२०० हल्ला हो - Zee5

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 August, 2021 - 18:58

२०० हल्ला हो

२०० बायकांनी मिळून कोर्टात सुनावणी होण्याच्या आधीच पोलिस कस्टडीत असलेल्या एका स्थानिक गुंडाची हत्या केली.

२००४ सालची ही सत्यघटना. तेव्हा बातमी वाचल्याचे आठवत नाही. वाचलीही असल्यास कुठेतरी विस्मरणात गेली असावी. पण आज त्या बातमीवर बनलेल्या चित्रपटाचा ट्रेलर लक्षवेधक वाटला आणि बघायला घेतला. मी नाही, तर बायकोने. मी उलट विरोधच करत होतो. नकोच आज, वायोलेन्स बघायचा मूड नाही म्हणून टाळतच होतो. सुरुवातीलाच त्या गुंडाची निर्घुण हत्या ज्या पद्धतीने दाखवली ते पाहता पुन्हा वाटले, छे, उगाच बघतोय हा रक्तपात. पण तरीही सत्यघटना आहे, काय एवढे झाले जे असे मारले या विचाराच्या किड्याने स्वस्थ बसू दिले नाही. आणि चित्रपट पुढे बघत राहिलो. आणि अस्वस्थ करणारी नागडी सत्ये समोर येऊ लागली.

एक दलितांची वस्ती, तिथे एक स्थानिक गुंडा प्रशासनाला विकत घेऊन कायदा धाब्यावर बसवून नुसते मारामार्‍या आणि हप्तावसूली करत नाही तर महिलांची आब्रू आपल्याला हवी तशी, हवी तेव्हा लुटतो. कोणी याविरुद्ध तक्रार करताच त्याचा थेट खून केला जातो. त्याच्या या दहशतीला लोकं ईतके घाबरले आहेत की ते स्वतःहून आपल्या घरच्या महिलांना त्याच्याकडे सोपवतात. एखाद्या टिपिकल सी ग्रेड बॉलीवूड चित्रपटातील सिच्युएशन आपण एक सत्यघटना म्हणून बघत आहोत. ते सुद्धा यूपी बिहार मधली घटना नसून नागपूरच्या शहरी भागातील हि घटना आहे हे चित्रपट पाहताना पचवताच येत नाही.

तब्बल दहा ते बारा वर्षे हे चालते आणि मग त्याच वस्तीतील पण दुसरीकडे राहायला गेलेली रिंकू राजगुरू तिथे येते आणि तिला हे बघून तसाच धक्का बसतो जसे आपल्याला. तिच्या हे पचनी न पडून ती आवाज उठवते. अ‍ॅक्शन घेते. असेही करता येते हि जाणीव त्या वस्तीतल्या लोकांना होते आणि हे हत्याकांड घडते.

चित्रपटाचा ट्रेलर पाहताना त्यात रंडी वगैरे शब्द ऐकून आधी मला वाटलेले की हि घटना एखाद्या वेश्यावस्तीत घडलेली असावी. वेश्यांच्या उठावाची कथा दिसतेय. अर्थात त्या देखील काही आपल्या मनाने या धंद्यात ओढल्या गेलेल्या नसतात. कुठून कुठून जोरजबरदस्तीने वा फसवूनच आणल्या गेलेल्या असतात. पण तरीही त्यांनी आपले आयुष्य कडवटपणे स्विकारले असते. पण एखाद्या सामान्य वस्तीतील स्त्रियांच्या नशीबी हे भोग बघताना आणखी वेदना झाल्या.

२०० महिलांनी मिळून हे कृत्य केले, पुरुषांनी का नाही? याचे उत्तर आपल्याला चित्रपटात मिळतेच, पण त्याआधी एका संवादातही सापडते. कायदा कितीही सर्वांसाठी समान असे पुस्तकात लिहिले असले तरी तो समाजातील वरच्या वर्गासाठी आणि खालच्या वर्गासाठी वेगळाच असतो. समाजातील वरच्या स्तरावर असतात ते हाती सत्ता आणि पैश्याची ताकद असलेले लोकं, त्या खाली मध्यमवर्गीय, तर त्याही खाली दारिद्ररेषेखाली खितपत पडलेली जनता. त्या जनतेतही उच्चवर्णीयांच्या तुलनेत दलित आणखी खालच्या स्तरावर असतात. आणि त्यातही सर्वात तळाशी असते ती दलित स्त्री... थोडक्यात तुम्ही गरीब असाल, दलित असाल, आणि एक स्त्री असाल तर तुम्ही नरकात जन्म घेतला आहे. तिथल्या पुरुषांनी कदाचित आपल्या नशीबाचे भोग म्हणून हे स्विकारलेही असावे, पण ज्यांना प्रत्यक्षात भोगावे लागत होते त्यांचा उद्रेक हा होणारच होता.

