

Submitted by कुमार१ on 11 January, 2023 - 22:37

गेल्या साठ वर्षात मराठी साहित्यात अनेक प्रकारची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्रे आणि संकीर्ण अशा साहित्यप्रकारांचा समावेश आहे. प्रकाशित झालेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तके काही वाचकांना आवडली व भावली. त्यातली काही खऱ्या अर्थाने गाजली, काही गाजवली गेली तर अन्य काही दुर्लक्षित राहिली. या कालखंडात अनेक लेखकांनी सातत्याने लेखन केले. त्यापैकी काही लेखक खरोखर वाचकप्रिय झाले. अशा लेखकांच्या काही पुस्तकांनी एक साहित्यिक मानदंड निर्माण केला. अशा काही लेखकांना त्यांच्या एकाच पुस्तकाबद्दल त्यांनी काही लिहावे आणि त्यातून संबंधित पुस्तकाची निर्मितीप्रक्रिया उलगडावी, अशी विनंती समकालीन प्रकाशनातर्फे करण्यात आली होती. त्यानुसार 15 निवडक लेखकांनी प्रत्येकी एक लेख सादर केला. हे सर्व लेख एका मालेच्या स्वरूपात अनुभव मासिकामध्ये क्रमशः प्रसिद्ध झाले होते. त्या लेखांचे संकलन करून या प्रकाशनाने “गोष्ट खास पुस्तकाची” हे संपादित पुस्तक सादर केलेले आहे.

या पुस्तकाचे संपादक सुहास कुलकर्णी आहेत. प्रकाशित पुस्तकांच्या निवडीचा ४५ वर्षांचा कालखंड 1963 (‘कोसला’ - नेमाडे) पासून 2008 ('अशी वेळ'- सानिया) हा घेतलेला आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती 2015 मध्ये प्रकाशित झाली होती. सध्या 2021 मध्ये प्रसिद्ध झालेली दुसरी आवृत्ती बाजारात आहे.

संबंधित मान्यवर लेखकांनी या लेखनासाठी आपले एक पुस्तक निवडताना वेगवेगळे निकष लावलेले दिसतात. कुणी आपले सर्वात पहिले पुस्तक निवडले आहे तर अन्य कोणी त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे परंतु दुर्लक्षित राहिलेले पुस्तक निवडले आहे. ते पुस्तक लिहिताना लेखकाला विषय कसा सुचला, त्याची मनस्थिती कशी होती, पुढे त्या पुस्तकावर प्रशंसा अथवा टीका कशी झाली, इत्यादी मुद्द्यांच्या अनुषंगाने लेखक मोकळेपणाने व्यक्त झालेले आहेत. काहीजणांनी संबंधित पुस्तकाच्या प्रकाशकाशी असलेल्या संबंधाबाबत टीकाटिपणी केली आहे. असे संबंध नेहमीच सौहार्दपूर्ण राहिलेले नाहीत हे त्यातून दिसून येते.

सर्व 15 पुस्तकांची यादी काही इथे देत नाही. ती इथे पाहता येईल: (https://suyashbookgallery.in/books/Book/10267/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B...). या 15 लेखांपैकी मला जे लेख विशेष भावले, फक्त त्याबद्दल मी लिहितोय. एकंदरीत 15 पुस्तकांपैकी मी फक्त तीन पुस्तके मुळातून वाचली होती. त्यामुळे त्यांच्यावरचे लेख मी विशेष आवडीने वाचले हे उघड आहे.

सुरुवात करतो ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या हमो मराठे लिखित 1972 च्या पुस्तकापासून. याचे कथासूत्र थोडक्यात असे:
एक जोडपे आहे. नवरा बायको दोघेही बेकार आहेत आणि आर्थिक विवंचनेत आहेत. नोकरी शोधताहेत परंतु एकंदरीत त्यांचा भ्रमनिरास झालेला आहे. त्या अवस्थेत ती स्त्री गरोदर देखील आहे. कथानायकाच्या हातात पैसा नाही आणि त्यात ही वाढू पाहत असणारी जबाबदारी. त्याने तो भयंकर त्रस्त आहे. आता बायको जर गरोदर नसेल तर तिला नोकरी मिळायची शक्यता अधिक आहे असे त्याला वाटते. त्या तिरीमिरीत तो बायकोचा गर्भपात करून घेतो.

