माझ्या बकेट लिस्टचा प्रवास - सामो

Submitted by सामो on 12 September, 2021 - 08:04

आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृंखला|
यया बद्धा: प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत||
.
आशा ही मनुष्याची खरोखर आश्चर्यकारक अशी बेडी आहे. जे लोक या बेडीमध्ये बद्ध असतात, ते (ध्येय गाठण्यासाठी) धावत असतात आणि जे आशेपासून मुक्त असतात, ते एखाद्या पांगळ्याप्रमाणे (कृतीशून्य) थांबून रहातात.

बकेट लिस्ट वगैरे शब्द माहीतही नसल्याच्या काळात, म्हणजे मी १९-२० वय असण्याच्या, बी एस सी ला असण्याच्या तारुण्याच्या, ध्येयाने झपाटले जाण्याच्या काळात अगदी लसलसून, म्हणजे अत्यंत तीव्रतेने, एक स्वप्न मनात उमलत होतं. त्याबद्दल पुढे येइलच लवकर.

तर फर्गुसनला गणित विषयामध्ये बी एस सी ला प्रवेश घेतलेला होता. मला आठवते पहीला तास होता आचार्य सरांचा. सरांनी मोठे 'इन्ट्रोडक्टरी' किंवा ज्याला एक 'ओरिएंटेशन' म्हणता येइल असे अतिशय प्रेरणादायक लेक्चर दिले आणि विचारले "कोणाला काही प्रश्न असल्यास जरुर विचारा." प्रश्न विचारायची कोणतीही संधी महत्पाप आहे असे मानणाऱ्या मी, हात वर करुन विचारले "लंच ब्रेक कधी असतो सर?" बाप रे वर्गात जो हशा पिकला. आचार्य काही बोलले नाही पण त्यांच्या लक्षात मी नक्की राहीलीले असणार.

मला काय माहीत होते की या कॉलेजमध्ये मातीच्या घड्यासारखे आपले आयुष्य घडणार आहे. हेच आचार्य, एम प्रकाश , डीव्हीके तसेच अन्य शिक्षक(ज्यांची नावे आता आठवत नाहीत Sad . माझ्या स्मृतीचा दोष.) पुढे आयुष्यभर आपल्या प्रिय अगदी मर्मबंधातील स्मृतींचा भाग होणार आहेत.

त्याच दिवशी म्हणजे पहील्या दिवशी शेजारी एक गव्हाळ, तरतरीत नाकाची, सडपातळ व तेव्हा पूर्ण पावले व्यवस्थित झाकतील असे, शूज घालून आलेली एक मुलगी येउन बसली जिचे नाव होते पल्लवी (नाव बदलले आहे). अर्थात मैत्री झाली. आम्ही दोघीही कॅन्टॉनमेन्ट भागातच जवळपासच म्हणाजे वानवडीला रहात असल्याचे कळले व मजा वाटली. त्या दिवसानंतर आमची घट्ट मैत्री विणण्यास सुरुवात झाली. मी लूनाने कॉलेजला येत असे व पल्लवी डबलसीट. पुढे वर्गात अधिक ओळखी होत गेल्या.त्यामध्ये किरण (नाव बदललेले आहे) आणि अर्चना (नाव बदललेले आहे) यांच्याशी ओळख झाली. पुढे इलेक्ट्रॉनिक्स ड्रॉप करुन, बी एस सी मॅथेमॅटिक्स्मध्ये करण्याचा निर्णय होण्यात या तीघांचाही मोठ्ठा वाटा होता. तो कसा सांगते - तीघेही अफाट अफाट हुषार होते. मी त्यांच्याइतकी हुषार नव्हतेच. परंतु मला एक गोष्ट माहीत होती ती ही की - आपली संगत अत्युत्तम हवी. आपल्याला कुसंगत नकोच उलट मिळाली तर हुषार आणि महत्वाकांक्षी मित्र-मैत्रिणी हव्यात. महत्वाकांक्षा म्हणजे त्या त्या वयात पुढे पुढे जाण्याची लालसा असलेल्या मैत्रांची संगत. तशी संगत मला अनायासे पल्लवी-अर्चना व किरण यांच्यात सापडली. आम्ही तीघांचा आवडीचा विषय होता 'गणित' . आवडता टाइमपास होता 'गणित', चर्चेचा विषय असे 'गणित. आम्ही सिद्धांत, प्रमेये, उपप्रमेये, गणितद्न्यांचे लॉज खात होतो, पीत होतो, चर्चा करत होतो, जगत होतो. मला माहीत आहे ही तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल पण नाही हे सत्य आहे.

