पळून गेलेले शरीर

Submitted by केशवकूल on 15 March, 2022 - 10:13

पी रामराव.
जगप्रसिद्ध प्रायव्हेट डिटेक्टिव. (एफ आर एस डी)
बाय अपॉइटमेंट ओन्ली.
ही दरवाज्यावरील पाटी वाचून टरकून जायची मुळीच गरज नाही.
ह्या क्षणी रामराव ऑफिसमध्ये टेबलावर पाय टाकून आपली नखे साफ करण्यात गुंतले होते. बेकार डिटेक्टिव दुसरे काय करणार? ‘ह्या क्षणी’ अस म्हणण्यातही काही अर्थ नव्हता. रामराव द ग्रेट गेले दोन अडीच तीन महिने दररोज नखे साफ करत होते. डोक्यात तुंबलेल्या बिलांचा विचार चालू होता. बँक बॅलंस अॅबसोल्युट मिनिमम लेवेलला आला होता. बँक आता फाईन लावणार अशी परिस्थिती झाली होती. दुष्काळात तेरावा महिना. दोन महिन्यांचे ऑफिसचे भाडे तुंबले होते. सकाळचा –दुपारचा चहा देणाऱ्या भटाच्या सहनशक्तीलाही मर्यादा होती.
केव्हा नवीन केस हातात येणार? त्यांना नेहामी वाटायचे हा आत्ता फोन वाजेल,
“हॅलो डिटेक्टिव रामराव बोलता आहेत काय? मी रत्नाकर शाह बोलतो आहे. होय तोच तो हिऱ्याच्या पेढीचा मालक. माझ्या मुलाच्या हालचालींवर नजर ठेवायची आहे. आपण हे काम घेतले तर माझ्यावर अनंत उपकार होतील. मला माहित आहे की आपण खूप बिझी असणार. प्लीज माझ्यासाठी. ओहो थॅंक्यू सो मच. चेक आजच घेऊन जा ऑफिसमधून.”
किंवा
कोणी सुंदर ललना ऑफिसचा दरवाजा धाडकन उघडून आत येईल आणि धपापलेल्या उराने म्हणेल, “रामराव प्लीज मला वाचवा. माझ्या पाठीमागे खतरनाक गुंडे माझी अब्रू लुटण्यासाठी लागले आहेत.”
किंवा
एखादं धमकी पत्र. “साल्या, लई माजलास काय रे तू? जीव सस्ता झालाय कारे? पुण्याच्या बाहेर जाउन दडी मार नाहीतर तुझी खैर नाही आणि आमच्या भानगडीत पडायचे नाही.काय समजलास ना?”
नाही. असे फोन, अश्या ललना असे खलिते फक्त बाबुराव अर्नाळकरांच्या कथेत असतात. लहानपणी त्या कथा वाचून आज रामराव डिटेक्टिव झाले होते. त्याचे ते आदर्श आता काय करत असतील बरे? झुंजार विजये बरोबर कांदापोहे खात बसला असेल. काळापहाड नवीन रत्नभांडार कसे हस्तगत करायचे ह्याचा विचार करत असेल. धनंजय छोटूला गुन्हेगारीशास्त्राचे धडे देत असतील, आणि मी?
मोबाईलच्या घंटीने रामारावांचे दिवास्वप्न भंग झाली.
व्वा! आली नवी केस! किती दिवस वाट पहायला लावली. देर आयी, दुरुस्त आयी. इट इज नेव्हर टू लेट!! रामरावांनी उत्साहाने फोन उचलला. फोन बिल्डींग मॅनेजरचा होता.
“मिस्टर रामराव, मी शर्मा बोलतो आहे.आपल्या ऑफिसचे तीन महिन्यांचे भाडे द्यायचे राहीलं आहे. आपण हे भाडे व्याजासह ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत चुकते केले नाही तर...”
“देणार, अगदी देणार. माझी एक पेंडिंग इनवॉइस येत्या आठवड्यात क्लिअर होते आहे. ती झाली कि पहिली गोष्ट म्हणजे ऑफिसचे भाडे.” रामराव घाईघाईने बोलत होते.
