रेल्वे कोणाची हो ! रेल्वे आमच्या 'बा' ची....

Submitted by कुमार१ on 22 July, 2019 - 04:42

भारतीय रेल्वेच्या प्रवासातील हा एक प्रसंग. मी एका प्रवासास प्रारंभ केलेला. गाडीत मध्यम स्वरूपाची गर्दी होती. माझा डबा आरक्षित स्लीपर गटातला होता आणि त्यातली काही आसने रिकामी होती. अशातच तीन हिंदी भाषक माझ्या डब्यात आले आणि माझ्या समोरील रिकाम्या आसनांवर बसले. ते बसल्यानंतर थोड्याच वेळात आमच्या आसपासची शांतता भंग पावली. ते तिघे मोठमोठ्या आवाजात असभ्यपणे हिंदीतून बडबडू लागले. त्यांच्या संभाषणातून ते रेल्वेचेच कर्मचारी असल्याचे समजले. तसेच ते ‘रेल्वे आपल्या ‘बा’चीच आहे’ असे त्यांच्या वर्तनातून जाणवून देत होते. आम्ही प्रवासी ते निमूटपणे सहन करत होतो.

थोड्याच वेळात त्यांना एक खेळ खेळण्याची हुक्की आली. त्यासाठी त्यांच्यापैकी दोघे एका बाजूला व तिसरा त्यांच्यासमोर असे बसण्याची गरज होती. मग त्यांच्या म्होरक्याने मला मानेनेच उठण्याची खूण करून दुसऱ्या बाजूस बसण्याचा इशारा केला. मी सहकार्याच्या भावनेतून ते लगेच मान्य केले. ते तिघे खेळायला लागले की निदान शांत तरी बसतील आणि आमचा प्रवास सुखकर होईल, अशी वेडी आशा मला होती. आता त्यांच्या खेळाला सुरवात होणार होती. मग त्यातल्या एकाने अन्य एका प्रवाशाकडून त्याचे बॉलपेन मागून घेतले. आता माझी अपेक्षा होती की कुठूनतरी ते कागद शोधून आणतील. पण छे ! त्यातील एक जण चक्क त्या पेनाने बाजूच्या रिकाम्या आसनावर मोठ्या रेघा ओढू लागला. मला ते असह्य झाले आणि खरे तर एक तिडीक मस्तकात उठली. मी लगेच त्याला हरकत घेतली.

“ अहो, असे करणे बरोबर नाही. ते आसन खराब होईल. त्या पेनाची तिथे उठलेली शाई नंतर तिथे बसणाऱ्याच्या कपड्यांना लागेल,” असे मी ताडकन म्हणालो.

त्यावर तो आसनावर रेघा ओढतानाच मला मग्रुरीने म्हणाला, “ चलता है, कोई फरक नही पडता. और ये शाई कपडेको नही लगती”.
यावर माझ्या अन्य दोघा सहप्रवाशांनी चूप बसणेच पसंत केले.

आता व्यवस्थित रेघा ओढून त्या उर्मटांचा खेळ सुरु झाला. त्यामध्ये त्यांनी रुपयाची तीन नाणी, कागदाचे तीन छोटे बोळे आणि पिस्त्याची तीन टरफले असे चौकटींत मांडले होते. तो खेळ मी पूर्वी कधी पाहिलेला नव्हता. त्यामुळे तो काय आहे हे जाणून घेण्याची खरे तर उत्सुकता होती. प्रवासात अशा प्रकारे ज्ञानार्जन होतच असते. परंतु, त्या तिघांच्या उर्मटपणाचा मला प्रचंड राग आलेला असल्याने मी त्यांच्या खेळाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि खिडकीतून बाहेर बघत बसलो.

जरा वेळाने तिकीट तपासनीस आले. त्यांनी आमची तिकीटे तपासली. त्या तिघांकडे त्यांनी पाहताच त्यांनी “ हम अगले स्टेशनपर उतरनेवाले है,” असे थाटात सांगितले. त्यावर तपासनीसानेही त्यांचा ‘स्टाफ पास’ वगैरे पाहण्याची तसदी घेतली नाही आणि तो पुढे निघून गेला. त्यांनी आसनावर ओढलेल्या रेघा त्याला बहुधा दिसल्याच नसाव्यात !

