आमार कोलकाता - भाग ६ – बंगाली कलासंस्कृतीचा अध्वर्यु

Submitted by अनिंद्य on 14 January, 2020 - 00:29


लेखमालेचे यापूर्वीचे पाच भाग इथे वाचता येतील : -
https://www.maayboli.com/node/72801
https://www.maayboli.com/node/72846
https://www.maayboli.com/node/72950
https://www.maayboli.com/node/72977
https://www.maayboli.com/node/73013

आमार कोलकाता - भाग ६ – बंगाली कलासंस्कृतीचा अध्वर्यु

प्रत्येक भारतीय ‘जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत गातो तेव्हा तो रवींद्रनाथ टागोरांचे गीत गात असतो. भारताचेच नाही तर बांगलादेशचे राष्ट्रगीतही टागोरांनी लिहिले आहे. दोन-दोन राष्ट्रांचे राष्ट्रगीत लिहिणारे ते बहुदा जगातील एकमेव कवी असावेत. (काहींच्या मते श्रीलंकेचे राष्ट्रगीतही टागोरांनीच लिहिलय, पण त्याबद्दल एकवाक्यता नाही.) भारताचे ‘जन-गण-मन‘ आणि बांगलादेशचे ‘आमार सोनार बांगला‘ दोन्ही मात्र निर्विवादपणे टागोरांची अपत्ये. दोन्ही देशांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केलंय, त्यांच्या स्मृती जपल्या आहेत, अमर केल्या आहेत.

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणजे बंगाली संस्कृती-साहित्य-कला-समाज सर्व प्रांत व्यापून दशांगुळे उरलेलं व्यक्तिमत्व. बंगाली जनमानसाच्या ‘मर्मबंधातील ठेव’. कोलकाता शहर टागोरांची जन्मभूमी आणि कर्मभूमीही. उत्तर कोलकात्यातील जोरासंखो ठाकुरबारी हे टागोर परिवाराचे कोलकात्यातील निवासस्थान. रवींद्रनाथांचा जन्म (१८६१) आणि मृत्यू (१९४१) ह्या वास्तूने बघितला. जोरासंखोच्या निष्प्राण भिंती रवींद्रनाथ टागोरांच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या घटनांच्या साक्षीदार आहेत. त्यामुळे साहजिकच कोलकाता शहराला टागोरांबद्दल आत्मीयता आहे, शहराचे नाव उंचावणाऱ्या त्यांच्या कार्यलौकिकाबद्दल अभिमान आहे.

48917619017_0b7e91656d.jpg

टागोरांचा ‘गीतांजली’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध होऊन त्यांना साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला तो १९१३ साली. हा पुरस्कार त्यांना कवितेच्या क्षेत्रातील योगदानामुळे मिळाला खरा पण रवींद्रनाथांचे योगदान फक्त कवितांपर्यंतच मर्यादित नव्हते. कादंबरी, नाटके, लेख, लघुकथा, प्रवासवर्णने, निबंध अशा सर्व साहित्यविधा रवींद्रनाथांना वश होत्या. इंग्रजी आणि बंगाली भाषांवर असामान्य प्रभुत्व होते. कंठसंगीत, वाद्यसंगीत, चित्रकला, सुलेखन, नाट्यमंचन, शिक्षण, समाजकार्य, धर्म-अध्यात्म, लोककला, स्थापत्यकला अशा अनेकानेक प्रांतात त्यांनी यथेच्छ मुशाफिरी केली. त्यांच्या व्यक्तित्वाचा फार मोठा प्रभाव कोलकात्याच्या समाजजीवनावर पडला.

रवींद्रनाथांची प्रसिद्ध कविता

Where the mind is without fear and the head is held high
Where knowledge is free
Where the world has not been broken up into fragments
By narrow domestic walls
Where words come out from the depth of truth
Where tireless striving stretches its arms towards perfection
Where the clear stream of reason has not lost its way
Into the dreary desert sand of dead habit
Where the mind is led forward by thee
Into ever-widening thought and action
Into that heaven of freedom, my Father, let my country awake.

