तब्बेत : ‘त्यांची’ आणि आपली !

Submitted by कुमार१ on 8 October, 2019 - 22:53

माणूस हा एक प्राणी आहे. जीवशास्त्रानुसार प्राण्यांचे प्रजाती आणि जाती ( Genus & Species) असे वर्गीकरण करतात. त्यानुसार माणूस होमो सेपिअन्स या कुळात येतो. ‘सेपिअन’ हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ ‘शहाणा’ असा आहे. सुमारे २४ लाख वर्षांपूर्वी या कुळाची निर्मिती झाल्याचे मानतात. तिथून पुढे उत्क्रांती होत माणूस आजच्या अवस्थेला पोचला आहे. मानवजातीच्या या अनोख्या इतिहासाचा विस्तृत आढावा युव्हाल नोव्हा हरारी यांनी त्यांच्या बहुचर्चित ‘सेपिअन्स’ या पुस्तकात घेतला आहे. हे विद्वान जेरुसलेम इथल्या विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक आहेत. त्यांचे हे पुस्तक २०११मध्ये प्रकाशित झाल्यानंतर जगभरात खूप गाजले. एव्हाना त्याचा ३० हून अधिक भाषांत अनुवाद झालेला आहे, ज्यात मराठीचाही समावेश आहे. सध्या मी हे मराठी पुस्तक वाचत आहे.

एव्हाना जागतिक साहित्यविश्वात या पुस्तकावर अनेक लेख व परीक्षणे प्रसिद्ध झाली असून चर्चाही झडल्या आहेत. त्यामुळे या संपूर्ण पुस्तकाचा गोषवारा वगैरे लिहीण्याचा माझा इरादा नाही. लेखकाने या पुस्तकात मानवी आरोग्यासंबंधी बरीच मते व्यक्त केली आहेत. अश्मयुगातील मानव, भटके व शिकारी, शेतकरी आणि आजचा आधुनिक शहरी माणूस यांच्या एकंदरीत आरोग्याची तुलनाही केलेली आहे. तेव्हा फक्त आरोग्य हाच धागा पकडून मी या पुस्तकासंबंधी काही विवेचन करणार आहे.

......
तब्बेतीच्या दृष्टीने दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे आपला दैनंदिन आहार आणि शारीरिक हालचाली. अश्मयुगातील आपले पूर्वज आणि आपण यांची तुलना करता यासंदर्भात खूप फरक पडलेत हे उघड आहे. पुस्तकात या जीवनशैलीचे सविस्तर वर्णन आहे. त्यातील काही महत्वाचे मुद्दे असे:

• आहार: अश्मयुगात माणूस गवताळ प्रदेश आणि अरण्यात राहत असे. इथे अन्नाची कमतरता होती. कशीबशी कंदमुळे आणि फळे मिळत. पिकलेली गोड फळे हे तर तेव्हाचे मिष्टान्न होते. जर अन्जीरांनी लगडलेले झाड दिसले तर त्यावर तिथल्या सगळ्या प्राण्यांचा हक्क असे. ही फळे जर बबून-माकडांच्या कळपाच्या नजरेस पडली तर ते त्यावर झडप घालून वेगात फस्त करीत. हे पाहिल्यावर माणूस एक गोष्ट शिकला. जर त्याने ही फळे आधी पहिली तर प्राण्यांच्या नजरेस पडण्यापूर्वीच ती शक्य तितकी खाऊन घ्यायची. त्यामुळे हे खाणे अर्थातच बकाबका होई. असे वारंवार झाल्यावर ती सवय त्याच्या हाडामासात रुजली आणि कालांतराने ती थेट जनुकांत नोंदली गेली. त्यामुळे अन्न दिसले रे दिसले की गरजेपेक्षा जास्तच खायची सवय अंगी मुरली.

• आता शिकारी व भटके यांचे आयुष्य पाहू. ते साधारण ३ दिवसातून एकदाच शिकार करत. त्यामुळे दिवसाचे मोजकेच तास अन्न शोधण्यात जात. ते रोज जेवणाचे वेळेपूर्वी घरी येत. त्यांना कुटुंबाबरोबर बराच वेळ घालवता येई आणि गप्पाटप्पा, मुलांशी खेळणे याही गोष्टी ते निवांत करीत.

