मुंबईच्या तीन प्रमाणवेळा

Submitted by प्रसाद70 on 26 May, 2021 - 07:03

मुंबईच्या तीन प्रमाणवेळा
© प्रसाद शेज्वलकर
मुंबईत एकेकाळी तीन प्रमाणवेळा अस्तित्वात होत्या, अगदी 1955 पर्यंत या प्रमाणवेळा पाळल्या जात होत्या .1884 मध्ये अमेरीकेतील वाँशिंग्टन येथे भरलेल्या इंटरनॅशनल मेरीडीअन काँन्फरन्स मधे भारतामध्ये दोन टाईम झोन निश्चित करण्यात आले. बाँम्बे टाईम झोन (73 पूर्व रेखांश) व कलकत्ता टाईम झोन (90 पूर्व रेखांश) मुंबई ची वेळ (GMT +4 तास 51मि.) पुढे ठेवण्यात आली. 1906 मधे ब्रिटीशांनी भारताच्या बरोबर मधून, अलाहाबाद मधून जाणारे (82.5 पूर्व रेखावृत्त) प्रमाणवेळ ठरवण्यासाठी निश्चित केले. त्याला IST (INDIAN STANDARD TIME) असे नाव दिले. पण मुंबई आणि कलकत्ता यांनी स्वतःच्या प्रमाणवेळा अनुक्रमे 1955 आणि 1948 पर्यंत पाळल्या.
ज्यावेळी मुंबई लोकल टाईम ऐवजी IST टाईम पाळावा असा ठराव आला, त्यावेळी लोकमान्य टिळक यांच्या विरुद्ध मुंबई हायकोर्टात बाँम्ब स्फोटाचा खटला चालू होता . लोक त्यावेळी सरकार विरुद्ध प्रचंड खवळलेले होते त्याच वेळी फिरोजशहा मेहता यांनी मुंबई लोकल टाईम ऐवजी IST बदलण्यास मुंबई म्युनिसिपल कार्पोरेशन मध्ये विरोध केला, त्यामुळे म्युनिसिपल कार्पोरेशनने हा ठराव बासनात गुंडाळून ठेवला. हा लोकल बाँम्बे टाईम मुंबईपासून सायन - माहीम पर्यंत पाळला जायचा.
1870 मध्ये ब्रिटीशांनी 'रेल्वे मिन टाइम ' मद्रासवरुन जाणाऱ्या रेखावृत्तावरुन निश्चित केला. कारण मद्रास हे मुंबई व कलकत्ता या त्यावेळच्या मोठ्या शहरांच्या साधारण मधे येते. तारखाते, मुंबईची उपनगरे ,रेल्वे मधे हा ‘मद्रासटाईम’ पाळला जायचा. ह्यावेळेत आणि मुंबई लोकल टाईम मधे 30 मिनिटांचा फरक होता. म्हणजे मुंबई शहरातील क्लाँक टाँवरवरील घड्याळ दहा वाजताची वेळ दाखवत असेल तर रेल्वे स्थानकातील घड्याळ साडे दहाची वेळ दाखवत असे. मुंबईचे त्यावेळचे गव्हर्नर जेम्स फर्ग्युसन (1880 ते 1885) यांची देखील या बाँम्बे टाईम आणि रेल्वे टाईम या घोळामुळे दोनदा गाडी चुकली.
पुढे 1906 मधे हा रेल्वे टाईम IST मधे बदलण्यात आला. तरीदेखील हा फरक तसाच राहिला कारण मद्रास टाईम (GMT +5 तास 21 मिनिटे) व IST ( GMT +5 तास 30 मिनिटे) आता हा फरक (30+9) 39 मिनीटांचा झाला.
तिसरी प्रमाणवेळ म्हणजे ' पोर्ट सिग्नल टाईम ', ही प्रमाणवेळ बंदरातील बोटींसाठी वापरण्यात येत असे. ती नेव्हल डाँकयार्ड, नेव्हल बेसवर उपयोगात आणत. त्यासाठी ' टाईम बाँल ' सिस्टिम वापरत. माझ्या आधीच्या लेखात मी याबद्दल सविस्तर लिहिले आहे. पोर्ट सिग्नल टाईम (GMT+ 5 तास) पुढे असे. बॉम्बे कँसल मधील टाईम बाँल यंत्रणा बहुधा बाँम्बे टाईम दाखवण्यासाठी वापरत असावेत.
जँकोब ससून मिल (लालबाग) आता युनायटेड मिल नंबर वन मधे जेव्हा बाँम्बे टाईम ऐवजी IST पाळण्याचे ठरविले आणि सकाळी 05.30 वाजता त्यांनी घड्याळात 06.09 वाजताची वेळ दाखवली त्यावेळी तिथल्या 4500 कामगारांनी दंगा केला, घड्याळाची तोडफोड आणि संप केला, त्यामुळे मिल मालकाने पुन्हा बाँम्बे टाईमची वेळ पाळण्यास सुरवात केली.
पुढे 1950 नंतर मुंबई शहराला जशी उपनगरे जोडली जाऊ लागली, तसा सगळ्या उपनगरातील IST मुंबई म्युनिसिपल कार्पोरेशनने 1955 मधे मुंबई शहर व उपनगरांसाठी स्विकारला.