थोड्या वेळाने पुढचे स्थानक येताच ते तिघे उतरून गेले. मग मी माझ्याजवळील वृत्तपत्राचा कागद वापरून त्या आसनावारील रेघा पुसण्याचा प्रयत्न केला. पण त्याला अर्थातच यश आले नाही. त्या रेघा आता आसनावर अजरामर झाल्या होत्या ! आता बाजूला बसलेल्या एका बाईंना कंठ फुटला. त्या मला म्हणाल्या, “ अहो, ही तरुण मंडळी गरम डोक्याची असतात; आपण त्यांना काही चांगले सांगायला गेलो तर त्यांना खूप राग येतो”. मी त्यावर फक्त ‘हूं’ म्हणालो आणि गप्प बसून चरफडत राहिलो.

रेल्वेच्या कर्मचार्यांनी बेफिकीरीने रेल्वेचीच, म्हणजे सार्वजनिक मालमत्ता विद्रूप करण्याचा हा प्रसंग खूप चीड आणणारा होता. एक नागरिक म्हणून मी तो होऊ न देण्याचा प्रयत्न केला होता पण तो असफल झाला. यापेक्षा दुसरे माझ्या हातात तरी काय होते? आणि माझ्या आजूबाजूच्या सहप्रवाशांचा निव्वळ बघेपणा... त्यावर काय बोलणार? तोही अपेक्षितच म्हणायचा.
......

आपल्याकडील एकंदर झुंडशाही बघता वरील प्रसंग फार ‘किरकोळ’ वाटू शकेल, याची मला कल्पना आहे. २ वर्षांपूर्वी आपण नव्याकोऱ्या ‘तेजस’ एक्सप्रेसमध्ये समाजकंटकांनी घातलेला हैदोस आणि गाडीचे केलेले नुकसान पहिले होते. अनेक गुंड प्रवासात कमालीच्या बेशिस्तीने वागत असतात. प्रत्यक्ष गाडीत पोलीस अभावानेच आढळतात. त्यामुळे सामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. हे सर्व नित्याचेच आहे. तिकीट तपासनिसांचे काम फक्त तिकिटासंबंधी असल्याने आपण त्यांनाही एका मर्यादेपलीकडे हे सांगू शकत नाही. राहता राहिला एक सनदशीर मार्ग. तो म्हणजे प्रवास संपल्यावर स्थानकातील तक्रारपुस्तकात नोंद करणे. पण या प्रकारातून विशेष कारवाई होणे एकूण अवघडच, कारण त्याचा पाठपुरावा आपल्यालाच आपला कामधंदा सोडून करावा लागतो.

वरील प्रसंगातून तर खुद्द सरकारी कर्मचाऱ्यांचीच बेपर्वा वृत्ती आणि मग्रुरी जाणवली. ती अधिकच अस्वस्थ करून गेली.
आपल्या देशात ' स्वयंशिस्त' आणि 'आपण' या दोन शब्दांना एकमेकांचे इतके वावडे आहे का, हा विचार वारंवार छळत राहतो.
**********************************************************
(टीप: हा प्रसंग काही वर्षांपूर्वीचा असून तेव्हा माझ्याकडे स्मार्टफोन नव्हता).

* पूर्वप्रसिद्धी : दै. सकाळ आणि मिपा संस्थळ.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेल्वेत फळे विकणारे नि खाणारे कचरा शिटाखाली निर्लज्जपणे टाकतात, काही पायाने ढकलत दरवाजातून बाहेर लोटतात. मी बऱ्याच वेळा अशी हरकत घेतली. तेव्हा हा कुठला परग्रहावरील प्राणी असा लूक व माझं सांगणं बेदखल करण्याचे अनुभव मला आले आहेत.

मी तर माझ्या परीने सीट वर पाय ठेवून बसणाऱ्या उपनगरीय गाड्या मधील खूप प्रवासी लोकांशी भांडण केली आहेत अगदी स्त्रिया शी सुद्धा.

माझे सरळ मत आहे जोपर्यंत लोक सुधारत नाहीत तो पर्यंत कोणतीच सुविधा देण्याची गरज नाही अगदी पंखा सुद्धा.
आणि जिथे ह्या सुविधा असतील त्या कंपार्टमेंट ला महाग तिकीट असावे

महाग तिकीट घेणारे काय सोवळे नसतात
राजधानी एक्स्प्रेस ला फर्स्ट एसी मधून प्रवासी नॅपकिन, चादरी, ब्लॅंकेट चोरून घरी नेतात

आशु , सहि पकडे है

platform वर थुन्कनार्या ना हटकतो तेव्हा उर्मट उत्तरे दिली जातात / हमरीतुमरी वर येतात
गुट्खा तर नाही थुन्कलो किवा सर्वानाच असे सान्गता का तेही सुशिक्षीत लोकाकडून