या कथासूत्राशी लेखकाच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटनांचा संबंध आहे.. मुळात हे लेखन दिवाळी अंकात कथा म्हणून प्रसिद्ध झाले होते. . त्याचे मूळ शीर्षक “निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी कावळ्याची कावकाव” असे लांबलचक होते. ते संपादकांनी छोटे केले. कालांतराने साहित्य जगतात त्याचा समावेश कादंबरी प्रकारात होऊ लागला. ही कादंबरी तत्कालीन तरुणांना खूप भावली. या कादंबरीच्या छपाईत लेखकाने विविध प्रयोगही केलेले आहेत. एक म्हणजे त्यात परिस्थितीनुरूप वेगवेगळी चित्रे पण आहेत. तसेच टायपोग्राफी या कलेचा वापर केलेला आहे. कथेच्या नायकापुढे पैसा नसणे ही पहिली समस्या आणि त्यातून आता ‘काय करावं’ असा त्रस्त करणारा प्रश्न. पैसा आणि काय करावं हे दोन शब्दांची एकाखाली एक मोठ्या होत जाणाऱ्या छपाईच्या टायपात पुनरावृत्ती केली आहे. ही लेखनशैली वैशिष्ट्यपूर्ण असूनही त्याकडे म्हणावे असं कोणाचं लक्ष गेलेलं नाही असे हमो म्हणतात.
या पुस्तकाबद्दलची एक विशेष टिपणी त्यांनी केली आहे. कादंबरी प्रकाशित झाली त्यावर्षीच्या उत्कृष्ट साहित्यनिर्मितीचा राज्य सरकारचा पुरस्कार या पुस्तकाला द्यायचाच नाही असा आग्रह मंडळाचे अध्यक्ष असलेले ग दि माडगूळकर यांनी धरला होता.

रंगनाथ पठारे यांनी त्यांच्या 1989 साली प्रसिद्ध झालेल्या चक्रव्यूह कादंबरीची निवड या लेखनासाठी केलेली आहे. सुरुवातीस ते एक गोष्ट स्पष्ट करतात की आतापर्यंत त्यांनी ज्या काही साहित्यकृती दिलेल्या आहेत त्यातली त्यांना कुठलीही बिनमहत्त्वाची वाटत नाही. ते कायम गांभीर्यपूर्वकच लेखन करतात.
लेखक स्वतः पुणे विद्यापीठातून पदार्थविज्ञान शिकलेले आहेत. तिथल्या संशोधन वातावरणावर आधारित हे पुस्तक आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या एका वैज्ञानिकाच्या शोकांतिकेची ही कहाणी आहे.
तसेच संशोधन संस्थेतील व्यवहार, मानवी संबंध आणि हेवेदावे या सगळ्यांची पार्श्वभूमी कादंबरीला आहे. या कादंबरीत चांगले लेखनगुण असूनही ती गाजली नाही असे काही समीक्षकांना वाटते. यावर पठारे यांनी, ते स्वतः गाजण्यासाठी लिहिणारे लेखक नाहीत आणि ते वाचकांचा अनुनय करत नाहीत अशी टिपणी केली आहे.

