माझ्या बकेट लिस्टचा प्रवास - सामो

Submitted by सामो on 12 September, 2021 - 08:04

आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृंखला|
यया बद्धा: प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत||
.
आशा ही मनुष्याची खरोखर आश्चर्यकारक अशी बेडी आहे. जे लोक या बेडीमध्ये बद्ध असतात, ते (ध्येय गाठण्यासाठी) धावत असतात आणि जे आशेपासून मुक्त असतात, ते एखाद्या पांगळ्याप्रमाणे (कृतीशून्य) थांबून रहातात.

बकेट लिस्ट वगैरे शब्द माहीतही नसल्याच्या काळात, म्हणजे मी १९-२० वय असण्याच्या, बी एस सी ला असण्याच्या तारुण्याच्या, ध्येयाने झपाटले जाण्याच्या काळात अगदी लसलसून, म्हणजे अत्यंत तीव्रतेने, एक स्वप्न मनात उमलत होतं. त्याबद्दल पुढे येइलच लवकर.

तर फर्गुसनला गणित विषयामध्ये बी एस सी ला प्रवेश घेतलेला होता. मला आठवते पहीला तास होता आचार्य सरांचा. सरांनी मोठे 'इन्ट्रोडक्टरी' किंवा ज्याला एक 'ओरिएंटेशन' म्हणता येइल असे अतिशय प्रेरणादायक लेक्चर दिले आणि विचारले "कोणाला काही प्रश्न असल्यास जरुर विचारा." प्रश्न विचारायची कोणतीही संधी महत्पाप आहे असे मानणाऱ्या मी, हात वर करुन विचारले "लंच ब्रेक कधी असतो सर?" बाप रे वर्गात जो हशा पिकला. आचार्य काही बोलले नाही पण त्यांच्या लक्षात मी नक्की राहीलीले असणार.

मला काय माहीत होते की या कॉलेजमध्ये मातीच्या घड्यासारखे आपले आयुष्य घडणार आहे. हेच आचार्य, एम प्रकाश , डीव्हीके तसेच अन्य शिक्षक(ज्यांची नावे आता आठवत नाहीत Sad . माझ्या स्मृतीचा दोष.) पुढे आयुष्यभर आपल्या प्रिय अगदी मर्मबंधातील स्मृतींचा भाग होणार आहेत.

त्याच दिवशी म्हणजे पहील्या दिवशी शेजारी एक गव्हाळ, तरतरीत नाकाची, सडपातळ व तेव्हा पूर्ण पावले व्यवस्थित झाकतील असे, शूज घालून आलेली एक मुलगी येउन बसली जिचे नाव होते पल्लवी (नाव बदलले आहे). अर्थात मैत्री झाली. आम्ही दोघीही कॅन्टॉनमेन्ट भागातच जवळपासच म्हणाजे वानवडीला रहात असल्याचे कळले व मजा वाटली. त्या दिवसानंतर आमची घट्ट मैत्री विणण्यास सुरुवात झाली. मी लूनाने कॉलेजला येत असे व पल्लवी डबलसीट. पुढे वर्गात अधिक ओळखी होत गेल्या.त्यामध्ये किरण (नाव बदललेले आहे) आणि अर्चना (नाव बदललेले आहे) यांच्याशी ओळख झाली. पुढे इलेक्ट्रॉनिक्स ड्रॉप करुन, बी एस सी मॅथेमॅटिक्स्मध्ये करण्याचा निर्णय होण्यात या तीघांचाही मोठ्ठा वाटा होता. तो कसा सांगते - तीघेही अफाट अफाट हुषार होते. मी त्यांच्याइतकी हुषार नव्हतेच. परंतु मला एक गोष्ट माहीत होती ती ही की - आपली संगत अत्युत्तम हवी. आपल्याला कुसंगत नकोच उलट मिळाली तर हुषार आणि महत्वाकांक्षी मित्र-मैत्रिणी हव्यात. महत्वाकांक्षा म्हणजे त्या त्या वयात पुढे पुढे जाण्याची लालसा असलेल्या मैत्रांची संगत. तशी संगत मला अनायासे पल्लवी-अर्चना व किरण यांच्यात सापडली. आम्ही तीघांचा आवडीचा विषय होता 'गणित' . आवडता टाइमपास होता 'गणित', चर्चेचा विषय असे 'गणित. आम्ही सिद्धांत, प्रमेये, उपप्रमेये, गणितद्न्यांचे लॉज खात होतो, पीत होतो, चर्चा करत होतो, जगत होतो. मला माहीत आहे ही तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल पण नाही हे सत्य आहे.