मग त्याना बोलुनच घेतो स्वच्छतेची सुरुवात स्वत: पासून करा

रेल्वेत कोणाचं काही ऐकून घ्यायचं नाही, आपलं तिकीट कन्फर्मेड असेल ना, मग घाबरायचं नाही, फुल वाद घालायचा, रेल्वे कर्मचारी असेल नाहीतर कोणी पण असेल, आपण पण आपल्या बा चं आहोत दाखवून द्यायचं, परवा माझ्या कन्फर्मेड सीटवर एक आख्खं कुटुंब बसलं होतं, उठायलाच तयार नाही, हळूच क्रिकेटची बॅट खांद्यावर ठेवून भांडू लागलो, मग हळूहळू सगळे निघाले.
तेच कचऱ्याचं, कचरा सरळ खिडकीबाहेर फेकून देतात, मी माझी लगेच बॅग पुढे देतो, कचरा यात टाका म्हणतो. माझे मित्र मला गाडगेबाबा म्हणतात, मला चालतं. जिथं चुकीचं वाटत असेल, तिथं सरळ सांगायचं, हे चुकीचं आहे, करू नका, नाहीतर लोक लय येड्यात काढायला बघतात.

काही झोनल रेल्वेत टिकिट तपासनिस कुणाचे लाड करत नाहीत आणि ते टग्यांना बरोबर माहीत असते.
तर काही ठिकाणी टगे हवे ते करतात.
पुण्याहून मुंबई डेक्कन एक्सने येणे मोठे दिव्य असतं. पेपर/मोबाइल पाहता येत नाही। इतके लोक दोन सिटांमध्ये उभे असतात. समोरच्या सीटवरच्या आपल्याच प्रवाशाचा चेहरा कर्जतनंतरच दिसतो.

ट्रेन स्टेशनवर उभी असताना टॉयलेट चा वापर करू नये अशा सूचना असतात. तरीही लोक फार घाण करतात. प्लॅटफॉर्मवर उभं रहावेसे वाटत नाही. बिचारे गॅंगमन कसे काम करतात काय माहित. दोन पंचवार्षिक पुर्वीच ग्रीन टॉयलेट बसवणार म्हणून फुशारकी मारली होती असे आठवते.

लोकांना स्वतचं समजले पाहिजे सार्वजनिक वाहनांचा वापर कसा करायला हवा .
ज्यांना समजत नाही त्यांच्या साठी शिक्षेची तरतूद असायलाच हवी आणि ती सुधा ताबडतोप .
तरच थोडी सुधारणा होईल .
इथे नियम तोडणारे परदेशात गेले की बरोबर तिकडचे सर्व नियम पाळतात .
शिक्षा होईल ह्याच भीती पोटी

छान लेख. आवडला.
गुंडशाहीपुढे सामान्य माणूस हतबल होतो.
कायद्याची अंमलबजावणी खूप कमी वेळा होते.

नियम तोडणारे परदेशात गेले की बरोबर तिकडचे सर्व नियम पाळतात .

मेट्रो स्टेशनांना कडेकोट बंदोबस्त असतो तसा तिथे असतो.
कोकण रेल्वे स्टेशनात पाहा कसा पहारा असतो. फुकट्यांना हाकलतात.

कुणीही या फलाटावर कायमचे राहा. पाणी,छप्पर,खाणे, टॉइलेट,कमाई सर्व व्यवस्था मिळते काही भारतीय रेलवे स्टेशनांत.

उदय व साद,
धन्यवाद.

कोकण रेल्वे स्टेशनात पाहा कसा >>>

जेव्हा कोकण रेल्वे नवी होती तेव्हाची तिची स्थानके तर लाजवाब होती ! आम्ही प्रवासात प्रत्येक स्थानक बघण्यासाठी कौतुकाने खाली उतरत होतो.

मला खटकलेल्या गोष्टी म्हणजे जनरलचं तिकीट काढून स्लीपर कोच मध्ये दादागिरी करत घुसायचं किंवा टिसीला विकत घ्यायचे. माझ्याबरोबर चे साठ हजार पगार घेणारे लोक विदाऊट प्रवास करायचे हे पाहून तळपायाची आग मस्तकात जायची.
एकदा प्लॅटफॉर्मवर गाडीची वाट पहात होतो. बरोबर असलेले लोकं भ्रष्टाचारावर चर्चेत रंगून गेले होते. गाडीची वेळ आली तेव्हा मी म्हटलं च्यायला जनरलला लयी गर्दी असेल. तर एक दोघे म्हणाले काय नाही स्लीपर मध्ये चढायचं आणि टिसीला पन्नास रुपये द्यायचे. मी म्हटलं मी जनरलनेच जातो. टिसीला पैसे देणे भ्रष्टाचार नाही का. आतातर लयी बाता मारीत होते. भावडे लगेच मारामारी वर आले.