आशा बगे यांनी त्यांच्या 1999 मध्ये प्रकाशित झालेल्या ऋतूवेगळे या कथासंग्रहाबद्दल लिहीले आहे. वरवर पाहता त्या कथा स्त्रीबद्दल आहेत असं वाचकाला वाटू शकते. परंतु त्या सर्व माणसांच्याच कथा आहेत. नेहमीच्या जगण्यातही जे काही वेगळं सापडून जातं त्याच्यावर या कथा लिहिल्या आहेत. या कथासंग्रहाचे इंग्रजी व फ्रेंच मध्ये अनुवाद झालेले आहेत. हे पाहता, " ही वाट फक्त माझी एकटीचीच नसून इतर कोणाचीही असू शकते" असे लेखिका म्हणते. त्यांच्या लिहिण्याचा जो ऐन बहराचा काळ होता त्याचे मार्मिक वर्णन त्यांनी केले आहे. त्या काळात संपादक व लेखक यांच्यात सुसंवाद होत असे तसेच प्रतिभेला व्यासंगाचीही जोड असायची. अफाट वाचन हे त्या काळाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. जीवनातील कोलाहल आपल्याला शांत करता येत नसला तरी समजून तर घेता येतो आणि मग तो पेलताही येतो, या जाणिवेतून या संग्रहातील कथा लिहिल्या गेल्या आहेत.

अरुण साधू यांनी त्यांची 1999 मध्ये प्रसिद्ध झालेली मुखवटा ही कादंबरी या लेखासाठी निवडली आहे. सुरुवातीसच ते म्हणतात, की त्यांच्या मुंबई दिनांक किंवा सिंहासन या कादंबऱ्यांवर लिहीण्याची संपादकांची अपेक्षा असली तरीसुद्धा त्यांनी तो पर्याय निवडलेला नाही. मुखवटाची चर्चा फारशी न झाल्यामुळे त्यांना ती कादंबरी या लेखनासाठी घ्यावी वाटली. जेव्हा ही कादंबरी प्रसिद्ध झाली तेव्हा संगणकीय क्रांतीचा बऱ्यापैकी प्रसार होऊन तरुणांचे वाचनावरून लक्ष उडू लागले होते याचे प्रत्यंतर त्यांना आल्याचे ते लिहितात. ही कादंबरी एका सोवळ्या ब्राह्मण कुटुंबातील एका परंपरेबद्दल आहे. त्या घराण्याच्या 700 वर्षांपूर्वीच्या आदिपुरुषाचा वार्षिक सोहळा ज्या दिवशी होतो त्या दिवशी त्या आदिपुरुषाच्या मुखवट्याची पूजा केली जाते. परंतु त्या पूजेचा मान असतो सवाष्ण दलित स्त्रीला. ही मध्यवर्ती कल्पना घेऊन त्याच्या सामाजिक अंगाने त्यांनी हे लेखन केले आहे. त्यात मानवी जीवनातील गुंतागुंत, ताणेबाणे इत्यादी सर्व काही विस्ताराने आलेले आहे. या लेखाच्या शेवटी साधूंनी माणसातील अहंभावावर मार्मिक टिप्पणी केली आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास,

" मनुष्यप्राणी कितीही निरिच्छ होऊन निर्वाणाप्रत पोचला तरी प्राण असेपर्यंत त्याच्यातील सूक्ष्म अहंभाव जिवंत असतो".

स्वतःच्याच लेखनाबद्दल स्वतः काही लिहीण्याच्या निमित्ताने तो अहम सुखावल्याचे ते प्रामाणिकपणे कबूल करतात.

पुस्तकात कवितासंग्रहांवर काही लेख आहेत. त्यापैकी ना धों महानोर यांचा रानातल्या कविता हा एक लेख. महानोर यांनी रानातल्या कविता कशा जन्माला आल्या त्याची सांगड वैयक्तिक आयुष्यातील घटनेशी घातली आहे. त्यांना कॉलेजचे शिक्षण चालू असताना घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते अर्धवट सोडून आई वडिलांना शेतात मदत करण्यासाठी यावे लागले. त्यानंतर ते त्यांची शेती आणि त्यांच्या कवितेतच मनसोक्त रमले.

