ज्ञानेश्वर माउलींच्या जीवनावरील कादंबरी वाचन श्री पद्माकर गोवईकर यांनी "मुंगी उडाली आकाशी " या ध्वनिफितीत अतिशय सुंदर केले होते. मी ते सतरा अठरा वर्ष्याचा असताना ऐकले होते. आणि वारंवार ऐकत होतो. त्यामध्ये एक प्रसंग होता की आळंदीच्या ब्राम्हणांच्या छळाला कंटाळून विठ्ठल पंत मुलांना घेऊन ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा करायला त्य्रंबकेश्वर येथे जातात व ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा करतात. तेथे असा उल्लेख केलेला ऐकला होता कि ब्रम्हगिरिचि प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळते. कारण ब्रम्हगिरीचा पर्वत म्हणजे साक्षात शंकर आहे. असा पुराणात उल्लेख आहे.
तेव्हापासून मनात होते कि आपण सुद्धा एक तरी प्रदक्षिणा करावी पण खूप वर्षे योगच आला नाही. परंतु या वर्षी भगवान शंकराच्या कृपेने योग जुळून आला. श्रावण अनायासे चालूच होता. आणि जायची तारीख ठरविली ३१ आणि १ बरोबर कोणी मिळते का म्हणून बऱ्याच मित्रांना विचारले पण सुरुवातीला होकार भरणारे शेवटी गळले व शेवटी एक चुलत भाऊ आणि मी असे दोघेच निघालो.
तसे याअगोदर मी त्य्रंबकेश्वर गेलो होतो. पण प्रदक्षिणेची सविस्तर माहिती नव्हती. नेटवरून थोडी मिळाली पण तिचा फारसा उपयोग झाला नसता. म्हणून एकतीस तारखेला सकाळी लवकरच निघालो म्हणजे लवकर पोहचलो तर अजून माहिती घेत येईल. आणि ठरल्याप्रमाणे तिथे पाच वाजता पोहचलो आळंदीतील कैलास ढगे महाराजांच्या ओळखीने खोली सुद्धा चांगली मिळाली .
खोलीवर जाऊन सर्व समान ठेवले आणि लगेच कुशावर्तावर जाऊन हातपाय धुऊन त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला गेलो. अर्ध्या तासात छान दर्शन झाले. दर्शन घेऊन परत येताना सहज एका दुकानात एक पुस्तक चाळत होतो काही पाने पालटया नंतर एक ओवी दिसली
"दृष्टी पडता ब्रम्हगिरी । त्यासी नाही यमपुरी ॥
"नामा म्हणे प्रदक्षिणा । त्याच्या पुण्या नाही गणना ।।
ओवी मनात घोळवतच खोलीवर आलो आणि खोली मालक सतीश पवार यांची भेट घेतली आणि त्यांना प्रदक्षिणे विषयी माहिती विचारली तेव्हा त्यांनी सविस्तर माहिती सांगितली.
प्रदक्षिणा हि दोन प्रकारे असती एक फक्त ब्रम्हगिरी पर्वताला फेरी मारणे ती साधारणता तीस किलोमीटरची आणि दुसरी म्हणजे ब्रम्हगिरी आणि हरिहर पर्वत अशी मोठी साठ किलोमीटरची , तर साठ किलोमीटरची प्रदक्षिणा हि कठीण आहे त्यात सात पर्वत चढावे आणि उतरावे लागतात. शिवाय जंगल आणि निर्जन परिसर आहे. शिवाय वाघाचे देखील भय असते. ती प्रदक्षिणा ग्रुपने केली तर शक्यतो धोका नसतो.
सतीश पवार यांनी पूर्ण श्रावण महिनाभर रोज एक अशी प्रदक्षिणा केल्या आहेत त्यात त्यांच्या दोन तीन प्रदक्षिणा ह्या साठ किलोमीटरच्या असतात. सगळी माहिती जमविल्या नंतर आम्ही लगेच झोपी गेलो कारण सकाळी चारला उठायचे उद्धिष्ट ठेवले होते. आणि उठलोही कुशावर्तात स्नान केले कुशावर्ताला एक प्रदक्षिणा घालून पुढे त्र्यंबके श्वराचे दर्शन घेतले. देवाला मनोभावे बेल फुल वाहिले आणि आमची प्रदक्षिणेला सुरुवात झाली. पहाटेची रम्य वेळ आणि त्र्यंब केश्वराच्या मंदिरातून येणारा ओम नमः शिवाय चा मंद स्वर तोच स्वर मनात ठेऊन त्याचाच जप करत आम्ही चालू लागलो. सुरुवातीला रस्त्याची अडचण येईल असे वाटत होते पण आमच्या मागे पुढे खूप प्रदक्षिणा करणारे भाविक होते. त्यामुळे आमचाही उत्साह वाढला. आणि पावलांनी वेग घेतला. साधारणता मंदिरापासून एक किलोमीटरवर एक तले लागते त्या तळ्याला प्रद्क्सिना घालून पुढे निघावे लागते. पहाटेच्या वेळी पाण्याने तुडूंब भरलेले तळे खूपच सुंदर दिसत होते. उगवतीला लालिमा पसरली होती.