वयाच्या अवघ्या आठव्या वर्षांपासून कविता लिहिणाऱ्या रविंद्रनाथांनी १६ व्या वर्षी पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध केला. गुरुदेव टागोरांच्या सुमारे २३०० रचना ‘गीतबितान‘ ह्या नावाने ओळखल्या जातात. ‘गीतबितान’चा शब्दशः अर्थ गीतांची बाग. प्रेम, पूजा, निसर्ग अशा विषयांना वाहिलेली ही गीते म्हणजे त्यांचे काव्यमनोगतच आहे. काही मोजकी गीते ‘विचित्रा’ म्हणून ओळखली जातात, कारण त्यांचे विषय अगदी वेगळे आहेत.

वयाच्या विसाव्या वर्षी रवींद्रनाथांनी नाटके लिहायला सुरूवात केली. टागोरांची नाटके आणि संगीतनाट्यात त्यांनी केलेल्या प्रयोगांनी बंगाली नाट्यसृष्टीला वेगळ्या धाटणीच्या नाट्याची ओळख करून दिली. ‘रवींद्रनाट्य‘ अशी एक वेगळीच नाट्यविधा त्यांनी निर्माण केली. संगीत आणि नृत्यांनी नटलेल्या नाटकांमध्ये कलाकारांच्या मोहक पण कमीतकमी हालचाली आणि नाजूक पदन्यास रवींद्रनाट्याचे वैशिष्ट्य असते. संथ सुरुवात आणि हळूहळू उत्कंठा वाढवत रोचक-रंजक शेवट असा फॉरमॅट टागोरांच्या नाटकात दिसून येतो. जोरासंखो बारीच्या रंगमंचावर रवींद्रनाट्यांचे प्रयोग होत, त्यासाठी गुणिजनांची गर्दी लोटत असे. टागोरांच्या नाटकांना खरी प्रसिद्धी मिळाली ती शंभू मित्र यांच्या ‘बहुरूपी थियेटर’मुळे. बहुरूपीने टागोरांची विसर्जन, वाल्मिकी प्रतिभा, चंडालिका सारखी प्रसिद्ध-अप्रसिद्ध नाटके मोठ्या प्रमाणावर सादर केली आणि त्यांना कोलकात्यातल्या रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

८४ लघुकथांचा एक संग्रह प्रसिद्ध करून रवींद्रनाथांनी बंगाली लघुकथांचा पायंडा पाडला. सर्व कथा बंगालच्या मातीतल्या, साध्या सोप्या विषयांवर आहेत पण त्यातील संदेश आणि प्रतीके चिरंतन आणि सर्व जगाला लागू होणारी आहेत. काबुलीवाला (१८९२), अतिथी (१८९५), क्षुधित पाषाण (१८९५) अशा प्रसिद्ध कथांचे विषय सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवन-संघर्षातून आलेले आहेत. टागोरांच्या कथानायिका हा बंगाली साहित्यातील एक रोचक आणि मननीय अध्याय. त्यांच्या सर्व कथांमधील नायिका आपल्या सांप्रत काळापेक्षा पुढचा विचार करणाऱ्या, हुशार आणि वैचारिक स्पष्टता असलेल्या स्त्रिया आहेत. पुरुषांपेक्षा कोठेही कमी नसलेल्या, उलट काकणभर सरसच. दर्पहरण, हैमंती सारख्या कथांमध्ये बंगाली स्त्रीजीवनाचे तरल चित्रण आहे. एक विशेष बाब म्हणजे टागोरांच्या बहुतेक नायिका अपत्यहीन आहेत. मृणाल असो, बिनोदिनी असो की बिमला, चारुलता. बहुतेक नायिकांना अपत्य नाही. मातृशक्तीचा गौरव करणाऱ्या मातृसत्ताक धाटणीच्या बंगाली संस्कृतीतल्या या कथांमध्ये अपत्यहीन नायिका हा मुद्दा मला विशेष वाटतो.

टागोरांनी स्वधर्मातील विशेषतः जातिप्रथेच्या कुरूपतेवर भाष्य टाळले असा आरोप त्यांच्यावर होतो पण तो योग्य नाही. त्यांनी जीवनाच्या सर्व भल्याबुऱ्या विषयांवर लिहिले आहे. उदा.:- ‘चंडालिका’ ह्या नाटकात तथाकथित अस्पृश्य चांडाळ समाजातील वाळीत टाकलेली छोटी मुलगी प्रकृती आणि भिक्खु भन्ते आनंद यांच्यातील संवादाने कथा जितक्या सहजतेने फुलवली आहे त्याला तोड नाही.