एम प्रकाशांच्या सरांच्या तासाला मंत्रमुग्ध व्हायला अगदी भान विसरायला होत असे. सर इतके भरभरुन बोलत. प्रत्येक शब्द मोतीपोवळ्याने तोलावा तसा अनमोल असे. आमच्याकरता. कानात साठवुन घेत असू. पल्लवी, किरण, अर्चनामुळे मला कळले की गणित फक्त वाचायचे व समजुन घ्यायचे नसते. त्यावर विचार करायचा असतो. शिक्षकांच्या शिकविण्यामुळे प्रत्येक प्रमेय-सिद्धांताचे-उपप्रमेय-संकल्पनांचे व्यावहारीक उपयोग कळत. आणि अशात मला माहीतही नसलेले नाव कानावर पडले - आय आय टी. मी तर कधीच या कॉलेजबद्दल ऐकलेले नव्हते परंतु गप्पागप्पांमध्ये कळले की या तीघांनाही पुढे एम एस्सी करायला आय आय टी किंवा टी आय एफ आर मध्ये जायचे आहे. मग मलाही वाटु लागले आपणही जावे. अधिक जोमाने वाटू लागले कारण तिथे प्रवेश मिळणे अतिशय अवघड असते असे ऐकले.

तारुण्य हा काळच असा असतो की एखादी गोष्ट अवघड आहे म्हटले की अधिक करावीशी वाटते. बंडखोरीचा काळ असतो. अमकं नको करु म्हटलं की तेच करण्याची इच्छा होते. तरुणपण ही एक परीकथा असते. त्यात ड्रॅगन्स देखील असतात. मूडस्विंग्स, अँग्झायटी, हायपोमॅनिया, बाहेरील जगाशी करावी लागणारी अ‍ॅडजस्टमेन्ट तर आहेच पण स्वत:च्या शरीरामध्ये अनियंत्रित, अनिर्बंध उसळणार्या संप्रेरकांची, हार्मॉन्स्ची सुलतानी.

हे सारे ड्रॅगन्स माझ्यापुरता सत्यच होते. पण त्यांच्याशी झुंजत झुंजत एक किल्ला सर करायचा होता तो होता आय आय टी मध्ये प्रवेश.

आम्ही तीघांनीही कोणताही क्लास न लावता परंतु आचार्य, एम प्रकाश, डी व्ही के यांच्या मदतीने आय आय टीच्या प्रवेश परीक्षेची तयारी सुरु केली. मला या सर्व शिक्षकांचा व माझ्या ग्रुपचा भयंकर म्हणजे अचाट. शब्दातीत फायदा झाला. पुढे प्रवेशपरीक्षा दिली आणि संपूर्ण भारतभरतील विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यांत पहीले २० विद्यार्थी निवडले गेले ज्यात माझा १९ वा नंबर लागला. (अर्थात भारतभरात परीक्षा नव्हती. फक्त सगळीकडून होतकरु स्पर्धक आलेले होते) काय अवर्णनिय आनंद होता. शब्दातीत आनंद वाटला. पण एक नक्की जर किरण-पल्लवी-अर्चना नसते, जर आचार्य-एम प्रकाश-डीव्हीके व फर्ग्युसनचे अन्य शिक्षक नसते तर हा किल्ला सर करताच आला नसता. इन फॅक्ट हे सर्वच जण इतके क्रुशिअल होते की यातली एक व्यक्तीदेखील वगळा आणि माझे स्वप्न पूर्ण झाले नसते. कोवळ्या वयातील त्या यशाने माझी इमेज स्वत:च्याच मनात उंचावली, आत्मविश्वास आला की आपण काहीतरी करु शकतो. मनात आलेले स्वप्न पूर्ण होउ शकते. बाकी उरलेल्या इच्छांना अंत नाहीच. खूप आहेत परंतु ही मोठी इच्छा पूर्ण झाली, ही मी गणपतीची कृपा समजते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा... इतकी कठीण इच्छा शेवटी पुरी झाली.
त्या वयात जसे मित्र मिळतात तसे आयुष्य घडते. माझा एक मित्र म्हणायचा की तो सी ए झाला कारण त्याचे सगळे मित्र सीए करत होते,त्यांच्यासोबत राहण्यासाठी त्यालाही सीए करणे भाग पडले.

होय संगत फार परिणामकारक असते. कारण ते फॉर्मेटिव्ह इयर्स असतात, आपले मन मऊ मातीसम असते. मुलीला मी तेच सांगते सतत प्रोग्रेसिव्ह लोकांबरोबर रहा पण तीही बंडखोर आहे तिचे मत आहे अशी सिलेक्टिव्ह मैत्री करता येत नाही. तेही खरेच असेल - तिच्यापुरते.

माझी मुलगी रिग्रेसिव्जना लगेच कट करुन टाकते. म्हणते, ते तर काही प्रोग्रेस करणार नाहीतच पण माझ्याही इच्छा नष्ट होतील. माझे मात्र तुमच्या मुलीसारखे मत आहे Happy

कविन तसे नव्हे. मैत्री कॅन टेक यु ओन्ली अ‍ॅज मच. पुढे तुमचा प्रवास तुम्हाला तुमच्या बुद्धीवर, सामर्थ्यावरती करायचा असतो. मला खूप खंत आहे की पुढे मी तितकीशी प्रगती करु शकले नाही. अ‍ॅव्हरेज राहीले. असो ती खंत या धाग्यावरती मांडण्यात काही अर्थ नाही. Happy कोळसा काळा तो काळाच.