पण तरीही चित्रपट संयत बनवला आहे. कुठेही अत्याचाराची किळस येणारी, वा अंगावर येण्यासाठी भडक द्रुश्ये टाकली नाहीत. कुठेही लाऊड म्युजिक टाकून वातावरणनिर्मिती नाही वा पॉज घेत, पंच लाईन्स टाकून टाळ्या घ्यायचा प्रयत्न नाही. हे वास्तव होते, आणि हे असे होते. कदाचित म्हणूनच चित्रपट संपल्यावरही डोक्यातून ते पुसले जात नाही.

अमोल पालेकर यांची बहुतांश चित्रपटात पडद्यावरची ईमेज जरी साधी सरळमार्गी किंबहुना एखाद्या मिळमिळीत व्यक्तीमत्वाच्या नायकाची असली तरी त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यात ते पडद्यावरचे अमिताभ बच्चन म्हणजे डॅशिंग व्यक्तीमत्वाचे आहेत, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे आहेत. या चित्रपटात त्यांनी पडद्यावरही अमिताभ बच्चन बनून आपल्या भुमिकेला पुरेपूर न्याय दिला. त्यांच्या द्रुश्यांसाठी पुन्हा एकदा बघू शकतो हा चित्रपट. रिंकू देखील कुठेच मिसफिट वाटत नाही. ऊपेंद्र लिमयेंचा ईन्स्पेक्टरही लक्षात राहतो. बरेचदा अश्या चित्रपटात व्हिलनचे कॅरेक्टर ईतर सर्वांच्या वरचढ ठसठशीतपणे लक्षात राहावे असे मुद्दाम केले जाते, तो जास्तीचा प्रयत्न इथे आढळला नाही हे चांगले वाटले.

चित्रपटात दाखवल्याप्रमाणे प्रत्यक्षातही सर्वच २०० बायकांनी पुढे येत या हत्येची जबाबदारी घेतली होती. पण ज्या बायकांना आरोपी म्हणून पकडले गेले त्यांची तब्बल १० वर्षांनी म्हणजे २०१४ साली या केसमधून ठोस पुराव्याअभावी सुटका झाली.

चित्रपटात कुठेही कायदा हातात घेण्याचे समर्थन केले नाही. किंबहुना अश्या कृत्याचे समर्थन केल्यास अराजक माजेल हे देखील कबूल केले आहे. पण त्याचवेळी कायदा सुव्यवस्थेच्या नावावर माजलेले अराजकच अश्या घटनांना जबाबदार आहे याकडेही लक्ष वेधले आहे.

२००४ साल म्हणजे या घटनेला आज तब्बल १७ वर्षे झाली. एक पिढी बदलली असेल. पण हा समाज, मुख्यत्वे समाजाच्या या स्तरातील बदल हा एका पिढीत होणारा नाहीये. त्यामुळे आजच्या तारखेलाही हा चित्रपट सद्यस्थितीचाच वाटतो. पण या लेखात कुठेही चित्रपट परीक्षण शोधू नका. हि घटना, हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी याच प्रामाणिक हेतूने हा चित्रपट बनवल्याचे वाटले. म्हणून त्याच हेतूने आणखी चार लोकांनी हा चित्रपट बघावा म्हणून याबद्दल लिहावेसे वाटले.

कुठे बघू शकता - Zee5

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चार पाच महिन्यापूर्वी आमच्या सोसाय टीचा सुपर वायझर एक आहे त्याला असेच सोसाय टीच्या दारासमोर अनेक बायकांनी एकत्र येउन चपलेने बडिवले होते. असे मला प्लंबरने सांगितले. हा सुपर वाय्झार एकंदर सर्वांशी फार उद्धट पणे वागत असे व इतर्ही बरेच प्रकार केले होते. पुढे ह्या सर्व टीमचेच उच्चाटन झाले .

