असे का लिहिल्या - बोलल्या जाते ?

Submitted by वाट्टेल ते on 12 August, 2019 - 13:58

मायबोलीवर अनेक ठिकाणी खालील प्रकारची वाक्ये वाचनात आली. उदा.
अमुक एक लेख आवडल्या गेला आहे
या टॉवेलने पाणी चांगल्या प्रकारे शोषल्या जाते
राजाकडून प्रजेवर अन्याय केल्या गेला आहे.

माझ्या शिक्षणानुसार आणि मराठी जितके आठवते आहे त्यानुसार :
लेख आवडला गेला आहे किंवा नुसताच आवडला आहे, पाणी शोषले जाते, अन्याय केला गेला किंवा अन्याय झाला अशी वाक्यरचना मी केली असती. बरीच शोधाशोध करून आवडल्या, शोषल्या , केल्या वगैरेंचा उगम सापडला नाही , नामाच्या लिंग, वचन यानुसार या क्रियापदांची रूपे बदलत नाहीत का? उदा. गोष्ट सांगितली गेली आणि गोष्टी सांगितल्या गेल्या ( मुळात गेली \ गेल्याची इथे गरजही नाही) . TV वरही बऱ्यापैकी प्रमाण मराठी बोलणाऱ्या काही नागपूरकडच्या लोकांना अशा प्रकारे बोलताना ऐकले. पण माझ्या परिचयाची इतर काही नागपुरी मंडळी अशी वाक्यरचना करीत नाहीत.

एक प्रामाणिक शंका, भा. प्र. म्हणून आवडल्या, शोषल्या , केल्या वगैरेंच्या वापरावर कोणी मायबोलीकर प्रकाश टाकू शकेल का ? का असे बोलणे नेहमीच अस्तित्वात होते पण त्याबद्दल माझे घोर अज्ञान समजू ? की व्याकरणदृष्ट्या uniform / प्रमाण करण्यासाठी वगरे असे बोलले \ लिहिले जाते?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विदर्भातल्या मंडळींकडून असे मराठी लिहीले जाते. कारण त्यांची भाषा आणि प्रमाण मराठी यात फरक आहे. प्रमाण मराठी ही त्यांना वेगळी भाषा शिकण्यासारखेच आहे.
व-हाडी किंवा खानदेशातील अहिराणी भाषा जर तुम्हाला वापरावी लागली तर तुमच्या जशा चुका होतील तशाच त्यांच्या बाबतीत मराठीत होतात.

गोष्ट सांगितली व गोष्ट सांगितली गेली, हे सेम नाही,

एक करतरी आहे , एक कर्मणी आहे,

(He) told story
Story was told ( by him)

संजय पगारे - धन्यवाद.
BLACKCAT - सहमत आहे, नुसते सांगितले हा भावे प्रयोग होईल ना ? असो माझे चुकत असेल. मुद्दा जो extra या जोडण्यात येतो त्याकडे लक्ष वेधणे होते.
आता काही जुन्या वैदर्भीय लेखकांची पुस्तके बघते त्यात अशीच शब्दरचना केली आहे का. पु भा भावे, सुरेश भट , राम शेवाळकर यांचं थोडं वाचलं , ऐकलं आहे त्यात extra या जोडलेला आठवत नाही , कदाचित मी पुरेसं वाचलं नसेल. आता हे लेखक विदर्भातले समजावेत का यावरून वाद होऊ शकतो. मायबोलीवर कशावरून वाद होईल सांगता येत नाही पण माझा प्रश्न अगदीच उत्सुकतेपोटी आहे ही खात्री बाळगा.

मलाही उत्सुकता आहे असे का लिहितात? योकु ने लिहिलेले पाहिले आहे. योकु, तु का बरे तसे लिहितोस? पगारेंनी सांगितले ते कारण की अजुनही दुसरे काही कारण?
चिनुक्सनेही हजेरी लावावी.

मिसळपाव साइटवरून हे व्याकरण आलं. कुणाच्या लेखनात हे शब्द आले होते आणि ते गमतीदार म्हणून मुद्दामहून तसे बरेचजण लिहू लागले.

सुनिधी+१११
गंमतीदार म्हणुन?! Uhoh आधीच भाषेची लागलेली वाट काय कमी आहे. त्यात अजुन भर..

मराठी सिनेमा, मालिका यांमध्ये आढळणारा आणखी एक चुकीचा प्रकार म्हणजे -
माझी मदत कर, तिची मदत कर

खरेतर मला मदत कर, तिला मदत कर असे पाहिजे ना???

