मज गाणे शोधत येते

Submitted by दाद on 19 November, 2009 - 00:07

आयुष्य रोजचे असते, दिनचर्या वाहत असते
दिवस आपला नसतो, अन रात्रंही परकी होते

मी नको नको म्हणते, अन तरी पुरती बुडुनी जाते
सापडेन माझी मजला शक्यताही असली नुरते

नि:श्वास सोडण्यापुरताही श्वासाला वेळ न उरतो
गुदमरतो जीव बिचारा जगणेच जणू विस्मरतो

क्षण क्षणास जोडायाचा कण-कणास रोगच जडतो
डुचमळे जोग कळशीत, पायातळी भोगच जळतो

बरबटते निर्मळ बिंब अन गढूळ जीवन होते
तशी धावत नाही मी, पण आयुष्य ओढुनी नेते

हो अवेळ हर वेळेची भरदिसा सांजही होते
गर्दीत गर्दं एकली का अवघी करीत सुटते

मग प्राण बनुनि श्वासात कुणी हलके हलके शिरते
अज्ञाताच्या देशातुन पक्षांसम येती खलिते

चांदणेच पागोळ्यांनी जणू झरते, कधी झिरमिळते
कधी शांत ज्योत दिवलीची अन कधी ढणढणते पलिते

कधी प्रपात शब्दं-सुरांचा कधी केवळ लकेर उठते
अन निरव शांतता मधली गुज काही सांगू बघते

कधी शब्दंच संपुनी जाती तरी सांगायाचे उरते
’तोम-तदियन-तन-देरेना’ही त्या हृदयीचे ह्या कळते

गुणगुणते मी काही, की गाणेच मला गुणगुणते
कधी हरवू देतच नाही मज गाणे शोधत येते

गुलमोहर: 

अप्रतिम कविता.. जबराच..:)
एक लहानशी सुचना, 'तशी धावत नाही मी, पण आयुष्य ओढुनी नेते' यातला स्वल्पविराम कल्पनेला मर्यादा घालतोय असं वाटतं.. तो नसता तर???
चु. भू. दे. घे. Happy

देवा चांगला विचार
तो स्वल्पविराम 'पण' नंतर केला (यति पाळायचा असेल तर तो स्वल्पविराम पण नंतरच पाहिजे ) तर वेगळी अर्थछटा येईल Happy

नि:श्वास सोडण्यापुरताही श्वासाला वेळ न उरतो
गुदमरतो जीव बिचारा जगणेच जणू विस्मरतो

क्षण क्षणास जोडायाचा कण-कणास रोगच जडतो
डुचमळे जोग कळशीत, पायातळी भोगच जळतो

मग प्राण बनुनि श्वासात कुणी हलके हलके शिरते
अज्ञाताच्या देशातुन पक्षांसम येती खलिते

हे आणि गाणे मज गुणगुणते हे सर्व मस्त! सर्वात जास्त आवडले ते जोग, भोग आणि पलिते. सुंदर कविता शलाकाताई!!

दाद, तुमची कविता छानच आहे. आवडली.

कधी शांत ज्योत दिवलीची अन कधी ढणढणते पलिते ही ओळ फार घाटदार आहे.
डुचमळे जोग कळशीत, पायातळी भोगच जळतो
ही ओळही फार आवडली.
चांदणेच पागोळ्यांनी जणू झरते, कधी झिरमिळते
सारख्या ओळीही कानांना फार छान वाटतात.

अवांतर:

लय किंवा वृत्त सांभाळणे इत्यादी गोष्टी सरावाने जमतात. पण मुळात रचनेत काव्य असायला हवे. अधिक चर्चा यतीसारख्या तांत्रिक मुद्यापेक्षा कवितेतल्या काव्यावर व्हायला हवी. तिच्या मौलिकतेवर, सार्थकतेवर व प्रामाणिकतेवर व्हायला हवी.

कविता कवीच्या ओळखपत्रासारखी असायला हवी. "हं एवढी मिरवते आहेस, पण तुझ्याकडे नवीन काय आहे गं सांगायला?" असा प्रश्न कुणी तिला विचारलाच तर तिला पटेलसे उत्तर देता यायला हवं

अनेक कवींच्या रचना अतिशय चांगल्या, सफाईदार व उत्तम असतात. पण त्यांची कविता देहावर भलत्याच कवीचे ओळखपत्र जाणता-अजाणता लटकवून आलेल्या असतात. किंबहुना एकाच कवीकडे कधीकधी अनेक कवींची ओळखपत्रे असू शकतात.

अनेकदा उणिवादेखील कवीची ओळख सांगतात. काही कवींची कविता ओबधोबड असते. पण तिच्याकडे विचारगुरुत्व असतं. स्वतःची अशी ओळख असते.

रचनेतला सफाईदरपणा, काही लकबी, शब्दयोजन, नवीन शब्दनिर्मिती, मांडणी इत्यादी गोष्टी कवीची ओळख पटवून देत असतातच. पण खरी ओळख ह्या गोष्टींपलीकडचीदेखील असावी.

सुंदर कविता. अगदी खोल खर्जातल्या आवाजात, संथ चालीत कोणी म्हटली ना तर अगदी मस्त आणं होईल, साथीला तंबोरा अन एकच एक बासरी!