मला एक प्रश्न आहे की बौद्ध लोक चैत्यभूमीवर जातात तेव्हा खरेच रेल्वे प्रवास फुकट असतो का. बऱ्याच जणांकडून या काळात रेल्वे तिकीट आकारत नाही असे ऐकले आहे.

मला खटकलेल्या गोष्टी म्हणजे जनरलचं तिकीट काढून स्लीपर कोच मध्ये दादागिरी करत घुसायचं किंवा टिसीला विकत घ्यायचे. >>>
+ १११
अशा लोकांमुळेच आरक्षित स्लीपर या वर्गाला काही अर्थ राहिलेला नाही.

सार्वजनिक सुविधा बेजबाबदारपणे वापरण्याच्या बाबतीत आपल्या लोकांत कुठलेही मतभेद नसतात ! असे सगळे लोक 'चलता है' याच पक्षाचे असतात.

सार्वजनिक सुविधा बेजबाबदारपणे वापरण्याच्या बाबतीत आपल्या लोकांत कुठलेही मतभेद नसतात ! असे सगळे लोक 'चलता है' याच पक्षाचे असतात.

डॉ तुम्ही म्हणताय ते दुर्दैवाने बरोबर आहे. माझे वडिल रेल्वेतच नोकरीस असल्याने हे सर्व माहीत आहे. फक्त फरक हाच की वडलांना शिस्तीची आवड असल्याने नोकरीतले अधिकार दुसर्‍या ठिकाणी गाजवुन त्रास देणे हे त्यांना मान्य नव्हते आणी नाही. आम्ही कधीही बाबांना दुसर्‍यावर फुकटची अरेरावी करतांना बघीतले नाही.

बाकी बिहार व उ प्रदेशातुन येणार्‍या कुठल्याही गाड्या बघा, त्यात कमालीची अस्वच्छता, गर्दी आणी बेशिस्त असते. हे लोक जगाच्या अंतापर्यंत सुधरणार नाहीत, हेच काय आपले भारतीय जगभरात कुठेही गेलो तरी भारताचे नाक कापुनच येऊ असा चंग बांधुन बसलेत. कालच्या लोकमत मधली बातमी बघा मिळाली तर. भारतीय पर्यटकांबाबत आहे, लिंक मिळाली नाही.

मला एक प्रश्न आहे की बौद्ध लोक चैत्यभूमीवर जातात तेव्हा खरेच रेल्वे प्रवास फुकट असतो का. बऱ्याच जणांकडून या काळात रेल्वे तिकीट आकारत नाही असे ऐकले आहे. >> रेल्वेला माहिती अधिकारांतर्गत हि माहिती विचरता येईल.

भारतीय पर्यटकांबाबत आहे, लिंक मिळाली नाही.>> बालीला गेलेल्या पर्यटकांबद्दलची का?

रश्मी..
धन्यवाद, सवडीने बघतो.
एकूण शिस्तप्रिय लोक कमीच हे खरे.

रेल्वे एक उदाहरण. एकुणातच भारतीयांची सार्वजनिक जागेतील वागणूक हा एक मोठा न संपणारा आणि न सुधारणारा विषय आहे.

हर्ष गोएंकांनी केलेलं ट्विट आणि बाली पर्यटकांचा व्हिडीओ या दोन अत्यन्त लाजिरवण्या घटना आहेत.

हर्ष गोएन्काना अपमानास्पद वाटलेली 'भारतीयांसाठी सूचना' ही हॉटेलवाल्यांच्या नेहमीच्या अनुभवातून आलेली असणार. मला ती अजिबात अपमानास्पद वाटली नाही कारण जीनेव्हा मध्ये आम्ही ज्या हॉटेलमध्ये काही तासासाठी राहिलो होतो, तिथे कोणत्या तरी ट्रॅव्हल कंपनीकडून मराठी ग्रुप आला होता. त्यांनी ब्रेकफास्ट हॉल आणि एकूणच हॉटेल मध्ये जो काही हैदोस घातला होता की आम्हीच embarrass झालो. हॉटेलमधील स्टाफ आमच्याकडे त्यांच्या जंगली वागण्याबद्दल तक्रार करत होते आणि आम्ही पटापट ब्रेफ करून लवकर निघून कसं जाता येईल याच्या विचारात होतो. तो किस्सा हा एक मोठा लेखाचा विषय आहे.