आता आरण्यक या रत्नाकर मतकरी यांच्या 1974 मधील नाटकाबद्दल. महाभारतातील विदुर, कुंती, ध्रुतराष्ट्र आणि गांधारी यांच्या वानप्रस्थाश्रमातील आयुष्यावर बेतलेले हे नाटक आहे. या नाटकाची निवडक नाट्य अभ्यासकांकडून प्रशंसा झाली परंतु समीक्षकांनी मात्र त्यावर खरपूस टीका केली. या नाटकाला त्याचे योग्य ते श्रेय न मिळाल्याचे मतकरी लिहीतात. परंतु त्याहीपेक्षा त्यांना खेद झाला तो आपल्या समीक्षकांच्या परधार्जिण्या वृत्तीचा. एखाद्या मराठी लेखकाने भारतीय परंपरेशी फारकत घेणारी रचना मूळ मराठीतच लिहिली तर ती आपल्याकडे सहन केली जात नाही. तसे काही करायचे असेल तर त्यासाठी आपण परदेशी लेखक असलेले बरे असे ते म्हणतात !
" मुळातच हे नाटक स्वतंत्रपणे मराठीत लिहिल्यावर मराठी साहित्य कसले डोंबलाचे संपन्न होणार?" असा त्रागा करून ते हा लेख संपवतात.

1963 मधील नेमाडेकृत कोसला आणि 1980 मधील अनिल अवचटांची माणसं ! या पुस्तकांवर गेल्या काही दशकांमध्ये भरपूर काही चर्चिले गेले आहे. त्यावर प्रस्तुत लेखात अधिक लिहीत बसत नाही. फक्त दोन मुद्दे:

१. कोसलावरील लेखात नेमाडेंच्या पुढील वाक्याने जरा दचकायला झाले:
"कोसला वाचून आत्महत्या केलेले लोक आहेत तसेच ती कादंबरी वाचल्यामुळे आत्महत्येपासून परावृत्त झालेले लोकही आहेत".

या वाक्याचा उत्तरार्ध समाधान देतो परंतु पूर्वार्ध मात्र विषण्ण करतो.

२. अवचटांच्या "माणसं !" या एका लेखाचे शीर्षकच त्या लेखसंग्रहाला दिले गेले. फक्त त्या शब्दापुढे उद्गारवाचक चिन्ह द्यायचे हे श्रीपु भागवत यांनी सुचवले. त्या एका चिन्हामुळे किती अर्थ ध्वनीत झाला असे अवचट विनयपूर्वक नमूद करतात.

या नववर्षातील माझ्या साहित्यवाचनाची सुरुवात या पुस्तकाने झाली. त्याने सुखद वाचनानंद दिला हे निःसंशय. गेल्या काही वर्षात मला एकाच लेखकाच्या मोठ्या आकाराच्या पुस्तकापेक्षा या प्रकारची पुस्तके अधिक आवडतात. एखाद्या मध्यवर्ती कल्पनेवर अनेक लेखकांनी एकत्रित लिहिलेले असे पुस्तक माझ्या विशेष आवडीचे असते. अशा पुस्तक वाचनात लेखांचा वाचनक्रम आपल्या पसंतीनुसार ठरवता येतो हा पण एक फायदा. या पुस्तकात वाचकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या विविध पुस्तकांची निर्मितीप्रक्रिया मान्यवर लेखकांनी विशद केली आहे. तिच्या वाचनाने मन समृद्ध झाले. . पुस्तकाचे मुखपृष्ठ वेधक आहे. त्याच्या तळातील भागात लिहिलेलं
"पंधरा लेखक, पंधरा पुस्तकं आणि त्यांचं म्हणणं"
हे उपशीर्षक देखील अगदी बोलके आहे.

……………………………………………………………………………………………
गोष्ट खास पुस्तकाची
संपादक : सुहास कुलकर्णी
दु. आ. २०२१

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखकांचं एखादं पुस्तक गाजतं आणि तो लेखक म्हणून वाचकांना माहीत होतो. मग त्यांची इतर काही पुस्तके येतात का याकडे लक्ष लागते. सातत्याने चांगली पुस्तके देणारे लेखक फार नसतात. मग त्या लेखकाने स्वतःच्या आणखी काही पुस्तकांच्या आठवणी सांगितल्या तरी आवडतील असं नाही.