• भटकंतीतून मिळणारे अन्न उत्तम पौष्टिक असे. हे अन्न विविधता असलेले होते, जसे की अळंबी, बेरी, फळे, गोगलगायी, कासव, ससा, रानटी कांदे.
• ते लोक सुपोषित होते आणि त्यांची उपासमार होत नव्हती हे त्यांच्या सांगाड्यांच्या अभ्यासावरून सिद्ध झालेले आहे. तसेच ते त्यानंतरच्या काळातील शेतकऱ्यांपेक्षा अधिक निरोगी व उंच असल्याचेही आढळले आहे.

ते एकाच प्रकारच्या अन्नावर अवलंबून नसल्याने वेळप्रसंगी त्यांची उपासमार झाली नाही, असे दिसते.
• ते लोक येताजाता झाडावरील फळे आणि मधाची पोळी यांचे निरीक्षण करत. ती शोधण्यासाठी दक्षपणे कसे बसावे, चालावे आणि धावावे याची त्यांना खूप सवय होत असे. अशा प्रकारे शरीराच्या सतत वेगळ्या हालचाली केल्याने त्यांचे शरीर काटक आणि लवचिक राही.

• कधी एखाद्या भागात दुष्काळ पडला तर ते स्थलांतर करीत आणि नवा अन्नयुक्त प्रदेश शोधत.
• तत्कालीन पर्यावरण खूप ‘शुद्ध’ असल्याचा त्यांना चांगलाच फायदा मिळाला. तेव्हा प्रदूषण काय ते माहित नव्हते. दाटीवाटीने राहण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे हल्लीचे संसर्गजन्य रोग नसायचे.

• मात्र बालमृत्यू खूप असायचे याचे काही पुरावे मिळाले आहेत. जी बालके प्रौढ वयात पोचत त्यांना चांगले आयुष्य लाभे.

तर असे होते हे भटक्यांचे जीवन. अगदी मोकळेढाकळे आणि स्व‍च्छंदी. एकदा का पुरेसे अन्न प्राप्त केले की इतर कुठले झक्कू त्यांच्यामागे नव्हते. काही प्रकारच्या अन्नासाठी मात्र त्यांना प्राण्यांशी स्पर्धा करावी लागली. त्यामुळे असे अन्न दृष्टीस पडताच ते ओरबाडून बकाबका खायची सवय त्यांच्यात मुरली. ही अन्नाची अशाश्वतता संपविण्यासाठी टिकाऊ अन्नाची निर्मिती ही गरज कालांतराने निर्माण झाली असावी. त्यातूनच शेतीचा शोध लागला.

आता हा कृषीक्रांतीचा टप्पा पाहू.
इ स पूर्व ९००० पासून शेतीची सुरवात झाली. सुरवातीस गहू, तांदूळ व बटाटा ही मुख्य पिके घेतली जात. त्यापैकी गव्हाची शेती हा विषय लेखकाने विस्ताराने हाताळला आहे. शेतीपूर्व काळात जमीन अगदी खडकाळ होती. आता गव्हाची लागवड करण्यासाठी ती शेतीयोग्य करणे आवश्यक होते. हे काम प्रचंड कष्टाचे होते. तसेच लागवड केल्यावर त्या रोपांची निगा राखण्यात माणसाचा संपूर्ण दिवस कामात जाऊ लागला. शेतातील तण काढणे हेही कष्टप्रद होते. त्यासाठी दिवसभर उन्हात राबावे लागले. आता गहू हे खूप पाणी खाणारे पीक असल्याने जलसिंचन वाढवावे लागले. पुन्हा या पिकावरील टोळधाडीपासून बचाव करण्यासाठी शेताला कुंपण घालणे असे अनेक कष्ट चढत्या क्रमाने वाढत गेले. भटक्याच्या जीवनशैलीतून हे संक्रमण होत असताना त्याचे तब्बेतीवर असे अनिष्ट परिणाम झाले:

१. पाठीच्या कण्याचे विकार
२. मान आणि गुडघे यांचे विकार
३. हर्निया

या कृषीक्रांतीने अन्न्साठ्यात लक्षणीय भर पडली. पण ही पिके कर्बोदकप्रधान असल्याने आपल्या सर्वांगीण पोषणाच्या बाबतीत तोटा झाला. अति भरपेट खाण्याची सवय आपल्या जनुकांत अश्म्युगातच नोंदवली गेली होती. त्यात आता हे कर्बोदकप्रधान अन्न आपण गरजेपेक्षा जास्तच खाऊ लागलो. त्यातून आरोग्यावरील दुष्परिणाम अगदी बाल्यावस्थेतच दिसू लागले. भटक्या अवस्थेत बालकांच्या स्तनपानाचा कालावधी बराच जास्त होता. परंतु, आता त्यांना मातेचे दूध लवकर थांबवून धान्यांच्या खिरी चालू झाल्या. त्यातून त्यांची प्रतिकारशक्ती दुबळी होत गेली.

अन्नाच्या या मुबलक उपलब्धता आणि साठ्यामुळे हळूहळू लोक लाडावत गेले. तसेच भटकेपणा संपून एका ठिकाणी (शेतीजवळ) स्थिरावणे वाढत गेले. त्यातून स्त्री-पुरुष संबंधांचे प्रमाण वाढले. परिणामी लोकसंख्या झपाट्याने वाढली आणि कालांतराने तिचा विस्फोट झाला.
या सुरवातीच्या शेतीचे अन्य काही परिणाम लक्षात घेण्याजोगे आहेत. तेव्हा आपली गुजराण ही मोजक्या पिकांवर अवलंबून होती. त्यामुळे जेव्हा मोठा दुष्काळ पडे किंवा जबरदस्त टोळधाड पिकांवर येई तेव्हा लोकांची खूप उपासमार होई. त्यातून खूप मृत्यू होत. कारण आता या नव्या जीवनशैलीत भटक्याप्रमाणे नैसर्गिक अन्न शोधण्याचे कष्ट झेपणार नव्हते; किंबहुना ते विस्मृतीत गेले होते.

माणूस आणि अन्नाची उपलब्धता या विषयाकडे आपण ऐतिहासिकदृष्ट्या क्रमाने पाहत गेलो तर असे टप्पे दिसतात:
मिळेल ते आणि मिळेल तेव्हाचे नैसर्गिक अन्न >> शेतीचा शोध >>> हरितक्रांती >>> मुबलक अन्नसाठे >> लाडावलेपणा >>> बहुसंख्यांची बैठी जीवनशैली आणि कर्बोदकप्रधान अन्नाचे बेसुमार सेवन >> विविध आजार.

हरितक्रांती ही शाप की वरदान हा नेहमीचा वादाचा विषय आहे. त्यावर दोन्ही बाजूंनी हिरीरीने चर्चा होतात. त्यातील कुठलीच बाजू पूर्ण बरोबर किंवा चूक असे म्हणता येत नाही. प्रस्तुत लेखकाने या शेतीविषयक प्रकरणाला तर ‘कृषीक्रांती : इतिहासातील सर्वात मोठी फसवेगिरी’ असे शीर्षक दिले आहे.
……………..

आता आपण अतिरिक्त खाणे आणि त्यातून निर्माण झालेल्या आजारांकडे आधुनिक वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहू. विसाव्या शतकात औद्योगीकरण झपाट्याने वाढले. त्यातून सामाजिक सुबत्ता वाढू लागली. ज्या देशांत अधिक संपत्ती निर्माण झाली तिथले लोक सुखासीन होऊ लागले. अन्नसाठे मुबलक झाले. विविध यंत्रांचा मानवी जीवनात शिरकाव झाला. त्यातून पूर्वीच्या सहज शारीरिक हालचालीही कमी झाल्या. उच्च उष्मांकयुक्त आहार आणि बैठी जीवनशैली यांच्या संयोगातून काही आजारांचा प्रादुर्भाव वाढला. यात मुख्यतः लठ्ठपणा आणि मधुमेह (प्रकार २) हे आजार येतात. या आजारांची कारणमीमांसा पाहताना जनुकीय पातळीवरील अभ्यास सुरु झाला.