विदर्भात (ही) असे अजिबात बोलले जात नाही. आम्हाला लग्नानंतर वैदर्भीय मराठी भाषेतच ऐकाव लागते. तिकडून असे काही बोलल्या जात नाही. Happy

माझ्या मते हे कॉन्वेंटमधे शिकलेल्या मराठी (अर्धवटमराठी) नवशिक्षितांचे हे काम आहे . यामुलांचे मराठी अगाध असत. असे बोलणार्‍यांच्या आयाही बहुधा कॉन्वेंटात शिकलेल्या असतात. Happy
(पळा, पळा)

हे असे लिहिणे बोलणे मी इथे माबोवरच पाहिले.

सुरवातीला काही लोकांनी विरोधही केलेला बघितला. त्यावर लिहिणार्यांनी आमच्या इकडे असेच 'लिहिल्या बोलल्या' जाते म्हणून समर्थन केले.

अगदी विदर्भही धरला तरी तिथेही गावोगावी भाषा बदलत असणार. त्यामुळे काही वैदर्भीय जरी आमच्याकडे असे बोलत नाहीत म्हणत असले तरी काही ठिकाणी ही पद्धत असेलही. आमच्या कोकणातले कित्येक शब्द मी ऐकले , वापरले नाहीयेत पण ते शब्द त्या त्या भागात आहेत.

हे विदर्भातून आलेलं नसावं.
माझ्या सासरी असंच बोललं जातं. सासरची मंडळी आणि आधीच्या ३-४ पिढ्या पुण्या-मुंबईतल्याच आहेत.

मला तर असं लिहिणं बोलणं उच्च सुसंस्कृत, शुद्ध बोलणाऱ्या लोकांचं असावं असं वाटायचं. असं बोलता येत नाही याचं दुःख वाटायचं मला.

झंडुत्ववादी होती ना मागच्या आयडीपर्यंत ? बरं असू दे प्रेयर टू प्रेयर
पुढच्या प्रेयरला नवीन घे काहीतरी.

माझ्या आजुबाजुचे काहीजण अणार, नणार, घाणार, पुणार, बणार असं बोलतात.. Proud ऐकणार्‍याला त्यावरुन काय समजायचं ते समजतंच म्हणा.. पण आम्ही कधी त्याचा बाऊ केला नाही.. पण 'हे'च लोक नाशीक असं धडधडीत लिहिलेलं असतानाही नासिक म्हणतात तेव्हा उगीच शिंक आल्यासारखं वाटत रहातं....!!

लिहायला तेवढी प्रमाण की काय म्हणायचं ते मराठी भाषा.. बोलताना मात्र वेगळीच.. Wink

कांदामुळा , विदर्भात मोप साहित्यिक आहेत पण मी ज्यांचे वाचले आहे त्यांचाच संदर्भ मी देणार ना ? वामनराव चोरघडे अजून एक. मला तशी शब्दरचना आढळली नाही म्हणून विचारले. मग तुम्ही सांगा विदर्भातले साहित्यिक जे अशी शब्दयोजना करतात. माझे अज्ञान मी कबूल करत आहेच.

कदाचित साहित्यात नसेल, बोली भाषेत वापरले जात असेल, पण ते कोणत्या भागात ही माहिती मिळवावी म्हणून विचारले कारण माझ्या परिचयाचे नागपूर अमरावतीकडचे लोक असे बोलताना दिसले नाहीत आणि असे बोलले जाते हे ही त्यांना माहित नाही.

बाकी "माझी मदद ( मदत असेही म्हणत नाहीत) कर, अमुक गोष्ट माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे" हे म्हणजे सरळ सरळ हिंदीचे मराठीत रूपांतर आहे, आणि TV वर सर्रास असेच बोलतात. हे असे ऐकून ऐकून आता चिडचिड होण्याच्या पल्याड गेलेय. भाषेत स्थित्यंतरे होतात त्यातलेच एक, अशी मनाची समजूत करून घेतली आहे. आणि कसेही बोलले तरी अर्थ लक्षात येतोच, भाषेचे प्रयोजन फक्त तुम्ही काय बोलता ते समोरच्याला समजले म्हणजे पुरे इतपतच असेल तर ठीक. अजून किती चर्चा करणार, माझ्याकडून पूर्णविराम.

अनेक वैदर्भीय लोकांना असे बोलताना ऐकले आहे. वरोऱ्यातल्या आनंदवनातही असेच बोलतात. अगदी विकास आणि विकास आमटेही ह्याच भाषेत बोलतात.

कांदामुळा , विदर्भात मोप साहित्यिक आहेत पण मी ज्यांचे वाचले आहे त्यांचाच संदर्भ मी देणार ना ? >>> तुम्ही सांगितलेले साहीत्यिक वर्‍हाडी भाषेत लिहीतात का ? ते प्रमाणभाषेत लिहीतात. त्यावर त्यांचं प्रभुत्व आहे. म्हणून बोलीभाषेला हे मापदंड कसे काय लावायचे ?