***** फोटो
या सुंदर तळ्याला प्रदक्षिणा घालून पुढे अतिशय चांगल्या डांबरी रस्त्याला लागलो. माहितीप्रमाणे आता जवळजवळ सात ते आठ किलोमीटर असाच रस्ता होता . चालत होतो त्याच्या डाव्या बाजूला अंजनेरी अतिशय सुंदर दिसत होता. आणि त्याला लागून असलेला एक खूप उंच पर्वत वरती आभाळातच घुसला होता.
निसर्गाचे मनमोहक रूप इतके सुंदर दिसत होते कि चालायचे कष्ट अजिबात जाणवत नव्हते. उजव्या हाताला ब्रम्हगिरी पर्वतावर दोन सुळके आकाशाशी स्पर्धा करत होते. आणि धुक्याने त्यांच्या मध्यभागाला लपेटले होते.
पाच सहा किलोमीटर अंतर झाल्यावर रस्ता मोठा वळसा घेणार होता. तिथेच गवतातून जाणारी एक पायवाट दिसली आणि खूप लोक तेथून चालत गेलेल्या खुणा होत्या तेव्हा आम्ही ती पायवाटच पकडली आणि आम्हाला त्याचा फायदा झाला. कारण थोडे पुढे चालून गेल्यानंतर छोटे पण सुंदर राममंदिर लागले. समोर मारुतीराय दर्शन घेतले. एक आदिवासी स्त्री दिवाबत्ती करायला आली होती. मंदिराला उजवी घालून पुढचा रस्ता पकडला आणि थोड्या वेळातच पुन्हा डांबरी रस्त्याला लागलो. काही प्रदक्षिणा करणारे आमच्या पुढे होते ते आता आमच्या मागे पडले.
रामंदिर (फोटो)
एक साधू आमच्या मागून झपझपा चालत येत होते. त्यांना विचारले कि कुठले तुम्ही तर म्हणाले कि त्र्यंबकेश्वरचाच आहे . त्यावर त्यांना म्हटले कि प्रदक्षिणेसाठी आजचाच दिवस का निवडला तर ते म्हणाले कि ,
या महिन्यात दररोज एक अशी महिनाभर प्रदक्षिणा करतो.
एवढे बोलले आणि त्यांचे पुटपुटणे चालू झाले मनात म्हटले महाराजांचे नामस्मरण चालू आहे. त्यांना व्यत्यय नको म्हणून मीही नामस्मरण करत चालू लागलो . वाटेत मारुतीरायांचे एक छोटे मंदिर लागले तिथे नमस्कार केला आणि निघालो.
रस्ता अजूनही डांबरीच होता. वाटेत एक छोटी नदी लागली तिचे नाव माहिती नव्हते पण नंतर खोली मालकाने सांगितले कि ती वैतरणा नदी आहे ब्रम्हगीरीवरच तिचा उगम असल्यामुळे तिचे स्वरूप छोटे होते. पूर्वी गळाभर पाण्यातून तिला पार करावी लागत होती. पण आता तिच्यावर छोटा पूल आहे. आणि पुलाला लागुनच एक गणपतीचे छोटे मंदिर आहे.