१९६२मध्ये जेम्स नील या जनुकतज्ञाने यासंदर्भात एक गृहीतक मांडले. त्याचा सारांश असा आहे:
भटक्या अवस्थेत जेव्हा अन्न तुटवडा होता तेव्हा एकदम मिळालेले अन्न शरीरात ऊर्जारूपाने साठवणे आवश्यक होते. त्यामुळे खूप खाण्याची सवय काही जनुकांत बिंबली गेली (बचत-जनुके). अनुवंशिकतेने तो गुण पुढील पिढ्यात जात राहिला. किंबहुना अशी अतिरिक्त ऊर्जा साठवू शकणारी माणसेच जगू आणि टिकू शकली. म्हणजेच हा जनुकीय गुणधर्म तेव्हा गरजेचा आणि फायद्याचा ठरला. मात्र सध्याच्या युगात जेव्हा अन्न मुबलक झाले तेव्हा उत्क्रांतीदरम्यान मिळालेला हा पुरातन गुण आता तब्बेतीस त्रासदायक ठरत आहे.

हे गृहीतक बरीच वर्षे चर्चेत राहिले. त्यावर दोन्ही बाजूंनी वादविवाद झडले. पुरेशा पुराव्यांअभावी ते सिद्ध करता आले नाही. त्यातून काही पर्यायी गृहीतके मांडली गेली:

१. सुबत्तेतून आलेल्या आजारांचे निव्वळ अति खाणे हे कारण असत नाही. पर्यावरणातील अनिष्ट घटकांमुळे व्यक्तीच्या काही जनुकांवर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे असे आजार होण्याची शक्यता बळावते. त्याच्या बरोबरच जीवनशैलीचाही परिणाम निर्णायक ठरतो.

२. बदलत्या जनुकांचे गृहीतक : यानुसार अति खाऊन उर्जेची साठवणूक करणे याचा जगण्याचे (survival) दृष्टीने काही फायदा पूर्वीही नव्हता आणि आताही नाही. लठ्ठपणाचे स्पष्टीकरण असे आहे. शरीरात जास्तीत जास्त किती मेद साठवला जातो, हे काही जनुकांच्या नियंत्रणात असते. या जनुकांच्या बिघाडातून हे नियंत्रण जाते आणि मग मेदनिर्मिती बेसुमार होते.
लठ्ठपणा आणि मधुमेह हे गुंतागुंतीचे आजार आहेत. त्यांची कारणे देखील क्लिष्ट आहेत. कुठलाही एक घटक किंवा जनुक त्यासाठी जबाबदार नाही. अनेक पर्यावरणीय घटकांचा आपल्या जनुकांवर विपरीत परिणाम होतो.. त्यातून ग्लुकोज, इन्सुलिनचे कार्य आणि मेदनिर्मिती या त्रिकुटातील सुसंगती बिघडते. असे झालेल्या व्यक्तीस हे आजार होण्याचा धोका वाढतो. आता जर तिने गरजेपेक्षा जास्त खाण्याची सवय लावली आणि त्याच्या जोडीस व्यायामाचा अभाव असेल तर तो धोका अजूनच वाढतो. अनुवंशिकतेने हे गुणधर्म पुढील पिढीत जातात.