Ref-: 1.https://en.wikipedia.org/wiki/Bombay_Time
2. Did you know Bombay followed three time standards all at once in the past? Mid-day article.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

एकट्या मुंबईत तीन तीन वेळा पाळताना गोंधळ होत असेल. पण भारतात तरी दोन ते तीन वेळा पाळाव्यात म्हणजे काही तोटा नसून फायदाच होईल. मुख्यः ईशान्येतील राज्यांमध्ये फार उपयोगाचे होईल.

छान माहिती मिळाली!
मुंबईचे त्यावेळचे गव्हर्नर जेम्स फर्ग्युसन (1880 ते 1885) यांची देखील या बाँम्बे टाईम आणि रेल्वे टाईम या घोळामुळे दोनदा गाडी चुकली. >> हे वाचून गंमत वाटली!

छान माहिती!
माझ्या लहानपणी काही लग्नपत्रिकांमध्ये मुहूर्ताच्या वेळेपुढे कंसात IST लिहिलेलं असायचं. बहुतेक तेव्हा वडिलांनी कारण असं सांगितलं होतं की पूर्वी लोकल टाईम आणि स्टँडर्ड टाईम दोन्ही वेगवेगळे असायचे त्यामुळे ती पद्धत पडली आणि ती चालू राहिली आहे.

बॉम्बे टाईम हा एके काळी विनोदाचा विषय होता. सदा उशिराने येणाऱ्या व्यक्तीस बॉम्बे टाईम असे नाव असे. ट्रेकिंग किंवा एखाद्या ग्रूप मध्ये वेळेवर या म्हणून आधी सांगूनही जर कोणी उशीरा येताना दिसला तर बॉम्बे टाईम बॉम्बे टाईम असा मोठमोठ्याने गजर करून त्याला ओशाळवाणे करीत. अर्थात असे मेंबर्स निगरगट्टच असत. त्यांना फरक पडत नसे.

सगळ्यांना धन्यवाद
दोन टाईम झोन ठेवताना बरेच बदल करावे लागतील उदाहरणार्थ रेल्वेची सिग्नल यंत्रणा.

जर कोणी उशीरा येताना दिसला तर बॉम्बे टाईम बॉम्बे टाईम असा मोठमोठ्याने गजर करून त्याला ओशाळवाणे करीत.
>>>>>>
हे सुद्धा कधी ऐकिवात नाही.. साधारण कुठल्या काळात हे जास्त प्रचलित होते? ८० च्या दशकात का?

माहितीपूर्ण लेख व रंजकही !
( दक्षिण व मध्य मुंबैची, विशेषतः 'काॅमन' पाणी भरण्याचीच सोय असलेल्या चाळींमधे, आणखी एक आत्यंतिक महत्वाची प्रमाणवेळ होती, अजूनही असावी; पहांटे फक्त एक- दीड तासांसाठी नळाला पाणी येण्याची ! Wink )

Pages