ज्यांच्या तीन चार पिढ्या प्रमाणभाषेत रूळल्या आहेत त्यांना सोडा. सुरेश भटांचं गझल, उर्दू भाषेवर प्रभुत्व असेल तर महाराष्ट्रात सर्वत्र उर्दू बोलली जाते असे समजायचे का ?

पुन्हा वर्‍हाडी भाषा एकसारखी बोलली जात नाही. खानदेश, वर्‍हाडात अहिराणी आणि वर्‍हाडी याच भाषा बोलल्या जातात हा सुद्धा गैरसमज आहे. या भाषांच्या अनेक बोलीभाषा आहेत. पावरी ही त्यातली एक. आदिवासींची अजून वेगळी. कुणबी बहुल भागातली बोली थोडी वेगळी.

उद्धव शेळके यांची धग आणि मनोहर तल्हार यांची माणूस या कादंब-या त्यातल्या भाषेच्या वेगळेपणामुळे गाजल्या होत्या. गाडगेबाबांच्या जीवनावरील चित्रपटात (देवकीनंदन गोपाळा) वर्‍हाडी भाषा आहे. प्रतिमा इंगोले या लेखिकेची कादंबरी आहे. विठ्ठल वाघ यांची डेबू ही कादंबरी गाजली आहे.

सदानंद देशमुखांची बारोमास वाचली नसेल तर मग कसे चालेल ?

कानाला अशी भाषा खटकते . शब्दरचनाही काहीजण बदलतात उदा. आपण असे करुया नकोत" .पण सध्या मराठी भाषा संकटात असताना कुणाला अक्कल शिकवायच्या फंदात पडत नाही.

माझी मदत कर किंवा तिची मदत कर हे सरळसरळ "मेरी मदद करो" किंवा 'उसकी मदत करो" ह्या हिंदी वाक्यांचे डोळेझा़कुन केलेले भाषांतर आहे. अजुन एक चीड आणणारा प्रकार जो जवळ जवळ समाजमान्य होतोय तो म्हणजे " मराठी असल्याचा आम्हाला गर्व आहे" अश्या पध्दतीचे वाक्य. च्क्क ह्या महाराष्ट्रदिनी हे वाक्य कायप्पावर फिरत होते.

भातात खडा आल्यासारखी खटकणारी काही उदाहरणे:

१. मी कधीपासून रस्त्यावर उभारले होते.
२. आवडल्या गेले आहे.
३. पेन भेटलं का?
४. माऊ भात (इथे यांना मऊ भात अपेक्षित असतो).
५. कोणी चिपकवलं हे?

माझ्या ओळखीचे नागपूरकडचे लोक काही वाक्यात दोन क्रियापदांचा वापर करतात. उदा. मी चाललो गेलो.
हिंदीतील चला गया याचं शब्दशः भाषांतर असावं.

बेळगाव व सीमेवरचें लोक उभारलाय,यायलाय करायलाय असे शब्द वापरतात. अगदी कोल्हापूरपर्यंत आढळतं हे.

उभारलाय,यायलाय करायलाय असे शब्द वापरतात. >>> मराठवाड्यातील लोक पण..असंच बोलतात.
अशणार, नशणार, घाशणार, पुशणार, बशणार असं बोलतात.>>> हे तर डोक्यात जातं.

हे तर डोक्यात जातं >>> हेच ते लोक तुमच्याबद्दल म्हणत असतील. वादात नाही पडायचं पण बोलीभाषा की प्रमाणभाषा हा न सुटलेला वाद आहे.

भाषा दर १२ मैलावर बदलते म्हणतात त्यामुळे कोणती भाषा प्रमाण मानावी हे ज्या त्या व्यक्तिवर अवलंबून आहे.
काहि ठिकानी केलं, गेलं, दिलं ऐवजी केलन, दिलन, घेतलन असे म्हणतात, किंवा दिसते आहेस, ऐवजी दिसतेयस किंवा दिसत्येस असं ही लिहिलं जातं बोललं जातं.

...आवडल्या गेला आहे
...चांगल्या प्रकारे शोषल्या जाते
...अन्याय केल्या गेला आहे.

ह्या पद्धतीने लिहिले जाते, हे खरेच. विशेषतः मराठवाड्यात परभणी, हिंगोली जिल्ह्यांपासून पुढे विदर्भातील वृत्तपत्रांत-नियतकालिकांत हे आढळते. मी काम करीत होतो, त्या दैनिकाच्या नागपूर आवृत्तीतून आलेल्या बातम्यांमध्ये हे सर्रास असे.