मानवी उत्क्रांती आणि आपले आरोग्य हा कुतूहलाचा विषय आहे. एकेकाळी स्नायूंवर भिस्त असलेला मानव आज मेंदूच्या शक्तीवर अधिक अवलंबून आहे. शेती, औद्योगीकरण, तंत्रज्ञान, आहार आणि जीवनशैली अशा अनेक घटकांचे एकत्रित परिणाम आपल्या तब्बेतीवर झालेले आहेत. एकेकाळचे तुफान बालमृत्यू आपण आटोक्यात आणले. पण त्याच जोडीला प्रौढपणीचे काही चयापचय-आजार एखाद्या साथीप्रमाणे समाजात फैलावले. त्यांचे मूळ शोधण्याचे प्रयत्न अनेक संशोधनांतून सतत चालू आहेत. ‘सेपिअन्स’च्या लेखनातून मानवी उत्क्रांती आणि आरोग्य या विषयावर चांगला प्रकाशझोत टाकलेला आहे.
*******************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ माधव,

२.मीठाच्या शोधानंतर क्षारांचे सेवन आधीच्या प्रमाणात खूप जास्त वाढले. त्याचे काही दुष्परीणाम झाले का
>>>>

अर्थात झाले- विशेषतः सोडियमच्या अतिसेवनाचे. ते सविस्तर माझ्या या लेखात दिले आहेत:
https://www.maayboli.com/node/68970

३. पण मग तसे असल्यास रुग्णांना सलाईन का देतात?
>>>>>
जेव्हा रुग्णास तीव्र उलट्या/जुलाब होतात तेव्हा शरीरातील NaCl, NaHCO3 इ. क्षार मोठ्या प्रमाणात शरीराबाहेर जातात. त्यातून जो असमतोल होतो तो घातक ठरू शकतो. तेव्हा ते देणे आवश्यक. “नॉर्मल सलाईन’ हे द्रावण रक्ताशी एकदम अनुरूप असते.

ही चर्चा चालू असतानाच डॉ. बाळ फोंडके यांचा उत्क्रांतीबद्दल एक छान लेख वाचला :

https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/dhavte-jag/there-is-no...

त्यातील प्राणी आणि माणूस यांची जन्मतःची तुलना रोचक आहे.
मानवी नवजात बालक हे एका अर्थी ते ‘अपुऱ्या’ दिवसांचंच असतं.
जरूर वाचा.

छान लेख.

ग्लुकोज, इन्सुलिनचे कार्य आणि मेदनिर्मिती .....आता जर तिने गरजेपेक्षा जास्त खाण्याची सवय लावली आणि त्याच्या जोडीस व्यायामाचा अभाव असेल तर तो धोका अजूनच वाढतो. अनुवंशिकतेने हे गुणधर्म पुढील पिढीत जातात.>>> असे अनुवंशिकतेने होणारे आजार आपण पूर्णपणे टाळू शकतो का?

जर एका कुटुंबात आजोबांना रक्तदाब-साखर, आजीला रक्तदाब, वडिलांना दोन्ही आणि आईला रक्तदाब असे असेल तर कितीही काळजी घेतली तरी पुढच्या पीढीत हे आजार होण्याची किती शक्यता असेल?

सोनाली, धन्यवाद.

• अनुवंशिकतेने होणारे आजार आपण काही अंशी टाळू शकतो. त्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागतात ! मधुमेह (प्र.२) च्या बाबतीत :
१. आपले वजन कायम नियंत्रणात ठेवणे
२. वयाच्या तिशीपासूनच संबंधित चाळणी चाचण्या नियमित करीत राहणे.
३. समजा त्यात मधुमेहपूर्व अवस्था लक्षात आली तर आहार व जीवनशैलीच्या बदलाने मधुमेह होणे टाळता / लांबवता येते.

• आता तुमच्या उदाहरणाच्या अनुवांशिकतेबद्दल:
अशा नुसत्या कुटुंब इतिहासावरून ठाम उत्तर नाही देता येत. त्यासाठी जनुक-अभ्यास करून मधुमेहाचा ‘जेनेटिक स्कोर’ काढावा लागतो.

उच्च रक्तदाबाची अनुवंशिकता वंशानुसार ३० ते ६० % या रेंजमध्ये असते.

