सुख नावाचे मृगजळ !

Submitted by Swati Karve on 22 February, 2021 - 03:27

जगण्याच्या शर्यतीत चालु असलेली
धावपळ, दग दग, ओढाताण
कधी कधी खूप असह्य होते...
मनातला विचारांचा कोलाहल,
ती तगमग जीव पार
पिळवटून काढते...
अश्या वेळी वाटतं,
नको ते विचार,
म्हणजे विचारांची दिशा
चुकण्याचा प्रश्नच नाही.
नको त्या भावना,
म्हणजे भावना दुखावल्या
जाण्याचा प्रश्न नाही.
नको ती स्वप्नं,
म्हणजे स्वप्नभंग
होण्याचा प्रश्न नाही.
नको ती आशा, ते प्रयत्न,
म्हणजे पदरी निराशा,
अपयश येण्याचा प्रश्न नाही.
मनी असावा एक विरक्त,
निर्विकार, स्थितप्रज्ञ भाव...
दुःखाच्या, संकटाच्या
वादळानंतर नंतर
तो निर्विकार, विरक्त भाव
घट्ट कवटाळून ठेवण्याचा
प्रयत्न केला जातो खरा,
पण त्या प्रयत्नाला ही
यश येतचं असं नाही.
मातीत रुजू पाहणारं छोटसं
रोपटं किती ही प्रतिकूल परिस्थिती
असली तरीही आपोआप
सूर्यप्रकाशच्या दिशेने झेपावत
हळू हळू वाढतं....
माणसाचं मनही तसंच,
किती ही दुःख, संकटं
कोसळली तरिही,
आजूबाजूला घडणाऱ्या
गोष्टींमधले, छोटे छोटे,
आनंदाचे कण वेचून
हळू हळू स्थिरावतं...
आणि मग पुन्हा नव्याने
सुरू होतो तोच खेळ,
इच्छा, आकांक्षा, अपेक्षा,
स्वप्न, विचार, भावना...
काय गंमत आहे,
आयुष्यभर माणूस आपला
मान सम्मान, स्वाभिमान, अहंकार
खूप खूप जपतो, कुरवळतो...
पण प्रत्येक वेळी लाचार होऊन
सुख नावाच्या मृगजळा मागे
धावताना मात्र माणसाचा अहंकार
कधी ही आडवा येत नाही...!

- स्वाती

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीले आहे.
इच्छा, आकांक्षा, अपेक्षांच्या पाठोपाठ आशा निराशा सुख दु:ख हे सगळे येते.

>> नको ते विचार,
>> म्हणजे विचारांची दिशा
>> चुकण्याचा प्रश्नच नाही.

सहमत.
हेच महत्वाचे. विचारांचे रस्ते एकमार्गी असतात.
परत फिरणे अशक्य नसले, तरी कठीण मात्र आहे.
विचारांचा रस्ता घेतानाच जाणीवपूर्वक घ्यावा...

Happy