देवा, मला अगदी तेच आणि तितकच म्हणायचय. "मी तशी धावत नाही... धावणार्‍यांतली नाही(?)... पण आयुष्य ओढून नेतं"... इतकच आणि हेच म्हणायचय.
मी आधी म्हटलं तशी फार फार साधी आणि सरळ कविता आहे... गर्दटलेल्या आयुष्यात माझ्या सोबत असणारं, मला भेटणारं गाणं... हा किती समृद्ध करणारा अनुभव आहे... समृद्ध कशाला, माझ्यातल्या "मी"ला हरवू न देणारं हे गाणं सतत बरोबर असणं... ही एक "जीवना"वश्यक गोष्टच झाली... नाही का?

मिल्या, लय ही सापेक्षं असते... हेच बरोबर. कधी भेटलास तर "लयीत" म्हणून दाखवेन त्या दोन ओळी Happy
(आणि खुसपट कसलं रे... "हे असं केलं ना तर अधिक सुंदर दिसेल गं" इतक्या साध्या सरळ वाक्याला खुसपट म्हणणार्‍यांच्या तोंडाला आग लागो Happy )

बैरागी, "ढणढणते पलिते" वाली ओळ घाटदार आहे हे तू म्हटल्यावर मी परत एकदा वाचली... खरच. आणि वाटतेय खरी! गंमत आहे... माझी मला न दिसलेली अशी एखादी गोष्टं बघताना गंमत वाटतेय.
ते अवांतर खूप आवडलं आणि अगदी खरय.

एखाद्या लेखकाचा ठसा तयार होण्यासाठी जे सातत्याने लिहिणं आवश्यक आहे तसं माझं नाही. "डोक्यात आलं म्हणून, आणि आलं तेव्हा वेळ मिळाल्यास" ह्या गोष्टींचे ग्रह जमल्यास लिहिल्याने सातत्यं असं नाही. "माझा असा ठसा नाही" हाच ठसा असावा... असलाच तर, असं मला वाटतं.
अनेक इतरांचे ठसे आहेत असं म्हणत असलात तर...
ते ही शक्यं आहे हं... आणि माझ्यामते त्यात वाईट काही नाही. लेखक घडण्याच्या काळात असं होतं.

माझी ही कविता तुला कोणत्या प्रकारात मोडते असं वाटतय? अगदी मोकळेपणाने सांगं रे बाबा. (तिची स्वतःची अशी ओळख आहे असं म्हटलस तर मी खरच एक उंच उडी मारणारय...)

दाद, तुला काय म्हणायचं आहे ते कळलं होतं गं.. म्हणूनच मी तिथे सुचना असं म्हंटलं शंका नाही.. खरं तर सुचना हा ही चुकीचाच शब्द आहे. मनात आलं आणि बोलून दाखवलं झालं..:)

बैरागी, एक शंका. कविता हे कविचं ओळखपत्रं असणं चांगलं की वाईट?

कधी शब्दच संपुनी जाती तरी सांगायाचे उरते
’तोम-तदियन-तन-देरेना’ही त्या हृदयीचे ह्या कळते!! व्वा! अतिसुंदर!!!!
खुप छान कविता. Happy

दाद, मिल्या म्हणाला तसं मलाही काही ठिकाणी लय जराशी चुकतेय असं वाटलं..
पण ते दुय्यम.. (आणि तुझ्या तोंडून योग्य लयीत ऐकायला नक्कीच आवडेल! )
कविता आवडली..
कधी हरवू देतच नाही मज गाणे शोधत येते>> छान! Happy

दाद,
अतिशय सुंदर.

माझ्यासारख्या अपूर्णत्वाने तुझ्यासारख्या पुर्णत्वाला कशी दाद द्यावी हेच मुळी समजत नाही.

पण एक मात्र नक्की - `शब्दांना जिवंत करून मनातील भावनांना जाग्रुत करण्याचे सामर्थ्य' तुझ्यात आहे. ह्या निसर्गदत्त देणगीला अशीच जप दुधावरच्या सायी सारखी. अन् सतत होऊ दे महोत्सव जगण्याचा, जगवण्याचा...

Hats off 2 U......

अगदी खोल खर्जातल्या आवाजात, संथ चालीत कोणी म्हटली ना तर अगदी मस्त गाणं होईल, साथीला तंबोरा अन एकच एक बासरी! >>

अगदी Happy
आतापर्यंत कितीदा वाचली. प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी सापडतंय!

सुरेख! क्लासिक.

मग प्राण बनुनि श्वासात कुणी हलके हलके शिरते
अज्ञाताच्या देशातुन पक्षांसम येती खलिते

हे अतिशय आवडलं.

दाद, रोज वाचते तुमची हि कविता, कुठे नेवुन ठेवलय तुम्ही या कवितेला, पारायणं झाली वाचुन पण प्रतिक्रिया सुचतच नाहिये !!
Happy

खरच मला मनापासुन तुम्हाला एकदा तरी भेटायच आहे... !!
( कधी योग येइल काय माहित ??)
Happy

लयदार मस्त.
शब्दनिवड व त्यांची मांडणी आवडली.
बैरागींच्या अवांतर विचारांशी सहमत.

गुणगुणते मी काही, की गाणेच मला गुणगुणते
कधी हरवू देतच नाही मज गाणे शोधत येते

कसलं सुंदर लिहीलंय.........!!!

हल्ली असं कुठं वाचायला मिळतं ? अभिप्राय काय द्यायचा खरंच !!!! मज गाणे शोधत येते.....

उमेशने ( कोठीकर ) मला ही कविता दिली वाचायला..... खरंच आभार त्याचे

प्रतिसादांमधे बैरागी यांचा प्रतिसाद खूपच सुंदर.... या धाग्यावर खूप आनंद आहे

Pages