आताच्या मानवाच्या लठ्ठ पणाची कारणे पूर्वीच्या मानवाच्या जीवन
शैलिशी जोडणे मला तरी योग्य वाटत नाही.
अतिरिक्त अन्न साठवून ठेवणे हे सर्व साजीवात दिसून येते अगदी वनस्पती सुध्धा अन्न साठवून ठेवतात .
पण त्या अन्नाचा वापर ऊर्जा वापरून केला जात नाही त्या मुळे लठ्ठ पना वाढतो .
लठ्ठ पना हा जिन्स शी संबंधित आहे हे निसंदेह सिद्ध झाले आहे का?.
बाळ फोंडके जे म्हणतात की मानवी मुल अपुऱ्या शारीरिक वाढीच्या अवस्थेत जन्माला येते कारण पूर्ण वाढ झालेले मुल जन्माला येण्यासाठी जागेची कमतरता असते .
हे जरा विचित्र वाटत नाही का .
कमी आकारात सर्व अवयव पूर्ण वाढू शकतात खूप प्राणी आहेत त्या प्रकारचे .
ससा,कुत्री,ह्यांची पिल्ल जन्मतःच आंधळी असतात .
त्यांचे डोळे उघडत नाहीत .
माणसाचे आयुष्य मोठे असल्या मुळे मुलांची वाढ सुधा हळू हळू होते .
आणि माणूस मुलांची काळजी घेण्यास सक्षम आहे .
हे सुधा विचारात घेणे गरजेचं आहे .

@ राजेश,

लठ्ठपणा आणि जनुके

या संदर्भात चालू संशोधनाची भर घालतो:

१. अतिरिक्त मेद साठविण्यात जनुकांचा वाटा महत्वाचा आहे.
२. अनेक जुळ्या भावंडांच्या अभ्यासात असे दिसले आहे की लठ्ठपणा आणि अनुवांशिकतेचा खूप संबंध आहे.

३. लठ्ठ वडील आणि निरोगी वजनाची आई असलेल्या अपत्यात लहानपणीचा लठ्ठपणा अधिक आढळतो.
४. मानवी जनुकांच्या व्यापक अभ्यासात लठ्ठपणाशी संबंधित बऱ्यापैकी जनुके शोधली जात आहेत.
अर्थात जनुके + आहार +व्यायामाचा अभाव, असे अनेक घटक मिळूनच लठ्ठपणा येतो. (multifactorial).

धन्यवाद डॉ. प्रतिसादांतून पण छान माहिती मिळाली.

>>>>लठ्ठ वडील आणि निरोगी वजनाची आई असलेल्या अपत्यात लहानपणीचा लठ्ठपणा अधिक >>>>
हे नव्याने समजले.

अर्थात जनुके + आहार +व्यायामाचा अभाव, असे अनेक घटक मिळूनच लठ्ठपणा येतो. (multifactorial).>>>>>> यातील सर्वसाधारण गुणोत्तर कसे असते ?

प्रकाश,

अगदी % नाही सांगता येत. पण,
आहार +व्यायामाचा अभाव हे अधिक महत्त्वाचे आहे.

तृणभक्षी प्राणी फळ खात नाहीत त्यांचा आहार मुख्यतः झाडाची पाने आणि गवत,
सर्व पक्षी गोड फळ खात नाहीत .
पोपट पेरू, आंबे erc खातो .
पण वटवाघूळ आंबा,पेरू,चिंच,अंजीर अशा फळांना तोंड लावत नाही तो वडाची फळे किंवा त्याच प्रकराची फळे खातो जी माणूस खात नाही .
अशोक झाडाची फळं वटवाघूळ खूप खातात .
म्हणून त्या फळाची मी चव घेवून बघितली होती.
अतिशय तिखट .
थोडक्यात अन्न ची विभागणी निसर्गात अशा प्रकारे केली आहे की .
कोणत्याच एका अन्न प्रकारावर अतिरिक्त बोजा येणार नाही .
माणसाला स्पर्धक फक्त वानर कुळातील च प्राणी होते .
त्या मुळे मोठी स्पर्धा होती अन्न मिळवण्याची अस वाटत नाही .
फळ हा एकाच प्रकार असा होता मानवी आहारात त्याला प्रक्रिया करायची गरज नव्हती .
भाजणे ,शिजवणे हे प्रकार माहीत झाल्यानंतर गहू हा मानवी आहारात आला असणार .
तसा गहू खूप उशीरा आहारात आला असेल.
हरभरा,भुईमुग,चवळी,वाटाणा
हे गहू येण्या अगोदर माणसाला माहीत असतील .
आणि त्याचीच शेती प्राचीन मानव करत असला पाहिजे .