“ही थाप आपण एक्झक्टली किती वेळा मारणार आहात? कुछ नया सोचो सरजी.”
फोन बंद झाला. शर्मा बोलत होता ते खरच होतं.
फोन पुन्हा वाजला. आता कोण? दूध वाला असणार.
रामरावांनी फोन बघितला. कोणीतरी अनोळखी व्यक्ती फोन करत होती. नवीन केस? कसे शक्य आहे. इतके दिवस आली नाही. आज कशी येईल? उगाच खोटी आशा बाळगायची आणि तोंडघशी पडायचे. का कोणी दूरचे आतोबा खचले पण जाताजाता मला लाखोंकी जायदाद देऊन गेले. त्यांच्या वकिलाचा तर फोन नसेल? काही सांगता येत नाही. रामरावांनी नव्या उत्साहाने फोन उचलला आणि आतोबांच्या मृत्युची सुखद बातमी ऐकण्यासाठी कान टवकारले. त्यांचे हृदयाचे ठोके वाढले. हाताला घाम फुटला होता. तोंडाला कोरड पडली होती. केव्हा एकदा ती बातमी ऐकेन असे त्यांना झाले होते.
“मी बीएसेनेल मधून बोलत आहे. आपले मार्च महिन्याचे बिल 448रुपये अजून भरलेले नाही. जर हे बिल आपण त्वरित भरले नाही तर आपली सेवा खंडित होण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. जर आपण हे बिल आधीच भरले असेल तर धन्यवाद. बीएसेनेल आता आपणासाठी आणत आहेत करमणुकीचा अमोल खजिना.....”
त्याने वैतागून फोन बंद केला. हाही कॉल नुरा निघाला॰
पुन्हा एकदा फोनची घंटी वाजली.
एक मिनिटभर ते फोनकडे बघत राहिले. आपलाच फोन वाजतो आहे की बाजूच्या ऑफिसामधला. त्याना संशय वाटला. रामरावांनी चक्क फोनला हात लावुन बघितले. खात्री करून घेतली. मगच फोन उचलला. फोन उचलताना त्यांनी आपल्या मनाची तयारी केली होती. इलेक्ट्रिकवाला राहिला होता. त्याचाच फोन असणार.
“हलो, पी रामराव डिटेक्टीव्ह एजन्सीमध्ये आपले स्वागत आहे. चीफ डिटेक्टीव्ह रामराव बोलतो आहे. मला सांगा मी आपली काय मदत करू शकतो?”
क्षणभर दुसऱ्या बाजूला स्टिरिओफ़ोनिक शांतता. रामराव अगतिक. शेवटी दुसऱ्या बाजुवाल्याला कंठ फुटला.
“आपण हरवलेल्या गोष्टी शोधून देता काय?”
“अर्थात! ती तर आमची खासियत आहे. मागे एका कविचे हृदय हरवले होते. त्यामुळे तो बिचारा सैर भैर झाला होता. रात्रंदिवस कविता पाडत होता. त्याच्या आईबाबांनी ती केस आमच्यावर सोपवली. आम्ही त्याच्या कवितांचे रसग्रहण आणि विश्लेषण केले तेव्हा आम्हाला असे दिसले कि त्याचे हृदय हरवले नव्हते तर त्यानेच ते कुणाला तरी दिले होते, नक्की कोणाला ते त्याला आठवत नव्हते. त्याच्या हृदय चोराला आम्ही शोधून काढले आणि त्या दोघांचे गोड मीलन घडवून आणले. आता बोला. ते सोडून द्या, तुमचे काय हरवले आहे?”
“माझे शरीर,” दुसऱ्या बाज्ने आवाज आला, “माझी बॉडी हरवली आहे.”
“वा छानच की. पण तुम्ही काही काळजी करू नका.” रामराव बोलून गेले. आपण काय बोललो ह्याची जाणीव झाल्यावर ते ओरडले, “ऑ. काय बोलताव काय तुम्ही?”