एम प्रकाशांच्या सरांच्या तासाला मंत्रमुग्ध व्हायला अगदी भान विसरायला होत असे. सर इतके भरभरुन बोलत. प्रत्येक शब्द मोतीपोवळ्याने तोलावा तसा अनमोल असे. आमच्याकरता. कानात साठवुन घेत असू. पल्लवी, किरण, अर्चनामुळे मला कळले की गणित फक्त वाचायचे व समजुन घ्यायचे नसते. त्यावर विचार करायचा असतो. शिक्षकांच्या शिकविण्यामुळे प्रत्येक प्रमेय-सिद्धांताचे-उपप्रमेय-संकल्पनांचे व्यावहारीक उपयोग कळत. आणि अशात मला माहीतही नसलेले नाव कानावर पडले - आय आय टी. मी तर कधीच या कॉलेजबद्दल ऐकलेले नव्हते परंतु गप्पागप्पांमध्ये कळले की या तीघांनाही पुढे एम एस्सी करायला आय आय टी किंवा टी आय एफ आर मध्ये जायचे आहे. मग मलाही वाटु लागले आपणही जावे. अधिक जोमाने वाटू लागले कारण तिथे प्रवेश मिळणे अतिशय अवघड असते असे ऐकले.

तारुण्य हा काळच असा असतो की एखादी गोष्ट अवघड आहे म्हटले की अधिक करावीशी वाटते. बंडखोरीचा काळ असतो. अमकं नको करु म्हटलं की तेच करण्याची इच्छा होते. तरुणपण ही एक परीकथा असते. त्यात ड्रॅगन्स देखील असतात. मूडस्विंग्स, अँग्झायटी, हायपोमॅनिया, बाहेरील जगाशी करावी लागणारी अ‍ॅडजस्टमेन्ट तर आहेच पण स्वत:च्या शरीरामध्ये अनियंत्रित, अनिर्बंध उसळणार्या संप्रेरकांची, हार्मॉन्स्ची सुलतानी.

हे सारे ड्रॅगन्स माझ्यापुरता सत्यच होते. पण त्यांच्याशी झुंजत झुंजत एक किल्ला सर करायचा होता तो होता आय आय टी मध्ये प्रवेश.

आम्ही तीघांनीही कोणताही क्लास न लावता परंतु आचार्य, एम प्रकाश, डी व्ही के यांच्या मदतीने आय आय टीच्या प्रवेश परीक्षेची तयारी सुरु केली. मला या सर्व शिक्षकांचा व माझ्या ग्रुपचा भयंकर म्हणजे अचाट. शब्दातीत फायदा झाला. पुढे प्रवेशपरीक्षा दिली आणि संपूर्ण भारतभरतील विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यांत पहीले २० विद्यार्थी निवडले गेले ज्यात माझा १९ वा नंबर लागला. (अर्थात भारतभरात परीक्षा नव्हती. फक्त सगळीकडून होतकरु स्पर्धक आलेले होते) काय अवर्णनिय आनंद होता. शब्दातीत आनंद वाटला. पण एक नक्की जर किरण-पल्लवी-अर्चना नसते, जर आचार्य-एम प्रकाश-डीव्हीके व फर्ग्युसनचे अन्य शिक्षक नसते तर हा किल्ला सर करताच आला नसता. इन फॅक्ट हे सर्वच जण इतके क्रुशिअल होते की यातली एक व्यक्तीदेखील वगळा आणि माझे स्वप्न पूर्ण झाले नसते. कोवळ्या वयातील त्या यशाने माझी इमेज स्वत:च्याच मनात उंचावली, आत्मविश्वास आला की आपण काहीतरी करु शकतो. मनात आलेले स्वप्न पूर्ण होउ शकते. बाकी उरलेल्या इच्छांना अंत नाहीच. खूप आहेत परंतु ही मोठी इच्छा पूर्ण झाली, ही मी गणपतीची कृपा समजते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंच
मॅथस मध्ये इतकी आचिव्हमेंट म्हणजे सा.न.

अनु अचिव्ह्मेन्ट काहीही नाही. बी एसी मध्ये खूप खूप आवडणार्‍या गणिताची पुढे भीती बसली कारण त्याचं अक्षरक्षः विराटरुप दर्शनही घडलं. जाऊ देत Happy

धन्य आहात...गणिताचं आणि माझं गणित कधीच जमलं नाही. शेवटी गणितच कंटाळलं. तुझ्याकडून एवढे हाल करून घेण्यापेक्षा मी दूर होतो म्हणालं. वरती मल्लिनाथी केली तू लावलेले महान गणितीय शोध भास्कराचार्यांना (मा.बो. वरचे किंवा अजून कुठचे असतील तिथले) देखील समजणार नाहीत.
Happy

Pages