बाकी प्रकल्प म्हणून ठीक आहे.

पुस्तकाची कल्पना आणि तुम्ही करून दिलेला परिचय आवडला. पुस्तक वाचायला हवं.
वरच्या लिंकवर लेखकांची यादी दिसली, पुस्तकांची नाही दिसली. बुकगंगावर मिळाली. https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=50634151385517...

यादीतली फक्त 'कोसला' आणि 'मुखवटा' ही दोनच पुस्तकं आपण वाचली आहेत ही जाणीव टोचली Happy 'माणसं' कदाचित वाचलं असेल पूर्वी.
कोसला वाचून आत्महत्या करावीशी कुणाला का वाटली असेल, असा प्रश्न पडला आणि वाईट वाटलं.
मुखवटा मला स्वतःला खूप नव्हतं आवडलं.
श्री. पु. भागवतांच्या संपादक म्हणून असलेल्या मोठेपणाबद्दल ठिकठिकाणी वाचलं आहे. नुकतीच डॉ. अरुणा ढेरे यांना ऐकण्याची संधी मिळाली. त्यांनीही 'प्रिय जी.ए.' पुस्तकाच्या प्रस्तावनेतल्या एका शब्दाचा श्री.पुं.नी केलेला उल्लेख आणि 'हाच शब्द नक्की तुम्हाला वापरायचा आहे का, याचा विचार करा. विचार करून हाच शब्द कायम ठेवलात तरी हरकत नाही. पण विचार करून सांगा. ' असं सांगितलं होतं ही आठवण सांगितली. (तो शब्द नंतर अरुणा ढेऱ्यांनी बदलला Happy )

धन्यवाद !
सातत्याने चांगली पुस्तके देणारे लेखक फार नसतात.>>> +111

श्री. पु. भागवतांच्या संपादक म्हणून असलेल्या मोठेपणाबद्दल ठिकठिकाणी वाचलं आहे >>> +११ .
ते चांगले मार्गदर्शक संपादक होते.

सातत्याने चांगली पुस्तके देणारे लेखक फार नसतात.>>>
या मुद्द्यावरून विख्यात इंग्लिश लेखक सॉमरसेट मॉम काय म्हणतात ते पहा :

“सर्वच लेखकांच्या लेखनगुणांमध्ये चढ-उतार हा असतोच. बाल्झाक, डोस्टोवस्की, शेक्सपियर या सर्व विश्वमान्य लेखकांनीही थोडेफार खालच्या पातळीवरचं लेखन केलेलच आहे. त्यातून कोणीही मुक्त नाही. पण जास्तीत जास्त वरची पातळी तुम्ही किती वेळा गाठू शकता त्यावर सारं अवलंबून आहे”.

पुस्तकाची कल्पना आणि परिचय आवडला.
त्या १५ पुस्तकांपैकी मी कोसला व माणसं वाचलं आहे.
माणसं खूप सुंदरच. त्यातले एक हमाल म्हणतात, "या शहरातली कुठलीही अशी गोष्ट नाही की जिला हमालांची पाठ लागलेली नाही"

लेख आवडला. शीर्षक वेधक वाटले, त्यामुळे पटकन वाचावे वाटले. Happy

पण जास्तीत जास्त वरची पातळी तुम्ही किती वेळा गाठू शकता त्यावर सारं अवलंबून आहे”.>>>> हे फार आवडले.
कोसला वाचून आत्महत्या करावीशी कुणाला का वाटली असेल, असा प्रश्न पडला आणि वाईट वाटलं. +१
यापेक्षाही मुरत जाणारी खिन्नता व विमनस्क मनस्थिती जी ए (पिंगळावेळ, काजळमाया ) वाचून होतेे. ऐहिक सुखाच्या प्रलोभनांपेक्षा अंगावर येणारे प्रखर वास्तव लिहिणे हे लेखकाची कारकीर्द सुद्धा पणाला लावते. बहुतांश वाचक हे वेगळ्या आयुष्याचे वेगळे सत्य पेलू शकत नाहीत.