48916887933_75036a5221_w.jpg

टागोरांच्या कथांवर आधारित सिनेमांची जंत्री बरीच मोठी होईल. टागोरांच्या ‘नष्टनीड’ ह्या रचनेवर सत्यजित रॉय यांचा ‘चारुलता’ हा प्रसिद्ध सिनेमा बेतलेला आहे. समाप्ती, मणिहार आणि पोस्टमास्टर अशा तीन टागोरकथांनी एकत्रितपणे ‘तीन कन्या’चे रूप घेतले आहे. तपन सिन्हानी टागोरांच्या ‘अतिथी’ला सिनेरूप दिले आहे. घरे बायरे, गोरा, काबुलीवाला, तप्तपदी, उपहार, थोड्या अलीकडच्या चतुरंग, चोखेर बाली अशा अनेक सिनेमांच्या कथा मूलतः टागोरांच्या आहेत.

48917414701_85a583d3e9_m.jpg

संगीत क्षेत्रातले टागोरांचे योगदान तर असामान्य म्हणावे असे आहे. गायन आणि वादन यात नाव मिळवलेल्या मोठ्या भावाकडून, ज्योतिन्द्रनाथांकडून त्यांना संगीताचे प्राथमिक ज्ञान मिळवता आले. लहानपणापासून कानावर आणि मनावर संगीताचे संस्कार झाले. ‘रवींद्रसंगीत‘ ही पूर्णतः वेगळ्या धाटणीची संगीत विधा निर्मिण्याचे श्रेय टागोरांना आहे. टागोरांनी स्वतः रचलेली जवळपास २३०० गीते हा रवींद्रसंगीताचा आत्मा आहे. रवींद्रसंगीत मूलतः हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या रागांवर बेतलेले आहे, अनेक गीतांवर भावप्रधान ठुमरी गायकीचा जाणवण्याइतपत प्रभाव आहे. बहुतेक गीते सुंदर निसर्ग, अमूर्त ईश्वर आणि मनुष्याच्या भाव-भावना ह्याच विषयांना वाहिलेली आहेत. हे विषय टागोरांचे हातखंडा विषय आहेत, त्यामुळे स्वर-रस-शब्द अशी सुंदर त्रिवेणी जुळून येते. विषय, भाव, राग, स्वर, काव्यसौष्ठव, गेयता-श्रवणीयता अशा सर्व निकषांवर रवींद्रसंगीत मौलिक ठरते. भारतीय शास्त्रीय संगीताचा ठसा आहे, पण गडद नाही. काव्यातील ‘भाव’ सर्वोच्च महत्त्वाचा आहे, त्यावर कुरघोडी करणाऱ्या सुरावटी अजिबात नाहीत. भावार्थाला पूरक होईल इतपतच भारतीय रागदारी संगीताचे मिश्रण आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील काही अनवट रागांचा कळेल-न-कळेल असा बेमालूम मिलाफही काही गीतांमध्ये दिसून येतो. पाश्चात्य पद्धतीप्रमाणे संपूर्ण रवींद्रसंगीत हे लिखित सुरावटींचे असते, त्यामुळे जगात कोठेही गायिले तरी नव्यानेच संगत करणाऱ्या अपरिचित वादकांनाही समजते आणि साथसंगत करणारी वाद्ये सुरात वाजविता येतात. ह्याच कारणामुळे संगीतरचनेतील रेखीवपणा थोडा जाचक होतो आणि सुरावटींमध्ये लवचिकपणा राहत नाही असे काही संगीतप्रेमींचे मत आहे. ह्या गीतांचे दुसऱ्या भाषेत भाषान्तर किंवा भावरुपान्तर करतांना मात्र त्यातील गोडवा कमी होतो असे समस्त बंगालीजनांचे मत आहे. एक मात्र आहे, रवींद्रसंगीताच्या ह्या सुरावटी समजल्या नाहीत तरी मनाला भिडतात, अर्थात आवड आणि तयार कान असेल तर. त्याची आवड निर्माण व्हावी लागते. काहीसे बीथोवेन, बाख आणि मोझार्ट अशा प्रसिद्ध संगीतकारांच्या रचना ऐकण्यासारखे. अन्यथा अनेक लोकांना रवींद्रसंगीत प्रचंड कंटाळवाणे वाटू शकेल, वाटतेही. अनेकांना प्राणप्रिय वाटणाऱ्या आणि अनेकांना अर्थहीन-कंटाळवाणे वाटणाऱ्या रवींद्रसंगीतासाठी आजही जगभरातील दर्दी बंगालीजन जीव ओवाळून टाकतात. टागोरांचे हे असामान्य योगदान एक जागतिक ठेवा आहे.