आता चढ लागला होता. चालता चालता आळंदीतील दोन साधक विध्यार्थी भेटले आमच्यासारखेच अनवाणी पायाने प्रदक्षिणा करत होते. आज त्यांचा दुसरा दिवस होता. काल आज आणि उद्या अश्या तीन प्रदक्षिणा ते करणार होते. त्यांच्यातीलच एकाने सांगितले कि , आळंदीतील ज्ञानेश्वर कदम म्हणून आहे त्यांनी ८० दिवसात १०८ प्रदक्षिणा केल्या आहेत. काही दिवस एका दिवसात दोन दोन प्रदक्षिणा केल्या मनोमन त्या ज्ञानेश्वर कदमला नमस्कार केला. आणि त्यांनी अजून एका साधकाचे कथा सांगितली ते म्हणजे त्र्यंबके श्वरचेच गणपत बुवा त्यांनी दररोज एक अश्या एक हजार प्रदक्षिणा केल्या त्यांना साडेतीन वर्षे लागली धन्य ते गणपत बुवा आणि धन्य ते ज्ञानेश्वर कदम , कारण एकाच प्रदक्षिणा करण्यासाठी आम्हाला एवढा आटापिटा करावा लागला होता.
आता खरी दमदार चढण लागली. रस्ताही नव्हता दगड धोंड्यातूनच चालावे लागत होते. बरयाच दमछाकी
नंतर खिंडीच्या माथ्यावर आलो आणि आमची अर्धी प्रदक्षिणा पूर्ण झाली. अडीच तासात १५ किलोमीटर
अंतर तोडले होते. खिंडीच्या माथ्यावर गौतम आश्रम होता. आश्रम म्हणजे एक छोटे मंदिर होते
त्यामध्ये
गौतम ऋषी आणि अहिल्या मातेची मूर्ती होती
. आश्रम म्हणजे एक छोटे मंदिर होते त्यामध्ये गौतम ऋषी आणि अहिल्या मातेची मूर्ती होती .
सर्वजन इथे आले कि विश्रांती घेतात पण आम्ही थांबलो नाही आतापर्यंत न थांबतच आलो होतो. म्हणून आताही थांबलो नाही शक्यतो न थांबतच प्रदक्षिणा पूर्ण करायचा विचार होता .
आता निसरडा उतार अगदी हळू उतरावा लागत होता. आमच्यापुढे एक आजोबा साधारणता
७ ५ ते ७ ८
वर्ष्याचे आणि आजी सत्तर बहात्तर वर्ष्याच्या अगदी हळुवारपणे तो निसरडा उतार उतरत होत्या.
आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या दहा बारा आणि पंधरा वर्ष्याच्या नाती प्रदक्षिणा करत होत्या. आजोबा आजीचे कौतुक वाटले श्रावणात एक प्रदक्षिणा करायचा त्यांचा नियम होता .
उतार उतरल्यानंतर दोन छोट्या नद्यांचा संगम लागला नावे माहिती नव्हती पण त्या छोट्या संगमात स्नानासाठी उतरलेल्या भाविकाने सांगितले कि एक गोदावरी आहे जिच्यासाठी गौतम ऋषींनी ताप केले ती दुसर्याही नदीचे नाव त्यांनी सांगितले. आम्ही फक्त हातपाय धुवून नमस्कार करून पुढे निघालो.
संगम फोटो ***
पुढे आल्यानंतर आदिवासी मुली आडव्या आल्या 'काका खाऊ द्या ना , म्हणू लागल्या पण आमच्याकडे त्यांना खायला द्यायला काहीच नव्हते. मी त्यांचा फोटो काढला तर म्हणू लागल्या आमचा फोटो काढला आता काहीतरी द्या असे म्हणू लागल्या मग त्या प्रत्येकीला एक एक रुपया दिला .
पुढे आल्यानंतर एके ठिकाणी खूप प्रदक्षिणा करणारे विश्रांतीसाठी थांबले होते. पण आम्ही न थांबता पुढे निघालो आता खरी कसोटी होती कारण रस्ता खडीचा होता वीस एक किलोमीटर अनवाणी चालल्यामुळे पाय हुळ हुळ करत होते. दगड टोचालकी भरपूर वेदना व्हायच्या पण तरीही आमची प्रदक्षिणा अगदी आनंदात नामस्मरण करत चालू होति.
काही वेळाने माझी गती मंदावली पाय खुब्यात चमकू लागला. प्रत्येक पावलागणिक चमकायचा भाऊ म्हणाला काय रे काय झाले म्हटलं तू चल तुझ्या वेगाने माझा पाय दुखतोय आणि मग आमच्या दोघातले अंतर वाढत चालले
पाय जरी दुखत होता तरी निसर्गाच्या सुंदर रूपाचे अवलोकन करत आणि ओम नमः शिवाय जप करत
असल्यामुळे काहीच वाटत नव्हते. जवळचे पाणी संपून बराच वेळ झाला होता पुन्हा तहान लागली
होती.