“माझी बॉडी. शरीर. विचार केल्यावर मला वाटायला लागले आहे कि ते मुद्दाम पळून गेले आहे.”
रामरावांनी खरं तर तिथल्या तिथेच फोन बंद करायला पाहिजे होता. पण काय असतं ना की ऐन वेळी तुमचे चाक जमिनीत रुतत जाते.
“अबे ओ सा...” रामरावांनी स्वतःला आवर घातला, “नाव काय रे तुझं?”
“माझं नाव सराफ, अनिल सराफ.”
अनिल सराफ! बापाने कमावलेल्या गडगंज संपत्तीचा एकमेव वारस. अनिल सराफ! शहारातील सर्वात श्रीमंत! बापाने मिळवलेला पैसा कसा उडवायचा ह्याची घोर चिंता पडलेला तरुण.
रामरावांनी आवाजात खोटे खोटे मार्दव आणले. “अनिल सराफ! तर तू शहरातला एकमेव कोट्याधीश हं.”
“हो. तोच मी आणि माझे शरीर हरवले आहे.”
“वा, छान, तू असं कर, कधीतरी वेळ मिळाला की माझ्या ऑफिसमध्ये ये. मग आपण स्वस्थ चित्ताने बसून बोलू.” असं बोलून रामरावांनी फोन आदळला.
रामरावांची आता मात्र सटकली. डोके भणभणायला लागले. कोण हा नालायक उपद्व्यापी माणूस? उगाच कुणाची खेचायची म्हणून फोन करतात? दुसऱ्याला मनःस्ताप देण्यात ह्या असल्या गटारी वृत्तीच्या लोकांना काय सुख मिळते? असतात असे लोक. जगात संत महात्म्यांपासून बलात्कारी लोकांपर्यंत निरनिराळ्या प्रकारचे लोक ठासून भरलेले आहेत.
चढलेले डोके शांत व्हायला चहाच पाहिजे. रामरावांनी खिसे चाचपले. खिशात होते थोडे पैसे. चहा आणि एक पॅकेट पार्ले-G साठी. पैसे जपून वापरायला पाहिजेत. नाहीतर कुणाकडून उधार मागायची वेळ येईल. रामरावांनी ऑफिसचा दरवाजा ओढून घेतला. कुलूप लावायची इच्छा नव्हती. इकडे चोर तरी कशाला येईल. चोरी करण्यासारखे काही नव्हतंच.
लिफ्ट मधून बाहेर पडले तेव्हा रामरावांच्या डोक्यात असुरी विचार धुमाकूळ घालत होते. त्यावेळी अनिल सराफच्या नावाने फोन करणारा मिळाला असता तर त्याची काही खैर नव्हती. चहा आणि बिस्किटे खाल्ल्यावर डोके जरा शांत झाले. समोरच्या इलेक्ट्रोनिक्सच्या शोरूम मधून चक्कर टाकली. त्याचा एसी फुल चालला होता. ( रामरावांच्या ऑफिसमधला एसी गेले तीन महिने बंद होता) तबियत गार गार झाल्यावर रामराव ऑफिसात परतले. दरवाजा उघडून आत आले.
“हलो, रामराव नाही का आपण? मी अनिल सराफ. ग्लॅड टू मीट यू, सर. इथे तुमच्या समोर बसलो आहे. तुम्ही मला बोलावले होते म्हणून आलो. केव्हाची वाट पहात बसलो आहे.”
रामरावांना चारशे चाळीस व्होल्टचा झटका बसला जणू. ऑफिसमध्ये चिटपाखरू देखील नव्हते. आवाज मात्र स्पष्ट येत होता. त्यांनी टेबलाच्या खाली बघितले. छोटा फ्रीज होता तो उघडून बघितला. गोद्रेजचे कपाट उघडून पाहिले. ह्या शिवाय लपायला दुसऱ्या जागा नव्हत्या.