पण ही "चांगली पातळी" ठरवणार कशी, लेखक आपल्या निर्मितीबाबत व वाचक आपल्या आवडत्या लेखकाबाबत नेहमीच पूर्वग्रहदूषित असण्याची शक्यता असते. त्यापेक्षा लेखकांनी वाचकांच्या ताब्यात राहू नये व वाचकांनी लेखकाला आपल्या चौकटीत बांधायला जाऊ नये, तरच समाज म्हणून या पातळीला आपण उंच नेऊ शकू.

धन्यवाद !
१. या शहरातली कुठलीही अशी गोष्ट नाही की जिला हमालांची पाठ लागलेली नाही"
>>> होय, हलवून टाकते ते वाक्य.
मिरची कामगारांच्या बद्दलही असे हलवून टाकणारे वाचले होते. ..
..
२.
लेखक आपल्या निर्मितीबाबत व वाचक आपल्या आवडत्या लेखकाबाबत नेहमीच पूर्वग्रहदूषित असण्याची शक्यता असते.
>>> +११ . चांगला मुद्दा.

ते स्वतः गाजण्यासाठी लिहिणारे लेखक नाहीत आणि ते वाचकांचा अनुनय करत नाहीत अशी टिपणी केली आहे. >> ज्जे बात. याला म्हणीन मी सच्चा लेखक.

लेख आणि पुस्तक परिचय आवडला. मूळ पुस्तके वाचायचा नक्की प्रयत्न करीन.

सर्वांना धन्यवाद !
या 15 पुस्तकांची साहित्य प्रकारानुसार वर्गवारी अशी आहे :
सात कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, तीन कवितासंग्रह आणि प्रत्येकी एक नाटक, चरित्रात्मक आणि संकीर्ण पुस्तक.

ते स्वतः गाजण्यासाठी लिहिणारे लेखक नाहीत आणि ते वाचकांचा अनुनय करत नाहीत अशी टिपणी केली आहे. >> असे जे म्हणतात ते लेखन पब्लिश का करतात. जेन्युइन प्रश्न आहे.

यानिमित्ताने मी एक मूलभूत प्रश्न उपस्थित करतो.
मुळात लेखक कुठल्याही सार्वजनिक माध्यमात का लिहितो ?

माझे उत्तर : प्रसिद्धी आणि प्रसिद्धीसाठीच ! स्वांत सुखाय वगैरे गोष्टींवर माझा विश्वास नाही; त्या फक्त म्हणण्याच्या गोष्टी झाल्या.
आता काही मान्यवर काय म्हणतात ते पाहू :

व. पु. काळे :
प्रसिद्धीपराङमुखतेची प्रसिद्धी करण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रसिद्धी केलेली काय वाईट ?

..
२००८ सालचे नोबेल विजेते फ्रेंच लेखक Jean Le Clezio :
वाचले जावे म्हणून आम्ही लिहितो, प्रतिसाद मिळावा म्हणून आम्ही लिहितो.

मुळात लेखक कुठल्याही सार्वजनिक माध्यमात का लिहितो ? >>
खाज आहे म्हणून. अनेक लेखक, उदा. ब्लॉगर किंवा सोशल मीडियावर लिहिणारे लिहितात, अगदी प्रसिद्धी किंवा पैसे मिळाले नाही तरीही.

प्रसिद्धी, पैसा हे हवे असतात, नाही असे नाही. पण मूळ उद्देश तो नाही. स्वतः ची कंड शमवणे हा आहे. (याचे कारण हे ही असू शकते की लेखन करणे बऱ्याचदा फुकट असते, त्याला पैसे पडत नाहीत).