पण पाणी मिळण्याचे चिन्ह नव्हते. तसाच चाललो होतो . भाऊ बराच पुढे होता. आणि हाताने काहीतरी
खुणावत होता. जवळ गेल्यावर कळले कि त्याने पुन्हा एकदा पाय वाटेचा रस्ता पकडला होता. गवतातून
जाणारी पायवाट खूपच सुखद वाटली कारण पाय खूपच भाजत होते
पायांना गारवा लागताच बराचसा शिण कमी झाला. पुढे गेल्यानंतर भाऊ थांबलेला दिसला तिथे अजूनही
एक प्रदक्षिणा करणारे कुटुंब थांबले होते . त्यांना पाणी मागितले तर म्हणाले हा डबा घ्या आणि ते
वाहतंय तिथले पाणी प्या
हे असले पाणी प्यायचे ?
अहो डब्यात घेऊन तर पहा स्वच्छ दिसले तर प्या
मी ते डब्यात घेतले तर इतके स्वच्छ पाणी होते कि ते छोटे तीन डबे पाणी पिलो चवीलाही छान लागत
होते. पाणी प्यायल्या नंतर लगेच निघालो आणि थोड्या वेळात पुन्हा मुख्य रस्त्याला लागलो. आणि पुढे
बोर्ड दिसला त्र्यंबके श्वर १ किलोमीटर आनंद झाला.
तसा बोर्ड किलोमीटर दाखवत होता पण कुशावर्त अजून तीन किलोमीटर होते . पण हरकत नाही प्रदक्षिणा
तर पूर्ण होत आली.
प्रदक्षिणा पूर्ण होत आली पण पाय खूपच दुखू लागला होता. शिवाय आता डांबरी वरचा बारीक खडाही
पायाला टोचलेला सहन होत नव्हता . मग नामस्मरणाचा जोर वाढविला आणि त्य नादातच राहिलेले
अंतर पूर्ण केले. कुशावर्तावर आलो हातपाय धवून प्रदक्षिणा घातली त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. नि
आमची प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि ती सुद्धा काहीही न खाता व अनवाणी पायाने. तीस किलोमीटर ला
वेळगला सहा तास.
शेवटी एक मुद्दा सांगायचा राहिला आम्ही ज्यांच्याकडे होतो. ते सतीश पवार आणि आळंदीतील कैलास
ढगे महाराजांचा चांगला परिचय होता. सगळे उरकल्यानंतर आम्ही ढगे महाराजांबरोबर सतीश पवारांच्या
घरी गेलो आणि सोप्यावर बसलो तेवढ्यात सतीश यांची छोटी मुलगी वय फक्त (अडीच ते तीन वर्षे )
जवळ आली आणि ओळीने अगदी पायावर डोके ठेवून आमच्या तिघांच्याही पाया पडली. तिला पाया पड
म्हणून कोणीही सांगितले नव्हते.त्यानंतर तीने आम्हा तिघांनाही प्रसाद दिला म्हणजे हातात काहीही नव्हते .
पण नुसता द्यायचा अभिनय केला. आम्हाला खुपच कौतुक वाटले. त्यानंतर आम्हाला तिच्या आईने
चहा दिला तेव्हा तर त्या मुलीने कळसच केला ती आमच्या जवळ आली नि आपल्या बोबड्या बोलीत
म्हणालीथांबा काका मी तुम्हाला चहा फुकून देते. गरम आहे. आणि अक्षरशा तिने तिघांच्याही कप फुंकून
दिले. आम्हाला त्यामुलीवरील संस्कार पाहून अक्षरशा मन भरून आले.
आणि मनोमन जाणवले कि हि मुलगी सामान्य नाही.
ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय
(फोटो टाकायचे होते पण मला जमले नाही )
anilbtapkir.blogspot.in या लिंकवर काही आहेत
छान अनुभव
छान अनुभव
या प्रदक्षिणेबद्दल काहीच
या प्रदक्षिणेबद्दल काहीच माहिती नव्हती. ती आता तुमच्यामुळे समजली. छान वाटले वाचून
खूप छान अनुभव!
खूप छान अनुभव!
छान लिहिले आहे
छान लिहिले आहे
मस्त प्रसन्न वाटले हे वाचताना
मस्त प्रसन्न वाटले हे वाचताना....