मस्त लिहिलय ,iit म्हणजे ग्रेटच ...
संगत खुप परिणाम करते.
फक्त माझ्या मैत्रिणीच्या inspiration मुळे मी वयाच्या 55 व्या वर्षी बँकेची caiib ही परीक्षा accountancy ची कोणती ही background नसताना पास झाले. ती नसती तर मी काही त्या वाटेला गेले नसते.

बाप रे ममो क्या बा त !! मस्त मस्त
@देवकी ध न्स

@ च्रप्स नाही माहीत मला वडा. वैशाली आमचा अड्डा होता.

सुरेख लिहीले आहेस!!! तू अ‍ॅव्हरेज नाहीस गं मुली... एक लग्न, दोन मुले, तीन पेट्स, चार चाकी गाड्या, पाच आकडी पगार, नि सहा आकडी घर ह्या असल्या फूटपट्टीने मोजशील तर किती कॅरेट सोनं आहेस ते नाहीच समजणार. तिथे कसोटीचा दगडच लागतो...

ममो, सहीच आहात. त्याबद्द्ल धागा काढा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! चारच प्रतिसाद आले तरी ठीक आहे. पण कळू दे तरी काय "पंगा" झाला तुमच्या लाईफचा... इन्स्पिरेशनल !!

संपूर्ण भारतभरतील, पहीले २० विद्यार्थी निवडले गेले ज्यात माझा १९ वा नंबर लागला>>> खूप कौतुकास्पद आहे हे...
छान लेखन... तुझ्या बकेट लिस्टचा प्रवास सुंदर मांडलायं...

अगं सॉरी भारतभरातील विद्यार्थी आलेले पण ती स्पर्धा फक्त मुंबईत आयोजित केलेली होती. ते बदलते आत्ता. हाहाहा., म्हणजे पूर्ण भारतभर ती प्रश्नपत्रिका वगैरे गेले ली नव्हती. असो.

सॉरी कश्यासाठी?? तुझा हा प्रवास खरंच खूप कौतुकास्पद आहे...
तुझ्या बुद्धीमत्तेची चमक तुझ्या लेखनातून, प्रतिसादातून लक्षात येते..

@सी, love your post to the moon and back. ❤ सहमतच. फूटपट्ट्यांची होळी करावी का ?!!!

सामो सहीच आहेस. गणितविषय आवडणाऱ्याकडे मी आदराने बघते.
ममो तू पण भारीच आहेस. सी म्हणतेय तसं कळू दे की आम्हाला तुझ्या लाईफचा पंगा.

मस्त लिहिलंय.
माझा जरा हे bucket list items आहेत की goals/aspirations हे समजण्यामध्ये मध्ये गोंधळ होतो आहे. पण लिस्ट मधला आयटम टीक केल्यानंतर मिळणारे समाधान महत्वाचे.

तुमचे म्हणणे खरे आहे अश्विनी. गोल्स किंवा अ‍ॅस्पिरेशन म्हणजे बकेट लिस्ट नाही.

पण बकेट लिस्ट मध्ये महत्त्वाकांक्षा आहे पूर्ण करण्याची तीव्र ओढ आहे तसेच न झाल्यास काहीतरी गमावल्यासारखे वाटण्याची खंत आहे - की अरे असे व्हायला पाहीजे होते.
हे तीन्ही फॅक्टर्स माझ्या शिक्षणाच्या अनुभवात असल्याने, मी जो एक गोल कंप्लीट झालेला आहे त्याच्याभोवती कहाणी गुंफली. ही इच्छा पूर्ण नसती झाली तर मला काहीतरी गमावल्यासारखे वाटले असते खरे.

परंतु हे ध्येय बकेट लिस्ट सदरामध्ये संयोजकांना गणायचे नसल्यास तसेही चालेल. नो इश्युज.

छान लिहिलं आहे. गणित विषय मुख्य घेऊन काहीही परिक्षा उत्तीर्ण होणार्‍यांबद्दल माझ्या मनात खूप आदराची भावना आहे. त्यात तुम्ही इतक्या स्पर्धेतून आय आयटीत प्रवेश मिळवला हे विशेष.
>हे सारे ड्रॅगन्स माझ्यापुरता सत्यच होते. पण त्यांच्याशी झुंजत झुंजत एक किल्ला सर करायचा होता तो होता आय आय टी मध्ये प्रवेश.
हे विशेष आवडलं . अगदी प्रांजळ.
काही बकेट लिस्ट अशा असतात की त्या आपल्यासाठी एक नवीन जग उघडतात ज्याची आपल्याला कल्पनाही नसते.
सहज कुतुहल म्हणून विचारतोय. आय आयटी मुंबई का? आणि तिथे गेल्यावर H10 का H11 ?

Pages