एकदम डोक्यात ट्यूब पेटली. त्यांनी हळूच टेबलाचा खण उघडला. आतून पिस्तुल काढले. दबत्या पावलांनी बाथरूम कडे चालत गेले. उजव्या हातात पिस्तुल तोलत डाव्या हाताने बाथरूमचा दरवाजा उघडला आणि भारी आवाजात ओरडले. “हॅंड्स अप. माझ्या हातात पिस्तुल आहे. हात वर करून बऱ्या बोलाने बाहेर ये.”
नेहमीचा उंदीरही पण आत नव्हता. मग बाहेर कोण येणार? खात्री करून घेण्यासाठी कमोड उघडून बघितला. कमोडचा फ्लश एकदा दोनदा चालवला. आत कोणी लपला असेल तर जाईल गटारात. जाइना का. एक निश्वास टाकून आपल्या खुर्चीवर येऊन बसले.
“तुमचा गोंधळ झाला असेल नाही का. मला पाहून आय मीन न पाहून?”
“अरे पण तू कोण आहेस आणि समोर का येत नाहीयेस?”
“मीच तो अनिल सराफ. आपण तासापूर्वीच बोललो होतो आठवले? तुम्हीच मला तुमच्या ऑफिसमध्ये यायचे निमंत्रण दिले होते. म्हणून मी आलो. मी पुढे का येत नाहीये? तोच तर माझा प्रॉब्लेम आहे. माझे शरीर मला सोडून पळून गेले आहे. प्लीज तेव्हढे शोधून द्या ना.”
“हे पहा, हा विनोदाचा क्रूर प्रकार आहे. हो ना? किंवा नाहीतर मी स्वप्नात आहे. ह्यापैकी एक खरं असायला पाहिजे. हे नाटक कृपाया थांबवा. गेले दोन महिने माझा धंदा झालेला नाही. भोवानीच्या टायमाला तुम्ही उगीच वांधा करू नका. ह्याक्षणी कोणी गिर्हाईक आले तर ते हा प्रकार पाहून बिथरून जाईल. मला वेड लागले आहे असं वाटून पुन्हा माझ्या ऑफिसात पाउल टाकणार नाही. मार्केट मध्ये माझी उरली सुरली अब्रू जाईल. तेव्हा तुम्ही जे कोणी असाल –सोनार, सराफ किंवा जव्हेरी- मला छळू नका. तुम्ही गेला नाहीत तर मला नाईलाजाने धक्के मारून तुम्हाला हाकलावे लागेल.”
“धक्के मारून? कुठे धक्के मारणार? माझी बॉडी मला वाऱ्यावर सोडून पळून गेली आहे. आणि ती शोधून काढायच्या ऐवजी तुम्ही मला धक्के मारायच्या बाता करता आहात. हाच का तुमचा प्रोफेशनॅलीझम?”
“ओ मिस्टर, ही जादू तुम्ही कशी केली. तेव्हढ मला सांगा आणि इथून फुटा.”
“मिस्टर तुमचं मन थाऱ्यावर नाही. म्हणून तुमची भाषा अशी असुसंस्कृत झाली आहे. म्हणे फुटा! ही काय बोलायची भाषा झाली. म्हणे ही जादू तुम्ही कशी केली? तुम्ही स्वतःला हुशार डिटेक्टीव्ह समजता ना. पण हुशारी म्हणजे फुशारकी नव्हे की मला जगातल्या प्रत्येक गोष्टीचे सम्यक ज्ञान आहे असं समजणे. स्वामी समर्थ रामदास स्वामींनी मूर्खाची लक्षणे सांगितली आहे त्यात....”
“ठीक आहे ठीक आहे. आता मी आपल्या कडून शिकतो. सांगा काय सांगायचे आहे ते.”
“ह्या जगात आपल्याला जितक्या गोष्टींचे ज्ञान आहे त्यापेक्षा जास्त गोष्टींचे अज्ञान आहे. मी माझे शरीर गमावू शकत नाही असे कोणी छातीठोकपणे सांगू शकेल काय? तुम्ही माझ्याशी बोलत आहात—एका शरीर विहीन आवाजाशी बोलत-- आहात हे तुम्हाला मान्य आहे आणि तुम्हाला वेड लागलेले नाही. मग माझे शरीर हरवले आहे हे मान्य करायला तुम्हाला काय अडचण आहे?”