अगदी % नाही सांगता येत. पण,
आहार +व्यायामाचा अभाव हे अधिक महत्त्वाचे आहे.>>>>>>>> ओके पण प्राधान्यक्रम काय असू शकतो?

प्रकाश घाटपांडे
Dr नी एकदा लठ्ठ पणाला जनुक जबाबदार आहेत असे जाहीर केले की तुम्ही आहार वरचे नियंत्रण सोडून देण्याचा विचार तर करत नाही ना ?
म्हणजे दोष जनुक वर टाकून मोकळं होता येईल .
काय हेतू आहे.
( थोड अवांतर)

आहारावरचे नियंत्रण सोडून दिले तर जनुकात दोष नसतानाही लठ्ठपणा येईल ना, मग फक्त जनुकावर दोष टाकण्याचा प्रश्नच येत नाही.

लठ्ठ पणा.
१) जेवढ्या कॅलरी जेवणातून घेतल्या जातात तेवढ्या कॅलरी चे ज्वलन न झाल्या मुळे

अतिरिक्त कॅलरी च चरबी च्या रुपात साठवल्या जातात.
म्हणजे व्यायामाचा अभाव.
२) आपल्या पूर्वजांना कडून आपल्याला मिळालेली जनुकांची देणगी.
अन्न चा तुटवडा निर्माण
झाल्या मुळे अन्न चरबीच्या रुपात साठवून ठेवण्याची शरीराची प्रवृत्ती.

३) लाहणपणी आई चे दूध ३ महिने तरी बालकाला मिळायला हवं ते न मिळणे.
४) लहानपणी लागलेली जंक फूड खाण्याची सवय तरुण पाणी वजन वाढण्यास कारणीभूत होवू शकते
ही ठोकळ काही कारण झाली .
पण काही लोकांचा असा अनुभव असतो सर्व बाबींचा विचार करून आहार,विहार ठरवून तसे आचरणात आणले तरी अशक्त पना न येता आणि स्नायू ची ताकत कमी न होता वजन कमी होत नाही .
म्हणून मला वाटतं असंख्य फॅक्टर ह्याला जबाबदार असले पाहिजेत .

पण लठ्ठ पना वाढण्याची सरळ सोपी कारण नक्कीच नसतील अस वाटत .
हा प्रश्न खूप क्लिष्ट असावा असं वाटतं .
Dr नी ह्या बाबत मत व्यक्त करावे

राजेश,
तुम्ही बरेच योग्य मुद्दे नोंदवले आहेत.
एक भर घालतो. जेव्हा एखाद्या आजारासाठी काही कायमस्वरूपी औषधे चालू असतात, तेव्हा ती व्यायामाने वजन कमी होण्यास प्रतिबंध करतात.

अजुन एक प्रश्न गोंधळ उडवतो.
निरोगी शरीर फक्त सडपातळ व्यक्तीचं च असतं की लठ्ठ व्यक्ती सुद्धा निरोगी राहू शकते .
BMI ह्या फॅक्टर ल गंभीर पने घेणे गरजेचं आहे का?
Bmi चा निरोगी पना शी
किती टक्के संबंध आहे

राजेश, चांगला प्रश्न.
'निरोगी लठ्ठपणा' असा प्रकार असतो का, या मुद्द्यावर गेली १० वर्षे वैज्ञानिक चर्चा होत आहे. सध्याचा निष्कर्ष असा आहे की असे काही नसते.

वरवर पाहता जरी लठ्ठ व्यक्तीस कुठला 'आजार' नसला तरी तिच्या शरीरात तसे नसते. पेशींच्या पातळीवर चयापचय बिघाड झालेला असतो. त्यातून भविष्यात काही आजार उद्भवू शकतात.

म्हणून, BMI महत्वाचा आहेच.