माझ्या मते, जे हे स्पष्टपणे मान्य करतात ते जेन्युईन लेखक असतात. त्याच्यानंतर आम्ही प्रसिद्धी, पैसे मिळावे म्हणून लिहितो, असे मान्य करणारे. सर्वात शेवटी, आम्ही वाचकांसाठी लिहितो असे म्हणणारे, ते पक्के खोटारडे आणि भामटे.

>>> ना धों महानोर यांचा रानातल्या कविता हा एक लेख.>>
महानोरांनी पाणी आणि पर्यावरण या विषयावर पण चांगले लेखन केले आहे. त्यांच्या काही पावसाळी कविता पूर्वी वाचल्या होत्या. छान आहेत.

२००८ सालचे नोबेल विजेते फ्रेंच लेखक Jean Le Clezio :
वाचले जावे म्हणून आम्ही लिहितो, प्रतिसाद मिळावा म्हणून आम्ही लिहितो. >> हालाखीच्या परिस्थितीत जगत असूनही आणि त्याकाळी त्याच्या चित्रांना कोणीही फारसे विचारत नसूनही वॅन गॉघ २००० पेक्शा जास्ती चित्रे काढून गेला.
लिहिणे, चितारणे आणि त्यात स्वांतसुखाय अशी विचारांची व भावनांची स्पष्टता व सुसुत्रता आणणे आणि ह्या सोपस्कारातून प्रामुख्याने समाधान प्राप्त करणे ही दुर्दम्य ईच्छा सुद्धा असू शकते ना.

सर्वांना धन्यवाद !
चांगले मुद्दे येत आहेत. सर्वांच्या मतांचे स्वागत आहे.

मला असे वाटते की..
एखादी कला स्वांत सुखाय एवढ्याच उद्देशाने केली असेल तर ती खाजगीपणे जपली जाईल. प्राचीन काळातील शिल्पकार कदाचित त्या हेतूने करत असावेत.

सध्याच्या काळाबद्दल आणि लेखनाबद्दल बोलायचं झाल्यास, निव्वळ स्वांत सुखाय लिहिणारा माणूस स्वतःपुरती दैनंदिन लिहून शांत बसू शकेल.
सार्वजनिक माध्यमात लेखन किंवा कला सादर करण्यामागे प्रसिद्धी हा मुख्य हेतू असावा. ( + पैसा )

एखादी कला स्वांत सुखाय एवढ्याच उद्देशाने केली असेल तर ती खाजगीपणे जपली जाईल. प्राचीन काळातील शिल्पकार कदाचित त्या हेतूने करत असावेत. >> शिल्पकारांनी मंदिरे, गुहा, स्तूप, स्तंभ, लेणी अशा सार्वजनिक वास्तूही आपल्या कलेच्य प्रदर्शनासाठी बनवल्याच ना.
प्रत्येक कलेला राजाश्रय आणि त्यातून मिळणारे मानधन नसावे आणि ती कलेच्या प्रदर्शनामागची प्रेरणा नसावी असेही काही बुद्ध लेण्यांमधून दिसून येते.

सार्वजनिक माध्यमात लेखन किंवा कला सादर करण्यामागे प्रसिद्धी हा मुख्य हेतू असावा. ( + पैसा ) >>
नाही, आमचे सर प्रसिद्धीसाठी लेखन करत नाहीत. पैशासाठीसुद्धा नाही.

मूळ लेख लांबलचक होऊ नये म्हणून मी त्यातील काही निवडक लेखांबद्दलच लिहिले.
पुस्तकातील अन्य लेखनातले काही वेचक-वेधक:

१. लक्ष्मण माने(उपरा) :
त्यांनी हे आत्मकथनात्मक पुस्तक अनिल अवचट यांच्या प्रोत्साहनाने व आग्रहामुळे लिहिले. पुस्तक गाजल्यानंतर मानेंवर अशी जाहीर टीका झाली, की “एक कैकाडी इतकं चांगलं पुस्तक कसं लिहू शकतो आणि त्याला एवढे यश कसं काय मिळू शकतं? त्याला ते नक्कीच अनिल अवचट यांनी लिहून दिले असेल”.
अर्थात दोन्ही लेखकांनी त्याचे खंडन केले.