रामराव आता मात्र पुरते गोंधळून गेले होते, “मला डिस्टर्ब करू नका. मी विचार करतो आहे.”
थोड्या वेळाने आवाज पुन्हा बोलू लागला.
“तुमचा विचार करून झाला असेल तर माझे ऐका, हे काम तुम्ही घेणार असाल तर मी तुम्हाला पेशगी म्हणून पन्नास हजार रुपये देईन. उरलेले पन्नास हजार काम झाल्यावर.”
पन्नास हजार! रामरावांचे चित्त थाऱ्यावर नव्हते. त्यामुळे त्यांना त्याचा अर्थ समजला नसावा. जेव्हा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला तेव्हा केवळ खुर्चीचा आधार असल्यामुळे ते कोलमडून जमिनीवर पडले नाहीत. पन्नास हजार! क्षणभर त्यांची तबियत गार्डन गार्डन झाली. झूठी ही सही.
“तुमचा डेस्कटॉप वापरू का? आताच पैसे तुमच्या खात्यात जमा करतो.”
रामराव हो ना म्हणायच्या आधीच संगणकाच्या पडद्यावर अक्षरं उमटत गेली.
“तुमच्या खात्याचा तपशील इथे तुम्हीच भरा. ही एवढी रक्कम पुरेशी आहे ना?”
रामरावांना स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. आवाजात जेव्हढा निर्विकारपणा निरीच्छ्पणा आणता येईल तेव्हढा आणून ते म्हणाले, “हम्म, ठीक आहे. काम चालू करायला पुरेशी आहे.”
जणू काय केवळ पन्नास हजारावर काम सुरु करायचे म्हणजे मी आपल्यावर उपकार करतो आहे असा आव आणला.
“ह,आता तुमची केस हिस्टरी तुम्हीच तुमच्या शब्दात सांगा. एक मिनिट थांबा. माझी सेक्रेटरी आज रजेवर आहे. बिचारीची आई इस्पितळात आहे.”
पी.रामराव ह्यांची ही आवडती थाप होती. क्लाएन्टवर छाप मारण्यासाठी एखादी सेक्रेटरी असावी अशी त्यांची कित्येक दिवसांपासूनची इच्छा होती. पण तिचा भरघोस पगार महिन्याच्या पहिल्या तारखेला तिच्या खात्यात जमा करता येईल असा धंदा चालायला पाहिजे ना. असो. पी. रामराव भविष्यात कधीकाळी सुंदर, सेक्सी, हुशार आणि त्यांच्यावर मनोमन प्रेम करणारी सेक्रेटरी –डल्लाश्री- नोकरीवर ठेवू शकतील अशी शुभेच्छा त्यांना देऊया. सध्यातरी तिला रजेवर पाठवण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
“अरेरे कुठल्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे? मला सांगा. मी एक फोन .....”
“आपल्या सदिच्छे बद्दल मी आपला आभारी आहे. मी तिच्या आईची काळजी घेतो आहेच.”
पी. रामरावांना हा विषय वाढवण्यात रस नव्हता. “आपण मला आपल्या केसबद्दल सांगत होता, नाही का?”
“ओह येस. सर, आपल्याला माझी थोडीतरी माहिती असेलच. इथल्या वर्तमानपत्रात आणि मासिकांत माझ्याबद्दल यथेच्च बदनामीकारक मजकूर छापला गेला आहे. मी विक्षिप्त, तऱ्हेवाईक, गर्भश्रीमंत, एकल्ली तरुण आहे असा एकंदरीत सूर!”
“तुम्हाला एककल्ली म्हणायचे आहे ना?”