बंदिस्त शाळा आणि अभ्यासक्रम टाळून निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थ्याना वेगळ्या धाटणीचे, जीवन समृद्ध करणारे शिक्षण देण्याचा ध्यास घेऊन टागोरांनी बोलपुरला ‘शांतिनिकेतन’ स्थापन केले. हा प्रयोग जगभर नावाजला गेला त्यात आश्चर्य नाही. आधुनिक भारताला अनेकानेक उत्तम कलाकार, साहित्यिक, चित्रकार, शिल्पकार, नाटककार शांतिनिकेतनने दिले आहेत.

रवींद्रनाथ टागोरांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली असली तरी टागोर कुटुंबातील ते एकमेव कलाकार नाहीत. कुटुंबातील अनेक सदस्यांनी वेगवेगळ्या कलाविषयात मोठी मजल गाठली आहे. सामवेदात वर्णिलेल्या रागरागिणींना सतार आणि तबल्यावर, कंठसंगीताद्वारे प्रत्यक्ष रूप देऊ पाहणारे हरकुमार टागोर असोत की नाटककार जतींद्रमोहन टागोर. भारतीय शास्त्रीय वाद्यसंगीताचा पाश्चात्य पद्धतीचा पहिला ‘ऑर्केस्ट्रा’ बसवणारे सतारवादक सुरेंद्रमोहन टागोर असोत की बंगाली चित्रकलेला नवीन आयाम देणारे ‘इंडियन सोसायटी ऑफ ओरियंटल आर्ट’चे संस्थापक अबनिंद्रनाथ टागोर. गणितज्ज्ञ आणि गीतकार एकाचवेळी असलेले द्विजेंद्रनाथ टागोर असोत की चित्रकार-व्यंगचित्रकार गगनेंद्रनाथ टागोर….कलाप्रांतातल्या मूर्धन्य टागोरांची यादी न संपणारी.

48917621792_c4c502e62c_k.jpg

कोलकातावासीयांनी टागोरांचे घर सुंदर जतन केले आहे. दरवर्षी पांच बैशाख (रवींद्रनाथांचा जन्मदिवस) बाईशे श्रावण (पुण्यतिथी) अशा महत्वाच्या दिवशी इथे कलामेळावे, संगीतसभा आणि साहित्य-नाट्य जलसे असे कार्यक्रम होतात. त्यात शेकडो लोक भाग घेतात. कोलकात्याची कलाप्रियता जिवंत असल्याची पुरेपूर खात्री पटते. अन्य संग्रहालयासारखे निर्जीव वातावरण इथे नसते. आवारातच रबींन्द्रभारती विद्यापीठाचे मुख्यालय असल्यामुळे विद्यार्थ्यांचा चिवचिवाट कानी पडतो. आवारात रवींद्रनाथांचा काव्यवाचन करण्याच्या मुद्रेतला देखणा पुतळा आहे. घराच्या आत मंद आवाजात रवींद्रसंगीत सतत ऐकू येईल अशी व्यवस्था आहे. बाहेरच्या घनदाट वस्तीचा आणि धावत्या जगाच्या कोलाहलाचा विसर पडून संगीताच्या मंद सुरावटी ऐकवत जोरासंखो ठाकुरबारीतले कलादालन आणि संग्रहालय तुम्हाला टागोरांच्या महान व्यक्तित्वाचे रुपेरी कवडसे दाखवते.

* * *

प्रतिभाशाली माणसांमुळे शहराचे नाव होते, सन्मान वाढतो हे खरेच. पण सामान्य माणसांचे समूह सुद्धा आपापल्या परीने शहराला समृद्ध करतात. फार जुन्या काळापासून कोलकात्याला वास्तव्य करणाऱ्या, शहराला आपले म्हणणाऱ्या समाजसमूहांबद्दल पुढील भागांमध्ये.

(क्रमश:)


(अन्यत्र पूर्वप्रकाशित. लेखातील कोणताही भाग लेखकाच्या परवानगीशिवाय अन्यत्र वापरू नये. चित्रपटांचे पोस्टर जालावरून साभार.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर.
रवीन्द्रनाथांना एका लेखात कोंबणे अशक्य आहे.
अभिप्रायाबद्दल आभार.

