शशक पूर्ण करा - पुढच्या वर्षी लवकर या! - ऋन्मेऽऽष

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 September, 2021 - 13:19

काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.

"काय रे दिवेलागणीची वेळ झाली. किती झोपणार सणासुदीच्या दिवसात?" आईचा आवाज आला

"कसले सणासुदीचे दिवस? बाप्पा तर गेले ना काल?" हे बोलताना आणि समोरच्या रिकाम्या मखराकडे बघतानाही त्याला रडू फुटले.

त्याचे हे नेहमीचेच होते. पाच दिवस घसा बसेपर्यंत केलेल्या आरत्या, प्रसाद, बाप्पांची भजने आणि नाचगाणी.. त्याही आधीपासून सुरू केलेली सजावट आणि रोषणाई.. गौरीविसर्जनाच्या दिवशी ढोलताशे आणि डीजेच्या तालावर नाचत गात, गुलाल उधळत बाप्पांची निघालेली मिरवणूक.. नदीकाठची ती शेवटची आरती आणि बाप्पांना दिलेला निरोप..

बाप्पांना सोबत म्हणून तो स्वतः नदीत ऊतरायचा. त्यांना पाण्यात शेवटची डुबकी घेताना बघायचा आणि शेवटचे एकदा `पुढच्या वर्षी लवकर या!' म्हणत तिथेच त्याचा बांध फुटायचा.

- - - - - - - - - - - - - - -

तरी एक बरे होते, तो नास्तिक होता.

- ऋन्मेऽऽष

IMG_20210916_224005.jpg
(फोटोतले सारे बाप्पा, आमच्या गावचे आहेत. याच वर्षीचा विसर्जनाचा फोटो आहे)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर.
बाप्पाला निरोप देताना डोळे भरून येतातच. आस्तिक असो वा नास्तिक प्रत्येकाला त्याची ओढ वाटते कारण तो देव वाटतच नाही असे वाटते कुणी आपलाच मित्र, नातेवाईक, सखा आहे जो काही दिवस सोबत राहून त्याच्या स्वगृही परतत आहे.

कारण तो देव वाटतच नाही असे वाटते कुणी आपलाच मित्र, नातेवाईक, सखा आहे जो
>>>>>>>
अगदी अगदी...
कालच आमच्या नव्या सोसायटीचा पहिला गणेशोत्सव धूमधड्याक्यात संपला, फार मजा आली.. घरी यावर चर्चा चालू असताना मी बायकोला नॉस्टेल्जिक होत बालपणीच्या आठवणी सांगताना हेच म्हणालो... यार तो देव असा वाटतच नाही Happy
घरी आल्यावर अचानक शांत झालेले वातावरण, मकरातील रिकामा पाट, आणि त्यावर ठेवलेली विसर्जनानंतरची मूठभर माती पाहिली की खरेच रडू यायचे ..

सस्मित, बदलले. ती नेहमी गडबड होते. माझी पहिली गर्लफ्रेंड सेनोरीटाची रास मकर असल्याने नेहमी तेच तोंडात येते Happy

छान. लहानपणी देव वगैरे काय न कळण्याचा वयापासून "गंपती" म्हणजे कोण आनंद!

बाकी आता "तोंडात रास येणे" हा वाक्प्रचार सुरू करायला हवा.

अहो ऐकलं का? पोरीची लक्षण ठीक वाटत नाही मला. सारखी त्याची रास तोंडात येतेय तिच्या!

छान!!

बाप्पाला निरोप देताना डोळे भरून येतातच. आस्तिक असो वा नास्तिक प्रत्येकाला त्याची ओढ वाटते कारण तो देव वाटतच नाही असे वाटते कुणी आपलाच मित्र, नातेवाईक, सखा आहे जो काही दिवस सोबत राहून त्याच्या स्वगृही परतत आहे. --- + १२३४५६७

छान

छान लिहिलेय
गणपती गेल्यावर रिकामे वाटते हे खरे