"बरोबर आहे," आवाज सहमत झाला. "तथापि, जेव्हापासून माझे वडील गेले- देव त्यांच्या आत्म्यास शांति देवो- तेव्हापासून ‘पेज थ्रीने’ माझा पिच्छा पुरवला. पिताश्री माझ्यासाठी जाताना बराच पैसा अडका, शेअर्स, भरभराटीस आलेला धंदा, फार्म हाउस शिवाय केपी मध्ये दोनचार बंगले सोडून गेले. पेपरवाल्यांना गॉसिप साठी रेडीमेड बकरा मिळाला. त्यामुळे माझ्यासाठी कोणतेही खाजगी जीवन जगणे खूप कठीण होते आणि ते टाळणे तितकेच कठीण होते.”
रामरावांना सराफचा हेवा वाटला.
“खर आहे.” रामरावांनी खोटी खोटी सहानुभूती दर्शवली.
“माझा पिंड नेहमीच शैक्षणिक आणि अभ्यासू होता. माणसाला जितके ज्ञान मिळवता येणे शक्य आहे तितके ज्ञान मिळवावे अशी माझी तीव्र इच्छा होती. मी शाळा, कॉलेजमध्ये असताना सुद्धा माझे वाचन, अभ्यास, प्रयोग चालू होतेच. माझ्या
वडिलांचा अकाली मृत्यू झाल्यावर मी सैरभर झालो. ह्या आयुष्याला काही अर्थ आहे का? मी सत्याच्या शोधात योग, कन्फ्यूशियसची शिकवण, अद्वैत, बुद्धीझम आणि इतर अनेक तत्वज्ञानांचा अभ्यास केला."
“गौतम बुद्ध आणि महात्मा गांधीजी ह्याच्या शिकवणुकीचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला.”
“म्हणजे शेळीचे दूध, मनःशुद्धीसाठी उपास तापास.....” रामराव मधेच बोलले.
“हो हो तेच ते. ब्रह्मचर्य हेच जीवन, वीर्यनाश म्हणजे मरण! मी जास्त काही बोलत नाही. पण अविनाशी सत्याच्या शोधात मी सुखलोलुप जीवनशैलीचा त्याग केला. दारू, बिअर एवढेच काय पण चहा कॉफी पिणे देखील बंद केले. चरस, गांजा, अफू, सिगरेट, मावा सर्व काही बंद झाले. फाईव स्टार हॉटेल मधल्या पार्ट्या बंद. शेळीचे दुध,शेंगादाणे आणि गूळ ,उकडलेल्या पालेभाज्या कंद मुळे यांचा खुराक सुरु केला. रात्री दहा वाजता दिवे बंद करून झोपायचे, सकाळी -सॉरी- पहाटे चार वाजता उठून ध्यान धारणा!”
“कमाल आहे तुमच्या निग्रहाची.” खात्यात जमा झालेले पन्नास हजार बोलत होते.
“सात दिवस व्यवस्थित गेले. आठव्या दिवशी एव्हढी गाढ समाधि लागली की माझे शरीर केव्हा पळून गेले ते मला समजलेच नाही. समाधी उतरल्यावर बघतो तर काय? माझे शरीर माझ्यावर रागावून माझ्या मनाचा, माझ्या आत्म्याचा त्याग करून पळून गेले होते. ते माझ्यावर खुन्नस म्हणून पळून गेले होते. जाताना माझ्यासाठी एक नोट सोडून गेले.
रामराव खुर्चीतून खाली पडणार होते पण त्यांनी स्वतःला सावरले.

(पुढील भाग लवकरच)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आक्रस्ताळेपणाला उत्तर नसते. ज्यावेळी कांगावा बंद होईल त्यावेळी पुढच्या कथेवर प्रतिसाद देईन. तोपर्यंत माझ्याकडून तुमच्या कथेला प्रतिसाद बंद.

हि कथाही ईथे आली का? Happy

जेवढे चिडाल तेवढे लोकं चिडवतील.. हुमायून नेचर आहे ते, जमानेका दस्तूर आहे ते..

असो, कुठेही लिहा पण पुर्ण करा. लवकरात लवकर आणि एकाच भागात. मी वाचायला बालसाहित्य विभागात सामील झालोय Happy