वाचतेय. टागोरांच्या कलाजीवनाचा, सामाजिक आणि साहित्यिक कार्याचा थोडक्यात घेतलेला आढावाही रंजक आहे.
शांतिनिकेतनाविषयीही लहानपणी ऐकले/वाचलेले होते आणि मग आपली शाळा “शांतिनिकेतनातच” असायला हवी होती असे प्रकर्षाने वाटत असे!
अवांतर: तत्कालीन स्वातंत्र्याच्या चळवळीवर टागोरांचा (बंगाली समाज जीवनात ते स्वत: एक भारदस्त आणि उच्च शिक्षित व्यक्तिमत्व असताना) प्रभाव कितपत होता... सहज एक प्रश्न आला मनात. या लेखमालिकेचा तो विषय नसल्यामुळे उत्तर नाही दिलेत तरी चालेल Happy अवांतरामुळे धागा नको भरकटायला.

@ राजदीप
@ rockstar1981

तुम्ही वाचताय याचा आनंद आहे.

.... रविंद्रनाथांच्या पत्नींशी त्यांचं फारसं पटत नव्हतं हे खरं आहे काय?.....

नो आयडिया. त्याने काही फरक पडतो का Happy

@ चंद्रा

मुळात टागोर राजकीय नेते नव्हते, कलाकार होते. त्यात श्रीमंत जमीनदार कुटुंब, इंग्रजी शिक्षण, जगप्रवास यामुळे त्यांच्याबद्दल भरपूर प्रवाद होते आणि आहेत. उदा.:

टागोरांनी ‘जन-गण-मन’ आणि त्यातील 'भारत भाग्यविधाता' हे शब्द हे राजे पंचम जॉर्ज यांच्यासाठी लिहिले.

टागोरांना नोबेल पुरस्कार त्यांच्या प्रतिभेमुळे न मिळता इंग्रजांच्या लांगूलचालनामुळे आणि ब्रिटिश कवी Y B Yeats यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे मिळाला.

टागोरांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात ब्रटिशांची बाजू घेतली.

इत्यादी इत्यादी.

त्याचवेळी जालियांवालाबाग हत्याकांडाचा विरोध म्हणून 'सर' उपाधी परत करणे, स्वदेशी आंदोलनाला स्वतः पुढाकार घेऊन सर्वार्थाने मदत करणे, बंगफाळणीच्या वेळी कर्झन आणि एकूणच ब्रिटिश सत्तेचा रस्त्यावर उतरून निषेध करणे, टिळक-गांधी-नेताजी-अरबिंदो घोष यांच्याबद्दलचा आदर आणि त्यांना वेळोवेळी दिलेले समर्थन, मूळ भारतीय / पौर्वात्य ज्ञानवारसा, समाज सुधारणेची कळकळ आणि त्यासाठी टागोरांनी वेचलेले श्रम यांचा विसर काहींना पडला हे दुर्दैवी आहे.

प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

फरक पडत नाही. पण इतक्या लोकप्रिय व्यक्तीला जोडीदार समजून न घेणारा मिळाला हे खटकते. माझी माहिती खरी नसेलही. ओझरते वाचल्याचं आठवतं म्हणून इकडे विचारले होते. क्षमस्व.

उत्तराबद्दल आभारी आहे, अनिंद्य.
तुम्ही उल्लेखिलेले कुठलेच प्रवाद मला माहित नव्हते! जालियनवाला बाग हत्याकांडाचा विरोध म्हणून टागोरांनी 'सर' उपाधी परत केल्याचे मात्र शालेय इतिहासात वाचले होते. टागोरांचे चरित्र मिळवून वाचले पाहिजे आता.

@ शिल्पा नाईक,

भारत भूमी नररत्नांची खाण आहे, बंगाल अपवाद नाही. लेखमाला कंटाळवाणी होण्याच्या भीतीमुळे उदाहरणे वानगीदाखल आहेत. सूचनेबद्दल आभारी आहे.

@ सस्मित,
१-२ भाग आहेत अजून. मग थांबतो.

प्रतिसादांबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार.

पडळकरांच्या 'कबुलीवाला' लेखामुळे लक्षात आले की आज ७ मे - कलाशिरोमणी गुरुदेव रवींद्रनाथांचा वाढदिवस !

My Salutes !

We have no time to lose,
And having no time we must scramble for a chance.
We are too poor to be late….
- From ‘Endless Time’ by Rabindranath Tagore

आज स्मृतिदिना निमित्त गुरुदेवांची आठवण म्हणून !