लठ्ठपणा हा जास्ती करून जनुकीय कारणामुळे की अति खाण्यामुळे हा वैद्यकातील नेहमीचा काथ्याकूटाचा विषय आहे. या संदर्भातील एक जागतिक अभ्यास परिषद नुकतीच झाली. त्यातील काही रोचक वृत्त :

• परिषदेच्या सुरवातीस एका वैज्ञानिकाने असे विधान केले – लठ्ठपणा हा ४०% जनुकीय तर ६०% जीवनशैलीशी निगडीत आहे.

• त्यानंतर विविध देशांतील संशोधकांनी आपापले निष्कर्ष सभेसमोर मांडले. त्यातले काही ठळक मुद्दे असे होते:
१. जनुकीय बदल ही फार संथ प्रक्रिया आहे. त्यामुळे गेल्या ३० वर्षांत लठ्ठपणाची जी साथ आली आहे, तिचे खापर निव्वळ यावर फोडता येत नाही.

२. अति खाणे हे कारण वरवर महत्वाचे वाटते. पण, शारीरिक हालचाली कमी होणे, वाहनांचा प्रचंड वापर, व्यायामाचा अभाव, बैठे छंद व आवडी ही कारणे अधिक महत्वाची.

३. सामाजिक पर्यावरणातील बदलांचा जनुकांवर लक्षणीय परिणाम. त्यामुळे विशिष्ट जनुकीय रचना नसलेले लोक सुद्धा लठ्ठ होतात.

• परिषद समारोपाचे वेळीस सर्वांनी या मुद्द्यावर मतदान केले. त्याचा निष्कर्ष:

जनुकीय (nature) घटक अधिक महत्वाचे : ५३% मते.
जीवनशैली (nurture) .......,,...................४७% मते !!

सेपिअन्सचे लेखक हरारी यांची कोविदोत्तर जगाबद्दल एक अभ्यासू मुलाखत इथे :

https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/e-conclave-coronavi...

त्यातील रोचक मुद्दे:
१. अमेरिकेच्या जागतिक नेतेपदाला धक्का?
२. जागतिकीकरण संपुष्टात ?
३. लोकांचा धर्माकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणार ?

सध्या वेळ मिळाल्यामुळे हे पुस्तक सावकाशीने वाचत आहे. त्यातून लेखकाने मांडलेल्या इतिहासातील अन्य सामाजिक व राजकीय गोष्टी समजत आहेत. एका प्रकरणातील रोचक वाटलेला भाग इथे देतो :

एके काळी युरोपीय लोकांनी जगभर आक्रमण करून त्यांची साम्राज्ये प्रस्थापित केली होती. या साम्राज्यांमुळे स्थानिक लोकांचे कल्याण की अकल्याण झाले, हा नेहमीचा चर्चेचा मुद्दा असतो. लेखकाने तो फार छान मांडला आहे.

१. जर आपल्याला असे वाटत असेल, की या साम्राज्यांनी जगभर शोषण, छळ आणि हिंसा केली, तर त्यांच्या या कृत्यांनी एखादा ज्ञानकोशही भरेल.

२. याउलट जर असे वाटत असेल, की या साम्राज्यांनी नवी औषधे, आर्थिक सुस्थिती आणि अधिक संरक्षण देऊन स्थानिक प्रजेचे कल्याण केले, तर या मुद्द्यांनी देखील अजून एक ज्ञानकोश भरेल !

मानवी उत्क्रांती संदर्भात एक चांगला लेख : https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/man-is-a-political-a...

त्यातील हा भाग रोचक वाटला :

शिकारकाळात धिप्पाड माणूस टोळीचा प्रमुख होत असे. तो आपले रक्षण करेल, शिकार करून अन्न मिळवण्यात मदत करेल असे टोळकऱ्यांना वाटणे साहजिक होते. या भावनेचे अवशेष आजही अमेरिकेत दिसतात. दोन उमेदवारांतील जो उंच व भारदस्त असेल त्याची निवड राष्ट्राध्यक्ष म्हणून ८३ टक्के वेळा झाली आहे.

Pages