समाजातील वरच्या स्तरावर असतात ते हाती सत्ता आणि पैश्याची ताकद असलेले लोकं, त्या खाली मध्यमवर्गीय, तर त्याही खाली दारिद्ररेषेखाली खितपत पडलेली जनता. त्या जनतेतही उच्चवर्णीयांच्या तुलनेत दलित आणखी खालच्या स्तरावर असतात. आणि त्यातही सर्वात तळाशी असते ती दलित स्त्री... थोडक्यात तुम्ही गरीब असाल, दलित असाल, आणि एक स्त्री असाल तर तुम्ही नरकात जन्म घेतला आहे.>> इन्टर सेक्षनालिटी म्हणजे हेच ना.

चांगली ओळख चित्रपटाची.

तेव्हा थोडीफार गाजली होती ही घटना. यावर लेख पण वाचला होता. पण एवढे विस्तृत नव्हते त्यात. बघायला हवा चित्रपट.

हो ना. जर पुरावे असतील तर बेल मिळतो बलात्कार केस मध्ये?
आणि जरी आरोप सिद्ध होत नाही तो पर्यंत गुन्हेगार नाही असे जरी असेल तरी लगेच asset वगैरे!

कोर्ट बोलले he is asset
>>>
धन्य आहेत. काय संदेश जाईल यातून याचा जरा तरी विचार करायचा.

कोर्ट बोलले he is asset>>>
कोर्टाला ती मुलगी asset वाटली नसावी का. ती पण त्याच ठिकाणी student आहे ना?

त्याला असेच सोसायटीच्या दारासमोर अनेक बायकांनी एकत्र येउन चपलेने बडिवले होते
>>>>
माझ्या जुन्या जॉबच्या काही महिला कर्मचाऱ्यांनाही एका मॅनेजर लेव्हलच्या माणसाला अशीच मारायची ईच्छा होती. पण तरीही नोकरी जपायची होती. म्हणून सहन करत होत्या. तो मुद्दाम त्यांना एकेकीला कामानिमित्त केबिनमध्ये बोलावून गप्पा मारत बसायचा. वैयक्तिक प्रश्न विचारायचा. तर कधी सूचक बोलायचा. लाळघोटेपणा करायचा. पण हात तर नाही पकडत ना असे म्हणून आपल्या नोकरी वा करीअरवर गदा नको म्हणून त्याला झेलत होत्या.
हे असे कित्येक ठिकाणी चालतही असावे. पण बरेचदा याची चर्चाही टाळली जाते.

दोघांनाही म्हटलंय asset. पण ज्याच्यावर बलात्काराचा आरोप आणि clear prima facie case आहे त्यालाही asset!

कोर्टाला ती मुलगी asset वाटली नसावी का.
>>>>
कदाचित आरोप सिद्ध झाल्यावर निकाल म्हणून दोघांना लग्न करायला सांगतील. असे प्रकार एक दोन चित्रपटात पाहिले आहेत. ज्याने बलात्कार केला तोच सुधारलेला दाखवून त्याच्याशी लग्न दाखवले तर पब्लिक सुद्धा ते आनंदाने स्विकारते. याने कौमार्यभंग एकाकडूनच झाल्याने आब्रू परत मिळते असा काहीसा फंडा असावा..

अनिल कपूर , जुही चावळाचा मुवि आहे बहुतेक >> हो, तो बेनाम बादशाह. अजूनही काही माहीतीत आहेत. नावे आठवून शोधून टाकतो.

बऱ्याच चित्रपटात दाखवलय असं. खास करून एकेकाळी बस म्हणजे व्हिडीओ कोच म्हणून सुरू झाली त्यात दाखवणाऱ्या चित्रपटात असायचे ते.

राजा की आएगी बारात, तेजस्विनी
>>>>
येस्स, हेच दोन तीन चटकन डोळ्यासमोर आलेले. पण या दोघांची नावे आठवत नव्हती. बेनाम बादशाहचे तेवढे लगेच आठवत होते.