२. ‘पांगिरा’बद्दल विश्वास पाटील :
“या पुस्तकावरून याच नावाचा मराठी चित्रपट तयार झाला आहे. तो मूळ आशयापासून दूर गेलेला आहे. चित्रपट आणि नाटक ही दोन्ही माध्यमे बरीच परावलंबी असतात. कादंबरी ही एका आईच्या मांडीवर सानाची थोर होते. मात्र, चित्रपट उद्योगात बाळाला अनेक आयांच्या आणि दायांच्याही अंगाखांद्यावरून प्रवास करावा लागतो”.

प्रसिद्धीपराङमुखतेची प्रसिद्धी करण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रसिद्धी केलेली काय वाईट ?>> आवडलं..
नेहमीप्रमाणे छान लेख, डॉक्टर.

धन्यवाद !
..
३.
भारत सासणे यांनी त्यांच्या ‘दोन मित्र’ या कादंबरीवर मनोगत व्यक्त केले आहे. या कादंबरीत एक उच्चवर्णीय तर दुसरा बहुजन असे मित्र आहेत. त्यांच्या अनुषंगाने सामाजिक पर्यावरणावर आधारित ही कादंबरी आहे.

तिच्यात उपहास व टीका आहे, परंतु ती त्यातल्या कुठल्याच व्यक्तिरेखेची बाजू घेत नाही. या कादंबरीची फार प्रशंसा झाली नाही किंवा तिच्यावर टीकाही झाली नाही. संयत प्रकारचे लेखन केले असता असंच होतं असे लेखकाने म्हटले आहे.

४.
या पुस्तकात मधु मंगेश कर्णिक यांनी त्यांच्या 2001 मध्ये प्रसिद्ध झालेल्या संधिकाल या कादंबरीबद्दल विस्ताराने लिहिले आहे. ही कादंबरी म्हणजे विसाव्या शतकातील महाराष्ट्रातील पांढरपेशा, बुद्धिजीवी मराठी मध्यमवर्गाची विस्तृत जीवनकहाणी. ४५० पानांची ही मोठी कादंबरी.

त्या काळातील विविध स्थित्यंतरांचा मध्यमवर्गावर झालेला परिणाम हा तिचा गाभा आहे. तत्कालीन अनेक राजकीय आणि सामाजिक व्यक्तींची खरी नावे त्या कादंबरीत समाविष्ट आहेत.

यानंतरच्या कालखंडासंबंधी प्राप्तकाल नावाची कादंबरी लिहिण्याचा मानस त्यांनी वयाच्या 82 व्या वर्षी व्यक्त केलेला होता. त्या वयात नवी कादंबरी लिहीण्याची ऊर्जा मिळावी असे त्यांना वाटते.

आज त्यांचे वय 91 आहे. ते खरंच प्राप्तकाल लिहीत असतील काय याचे कुतूहल वाटते.

दीर्घायुष्य लाभणे आणि त्या वयातही लेखन करणे यावरून श्री ना पेंडसे यांची आठवण झाली. विकिपेडियानुसार
१९ मार्च २००७ला त्यांची लोकमान्य टिळकांवरची ‘हाक आभाळाची’ ही कादंबरी प्रकाशित झाली आणि २3 मार्च २००७ रोजी त्यांचे निधन झाले.
(वय ९४)

ओ!
भरत धन्यवाद माहितीसाठी.
श्री ना पेंडसे >>छान

>>>>>>>>१९ मार्च २००७ला त्यांची लोकमान्य टिळकांवरची ‘हाक आभाळाची’ ही कादंबरी प्रकाशित झाली आणि २3 मार्च २००७ रोजी त्यांचे निधन झाले.

बाप रे!!! कादंबरीचे नाव व घटीत हा योगायोग भेदक आहे.

छान परिचय.

समकालीनच्या संपादक-प्रकाशकांना लिंक पाठवली.

Pages